अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात.
झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ?
मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा शब्दच मुळात केलेला नाही. म्हणजे वनस्पतींना खातोय म्हणजे जीवहत्या वगैरे काही नाही. अखिल मानवजातीला योग्य पूरक अशी रचना निसर्गाने केलेली आहे, हे विसरून चालणार नाही.
आता आणखी एक लघुशंका.. प्रण्यांपासून मिळते म्हणून, दूध पण मांसाहारी म्हणे.
वाद घालायचेच ठरवले तर अश्या शंका ठीक आहेत. पण मुळात मांसाहारी या शब्दामधेच त्याची मर्यादा स्पष्ट होते. ज्यामधे मांस आणि त्यातील रक्त असते, तसेच ते मांस ज्याला चिकटलेले असते ते हाड, किंवा अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे झाल्यास आयुर्वेदात जे धातु म्हणून वर्णन केले आहेत, तत्या रक्तापासून पुढील धातुंचे सेवन करणे म्हणजे मांसाहार ! असा ढोबळ विस्तार करता येईल. यात दूध येत नाही. पण अंडी येतात.
असो.
व्याख्यांच्या मर्यादेच्या जाळ्यात न अडकता, आपण माणसासाठी, आयुष्य वाढण्यासाठी, वाढलेलं आयुष्य संपूर्ण पणे निरोगी निरौषधी जगण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण बघतोय ना? मग निरर्थक वादात कशाला शिरा ?
तुटे वाद संवाद तो हितकारी….
आयुर्वेदात हितकर आणि अहितकर या शब्दाचा खूप विस्तृतपणे अर्थ टीकाकारांनी सांगितला आहे.
आयुर्वेदाच्या उपयोगितेचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात,
हिताहितम् सुखं दुःखम् ।
आयुस्तस्य हिताहितम्
मानंच्च तच्च यत्रोक्तं,
आयुर्वेद स उच्चते।।
अखिल मानवजातीला योग्य काय अयोग्य काय, हितकर काय अहितकर काय, सुखकर काय दुःखकर काय, या सर्वांची चर्चा किंवा अभ्यास, विचार ज्या शास्त्रात केला जातो, त्यालाच आयुर्वेद म्हणतात.
पशु खातात केवळ पोट भरण्यासाठी
मूर्ख खातात केवळ चव वाढण्यासाठी
संत खातात साधना करण्यासाठी
आणि बुद्धिमान खातात,
शक्ती, आयु, आरोग्य मिळवण्यासाठी…
आपण जो आहार खातो, त्याचा आपले आचार विचार, चिंतन, मनन, व्यवहार, स्वभाव, यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. म्हणूनच जैसे अन्न तैसे मन असे म्हटले जाते.
शरीराचे स्वतःचे एक अर्थशास्त्र असते. अत्यंत आवश्यक असेल त्याची पूर्तता पहिल्यांदा केली जाते. त्यानंतर कमी महत्वाच्या गोष्टींकडे शरीर लक्ष देते.
जसे अत्यंत गरीब व्यक्तीला प्रथम पोट भरण्यासाठी अन्न हवे असते. मग कपडे, घर, मनोरंजन, स्वादिष्ट भोजन वगैरे. शरीराच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावरच मनाच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. मन संतुष्ट झाल्यानंतरच आत्मा प्रसन्न होण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.
शरीराच्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेनंतर ऊरलेली उर्जा, मनाच्या संतुष्टीसाठी वापरली जाते. त्यातून शिल्लक असलेल्या उर्जेतून आत्म्याच्या गरजांकडे लक्ष दिले जाते, ज्यांची साधना, उपासना, आराधना योग्य असेल त्यांना या आत्म उर्जेचा लाभ मिळतो. तेव्हाच तो ध्यान समाधी यावर लक्ष केंद्रित करू शकतो.
म्हणजेच ही उर्जा मिळवण्याची सुरवात ही आहारापासून आहे. म्हणून हा आहार जेवढा सात्विक असेल तसे चित्तावरचे संस्कार शुद्ध होत जातात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
16.10.2016