(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • याला जीवन ऐसे नाव भाग ८

    संदर्भ - वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय

    तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय पाहूया.

    जांभळाची किंवा आंब्याची कोवळी पाने चघळून खाल्ली असता, अति तहान कमी होते.
    सर्व प्रकारची तहान कमी होण्यासाठी पावसाचे वरच्यावर धरलेले पाणी मध घालून प्यावे अथवा मातीचे ढेकूळ किंवा कौल किंवा वाळू तापवून पाण्यात विझवून ते पाणी गाळून साखर घालून प्यावे किंवा दर्भ नावाचे गवत पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
    लाह्यांचे पीठ करून साखर आणि मध घालून खीर करून प्यावी.
    साळीच्या लाहयांची कण्हेरी करून प्यावी.
    थंड पाण्याने स्नान करून, थंड गुणाच्या औषधांनी शिजवलेल्या दुधाबरोबर मध साखर घालून जेवावे.
    किंचीत आंबट आणि मीठ घालून मुगडाळीचे तुपाची फोडणी देऊन केलेले कढण जेवणात ठेवावे.
    दुधापासून दही ताक लोणी बनवून काढलेल्या तुपाचे सहा थेंब नित्य नियमाने दोन्ही नाकपुड्यात घालावे.

    याबरोबरच मनाची प्रसन्नता राखावी. नदी, तलाव, डोह अशा शांत थंड जागी जावे. किंवा त्याचे कल्पनाचित्र तयार करून त्यात रमावे.

    जेणेकरून तहान शमली जाईल. असे काही शारीरिक आणि मानसिक उपाय करावे. पण उगाचच पाणी पिऊ नये.

    काही ठिकाणी युक्ती वापरून लेपन चिकित्सा करता येते. जायफळ, वेखंड, हळद अशा उष्ण औषधींचा लेप थंड पाण्यातून केला असता, दोषांचे पाचन होऊन तृषा कमी होते. किंवा काही वेळा उसाचा रस मध वेखंड अशा औषधी पिऊन उलटी करून टाकल्याने देखील तहान कमी होते.

    पाणी सुद्धा पचावे लागते, ते पचण्यासाठी त्यात औषधी घालून पाणी प्यावे. कोणत्याही संस्काराशिवाय पाणी पिणे हे मधुमेह, रक्तदाबवृद्धी सारख्या आजाराचे कारण ठरू शकते.

    आयुर्वेदाचे माहेरघर केरळमधे हाॅटेलमधले पाणी देखील मुस्ता, चंदन, सुंठ घालून उकळवून दिले जाते. केरळमधे आयुर्वेद दैनंदिन जीवनात पाण्यातदेखील कसा मुरवलाय, हे हाॅटेलच्या या उदाहरणावरून लक्षात घ्यावे.

    नैसर्गिकरित्या लागलेली तहान साध्या पाण्याने कमी होते. पण साध्या पाण्याने तहान कमी झाली नाही तर असे औषधी पाणी प्यावे. सर्वसाधारणपणे मधुमेहात अशी तहान लागते. ही तहान कमी होण्यासाठी साध्या पाण्याऐवजी औषधी पाणी प्यावे. म्हणजे पाण्यापासून वाढणारा क्लेद, म्हणजे चिकटपणा कमी होऊन तहान कमी होते आणि साखरदेखील नियंत्रणात रहाते.

    म्हणजेच लागलेली तहान, काही वेळा औषधांनी पण कमी करावी लागते, प्रत्येक वेळी ही तहान फक्त पाण्यानेच भागते, असा गैरसमज नसावा.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    15.12.2016

  • आहारातील बदल भाग ३

    कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.

    समर्थ म्हणतात,
    पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
    उगाच ठेवी जो दूषण
    तो दुरात्मा दुराभिमान
    मत्सरे करी ।।

    आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.

    जसे काम तसे तसा आहार.
    कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
    लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
    " तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",

    तर तो म्हणेल,
    "काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.

    आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
    केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.

    म्हणजे
    काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
    रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
    ऊन्हात काम आहे की एसी मधे.
    ऊद्याची चिंता आहे की नाही.
    शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
    परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
    गरज म्हणून की हौस म्हणून.
    जीभेसाठी की पोटासाठी.
    जीवासाठी की जातीसाठी.
    हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
    मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
    या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
    विचार वेगळा करावा लागेल. लागतो.

    इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.

    मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
    माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    24.09.2016

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग तेरा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे पंचावन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग तेरा

    आपले अवयव जरी आपले असले तरी त्या अवयवांना सार्वजनिक ठिकाणी प्रकट करू नये. अशी कृती आपल्याकडून होऊ नये, जी सार्वजनिक क्षेत्रात निंद्य मानली आहे.

    जसे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मल मूत्र विसर्ग करणे, चुकीचे आहे. यासाठी सरकारने तशी बंद व्यवस्था ठिकठिकाणी निर्माण करून देणं, हा सरकारी व्यवस्थापनाचा भाग आहे. मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी मल विसर्जनासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर यावे लागते, ही शरमेची बाब आहे.

    शरीराच्या मूलभूत गरजा आणि जागेची उपलब्धता यापेक्षा शासनाची पराभूत मानसिकता आणि लोकप्रतिनिधींचे गांधारी धोरण, हे सार्वजनिक स्वच्छता मोहिमेतील मोठ्ठे अडथळे आहेत. केंद्रसरकारचे यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत, ही समाधानकारक बाब आहे.

    परदेशात रस्त्यावरून स्वतःचे कुत्रे फिरवताना देखील त्यांनी केलेली शी शू मालकाला उचलावी लागते. पण भारतात मात्र मर्सीडीज गाडीची काच खाली करून रस्त्यावर थुंकणारे महाभाग देखील कमी नाहीत.

    जे अवयव झाकले जाणे अपेक्षित आहे, ते जाणुनबुजुन दिसतील आणि अंग प्रदर्शन होईल असे कपडे सार्वजनिक ठिकाणी न घालणे, हा नियम पुरुष आणि महिला दोघांसाठी लागू आहे.

    प्रत्येक देशाच्या परंपरा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ब्राझील सारखा देश, अमेरिकेसारखा देश आणि भारतासारखा देश या देशांच्या सभ्यता आणि परंपरा वेगवेगळ्याच असणार. मुस्लिम महिला बुरखा घालणे ही सभ्यता मानतील, भले ती इतराकरीता कट्टर असेल. मुसलमान तरूण मिशी भादरून टाकतील तीच मिशी भारतात प्रतिष्ठेची गोष्ट ठरते. उत्तर भारतात डोक्यावरून पदर घेणं ही सभ्यता आहे, तर दक्षिण भारतात कमरेखाली महावस्त्र आणि खांद्यावर उपवस्त्र घेणं प्रतिष्ठेची बाब समजली जाते.
    भारतातील काही भागात घागरा आणि चोळी हा मुख्य पोशाख आहे तर दक्षिणेकडील काही भागात चोळी वापरलीच जात नाही.

    सांगायचे काय तर या संस्कृती सभ्यता ज्या त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अस्मितेच्या गोष्टी आहेत. त्या तशाच पाळल्या जाव्यात. जागतिकीकरणाच्या किंवा ग्लोबलायझेशनच्या गोंडस नावाखाली, मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचावे का ? हा प्रश्न आहे.

    हात, पाय, ओठ, पोट, कंबर, डोळे, छाती अथवा जननेंद्रिये यांचे प्रदर्शन होऊ नये. याकरीता पालकांनी जागरूक राहून आपल्या कुटुंबाच्या हितासाठी काही कठोर निर्णय वेळोवेळी घेणे आवश्यक आहे.

    कायदे आणि नियम करून किंवा सेन्साॅर बोर्डची स्थापना करून हे प्रश्न सुटतील, असे वाटत नाही. त्यासाठी आपल्या कुल परंपरा, प्रदेश विचार आणि नीतीच्या मर्यादेचे लहानपणापासूनच प्रशिक्षण गरजेचे आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १३.०९.२०१७

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकाहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 28-नैवेद्यम् समर्पयामी-भाग दोन

    देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
    गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
    मोदकच का ?
    गणेशांना आवडतो म्हणून !
    का आवडतो ?
    गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

    देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
    पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

    नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

    वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.06.2017

  • अक्षोटक / अक्रोड

    अक्षोटक / अक्रोड

    अक्रोड चवीला गोड, उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो. हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची व थंड असते.

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३६

    पाण्याची प्रशंसता भाग एक

    पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर !

    हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत नाही, मग तो रोगी असो वा निरोगी, पाणी हेच जीवन आहे.

    निरोगी राहाण्यासाठी वाग्भटजी म्हणतात,
    जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य बारीक होतो.
    जेवणाच्या नंतर पाणी प्यायले असता, माणूस स्थूल होतो.
    तर जेवताना पाणी प्यायले असता मनुष्य सडसडीत राहातो.

    तो मूळ संदर्भ असा आहे.
    समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा : ।

    भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम् ।
    अंते करोति स्थूलत्वं ऊर्ध्व चामाशयात्कफम
    मध्ये मध्यांगतां साम्यं धातूनां जरणं सुखम् ।।

    जेवताना देवाचे स्मरण करून पहिली आपोषणी घेतात. घसा ओला होण्यापुरतेच हे पाणी सांगितले आहे. नंतरचा घास अडकू नये, म्हणून घसा थोडा ओला करून घेणे. एक पळी पाणी उजव्या हाताची तर्जनी आंगठ्याच्या मुळाशी लावून तळहातावर छोटा खळगा करून त्यात एकच पळी पाणी घेतात......

    देवपूजे मधेदेखील कोणत्याही कार्याच्या सुरवातीला आपोषणी घेतात.
    केशवाय... नारायणाय....माधवाय नमः।
    इथेपण तीनच पळ्या पाणी सांगितले आहे....

    पाणी भरपूर प्यायचा नियम जर आपल्या संस्कृती मधे असला असता तर तिथे एक पळीभर ऐवजी, एकेक पेलाभर किंवा एकेक तांब्याभर पाणी प्यायला का सांगितले जात नाही?

    "कारणाशिवाय पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, पाणी प्यायचे असल्यास एक पळीभरच पाणी प्यावे" हा संदेश यातून मिळतो.

    जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक स्राव कमी होतात.भूक मारली जाते. जेवण कमी जाते, त्यामुळे बारीक व्हायला होते. शरीर कृश होते, म्हणून असे करू नये.

    हो. हे आधी ठरवले पाहिजे की, आपण सडसडीत असले पाहिजे. जाड पण नको. आणि बारीक पण नको. केवळ बारीक दिसण्यासाठी, डाएटींगच्या नावाखाली, पाणी पित रहाणे हा रानटी क्रूरपणा आहे. कृपया असे करू नये. आम्ही आमच्या विचारधाराच बदलून टाकल्या आहेत. आम्ही आमचे आदर्शच बदलून टाकले आहेत.

    आमचे आदर्श जर दीपिका नि कॅटरीना असतील तर जीवनात वादळं आल्याशिवाय राहाणार नाही. काय दीपक लावायचे आहेत, ते कर्तृत्वात दाखवा. नुसते 'फिगर फिगर' करण्यात काही अर्थ नाही. शरीर अगदी नाजूक आखीव रेखीव, पण जरा काम सांगितले की कंबर जाते मोडून !

    तरूणांचा आदर्श सुद्धा संजय दत्त नको, तर बटुकेश्वर दत्त हवा. पाश्चात्य विचारांचे पाणी जोखणारा आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा !!

    कृश होणे, बारीक होणे हे, 'अशक्त होणे' या अर्थी आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणून शहाण्या माणसानी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.

    तोंडातील लाळ औषधी असते, पण सकाळी सकाळी तोंड धुवायच्या अगोदरची नाही. रात्रभर तोंडात तयार झालेली, किडलेल्या दाढांमधे भरून राहिलेली, लाळ औषधी कशी असेल ? राजा भोज यानी लिहिलेल्या एका ग्रंथातील संदर्भ असं सांगतो, पण वाग्भटजी असं कुठेही सांगत नाहीत.
    आपले राजे केवळ युद्धच करत नव्हते तर ग्रंथ देखील लिहित होते. आमच्या छत्रपती शंभुराजांच्या संस्कृतमधे लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे नाव तरी आठवत असेल. हे सर्व प्राचीन ग्रंथ खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवेत. असो.

    गोऱ्या कातडीचे लोक काय सांगतात, यापेक्षा आपल्या परंपरा आणि आमचे आप्त काय सांगतात, ते जास्त महत्वाचे. त्यांनी नक्कीच चार पावसाळे जास्त बघितलेले आहेत.

    थोडा विश्वास दाखवूया, आमच्या आप्तांवर !
    त्यांनी आखून दिलेल्या चालीरीती वर !!

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.01.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ

    धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन

    धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. खजूर आणि खारीक, आलं आणि सुंठ, द्राक्षे आणि मनुका या जोड्या लक्षात आणा, म्हणजे हा विषय समजेल. (उगाच आंबटगोड गैरसमज नकोत.)

    ज्या फळामधील रस. (रस म्हणजे जलमहाभूत.) कमी होत जातो, ते टिकाऊ होत जाते. आमरस आणि आंब्याची पोळी ( आमच्या कोकणात आंब्याच्या पोळीला "साट" म्हणतात.) यात टिकाऊ काय आहे ? साट जास्ती दिवस टिकते, कारण त्यातील पाणी कमी होत जाते.

    निसर्गामधे सूर्य हा जणुकाही साक्षात अग्निदेव. अन्न पदार्थातील रस, पाणी, द्रवांश, जलमहाभूत ओढून घेत असतो. याला "आदान कर्म" असे म्हणतात. या पाण्याला शोषून, ओढून घेण्यामुळे अन्न टिकाऊ बनते. आजच्या भाषेत, सूर्यापासून येणाऱ्या काही किरणांमधून काही उपकारक तर काही अपायकारक किरणे येत असतात. या किरणांमधे प्रचंड उर्जा साठवलेली असते. व्हिटामिन डी सारखी उर्जा जी फक्त थेट सूर्य किरणांमधूनच मिळत असते, ती पत्र्याच्या डब्यातील टाॅनिकच्या पावडरीमधे कशी भरतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. असो.

    धान्य वाळवून ठेवल्याने, त्यांना चार पाच कडकडीत उन्हे दिल्याने ती टिकून रहातात, हे सत्य आपण बघतोच आहोत. धान्यामधे टोका, बरड आदि जंतुसंसर्ग देखील होत नाही.

    टीव्हीवरील एका कंपनीच्या बासमती तांदळाची जाहीरात बघितली आहे ? ती कंपनी चक्क जाहीरात करते आहे, की आमचे तांदुळ एवढे जुने करून ठेवल्यानंतर, आता आम्ही विकायला काढले आहेत. ( म्हणून त्याची किंमत एवढी जास्त आहे)
    बिझनेस सोडला तर जाहीरातीमधे तथ्य आहे. जुना तांदुळ शिजल्यानंतर, तो वाफेवर झाकून ठेवल्यानंतर, छान फुलतो. नवीन तांदळाचा भात केला तर कसा होतो, ते सुगृहिणीला विचारून बघा. शिजताना कमी पाण्यात जरी शिजवला तरी, नवीन तांदळामधे अंगभूत पाणी जास्ती असल्याने, शिजताना जरा जोरात ढवळले तरी त्याची कणी होते, तुकडा पडतो, परिणामी तो भात चिकचिकित, गिजगिजीत होतो. अशा भाताची बिर्याणी कशी चांगली होणार ?

    भातात अपेक्षित असलेला मोकळेपणा येण्यासाठी तो जुनाच हवा ! जुना करूनच वापरायला हवा.

    प्लॅस्टिकच्या डब्यात भात साठवून ठेवले तर, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम तर त्यावर होणारच. प्लॅस्टिकमधे उष्णता असतेच, पण डबा अगदी "एअर टाईट" झाल्यामुळे भाताच्या गोट्यातील आतील पाण्याची होणारी जी वाफ आहे, ती कुठे जाणार ? ती बाहेर तर जाऊच शकत नाही, म्हणजे ती पुनः डब्यातील भातातच मुरून राहते.

    गवताच्या मुडीत साठवून ठेवलेला भात आणखी हलका होतो, कारण हे गवताच्या मुडीत, साठवलेले भात "वेल व्हेंटिलेटेड" असते. या मुडीतून भाताचा गोटा बाहेर पडणार नाही, पण तयार होणारी वाफ मात्र गवतामधून बाहेर जायला, भरपूर जागा असते. हीच तर निसर्गाची किमया आहे.

    गवतामधे मात्र प्रचंड उष्णता दडलेली असते. ही उष्णता मुडीमधील भातातील जलांशाचे, वाफेत रूपांतर करायला पुरेशी असते.

    आवश्यक असतील ते बाकी सर्व बदल घडवायला गवताच्या मुडीतील निसर्ग समर्थ आहे.
    सिर्फ अपना "मूड" बनना चाहीये ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.05.2017

  • किचन क्लिनीक – अक्रोड

    किचन क्लिनीक – अक्रोड

    अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
    अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
    अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.

    अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
    हृदयाला हितकर असतात.

    अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.

    अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग १

    अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात.
    झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ?
    मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा शब्दच मुळात केलेला नाही. म्हणजे वनस्पतींना खातोय म्हणजे जीवहत्या वगैरे काही नाही. अखिल मानवजातीला योग्य पूरक अशी रचना निसर्गाने केलेली आहे, हे विसरून चालणार नाही.

    आता आणखी एक लघुशंका.. प्रण्यांपासून मिळते म्हणून, दूध पण मांसाहारी म्हणे.
    वाद घालायचेच ठरवले तर अश्या शंका ठीक आहेत. पण मुळात मांसाहारी या शब्दामधेच त्याची मर्यादा स्पष्ट होते. ज्यामधे मांस आणि त्यातील रक्त असते, तसेच ते मांस ज्याला चिकटलेले असते ते हाड, किंवा अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे झाल्यास आयुर्वेदात जे धातु म्हणून वर्णन केले आहेत, तत्या रक्तापासून पुढील धातुंचे सेवन करणे म्हणजे मांसाहार ! असा ढोबळ विस्तार करता येईल. यात दूध येत नाही. पण अंडी येतात.
    असो.

    व्याख्यांच्या मर्यादेच्या जाळ्यात न अडकता, आपण माणसासाठी, आयुष्य वाढण्यासाठी, वाढलेलं आयुष्य संपूर्ण पणे निरोगी निरौषधी जगण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण बघतोय ना? मग निरर्थक वादात कशाला शिरा ?

    तुटे वाद संवाद तो हितकारी....

    आयुर्वेदात हितकर आणि अहितकर या शब्दाचा खूप विस्तृतपणे अर्थ टीकाकारांनी सांगितला आहे.
    आयुर्वेदाच्या उपयोगितेचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात,

    हिताहितम् सुखं दुःखम् ।
    आयुस्तस्य हिताहितम्
    मानंच्च तच्च यत्रोक्तं,
    आयुर्वेद स उच्चते।।

    अखिल मानवजातीला योग्य काय अयोग्य काय, हितकर काय अहितकर काय, सुखकर काय दुःखकर काय, या सर्वांची चर्चा किंवा अभ्यास, विचार ज्या शास्त्रात केला जातो, त्यालाच आयुर्वेद म्हणतात.

    पशु खातात केवळ पोट भरण्यासाठी
    मूर्ख खातात केवळ चव वाढण्यासाठी
    संत खातात साधना करण्यासाठी
    आणि बुद्धिमान खातात,
    शक्ती, आयु, आरोग्य मिळवण्यासाठी...

    आपण जो आहार खातो, त्याचा आपले आचार विचार, चिंतन, मनन, व्यवहार, स्वभाव, यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. म्हणूनच जैसे अन्न तैसे मन असे म्हटले जाते.

    शरीराचे स्वतःचे एक अर्थशास्त्र असते. अत्यंत आवश्यक असेल त्याची पूर्तता पहिल्यांदा केली जाते. त्यानंतर कमी महत्वाच्या गोष्टींकडे शरीर लक्ष देते.

    जसे अत्यंत गरीब व्यक्तीला प्रथम पोट भरण्यासाठी अन्न हवे असते. मग कपडे, घर, मनोरंजन, स्वादिष्ट भोजन वगैरे. शरीराच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावरच मनाच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. मन संतुष्ट झाल्यानंतरच आत्मा प्रसन्न होण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.

    शरीराच्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेनंतर ऊरलेली उर्जा, मनाच्या संतुष्टीसाठी वापरली जाते. त्यातून शिल्लक असलेल्या उर्जेतून आत्म्याच्या गरजांकडे लक्ष दिले जाते, ज्यांची साधना, उपासना, आराधना योग्य असेल त्यांना या आत्म उर्जेचा लाभ मिळतो. तेव्हाच तो ध्यान समाधी यावर लक्ष केंद्रित करू शकतो.

    म्हणजेच ही उर्जा मिळवण्याची सुरवात ही आहारापासून आहे. म्हणून हा आहार जेवढा सात्विक असेल तसे चित्तावरचे संस्कार शुद्ध होत जातात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    16.10.2016

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १६

    सुखाच्या कक्षा वाढवित जाणे, सुखाचा हव्यास वाढवित नेणे, हा प्रमेहाचा हेतु आहे. यालाच आस्यासुख असे ग्रंथकार म्हणतात. कुठुनही शरीरातील कफ वाढण्यासाठी मदत करणे हा प्रमेहाचा हेतु आहे. असे ग्रंथकार म्हणतात.

    आस्या सुख म्हणजे हालचाली करू नयेत, दोन्ही हात हलवत काम करण्यापेक्षा, एकाच हाताने काम करावे, असे वाटणे, हे आस्यासुखच!

    अहो, कंप्युटरचा माऊस एकाच हाताने हलवित बसण्यापेक्षा केवळ डोळ्यानीच तो ऑपरेट करणे, असे अॅप सुद्धा आले आहे, एका हाताचे एक बोटसुद्धा हलवायला नको. फक्त डोळे फिरवायचे की कर्सर हलतो. हे आस्यासुख.!

    उभे राहून काम करण्यापेक्षा किंवा फिरत फिरत काम करण्यापेक्षा बसून काम करावे असे वाटणे. बसताना सुद्धा खाली जागा नीट समतल असावी, एखादी बैठक असावी, असे वाटणे. सतरंजी मिळाली की सतरंजीपेक्षा आणखी मऊ आरामशीर आसनावर बसावे, एकदा बसले की उठू नये असे वाटणे, बसलो तर टेकून बसावेसे वाटणे, टेकून बसलो तर टेकायला मऊ तक्क्या असावासा वाटणे, तक्का मिळाला तर उशी हवीशी वाटणे,बसायला जागा मिळतेच आहे तर खुर्ची का नको ? मग ही खुर्ची काटकोनीच कशाला, त्यापेक्षा विशालकोनी बरी. हे आस्यासुख !!

    आरामखुर्चीवर बसल्यावर पुढे पाय समांतर टेकण्यासाठी टेबल हवे, असे वाटत रहाणे, पण मागे काय चालले आहे हे समजत नाही, त्यासाठी ही आरामखुर्ची गोल फिरणारी हवी ..... आरामखुर्चीवरच बसायचे मग नुसतीच कापडवाली आरामखुर्ची कशाला, फोमचीच वापरूया..... हे आस्यासुख !

    चालण्यापेक्षा सायकल बरी, सायकल पेक्षा स्कूटी बरी, स्कूटीपेक्षा स्कूटर, त्यापेक्षा बाईक, ही बाईक एक पाय झाडून सुरू करण्यापेक्षा एक बोट दाबून सुरू झाली तर बरी !!!!! हे आस्यासुख !!

    कमरेत वाकून जमिनीवरचा केर केरसुणीने काढण्यापेक्षा उभे राहून व्हॅक्युम क्लीनरने केर ओढून घेणे, उकीडवे बसून लादी पुसण्यापेक्षा माॅबने किंवा दांडा लावलेल्या स्पंजने लादी अलगद पुसुन घेणे, किंवा आपण काम न करता, चक्क त्या कामासाठी बाई लावणे, हे आस्या सुख !!!

    सुख हे केवळ बसण्यामधूनच मिळते. बसण्यामधले पुरेपुर सुख मिळवण्यासाठी धडपड सुरू होणे असाही आस्यासुखचा अर्थ आहे.

    सुखार्था सर्व भूतानाम् मताः सर्वा प्रवृत्तयः, असे वाग्भटजी म्हणतात. सर्व प्राणी मात्रांची सुखाकडेच प्रवृत्ती असते, पण प्रमेहामधे, ती जरा जास्तच या कॅटेगरीमधे मोडते.

    याचा अर्थ असा नव्हे की सुखाची कामना, इच्छा करूच नये. सुख मिळावेसे वाटणे, ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण आणखी आणखी, त्यापेक्षा जास्ती सुख मलाच मिळावे. हा हावरटपणा किंवा सुखाचा अतिरेक हे दुःखाचे कारण ठरू नये.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.02.2017