छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषध काम करत नाही - भाग तीन
स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा दुरुस्तीची वेळ आली तर त्या गाडीच्या स्पेशल मेकॅनिककडे नेतो. पण नशीबाने एकदाच मिळणाऱ्या या शरीरावर असे काही अत्याचारी औषधी प्रयोग करीत बसतो, की जणुकाही आपणाला आपले शरीर संपूर्णपणे कळलेलेच आहे.
आपण कोणते औषध घेतोय, तो देणारा, तेवढा विश्वासार्ह आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता, भोंदू वैद्य आणि बोगस डाॅक्टरांच्या मागे अक्षरशः धावतो, यात औषध देणाऱ्याला आपण शास्त्र बदनाम करीत आहोत, याचेही भान नसते. आणि घेणाऱ्याने आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.
प्रत्येक राज्याचे एक वैद्यकीय व्यवसाय नियामक मंडळ असते. जसे महाराष्ट्रात एमसीआयएम. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन हे सरकारने नेमलेले मंडळ आहे. या मंडळाकडे जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विद्यापीठाचे अधिकृत प्रशस्तीपत्रक सादर केले जाते तेव्हा, असे केल्यानंतर डाॅक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा रितसर क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. ते दवाखान्याच्या दर्शनी भागात लावलेच पाहिजे. असा नियम आहे. आपण रूग्ण म्हणून ज्यांच्याकडून औषधे घेणार आहोत, ते योग्य शिक्षण घेतलेले अधिकृत पदवीधर आहेत का, याची खात्री करून नंतरच त्यांची औषधे घ्यायची असतात. नाहीतर औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम होतात, त्यांना सामोरे जावे लागते.
आयुर्वेद, होमियोपॅथी, अॅलोपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध आणि युनानी या किमान पदवीधारकाकडून औषध घ्यावे, असा दंडक आहे.
केवळ लक्षण सांगून, काही वेळा तर पूर्वीच्या डाॅक्टरनी केलेले निदान ऐकवून, स्वतःच पॅथाॅलाॅजीमधे जाऊन, रिपोर्ट करून, नेट वरून थोडीफार माहिती मिळवून, रोगाचे अचूक नावच सांगून, कोणत्याही पॅथीचे औषध घेणे ही खूप मोठी चूक होऊ शकते. यात मूळ शास्त्र बदनाम तर होतेच पण शरीराची जास्ती हानी होते, बोले तो, पूरी वाट लगती है । तेव्हा सावधान!!
रुग्णाची अवस्था, रोगाची व्याप्ती, गंभीरपणा, रोगाचे भविष्यातील धोके, औषधांचे डोस, किती कालावधीसाठी औषध घ्यावे, पथ्यापथ्य इ. सर्व तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ना ! केवळ वाॅटसपवरचे सल्ले, कुणातरी पुष्पादिदिवर विश्वास ठेवून, आंबट तिखट तेलकट बंद करा आणि आमची अमुक औषधे घ्या, टीव्ही वरील जाहीराती वाचून, शेजाऱ्यांचे ऐकून, घरी आलेल्या एजंटकडून औषधोपचार ठरवणे, हा चक्क मूर्खपणा आहे.
अनेक वेळा आयुर्वेदीय औषधांमधे अॅलोपॅथीच्या औषधांची भेसळ केली जाते. त्यातही त्वरीत वेदनाशामक म्हणून स्टिराॅईड असलेली औषधे जास्त प्रमाणात दिली जातात, याचे परिणाम न सांगता सुद्धा थोबाडावर दिसतात. कानाखाली सूज येणे, औषध घेतल्यावर लगेचच दुख कमी होणे, औषध थांबवले की परत त्रास सुरू होणे, भूक खूप लागणे, तेच औषध मला परत परत घ्यावेसे वाटणे, ही सर्व स्टिराईड पोटात जात असल्याची लक्षणे आहेत. जी भविष्यात खूप हानीकारक ठरू शकतात.
किडनी साफ करण्यासाठी लघवी होणारी औषधे, सेक्सची ताकद वाढवणारी, त्वचा विकार कमी करणारी काॅर्टीझाॅन मलमे, आवळा आणि कोरफड ज्युसच्या नावाने मिळणारे पाणी, कफ सिरपच्या नावाने मिळणारा साखरेचा पाक, नोनीचे मार्केटींग, एमेलेमच्या नावाखाली चाललेला टाॅनिकचा धुडगुस, जिममधे सुचवली जाणारी प्रोटीनची खिरापत, कित्ती किती अनावश्यक औषधे म्हणून सांगू...
औषधांचा काळाबाजार हा प्रथितयश औषधांच्या तुलनेत कदाचित दोन ते तीन पट अधिक असू शकेल. असा अंदाज आहे.
हे म्हणजे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशी अवस्था होते. आधीच्या चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम काहीवेळा सहा सहा महिने राहातात, आणि महत्वाच्या औषधाला गुण दिसत नाही, ही अवस्था तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी होते. हे केवळ एकाच पॅथीमधे होत असे नाही तर सर्वच पॅथीमधे हा घोळ दिसतो. यावर सरकारचे लक्ष असेल नसेल, पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्याला, आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी, अनावश्यक औषधांचा अनावश्यक वापर टाळावा असा सल्ला द्यावासा वाटतो.
नको त्या माणसाकडून, नको ती औषधे, नको त्या अवस्थेत घेतली की, परिणाम नको तेच दिसणार. आणखी दुसरं काय होणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.04.2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सतरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
हे सर्व कशासाठी, तर रोग होऊ नयेत यासाठी. रोगामुळे काय होतं ?
आयुष्य कमी होतं.
त्याने काय होतं ?
जीवनातील आनंद हरवून जातो. जीवन हे आनंद निर्माण करण्यासाठी आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसं, हे जग सुखी व्हावे. याचा दुसरा अर्थ दुःख नाहीसे व्हावे, असा आहे. रोगालाच दुःख असे पर्यायी नाव देखील आहे.
रोग म्हणजे दुःख. पण औषध म्हणजे सुख नाही.
एक गोष्ट लक्षात येतेय का बघा. निरोगी राहण्यासाठी ग्रंथकारांनी या श्लोकामधे कुठेही औषधांचा पुसटसा उल्लेख देखील केलेला नाही.
या श्लोकामधे नित्यं हिताहारविहार औषधसेवी.... असं म्हटलेलं नाही. तशी गरजच नाही, याचा विश्वास ग्रंथकारांना आहे.
याचा अर्थ रोग होऊ नयेत यासाठी औषधे कधीही काम करीत नाहीत. हे पटतंय का ?
आयुष्यभर, मरेपर्यंत औषधं खाणं ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे. आपल्याला त्रास असेपर्यंत औषध जरूर घ्यावे. भले कोणत्याही पॅथीचे असावे.
त्रास संपला की औषध संपलेच पाहिजे. जसं कावीळ झाल्यावर कावीळीवरील औषध जरूर घ्यावे.
किती दिवस औषध घ्यावे ?
कावीळ उतरेपर्यंत. म्हणजे कावीळीची शरीरावर असणारी लक्षणे नाहीशी होईपर्यंत औषधे जरूर घ्यावी. नंतर भूक वाढणारी औषधे घ्यावीत. नंतर मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी एखादे जुलाबाचे औषध घ्यावे. नंतर औषधांची गरज संपते.
रोगाची लक्षणे संपल्यानंतर रोगही विसरून जायचा आणि औषधे देखील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगाचा मनातला विचार देखील काढून टाकायचा, की मला असा रोग होता......
भूक वाढल्यानंतर आपला आहार विहार नियंत्रित असेल तर आपल्या शरीराला जे घटक हवे आहेत, ते सर्व शरीरालाच निर्माण करू देत. बाहेरून सतत मोजून मापून औषधांनी मदत पुरवून, शरीर निरोगी राहील, हा भ्रम आहे. असे होत नाही.
जसं कावीळीचं, तसंच तापासाठी. ताप उतरला तरी औषधं खायची आवश्यकता नसते. पण आजकाल रक्तदाब, मधुमेह, पीसीओडी, डिप्रेशन, यासरख्या अनेक आजारात यासाठी कायमस्वरूपी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. काही मोजकेच आजार असे असतात, की औषधं घेईपर्यंत बरे असतात, आणि औषधे संपली की पुनः डोके वर काढतात. याला याप्य असा शब्द आयुर्वेदात वापरलेला आहे. काही आजार असाध्यच असतात, त्यावर औषधेदेखील काही काम करीत नाहीत, मग औषधे पचवायचे ज्यादाचे काम तरी कशाला द्यावे ? औषधे कधीपर्यंत सुरू ठेवावीत हे सुद्धा रोग्याच्या लक्षणावर आणि रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते. याचा निर्णय एखादा कुशल वैद्यच घेऊ शकतो.
औषध हेच माझे सर्वस्व आहे. औषधे घेतल्याशिवाय माझं काही खरं नाही, ताकद वाढण्यासाठी औषधे घेतलीच पाहिजेत, टाॅनिकशिवाय बाळ अंग धरणारच नाही, असं नाही. न्यायालयाच्या भाषेत सांगायचे तर, हे सर्व खोटं आहे
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०६.०८.२०१७
पान खाण्याचा एक विशिष्ट नखरा आहे. “पान लावणे” ही एक खास कला आहे. दर्दी खवैय्याला यातील नजाकत बरोब्बर समजते. आपल्याला हवी असलेली, किंचित पिवळसर झाक असलेली दोन पाने चंचीतून निवडून, हलकेच झटकून सफाईदारपणे पुसत, नखानी त्याचे टोक आणि त्याचा हिरवा देठ खुडुन, दातांनी एकदाच त्याचा चावा घेत देठ टाकून द्यावा. नखांनी पानावरच्या शिरा हलकेच काढाव्यात. या शिरा काढताना पानाला भोक पडता नये, एवढे सराईत झाल्याशिवाय चारचौघात पान खायला सुरवात करू नये. नाहीतर त्याएवढा लाजीरवाणा प्रसंग दुसरा नाही.
मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले.
काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !!
काल मी संप्राप्ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही संप्राप्ती चुकीची / बरोबर असे कुणीही वैद्य बोललेच नाही.
स्त्रीत्व आणि मासिक पाळी पाळणं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आधी बंद होत आलेली मासिक पाळी सुरू तर होऊ देत, मग पाळायची /नाही पाळायची/ कशी पाळायची/ का पाळायची/ आम्हीच का म्हणून, हे विषय घेऊ चर्चेसाठी ! पीसीओडी हा विषय एवढा गंभीर आहे, असं मला म्हणायचंय !
असो.
एक विचार मंथन सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. काही छान विचार वाचायला मिळाले. ज्ञानात खरंच भर पडली.
मुळात हा आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनुक्त प्रकारात बसणारा व्याधी.
त्याचे हेतु, त्याचे निदान त्याची चिकित्सा, त्याची दोषदूष्य संमूर्च्छना, संप्राप्ती भेद इ. वर आणखी सखोल विचार व्हायला हवाय.
एक अत्यंत गंभीर आजार ज्याचे उत्तर अॅलोपॅथीमधे आजतरी अंधेरे मे तीर असेच आहे.
पण आपण आयुर्वेदाचे दृष्टीकोन वापरला तर, हा पीसीओडी रोग थांबवू शकतो का ? त्याचे उत्तर "होय" असेच आहे. एखाद्या रोगाच्या हेतुशोधनापासून अपुनर्भवपर्यंत विचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पहायला मिळेल.
मी "थांबवू" शकतो का असा शब्द मुद्दामच वापरला, विचारकक्षा आणखी वाढवल्या तर घालवू शकतो का ?, असा शब्दही वापरता येईल.
हाच विचार अन्य सर्व कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी करावा लागेल.
जर रोगाचा हेतु शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक
जर हेतु मानसिक असेल तर चिकित्सा मानसिक
जर हेतु आध्यात्मिक असेल तर उपाय आध्यात्मिक करावा लागेल. आणि हेतु सामाजिक असेल तर चिकित्सा देखील सामाजिक करावी लागेल. आणि सर्वच हेतु कारणीभूत असतील तर सगळ्या हेतुंचा विचार एकदम करावा लागेल.
जर आपले शास्त्र हे तीनही शामाआ. सा सुद्धा. मानत असेल तर त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. शारीरिक हेतुंचा विचार केला तर बदललेली जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त पोषण, हेच शारीरिक हेतु मिळतात. जे सगळ्यांना माहिती आहेत.
मानसिक हेतुंचा विचार केला तर मी अगोदर म्हटले तसे, स्त्रीत्वापासून लांब जाणे, तिटकारा वाटणे, वाढता ताणतणाव, नोकरी छोकरी या दोन्ही आघाड्यांवर काम करणे, हे हेतु मिळतात.
आध्यात्मिक हेतुंचा विचारही करावाच लागेल, आध्यात्मिक हा आणखी एक वादाचा मुद्दा होईल, पण जे आहे त्याचा अभ्यास तर करायचाच हवा ना. आईने गर्भावस्थेमधे कुपथ्य करणे, नकोत तेवढ्या गोळ्या खाणे, इ. हेतुंमुळे मुलीला होणारा पीसीओडी हा त्या मुलीसाठी आध्यात्मिक दुष्टीहेतु ठरू शकेल. तिचा काहीही दोष नसताना, तिला पूर्ण आयुष्यभर हा रोग सांभाळत जगावं लागणं, हे तिचं नशीब, असे अनेक रोग आहेत, ज्याची कारणं आध्यात्मिक आहेत.
आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, जेवायला पुरेसा वेळ न मिळणे, किवा जेवणाची वेळ नोकरीमुळे पाळता न येणे, जीवनात शांतपणा नसणे, नवरा किंवा बाॅसची हुकुमशाही, घरातील काही कारणाने घ्याव्या लागलेल्या पाळी पुढे जाणाऱ्या गोळ्या, सक्तीने घ्याव्या लागलेल्या ओसी पिल्स, या सामाजिक कारणामुळे पीसीओडी दिसतो.
पाश्चात्य विचारसरणीच्या तज्ञांनी याचा विचार फक्त शारीरिकपुरता अधिक केला आहे. काही कारणाने होणारा हार्मोन्समधील बदल याचा विचार केला आहे. पण हे हार्मोन्समधील बदल घडवायला, मन, इंद्रिये, कारणीभूत आहेत, हा अधिकचा विचार आपणाला करता येणार आहे. कारण आपण तो शिकलोय. आणि त्याची चिकित्सा आपल्याला आपल्या पद्धतीने चांगली करता येणार आहे.
( मी असं म्हटलेलं नाही, की फक्त कुंकु, बांगड्या आणि पैंजण घालून पीसीओडी बरा होईल. पीसीओडीचा एक हेतु मन आहे, हे विसरून चालणारच नाही. आणि स्त्रीयांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, हे मी आधी नियमितपणे लिहित असलेल्या आरोग्यटीप मधून आपल्या लक्षात आले असेलच.
ज्या मुली कुंकू, बांगड्या, पैंजण वापरतात, आणि ज्यांना पीसीओडीची लक्षणे दिसतात, त्यांचे इतर हेतु शोधावेच लागतील. अव्यायाम, रसायनांचा अति वापर, अवेळी जेवण, लवकर वयात येणे, जीवनशैली ही सर्व कारणे आहेतच ना ! त्याची वेगळी चिकित्सा करावी लागणारच !
मी गेली दहा वर्ष या आजारात जसे कारण (हेतु) तशी चिकित्सा देतोय. माझा संमोहन हा आवडीचा विषय असल्यामुळे मानस हेतु शोधणे, आणि मानस चिकित्सा देणे, त्यामधेही आश्वासन, योगासन, संमोहित अवस्थेत सूचना देणे, नंतर दररोज त्याचा रुग्णाला अभ्यास करायला लावणे, हे मला आवडते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. काही रुग्ण मी मुद्दाम फक्त मनोवह स्रोतस शुद्धीचे वेगळे ठेवले आहेत, ज्यांना संमोहनाव्यतिरिक्त फक्त आहारातील पथ्ये आणि योगासने सांगतो. कोणतीही औषधे देत नाही. कुंकु, बांगड्या, पैजण त्याच रुग्णांना सुचवतो, ज्यांनी कधी ते घातलेच नाहीत. त्यांनी हे उपाय केले तरी परिणाम दिसतात. यांची पुढे मासिक पाळी नियमितपणे होताना दिसते.
शमन औषधांचा आणि शोधन चिकित्सेचा परिणाम सुद्धा दिसतो, पण तो काही काळच टिकतो, पुनः कुपथ्य झाले तर किंवा कालाच्या प्रभावाने पुनः अनुपशय दिसतो. जेवढे आपण सूक्ष्मत्वाकडे जाऊ तेवढी शक्ती वाढत जाते,या न्यायाने, शरीरापेक्षा, मन सूक्ष्म आहे, तिथे केलेली चिकित्सा लवकर परिणाम दर्शवते. आत्मा तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचा अभ्यास गुरूकृपा झाल्याशिवाय सुरूच होत नाही. म्हणून मला असे वाटते,
( मला असे वाटते, म्हणजे मी अहंकाराने म्हणत नाही हो, ) की, सर्वच व्याधींचे हे तीनही हेतु शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, मी जे काम करतोय ते आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय.
पूर्वीच्या काळी देखील स्त्रीयांना मानसिक ताणांना जास्त सामोरे जावे लागत होते. पण पीसीओडीचे प्रमाण एवढे नव्हते. कारण, त्यांची शारीरिक कामेदेखील तेवढीच प्रचंड कष्टांची होती. विहिरीतील पाणी ओढून काढणे, ते घागरीतून कमरेवर घेऊन येणे, सरपण गोळा करणे, चुल फुंकणे, इथपासून, सडा सारवण, रांगोळी काढणे, वाकून केर काढणे, जात्यावर दळणे, कांडणे, उकीडवे बसून कपडे धुणे, भांडी घासणे, पाट्या वरवंट्याने वाटणे, गाई गुरांचे करणे, जमिनीवर डावी मांडी दुमडून जेवणे, ओणव्याने वाढणे, पुनः उष्टशेण करणे, हे सग्गळं तिला एकटीलाच करावं लागत होतं. कोणताही पुरूष मदतीला जात नव्हता. त्यात पोरांकडे तिलाच लक्ष द्यायचं होतं.
तिची करमणूक म्हणजे झिम्मा, फुगड्या, पिंगा, हे सर्व व्यायाम प्रकारच होते. वेगळे योगासनाचे क्लास लावावे लागत नव्हते.
या सर्व प्रकारात तिचे पोट अक्षरशः पिळले जात होते, पिळवटले जात होते, खऱ्या अर्थाने स्त्रीची "पिळवणूक" होत होती. अशा कामामुळे पीसीओडी कशाला होईल ? आज पीसीओडी वाढलेला दिसतोय कारण ही सर्व कामे बंद झाली. मी पुनः एकदा सांगतोय, स्त्रीला कामाला लावायचा माझा हेतु बिलकुल नाही, पण आपण हेतुंचा विचार करतोय, म्हणून जुन्या भारतीय कामांची फक्त आठवण करून दिली.
अन्नाचा दर्जाही उत्तम प्रतीचा होता. कमी खाल्ले तरी (आजच्या भाषेतील पोषणमूल्ये पुरेशी होती. मी आयुर्वेदाचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे मला म्हणे, असे माॅडर्न टर्मिनाॅलाॅजी असलेले शब्द वापरायची सुद्धा बंदी. ) पोटभर नसले तरी पुरेसे होते.
भरपूर काम करायचं आणि काय खायचं, असा एक जमाना भोगलाय स्त्रीनं. आणि आज हे समीकरण बदलत बदलत, व्यायाम-काम कमी करायचं, आणि काय काय खायचं, असा प्रश्न भरल्या घरात पडतोय. चीज, पनीर, चायनीज, पंजाबी या खाण्याबद्दल मी बोलतच नाही.....
एकंदरीत आज स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक कमी, आणि मानसिक जास्त असं झालंय.
म्हणजे पुनः स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक करा, असं शब्दशः मला म्हणायचं नाहीये.
आणि मी फक्त स्त्रीयांना म्हणतोय, कारण लेखाचा विषय पीसीओडी आहे. मी पुरूषांच्या बाजूने बोलतोय, असा (गैर) समज कृपया करून घेऊ नये.
आणि हो, ही सर्व फक्त आपल्या प्रिय भारत देशातलीच वैशिष्ट्य सांगतोय बरं का !
भारतात पीसीओडीचे थैमान आत्ता वीस पंचवीस वर्षातील. पण पाश्चात्य देशात हा आजार त्यांच्या यांत्रिक (सेडेंटरी) जीवनशैलीमुळे चाळीस पन्नास वर्षे तरी जुना असावा.
हा आजार भारतातून हद्दपार करणे, आपल्याला शक्य आहे, कारण त्यांचे निदान हेतू आपणाला आयुर्वेदानुसार शोधता येतील, माहिती आहेत.
गाडी जर चुकीच्या रस्त्याने गेली तर तसंच आणखी पुढे जायचं का ? ज्या रस्त्याचं भविष्य आपणाला माहितीच नाही. तिथून परत मागे फिरणे योग्य नाही का ?
हेतु सेवन बंद झाल्याशिवाय कायमचा संप्राप्तीभंग कसा होईल ? नाहीतर कायमच्या घ्याव्या लागणाऱ्या व्याधींच्या यादीत आणखी एक नाव अॅड होईल.
बघा विचार करून..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4
कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.
देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.
सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
देव अशानी पावायचा नाऽही रं
देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !
देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.
अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.
श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.
पूजा करण्याच्या निमित्ताने,
"हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.
माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.05.2017
आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ.
सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात.
आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात.
गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील.
भारतीय आहारात पंधरावीस प्रकारचे मुख्य पदार्थ मसाला बनवण्यासाठी वापरले जातात. मुख्यत्वेकरून मिरी, दालचिनी, लवंग, बडिशेप, खसखस, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, धने, मोहोरी, हिंग, हळद, यासारखे सुके पदार्थ वापरले की सुका मसाला आणि कांदा, लसूण, नारळ, शेंगदाणे वापरून केलेला ओला मसाला होतो.
मसाल्यातील एक दोन पदार्थ कमी जास्त केले की, मसाल्याचा स्वाद बदलत जातो. जिरे जास्ती वापरले की तो पावभाजीचा मसाला होतो, धनेपावडर जास्त वापरली की सांभार मसाला होतो. त्यामुळे प्रत्येक तिखट पदार्थ कमी जास्त प्रमाणात आपले परिणाम दाखवतात.
गंमत अशी आहे, हे मसाल्याचे पदार्थ तर सर्वच गृहिणी वापरतात, पण हे सर्व मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदीय औषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यांचा युक्तीने वापर केला तर आपला आहार हेच परिपूर्ण औषध होऊ शकतो, हे ज्या गृहिणींना समजले, त्या सुगृहिणी !
या प्रत्येक मसाल्यामधे एकतरी उडनशील तेल असते, जे त्या पदार्थाला विशिष्ट सुगंध, आणि विशिष्ट चव देते. हे तेल औषधी असते, औषध म्हणून पोटात जाणे अपेक्षित आहे.
पण जीभेच्या चोचल्याच्या मागे लागून आपण खमंगपणा वाढण्यासाठी मसाले भाजून वापरायला सुरवात केली आणि मूळ औषधापासून, आहार लांब होत गेला.
काही औषधी बनवताना भाजावी लागतात, शिजवावी लागतात, तळावी लागतात, त्यातील काही पदार्थांचे गुण वाढवायचे असतात तर काहींमधले दोष काढावयाचे असतात, जसे हिंग हा तुपात भाजून वापरावा, मोहोरी तेलात तडतडल्यावर शुद्ध होते. म्हणजे त्यातील उष्णतीक्ष्ण गुण थोडे कमी होतात.
त्यामुळे हा अग्निसंस्कार करणे आवश्यक असते. पण काही ठिकाणी मात्र हे मसाले औषध पूर्ण तयार झाल्यावर कच्च्या स्वरूपात वरून घालायला सांगितले आहे. याला आयुर्वेदीय औषधांच्या परिभाषेतमध्ये प्रक्षेप म्हणतात.
मसाल्याचे पदार्थ भाजले की त्यातील उडनशील तेल उडून जाते, जे पोटात जाणे अपेक्षित असते, त्यामुळे मसाला न भाजता आहारात वापरला तर आपले जेवणच औषधी होईल. म्हणजेच युक्ती वापरली तर आहार हेच औषध बनते.
"आम्हाला वगळा गतप्रभ जणु होतील तारांगणे" च्या धर्तीवर हे मसाल्याचे पदार्थ वापरायचे नाहीत, असे ठरवले तर जेवणातील औषधी भाग जवळपास संपूनच जाईल.
तिखट खाऊच नका, असे म्हणण्यापेक्षा युक्तीने तिखट खा, असे म्हणणे जास्त गोड वाटते ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
11.11.2016
मांसाहारी प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. जी खास आहेत. वैश्विक सत्य आहेत. म्हणजे जगात कुठेही गेलात तरी ही सत्य बदलत नाहीत. वाघ भारतात असो, वा बांगला देशात त्याची वैशिष्ट्ये तीच रहातात.
सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीभेने पितात. जीभ खूप खरखरीत असते. जीभेला आतल्या बाजूला वळलेल्या खाचा असतात. त्यामुळे पाणी चाटले जाते. चाटलेले पाणी या खाचांमधे भरलेले रहाते. सिंह पाणी पिताना पाहिलेत. सिंहच कशाला कुत्रा, मांजर देखील असंच पाणी पितात.
यांचे दात आणि सुळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. भक्ष्य पकडण्यासाठी, खाल्लेले मांस तोडण्यासाठी, हाडे फोडण्यासाठी, सुळे आतमधे वळलेले, वर खाली दोन्ही जबड्यात असतात. या सुळ्यांना धार असते. तीक्ष्ण टोके असतात. यामुळे भक्ष्य एकदा पकडले की सहसा सुटत नाही. मगरीच्या तोंडातील दातांची रचना लक्षात घ्या.
यांना अन्न बारीक करायचे नसते. अन्न रवंथ करायचे नसते. सुळ्यांनी भक्ष्याचे तुकडे केले की अख्खे तुकडे गिळतात. म्हणून यांच्या जबड्यात दाढा कमी असतात. दाढा कमी, चावणे नाही म्हणून यांची पचन करणारी आतली अन्नपचन करणारी काही एन्झाईम्स खूप जास्ती प्रमाणात पाझरत असतात, ज्यामुळे त्या अम्लामधे मांसाचे तुकडे सहज विरघळून जातात. अजगर तर अख्खी नीलगाय गिळतो. त्याच्या पोटात एवढे तीक्ष्ण पाचकरस असतात की त्यात नीलगाईची शिंगे, हाडे, केस, दात, पायाचे खूर सगळं काही सहज विरघळून जाते. यांना शिजवणे सोडाच, जाळले तरी ते भस्म होत नाहीत, असे हे अत्यंत कठीण अवयव पोटातील पाचकरसात सहज विरघळून जातात. ईश्वराने/ निसर्गाने, त्यांना अन्नपचन करण्यासाठी केलेली ही मदतच आहे. त्यामुळे यांनी अन्नाचे तुकडे गिळले तरी सहज पचून जातात. अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर असे काही लक्षणे किंवा आजार त्यांना नसतात.
पायांची नखे देखील सुळ्यांप्रमाणे टोकदार धारदार आणि तीक्ष्ण असतात.झडप घालून भक्ष्याला पकडणे, परत सुटू नये म्हणून नखे रोवून ठेवणे, गरूड, घार, घुबडाची नखे पाहिलीत किती अणकुचीदार असतात ती !
या नखांचे आणखी एक वैशिष्ट्य. ती हलवता येतात. आत बाहेर करता येतात. भक्ष्याला पकडण्यासाठी ही रचना असते. काम झाले की फोल्डींग करून ठेवायची.
यांना अंगावर पाणी घ्यायचा खूप कंटाळा येतो.त्यामुळे ही मंडळी आंघोळ करीत नाहीत. यांच्या अंगाला खूप उग्र वास येतो. दुर्गंधी पण असते.
आवाज तर विचारूच नका. एवढा मोठा आणि भेदक असतो, की डरकाळी फोडली तरी उरात धडकी भरावी.
त्यांची नजर पण एवढी तीक्ष्ण असते, की दूरवरचे भक्ष्य देखील सहज दिसते. घारीला किती वरून जमिनीवर असलेले भक्ष्य दिसते.
आणि यांनी एकदा पोटभर खाल्ले तर पुढे आणखी काही दिवस एखादा प्राणी खायला नाही मिळाला तरी चालते. एवढे प्रोटीन्स त्यांना मिळतात की ते पुढे पुरवून पुरवून वापरता येतात. हाय प्रोटीन डाएट !
सर्व मांसाहारी प्राणी नजर रोखून ठेवत, कळपाने, समुहाने ठरवून शिकार करतील, पण शिकार खाताना एकट्या एकट्यानेच खातील, डूक धरून खातील. खाताना इतर कोणी त्याचेच भाऊबंद शिकार खायला आले तर त्यांच्या अंगावर गुरगुरतील, ओरडतील, धावून जातील. मांजराची पिल्ले, उंदीर पकडताना बघीतलंय कधी.
ईश्वराने यांची आतडी लांबीला कमीच ठेवली आहेत, न जाणो कोणता रोगट प्राणी चुकुन खाल्ला गेला, तर तो लवकरात लवकर पोटातून बाहेर पडून जावा. पुढे जाऊन त्याच्या शरीरातील रोगजंतु, किंवा टाॅक्झीन्स, खाणाऱ्याला त्रास देणार नाहीत.
ईश्वर /निसर्ग महान आहे.
.......क्रमशः ऊद्या
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
25.09.2016
अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.
अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
हृदयाला हितकर असतात.
अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.
अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
सकाळी लवकर उठावे. दोन श्लोक म्हणावेत. तळहात पहावेत. व्यायाम करावा, सर्व आह्निके आवरावीत. आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना करावी. मनातल्या मनात नको. अदृश्यातील देवाची नकोच. आपल्या संस्कृतीमधे उपासना सगुणाची सांगितलेली आहे. सगुणाच्या उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की निर्गुणाची उपासना करायची.
Copyright © 2025 | Marathisrushti