(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • वदनी कवल भाग १

    वदनी कवल घेता
    नाम घ्या श्रीहरीचे
    सहज हवन होते
    नाम घेता फुकाचे
    जीवन करी जिवित्वा
    अन्न हे पूर्ण ब्रह्म
    उदर भरण होणे
    जाणिजे यज्ञकर्म

    हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया.

    मुखी घास घेता करावा विचार.
    कशासाठी हे अन्न मी सेवणार
    घडो माझे हाती नित्य देशसेवा
    म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा

    असा परिवर्तित श्लोक देखील म्हटला जातो. हे श्लोक सामुहीकरीत्या म्हटले जातात.
    समुहाने किंवा एकत्रितरीत्या हे श्लोक म्हणण्याचा एक वेगळा अर्थ अपेक्षित आहे.

    आपण सारे एक आहोत,
    सहनाववतु सहनौ भुनक्तु
    यामधे देखील तोच अर्थ अभिप्रेत आहे.
    एकत्र बसून भोजन करणे, हे एकमेकांची शक्ती वाढवणारे आहे.

    आजकालच्या प्रथेनुसार एकत्र जरी आलो तरी, बसून भोजन काही होत नाही. ते यथाकालोद्भव उभ्याउभ्याच होते. डाव्या हाताने कधीही वाढू नये, वाढून घेऊपण नये. पण डाव्या हाताने घेतल्याशिवाय बुफेभोजन होतच नाही. याकरीता, ( फार फार वर्षा) पूर्वी (सौ.) अन्नपूर्णा सर्वांना वाढून नंतरच आपण जेवायला बसत असे. जे काही हवे ते एकदाच घेऊन नंतरच ती जेवत असे. वाढपी लोकांची संगत हीच तिची पंगत. पण तिच्या चेहर्‍यावर इतरांना वाढण्याचे समाधान झळकत असे.

    सर्व पदार्थ वाढून पूर्ण झाल्यावर, अन्नशुद्धी वाढली जाई.
    अन्नशुद्धी म्हणजे लोणकढे तूप.
    हे तूप (आडव्या चमच्याने) वाढून झाले की, आता आणखी पदार्थ ताटात येणे शिल्लक नाही, असा जणुकाही इशाराच जेवणार्‍यांना मिळत असे.
    म्हणजे अन्नशुद्धी वाढून होईपर्यंत, समोर वाढलेल्या ताटाला हातही लावायचा नाही. असा अलिखित नियमच होता त्यावेळी.

    कोशींबीर वाढून होईपर्यंत लोणचे संपलेले, भाजी येईपर्यंत कोशींबीर संपवलेली. याला सहभोजन म्हणत नाहीत.

    आता पंगतही कालबाह्य झाली आहे.

    एका ओळीत मांडलेली केळीची हिरवीगार पाने, त्यावर रंगीबेरंगी पदार्थांनी सजलेलं आणि गच्च भरलेलं ताट, उदबत्यांचा सुवास,
    एका सुरात, एका तालात म्हटलेले श्लोक, हा सर्व माहोल पाहून आधीच अग्निनारायण अवतीर्ण झालेले असत. आणि वाट बघत बसलेले असत फक्त गजराची !

    जय जऽय रघुवीर समर्थ ऽऽऽ
    हरऽऽहर महाऽऽदेव

    आणि नंतर आक्रमणाला जी सुरवात होई, ती अग्निनारायणाने अगदी तथास्तु म्हणेपर्यंत.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    04.09.2016

  • किचन क्लिनीक – तांबडा भोपळा

    चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हो हाच तो भोपळा ज्यात बसून वाघाला चुकवून म्हातारी लेकिच्या घरी धष्टपुष्ट व्हायला गेली होती बरं का!ह्या लाल भोपळ्यांचे घारगे,वडे,भाजी,कोशिंबीर,भजी,चटणी सगळेच कसे रूचकर लागते.

    हा भोपळा मोठा असला तरी वेलींवर उगवतो बरं का.जसे स्वयंपाकात ह्याचा भरपूर उपयोग होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हा वापरू शकतो.

    लाल भोपळा हा चवीला गोड,तुरट व थंड असून शरीरातील पित्त व वात हे दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.

    चला ह्याचे औषधी उपयोग पाहू:

    १)अतिभूक लागून वारंवार काही तरी खावेसे वाटते तेव्हा भोपळ्याची उकडून केलेली भाजी किंवा तूपात तळलेले वडे खावे.

    २)तोंडास रूची नसणे व अन्न नकोसे होणे ह्यात लाल भोपळ्यांचे दह्यात केले भरीत जीरे व तूपाची फोडणी व सैंधव घालून खावे.

    ३)धावपळ दगदग ह्यामुळे त्रास होत असल्यास १ कप भोपळ्याचा रस+१ चमचा साखर+ १/४ चमचा सैंधव घालून प्यावे.

    ४)भोपळ्याच्या बिया सोलून आतील मगज तूपात तांबूस परतून त्यात साखर घालून लहान लहान लाडू करावे व ते अशक्तपणा मध्ये तसेच लहान मुलांना खायला द्यावेत.

    ५)आजारी व्यक्तीला भोपळा उकडून वाटून त्यात साजूक तूप व जि-याची फोडणी देऊन केलेले सूप द्यावे.

    भोपळा खायचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दहा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6

    एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
    माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात....... इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.

    .......रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, "हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्." असं म्हणून टेबलावर आपटतात.

    एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
    असो.

    .......तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, "बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! "
    नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, "मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !" त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?

    संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, "काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? " मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
    ती तोंड एवढंस करत म्हणाली, " कशातच दोष मिळाला नाही."
    "बरं झालं ना मग."
    "एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?" आता मात्र मला हसू आले, "अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? "
    म्हणाली,
    "मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?"

    बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.

    आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
    औषधे कोणाला द्यायची ?
    जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????

    शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
    Please correlate clinically.
    कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
    म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.

    म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !

    सुटले कोडे मिळाले उत्तर!
    आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.02.2017

  • किचन क्लिनीक – मिरची

    मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
    गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.

    लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
    औषध म्हणून कशी वापरू शकते.

    चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.

    अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील??.

    आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!

    १)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.

    २)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

    ३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.

    ४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.

    ५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.

    ६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.

    मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – अंतिम भाग पंचवीस

    निरोगी कोण ?

    आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
    आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या 'देवदत्त' प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.

    यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.

    जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.

    जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.

    प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
    कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा "नाॅर्मल" वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.

    आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.

    म्हणजे एखाद्याला "तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल " असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.

    पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?

    या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.

    आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
    पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.

    आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?

    सकाळी हलकेच जाग यावी.
    उठल्यावर लगेच "ती" जागा आठवावी.
    पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
    समाधानाची अनुभूती घ्यावी.
    सणसणीत भूक लागावी.
    मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
    दिवसभर गाडी पळवावी.
    तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
    शक्ती पुरवून वापरावी.
    विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
    पुनः भुकेची जाणीव व्हावी.
    हलक्या आहाराने ती पुरी करावी.
    झालेली कामे सहज आठवावी.
    ही ईश्वराची कृपा समजावी.
    आणि मस्त झोप यावी.
    निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
    "तो" मला उठवणार, याची खात्री असावी.
    आणि सकाळी हलकेच जाग यावी.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.04.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेचाळीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस

    बाबा सांगतात...

    हितकारक, थोडे, गोड, सत्य, आणि प्रसंगोचित संभाषण करावे.

    संभाषण कसे असावे तर हितकारक असावे, थोडे कमीच बोलावे, पण सत्य बोलावे, गरज असेल तेव्हा मौन सोडावे.
    प.पू.स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या प्रमाणे "मित मधु भाषण" असावे.
    श्रीकृष्ण बोलतात तसे बोलावे. थोडे गोड, थोडे सत्य ! जिथे जसे आवश्यक असेल तसे. प्रसंगोचित.

    कसे बोलावे, याची इतिहासातील काही उदाहरणे लक्षात ठेवण्यासारखी आहेत.
    विदुराने सांगितलेली विदुरनीती,
    औरंग्याच्या दरबारातील शिवरायांनी दरबाराचा मान कसा राखायचा असतो, याबाबत राजा औरंगजेबाची त्याच्याच दरबारात केलेली कानउघाडणी,
    शिवरायांच्या वकीलाने अफजलकडे जाऊन केलेली यशस्वी बोलणी,
    रावणाच्या दरबारात जाऊन, सीतामाईना सोडून द्यावे अश्या अर्थाचे अंगदाचे बोलणे,
    मुक्ताबाईनी ज्ञानेश्वरांना सांगितलेले ताटीचे अभंग, किंवा चांगदेव पासष्टी,
    रामरायांनी वनवासात जाऊ नये याकरीता भरताने केलेली विनवणी आणि त्यावर श्रीरामांनी केलेले खंडन,
    युद्ध नको म्हणून सांगायला श्रीकृष्ण कौरवांकडे गेला, ती प्रसिद्ध कृष्णशिष्टाई.
    आणि अर्जुनाने युद्ध करावेच यासाठी श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता
    ही सर्व उत्तम संवादाची उदाहरणे आहेत. मुद्दाम सांगण्याचे कारण आता ही उदाहरणे आपल्या शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली आहेत. ती मुळातून आपण अभ्यासावी आणि मुलांना शिकवावी.

    संवाद शब्दांनी वाढतो. मनात काय आहे, हे सुरांवरून कळते. काय करायला हवे हे देहबोलीतून कळते. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून समाधान मिळते.

    या सर्वांचा आरोग्याशी संबंध काय, असे मनात येणं साहाजिकच आहे.
    पुनः एकदा सांगतो, आपल्याला फक्त शारीरिक संतुलन म्हणजे आरोग्य, या संकुचित कोशातून बाहेर यायचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यासाठी हे गुण अंगी असावेच लागतात.

    आपल्याला काय होतंय, हे जर रूग्णाला सांगताच आले नाही तर, वैद्याला रुग्णाच्या वेदना समजणार तरी कश्या ? जर आपल्याला काय होतंय हे सांगता येत नसेल तर घरी असताना शांतपणे एका कागदावर अथवा वहीत लिहून काढावे. त्यावर तारीख, वेळ लिहावी, शक्य असेल तर त्रास होण्याअगोदर चार पाच दिवस आपण काय काय खाल्ले होते, कुठे फिरलो होतो, त्याचा त्रास झाला होता का, इ. गोष्टी पण लिहून ठेवाव्यात. जर ही सर्व माहिती आपल्याला, वैद्यांना नीट सांगता आली, तर वैद्यांना निदान करणे सोपे होते.
    आपल्यालाच नंतर भविष्यात ही आरोग्यवही, (खरंतर अनारोग्यवही) उपयोगी ठरणारी असते.

    रुग्णापेक्षा वैद्यांकडे ही संभाषण चातुर्य असले पाहिजे. योग्य प्रश्न विचारून रुग्णाला काय होते आहे, हे त्याच्याच तोंडून वदवून घेणं ही वैद्याची कला आहे.
    (म्हणजे रुग्णाला पोपट बनवायचे !! )

    विशेषतः पथ्य अपथ्य ठरवताना, रुग्णाचा आधीचा इतिहास समजावून घेणं, वैद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ज्या भाषेत वैद्य शिकलेला आहे, त्यापेक्षा रुग्णाची भाषा कोणती आहे, त्याला समजेल अशा भाषेत त्याला त्याचा रोग समजावून सांगता यायला हवा. त्याच्या बरोबर संवाद साधता यायला हवा. आजच्या भाषेत सांगायचे तर रुग्णाचे कौन्सिलिंग म्हणजे संवाद ! बरं हा संवाद साधत असताना आपली देहबोली म्हणजे हावभाव पण महत्त्वाचे असतात.

    औषधांपेक्षा शब्द हे जास्ती गुणकारी असतात. कारण औषध फक्त पोटापुरते शरीरापुरते असते. शब्द हे त्यापलीकडील मनापर्यंत पोचतात. स्थूलापेक्षा सूक्ष्म हे जास्ती क्षमतेचे असते.

    मनापेक्षा सूक्ष्म आत्मा. त्याच्याशी होणाऱ्या या आत्मसंवादाला शब्दांची पण गरज नसते. तिथे, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ही अनुभुति असते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • आहारातील बदल भाग ५६ – चवदार आहार -भाग १८

    नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी.

    जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही.
    दिसायला बारीक सुरकुतलेली जरी दिसली, तरी जिभेवर चुरूचुर निर्माण करणारी चव काही औरच असते.

    त्रिकटू या आयुर्वेदीय प्रक्षेप द्रव्यातील सुंठ आणि पिंपळीच्या मधे बसलेली ही मिरी कच्चीच वापरली जाते, हे बहुधा पाश्चात्य मंडळींनी पाहिले, तेव्हापासून ते काळी मिरीची पावडर सूप सॅलेडमधे वापरू लागले. मिरची वापरण्याएवढी आपली योग्य प्रकृती नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मिरचीची तहान त्यांनी मिरीवर भागवली बहुतेक !

    आजारपणातून उठल्यावर पहिला घासाच्या तूपभातावर मिरी हवीच. सकाळी दात घासण्याच्या दंतमंजनापासून, पापड आणि ऊसळीपर्यंत तर असतेच. पण अगदी आमरसाच्या वाटीत जावून तुपाच्या बरोबरीने विराजमान होणारी ही मिरी.

    सणसणीत उष्ण तीक्ष्ण गुणाची, उत्तम दीपक म्हणजे भूक वाढवणारी, पाचक म्हणजे पचन घडवणारी, घाम आणून ताप कमी करणारी, ह्रदयाला हितकर, उत्तम जंतुघ्न, कृमींचा नाश करणारी, स्रोतसांमध्ये असलेला आमाचा चिकट अडथळा स्वशक्तीने दूर करणारी, आतून जखम स्वच्छ करणारी, सर्दी खोकल्यापासून डायबेटीस आणि ह्रदयरोगापर्यंत अप्रतिम रिझल्ट देणारी, वात कफावर विजय मिळवणारी आणि पित्ताला वाढवणारी असते. सर्व रोगांचे मूळ असलेल्या, मंद अग्निला वाढविणारी असल्यामुळे, वैद्यप्रिया बनलेली आहे.

    जिथे पाणी, आंबटपणा, गोडपणा जास्त असतो, तिथे मिरी वापरली जाते. म्हणून कदाचित कोकणात जास्त वापरली जाते. कोकणात उत्पन्न होत असल्याने कोकणी प्रकृतीला सहजपणे मानवणारी, तसाच स्वभाव बनवणारी, पण अंतिमतः सुखकर ठरणारी, ही मिरी म्हणजे अगदी कोकणप्रिया. कोकणी महिलेला आपल्या गळ्यामधील मंगळसूत्रातील जणु काळे मणीच वाटावेत, एवढी प्रिय.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    18.11.2016

  • जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 9

    ऋतुनुसार, दिनमानानुसार सर्वसाधारणपणे सकाळी 6 ते 10 हा काल कफाचा, 10 ते 2 पित्ताचा आणि 2 ते 6 हा वाताचा काळ येतो. असेच सायंकाळ पासून सकाळ पर्यंत समजावे.

    जेवण हे भूक लागेल तेव्हा घ्यावे. भूक असेल तेवढेच घ्यावे. परंतु सूर्य असेपर्यंतच घ्यावे. म्हणजे सर्व साधारणपणे दिवसा जेवावे. रात्रौ जेवू नये.

    व्यवहारात, नियम करायचाच झाल्यास, जेवणाच्या मुख्य वेळा दोन सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात.

    पण आपण समजा दुपारी बारा वाजता पोटभर जेवलो तर पुनः चरचरीत भूक किती वाजता लागेल ? रात्री 8 वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? आठ तास. दुपारचे जेवण पचायला फक्त आठ तास.

    समजा, रात्री 8 वाजता पोटभर जेवलो तर पुनः भुक कधी लागते ? पित्ताची प्रकृती असलेल्यांना सकाळी नऊ दहा वाजता. आणि इतरांना चरचरीत भूक कधी लागेल? चरचरीत भूक लागेल, दुपारी बारा वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? सोळा तास. रात्रीचे जेवण पचवायला सोळा तास ?????

    दिवसाचे जेवण पचायला फक्त आठ तास आणि रात्रौचे जेवण पचायला तब्बल सोळा तास जातात. एवढा वेळ का लागतो ?

    उत्तर सोपं आहे, दिवसा सूर्य असतो म्हणून आणि रात्रौ सूर्य नसतो म्हणून.

    आपण हे पाहिलंय की सूर्य म्हणजे अग्नि.
    पचन घडवणारा तो सूर्यनारायण. हजर असला तर पचन होणारच ना ! त्यात विशेष ते काय ?
    प्रश्न येतो तो, रात्रीचं पचन घडवणार कोण ?

    पचन घडवणे म्हणजे नेमके काय हे पण आपण अन्नपचन कसे होते ? या लेखमालेतून पाहिले आहे. पचन म्हणजे रूपांतरण. एका बाह्य घटकद्रव्याचे रूपांतर शरीराला योग्य होईल अशा अवस्थेत बदलवून घेणं. त्याचे शरीरातील वेगवेगळ्या विकरकामार्फत ( एन्झाईम्स) विघटन घडवून आणणे, त्याचे चांगल्या ( उपयुक्त) आणि वाईट (टाकाऊ) भागात विभागणी करणे, चांगल्या भागातून शरीराचे पोषण करवणे, टाकाऊ भाग जवळच्या मलमार्गापर्यंत आणून ठेवणे, इ. कामे करवून घ्यायला, शरीरातील काही उर्जा संपून जाते. म्हणजे पचन घडवून आणायला, रूपांतरण घडवायला, उर्जा निर्माण करायला उर्जा संपून जाते.

    या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता एक रूपक पाहू. हे उदाहरण ग्रंथात लिहिलेलं नाही. पण समजून घेण्यासाठी थोड्या वेळ पुरतं विचारात घेऊ.

    आपल्या शरीरात एक बॅटरी आहे. जी सोलर एनर्जी वर चालते. सूर्योदय ते सूर्यास्त असं हिचं चार्जिंग सुरू असतं. जोपर्यंत चार्जिंग सुरू असतं, तोपर्यंत सगळी हेवी ड्यूटी कामे करून घ्यावीत. चार्जिंग संपल्यावर जर बॅटरीकडून काम जास्ती करून घेतलं तर बॅटरी लवकर संपून जाईल, अगदी तस्सच होतं पचनाचं.

    सूर्यास्तानंतर या शरीरातील बॅटरी, बॅकअप वर जाते. पचनासाठी लागणारी उर्जा संपू नये असं वाटत असेल तर बॅकअपवर कमीत कमी काम करायचे. म्हणून सूर्यास्तापूर्वी जेवून घ्यावं. जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत पचन पूर्ण करून घ्यावं आणि पुढील महत्वाच्या कामासाठी ही बॅटरी रिझर्व्ह ठेवावी. सकाळपर्यंत नो प्रॉब्लेम. पचन पूर्ण. उठल्या उठल्या दोन नंबरचा काॅल येणार. आणि संपूर्ण दिवस चांगला जाणार.

    सायंकाळी एवढ्या लवकर जेवणार म्हणजे सकाळी लवकर जाग येणार. भूक लागूनच जाग येणार. किंवा कदाचित झोपच लागणार नाही. कारण तशी सवयच नाही ना. गेल्या चाळीस वर्षातील चुका दुरूस्त करायच्या असतील तर थोडा त्रास तर होणारच. काहीजणांची थोडी अॅसिडीटी वाढणार.
    हा पोटात पडणारा खड्डा सुखासाठीच असल्याने त्याचं दुःख मानायचं नाही, ( देहे दुःख ते सुख मानीत जावे ) असं आपलं आधीच ठरलं आहे.
    कुछ बडा पाने के लिए कुछ छोटा खोना तो पडता ही है दोस्तो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    04.03.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ

    धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन

    धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. खजूर आणि खारीक, आलं आणि सुंठ, द्राक्षे आणि मनुका या जोड्या लक्षात आणा, म्हणजे हा विषय समजेल. (उगाच आंबटगोड गैरसमज नकोत.)

    ज्या फळामधील रस. (रस म्हणजे जलमहाभूत.) कमी होत जातो, ते टिकाऊ होत जाते. आमरस आणि आंब्याची पोळी ( आमच्या कोकणात आंब्याच्या पोळीला "साट" म्हणतात.) यात टिकाऊ काय आहे ? साट जास्ती दिवस टिकते, कारण त्यातील पाणी कमी होत जाते.

    निसर्गामधे सूर्य हा जणुकाही साक्षात अग्निदेव. अन्न पदार्थातील रस, पाणी, द्रवांश, जलमहाभूत ओढून घेत असतो. याला "आदान कर्म" असे म्हणतात. या पाण्याला शोषून, ओढून घेण्यामुळे अन्न टिकाऊ बनते. आजच्या भाषेत, सूर्यापासून येणाऱ्या काही किरणांमधून काही उपकारक तर काही अपायकारक किरणे येत असतात. या किरणांमधे प्रचंड उर्जा साठवलेली असते. व्हिटामिन डी सारखी उर्जा जी फक्त थेट सूर्य किरणांमधूनच मिळत असते, ती पत्र्याच्या डब्यातील टाॅनिकच्या पावडरीमधे कशी भरतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. असो.

    धान्य वाळवून ठेवल्याने, त्यांना चार पाच कडकडीत उन्हे दिल्याने ती टिकून रहातात, हे सत्य आपण बघतोच आहोत. धान्यामधे टोका, बरड आदि जंतुसंसर्ग देखील होत नाही.

    टीव्हीवरील एका कंपनीच्या बासमती तांदळाची जाहीरात बघितली आहे ? ती कंपनी चक्क जाहीरात करते आहे, की आमचे तांदुळ एवढे जुने करून ठेवल्यानंतर, आता आम्ही विकायला काढले आहेत. ( म्हणून त्याची किंमत एवढी जास्त आहे)
    बिझनेस सोडला तर जाहीरातीमधे तथ्य आहे. जुना तांदुळ शिजल्यानंतर, तो वाफेवर झाकून ठेवल्यानंतर, छान फुलतो. नवीन तांदळाचा भात केला तर कसा होतो, ते सुगृहिणीला विचारून बघा. शिजताना कमी पाण्यात जरी शिजवला तरी, नवीन तांदळामधे अंगभूत पाणी जास्ती असल्याने, शिजताना जरा जोरात ढवळले तरी त्याची कणी होते, तुकडा पडतो, परिणामी तो भात चिकचिकित, गिजगिजीत होतो. अशा भाताची बिर्याणी कशी चांगली होणार ?

    भातात अपेक्षित असलेला मोकळेपणा येण्यासाठी तो जुनाच हवा ! जुना करूनच वापरायला हवा.

    प्लॅस्टिकच्या डब्यात भात साठवून ठेवले तर, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम तर त्यावर होणारच. प्लॅस्टिकमधे उष्णता असतेच, पण डबा अगदी "एअर टाईट" झाल्यामुळे भाताच्या गोट्यातील आतील पाण्याची होणारी जी वाफ आहे, ती कुठे जाणार ? ती बाहेर तर जाऊच शकत नाही, म्हणजे ती पुनः डब्यातील भातातच मुरून राहते.

    गवताच्या मुडीत साठवून ठेवलेला भात आणखी हलका होतो, कारण हे गवताच्या मुडीत, साठवलेले भात "वेल व्हेंटिलेटेड" असते. या मुडीतून भाताचा गोटा बाहेर पडणार नाही, पण तयार होणारी वाफ मात्र गवतामधून बाहेर जायला, भरपूर जागा असते. हीच तर निसर्गाची किमया आहे.

    गवतामधे मात्र प्रचंड उष्णता दडलेली असते. ही उष्णता मुडीमधील भातातील जलांशाचे, वाफेत रूपांतर करायला पुरेशी असते.

    आवश्यक असतील ते बाकी सर्व बदल घडवायला गवताच्या मुडीतील निसर्ग समर्थ आहे.
    सिर्फ अपना "मूड" बनना चाहीये ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.05.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग २

    आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला जन्मापासूनच त्याची सर्व माहिती असते. त्यामुळे निदान करायला किंवा अपथ्य, चिकित्सा सांगायला सोपे होते.

    मी असं सांगतो, एकच नियम पाळावा, की (वैश्विक नियम सोडून) कोणताच नियम पाळू नये. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सली अॅक्सेप्टेड. जगन्मान्य !

    आपण आता सर्वसामान्य जगन्मान्य नियम काय असतात ते पाहू.

    1. पाणी कधी प्यावे ?
    तहान लागेल तेव्हा. गरज असेल तेव्हा.
    2. पाणी किती प्यावे ?
    तहान भागेपर्यंत. गरजेपुरते.

    याला म्हणतात, वैश्विक नियम. जगात कुठेही जा. हाच नियम पाळायचा. म्हणजे कोणताही शास्त्राधार शोधण्याची आवश्यकताच पडणार नाही.

    एवढे साधे प्रश्न आणि एवढी साधी उत्तरे असताना, आपण नियम करून खूप गोंधळ निर्माण करून ठेवतो. जे सोप्पं आहे ते, अवघड करून सांगितले, तरच ते शास्त्र आणि ते जाणणारा कोणीतरी मोठ्ठा विद्वान वगैरे वाटतं. असं काही जणांना वाटतं म्हणून जरा अघळपघळ करून सांगितले तर ऐकणाऱ्यालाही जरा बरे वाटते ना !

    ताप आहे असं सांगण्याऐवजी पायरेक्झिया ऑफ अननोन ओरीजीन, वगैरे भाषेत सांगितले तर रूग्णालापण आपणाला कोणता तरी मस्त मोठा आजार झालाय असे वाटते. मग नंतर बिल भरताना फार कटकट वाटत नाही. असो.

    पाणी पिण्याचे हे दोन नियम मोडले नाहीत, तर पाण्यापासून होणारे रोग निकाली निघतील. (आणि हे एवढ्या पटकन, समजले तर ही लेखमाला पण लवकर बंद होईल.)

    याला शास्त्राधार काय ? असंही कोणाच्या तरी मनात येईल. त्यालाही उत्तर देतो.

    ही गरज कोण ठरवणार ?
    तहान लागली की नाही, हे कसं समजणार ?

    सोप्प आहे.

    यासाठी त्याला काही काळ गृहीत धरावा लागेल. उत्तर मिळेपर्यंत वाट पहावी लागेल. नंतर वाटलं तर विसरून जायचं. गणितामध्ये नाही का आपण एक्स गृहीत धरंत. तसं. एक्सचं उत्तर मिळालं, की त्याला विसरून जायचं.

    आपली तहान भूक, झोप, ढेकर,जांभई, अश्रु, मलमूत्र विसर्जन इ. क्रियांची जाणीव आपणाला कोण करून देतो ? जर त्याने ही जाणीव करून दिली नसतीच तर ? म्हणजे तो आतून काहीतरी सांगतोय, हे असं कर. हे तू असं केलंस तर बरं वाटेल, वगैरे.
    कोण आहे तो?

    तोच तो निर्गुण निराकार...... आत्मा !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    09.12.2016