(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    शिरा ताणून बोलू नये
    "अरे मला ऐकायला येतंय, उगाच शिरा ताणून बोलू नये. डोके दुखायला लागेल. गळ्याच्या शिरा किती फुगतायत बघ." ही आईची नेहेमीचीच शिरा ताणून ओरड सुरू असते.

    शिरा ताणून बोलायची सवय वाईटच. आपण मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपण खरं बोलतोय, किंवा दुसऱ्याला ते पटतंय, असं वाटणं, हा निव्वळ भ्रम आहे.

    बोलताना मनावरचा संयम वाणीमधे दिसला पाहिजे. मनातील रागादि रिपु वाणीतून प्रकट होता नये. तावातावाने बोलल्यामुळे डोक्यातील सर्व सूक्ष्म इंद्रिये ताणाखाली येतात. अनावश्यक दाब तयार होतो. जो दाब बोलून गेल्यानंतरदेखील काम करीत राहातो. असं वारंवार झालं तर नुकसान होणारच !

    उगाच वाद ओढवू नये
    म्हणजे आ बैल मुझे मार. समोरचा स्वभावाने कसा आहे, हे आपल्याला जर नीट कळलेले असेल तर, त्याच्याशी कसे बोलावे, त्याच्याशी कसे वागावे, याचा विवेक करता यायला हवा. जेवढे शब्द जपून वापरता येतील, तेवढे जपून वापरावेत, नाहीतर अर्थाचे अनर्थ होतात. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या नावाखाली एक काव्य वाॅटसपवर प्रसारीत होत आहे, शब्द तासून बोलावा.वगैरे... खरं आहे ते !
    बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून मग शांतपणे बोलावे.

    पण गरज असेल तेव्हा न बोलणे हा अवगुण देखील आहे. काहीवेळा आपल्या बोलण्यातील धार दाखवून पण द्यायला लागते. समर्थ म्हणतात,
    ठकासी पाहिजे ठक
    खटनटासी खटनट
    हुंब्यासी हुंबा
    लावूनी द्यावा.
    आपण कोणाशी वाद करायला जाऊ नये, पण वाद करायला कोणी आलाच तर शिंगावर घेण्याची तयारी पण हवी.
    आई नेहेमी सांगते. शाळेत "उगाच" भांडू नकोस. त्या वाक्याचा अर्थ आता कळतोय. जर भांडायची वेळ येईल, तेव्हा उगाच गप्प पण बसू नकोस. असंही तिला सांगायचं असतं.

    वाद घालण्याची पण एक कला असते. आयुर्वेद महाविद्यालयात पदार्थविज्ञान या विषयात, "तंत्रयुक्ती" नावाचा एक प्रकार शिकायला मिळतो. याचा नीट अभ्यास केला तर, आपले म्हणणे समोरच्या व्यक्तींना समजावून सांगता येते. आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असताना पदार्थविज्ञान हा खरंतर "ऑप्शनला" टाकलेला विषय. हे असले विषय कशाला घेतले सिलॅबसमधे य्यार ! असं म्हणून या विषयाची जागा त्याला दाखवून दिलेली असते, पण पुढे व्यवहारात रुग्णाला आपले म्हणणे समजून सांगायला, पदार्थविज्ञान हाच विषय काम करतो, हे आता लक्षात येतेय.

    काही गोष्टींचे महत्त्व कळण्यासाठी, काही काळ जाणं आवश्यक असतं. असंही आई म्हणायची, तेही खरंच आहे म्हणा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १३.०८.२०१७

  • अक्षोटक / अक्रोड

    अक्षोटक / अक्रोड

    अक्रोड चवीला गोड, उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो. हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची व थंड असते.

  • आहारातील बदल भाग ६४ – चवदार आहार -भाग २६

    सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव.
    तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते.

    हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत.

    सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत.

    हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. )

    स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे काम ही चव करते. या एका अति महत्वाच्या गुणामुळे ती वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रिय झाली आहे.

    रक्तवाहिनींचा संकोच करीत असल्यामुळे रक्तस्राव थांबवणारी,त्यामुळे शस्त्रकर्मींना हुकुमी शस्त्रच जणु !

    आतड्यांचे, गुदमार्गाचे आकुंचित करत असल्यामुळे अतिसार कमी करणारी, सहन होत नाही, सांगताही येत नाही वाले सगळे खुश !

    तसेच पित्त वाहिनीचा संकोच झाला तर पित्ताचे स्रवण पण कमी करण्यासाठी वापरली जाणारी, म्हणजेच पित्तशामक गुणाची त्यामुळे गॅस्ट्रोएन्टराॅलीस्टना भक्कम आधार देणारी.

    रोमकुपांचा संकोच झाल्यामुळे घाम कमी करणारी, त्यामुळे त्वचारोग तज्ञांना सावरून घेणारी.

    शुक्रवाहिनीचा संकोच झाल्यामुळे शुक्राच्या बाहेर पडण्यावर बंधन आणणारी, म्हणून शीघ्रस्खलनामधे उपयोगी ठरणारी, म्हणजेच सेक्स स्पेशालिस्टच्या भात्यातील मदनाचा बाणच जणु !

    केस जिथून उगवतात, त्या पेशींना आकुंचित करत असल्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे स्त्रीयांची जीवश्च कंठश्च सखी !

    मूत्रमार्गाचा अवरोध करत असल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी करवणारी, म्हणून मधुमेह तज्ञांना मदत करणारी

    स्थूलता कमी करण्यासाठी, भूकेवर संयम आणण्यासाठी पण ही तुरट चव वापरता येते. म्हणजे ढेरपोटे, तुंदीलतनु कमी करण्यासाठी धडपडणारे स्लीम सेंटर वाले भी खुश !

    हिरड्यांना बलदायक आहे. म्हणून प्रत्येक दंतमंजनामधे वापरली जातेच जाते. दातांची हलणारी मुळे या संकोच गुणामुळे मजबूत होतात. म्हणजे सर्व दात पाडणारे तज्ञ पण खुश !

    गुणांचा अभ्यास केला की द्रव्य कोणतेही असो, ते कसे काम करेल, याचा अंदाज बांधता येतो आणि इच्छित ठिकाणी जावून औषध काम करते.

    यासाठी युक्ती वापरावी लागते. ही ज्याच्याकडे आहे तो बुद्धिमान यशस्वी होतो.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    26.11.2016

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सहा

    आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात.

    बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, "नीट चावून चावून गिळा." यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत.

    हल्ली लहान मुलांचे दात लवकर किडतात, दोन वेळा ब्रश करूनदेखील दात किडतात, यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी बोटांचा वापर करणे, किंवा कडूनिंबाच्या काड्यांचे टोक चावून ब्रश तयार करून वापरणे आणि टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन वापरणे योग्य ठरेल. दात दोन वेळा घासले पाहिजेत. तसेच चुळादेखील नीट भरल्या पाहिजेत, म्हणजे दात लवकर किडत नाहीत. दंतमंजन गोड नको, फेस येणारे नको आणि नुसती पांढरी पावडर नको. किंचीत कडू, किंचीत तिखट किंचित तुरट असावे.

    प्रत्येकाच्या दातांची ठेवण वेगळी असते. पण काम एकच असते. अन्नाचे बारीक चूर्ण करणे. वरची किंवा खालची एक दाढ जरी पडली तरी त्या दाढेखाली येणारे अन्न भरडले जात नाही आणि तो तुकडा तसाच रहातो गिळला जातो आणि अपचन सुरू होते. त्यामुळे पचनाशी दातांचा संबंध देखील असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.

    किडलेल्या दात आणि दाढांवर वेळीच उपचार करून घ्यावेत. शक्यतो दात काढू नये. रूट कॅनाॅल सारखी पद्धत वापरून जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवावं. गडग्यातला एक दगड काढला तर बाजूचे दगड हलू लागतात आणि सर्व गडगा ढेपाळतो. (गडगा म्हणजे दगडाची भिंत जी, कुंपण म्हणून केली जाते.) किडलेला, हलणारा दात अथवा दाढ ही अपचनाची सुरवात असते. ती जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

    त्याने जी बत्तीशी दिलीय, ते काही तरी कारण असेल म्हणूनच दिलीय ना ! त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ते ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे खरे शिक्षण.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.03.2017

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – कोथिंबीर

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – कोथिंबीर

    आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी हि वनस्पती.तशी सगळ्याचीच लाडकी.कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसहारी पदार्थ असो जसे वरण,डाळ,पोहे,उपिट,भाज्या,माशांची आमटी,चिकन,मटण ह्यावर सजावटी करीता हिची पेरणी करतात.तसेचकाथिंबीर चटणी,कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या.ब-याचं व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविणा करिता केला जातो.कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जत हि वाढते.

    कोथिंबीरीचे १ मीटर उंचीचे नाजुक क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली व सुगंधी असतात.हि चवीला तुरट,कडवट व गोड असते व गुणाने थंड असते.म्हणुनच हि शरीरातील तिन्ही दोष शांत करते.

    जसा आपण हिचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतो तसेच हिचा वापर घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.

    १)तोंड आले असता कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.

    २)डोकेदुखी मध्ये कोथिंबीरीचा पाला वाटून त्याचा लेप कपाळावर करावा.

    ३)कामाच्या दरम्यान जर चेहर्याचा संपर्क उष्णतेशी आल्यास त्वचा कोरडी होते व त्वचेची आग होते तेव्हा कोथिंबीरीच्या रसांच्या घड्या चेहर्यावर ठेवाव्या थंडावा मिळतो.

    ४)वारंवार उल्ट्या होत असल्यास कोथिंबीरीचा रस+मध हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.

    ५)ओल्या इसबावर कोथिंबीर वाटून त्यात वेखंड घालून ह्या मिश्रणाचा जाडसर लेप त्यांवर करावा.

    ६)हाता पायाची आग होत असल्यास कोथिंबीरीच्या पाल्याचा रस काढुन हातापायांच्या तळव्यांना चोळावा.

    कोथिंबीर खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील धातूंना क्षीणता येते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १२

    प्रमेह हा कफाशी संबंधित आजार आहे. कफ दोषाचं विकृत झाल्यानंतरचं नाव क्लेद. क्लेद वाढवणाऱ्या पदार्थामधे दह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.पण दही न आवडणारा प्राणी तसा दुर्मिळच. दही म्हटलं की फक्त एकच प्राणी नाखुश असतो, तो म्हणजे आयुर्वेद वैद्य. खरंतर त्याच्याही जीवावर येतं, दही खाऊ नका म्हणून सांगायला. पण काय करणार? जे सत्य आहे ते कोणीतरी शेवटी सांगायलाच हवे ना ! ते अतिशय कठीण काम अखेर वैद्यालाच करावे लागते.

    दही दूध म्हणजे काही अगदी विष नव्हे! अगदी बंद करण्याची आवश्यकता नाही. पण प्रकृती, लक्षणे, स्थळ काळ इ. ठरवून यांचे सेवन करावं लागतं.वाताचे काही आजार सोडले तर दही अनेक रोगांचे माहेरघरच आहे. युक्ती वापरून दही खाता येते. जिथे कायदा सांगितला जातो, तिथे पळवाट असतेच. ती युक्ती शोधून काढणारा वैद्य महत्वाचा !

    दही लागते म्हणजे नेमके काय होते ? काही उपकारक जंतु विरजण स्वरूपात आपण त्या दुधात सोडतो. त्या दह्याच्या पहिल्या अवस्थेला आपण अदमुरे दही म्हणतो. साधारणपणे सात ते आठ तासात ही अवस्था येते. अजून तीन चार तास गेल्यावर पक्के वडी स्वरूप दही जमते. आणखी चार पाच तास गेले म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ते चांगलेच आंबट होते. तिसऱ्या दिवशी आंबटपणाचा कहर होतो. त्यावरची साय सुद्धा आंबट दिसायला लागते. रंग बदललायला सुरवात झालेली असते. वास बदलतो. बुडबुडे यायला सुरुवात होते. हे सगळं वर्णन का करतोय ? तेच तर दही न खाण्यामागचे इंगित आहे.

    ही जी प्रक्रिया दह्यामधे सुरू झालेली असते ती थांबतच नाही. अदमुऱ्या दह्याचे रूपांतर एव्हाना आंबट्टढ्ढाण्ण दह्यात झालेले असते. या प्रक्रियांचा विचार केला तर दुधापासून दह्यात रूपांतरण होणारी ही प्रक्रिया रासायनिक स्वरूपाची असते. म्हणजे एकदा दही बनवायला सुरवात झाली की, थांबायचे नाव नाही. कितीही थांबवायचं म्हटले तरी आता परत दुधात रूपांतर होणे नाही. गुण आणि कर्माने सुद्धा! चव तर होत्याची नव्हती होऊन जाते. दह्यावरची ही प्रक्रिया पोटात गेली तरी तश्शीच सुरू राहते. ते आणखीनच आंबट होते. दह्याचा हा आंबटपणा पित्ताला हमखास वाढवतो. आणि त्यातील बुळबुळीतपणा कफाला वाढवतो.

    वायुचा विचार केला तर दह्यामधे बुडबुडे पण तयार झालेले दिसतात. दही घुसळल्यावर, दह्याची वडी / कवडी मोडल्यावर आतील हा वायु निघून जातो, म्हणून तयार झालेले ताक सुपाच्य असते. म्हणूनच नुसते दही घेणे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण असे न घुसळलेले दही तिन्ही दोषांचा प्रकोप करते.

    नक्तं न भुञ्जात्
    दही कधीच रात्रीचे घेऊ नये, कारण दह्यामधे सुरू असलेली किण्वन प्रक्रिया कारणीभूत होत असावी. वात वाढवायला ही प्रक्रिया मदत करणारी असते. आणि सर्वात महत्वाचे सूर्य असेपर्यंत, त्याच्या अग्निवर पचन पूर्ण करून घेतले गेले पाहिजे, मग जाठराग्निवर अतिरिक्त ताण निर्माण होत नाही.

    असे हे स्वभावतः कफ आणि पित्त वाढवणारे,क्लेद निर्माण करणारे, दही प्रमेहामधे वर्ज्य सांगितले गेले नसते तरच नवल !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    28.01.2017

  • किचन क्लिनीक – सीताफळ

    किचन क्लिनीक – सीताफळ

    हे फळ सगळ्यांना आवडते.दिसायला आणी खायला देखील सुरेख.साधारण अक्टोबर महिन्यात सुरूवातीला हि फळे बाजारात येतात.ह्याचे १०-१२ फुट उंच झाड असते व फळ ४-५ इंच व्यासाचे असते.बाहेर काळपट हिरवी साल असते व आत पांढरा सुगंधी गर व काळी बी असते.

    हे चवीला गोड थंड व पित्तनाशक असून वात व कफ दोष वाढविते.

    आता ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)व्यवसाया निमित्त उष्णतेशी संपर्क येत असणाऱ्या व्यक्ती ज्यांना घसा कोरडा होणे,वारंवार तहान लागणे ह्या तक्रारी असतात त्यांनी सीताफळ अवश्य खावे.

    २)मुलास दुध पाजत असणाऱ्या स्त्रीने सीताफळ खावे भरपूर दुध येते व थकवा देखील कमी होतो.

    ३)तळपाया व हात ह्यांची आग होत असल्यास सीताफळ खावे व साल तळव्यांना बांधावी.

    ४)गळवे पिकायला कच्च्या सीतांफळाचे पोटीस त्या गळूवर बांधावे.

    ५)सीतांफळाचे बियांचे चुर्ण हे केस धुवायला वापरल्यास कोंडा कमी होतो व केसांचे आरोग्य सुधारते.

    सीताफळ खायचा अतिरेक केल्यास सर्दी खोकला होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • याला जीवन ऐसे नाव भाग ११

    पदार्थामधील पाणी कमी केले की तो टिकाऊ होतो. द्राक्ष आणि मनुका बेदाणे, ओला अंजीर सुका अंजीर, ताजी फळे आणि सर्व ड्राय फ्रूटस, यात टिकाऊ काय ? कोणते पदार्थ ?

    जे सुके आहेत ते. ज्यांच्यात पाणी कमी आहेत ते !

    साधा रवा आणि भाजून ठेवलेला रवा. साध्या रव्यात कीड पटकन होते. पण भाजून ठेवल्याने त्यातील पाणी कमी केले जाते. जंतुना जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी कमी झाल्याने, भाजून ठेवलेल्या रव्यात कीड, टोका पडत नाही. बरोबर ना !

    घरात आणलेल्या पालेभाज्यांचं सर्वसाधारण आयुष्य किती ? एक दिवस. जास्ती जास्त दोन दिवस. नंतर त्या चक्क मान टाकतातच ! पाण्याच्या अभावाने त्या मरतात. पालेभाज्या म्हणजे ऐशी नव्वद टक्के पाणीच ना ! पाणी संपले की संपले. हीच पालेभाजी पाणी शिंपडून ओट्यावर ठेवली तर जिथे पाणी साठले आहे, त्या ओट्याला चिकटून राहिलेल्या भागातील भाजी कुसुन लिबलिबीत होते. फुकट जाते.

    पाण्याशिवाय जीवन नाही. जंतुचे देखील तसेच आहे. स्थूल आणि सूक्ष्म जीवांना जगण्यासाठी देखील पाणी हवे असते, ते मिळाले नाही तर ते पण मरतात.

    झुरळांची पैदास कुठे होते ? बेसिनच्या खाली.
    डासांची वाढ कुठे होते ? पाण्यामध्ये.
    त्यांचा जन्म, पोषण, वंशवृद्धी पाण्यावर, पाण्याच्या दमटपणावर अवलंबून असते. पाणी नसले की जीवन संपले.

    चंद्र मंगळावर जी अंतराळ याने पाठवताहेत, ती कशासाठी? केवळ दगडधोंडे आणि हवामान तपासायला ?
    नाही.
    त्या दगडातील पाण्याचा अंश शोधायला.
    त्या दगडात जरा जरी पाण्याची शक्यता वाटली तर तिथे इतर जीवजंतु नक्कीच असणार. या शक्यतेवरच या मोहिमा चालतात.

    म्हणजे जीवांना त्यांचे पोषण करणारे पाणी जिथून मिळेल तिथे हे जीव स्थिरावतात, हा वैश्विक नियम आहे.

    याची दुसरी बाजू. जिथे पाणी नाही, तिथे जीव संसर्ग नाही. इन्फेक्शन नाही.

    म्हणजेच
    शरीरातील पाणी गरजेपेक्षा वाढत गेले तर तिथे जीवांची उत्पत्ती होणारच. आणि अवास्तव पाणी कमी करत गेलो तर जंतुसंसर्गही तेवढाच कमी होत जाणार ! बरोबर ना ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    18.12.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बत्तीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात

    निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग सात !

    जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.

    एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.

    तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.

    प्रकृती म्हणजेच निसर्ग !
    सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.

    बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.

    रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.

    ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.

    हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
    कारण,
    शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.05.2017

  • आहाररहस्य ६

    आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता.
    म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे.
    एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल असे नाही.