(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • अॅंजिओग्राफी आणि डी. एस. ए.

    रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 10

    शरीरात एक बॅटरी असते. ती पुरवून पुरवून वापरायची असते. शरीराला रात्रौच्याच वेळी, पूर्ण विश्रांतीच्या वेळी ही उर्जा वापरायची असते.

    मोबाईल बॅटरीमोडवर जातो, तेव्हा बॅटरी लवकर संपते. चार्जिंग ऑन असताना त्याच्यावर ऑडीओ ऐका, नाहीतर, व्हिडिओ पहा. बॅटरीवर लोड नाही. तसंच सूर्य असताना दोन्ही जेवणं संपली की शरीरातील बॅटरीवर लोड नाही, जी उर्जा अन्य महत्त्वाच्या अंतर्गत कामासाठी वापरली जाऊ शकते.

    आणखी एक उदाहरण समजून घेऊया.

    नीट शब्द शब्द वाचलेत तर समजेल.

    जर मी माझ्या हातांचे काम वाढवले तर शरीरातील रक्त किंवा उर्ज़ा हातामधे आणली जाईल. पायांनी धावलो तर, हीच उर्जा पायात वळवली जाईल. डोक्याचे काम केले तर हीच उर्जा इतर अवयवांमधून काढून मेंदूकडे नेली जाईल, ( म्हणून जिथे उर्जा जाईल, तेव्हा इतर अवयवांमधील शक्ती तुलनेने कमी होईल, मेंदुचे काम वाढवले, अभ्यास केला, तर हातापायामधील शक्ती मेंदुकडे वापरली जाईल. हातापायामधील शक्ती तात्पुरती कमी केली जाईल. )

    म्हणून पाठांतरासारखा अभ्यास पहाटेच्या वेळी करावा. मेंदुला रात्रभर रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने मेंदु तरतरीत असतो. नीट लक्षात रहाते. पण दिवसभर विचार करून मेंदु दमलेला असतो, आणि रात्री झोप येते तेव्हा जागरण करून अभ्यास केला तर काऽऽही उपयोग होत नाही. झोप येणे, म्हणजे आतून येणारा सिग्नल आहे. "आता मी दरवाजा बंद करत आहे. बाहेरचे व्यवहार बंद. आम्हाला आतील दिवसभराची सर्व पेंडींग कामे करायची आहेत." असं तो म्हणतो.

    बॅन्क कशी दुपारी तीननंतर आतून बंद करून घेतली जाते. पण आतमधे बॅन्क बंद नसते. आतमधे काम सुरू असते. तसंच शरीराचं असतं. आतली कामे करायची असल्याने दरवाजा आतून बंद ! (म्हणजे झोप. )

    आता पचनाचे काम आतील भागात सुरू झालेले आहे, तेव्हा हीच उर्जा पचनासाठी वापरली जाईल. म्हणजे "पेरीफेरल सर्क्युलेशन" कमी होईल. आणि "सेंट्रल सर्क्युलेशन" वाढवले जाईल. इथे सुद्धा हातापाय आणि डोक्यातील शक्ती पचन नीट होण्यासाठी आतमधे वळवली जाते. जेव्हा उर्जा आतमधे आहे, तेव्हा बाहेरची कामे कमीच करावीत.

    आता एक गोष्ट लक्षात येतेय का पहा.
    आज्जी सांगायची, "अरे आत्ता जेवला आहेस ना, धावतोस कसला, पोटात दुखेल. असं जेवणानंतर लगेच धावू नये "

    ....... म्हणून जेवणानंतर लगेच धावू नये, लगेच मोठे काम करू नये, लगेच अभ्यास करू नये. कारण असं मोठे शक्तीचे काम बाहेर सुरू झाले तर आतील पचन बिघडते.......

    जेव्हा पचनानंतर उर्जा तयार होणार असते, तेव्हा बाकीची सर्व कामे थांबवली तर शरीराला आतमधे लक्ष दिले जाईल. आतले काम पूर्ण झाले नाहीतर दुसऱ्या दिवशी पुनः काम सुरू करताच येणार नाही. म्हणून इतर सर्व कामे थांबवायची ऑर्डर काढली जाते, म्हणजेच आपणाला झोप निर्माण केली जाते. बाकी सगळी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये विश्रांतीला गेली की मनाला मनसोक्तपणे आपली आतली कामे करता येतात. पोरं, नवरा शाळेत, कामाला गेली की कसं छाऽन कामं आवरता येतात. कोणाचाही अडथळा नाही.

    तसं जर लवकरात लवकर पचनाचे काम पूर्ण करण्यासाठी, आपण जर लवकर जेवलो, आणि लवकर झोपलो तर पुढे तो मनसोक्त काम करवून घ्यायला मोकळा !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.03.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तीन

    स्वयंपाकघरात मधे वाढलेली राईस प्लेट थेट टेबलावर आणून समोर ठेवणे आणि टेबलावर ताट ठेवून एकामागून एक पदार्थ आणून वाढणे, यात फरक आहे. पदार्थ कोणत्या क्रमाने वाढले जातात, त्या क्रमालाही महत्व आहे. सुरवात लिंबू मीठाने करून शेवट वरणभातावर वाढलेल्या तुपाने करावा. तूप वाढून झाले की बसलेल्यांनी समजावे, आता वाढायला येणारी आणखी कोणी नाही. आता फक्त "हर हर महादेव" म्हणून आक्रमणाला सुरवात करायची, एवढे समजले तरी पुरे.

    ताटात जसजसा एक पदार्थ येत जातो, तस तसा डोळ्यांनी म्हणजे चक्षुरेंद्रियांनी, घ्राणेंद्रियांनी म्हणजे नाकाने वास घेत त्याची वार्ता आतमधे पोहचवलेली असते. बाकी सगळे अगदी तैय्यार असतात. प्रत्येक पदार्थ वेगळा वाढल्यामुळे प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण अगदी उत्तम करता येते.

    मीठ वाढताना त्याची सूक्ष्म चव आपण अनुभवतो, लिंबू वाढताना, त्याच्या रसाचा फवारा आपल्या तोंडात उडायला सुरवात होते, पापड वाढताना त्याचा कुर्रकुर्र आवाज कानात नाद निर्माण करतो. भजी आल्यावर त्याचा खमंग वास चोंदलेलं नाक सैल करून टाकतो. लालबुंद रस्सा डोळ्यांनी बघताक्षणी पोटात भूक चाळवायला सुरवात झाली नाही, तरच नवल.

    (काहीजण एवढे चाळवतात, की वाढला पापड झाला गट्टम, कोशिंबीर पुढच्या पानात वाढायच्या अगोदर ही संपली सुद्धा. वाढली भाजी खाऊन टाकली. याला पंगत म्हणत नाही. त्याचेही काही भारतीय नियम असतात, तेही "मॅनर्स" पाळलेच पाहिजेत. थोडा संयम हा हवाच. तरच "सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम्, यातील सह ला महत्व आहे. ) असो.

    तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड त्याच्या आवाजाने, पुरणपोळी आपल्या स्पर्शाने, भजी आपल्या वासाने, चटणी आपल्या चवीने, आणि सुंदर रंगसंगतीने, असं छान वाढलेलं, पदार्थांनी भरलेलं ताट, बघताक्षणी डोळ्यांचेही पारणे फिटते. म्हणजे डोळ्यांनी ते पचवायला सुरवात केलेली असते.

    शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा या परिपूर्ण आहारात एकवटलेल्या असतात. केवळ कॅलरीज मोजून जेवणे, वजनी प्रमाणात जेवणे, याला चौरस आहार म्हणता येईल का, विचार करून पहावे.

    एकापेक्षा एक उत्तम पदार्थांचे एकमेकांमधे एकत्र झालेले वास. आणि आग्रह करून, प्रेमाने वाढणाऱ्यांचा सहवास यामुळे अग्निवृद्धी आपोआपच होत जाते. कधी एकदा ताटातले हे उत्तम पदार्थ पोटात जातात असे होऊन जाते.
    हे सर्व मीच अगोदर अनुभवणार अशी जणु काही स्पर्धाच लागते सगळ्या इंद्रियामधे.
    जो जे वांछील तो ते लाहो, अशी अनुभुति इंद्रिये घेत असतात, तो आनंद शब्दात वर्णन करणं अशक्यच आहे. याचा दृष्य परिणाम म्हणून हर हर महादेव चा गजर होण्याअगोदरचा कल्ला, पुढील पाच मिनिटांसाठी पूर्ण बंद झालेला असतो. निमूटपणे सर्वजण आतील प्रज्वलीत अग्निनारायणाला एकेका पदार्थाची आहुती देत असतात.

    पंचहाभूतात्मक आहार, पंचमहाभूतात्मक शरीरासाठी, पंचमहाभूतांच्या तन्मात्रांसह...

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    18.03.2017

  • आहारातील बदल भाग ९ – शाकाहारी भाग चार

    मांसाहारी प्राण्यांची आणि शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. मांसाहारी म्हणजे कार्निवोरस, जे फक्त मांसच खातात. शाकाहारी म्हणजे हर्बीवोरस. ज्यांचे मुख्य अन्न, शाक म्हणजे पालाच आहे.

    शाकाहारी प्राण्यांच्या जवळपास जाणारी आणखी एक जमात अस्तित्वात आहे, तिला फ्रूगीवोरस म्हणतात. ही जमात फळे, धान्य, धान्याच्या बीया आणि पाला हे सर्व खाते. पण ज्यांचे मुख्य अन्न, धान्य आणि बीया हे आहे. हे फ्रूगीवोरस हर्बीवोरसच्या जवळचे असतात. पण थोडा फरक असतो.

    हर्बीवोरस प्राण्यांचे पचन थोडे वेगळे असते. यांची आतडी ही इतर दोन प्रकारांपेक्षा मोठी असतात. शरीराच्या उंचीच्या किंवा लांबीच्या सर्वसाधारणपणे बावीस ते चौवीस पट मोठी असतात. पाल्यामधे असलेले घटक पचवण्यासाठी ही आतडी मोठी असणे, पचन सावकाश होणे, आवश्यक असते. त्यामुळे या प्राण्यांनी भराभरा खाल्लेले अधिक रेषायुक्त पाल्याचे अन्न सावकाश पुढे सरकते, आणि नंतर पुनः हे अन्न तोंडात आणून रवंथ केले जाते. पाल्यामधे अल्प प्रमाणात असलेला पिष्टमय पदार्थ पचवायला आवश्यक लाळ यांच्या तोंडात तयार होते. यामधे पिट्यूलीन हे एन्झाईम असते.

    हे एन्झाईम फ्रूटीवोरस जमातीमधे त्याही पेक्षा जास्त आढळते. यांची आतडी ही हर्बीवोरसपेक्षा थोडी लहान पण कार्निवोरसपेक्षा मोठ्ठी असतात. शरीराच्या तुलनेत आतडी साधारणपणे बारा पट मोठी असतात. आणि कार्निवोरसची आतडी शरीराच्या लांबीच्या तुलनेत फक्त चार पट एवढी लहान असतात. अन्न लवकरात लवकर पचून बाहेर पडून जावे, यासाठीची त्याने केलेली रचना आहे.

    यांच्या लाळेमधील पिट्यूलीन मात्र जास्त असते, कारण यांचा मुख्य आहार धान्य, बीया, फळे इ. म्हणजे पिष्टमय पदार्थ आहे.

    या फ्रूटीवोरसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एकदा अन्न चावून, बारीक करून, वरून खाली ढकलले की, पचनाची जबाबदारी संपली. पचनासाठी नंतर विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत.
    जसे, वाघ सिंहा सारखे मांसाहारी प्राणी खाल्लेले मांस पचवण्यासाठी गडाबडा लोळतात, किंवा अजगर झाडाला विळखा घालून अंगाचे बऱ्याच वेळा आकुंचन प्रसरण करतात. तसे फक्त पाला खाणारे हर्बीवोरस करत नाहीत, पण यांना पचनाला मदत करण्यासाठी रवंथ मात्र करावेच लागते.

    ही त्याने स्वतःची बुद्धीमत्ता वापरून केलेली रचना आहे.
    बाय डिफाॅल्ट प्रोग्राम ने फिक्स झालेली.
    यातील एकही प्राणी आपली जीवनपद्धती बदलत नाही. म्हणून यांचे अस्तित्व आजही टिकून आहे.

    या तीनही प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराचा आतून बाहेरून विचार केल्यास, स्वभावगुणांचा विचार केल्यास, निर्माण होणाऱ्या स्रावांचा विचार केल्यास, बुद्धी नावाची चीज जरा जास्ती दिली आहे, तो माणूस नावाचा प्राणी कोणत्या गटात येतो. हे आपणच ठरवावे.

    कोणाला काय आणि किती द्यायचे हे देणारा ठरवित असतो.
    त्याच्याकडे जे आहे, त्यापेक्षा अधिक तर कोणीच देऊ शकत नसतो.

    देणाऱ्या पेक्षा घेणारा हा जर, स्वतःला जास्ती बुद्धिमान समजायला लागला, तर देणारा,
    "भोग आपल्या कर्माची फळे" असे म्हणत असतो.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    30.09.2016

  • प्रमुख आहार सूत्र – भाग २

    पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध देखील !
    यांच्यातील काही साम्य.
    दोन्ही घटक आहारीय. म्हणजे आहारातील मुख्य. एक बालकांचे एक इतरांचे.
    यांच्याशिवाय आहार पूर्ण होतच नाही.
    दोघांविषयी जनमानसात प्रचंड गोड गैरसमज.
    आणि महत्वाचे म्हणजे मधुमेहाचे हे दोन मोठे मित्र !
    मधुमेह होण्यामधे आणि वाढवण्यामधे.

    पाणी हे जसे मधुमेह वाढवायला मदत करते तसे ते रक्तदाब वाढवायलाही मदत करते. तसेच दूध हे देखील मधुमेहाला वाढवते.

    पाणी आणि दूध दोघे एकमेकामधे असे काही एकजीव होऊन जातात. की पाण्यात दुध की दुधात पाणी समजाणार सुद्धा नाही.

    असो.

    मोठ्या शहरामधे तर आपल्या घरात येणारे प्लॅस्टिकच्या पिशवीतील दूध, हे दूधच आहे की नाही, हे शोधण्यासाठी फार कष्ट करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. एकवेळ पाणी शुद्ध करता येईल. पण दूध शुद्ध करणे हे महाकठीण काम. दूध शुद्ध करण्यासाठी गोवंश शुद्ध करण्यापर्यंतचा प्रवास करावा लागेल.

    जिथे जिथे दूध असा उल्लेख आयुर्वेदात येतो, तिथे ते गाईचेच वापरावे. हे जेव्हा लिहिले होते त्या काळात गाईमधे "हायब्रीड" हा प्रकार नव्हता. जे दूध उपलब्ध होते, ते सर्व शुद्ध देशी भारतीय वंशाचेच होते.

    सरकारी यंत्रणेने दुधाचा महापूर योजने अंतर्गत विदेशी वळू आणून आमच्या अस्सल देशी गाई नासवल्या. खरंतर दुधासाठी नव्हे तर भरपूर मांस मिळवण्यासाठी, विदेशी माजवलेले वळूंचे वीर्य आणले गेले हे खरे सत्य आहे. ( खोटे सत्य असते काय ? हो. भारतात असते. सांगायचे एका कारणासाठी. असते दुसऱ्याच कारणासाठी म्हणजे खोटे सत्य. "सत्य" शब्द देखील असा नासवलाय, की आता तो वापरतानादेखील खुलासा करावा लागतोय. हे दुर्दैव.

    आणि आता तर विदेशी गोवंशाचा हैदोसच सुरू आहे. औषधाला देखील देशी गाय उपलब्ध राहिलेली नाही. दूध, दही, लोणी, ताक, तूप या आहारातील सर्वात श्रेष्ठ अश्या दैनंदिन वापरातील पदार्थांविषयी खात्रीने सांगावे असा एकही पदार्थ आज उपलब्ध नाही.

    कोणत्या तोंडानी वैद्यांनी सांगावे, दूध प्या म्हणून ? आणि या या अश्या विदेशी गाईचे दूध प्यावे म्हणून? जे अत्यंत विषारी आहे. एकाही मिडीयाने याची दखल घेतलेली नाही. प्रत्येकाचे लागेबांधे कुठेतरी आहेत. दूध हे दुध राहिलेले नाही. जोपर्यंत आपण आपले पूर्ण शुद्धिकरण करत नाही, तोपर्यंत दुधापासून थोडं लांबच राहिलेलं बरं.
    नाहीतरी दुध मधुमेहामधे वर्ज्यच सांगितलेले आहे.
    एवढं स्पष्ट लिहून देखील काही जण प्रश्न विचारतील, मग आम्ही दूध पण प्यायचे नाही का ?
    आता काय सांगावे ?

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.01.2017

  • किचन क्लिनीक – काही दुधांचे उपयोग भाग २

    ब) म्हशीचे दुध:

    १)भस्मक रोगात किंवा जेव्हा अतिभूक लागते व काही खायला न मिखाल्याच त्रास होतो तेव्हा नियमीत आहार मध्ये म्हशीचे दुध,तुप,लोणी हे पदार्थ असावेत.

    २)रात्री शांत झोप लागण्याकरिता म्हशीच्या १ ग्लास दुधात १/४ चमचा जायफळ घालून उकळावे व खडीसाखर घालून हे दुध प्यावे.

    ३)ज्या पुरूषाचे पुरुष बीज प्रमाण कमी असते त्यांनी आहारात म्हशीचे दुध,तूप व लोणी वापरावे.

    म्हशीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्यास अती झोप येते व स्थूलपणा येऊ शकतो.

    क) बकरीचे दुध:

    १)टिबी,खोकला,छाती व बरगड्या ह्यात वेदना होणे ह्यात बकरीचे दुध पिणे उत्तम.

    २)वारंवार होणाऱ्या जुलाबात बकरीचे दुध फायदेशीर ठरते.

    ३)डोळ्यांचा थकवा,डोळे दुखणे,ह्या तक्रारीमध्ये बकरीच्या दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.

    बकरीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्याने संडासला घट्ट होऊ शकते.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – अंतिम भाग पंचवीस

    निरोगी कोण ?

    आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
    आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या 'देवदत्त' प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.

    यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.

    जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.

    जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.

    प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
    कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा "नाॅर्मल" वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.

    आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.

    म्हणजे एखाद्याला "तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल " असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.

    पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?

    या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.

    आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
    पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.

    आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?

    सकाळी हलकेच जाग यावी.
    उठल्यावर लगेच "ती" जागा आठवावी.
    पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
    समाधानाची अनुभूती घ्यावी.
    सणसणीत भूक लागावी.
    मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
    दिवसभर गाडी पळवावी.
    तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
    शक्ती पुरवून वापरावी.
    विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
    पुनः भुकेची जाणीव व्हावी.
    हलक्या आहाराने ती पुरी करावी.
    झालेली कामे सहज आठवावी.
    ही ईश्वराची कृपा समजावी.
    आणि मस्त झोप यावी.
    निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
    "तो" मला उठवणार, याची खात्री असावी.
    आणि सकाळी हलकेच जाग यावी.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.04.2017

  • किचन क्लिनीक – धणे

    धणे व कोथिंबीर ह्यांचा उपयोग आपण आपल्या जेवणात नेहमीच करतो.धणे हा मसाल्याचा एक पदार्थ.गोव्यात ह्याचा नियमीत उपयोग हा माशांची आमटी अर्थात हुमण करताना केला जातो तसेच गरम मसाला करताना देखील ह्याचा उपयोग केला जातो.

    धणे हे कोथिंबीरीच्या क्षूपाचे फळ आहे.धणे हे चवीला गोड,कडू,तुरट अशा मिश्र चवीचे असते.आणी हे थोडे उष्ण असतात.उष्ण असले तरी देखील हे शरीरातील वात,पित्त आणी कफ ह्या तिन्ही दोषांना कमी करतात.

    आपण सगळेच जण धणे घरगुती औषधात वापर तो.चला तर मग धण्यांचे घरगुती औषधांमध्ये उपयोग थोडे सविस्तर पाहूयात.

    १)उल्टया होत असल्यास ४ ग्राम धणेपूड+१०ग्राम साखर तांदूळाच्या धूवणासोबत खावे नक्की फायदा होतो व उल्टया थांबतात.

    २)एॅसीडीटी व संडास साफ न होण्याची तक्रार असल्यास १ चमचा गुलकंद+१ चमचा धणेपूड हे मिश्रण तांदूळाच्या धुवणातून संध्याकाळी चार वाजता घ्यावे .

    ३)२ चमचे गुळ+१ चमचा मध+१ चमचा धणेपूड हे मिश्रण दिवसातून २-३वेळेस नियमीत घेतल्यास लघ्वीचा त्रास कमी होतो.

    ४)तोंडास चव नसेल तर धणे,वेलची व मिरी ह्यांच्या चुर्णाचे मिश्रण तूप साखरेसोबत घ्यावे.

    ५)पोटात गॅसेस होत असल्यास धण्याचा काढा साखर व मध घालून घ्यावा.

    तसेच आंधूरली आली असल्यास धण्यांची पुरचुंडी थंड पाण्यात भिजवून डोळ्यावर ठेवणे,डोकेदुखीत धण्यांचा लेप करणे,लघ्वीची जळजळ होत असल्यास धण्याचा काढा साखर घालून घेणे इ.हे उपाय आपल्यापैकी ब-याच जणांना माहीत असणार ह्यात शंकाच नाही.

    धण्यांचे अतिसेवन केल्यास त्याचा दुष्परिणाम पुरूषांच्या स्पर्म काऊंटवर होऊन ते कमी होऊ शकतात तसेच स्त्रीयांमध्ये मासिकपाळी अनियमित येणे अथवा मासिक पाळीच्या वेळेस स्त्राव कमी होणे असे होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहारसार भाग ७

    केवळ फवारणी करणार्‍या शेतकऱ्याला जर कॅन्सर होतोय तर हे धान्य खाणार्‍यांना तो होईल की नाही, हे नीट विचार करून पहावे. ही समस्या फक्त भारतातीलच आहे असे समजू नये. पूर्ण जगात या रासायनिक शेतीचे कॅन्सर रूपी राक्षसी परिणाम दिसताहेत.या रासायनिक खत आणि विषारी औषधे निर्माण करणार्‍या भांडवलदार कारखानदारांची लाॅबी एवढी मजबूत आहे, की कोणत्याही देशातील सरकार उलथवून टाकण्याची यांची ताकद आहे.

  • किचन क्लिनीक – वांगी

    ह्याच्या सुंदर रंगावरून ह्याला वांगे हे नाव पडले असावे.बायकांचा फेव्हरेट वांगी कलर हो.वांगीची भाजी हि ब-याच मंडळीची आवडीची बुवा.वांगीच भरीत,रसभाजी,कापं,वांगी भात,भरली वांगी,वांगीचं लोणचे,वांगीची आमटी सगळेच पदार्थ सुरेख लागतात बुवा.

    हि वांगी लहान व मोठी अशा दोन आकारात मिळतात बरं का.दोन्ही छान लागतात.वांगीचे रोप हे कंबर भर उंच असते व त्यात हि गोल गोमटीफळे लागतात जी आपण भाजी करीता वापरतो.जसा हिचा उपयोग स्वयंपाकात होतो तसाच हिचा आपण घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो बरं.

    वांगे हे चवीला तुरट,कडवट,तिखट असे मिश्र चवीचे असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात पित्त व कफ हे तीन्ही दोष कमी करते.पण वांग्यावर केल्या जाणा-या संस्काराचा जबरदस्त परिणाम होतो बरे का ह्याचा अर्थ असा कि आपण जर वांग्याची रस भाजी केली अर्थात बटाट व पाणी ह्या सोबत वांगे शिजवल्यावर ते हमखास वात वाढवणार पण तेलात तळलेले काप व वांग्याचे भरीत वात कमी करणार, आहे ना हि गंमत संस्काराची.

    आता वांग्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहुया:

    १)वांग्याचे गुळ घालून केलेले भरीत संध्याकाळी खाल्ल्यास छान झोप लागते.

    २)गळवे पिकुन सूज कमी व्हायला वांगी भाजून त्याचे पोटीस बांधावे.

    ३)कोरडा खोकला येऊन घशाला कोरड पडत असल्यास १ कप कच्च्या वांग्याचे तुकडे ४ कप पाण्यात १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात १/२ चमचा हळद व १ चमचा खडीसाखर घालून ते पाणी प्यावे.

    ४)कोवळ्या वांग्याचे तुकडे रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी ते तुकडे काढुन त्या पाण्याने हात धुवावे.ह्याने तळहातावर येणारा घाम कमी होतो.हा प्रयोग ३ आठवडे करावा.

    ५)डोळे दुखत असल्यास वांग्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात आराम मिळतो.

    वांगे अतिमात्रेत खाल्ल्याने पोटात वात धरून संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४