(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • आहारातील बदल – चवदार आहार – भाग १

    शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही.
    मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत.
    डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. आहार परिपूर्ण होण्यासाठी हे पदार्थ आवश्यकच आहेत.

    आहारातील सहा चवींपैकी तीन चवी या डाव्या बाजुलाच आहेत. आंबट, खारट, कडू. जेवताना या चवींचा वापर युक्तीने करायचा असतो. यातील एकही चव कमी होता नये, तरच आहार परिपूर्ण होतो. हे लक्षात ठेवावे.

    या प्रत्येक चवीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. ते जेवताना जपले पाहिजे. एखादा पदार्थ बंद केला तर तो आहार पूर्ण होणार कसा ? पुनरूक्ती दोष स्विकारून लिहितो,
    मधुमेह झाला तर गोड बंद केले जाते.
    पित्त वाढले तर आंबट, तिखट बंद.
    रक्तदाब वाढू नये म्हणून खारट बंद.
    आवडत नाही, म्हणून कडू पण बंद.
    राहिली फक्त तुरट चव. ज्यातून पोषण काही होत नाही.

    मग आपले जेवण परिपूर्ण कसे बनणार ?
    आणि पॅथाॅलाॅजीचे रिपोर्ट पण परिपूर्ण कसे येणार ? एखादी चव इकडेतिकडे झाली कि त्याचा परिणाम रिपोर्टमध्ये दिसणार. त्याची पूर्तता करायला एखादी गोळी कायमची सुरू होणार.
    त्यापेक्षा आपले नेहेमीचे जेवणच संतुलित ठेवावे. हा सोपा उपाय.

    एखाद्या चवीचा पदार्थ काय गुणाचा, अवगुणाचा आहे, हे शास्त्रकारांनी ग्रंथात वर्णन केले आहे.
    म्हणजे खारट पदार्थांनी केस गळतात, कडू चवीने धातुक्षय होतो, गोड पदार्थ खाल्ले की चरबी वाढते इ.इ.
    याचा अर्थ ती चव अवगुणीच आहे, ती कायमची बंद करा, असे मात्र नक्कीच नव्हे.

    तात्पुरत्या बिघडलेल्या दोषांवर विजय मिळवण्यासाठी त्याचे सर्व गुणअवगुण परिचित असावे लागतात, म्हणून त्यांना साम्यावस्थेत, म्हणजेच पूर्वपदावर आणण्यासाठी काय युक्त्या योजाव्यात, याचे दिशादर्शन वैद्यांना होते. म्हणून ग्रंथ शिकायचे असतात. त्यांना प्रमाण मानायचे असते, पण व्यवहारात मात्र स्थळ काळ वेळेनुसार यात बदल करण्याचे सर्व अधिकार ग्रंथकारांनी वैद्यांकडे दिलेले आहेत.

    एखादा मुलगा वांड असतो, एखादा अवगुण त्याच्यात असतो, म्हणून आई बाबा त्याला झिडकारत नाहीत, तर युक्तीने त्याचा अवगुण कसा कमी करता येईल, हे पहातात. काहीवेळा प्रेम करून, काहीवेळा समजावून, कधीतरी थोडीफार शिक्षा करून, तो अवगुण काढण्याचा प्रयत्न करणे याला जीवन ऐसे नाव !

    इथे तर कोणीच परिपूर्ण नाही. जेवणात आणि जीवनात देखील ! कुठेतरी कोणीतरी कमी अधिक असणारच.

    परिपूर्ण तर नवीन सुन पण नाही, आणि अनुभवी सासु पण नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे गुण अवगुण जाणणे, एकमेकांच्या चवी समजून घेणे, हे घर सांभाळण्यासाठी, अत्यंत आवश्यक आहे. तरच उत्तम संसार होतो.

    मनापासून प्रेम करणारी, पण बाहेरून तत्वांसाठी भांडणारी, अवखळ फटकळ बहिण भावासाठी बाहेरून आंबट, पण आतून मधुर असते, पण नणंद या भूमिकेतून तिखट वाटते. मेहुणीचे मात्र तसे नसते हो, ती सदाबहार मधुर असते.

    तसेच या चवींचे आहे.

    कोण जास्त तिखट आहे, कोण कडू बोलतंय, हे इतरांनी समजून गोडपणा वाढण्यासाठी, काय करायचं हे ठरवावं लागतं. आमटी तिखट असली तर त्याला बॅलन्स करणारा आंबट आणि गोड पदार्थ वाढवावा, की झाले. तिखट आमटी टाकून देण्याची आवश्यकता नाही.
    हे ज्या घरातील सासु सुनाना कळते ते घर सुदृढ होते.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    01.11.2016

  • विडा घ्या हो नारायणा – भाग १

    देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग चार !

    एक माणूस सोडला तर कोणी पशुपक्षी सहसा आजारी पडत नाहीत, हे कटु सत्य आहे. इतर प्राणी आणि माणूस यात एक धर्म सोडला तर बाकी आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी समान आहेत. या अर्थी एक सुभाषित पण शिकल्याचे स्मरते.

    या सगळ्या पशुपक्ष्यांना नियत आयु मिळाली आहे. निसर्गाचे वरदान आहे. निसर्गच त्यांना शिकवत असतो. प्रत्येकाचा आहार ठरवून दिलेला आहे, त्यात ते बदल करीत नाहीत. गाई म्हैशीला कितीही उपाशी ठेवले तरी मांस भक्षण करणार नाही, वाघसिंहाला कितीही उपाशी ठेवले तरी ते गवताला तोंडही लावणार नाहीत. यामुळे की काय त्यांचे आरोग्य चांगले रहाते. शिकार करून पोट भरलेले असले तर समोर हरीण फिरले तरी सिंह त्याच्याकडे बघत सुद्धा नाही,

    पोपट फक्त झाडावरचाच पेरू खातो, शिळा पेरू अजिबात खात नाही. शिळा म्हणजे झाडावरून जमिनीवर पडलेला सुद्धा खात नाही. कावळ्याला मात्र किडे पडलेला उंदीर सुद्धा चालतो, किंवा विष घालून मारलेला उंदीर देखील चालतो. गटारात पडून मेलेला पण चालतो, अपघाताने गाडीखाली सापडून मेलेला उंदीर ही त्याची जणुकाही फीस्टच !

    प्रत्येक पशुपक्ष्याच्या नवीन पिल्लांसाठी प्रत्येक वेळी नवीन घरटे बांधले जाते. जुन्या घरट्याचा वापर कुंभारमाशीदेखील करत नाही. फळांनी लगडलेल्या झाडावर पक्ष्यांचे घरटे दिसत नाही, छोटे पक्षी छोट्या झाडांवर तर, गरूडासारखे मोठे पक्षी मोठ्या झाडाच्या अगदी वर घरटे बांधतात. ही यांची जीवन वैशिष्ट्य दिसतात. स्वतः जगण्यासाठी किंवा त्यांचा वंश वाढण्यासाठी असे करणे त्यांना निसर्गाने शिकवलेले असते.

    जाती वर्ण भेदानुसार हे वरवर दिसणारे फरक असले तरी सूर्यास्त झाल्यावर मात्र कोणीच खात नाही, हे मात्र वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

    माणसाने पाळलेल्या प्राण्यांमधे मात्र ही वैशिष्ट्ये बदललेली दिसतात. माणसाप्रमाणे, माणसाने पाळलेल्या पशुपक्ष्यांनीही आपली जीवनपद्धती बदलली आणि माणसांप्रमाणे त्यांनाही डाॅक्टरांची गरज भासू लागली.

    निसर्गात आढळणारे प्राणी आणि माणसाच्या अवतीभवती वावरत असले तरी, माणसाने ज्यांना पाळलेले नाहीत, अश्या पशुपक्ष्यांनी मात्र आपली जीवनपद्धत बदललेली नाही.

    त्याचाच परिणाम म्हणून असेल, पण सर्व कावळे एकाच आकाराचे दिसतात. एक जाड, एक बारीक, असे दिसत नाही. जसा कावळा तशीच चिमणी, तसाच पोपट, तसेच कबुतर.

    निसर्गातील सर्वच प्राणी आहेत त्या आकारामधे बंदिस्त आहेत....
    .
    .
    .
    .
    .
    .

    फक्त माणूस सोडला तर !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.05.2017

  • आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७४

    आहारातील या ग्लोबल बदलाचे परिणाम रोग स्वरूपात भोगावे लागणार आहेत हे नक्की. बदलाचे परिणाम आपणा सर्वाना समोर दिसत आहेत. सुदृढ, काटक, कोकणी माणसाची पोटे सुटु लागली. बुद्धीजीवी, बैठे काम करणारा श्रमजीवी शेतकरी, मधुमेहासारख्या आजाराच्या फाईल्स, मोठ्या अभिमानाने डाॅक्टरांच्या टेबलवर आपटून टाकू लागला.

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – मुळ्याचा पाला

    मुळ्याची भाजी आवडीने खाणारे लोक तसे कमीच आढळतात.आपण भाजी करताना पाल्यासोबत मुळा देखील वापरतो.पंजबी डिश मुलीके पर्राठे जाम फेमस आहे बुवा पण मला अजुनही तो खायचा योग आला नाही,मुळ्याच्या कोवळ्या पाल्याची लिंबू पिळून केलेली कोशिंबीर देखील सुरेख लागते बरं का.

    तर असा हा मुळ्याचा पाला आपण भाजी करायला तर वापरतोच पण ह्याचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते ही पाहणे गरजेचे आहे.

    मुळ्याचे झुडूप असते व मुळा जो पांढरा असतो जमिनीखाली उगवतो तर पाल्याला उगवणा-या शेंगामध्ये बिया असतात.मुळ्याचा पाला हा कडू,खारट व गोड अशा मिश्र चवीचा असमतोल तो शरिरातील कफ आणी वात दोष कमी करतो.

    आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)लघ्वीला कमी व बुळबुळीत होत असेल तर मुळ्याच्या पाल्याचा रस १/४ कप सकाळी अनशापोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावा.

    २)छोटा मुतखडा असल्यास मुळ्याच्या पाल्याचा रस १/२ कप + १ चमचा धणे पुड नियमीत ६ महिने घ्यावे तो खडी विरघळतो.

    ३)शौचास काळपट पांढरे होणे,भुक न लागणे,अंग जड होणे अशा तक्रारी मध्ये १/४ कप मुळ्याच्या पानांचा रस+१/४चमचा कळी मिरीपूड रोज दिवसातून ४ वेळेस काही दिवस घ्यावी.

    ४)संडासला साफ होत नसेल तर मुळ्याच्या पाल्याची भाजी नियमीत जेवणात असावी.

    ५)वारंवार सर्दी खोकला होत असल्यास २ चमचे मुळ्याच्या पाल्याचा रस+२ चिमूट मिरपुड+ १/४ चमचा मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस काहि दिवस घ्यावे.

    मुळ्याचा पाला खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास व वारंवार संडासला होते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सोळा

    या अन्नपचनातून आणखी एक स्फोटक पदार्थ तयार होतो. जो दिसत नाही, पण आपले अस्तित्व सतत दाखवत असतो,

    ज्याच्यामुळे दवाखान्यात येणारे नव्वद टक्के रूग्ण हैराण झालेले असतात,

    जो आजपर्यंत कोणत्याही पॅथाॅलाॅजी लॅबला दिसलेला नाही, कंप्युटरला समजलेला नाही, एम आर आय ला उमजलेला नाही. स्कॅनमशीन शोधू शकली नाही.

    जो आपले कर्तृत्व तर दाखवतो, पण स्वतः मात्र नामानिराळा रहातो.

    ज्याच्या दबावाखाली भले भले अवयव गुपचूप बसून रहातात. आपले कामही करू शकत नाही, असा दरारा असणारा,

    ग्रंथात, ज्याच्या नावावर, ऐशी रोगांची भलीमोठी लिस्ट लागलेली आहे असा,

    वाॅन्टेड असे फर्मान येऊनही त्याला कोणीही पकडू न शकलेला,

    जो स्वतः विकृत होऊन, कफाला पित्ताला हलवून टाकण्याची क्षमता असलेला,

    स्वतःची वेगळी स्रोतस यंत्रणा नसतानाही, इतर प्रस्थापित यंत्रणेचा वापर करत, सर्व स्रोतसांमधे भरून रहाणारा,

    विकृत झालेल्या पित्तामुळे बिघडलेला अग्नि हा ज्याचा पितामह म्हणजे आजोबा, आणि त्यामुळेच विकृत झालेल्या कफाचा परिणाम म्हणून जन्माला आलेले 'आमजन्य अपचन' हा ज्याचा पिता आहे, ज्याच्यामुळे अनेक अन्य रोगांना जन्म मिळालेला असतो, किंवा जो त्यांचा जन्मदाता असतो,

    शोषून घेऊन सुकवून टाकणे हा दुर्गुण असलेला, अत्यंत चंचल स्वभावाची जोड मिळाली की, समोरच्यातला स्नेह आटवून टाकणारा,

    पाण्यामुळे वाढणारा, पाण्यात काम करण्याऱ्या मंडळींना लवकर पकडणारा, थंड गुणाचा जवळचा मित्र असणारा,

    ज्याच्या अस्तित्वामुळे पोटाला चारी बाजूला सारखीच तडस लागते, हा भौतिकशास्त्रातील नियम सिद्ध करणारा,

    ज्याच्याकडे स्त्री पुरूष वृद्ध बालक असा भेद नाही, कोणताही वांशिक, जातीय, धार्मिक भेदभाव न मानणारा,

    हाडे ठिसूळ करण्यात एक नंबर, चरबी एका जागी साठवून ठेवण्यात एक नंबर, मळाला सुकवून टाकून विबंध निर्माण करण्यात एक नंबर, मनात आलं तर अग्निला भडकवून टाकून, एका ठिकाणी लागलेली आग दुसऱ्या ठिकाणी नेऊन, लावालावी करण्यात एक नंबर असलेला,

    श्रम केले नाही, पोट हलवले नाही, पोट दाबले गेले नाही, पोट पिळले गेले नाही, तर जिथे आहे तिथे, तस्साच पडून रहाणारा,

    बहुतेक वेळा आभासी ह्रदयरोगाची लक्षणे दाखवणारा, आणि प्रचंड भीती उत्पन्न करणारा,

    क्षणात इथे तर क्षणात तिथे असा लपाछपीचा खेळ खेळत स्नायुंना कमजोर करून टाकणारा,

    काय खाल्लेतर बरे होईल, काय नाय खाल्लेतर बरे होईल, या द्वंद्वात कायम ठेवणारा, काहीही खाल्लेतरी आणि काही नाही खाल्लेतरी जे करायचंय ते करणारा,

    एवढं असूनही स्वतंत्रपणे शास्त्रीय नावाचं बारसं न झालेला, त्यामुळे स्वतंत्र व्याधी म्हणावा की नाही, इथपर्यंत वैद्यांची चर्चासत्रे घडवणारा

    वन अॅण्ड ओन्ली वन
    गॅस
    गॅस
    आणि
    गॅस

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    31.03.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग त्रेसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 19-पुष्प सातवे

    पत्री पूजे मधे आणखी कोणाकोणाला मान दिला आहे तो पाहू.
    माका, बेल, धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली वांगी, कण्हेर, रूई, अर्जुन, गोकर्ण, वड, ताड, केवडा, निर्गुंडी, इडलिंबू किंवा महाळुंग, आवळा, अशोक, दुर्वा, कदंब, ब्राह्मी, जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चमेली, सायली, चाफा, इ. अनेक वनस्पतींची पाने देव आणि विशेषतः देवींसाठी सांगितलेली आहेत.
    यातील काही नावे कळणार नाहीत, गुगल गुरूजींना विचारलेत तर फोटोसहीत दाखवतील.

    ही सर्व पाने आपल्या अवतीभवती असतात. फक्त अज्ञानामुळे आपणाला त्याचे उपयोग माहिती असत नाहीत. पण प्रसंगी जीव वाचण्यासाठी सुद्धा काही पाने उपयोगी ठरतात.

    पानफुटी किंवा घावमारी किंवा कोंबाचे पान नावाची वनस्पतीचे पान रक्तस्तंभक आहे. म्हणजे कोणत्याही अवयवातून होणारा रक्तस्राव, किंवा बाह्य आघातामुळे जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी ही पाने जादूसारखी काम करतात. जखमेच्या आकारानुसार याची दोन तीन पाने वाटून ही पानांची चटणी जखमेवर लावली असता, जखम पटकन भरून येते.
    पेरूचा पाला, लाजरीचा पाला अशाच प्रकारे काम करतो. विशेषतः मुळव्याधीचे रक्त थांबवण्यासाठी पोटातून सुद्धा या पानांची चटणी खावी.

    जाईचा पाने चावत राहिली तर तोंडात येणारे उष्णतेचे फोड कमी होतात.

    तुळशीचे पान तर कफ विकारावर हुकुमी एक्काच आहे.

    हे सर्व उपचार करताना कोणातरी वडीलधारी माणसांची मदत घ्यावीच. यासाठी ते आपल्या जवळ असावेत,( वृद्धाश्रमात नसावेत. ) अन्यथा याचे प्रमाण, वापरायची पद्धत हे सर्वच काही लिहिता सांगता येत नाही ना. यासाठी गुरू हवा. जवळपास असणाऱ्या वैद्यांना भेटून त्यांच्या सवडीनुसार निसर्गाने दिलेल्या या अमूल्य ठेव्याचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे. अशी अनेक मंडळी आपल्या अवतीभवती असतात, यांच्याकडून जेवढे मिळेल ते ज्ञान घेत जावे, शिकत रहावे, ज्ञानी होत रहावे.

    एरंडाचे किंवा कापसाचे पान टाळूवर ठेवले असता, डोके गरम होत नाही. लहान मुलांची टाळू तेलाने भरून झाल्यावर त्यावर कापसाचे पान लावण्याची आपली परंपरा आहे. आता 'अंगाला तेल लावूच नका', असं डाॅक्टरच सांगतात, तेव्हा विषयच संपला. पण या सर्व जुन्या परंपरा कालबाह्य नक्कीच नाहीत. डाॅक्टरांना देखील माहिती आहे, की या रूढीमागील आरोग्य जरी आपल्याला माहिती नसले तरी, आपण लहानाचे मोठे झालो तेव्हा आपल्या आईने आपल्याला हे सर्व उपचार केलेले होते, फक्त हे उपचार आज आमच्या पाश्चात्य धर्तीच्या सिलॅबसमधे लिखित स्वरूपात नाही, आणि आमच्याकडे यातील आरोग्य शोधून काढायची दृष्टी नाही एवढंच.

    देवाच्या नावाने का होईना पण काही वनस्पतींना आपल्या अवतीभवती जागे ठेवणाऱ्या या भारतीय रूढी परंपरंपरांना साष्टांग नमस्कार.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.06.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग दहा

    झोपण्यापूर्वी पुनः एकदा दंतधावन करावे, असे फक्त आजचेच विज्ञान सांगते असे नाही तर भारतीय संस्कृती सुद्धा सांगते.
    रात्री झोपताना कोणत्याही घरगुती अथवा कंपनीमेड दंतमंजनाने दात जरूर घासावेत. खळखळून चुळा भराव्यात आणि परत काहीही तोंडात न टाकता झोपावे.

  • आहारातील बदल भाग ५४ – चवदार आहार -भाग १५

    रस्साभाजी मधे रस्सा महत्वाचा !
    ग्रेव्ही महत्वाची. त्यातले पदार्थ बदलले की परिणाम बदलणार .
    जसं कोणत्याही भाजीतले पाणी हे वात वाढवणारे असते. पण पाण्याशिवाय, केवळ परतून किंवा वाफेवर, ज्या भाज्या बनवल्या जातात, त्या वात वाढवत नाहीत.

    पण पाणी घालून शिजवलेल्या भाज्या वात वाढवतात.

    जसं बटाटा हा वात वाढवतो. म्हणजे बटाटावडा करताना बटाटा जसा शिजवला जातो तसा पाण्यात शिजवला तर वात हमखास वाढणार. बटाट्याच्या काचऱ्या केल्या तर त्याला पाणी लागत नाही. म्हणून वात तेवढा वाढणार नाही. बटाटे चिरून, थोड्याश्या तेलात परतून मग पाणी घालून शिजवले तरी त्याचे गुण बदलतात.
    पण हाच बटाटा बार्बिक्यु सारखा थेट अग्निवर भाजला तर पचायला शिजवल्यापेक्षा, काचऱ्यांपेक्षाही हलका होतो.

    भरली वांगी वांग्यामधे मसाला भरून केली जातात. पण भाजली जात नाहीत, फक्त शिजवली जातात, म्हणून पचायला जड होतात.
    वांगी बटाटा रस्सा हा फोडी परतून नंतर पाणी, मसालाग्रेव्ही घालून केला जातो. भाजल्यामुळे पचन थोडे सुलभ होते.
    वांग्याच्या काचऱ्या नुसत्याच परतल्या जातात, पाणी घातलेच जात नाही, म्हणून वांग्याच्या काचऱ्यांची भाजी पचायला हलकी. तर भरताचे वांगे शिजवण्याऐवजी भाजलेच जाते. पचायला आणखी हलके. वांगे एकच. मसाला जवळपास तोच. पण संस्कार बदलले की गुणधर्म बदलतात.

    पदार्थ जरी तिखट चवीचा असला तरी, तो पदार्थ बनवताना कसा बनवला जातोय, हे महत्वाचे.
    म्हणून रसभाजी, सुकी भाजी, परतून भाजी आणि बार्बिक्यु या सर्व तिखट पदार्थांचे परिणाम वेगवेगळे होतात.
    हा आहे संस्काराचा परिणाम.

    ग्रेव्ही करताना जे पदार्थ वापरले जातात, ते सुद्धा वेगवेगळे परिणाम दाखवतात. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही, नारळाची ग्रेव्ही, काजूची ग्रेव्ही, ही क्रमशः पचायला जड होत जाते.

    कोकणात रसभाजीला, चणाडाळीच्या पीठाचे अळण लावतात. अळण म्हणजे भाजीला घट्टपणा येण्यासाठी, भाजीतला रस आळण्यासाठी घातला जाणारा पदार्थ.
    काही ठिकाणी तांदुळाचे पीठ पण वापरतात.

    पाणी आणि भाजी शिजवल्यावर एकजीव होऊन जावीत, एकमेकांशी फटकून वागू नयेत, वाढलेल्या ताटात वेगळे वळण काढू नये, यासाठी हे अळण.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    15.11.2016

  • किचन क्लिनीक – कढिपत्ता

    हि वनस्पती न ओळखणारी भारतीय व्यक्ती अत्यंत दुर्मिळ असेल.बहुतेक करून शाकाहारी जेवणामध्ये ह्याचा वापर जास्त केला जातो.फोडणी मग ती कशाला ही असो चिवडा,उपिट,पोहे,आमटी,डाळ,फोडणीचा भात,भाज्या अशा एक ना अनेक पदार्थांना फोडणी देण्यासाठी ह्याचा देखील आवर्जून वापर केला जातो कारण ह्याच्या विशिष्ट रूचीवर्धक सुगंधाने (इथे मन मोहक वापरणे इष्ट वाटले नाही)प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवितो.असा हा कढिपत्ता .

    ह्याचा व्रुक्ष असतो.ह्याच्या पानांचा उपयोग जेवणात केला जातो.चवीला कडू,तिखट,तुरट अशी मिश्र चव आणी थंड असा हा कढिपत्ता शरीरातील वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवतो.

    ह्याचा उपयोग देखील आपण घरगुती उपचारांमध्ये करू शकतो बरे का!अगदी डोळयांपासुन ह्रूदयाचा पर्यंत ब-याच अवयवांना हा हितकर आहे.चला मग पाहूयात ह्याचे औषधी उपयोग.

    १)एॅसीडीटी मध्ये २ चमचे कढिपत्ता रस+१ चमचा लिंबु रस+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण चाटावे.

    २)गजकर्ण,खरूज,इसब अशा त्वचा रोगात कढिपत्त्याची चटणी बनवून ती गरम करून त्या भागावर लावावी.

    ३)ज्यांना वारंवार जंत होतात त्यांनी साधारण पणे १५-२० दिवस १ चमचा कढिपत्ता चटणी गुळात मिसळून पाण्यासोबत गिळावी.

    ४)मार लागणे,ठेचलागणे,मुरगळणे ह्यामुळे आलेल्या सुजेवर कढिपत्ता + हळद ह्याच्या पोटीसाने शेकावे.

    ५)बरेचदा गांधीलमाशी,मधमाशी,कोळी असे किटक अंगावर चिरडून मरतात आणी त्या जागी विखार होतो आणी मग आग होणे,खाज सुटणे,पुरळ येणे अशा तक्रारी सुरू होतात तेव्हा कढिपत्ता चुरून त्या भागावर लावावा.

    कढिपत्ता अतिप्रमाणात खाल्ल्यास तोंडाला कोरड पडते,संडासला घट्ट होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४