आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 26-दीपं दर्शयामी-भाग तीन
जसे इंधन तशी काजळी.
जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. मेणाचा असेल तर वेगळे. राॅकेलचा असेल तर काजळी जास्ती आणि पेट्रोल जाळले तर काजळी एकदम कमी. स्पिरीटला काजळी धरणारच नाही, तर विमानातील इंधनाची ज्योतच दिसणार नाही. म्हणजे जसे इंधन तशी काजळी. भगवत गीतेमधे या अर्थाचा एक श्लोक आला आहे...
भक्ष्ययते यद् ध्वान्तम कज्जलम च प्रसूयते।
यद् दीपोज्वलेत कज्जली भवेत् ।
जायते तादृशी प्रजा।
झिरोचा बल्ब, एल ई डी बल्ब, ट्यूबलाईट, फ्लुरोसंट बल्ब, हॅलोजन, हाय मास्क बल्ब या प्रत्येकापासुन मिळणारा प्रकाश वेगवेगळा.
आपल्याला ज्या कारणासाठी प्रकाश हवा आहे, त्याप्रमाणे योजना हवी. फक्त मलाच वाचायचे आहे, किंवा लेखन करायचे असेल तर टेबल लॅम्प पुरतो ना ! तिथे हॅलोजन नको ! आता तर पेनच्या रिफिलच्या टोकापुरताच उजेड पाडणारी पेन पण निघाली आहेत.
या प्रत्येक यंत्रणेला लागणारी विद्युत उर्जा देखील वेगवेगळी असते. काही ठिकाणी एसी करंट, काही ठिकाणी डीसी करंट काही ठिकाणी स्टॅबीलायझर, काही ठिकाणी अॅडेप्टर, तर काही ठिकाणी फक्त मायक्रोचीप पुरते. तसेच आहे. दिव्यातील इंधन जसे असेल तसे परिणाम आपणास मिळतात.
जो दिवा देवासाठी तसाच तो देहासाठी समजून घ्यावा. जशी काजळी दिव्यामधे तशी देहामध्ये देखील काजळी बनते. आपल्या अन्नाचा दर्जा जसा असेल, तशी काजळी बनण्याचे प्रमाण कमी जास्त होईल.
खाल्लेल्या अन्नातून चांगले आणि वाईट असे दोन भाग तयार होतात. चांगल्या उत्तम प्रतीचा आहार जर आपण सेवन केला तर तयार होणारे प्राॅडक्ट उत्तम प्रतीचेच असणार. मध्यम प्रतीचा आहार घेतला तर मध्यम प्रतीचे प्राॅडक्ट तयार होणार. आणि हलक्या प्रतीचे अन्न घेतले तर हलक्या दर्जाचे प्राॅडक्ट तयार होणार.
आड्यात जे असेल तेच पोहोऱ्यात येणार ना !
बिर्याणी करायची असेल तर तांदुळ बासमतीचाच हवा. साधा भात करायचा असेल तर तांदुळ मसूरी किंवा कोलम हवा. आणि पेज करायची असेल तर उकडा तांदुळ उत्तम असतो. आपल्याला कोणते प्राॅडक्ट बनवायचे आहे ते ठरवले तर तांदुळ कोणता वापरायचा ते निर्णय बदलतात.
तसेच शरीर पुष्ट करायचे असेल तर आहाराची योजना वेगवेगळी हवी. केवळ मांसधातु वाढवायचा असेल तर आहार वेगळा, रक्त वाढवायचे असेल तर आहार वेगळा आणि सगळेच धातु वाढवायचे असतील तर आहार वेगळा असतो.
या अन्नाच्या दर्ज्याला आयुर्वेदीय ग्रंथकार आणि गीताकार, सत्व रज तम असे नामाभिधान करतात.
आहार सात्विक असेल तर सर्व इंद्रिये, अवयव, धातु, अगदी मन सुद्धा सात्विक बनते. आहार राजसिक असेल, तर शरीरावर होणारा परिणाम राजसिक असतो, आणि आहार तामसिक असेल तर विचार आणि कृती तामसिक होते. हेच सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी, (पटवून घेणाऱ्याला) दिव्याचे उदाहरण ग्रंथकर्ते देतात.
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" असे तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेले आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.06.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4
कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.
देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.
सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
देव अशानी पावायचा नाऽही रं
देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !
देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.
अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.
श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.
पूजा करण्याच्या निमित्ताने,
"हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.
माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.05.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग पाच !
निसर्ग निसर्ग म्हणजे तरी काय ?
साधे सोपे उत्तर येईल.
व्यवस्था.
निसर्ग म्हणजे व्यवस्था, नियम.
सूर्य उगवतो, अस्ताला जातो. दिवस होतो, रात्र होते, ग्रह विशिष्ट दिशेने फिरतात, उपग्रह फिरतात. त्याच्यामुळे ग्रहणे होतात, वारा वाहातो, झाडे बहरतात, फुल उमलते, फळ बनते, झाडावरून फळ खालीच पडते, बी तयार होते, इकडे तिकडे जाते, पुनः नवीन वृक्ष बनतात.
हे सर्व काय आहे ?
त्याने नेमून दिलेले नियम आहेत. त्रिकालाबाधित सत्य !
कधीही न बदलणारे अंतिम सत्य म्हणजे निसर्ग !
या त्रिकालाबाधित सत्यांचा शोध घेत गेले असता, एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे निसर्गाने बनवलेले नियम निसर्गातील सर्वासाठी सारखेच बनवलेले आहेत. तिथे कुठेही, जात, धर्म, पंथ, गरीब श्रीमंत, राजा रंक, पौर्वात्य पाश्चिमात्य, पशू पक्षी, मानव अमानव, असा भेदभाव दिसत नाही. या नियमात कमालीची शिस्त आहे, या नियमात तसुभरदेखील फरक पडत नाही, आणि जर असा फरक पडला तर खुशाल समजावे, तो नियम निसर्गाचा नाही. बेशिस्त किंवा ढवळाढवळ निसर्गाला अजिबात खपत नाही. जर काही लुडबुड झालीच तर नुकसान होणार हे शंभर टक्के ठरलेले !
हा एक नियम गांभीर्याने समजून घेतला की आरोग्य समजून यायला वेळ लागणार नाही.
मृत्युबद्दलची भीती, मृत्यु येऊ नये यासाठी नियमितपणे आहार, घेतलेला आहार योग्य रितीने पचण्यासाठी पुरेशी विश्रांती, आणि आपण जाताना पुनः "आपणासारखे करिती तात्काळ" या उक्तीला आवश्यक असलेले मैथुन, या चार गोष्टी निसर्गाने वरील सर्वासाठी नेमून दिलेल्या आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या नियमांच्या मर्यादेलाच "धर्म" असेही म्हणतात. मानव आणि अमानव योनीमधे मागे पाहिलेल्या दूष्य देश बल काल या सूत्राप्रमाणे अवस्था बदलत जातील, त्यात योग्य तो बदल प्राप्त परिस्थितीनुसार करावा.
असाच धर्म शरीराचादेखील असतो. याला शरीरधर्म असे म्हणतात. रात्री झोप घेणे, सकाळी आपोआप जाग येणे, भुकेची जाणीव होणे, तहान लागणे, मल मूत्रादि उत्सर्जन क्रिया, (शरीरवेगांच्या संवेदना) कळणे, काम करताना उर्जा निर्माण होणे, त्यातून आनंद निर्माण होणे, याला "निसर्ग" म्हणतात. म्हणजे निसर्गाच्या नियमामधे बिघाड होत नाही. जे घडते ते घडू द्यावे, त्याविरोधात गेलो तर बिघडते.
उलटी होत असेल तर होऊ द्यावी, घाम येत असेल तर येऊ द्यावा, झोप येत असेल तर झोपावे, दमलो तर विश्रांती घ्यावी, भूक लागल्यावर जेवावे, तहान लागल्यावर पाणी प्यावे, निसर्ग असाच वागतो. कुठेही निसर्ग चक्र विस्कळीत झालेले दिसत नाही.
माणसाने जेव्हा यात बदल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निसर्ग सुद्धा कोपतो.
आम्ही आमच्यासाठी निसर्गाच्या नियमात पालट करण्याचा प्रयत्न केला तर रोग होणारच.
पण आजच्या काळानुसार, ज्यांना आपल्याला निसर्गाचे वेळापत्रक पाळणे अशक्य आहे, त्यांनी काय करावे ?
निसर्गाला जाणून घ्यावे. आणि दूष्य देश बल काल आदि ओळखावे. जेवढ्या शक्य आहेत, तेवढ्या आपल्या कामाच्या खाण्या पिण्याच्या वेळा निसर्गाला अनुकुल होतील अशा करून घ्याव्यात. जर काही बिघाड झालाच तर वैद्यांच्या सल्ल्यानुसार निसर्गदत्त औषधींचाच वापर करावा.
इथे पुनः रक्तघटक एवढेच पाहिजेत, अमुक या लेव्हलच्या वर नको, याच्या खाली नको, असे अभारतीय नियम करून घेऊ नयेत. हे सर्व "मॅनमेड नियम" केवळ शरीराचे ढोबळमान समजून घेण्यासाठी आणि अभ्यासासाठी आहे. हे जरूर शिकावे, पण या शरीर तपासण्या हे अंतिम सत्य नाही, हे पण लक्षात ठेवावे. मानवनिर्मित नियमांचा वापर युक्तीने व्हावा, नियमाने होऊ नये. मानवाने केलेले नियम हे अर्धसत्य असतात, निसर्ग हेच पूर्ण सत्य आहे, हे आपण मागे बघितलेले आहेच !
कृत्रिमपणे केलेला विचार आणि सहजपणाने झालेली कृती यात फरक असतोच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.05.2017
पाणी शुद्धीकरण भाग चार
पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात.
दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. ही वात ओली करावी. त्याचे दुसरे टोक बाहेर काढून खालील मडक्यात असे लोंबत ठेवावे की, वरच्या मडक्यातील पाणी थेंब थेंब वातीवरून खाली ठिपकत राहील. दोन्ही मडक्यावर नीट आच्छादन घालावे.
वरच्या मडक्यातील काही अशुद्धी, वातीमुळे खालील पाण्यात येणार नाही. फक्त वरच्या मडक्यातील तळापर्यंत गेलेल्या वातीच्या पातळीपेक्षा दुसरे टोक आणखी खालील पातळीवर आले पाहिजे, हे पहावे.
ही वात घसरून खाली येऊ नये यासाठी वरच्या मडक्यात वातीवर एखादी वाटी वजनासाठी ठेवावी.
टीप टीप बरसा पानी.... सुरू होईल.
वरच्या मडक्यातील पाणी गाळून आपोआप खालील मडक्यात जमा होईल. वरच्या मडक्यातील पाणी कमी होत जाईल. खालचे मडके भरत जाईल.
वातीला चिकटलेली धुळ, माती सारखी अशुद्धी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहाता येते. कापडाची वात धुवुन वाळवून ठेवली की, पुनः दुसऱ्या दिवशी वापरायला तयार !
खर्च म्हणाल तर काही नाही. मडक्यामुळे पाणी थंड पण होईल. वरील मडक्यात रोज एखाददुसरे सुगंधीत फूल किंवा पान किंवा बी किंवा वाळ्यासारखे सुगंधी असलेले एखादे मूळ ठेवावे. त्याचा वास, अर्क, आणि काही प्रमाणात सूक्ष्म औषधी गुण पाण्यात येतील.
दररोज औषधीयुक्त शुद्ध गाळलेले थंडगार पाणी मिळत जाईल.
करून तर बघा,
गंमत म्हणून !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.12.2016
निषेधार्ह पाणी भाग दोन
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे परत परत म्हणतात, आणि ते सुद्धा रोगांची नावे सांगायच्या अगोदरच सांगताहेत, न अम्बुपेयम्....पाण्याचा अतिरेक टाळा.
यापूर्वी, न पिबेत् सूर्येन्दु पवनम् अदृष्टम् । या श्लोकाची सुरवात त्यांनी "न" ने केली होती. या श्लोकाची सुरवात पण "न" ने केली आहे.
या उल्लेखित रोगांनी जे अशक्त झालेले रोगी आहेत, त्यांनी पाणी टाळावे.
अशक्त होण्याचे कारण यांची चयापचय प्रक्रिया बिघडलेली असते. शरीरातील दोषांच्या तरतम भावाने निर्माण झालेली रोगाची अवस्था, समान करण्यासाठी शरीर देखील काही तरी प्रयत्न (compensation) करीत असते.
सर्व रोग होण्यामागे मन्द झालेला अग्नी हेच कारण असते. अग्नी मंद झाला की, पाचनकर्म बिघडते. खाल्लेल्या अन्नाचे शरीराला अपेक्षित असलेले रूपांतरण, जे अग्निमहाराज करत असतात, ते बिघडते. पाचन बिघडले की, अन्नाचे पुढील शोषण पोषण बिघडते.
मोठ्या टोपात भात शिजवायचा असेल तर गॅस बारीक असून चालणार नाही. बर्नर मोठाच हवा तरच तांदुळ शिजतील, नाहीतर टोपात जे काही तयार होईल, त्याला भात असे म्हणता येणार नाही.
एक सुभाषित आठवतेय का, विद्येविना मति गेली....
तसं आहे, हे सर्व अनर्थ एका अग्निने केले. ज्या अग्निचा पाणी हा शत्रू आहे. म्हणून पाणी कमी (गरजेपुरतेच) प्यावे.असं वाग्भटजी सांगताहेत.
कोणताही रोग व्हायला लागला कि शरीर खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाची चव बिघडवून टाकते. चव बिघडली की, पाणी पण बेचव लागते. आणि खाण्या पिण्याची इच्छाच नाहीशी होते. शरीर जे सांगतेय, ते दीर्घकालीन विचार केला तर नेहेमी फायद्याचेच असते.
वाहातुक पोलीस शिटी मारून, बोलावून कसे सांगतो,
"पुढे अपघात झाला आहे. तातडीचे काम सुरू झाले आहे. इथून पुढे वाहाने नेऊ नका.अगदी स्कूटी सुद्धा जाणार नाही. जरा त्रास झाला तरी चालेल, पण आपली गाडी या मार्गाने नेऊ नका. वळवा. आणि परत मागे न्या. वाटलं तर दूरच्या पर्यायी मार्गाने जा"
तसं पोटात जेव्हा गडबड सुरू झालेली असते, तेव्हा "त्याचा" इंद्रियरूपी ट्रॅफिक अंमलदार मनामार्फत आतून सूचना देतो, "आतमधे किरकोळ दुरूस्तीचे काम सुरू आहे. कोणालाही, कोणत्याही कारणासाठी आत पाठवू नका. अगदी पाण्याला सुद्धा ! उगाच त्रास करू नका, त्रास देऊ नका. उगाच जबरदस्ती करू नका. थांबा थोडी विश्रांती घ्या.आणि द्या."
शरीराची ही अवस्था लंघन करण्याची असते. ही विशिष्ट अवस्था ओळखता यायला हवी. यावेळी फक्त जिभेवर संयम ठेवता यायला हवा. की पुढचे सगळं ट्रॅफीक जाम टाळता येते. नाहीतर टाळक्याला ताप होतो.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ची जाहीरात आपण बघतो.
अंडी खा, अशी जाहीरात का करावी लागते ?
कारणही तसेच आहे.अंडे हे शाकाहारीच आहे, असेही सांगितले जाते.
अंडे चांगले की वाईट, अंडे आरोग्य वाढवते की कोलेस्टेरॉल? यापैकी कशाचाही संदर्भ न देता, अंडे हे शाकाहारीच आहे, त्यात जीव नसतो, अशी जाहीरात करणे हा बुद्धी भेद करण्याचा दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.
असे ऐकीवात आहे की, दरमहा बाहेर पडणारा रजाचा स्राव म्हणजे म्हणे अफलीत अंडे. म्हणून त्याच्यात जीव नसतो. जसं ए1 ए2 दुधाबद्दल, साबुदाण्याबद्दल, अजूनही काही जणांच्या मनात संभ्रम आहेत, तसेच काहीसे अंड्याबद्दल आहेत. पण हे नक्की की, अंडे हे शाकाहारी नाहीच. त्यात रक्त आणि मांस असतेच. कोणतेही ब्राॅयलर उत्पादक व्यापारी आपल्या प्राॅडक्टविषयी संभ्रम निर्माण करणारी किंवा काॅन्ट्राडिक्टरी माहिती कशी जाहीर करतील ?
आयुर्वेदात जे अंडे औषधामधे वापरायला सांगितले आहे ते, जंगलात फिरणाऱ्या किंवा आपले अन्न आपल्याच पायांनी उकरून खाणाऱ्या गावठी पक्ष्यांचे सांगितले आहे. ब्राॅयलर नाही. त्याची कारणमीमांसा मागील आरोग्य टीपेमध्ये केलेली आहे.
जे खाऊ शकतात, त्या कुपोषित बालकांसाठी मात्र अंडी हा प्रोटीनचा मोठा स्त्रोत होऊ शकतो.
कोंबड्याची कृत्रिम पैदास वाढवली, पण दुर्दैवाने जेवढी विक्री व्हायला हवी, तेवढी झाली नाही. अगदी 1970 पासूनचा विचार केला तरी दहा वर्षात अंड्याची किंमत फक्त दुप्पट झाली, हे नुकसान खूप मोठं होतं.अंडी हा नाशवंत माल वेळीच माल खपला नाही तर सरळ नुकसान पुनः अंड्याच्या प्रवासात नासधुस , फुटणे इ नुकसान होणे स्वाभाविकच. म्हणून हा तोटा टाळण्यासाठी अंडी उत्पादकांना खोटी का होईना पण जाहीरात करणे भाग पडले.
मोठाले भांडवल घातल्यावर त्यात नुकसान होऊ नये म्हणून व्यवसायात नीती, संस्कृती, सभ्यता, संस्कार, प्रेमभाव, जीवदया, सर्व नियम अगदी धाब्यावर बसवले जातात, मग व्यवसाय कोणताही असो. खरं आहे ना ?
हा व्यापाराचा नियमच आहे. तिथे नातेगोते, ओळखपाळख, मित्र मैत्री, यामधे 'बिझनेस' सोडून काही पाहू नये असं म्हणतात. आताच्या पाश्चात्य कंपन्यांच्या कोणत्याही मल्टीलिंक मार्केटिंगच्या ट्रेनिंगमध्ये हेच शिकवले जाते. तेच भारतीय कंपन्याही शिकल्या आणि व्यापारवृद्धी केली जाऊ लागली. अगदी शिक्षण क्षेत्रापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत हे पहायला मिळते. असो.
मुख्य विक्री मांसाची हे तत्व बाजूला होऊन मग अन्य अवयवांच्या विक्रीतून तूट भरून काढणे सुरू झाले. आणि बाय प्राॅडक्टची जागा मुख्य व्यवसायाने कधी घेतली हे कळलेसुद्धा नाही.
मांस उद्योगामधे सर्वात मोठा खर्च पाण्यावर केला जातो. पाण्याची किती मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो त्याची नुसती आकडेवारी पहा.
एक किलो भाजीपाला पिकवण्यासाठी शंभर दिवसात एकशेवीस लीटर पाणी लागते.
एक किलो फळे तयार करायला दीडशे लीटर, आणि एक किलो मांस निर्माण होण्यासाठी तब्बल पाच हजार लीटर पाण्याची गरज भासते.
एका बाजूने होळीच्या सणाला नजरेत भरणारी लाकुडतोड, रंगपंचमीच्या निमित्ताने वापरले जाणारे पाणी, दसरा, वटपौर्णिमेच्या निमित्ताने तोड होत असलेली बहुवर्षायु झाडे यांच्या तुलनेत दररोज होणारा हा पाण्याचा अपव्यय लक्षात नको का घ्यायला ? निदान महाराष्ट्रात तरी, जिथे पाण्याअभावी माणसेच तडफडून मरत आहेत !
अन्न (किंवा मांस ) ताजे असावे, हा अतिसामान्य नियम झाला, पण मोठाल्या कत्तलखान्यातून वेगळे केलेले मांस दुसरी कडे नेण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा लागते. त्यासाठी वीजेचा खूप वापर होतो. या वीजेमधे भार नियमन चालत नाही. भारतात ही कोल्ड चेन मेन्टेन ठेवणं शक्य आहे ? काय वाटतं ?
नक्कीच नाही.
मांस तसेच पुढे पाठवले जाते. यातून खूप मोठा जंतुसंसर्ग होऊ शकतो.
उत्तम प्रतीची कोल्डचेन मेंटेन केलेले मांस परदेशात पाठवले जाते. पण त्यासाठी खर्च खूप जास्त येतो. कारण त्यासाठी वीज, पाणी जास्त खर्च होते. भारतात ते परवडत नाही.
विमानाने जाणाऱ्या मांसासाठी खर्च होणारे पाणी, वीज मात्र भारताकडून ! त्याच्यासाठी करावे लागणारे भारनियमन भारतीयांनीच सोसायचे. मांस प्रकल्पातून तयार होणारा जैवीक कचरा, त्याची दुर्गंधी, भारतीयांनी सहन करायची.. ...
का म्हणून ???
या अवाढव्य प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी, रक्त, मांस मिश्रीत कचरा नदीमधे तसाच सोडला जातो.
म्हणजे एकुणच या मोठ्याल्या प्रकल्पातून देखील निसर्गावर आक्रमणच केले जाते.
कधीतरी या गोष्टीचा विचार करावाच लागेल.
हा विषयच वादग्रस्त आहे. म्हणून चर्चा करणेच टाळावे, लिखाण थांबवावे, असे करणे पण योग्य होणार नाही. त्यामुळे हे सर्व लिहावे लागत आहे. नाहीतर हे असेच चालायचे, यात बदल होणे भारतात तरी शक्य नाही, असे म्हणून मौन धरणे पिंडाला पटत नाही. जे योग्य आहे, तिथे ते न बोलणे, हेदेखील पाप लागणारे आहे.
मी पापपुण्यावर विश्वास ठेवणारा श्रद्धाळू माणूस असल्याने लिहिण्याचे धाडस केले, एवढेच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
14.10.2016
पाण्याची शुद्धाशुद्धता
पाणी जसे मिळते तसेच जर वापरले तर ते प्रमेहाचे कारण आहे, असे सांगितले आहे.
त्यासाठी शास्त्रकार ग्राम्य उदक असा शब्द वापरतात. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी सोडून अन्य सर्व प्रकारच्या पाण्यात दोष असतात. दोष फक्त नलोदकात असतात, असे नाही.
अनेक आजार अशुद्ध पाणी पिऊन होत असतात, हे केवळ आधुनिक विज्ञान सांगते असे नाही तर, अतिप्राचीन आयुर्वेदात देखील, ज्या काळात दुर्बीणी, सूक्ष्मदर्शित्रे बहुधा नव्हती,( असं आपणाला आज वाटतं. ) त्या काळात आज न सांगितले गेलेले व्याधी पण सांगितले आहेत, हे नवल !
एवढेच नव्हे तर प्रदेशानुसार पाण्याचे गुण आणि दोषही सांगितलेले आहेत. जसे पश्चिमेकडे असणाऱ्या अरबी समुद्राच्या दिशेत वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी हितकर असते, पण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी दोषयुक्त असते. ज्या नद्यांचे पाणी खळाळत वाहाणारे, दगडांवर आपटत इकडेतिकडे तुषार उडवित येणारे असते, ते पाणी पचायला हलके असते.
याउलट ज्या प्रदेशातील नद्या संथ वाहातात, पाणी हलताना पण दिसत नाही, अश्या नद्यांचे पाणी पिऊ नये. विषयाची व्याप्ती अधिक होऊ नये यासाठी हे फक्त माहितीसाठी सांगतो.
पाणी शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखावे या विषयी ग्रंथकार म्हणतात, जे पाणी साठवण्यासाठी दगडाचे कुंड किंवा डोणी असेल तर चांगले. किंवा दगडाच्या खोलगट भागात साठलेले पावसाचे पाणी उत्तम असते.
पण पहिल्या पावसाचे पाणी नकोच, असेही शास्त्रकार सांगायला विसरत नाहीत. त्यात वातावरणातील अशुद्धी जास्त प्रमाणात असतात. पहिले एक दोन पाऊस पडून गेल्यावर म्हणजे पाऊस चांगला सुरू झाल्यावर वातावरणातील दोष कमी होत जातात. पाण्यानेच ते धुवुन टाकले जातात.
सकाळी पाणी भरावे. दिवसभर वापरावे आणि सायंकाळी संपवून टाकावे. सूर्य असेपर्यंत पाण्यात दोष निर्माण होण्याचे प्रमाण कमी असते. नंतर मात्र त्यात जंतुसंसर्गामुळे दोष निर्माण होतात.
स्वच्छ वस्त्राने गाळून घेतलेले, सोन्याच्या वा मातीच्या किंवा काचेच्या पात्रात जमवलेले पाणी चांगले. तांब्याच्या किंवा पितळीच्या कल्हई केलेल्या भांड्यात पाणी ठेवलेले असेल तर त्यातील अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव मरतात, असे आजचे एक संशोधन सांगते.
पण तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवणे आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी वापरणे चुक आहे. ते पाणी कळकते. पाण्याची चव पण बदलते.त्या पाण्यावर सूर्य किरणे पोचत नाहीत अश्या पाण्याने व्याधी वाढतात.
आजचे वाॅटर प्युरीफायर किती भरवंशाचे आहेत, हे सांगता येत नाही.
आजच्या जाहिरीतीच्या जमान्यात सचीन सांगतोय ते बरोबर कि हेमामालीनी ? कोणावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे.
धातुंचा पाण्याबरोबर संयोग होतो. साहचर्याचा परिणाम म्हणून ज्या धातुच्या भांड्यात पाणी ठेवणार, भले पाणी उकळले नसेलही, त्या धातुचे गुण अवगुण पाण्यात उतरणार हे नक्की आहे.
बरं आमच्या घरात लोखंडी नळात रात्रभर साठून रहाणारे आणि प्लॅस्टिकच्या टाकित साठवलेले पाणी तर आम्ही टाळू शकतच नाही.
आता आली का पंचाईत !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.12.2016
झोपण्यापूर्वी पुनः एकदा दंतधावन करावे, असे फक्त आजचेच विज्ञान सांगते असे नाही तर भारतीय संस्कृती सुद्धा सांगते.
रात्री झोपताना कोणत्याही घरगुती अथवा कंपनीमेड दंतमंजनाने दात जरूर घासावेत. खळखळून चुळा भराव्यात आणि परत काहीही तोंडात न टाकता झोपावे.
न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 3
जसं काळोख्या जंगलातील पाणी निषिद्ध सांगितले आहे, तसेच आपल्या घरातील असा प्रदेश म्हणजे शीतकपाट. या फ्रीजमध्ये देखील असाच काळाकुट्ट काळोखच दडलेला असतो.
शीतकपाटामधे ना सूर्यप्रकाश, ना चंद्रकिरण ना वाऱ्याची झुळुक. हे कारण देखील ग्रंथकार देताहेत. अशा ठिकाणी असलेले अन्न पाणी घन आणि गुरू गुणाचे बनते, असे स्पष्टपणे सांगताहेत.
या ठिकाणचे अन्नपाणी, वात आणि कफ दोष वाढवणारे बनते. हे पाणी तात्काळ पित्तशमन करेलही, पण अग्निच्या विरोधी काम होईल, आणि थंड गुणांनी वातही वाढवेल. वाढलेला वात पुनः पित्ताला अन्य ठिकाणी जायला मदत करतो. एकंदरीत हे पाणी गडबड करणारेच ठरते. दाताला झिणझिण्या आणणे, हिरड्या शिणशिणणे, लालास्राव कमी करणे, संकोच घडून आल्याने चवही बदलून जाते. सर्वात महत्वाचे आम, क्लेद, चिकटपणा वाढवणारे असते.
आता करा यादी.
फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या,
दूधाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या,
पालेभाज्यांच्या जुड्या,
दोन चार दिवसाची मळून ठेवलेली कणिक,
पाकीटातील मांसाचे तुकडे,
आईस्क्रीमचे गोळे,
दह्याचे पातेले,
शिल्लक राहिलेली कोशिंबीर, सॅलेड,
डबाबंद रसगुल्ले, गुलाबजाम, श्रीखंड,
ज्युस, इ.इ. हे सर्व ....????
सूर्येंदुपवनम् अदृष्टम् न भक्षयेत.....
फ्रीजमधीलच नव्हे तर, जे जे अन्नपदार्थ, पाणी, सूर्येंदुपवनम् अदृष्टम असतील ते ते सर्व, या वैश्विक नियमानुसार निषिध्दच ना !
शेवटी ज्या अन्न पाण्यावर सूर्य, चंद्र, वारा यांचा स्पर्श नसेल, ते अन्न पाणी खाण्या पिण्यासाठी अयोग्यच ठरेल. मग ते निबाड जंगलातील एखाद्या तलावातील असूदेत, बोअरवेलचे असूदेत, किंवा टाकीत साठवलेले पाणी, रेन वाॅटर हारवेस्टींगच्या माध्यमातून गोळा करून घराच्या खाली तळघरातील टाकीचे असू दे. किंवा घरातील शीतघराचे ! !
असे साठलेले पाणी वात आणि कफ दोष वाढवणारे असल्यामुळे याच गुणाने निषिध्द ठरेल.
शास्त्रकारानी आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवला आहे. शास्त्रकाराते वाट पुसतु असं माऊली पण म्हणतात. ज्या मार्गाने गेल्यावर, आपले भले होईल त्या मार्गाने जाणेच संयुक्तिक होईल ना !
आजची काळाची गरज,
हे असंच चालायचं,
काळानुसार बदलायला नको काय ?
आजचे विज्ञान, शोध मान्य करायचे नाही का ?
एकदा वैश्विक नियम पाळायचे ठरवले तर बाकी
या साऱ्या लंगड्या पळवाटा आहेत, असे वाटत नाही काय ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti