(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुनर्नवा – (वसुची भाजी /घेटुळी)

    ह्याचे प्रसरणशील व बहुवर्षायू क्षुप असते.हे २-३ फुट लांब असते हिचे पांढरा व लाल असे दोन प्रकार असतात.त्यातील पांढरी पुनर्नवा हि प्रामुख्याने भाजी करीता वापरतात.हि भाजी पथ्यकर असली तरी देखील ब-याच प्रमाणात उपेक्षित आहे.म्हणुनच हिचा उपयोग व गुण जाणून घेणे गरजेचे आहे.

    हि भाजी पावसाळयात भरपूर वाढते.अाणी हिचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत.पांढरी वसुची भाजी अथवा घेटुळी हि चवीला तिखट,कडू,तुरट,व गोड असते.हि उष्ण गुणाची असते व शरीरातील वात,पित्त व कफ हे तिन्ही दोष कमी करते.

    हिचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)व्रणातील स्त्राव कमी करायला वसुच्या पानांचा रस काढुन तिचा लेप लावावा.

    २)सुज आली असल्यास पुनर्नवा+देवदारू+सुंठ+वाळा ह्याचा काढा गोमूत्र घालून घ्यावा.

    ३)कफयुक्त दम्याचा त्रास होत असल्यास पुनर्नवाचा काढा वेखंड घालून घ्यावा.

    ४)पचन नीट न होत असल्यास पाल्याची भाजी, सुप किंवा त्याच्या पाल्याचा रस नियमीत काही दिवस घ्यावा.

    ५)कावीळीमध्ये पुनर्नवा रस १-११/२ महीना घ्यावा व यकृताचा अशक्तपणा कमी होतो.

    ६)घाम मुळीच येत नसेल तर त्वचा कोरडी होते व फुटू लागते व त्वचेवरील लव देखील गळू लागते त्यावेळी पुनर्नवेच्या पानांचा रस अंगास चोळावा व त्याची भाजी खावी.

    हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिप्रमाणात संडास व लघ्वी होऊ शकते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – बदाम

    आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते.

    बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा वापर केला जातो.

    चला मग बदामाचे गुणधर्म पाहूया:
    बदाम चवीला गोड,तुरट,उष्ण,स्निग्ध,बलकारक,वातनाशक,
    कफपित्तवाढविणारे,पौष्टिक,सारक,बुद्धिवर्धक,
    पचायला जड,शुक्रवाढविणारे आहे.

    आता बदामापासून बनविलेल्या व्यंजनाचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:

    १)बदामखीर/मिठाई:
    गोड,पौष्टिक,उष्ण,पचायला जड,झोप आणणारी,शुक्र धातूवाढविणारी,बुध्दिवर्धक,
    वातपित्तनाशक,बलकारक आहे.

    २)बदामाचे तेल:
    गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातपित्तनाशक,
    कफकर,मेंदूलाशांतकरणारा,वृष्य,उष्ण,
    पोषक,डोकेदुखी कमी करते.हे तेल कानाच्या रोगात देखील उपयुक्त आहे.

    बदामाचे अतिसेवन केल्यास पित्तवाढून जुलाब देखील होऊ शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • आहारातील बदल भाग ५४ – चवदार आहार -भाग १५

    रस्साभाजी मधे रस्सा महत्वाचा !
    ग्रेव्ही महत्वाची. त्यातले पदार्थ बदलले की परिणाम बदलणार .
    जसं कोणत्याही भाजीतले पाणी हे वात वाढवणारे असते. पण पाण्याशिवाय, केवळ परतून किंवा वाफेवर, ज्या भाज्या बनवल्या जातात, त्या वात वाढवत नाहीत.

    पण पाणी घालून शिजवलेल्या भाज्या वात वाढवतात.

    जसं बटाटा हा वात वाढवतो. म्हणजे बटाटावडा करताना बटाटा जसा शिजवला जातो तसा पाण्यात शिजवला तर वात हमखास वाढणार. बटाट्याच्या काचऱ्या केल्या तर त्याला पाणी लागत नाही. म्हणून वात तेवढा वाढणार नाही. बटाटे चिरून, थोड्याश्या तेलात परतून मग पाणी घालून शिजवले तरी त्याचे गुण बदलतात.
    पण हाच बटाटा बार्बिक्यु सारखा थेट अग्निवर भाजला तर पचायला शिजवल्यापेक्षा, काचऱ्यांपेक्षाही हलका होतो.

    भरली वांगी वांग्यामधे मसाला भरून केली जातात. पण भाजली जात नाहीत, फक्त शिजवली जातात, म्हणून पचायला जड होतात.
    वांगी बटाटा रस्सा हा फोडी परतून नंतर पाणी, मसालाग्रेव्ही घालून केला जातो. भाजल्यामुळे पचन थोडे सुलभ होते.
    वांग्याच्या काचऱ्या नुसत्याच परतल्या जातात, पाणी घातलेच जात नाही, म्हणून वांग्याच्या काचऱ्यांची भाजी पचायला हलकी. तर भरताचे वांगे शिजवण्याऐवजी भाजलेच जाते. पचायला आणखी हलके. वांगे एकच. मसाला जवळपास तोच. पण संस्कार बदलले की गुणधर्म बदलतात.

    पदार्थ जरी तिखट चवीचा असला तरी, तो पदार्थ बनवताना कसा बनवला जातोय, हे महत्वाचे.
    म्हणून रसभाजी, सुकी भाजी, परतून भाजी आणि बार्बिक्यु या सर्व तिखट पदार्थांचे परिणाम वेगवेगळे होतात.
    हा आहे संस्काराचा परिणाम.

    ग्रेव्ही करताना जे पदार्थ वापरले जातात, ते सुद्धा वेगवेगळे परिणाम दाखवतात. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही, नारळाची ग्रेव्ही, काजूची ग्रेव्ही, ही क्रमशः पचायला जड होत जाते.

    कोकणात रसभाजीला, चणाडाळीच्या पीठाचे अळण लावतात. अळण म्हणजे भाजीला घट्टपणा येण्यासाठी, भाजीतला रस आळण्यासाठी घातला जाणारा पदार्थ.
    काही ठिकाणी तांदुळाचे पीठ पण वापरतात.

    पाणी आणि भाजी शिजवल्यावर एकजीव होऊन जावीत, एकमेकांशी फटकून वागू नयेत, वाढलेल्या ताटात वेगळे वळण काढू नये, यासाठी हे अळण.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    15.11.2016

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दहा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6

    एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
    माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात....... इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.

    .......रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, "हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्." असं म्हणून टेबलावर आपटतात.

    एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
    असो.

    .......तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, "बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! "
    नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, "मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !" त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?

    संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, "काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? " मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
    ती तोंड एवढंस करत म्हणाली, " कशातच दोष मिळाला नाही."
    "बरं झालं ना मग."
    "एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?" आता मात्र मला हसू आले, "अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? "
    म्हणाली,
    "मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?"

    बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.

    आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
    औषधे कोणाला द्यायची ?
    जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????

    शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
    Please correlate clinically.
    कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
    म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.

    म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !

    सुटले कोडे मिळाले उत्तर!
    आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.02.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग एकवीस

    गॅसनामा

    गॅस झालाय. आता काय करावे ? अनेक जणांनी हाच प्रश्न विचारलाय. आधीच्या सर्व टीप नीट वाचल्या असतील तर याचा खुलासा सहज होतोय. तरी सुद्धा परत सांगतो.

    गॅस होण्यासाठी काही तरी कुजणे आवश्यक आहे. काही तरी कुजल्याशिवाय गॅस तयारच होणार नाही. पोटात गॅस होतोय म्हणजे या ब्रह्मांडात कुठेतरी घोटाळा नक्कीच असणार. ( आमच्या वैद्य नानांचा हा आवडता शब्द, ब्रह्मांड ! )

    या आतड्याच्या आत काय कुजणार ? आपण जे काही खातो पितो तेच ना ! जर ते पुढे सरकले नाही, जिथे आहे तिथेच साठून राहिले की गॅस बनायला सुरवात होते. अन्न पुढे पुढे सरकत असले की गडबड नसते. पाणी पुढे सरकत असले की शेवाळ धरत नाही. अडकले की शेवाळ धरायला, बुळबुळीतपणा वाढायला सुरवात होते.

    लोकलच्या तिकिटाची रांग ( मराठीत लाईन लाईन ! ) व्यवस्थित पुढे जात असेल तर आरडाओरडा नसतो. जरा कोणाकडे सुटे पैसे नसले, आणि रांगेची हालचाल जरा थांबली की बोंबाबोंब सुरू झालीच म्हणून समजा !

    जीवनाला गती हवी, थांबला तो संपला.....
    याच न्यायाने खाल्लेल्या अन्नाला पण गती हवीच. अन्नाचा रस जिथे थांबेल तिथे अन्न चिकटून बसते. तिथेच जास्ती वेळ अडकले की कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पहिले चिकटलेले असेल त्याला मागून येणारे अन्न चिकटते, आणि मागे रांग वाढत जाते. थरावर थर वाढतो. गॅस होत रहातो.

    चिकटवण्याची प्रक्रिया पाणी करते आणि तेल या चिकटवण्याच्या बरोब्बर विरोधी गुणाचे आहे.
    कणिक मळल्यानंतर हाताला चिकटते, कशाने काढली जाते ? तेलाने.
    फणसाचा डिंक हाताला चिकटला तर तो सोडवण्यासाठी फक्त तेलाचा एक थेंब पुरतो.
    ग्रीस डांबरासारखे चिक्कट पदार्थ हाताला चिकटले तरीसुद्धा खनिजतेल म्हणजे राॅकेलच मदतीला येते. याचा अर्थ चिकटपणा सोडवण्यासाठी तेल मदत करते.

    जसं बाहेर तसंच आतमधे देखील! पोटाला आतड्यांना चिकटून बसलेला चिकट आम सोडवून बाहेर काढण्यासाठी तेलच मदत करते. म्हणून जेवणात तेल वापरावे. वरून कच्चे वापरले तर अधिक फायदेशीर. म्हणजे तयार झालेला आम चिकटत नाही. आणि वायुची निर्मिती अगदी "न" के बराबर !

    गॅस वाढवायला पाणी पण मदत करते. म्हणून पाणी देखील गरजेनुसारच प्यावे. नियम करून अमुक लीटर पिऊ नये. पाणी जेवता जेवता प्यावे. अगोदर किंवा नंतर शक्यतो नको.

    तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे, जेव्हा एक नंबर दोन नंबर काॅल येईल तेव्हा, टाळाटाळ न करता, लगेचच जाऊन येणे, भूक असेल तेव्हा जेवणे, जेवणात सहा चवींचा वापर करणे या छोट्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर गॅस होणारच नाही.

    गॅस होऊ नये म्हणून जेवणाची वेळ बदलावीच लागेल. सूर्यास्त होईपर्यंत खावे. त्यानंतर लगेचच आपली सायंपूजा आणि नैवेद्य! रात्रीचा नैवेद्य हा अगदी अल्प असतो, हे ध्यानात ठेवावे.

    गॅस होऊ नये यासाठी म्हणजे अन्नपचन नीट व्हावे यासाठी जे करायचे तेच गॅस झाल्यानंतर देखील करायचे असते.

    ( या विषयावर गेल्या वर्षी याच दिवसात सविस्तर लेखमाला आलेली होती. )

    हे करायचे नसेल तर नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम पोट हलेल, चिरडेल, असा असावा. उगाच चालण्याचा देखावा नसावा. यासाठी सूर्यनमस्कार आठवावा. नाहीतर देह जमिनीवर गडाबडा फिरवावा. लोटांगणे घालावीत. आतमधे चिकटलेले आम आदि सोडवून घ्यावे.

    "हे काही आम्हाला जमणारच नाही", अशी मनोभूमिका असणाऱ्या मंडळींनी, गॅस होऊ नये याकरीता जवळपास असणाऱ्या वैद्यांचे पत्ते शोधून ठेवावेत. ते वैद्य पंचकर्म आदि उपचार, जे जे सांगतील ते अगदी मनोभावे करावेत.

    अन्यथा नंतर कधीतरी जिथे जावे लागणारच आहे, अशा आपल्याला आवडेल तशा, मल्टी सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटल मधली एखादी रूम आधीच बुक करून ठेवावी. पै पै मिळवलेली सर्व स्वकष्टार्जित मिळकत, दहा पंधरा दिवसात त्यांच्या खात्यात खात्यान्तरीत करावी. हल्ली मोबाईल वर सुद्धा अॅप आहेतच. बॅकेत जायचे सुद्धा कष्ट नाहीत.

    कष्टाविना काही नाही,
    आमाविना गॅस नाही,
    केल्याविना साध्य नाही,
    आधी केलेची पाहिजे ।।

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    05.04.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ४

    इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात.

  • किचन क्लिनीक – खसखस

    कोणी छानसा विनोदी चुटकुला सांगितला आणी सगळे जण हसायला लागले कि त्या व्यक्तीला दाद देण्यासाठी म्हटले जाते कि तुमच्या विनोदाने तुम्ही छान हास्याची खसखस पेरलीत.तर असा हा गरम मसाल्यातील पदार्थ.खरे तर ह्या अफूच्या बोंडामधील बिया होय पण ह्या मात्र अफूच्या प्रमाणे मादक नसतात.

    खसखसचा उपयोग गरम मसाल्या मध्ये,तसेच खीर मिठाई इ पदार्थ बनवताना केला जातो.साधारण रव्या प्रमाणे दिसणारी हि खसखस देखील आपण घरगुती उपचारांमध्ये वापरू शकतो बरे का!

    खसखस हि चवीला गोड,थंड असून शरीरामध्ये वात कमी करते व कफ दोष वाढवते.चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?

    १)संडास मधून आव पडत असेल तर चमचाभर खसखस दह्यात वाटून खावी.

    २)खसखस,बदाम,चारोळी,समभाग घेऊन वाटावी व तिची गाईच्या दूधात खीर करावी त्यात १ चमचा साजूक तूप व १ चमचा गुळवेल सत्व आणी थोडी खडी साखर घालून हि खीर अशक्त व्यक्तीने खाल्ल्यास शरीरात ताकद वाढते.

    ३)काही व्यक्तींच्या डोक्यात केसांच्या मूळांशी बारीक फोड येतात त्यांनी दुधामध्ये खसखस वाटून केसांच्या मुळाशी लावून दोन तास ठेवून मग केस धुवावे.

    ४)पुष्कळ सुका खोकला येत असेल तर १ चमचा खसखस गाईच्या दुधात शिजवून खीर करावी व हि खीर गरम असताना खावी उपशय मिळतो.

    ५)सोमरोग अर्थात काही स्त्रीयांना लघ्वीच्या मार्गातून सारखे पाणी जात असते त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्यांना अशक्तपणा येतो ह्यामध्ये मुठभर खसखस रात्री पाण्यात भिजत घालावी व सकाळी वाटावी नंतर त्यात २ चमचे लोणी+ १ चमचा खडीसाखर + १/२ चमचा वेलची पूड घालून हे मिश्रण तिला सतत किमान तीन ते सात दिवस खायला द्यावे.

    खसखस अतिप्रमाणात खाल्ल्याने मद वाढून अति झोप येऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • वदनी कवल भाग २

    नाम घ्या श्री हरीचे......

    गजर करणे, जयजयकार करणे म्हणजे देवाचे नाव घेणे, त्याला हाक मारणे, आणि त्याला आपली सतत आठवण करून देणे.

    या अन्नप्रार्थनेमधे खूप मोठा अर्थ सामावलेला आहे.

    तू दिलेल्या वाचेने, तुझे नाम अगदी सहजपणे मी घेतोय, त्यासाठी कोणतेही मोल मला द्यावे लागत नाही. तुच दिलेले अन्न सेवन करतोय, पोटात ढकलतोय, आता पुढची जबाबदारी हे दयाघना, आता तू स्विकार !
    कारण भगवंता, तूच गीतेमधे सांगितले आहेस,
    अहं वैश्वानरो भूत्वां
    प्राणीनां देहमाश्रितम ....
    "*मीच* जठराग्नि आहे. चारही प्रकारचे अन्न मीचपचवतो. (तुम्ही फक्त माझ्यापर्यंत आणून पोचवा.) तुमच्या कर्मसिद्धांतानुसार मीच त्याचे योग्य ते फळ, योग्य त्या वेळी देणार आहे. आणि या मिळणार्‍या फळाची आसक्ती न ठेवता, तू तुझे कर्म केवळ कर्तव्य म्हणून करीत रहा."

    तुझ्याशिवाय हे अन्न पचवणारा कोण आहे ? हा भाव मनी ठेवावा.
    हे खरेच आहे.

    आपण फक्त अन्न खातो. त्यापासून लाल रंगाचे रक्त तयार करणे, घट्ट असलेले मांस हाडे यांची निर्मिती करणे, मातृस्तनी पांढरे दूध निर्माण करणे, पाण्याच्या रंगाचे मूत्र बाहेर काढणे, इ. सर्व नियंत्रित करणारी एक शक्ती आहे,
    (तिलाच आध्यात्मिक भाषेत ईश्वर आणि आयुर्वेदीय भाषेत अग्नि असे म्हणतात.)
    आणि हे सर्व आपल्याच पोटात चालले आहे, याची साधी जाणीव सुद्धा आपल्याला नसणे हेच, त्याच्या अस्तित्वाचे लक्षण आहे. अदभुत यंत्र आहे हे शरीर ! म्हणूनच तर समर्थ म्हणतात, "या शरीरासारीखे दुसरे यंत्र नाही "

    हे शरीर त्याने एवढे गुंतागुंतीचे बनवले आहे, पण प्रत्येक स्पेअर पार्टचे काम अगदी चोख.

    कशासाठी हे अन्न मी सेवणार? याचा विचार अन्न घेत असताना व्हायला हवा. माझ्या आहाराने मला शक्ती मिळते आहे, आणि ही देहशक्ती मला देशभक्ती वाढवण्यासाठी वापरायची आहे, हेच माझ्यासाठीचे जीवन कर्म असेल,

    उदरभरण नोहे म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर ही देवाला दिलेली जणुकाही आहुतीच आहे, माझ्या मीपणाची, अहंकाराची, आहुती मी या यज्ञात हवन करतोय, असा भाव निर्माण करणारी बुद्धी, याच अन्नातून निर्माण होणारी आहे, ती उत्तम गुणी बुद्धी फक्त तू मला दे ! हा देणारा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतःच अन्नरूप ब्रह्म आहेस !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    05.09.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौऱ्याहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 31

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग पाच

    गणेशजी आपल्याकडे येतात. काही जणांकडे दीड दिवस, काही जणांकडे पाच, सात, अकरा, एकवीस दिवस मुक्कामी असतात. जणुकाही घरातलाच एक घटक होऊन जातात. विसर्जनाची वेळ येते तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावतात. ते (तेज) घरातून जाऊ नयेत, असे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच वाटत असते.
    गणेशजी आपल्या घरातील एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तीच बनून गेलेले असतात. सर्वगुणसंपन्न असलेली ही सगुण देवता आपल्या अवतीभवती आहे, याचा विलक्षण आनंद यावेळी आपल्या मनात असतो. केवळ एका ज्ञातीचे हे दैवत नसून समस्त समाजाला देशभक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवणारे हे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील दैवत. जेव्हा गणेशजी येतात, मनातली सर्व सुख दुःख प्रत्येक जण त्यांना सांगत असतात. कोणावर जबरदस्ती नाही, कडक सोवळे ओवळे नाही. घरातली सर्वजण अगदी मनोभावे यथासांग, यथा मिलितोपचार द्रव्यांनी षोडशोपचार पूजा करत असतात.

    या निमित्ताने नवीन खरेदी, बाजारात खरेदीला गर्दी, एका घरातील पैसा बाहेर येतो, दुसऱ्याच्या घरात जातो. चलन हलते फिरते राहाते, पैसा फिरला तर देशाचा आर्थिक विकास होतो, हा अर्थशास्त्रातला नियम. सणांच्या माध्यमातून भारतात हा नियम केवळ पुस्तकात राहिलेला नाही तर व्यवहारात उतरवला गेलाय. त्याचा परिणाम म्हणून भारतात इंग्रज येऊन गेल्यानंतर परिस्थिती दुष्काळी असली तरी आर्थिक मंदीची लाट तशी कधी जाणवली नाही, ती या अशा सणांमुळे आणि त्यातल्या कर्मकांडामुळे !

    पाच फळं, पाच भाज्या, पाच पक्वान्न, सणाच्या निमित्ताने का होईना, खरेदी होते, सण म्हणून वेगवेगळे पदार्थ. एकत्रित भोजन, एकत्रित भजन, एकमेकांच्या सहवासात येत असतो. घराला जणुकाही देवालय बनवून टाकलेलं असतं. घराघरातील गणेशतत्व जरी एकच असले तरी प्रत्येकाच्या घरी जावून, प्रत्येक घरातील प्रत्येक गणेशाचे दर्शन होते. एक निमित्त असते, लोकसंग्रह वाढवायचे ! नातेसंबंध वाढवायचे, पौष्टिक खायचे, आरोग्य सुधारायचे !

    सकाळी लवकर उठून गणपतीची मनोभावे केलेली पूजा, आरती, शंख, घंटा यातून निर्माण होणारे ध्वनी, झांज, टाळ, तबला, पेटी, पखवाज, घुमट इ. अनेक वाद्यांचे गजर, शब्दलहरी, मंत्रलहरी, त्यांचे नाद, सूर, ताल, लय यांनी घरातील वायुमहाभूताची, आकाश महाभूताची शुद्धी होत असते.

    काही आठवतंय पहा,
    प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशजीना पहिला नमस्कार.
    आपण जेवायला बसलो की गणेशजीना नैवेद्याचे पान पहिल्यांदा. "तुमच्यामुळे आम्हाला मोदक मिळती खायाला, गणपती बाप्पा मोरया" असं म्हणत गणपतीसाठी केलेले सर्व मोदक आपणच खाऊन टाकायचे....

    हे पंचपक्वान्नाचे ताट नैवेद्य म्हणून दाखवून परत सगळ्यांनी समान वाटून घ्यायचे. कोणताही भेदाभेद नाही. कोणाशीही भेदभाव नाही.

    पण....
    हा असा भरलेल्या ताटाचा नैवेद्य फक्त दुपारी दाखवला जातो.( नाव गणेशाचे खातो आपणच ! )
    आणि रात्रीची पेटपूजा ?
    ?????
    नैवेद्याला काय असते ?
    आठवावं लागतंय ना !
    जशी षोडशोपचार पूजा सकाळी केली जाते, तशी सायंपूजा केली जात नाही. सायंकाळी केली जाते, त्या पूजेला सायंपूजा असे म्हणतात.
    सायंकाळी फक्त पंचोपचार आणि आरती ! आणि नैवेद्याला काय असतं ?

    फक्त एखादा लाडू, किंवा लाह्यांचं गुळखोबरं घातलेलं पंचखाद्य, किंवा एखादा मोदक किंवा एखादी करंजी किंवा नेव्हरी. ( गोवा, कोकण भागात करंजीला नेवरी म्हणतात.)

    बास्स बास्स बास् !
    संध्याकाळी झालेल्या या पूजेनंतर गणेशजींचा हा जो नैवेद्य असतो, इथे आरोग्य दडलेलं आहे.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायानुसार आपणही तेवढे आणि तसेच अन्न खायचे असते.
    सकाळ दुपार भरपूर जेवायचे आणि सायंकाळी कमी, रात्रीचे तर नाहीच, हा नियम पुनः एकदा सिद्ध होतो.

    सकाळी झालेल्या पूजेनंतर पंचपक्वान्न खाल्ली तरी चालतात. आणि सायंकाळी मात्र एखादाच लाडू किंवा लाह्या सदृश्य काही तरी भाजलेलं, फुलवलेलं, पचायला एकदम हलकं असंच अन्न घ्यावं हा त्यामागील आरोग्य संकेत . समजून घेणाऱ्या समंजसांना हा समज समजतो. बाकी सगळे बुद्धीवादी, भक्ती सोडून ज्ञानाची सालपटं काढत रहातात, आणि आपण मात्र लंबोदर होतात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    24.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पासष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 21-धूपं समर्पयामी-भाग दोन

    धूपन ही एक उत्तम चिकित्सा म्हणून आयुर्वेदात वर्णन केली आहे. औषधे टिकून रहावीत यासाठी जी भांडी बरण्या वापरल्या जात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडाच्या धुराने धुपीत करून घ्यायला सांगितले आहे. उद्देश्य एकच. जंतुनाश ! जखमेतील सूक्ष्म जीव नाहीसे व्हावेत, मरून जावेत, जखमांना धूप दाखवण्याची पद्धतही आपल्याकडे आहे. अनेक प्रकारचे हट्टी त्वचारोग धुपन केल्यावर काबूत येतात. धुपन करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. कोळसा पेटवून लाल करून घ्यावा, त्यावर धूपन द्रव्य घालावे, आणि जिथे आवश्यक आहे तिथे युक्तीने फिरवावा.

    कोळसा नसेल तर काय ? आणि धूपन द्रव्य कोणती ? असेच प्रश्न आले ना मनात.

    कोळसा नसेल तर नारळाची करवंटी गॅसवर ठेवावी आणि पेटवावी. पूर्ण पेटल्यावर ती एका पत्र्यावर काढून घ्यावी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे तीक्ष्ण वास येईल अशी जंतुनाश करणारी द्रव्य घालावे. जसे धूप, हळद पूड,कांद्याची साले, लसणीची साले, लवंग, वेलचीची टरफले, काजूची टरफले, मिरचीचे देठ, मीठ मोहोरी, तूप तांदुळ, कढीलिंबाची किंवा कढीपत्त्याची पाने, ज्यातून तीक्ष्ण वास येईल असे काहीही चालेल. ज्याचा दळ गेलेला आहे असा मसाला, किड पडलेली हळकुंडे, टोके झालेली मिरचीपूड, यापैकी सुद्धा काहीही चालेल. पण प्रमाण कमी वापरावे. अगदी चिमूटभर. नाहीतर धूप, गुग्गुळ, हिंग, डिंक, यासारखे नैसर्गिक निर्यास, नाहीतर काळाच्या ओघात फुकट गेलेली आयुर्वेदातील चूर्ण, जसे त्रिफळा चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, यापैकी चूर्ण देखील धूपाप्रमाणे वापरावे. आपल्याला तीक्ष्ण वास तयार करायचा आहे, हे तत्व लक्षात ठेवायचे. आणि त्या वासाचा आपल्याला त्रास न होता, फक्त रोगजंतु घराबाहेर जावेत हा हेतु, ही युक्ती मात्र वापरावी. नाहीतर घरात एवढा धूर होईल की, आपणालाही आपले घर सोडावे लागेल ऐसे न व्हावे !

    वर्षातून एकदा घरामधे होम करावा तो यासाठी असाही विचार करायला हरकत नाही. यासाठी द्रव्य म्हणून अनेक प्रकारच्या समिधा वापरल्या जातात. वड, गुळवेल, औदुंबर, पिंपळ, रूई, पळस, दुर्वा, तीळ, शिजलेला भात, रेशमी वस्त्र, केळी, नारळ, तूप, इ. अनेक हविर्द्रव्य सांगितलेली आहेत. ही सर्व औषधे आहेतच. यांचा धूर महा औषध आहे.

    एक साधे उदाहरण बघूया. जो मिरची चावतो, त्याला ती तिखट लागते, नाकातोंडातून पाणी येते, डोळे चुरचुरतात, अंगाची आग होते हे फक्त मिरची चावणाऱ्यालाच होते इतरांना नाही. पण हीच मिरची निखाऱ्यावर टाकली तर हीच सर्व लक्षणे तिथे आसपास असणाऱ्या सर्व माणसांवर दिसतात. याचा अर्थ एक मिरची जर जाळली तर त्याचा परिणाम सार्वजनिक स्वरूपात दिसतो, आणि चावण्यापेक्षा जहाल रूपात दिसतो. हा आहे धुराचा सूक्ष्म परिणाम. त्रिफळा किंवा हळदी सारखे प्रमेहावर काम करणारे औषध, दोन चिमूट प्रमाणात जर निखाऱ्यावर धुपाप्रमाणे घालून रोज सकाळी सायंकाळी घरात सर्वत्र फिरवले तर ? ....

    तर निर्माण होणारा धूर प्रमेहातील क्लेद म्हणजे चिकटपणा कमी करायला मदत करतो, असा अनुभव घेतला आहे. आपणही असा प्रयोग करायला हरकत नाही. अपाय नक्कीच नाही.

    आपल्याकडे सायंकाळी मीठ मोहोरीची दृष्ट काढण्याची पद्धत आहे. ती या चिकित्सेतीलच एक भाग आहे. हा "मिनी होम" झाला. सायंकाळच्या वेळी घरात प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना, जीवजंतुंना, अटकाव करण्यासाठी हा धूर मदत करणार नाही का ?

    ज्यांना या शक्तींचे अस्तित्व मान्य नाही, त्यांनी देखील असा धूर घरात रोज सकाळ संध्याकाळ करावा. त्यांचे विचार शुद्ध व्हायला वेळ लागणार नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.06.2017