(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारातील बदल – भाग १

    आजच्या काळातील एक जोरदार चर्चा सुरू असलेला एक विषय. आहारातील बदल चांगले की वाईट ?

    कोणासाठी कसा आहार असावा, याचे काय काय नियम आहेत हे तारतम्याने ठरवायचे असतात.

    वाॅटसपवर अनेक लोकाचे अनेक आहार सल्ले येत असतात. निसर्गोपचार, घरगुती आहार सल्ले, अनुभविक उपचार, आजीबाईचा बटवा, लेखाखाली स्वतःचेच नाव असलेले, दुसर्याच्या नावावरील लेख तिसर्याच नावाने खपवलेले, अनेक विरोधाभास असलेले सल्ले आपल्याला वाचायला मिळत असतात. त्यातील खरेखोटेपणा शोधायला तेवढा वेळही नसतो.म्हणून काही नियम गृहीत धरावे लागतात.

    आपला पारंपारिक आहार कधीही बदलू नये.
    जो आहार आपल्या पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई बाबांनी घेतलेला आहे, तोच आहार आपल्यासाठी योग्य असतो. त्यांनी तो तेथील परिस्थिती, उपलब्धता, आवश्यकता, गरज, प्रकृती, विचार, इ. गोष्टी विचारात घेतलेल्या असतील.

    आपले पूर्वज खूप हुशार होते, ज्ञानी होते, सूक्ष्मातील जाणणारे होते. प्रत्यक्ष कृती करणारे होते. केवळ वाचाळवीर आणि आरंभशूर नव्हते.

    सांगे वडिलांची किर्ती, तो एक मूर्ख. असे समर्थांनी सांगून सुद्धा तो दोष मी स्विकारतो.

    अनुभवाच्या आधारे जीवन जगायची एक आदर्श पद्धत त्यांनी निर्माण केली होती. खरं सांगायचं तर शास्त्र निर्माण करत गेले. अनुभवाच्या जोरावर, प्रायोगिकता वापरत, भविष्याचा वेध घेत जगायचं कसं हे पुढील पिढीला प्रत्यक्ष शिकवित गेले. आचरणात आणत गेले. त्याची पुढील पिढी त्यात ज्ञानाची आणखी भर टाकत गेली. अनुभव जोडत गेली. अनावश्यक गोष्टी काढत गेली, काही वेळा कालानुरूप बदलतही गेली. नवीन सिद्धांत तयार करत गेली. नवीन बदलाला समोरी गेली. मूळ तत्व न सोडता, होणारे बदल मान्य करत गेली. नवीन गोष्टींना मान्यता देत गेली.
    यालाच सनातन म्हणतात. नित्य नूतन सनातन !

    म्हणून तर हजारो वर्षे झाली तरी वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय संस्कृती अजून ही जिवंत आहे. केवळ कागदी घोडे न बनता, कृतीच्या स्तरावर बदल मान्य करत गेलेली आधीची वडील पिढी.

    आता हेच पहा ना, अगदी आपल्या लक्षात येतील असे आपल्या डोळ्यासमोर झालेले आहारातील काही बदल आपल्या आधीच्या वडील पिढीने मान्य केलेच ना !

    दोन पिढ्यांपूर्वी न्याहारीच्या वेळी फक्त कोंड्याची भाकरी आणि पेज जेवून रहाणार्या या पिढीने उपमा आणि पोहे स्विकारले.
    त्या पुढच्या पिढीने थालीपीठ, आंबोळी, डोसा पण स्विकारला, वडा भजी ऊसळ मिसळ पण पचवली. आवडीने आणि चवीने खाण्याची चटक वाढत गेली.
    आणि अगदी आताची पिढी पिझ्झा बर्गर पनीर बटरच्या बदलाला सामोरी जातेय.

    परिवर्तन , बदल ही काळाची गरज असते. युक्ती वापरून त्यातील योग्य अयोग्य ठरवणे हे आपल्याच हातात असते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    22.09.2016

  • आहाररहस्य ५

    छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
    अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.

  • याला जीवन ऐसे नाव भाग २२

    पाणी शुद्धीकरण भाग दोन

    पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, "पाणी शुद्ध कसे करा" हे मात्र सांगितले जात नाही. "इट इज नाॅट अवर बिझनेस" असं म्हटलं की विषय संपत नाही राव !

    आर ओ फिल्टर वापरणे, वाॅटर फिल्टर वापरणे, ते स्वच्छ करणे, ठराविक दिवसांनी आतील फिल्टर, फिलामेंट, कॅन्डल जे काही असेल ते बदलणे, इ.इ. हे केले जातेय का ? कसे करायचे हे सुस्पष्ट सांगितले जातेय का ?

    परदेशी टेक्नाॅलाॅजी वापरून पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग, त्यातील पारदर्शकता अजूनही स्पष्ट होत नाही. एखादी कंपनी स्वतःची जाहिरात करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जावून एकमेकांच्या जाहीरातींशी जणुकाही स्पर्धाच करत असतात. मग त्यातील खरेखोटेपणा कसा तपासणार ?

    शेवटी जो दुसऱ्यावरी अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला हेच खरे !

    पाणी शुद्ध करण्यासाठी अस्सल भारतीय पद्धतींचा अभ्यासच होत नाहीये, या निमित्ताने आपण एक जल शुद्धीकरण मोहीम राबवूया. या मोहिमेअंतर्गत आपल्या प्राचीन अथवा आजही ज्या पद्धतीने जलशुध्दीकरण केले जात होते, त्या पुनः एकदा प्रकाशात आणूया. पुढील पिढीला या पद्धतींची ओळख तर करून देऊया.

    जसे पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातील गढुळपणा कमी होतो, पण तळात हा गढुळ भाग साठून रहातो. नंतर गाळून वरील स्वच्छ पाणी वेगळे करता येते.

    आपल्याला माहिती असलेली पाणी शुद्धीकरणाची एखादी पारंपारिक स्वदेशी पद्धत सांगा. त्यातील दोष त्रुटी कमतरता शोधून काढू. त्या दूर कशा करता येतील यावर चर्चा करू. मत मांडायला तज्ञच असले पाहिजे असे नाही.

    शाळेतदेखील आपल्याला पाणी शुद्ध करायच्या काही कृती शिकवल्या होत्या. शाळा आठवून पहा......

    नाहीतर आजी आजोबांना विचारा. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधा. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी, कोणीतरी विचारल्याने त्यांना पण आनंद होईल. आपल्याही मताला आज कुणीतरी तिसरी पिढी विचारणारी आहे, असं त्यांनाही वाटेल.

    ज्यांनी आपल्या जीवनातले अनेक चढउतार पाहिलेले आहेत, यशस्वीपणे पार केलेले आहेत, त्यांना 'या जीवनाच्या' शुद्धीकरणासाठीचा एखादा पर्याय सहज सुचेल. विचारून तर बघा.
    "आजी आजोबा घरातील पाणी कसे शुद्ध करीत होते".....

    घ्या वही पेन, द्या मुलांच्या हातात! सांगा आजीआजोबांची मुलाखत घ्यायला !! करूदेत शब्दबद्ध !!!

    जीवनाचा सर्वात मोठा भाग, ज्या 'जीवनावर' आहे, त्या अशुद्ध जीवनाकडे इतक्या उदासीनपणे बघून चालणार नाही.
    जीवनाचे शुद्धिकरण झालेच पाहिजे!!!

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    29.12.2016

  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग दोन

    नियम एक.
    कोणताच नियम पाळू नये. भाग दोन.

    दूध म्हणजे विष नाही, दही म्हणजे विष नाही, गुळ म्हणजे विष नाही, पाणी म्हणजे विष नव्हे, पण हे पदार्थ प्रमेहामधे रोगाचे कारण सांगितलेले आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणजे हे पदार्थ बंद करायला हवेत असं नाही. आपली प्रकृती आपली पचनशक्ती जर कफाकडे जाणारी, कफ वाढवणारी असेल, तर या पदार्थांचा वापर करताना युक्तीचा वापर करायला हवा. हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. हे पदार्थ खाल्ले आणि काहीच व्यायाम केला नाही तर मात्र गडबड होणार हे नक्की.

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खावे, दोन मुख्य जेवणे या वेळेत झाली, की त्याचे पचन सूर्य करतो, पचन सोपे होते, हा नियम झाला, पण एखादे वेळी दोनापैकी एक जेवण झालेच नाही, आणि सूर्यास्तानंतर खूप भूक लागली तर काय करावे ?
    मस्त जेवावे.
    फक्त अशा वेळी लक्षात ठेवावे की, सूर्यासारखा, पचनाला मदत करणारा अग्नी हा अत्यंत महत्त्वाचा घटक शरीराला पचनासाठी वापरता येणार नाही, तेव्हा फार लोड येईल असे खाऊ नये. जे काही खाऊ ते चापून खाण्याऐवजी हातचे राखून खावे, मटण चिकन, श्रीखंड, गुलाबजाम असे पचायला जड होणारे जेवण तर अजिबात नको. ही युक्ती हवी.
    असे जड जेवण घेतले तर त्याचे पचन पूर्ण होण्यासाठी तसाच व्यायाम, तसेच कष्ट, तशीच मेहनत करायला हवी. नाहीतर सगळेच ओमफस्स !

    संकष्टीला दिवसभर उपवास करून रात्री उशीरा चंद्रोदय झाल्यावर मोदकाचे जेवण जेवावे, या संकल्पनेमधे आपण नियम मोडलाच. पण दिवसभर उपाशी आहोत, स्वतः ठरवून, जाणून बुजुन, व्रत म्हणून, मनाला संयम घालून दिवसभर उपवास करून रात्री जेवलात तर ते क्षम्य ठरू शकते. पण ते सुद्धा महिन्यातून एक वेळ नियमाला हा अपवाद आहे. आम्ही अपवादाचा नियम केला की, सत्यानाश !

    चातुर्मास करताना, या चार महिन्यात "देव झोपतो", अशी आपली संकल्पना आहे. या चार महिन्यात देवच जर झोपला, तर शरीराचे सर्व व्यवहार आपल्यालाच पहावे लागणार आहेत, उगाच काही मोठे निर्णय घेण्याची चूक करू नये, याचे भान राखून आपण आपले व्यवहार करावेत, ही युक्ती आहे. हे आपल्या लक्षात असावे, म्हणून चातुर्मासामधे काही विशिष्ट व्रते सांगितली जातात. एखाद्या वेळी एखादा उपवास चुकुन मोडला, म्हणून लगेच, " आता उपास मोडलाच आहे, भजी खाऊन घेऊया" असा विचार करणे ही चुक आहे.

    तारतम्य बाळगणे, योग्य अयोग्याचा विचार करणे ही युक्ती असते. एखादी कृती दुसरा करतोय मग मी का नको ? असा विचार करणे चूक आहे असे नाही, पण त्यासाठी मला, जशाच्या तसा "दुसरा" बनणे आवश्यक आहे.

    व्यायामाचे तेच आहे. व्यायाम जरूर करावा, पण कोणी करू नये, हे पण शास्त्रात सांगितलेले आहे.

    प.पू. रामदेव स्वामी महाराज शीर्षासन करून हातावर चालतात, मग मला का नाही जमणार असे एखाद्यानं ठरवले आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? नाक तोंड फुटेल बाकी काही नाही. यासाठी तसा अभ्यास, तसे सातत्य, पहिल्यापासून हवे, तर जमेल. नाहीतर नाही.

    शेवटी नियम हे आपल्याला मर्यादा समजावी म्हणून सांगितलेले असतात. तसेच्या तसे ते तंतोतंत पाळणे आणि सगळे नियम धाब्यावर बसवणे, दोन्ही चुकच !
    युक्ती वापरली की, सगळ्याचा उपभोग घेता येतो. त्याचा हेतु योग्य असला की झालं.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.04.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सात

    ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.

    एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.

    सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.

    प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ, भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !

    सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !

    बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे "काम" करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त "आऽऽ कर" असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा "कामानिराळा" राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !

    दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळुशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !

    पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !

    ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !

    ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !

    आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !

    उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना......

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.03.2017

  • आहारातील बदल भाग ६ – शाकाहारी भाग एक

    आपल्या अवतीभवती जे प्राणी आहेत, त्यांचे परीक्षण केले असता, असे लक्षात येते की, जगात कुठेही यांना बघीतलेत किंवा अभ्यासले तरी या प्राण्यांची वैशिष्ट्ये तीच रहातात. दक्षिण आफ्रिकेमधला कावळा काळाच असतो आणि अमेरिकन कावळा पण काळा तो काळाच ! रंगात बदल नाही, गुणसूत्रात बदल नाही, आहारात बदल नाही, की सवयी मधे. त्याचे काव काव ओरडणे सगळीकडे सारखेच ! कावळा हा एक स्वतंत्र अभ्यास करण्यासारखा विषय आहे. पुढे कधीतरी.

    आपण मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली आता शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये तपासून बघूया.

    सर्व शाकाहारी प्राणी जसे गाय, बैल, हत्ती, घोडा, गाढव इ.इ. पाणी पिताना ओठाने पितात, म्हणजे दोन्ही ओठांचा वापर करून पाणी ओढून घेतात व घोटतात. जीभेचा वापर नाही. जीभ फक्त अन्नाला तोंडातल्या तोंडात, इकडून तिकडे ढकलण्यासाठी, फिरवण्यासाठी वापरली जाते. आणि चव घेण्यासाठी सुद्धा ! पण यांच्या जीभेला धार नसते, खाचा नसतात. लाळ असते ती पण खूपच बुळबुळीत. एकावेळी भरपूर पाणी तोंडात ओढून घेता येते. गाय किंवा बैल पाणी पिताना आपण बघीतले आहेच.

    खाल्लेले अन्न, पाला बारीक तुकडे करून पोटात गिळले जातात. यासाठी यांच्या जबड्यात दातांची एक वेगळीच रचना दिसते. यांच्या वरच्या जबड्यातील दातामधे दोन दात सुळे प्रकारातील असतात. ज्यांना थोडेसे टोक असते. घास तयार करण्यासाठी हे सुळे त्यांना उपयोगी पडतात. जे खाल्ले आहे, ते तोंडातून परत बाहेर पडू नये यासाठी पण या सुळ्यांचा वापर केला जातो. गाय बैल घोडा यांच्या जबड्यात अशीच रचना असते. मुद्दाम बघा. यांच्या खालील जबड्यात सुळे असत नाहीत.

    यांना अन्नाचे मोठे तुकडे गिळता येत नाहीत. थोडे बारीक करावे लागते. रवंथ करावे लागते, पीठ करून आत ढकलावे लागते, म्हणून यांच्या जबड्यात वर आणि खाली दाढा जास्त यांच्या मधे जे काही येईल त्याचे पीठच.

    यांची लाळ जास्त बुळबुळीत असते. कारण पाल्यात भरपूर प्रमाणात असणाऱ्या स्टार्च किंवा शर्करेला पचवणारे " पिट्यूलीन" हे एक एन्झाईम यांच्या लाळेत जास्त असते.
    (जे एन्झाईम मांसाहारी प्राण्यांच्या लाळेमधे उपस्थित नसते. कारण त्यांना त्याची गरजच नसते. कारण मांसाहारामधे स्टार्च चे प्रमाण जवळपास नसतेच, किंवा अपवादानेपण अगदीच कमी असते. त्यामुळे त्यांच्या लाळेमधे स्टार्च पचवणाऱ्या एन्झाईमची आवश्यकताच नसते.
    पण मांसामधे प्रोटीन्स जास्त असतात. हे प्रोटीन्स पचवण्यासाठी आवश्यक असलेली एन्झाईम्स, पोटात हायड्रोक्लोरीक अॅसिड सारख्या रूपात भरपूर प्रमाणात निर्माण झालेली असतात.)

    चावून चावून चावून चावून गिळल्यामुळे लाळेची निर्मिती जास्त होते. हे एन्झाईम जास्त पाझरते, पचन सुलभ होते. या लाळेमुळेच गाय बैल या शाकाहारी प्राण्यांना, गिळलेले अन्न पुनः तोंडात आणणे आणि सावकाशपणे रवंथ करणे सोपे होते.
    कोणीतरी मांसभक्षी आपल्याला खाईल, या भीतीने, दिवसभर बकाबका खाऊन घ्यायचे, मग निवांत सुरक्षित ठिकाणी येऊन खाल्लेले परत पचवायचे.
    या दोन वेळा केलेल्या पचनामुळे या प्राण्यांना पण अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर यातले काही त्रास होत नाहीत.

    भक्ष्याला पकडायचे नसल्यामुळे पायाची नखे स्थिर असतात. त्यांना आपण खूर म्हणतो. गाय बैल, यांचे खूर विभागलेले असतात, तर घोडा, गाढव यांचे खूर विभागलेले नसतात. पण यांना टोके नसतात. हलवता येत नाहीत. जर यांना टोके असली असती तर चालणे मुश्किल झाले असते, जीव वाचवण्यासाठी पळणे किंवा धावणे दूरच राहिले. म्हणजे शाकाहारी प्राण्यांची नखे आत बाहेर करता न येणे, ही त्यांच्यासाठी "त्याने" दिलेली देणगीच म्हणायची !!!

    त्यांना जगवण्यासाठी केलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजेच ईश्वर !!!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    27.09.2016

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पाच

    आतापर्यंत मनापासून खाल्लेले अन्न तोंडात आलेले आहे. असे गृहीत धरू.

    धान्यापासून आपण अन्न रूपांतरीत केले, आपल्या जीभेला, मनाला, शरीराला हवे तसे बदलवून घेतले, आणि घास करून तोंडात घेतला. पहिली प्रक्रिया सुरू होते ती लाळेची, ज्याला आयुर्वेदात बोधक कफ असे म्हटलेले आहे. रसनेंद्रियामार्फत त्याचे बोधन होऊन त्या पदार्थाला पचवायला जे जे द्रव्य पुढे आतमधे हवे आहे, त्याचा एसेमेस त्वरीत फाॅरवर्ड होतो. त्या पदार्थाच्या स्वागतासाठी आतमधे तयारी सुरू होऊ लागते. असलेल्या बत्तीशी ने तो बत्तीस वेळा सावकाश चावला की त्यात लाळ चांगली मिसळली जाते. अगदी बत्तीस वेळा असं काही मोजत बसत नाही कुणी पण, त्याचा गिळण्याएवढा गिळगिळीत गोळा तयार झाला की तो अन्ननलिकेत जीभेने ढकलला जातो. तेव्हा श्वासनलिका एका पडद्याने पूर्णपणे बंद होते. अन्नाचा एकही थेंब त्या टाईट बसलेल्या झाकणातून श्वासनलिकेत लिकेज होत नाही.

    या पडद्याला कुठेही थ्रेड नाही, कुठेही फेवीकाॅल नाही, कुठेही कडीकुलुप नाही, पण काही सेकंदामधे पूर्ण बंद, तर काही सेकंदात पूर्ण उघडतो देखील !
    अन्न कसे गिळावे, पडदा कसा बंद करावा, याचे कोणीही वर्कशाॅप घेतलेले नाही, कोणीही ट्रेनिंग दिलेले नाही, तरी हे काम जन्माला आल्यापासून अव्याहतपणे सुरू असते. हा एकच पडदा नाही तर असे असंख्य पडदे / व्हाॅल्व्ह, आतबाहेर आपल्याला दिसतात, डोळे, ओठ, मूत्रद्वार, मलद्वार हे बाहेर दिसणारे सगळे अवयव कसे उघडायचे कसे बंद करायचे, हे शिकवूनच त्याने जन्माला घातलंय.

    कदाचित आधीच्या जन्मी हे सगळं अनुभवलेलं असतं, ते संस्कार घेऊनच आपला मनुष्य जन्म झालेला असतो. आजच्या भाषेत डिफाॅल्ट प्रोग्राम असा काही पक्का झालेला असतो, की कधीही परत फाॅर्मॅट मारावाच लागत नाही.

    शेवटी हे यंत्र बनवणारा कोण आहे ?
    तोच, जो आपल्या शरीरात राहून सर्व करवून घेत असतो.
    तो
    सर्वशक्तीमान !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.03.2017

  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे – भाग एकोणीस

    उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये. या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण !

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणपन्नास

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4

    कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.

    देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
    आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.

    सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
    या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
    मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
    देव अशानी पावायचा नाऽही रं
    देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !

    देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
    कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.

    अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.

    श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.

    पूजा करण्याच्या निमित्ताने,
    "हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
    असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.

    माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.05.2017