हा मुळ भारतीय संस्कृतीचा धागा आज हरवत चाललाय, तो शोधायला पाश्चात्य भारतात येताहेत, जगातल्या अनेक देशात भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची पाश्चात्यांची तयारी आहे.आणि आपण मात्र नित्याच्या सर्व भारतीय गोष्टी विसरत आहोत.
झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच.
मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.
लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
औषध म्हणून कशी वापरू शकते.
चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.
अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील
??.
आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!
१)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.
२)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.
४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.
५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.
६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.
मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक
जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ?
सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद आहे. " आमच्याकडे कापसाची शेतं लावली आहेत, आणि घरात तेल जास्ती झालंय म्हणून नाही दिवा लावत आपण. तर जे अनाकलनीय आहे, ते तुझ्या दिव्यत्वाच्या प्रकाशानं उजळून जाऊ दे ! अज्ञानाचा जो अंधःकार आमच्या मनात आहे, तो तुझ्या प्रकाशाने निघून जाऊ दे, अशी प्रार्थना असते दिव्याकडे ! "
आपल्याकडे अजून तरी देवघर नावाचा, कोनाडा का होईना, शिल्लक असलेल्या जागेत थोडी जागा राखीव ठेवलेली असते. त्यात रात्री मधेच उठल्यानंतर आपल्याला दिसावे, म्हणून देवाच्या डोक्यावर एक दिवा टांगून ठेवलेला असतो. इलेक्ट्रीक झिरोचा किंवा आता एलईडीचा ! न जाणो रात्री देव आलाच तर ? म्हणून म्हणायचं दिवा लावला देवापाशी......
जे जे देवासाठी ते ते देहासाठी, असा विषय आपण बघत असल्याने या दिव्याचा देहरक्षणासाठी काय उपयोग आहे ? बरं हे इलेक्ट्रीकचे दिवे आत्ताचे ! त्यापूर्वी काय होते ? तेलाचे दिवे आणि तूपाचे निरांजन. काय एवढा फरक आहे इलेक्ट्रीकच्या दिव्यात आणि तेल तूपाच्या दिव्यात ?
आता हेच पहा ना, रस्त्यावर रात्रभर जळणारे जे हायमास्क दिवे आहेत, त्यावर किती छोटे छोटे किटक पिंगा घालत असतात ? पिंगाच तो. नुसते गोल गोल फिरत राहायचे. काम काही नाही. फायदा शून्य.
या किटकांना प्रकाशाचे प्रचंड आकर्षण असते. जिथे प्रकाश दिसेल तिथे अक्षरशः झडप घालतात. झोकून देतात. हा निसर्गाचा नियम आहे. पतंगाला ओढ प्रकाशाची. हे छोटे छोटे किटक घरात आले तर नुसता उच्छाद असतो. डोक्यात, कानात, डोळ्यात, नाकात, टीव्ही च्या स्क्रीनवर, ट्यूबलाईटवर, बेडवर, पिण्याच्या पाण्यात, आमटी भाजीत, जेवणाच्या ताटातसुद्धा ! काही केल्या जात नाहीत. आला असेल अनुभव प्रत्येकाला कधी ना कधीतरी ! ह. हेच तर मला सांगायचंय. हे किटक या दिव्यांवर मस्त खेळत असतात. आणि आपल्याला छान खेळवत असतात.
या किटकांचा त्रास घालवण्यासाठी एक जालीम उपाय आहे. देवापुढे दिवा लावणे. हा दिवा इलेक्ट्रीकचा नको. तेलाचा किंवा तुपाचा हवा. काय होईल ? या दिव्याच्या पेटत्या ज्योतीकडे हे क्षुद्र किटक आकर्षित होतात. आणि या ज्योतीत जळून जातात. चक्क मरतात. हा निसर्ग आहे. किटक मरणे ही चांगली गोष्ट झाली ना. नाहीतर त्यांचा बल्बवर चाललेला पिंगा बघत रहाण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही.
जे आपण करू शकत नाही, ते छोटी पेटती पणती करते. उपद्रवी किटकांना मारते. कायमचे !
जसे हे काही उपद्रवी किटक डोळ्यांना दिसतात, तसे काही सूक्ष्म जीवही असतात, जे डोळ्यांनाही दिसत नाहीत, ते सूक्ष्म जीव देखील या पेणत्या पणतीच्या ज्योतीवर जणुकाही आत्महत्याच करतात. काम तमाम ! वातावरण शुद्ध ! निर्जंतुक !
दिवा देवासाठी, आरोग्य आपल्यासाठी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.06.2017
सदा सर्वकाळ मिळणारी हि भाजी दोन प्रकारात मिळते लाल व पांढरा माठ (पांढरा म्हणजे हिरवा बरंका नाहीतर तुम्ही पांढ-या पानांची भाजी समजाल ?).हि भाजी तशी लई फेमस कारण हि सगळीकडेच मिळते.
ह्या भाजीबद्दल देखील लोंकात मिश्र भावना आढळते काहीजणांची आवडती तर काही जणांची नावडती.लालरंगामुळे मुलांना आवडते पण काही वेगळी कल्पक बुद्धीवापरून काही चटपटीत,सुंदर आणि पौष्टिक असे काही करून दिल्यास.
ह्या भाजीचे देखील वेगवेगळे प्रकार करून आपण खाऊ शकतो जसे सुकी भाजी,पिठ मारून,रस्सा भाजी,कटलेट इ.पण खरोखरच हि भाजी शेतात आणि शिजवून केल्यावर देखील सुंदर दिसते.
हि भाजी चवीला गोड,थंड आणि पित्तकमी करते पण कफ व वात दोष वाढविते.
ह्या भाजीचे देखील औषधी उपयोग आहेत.आता आपण ते पाहूयात.
१)माठाच्या पानांची चटणी हळद व मीठ घालून गळवांवर बांधावे गळू लवकर पिकुन फुटतो.
२)पायांच्या भेगातून रक्त येत असेल तर माठाचा रस+ एरंडेल तेल घालून मलम करावे व ते भेगांवर लावावे.
३)हिरड्यांतून रक्त येत असल्यास माठाच्या रसाने गुळण्या कराव्यात.
४)तीक्ष्ण औषध उपचारानंतर शरीर अशक्त होते तेव्हा माठाची बिन्मसाल्याची भाजी गव्हाचे फुल्क्यांसह खावे व माठाचा रस घालून पाणी प्यावे.
५)बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास माठाची भाजी आठवड्यातून एकदा खावी व पोटास मोहरीचे तेल लावावे.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्याने वारंवार शौचास होते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
ऋतुनुसार, दिनमानानुसार सर्वसाधारणपणे सकाळी 6 ते 10 हा काल कफाचा, 10 ते 2 पित्ताचा आणि 2 ते 6 हा वाताचा काळ येतो. असेच सायंकाळ पासून सकाळ पर्यंत समजावे.
जेवण हे भूक लागेल तेव्हा घ्यावे. भूक असेल तेवढेच घ्यावे. परंतु सूर्य असेपर्यंतच घ्यावे. म्हणजे सर्व साधारणपणे दिवसा जेवावे. रात्रौ जेवू नये.
व्यवहारात, नियम करायचाच झाल्यास, जेवणाच्या मुख्य वेळा दोन सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात.
पण आपण समजा दुपारी बारा वाजता पोटभर जेवलो तर पुनः चरचरीत भूक किती वाजता लागेल ? रात्री 8 वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? आठ तास. दुपारचे जेवण पचायला फक्त आठ तास.
समजा, रात्री 8 वाजता पोटभर जेवलो तर पुनः भुक कधी लागते ? पित्ताची प्रकृती असलेल्यांना सकाळी नऊ दहा वाजता. आणि इतरांना चरचरीत भूक कधी लागेल? चरचरीत भूक लागेल, दुपारी बारा वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? सोळा तास. रात्रीचे जेवण पचवायला सोळा तास ?????
दिवसाचे जेवण पचायला फक्त आठ तास आणि रात्रौचे जेवण पचायला तब्बल सोळा तास जातात. एवढा वेळ का लागतो ?
उत्तर सोपं आहे, दिवसा सूर्य असतो म्हणून आणि रात्रौ सूर्य नसतो म्हणून.
आपण हे पाहिलंय की सूर्य म्हणजे अग्नि.
पचन घडवणारा तो सूर्यनारायण. हजर असला तर पचन होणारच ना ! त्यात विशेष ते काय ?
प्रश्न येतो तो, रात्रीचं पचन घडवणार कोण ?
पचन घडवणे म्हणजे नेमके काय हे पण आपण अन्नपचन कसे होते ? या लेखमालेतून पाहिले आहे. पचन म्हणजे रूपांतरण. एका बाह्य घटकद्रव्याचे रूपांतर शरीराला योग्य होईल अशा अवस्थेत बदलवून घेणं. त्याचे शरीरातील वेगवेगळ्या विकरकामार्फत ( एन्झाईम्स) विघटन घडवून आणणे, त्याचे चांगल्या ( उपयुक्त) आणि वाईट (टाकाऊ) भागात विभागणी करणे, चांगल्या भागातून शरीराचे पोषण करवणे, टाकाऊ भाग जवळच्या मलमार्गापर्यंत आणून ठेवणे, इ. कामे करवून घ्यायला, शरीरातील काही उर्जा संपून जाते. म्हणजे पचन घडवून आणायला, रूपांतरण घडवायला, उर्जा निर्माण करायला उर्जा संपून जाते.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता एक रूपक पाहू. हे उदाहरण ग्रंथात लिहिलेलं नाही. पण समजून घेण्यासाठी थोड्या वेळ पुरतं विचारात घेऊ.
आपल्या शरीरात एक बॅटरी आहे. जी सोलर एनर्जी वर चालते. सूर्योदय ते सूर्यास्त असं हिचं चार्जिंग सुरू असतं. जोपर्यंत चार्जिंग सुरू असतं, तोपर्यंत सगळी हेवी ड्यूटी कामे करून घ्यावीत. चार्जिंग संपल्यावर जर बॅटरीकडून काम जास्ती करून घेतलं तर बॅटरी लवकर संपून जाईल, अगदी तस्सच होतं पचनाचं.
सूर्यास्तानंतर या शरीरातील बॅटरी, बॅकअप वर जाते. पचनासाठी लागणारी उर्जा संपू नये असं वाटत असेल तर बॅकअपवर कमीत कमी काम करायचे. म्हणून सूर्यास्तापूर्वी जेवून घ्यावं. जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत पचन पूर्ण करून घ्यावं आणि पुढील महत्वाच्या कामासाठी ही बॅटरी रिझर्व्ह ठेवावी. सकाळपर्यंत नो प्रॉब्लेम. पचन पूर्ण. उठल्या उठल्या दोन नंबरचा काॅल येणार. आणि संपूर्ण दिवस चांगला जाणार.
सायंकाळी एवढ्या लवकर जेवणार म्हणजे सकाळी लवकर जाग येणार. भूक लागूनच जाग येणार. किंवा कदाचित झोपच लागणार नाही. कारण तशी सवयच नाही ना. गेल्या चाळीस वर्षातील चुका दुरूस्त करायच्या असतील तर थोडा त्रास तर होणारच. काहीजणांची थोडी अॅसिडीटी वाढणार.
हा पोटात पडणारा खड्डा सुखासाठीच असल्याने त्याचं दुःख मानायचं नाही, ( देहे दुःख ते सुख मानीत जावे ) असं आपलं आधीच ठरलं आहे.
कुछ बडा पाने के लिए कुछ छोटा खोना तो पडता ही है दोस्तो !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
04.03.2017
1अपानवायु आणि ढेकर, 2मल, 3मूत्र, 4शिंक, 5तहान, 6भूक, 7खोकला, 8जांभई, 9उलटी, 10अश्रू, 11शुक्र, 12झोप आणि 13श्रमामुळे लागणारा दम, यांना वेग असे म्हटलेले आहे. यातील कोणाचेही अवरोध करू नये, किंवा मुद्दाम प्रवर्तन करू नये.म्हणजे निर्माण करू नये.
या प्रत्येक रोगाचा अवरोध केल्यामुळे काय काय लक्षणे दिसतात, ते वाग्भट या शास्त्रकारांनी अध्याय चार मध्ये वर्णन केले आहे.
या अध्यायाचे नावच मुळी रोगानुत्पादनीय असे आहे. म्हणजे रोग होऊ नये यासाठी आपण काय करावे, याचे वर्णन या अध्यायात केले आहे.
शरीरातील या वेगांचा अवरोध कधीही करू नये. जर असा अवरोध वारंवार होत असेल तर त्याची चिकित्सा काय करावी ते सुद्धा सांगितले आहे.
त्यातील तहान या वेगाचा अवरोध केल्यामुळे,( म्हणजे तहान लागली असता पाणी न पिल्यामुळे ) शोष, अंग ठणकणे, बहिरेपणा, मूर्च्छा, भ्रम, आणि ह्रदयरोग हे विकार होतात. चुकुन असे झाले तर त्याची चिकित्सा म्हणून शीत उपचार करावेत, असे ग्रंथकार म्हणतात. शीत उपचार म्हणजे थंड उपचार. जसे थंड गुणाचे चंदन, केशर, कांदा, वेखंड, धने जिरे इ. लेप लावणे, या द्रव्यांचे रस किंवा पाणी थोडेथोडे पिणे, थंड पाण्याचा अंगावर शिडकावा करणे, थंड वारा घालणे, गुलाब, वाळा इ. सुवासिक फुलांचा आणि मुळांचा सुगंध घेणे, अश्याच गुणांच्या तेलाचे मालीश करणे किंवा विधीवत बस्ती घेणे इ. उपचार करावेत.
आजच्या काळाचा विचार करता, चिकित्सातत्व तेच ठेवून तहान या वेगाचा अवरोध झाल्यामुळे वर वर्णन केल्याप्रमाणे जो त्रास होतो, त्याला प्रथम उपचार म्हणून अगदी असेच उपचार करतात. जसे सलाईन लावणे, कोल्ड स्पजींग, कोलन वाॅटरने पुसुन काढणे, आईस वाॅटर एनिमा, एसी खोलीमधे ठेवणे, इ.इ.
यासाठी आपली तहान आपल्याला समजली पाहिजे. पोटावर जबरदस्ती, अत्याचार होऊ नयेत. जेव्हा तहान लागते तेव्हा, तहान लागते तेवढेच पाणी वा तत्सम द्रवपदार्थ प्यायलाच पाहिजे. आणि जेव्हा भूक लागते तेव्हा, जेवण म्हणजे घन आहार त्याच वेळी पोटात गेला पाहिजे. असे केले नाहीतर काय होते, ते सुद्धा अभ्यासून लिहून ठेवले आहे. भावप्रकाश या ग्रंथात ग्रंथकार म्हणतात,
तृषितस्तु न चाश्नियात्क्षुधितो न पिबेज्जलम् |
तृषितस्तु भवेद्गुल्मी क्षुधितस्तु जलोदरी ||
सार्थ भावप्रकाश
तहान लागली असता पाणी न पिता जेवण्याने गुल्म, म्हणजे पोटात गोळा होणे हा रोग होतो, तर भूक लागली असता, न जेवता रिकाम्या, भुकेल्या पोटी पाणी पिण्याने जलोदर किंवा असायटीस म्हणजे पोटात पाणी साठून रहाणे हा रोग होतो.
कोणता रोग का होतो, याची कारणे शोधून काढून, अनुमान करून, ते वारंवार अभ्यासून, पुढच्या पिढीसाठी सर्व लिहून ठेवणाऱ्या, या सर्व ऋषींना साष्टांग दंडवत !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
14.12.2016
होय आपल्या आयुर्वेदानुसार हिलाच बावची अथवा बाकूची असे म्हटले जाते.आपण औषधी प्रयोगा करिता ह्याच्या बियांचे चुर्ण किंवा तैल वापरतो.पण आहारात मात्र ह्याच्या शेंगांची भाजी वापरली जाते.
अर्थात बोलीभाषेत हिलाच चिटकी देखील म्हणतात.आणि हिच एक अशी भाजी आहे जी कधीच चिरून केली जात नाही तर हिच्या शेंगा मोडून मग हिची भाजी करतात.कारण चिरताना जर ह्याच्या बिया कापल्या गेल्या तर हि भाजी कडू होते असे म्हणतात.
हिची भाजी कडवट असली तरी लागते छान आणि ब-याच लोकांना हि भाजी फारच आवडते.जशी हि स्वयंपाकात वापरतात तसेच हिचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.
गोवारीची भाजी हि चवीला कडू तिखट लागते व हि उष्ण असते त्यामुळे ती शरीरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त मात्र वाढवते.
चला हिचे औषधी प्रयोग पाहूयात:
१) चाई पडून टक्कल पडले असल्यास गवारीच्या ह्यांचा लेप त्या जागी लावावा व पोटात खायला गोवार भाजी द्यावी.
२)हि भाजी कडूपौष्टीक मानली जाते त्यामुळे ताप येऊन गेल्या नंतर येणा-या अशक्तपणा मध्ये हि खायला द्यावी.
३)खरूज झाली असता गोवारीच्या बिया व कडूकारले गोमूत्रात वाटून लावावे.
४)त्वचेवर पांढरे कोड आल्यास तसेच सोरियासीस मध्ये गोवारीच्या बियांचे तेल त्वचेवर लावावे व पोटात खायला भाजी द्यावी.
५)मुळव्याध,कृमी व वारंवार संडास मधून आव पडणे ह्यात गोवारीची भाजी खाणे उत्तम होय.
गोवारीची भाजी खायचा अतिरेक केल्यास अॅसिडीटी,पातळ जुलाब होणे व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अमुक रोगावर आयुर्वेदात काही सांगितले आहे काहो ?
नवीन नवीन रोगावर जुन्या आयुर्वेदातील औषधे कशी लागू पडतील ?
ही चौदा प्रकारची औषधे डाॅक्टरनी कायमचीच घ्यायला सांगितली आहेत. त्या औषधांबरोबर आयुर्वेदातील औषधी चालतील का ?
एखादे कायमचे घेण्यासाठी औषध सांगा हो वैद्यराज !
केमोचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का ?
अॅलोपॅथीमधे जसं क्रोसीन आहे तसं आयुर्वेदात काय सांगितले आहे ?
आम्हाला वैद्यांनी सांगितलेले पथ्य आणि औषध घ्यायच्या वेळा पाळता येत नाहीत, ते सोडून आयुर्वेदातील औषधे देऊ शकता का ?
बी काॅम्लेक्ससाठी आयुर्वेदात काय ?
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची नाही तर आयुर्वेदात काही आहे का ?
अशा प्रकारचे असंख्य प्रश्न वैद्य मंडळींना विचारले जात असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वैद्याच्या शैक्षणिक आयुष्यातील निम्मी वर्षे फुकट गेलेली असतात. किंबहुना त्यासाठीच पाच वर्षाचा सिलॅबस पूर्ण करायला काहीजणांना सात आठ वर्षे पण द्यावी लागतात.
या एक मिनीटात विचारलेल्या दोन ओळीच्या प्रश्नांची उत्तरे अशी तीन चार ओळीतच कशी देता येणार ? पाच सहा दिवस विचार केल्यानंतर लक्षात येते की उत्तरे द्यायला सात तास तरी लागतील. म्हणजे आठवडा गेला. तोपर्यंत चांगलेच नाकी नऊ आलेले असतात. आणि दहा वेळा प्रश्नांची उत्तरे सांगितली तरी आणखी अकरा जण बारा प्रश्न घेऊन तयार असतात.
आजच एका गटात विचारणा झालीय. "प्रमेहाचे सर्व पंचवीस भाग वाचले. आता साखर नाॅर्मल राहण्यासाठी काय करायचे ते सांगा." म्हणजे लोकांना किती 'इन्स्टंट फाॅर्म्युले ' हवे आहेत ते बघा.
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. ही विशिष्ट पॅथी नाही. विशिष्ट चौकट आखून त्यात औषधे आणि पथ्य कोंबायची म्हणजे आयुर्वेद नव्हे. असं जर कोणी करत असेल तर त्याला खरंतर आरोग्यच कळलेलं नाही.
समजा आपल्याकडे एखादे मशिन आणलेले आहे. तीन वर्षे वाॅरंटीचे ! काही कारणानी ते मुदतीपूर्वीच बंद पडले.
ते कसे बंद पडले, तेव्हा काय काम करीत होतो, याचे रसभरीत वर्णन ऐकवल्यानंतर तो काय म्हणतो ?
तज्ञाला दाखवल्यानंतर तो म्हणतो,
"अहो, या मशिन बरोबरचे हे 'लिफलेट' वाचले नाहीत का ? त्यावर हे बघा, स्पष्ट शब्दात लिहिले आहे, हे मशीन कसे वापरायचे ते ! तुम्ही हे मशीन तस्से वापरलेले नाही. सबब तुम्हाला या मशीनची 'वाॅरंटी' लागू होत नाही. "
आपण कपाळावर हात मारून फक्त "ओऽहोऽऽ" एवढंच म्हणू शकतो. म्हणतो. कारण तेवढंच आपल्या हातात असते. आणि ते 'लिफलेट' वाचायची वेळ निघून गेलेली असते.
जीवनाचं असच होतं. या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही, असे हे दुर्लभ यंत्र जेव्हा तो शंभर वर्षाच्या वाॅरंटीसह, आपल्या हातात देतो, तेव्हाच एक 'लिफलेट' त्याने या यंत्राला जोडून पाठवलेले असते. हाऊ टु युज इट. लिहिलेलं असतं त्यावर !
पण आम्हाला हे 'लिफलेट' वाचून बघण्याची तसदी घ्यावी असे सुद्धा वाटत नाही. जेव्हा मशीन बंद पडते, तेव्हा हे मशीन का बंद पडले, कसे बंद पडले, कधी बंद पडले, हे शोधण्यासाठी, 'लिफलेट' शोधायची धावाधाव सुरू होते.
पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
असे होऊ नये......
या 'लिफलेटचे' नाव आहे.
" आयुर्वेद "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
11.02.2017
समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
देहे दुःख ते सुख मानीत जावे....
सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे !
प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात,
सुखापेक्षा समाधान महत्वाचे.
सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख संपते तिथे समाधान सुरू होते. किती अर्थपूर्ण वाक्य आहे ना हे. एका गोष्टी मधे संतुष्टी होतच नाही. एकावर एक फ्रीचा जमाना आहे. तिथे सुख कुठे संपते हे कसं कळणार ?
प्रमेहाच्या सूत्रामधे या सुखासनाचा सर्वात प्रथम उल्लेख करावासा वाटला. आळशी बनत जाणे, वृत्तीने, कर्माने, तनाने आणि मनाने सुद्धा!
आजची तरूण पिढी. दोष देत नाही, पण नाक्यावरून दळण आणायचं झालं तरी बाईकचं बटन स्टार्ट केल्याशिवाय दळण सुद्धा आणले जात नाही. छोटी छोटी काम करायचा आळस हा पुढे मधुमेहासारख्या आजाराला जन्म देतो, हे लिहून ठेवणारे दूरदृष्टीचे ऋषी, भारतात होऊन गेले याचा अभिमान बाळगायलाच हवा. पण पाश्चात्यांच्या आपण एवढे आहारी गेलो आहोत की, आमच्या ऋषींचे कौतुक सोडाच, पण भारतीयांनाच मागासलेपणाचा शिक्का मारून आपण मोकळे होतो.
घरातील छोट्या छोट्या गोष्टी करायला लाज कशाला बाळगायची ? ही कामे करताना आरोग्याचे पण रक्षण होतेच आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.
किती सोप्पं आणि सुखासिन झालं आहे जगणं.
चुल फुंकावी लागत नाही, की जमिन सारवावी लागत नाही,
पाणी ओढायला लागत नाही, किंवा शेंदावे लागत नाही, नळ सोडला किंवा बटन दाबले की पाणी किचनमधे !
ठिबक सिंचनमुळे पाणी झाडांना सुद्धा द्यावे लागत नाही.
ट्रॅक्टरमुळे नांगर हातात धरावा लागत नाही,
मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंटाही गेला. टेबलखुर्ची आली नि खाली बसून जेवणारी पंगत संपली,
एवढंच काय वारा घेण्यासाठी सुद्धा हात हलवावा लागत नाही.
हळदीकुंकु असेल तर निमंत्रणे देण्यासाठी फिरावे लागत होते, वाॅटसपमुळे तेही नाही.
शाॅपिंगही ऑनलाईन. पैसे मोजायचे पण श्रम नाहीत, करा स्वाईप !
पाश्चात्य देशात काम करायला माणसं मिळत नाहीत म्हणून मशीनची निर्मिती करणे ही त्यांची गरज होती, पण माणसांची मुबलकता असलेल्या प्रिय भारत देशात, पाश्चात्यांनी बनवलेली मशिन्स घरात आणून, माणसे मुबलक मिळतात म्हणून मशिन चालवायला पुनः बाई किंवा बाबाला ठेवायला लागले. ही सुखासिनता नव्हे काय ?
नंतर आजारपण आल्यावर दिवसाला सोळा सोळा प्रकारची औषधे खात बसून आरोग्य विकत घ्यायचे ? याला काय म्हणावे ?
मध्यंतरी एक जपानी व्हिडिओ बघीतला होता, माणसाला बेड वरून हलवून उठवायला घड्याळ. त्याचा बेड आणि त्याला उभा करायला मशिनची प्रगत टेक्नाॅलाॅजी. त्याचे गाल बाजुला करून तोंडात टूथब्रश ढकलून त्याचे दात घासले गेले, नंतर चुळ भरायला पाणी तोंडात सोडले गेले, चुळ भरायला छोटे बेसिन, आपल्या पिकदाणी सारखे तोंडासमोर हजर.
रोबोच्या दुसऱ्या हातानी ओले झालेले तोंड पुसायचे. वगैरे वगैरे टेक्नाॅलाॅजीची कमाल दाखवली जात होती. हा सुखाचा अतिरेक नव्हे काय ?
अतिशयोक्तीचा दोष सोडून देऊ....
पण निदान...
आपली ताट वाटी आपली आपण उचलून ठेवावी, जमलं तर घासावी.
आपले कपडे आपण बुचकळून काढावेत.
आपली गाडी आपण धुवावी. पुसावी तरी.
आपले अंथरूण पांघरूण आपणच घालावे, आपणच आवरावे.
आणि
आपल्या देवघरात एकदा तरी त्याच्यासमोर ओणवे रहावे.
देहे दुःख ते सुख मानीत जावे......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.02.2017
Copyright © 2025 | Marathisrushti