कोणी छानसा विनोदी चुटकुला सांगितला आणी सगळे जण हसायला लागले कि त्या व्यक्तीला दाद देण्यासाठी म्हटले जाते कि तुमच्या विनोदाने तुम्ही छान हास्याची खसखस पेरलीत.तर असा हा गरम मसाल्यातील पदार्थ.खरे तर ह्या अफूच्या बोंडामधील बिया होय पण ह्या मात्र अफूच्या प्रमाणे मादक नसतात.
खसखसचा उपयोग गरम मसाल्या मध्ये,तसेच खीर मिठाई इ पदार्थ बनवताना केला जातो.साधारण रव्या प्रमाणे दिसणारी हि खसखस देखील आपण घरगुती उपचारांमध्ये वापरू शकतो बरे का!
खसखस हि चवीला गोड,थंड असून शरीरामध्ये वात कमी करते व कफ दोष वाढवते.चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?
१)संडास मधून आव पडत असेल तर चमचाभर खसखस दह्यात वाटून खावी.
२)खसखस,बदाम,चारोळी,समभाग घेऊन वाटावी व तिची गाईच्या दूधात खीर करावी त्यात १ चमचा साजूक तूप व १ चमचा गुळवेल सत्व आणी थोडी खडी साखर घालून हि खीर अशक्त व्यक्तीने खाल्ल्यास शरीरात ताकद वाढते.
३)काही व्यक्तींच्या डोक्यात केसांच्या मूळांशी बारीक फोड येतात त्यांनी दुधामध्ये खसखस वाटून केसांच्या मुळाशी लावून दोन तास ठेवून मग केस धुवावे.
४)पुष्कळ सुका खोकला येत असेल तर १ चमचा खसखस गाईच्या दुधात शिजवून खीर करावी व हि खीर गरम असताना खावी उपशय मिळतो.
५)सोमरोग अर्थात काही स्त्रीयांना लघ्वीच्या मार्गातून सारखे पाणी जात असते त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्यांना अशक्तपणा येतो ह्यामध्ये मुठभर खसखस रात्री पाण्यात भिजत घालावी व सकाळी वाटावी नंतर त्यात २ चमचे लोणी+ १ चमचा खडीसाखर + १/२ चमचा वेलची पूड घालून हे मिश्रण तिला सतत किमान तीन ते सात दिवस खायला द्यावे.
खसखस अतिप्रमाणात खाल्ल्याने मद वाढून अति झोप येऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
धूमपान करणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, हे फक्त आपली संस्कृती सांगते. अर्थात त्यात मद निर्माण करणारा तंबाखू नको, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि नीट लक्ष ठेवून वाचा. धुमपान असं लिहिलं आहे. धुम्रपान नाही. दैनंदिन धुमपान, प्रासंगिक धुमपान, चिकित्सास्वरूप धुमपान असे प्रकारही वर्णन केलेले आहेत.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा
आज काल काय झालंय.
दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी,
जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून !
आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती.
रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती !
वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती !
पैशांची किंमत झाली कमी आणि पैसे झाले जास्ती !
मनमोकळ्या गप्पा झाल्यात कमी आणि चॅटींगसाठी वेळ झालाय जास्ती !
टीव्ही वरील सर्व चॅनेल्सवरचे एकुणएक पिक्चर्स जणु काही आपल्यासाठीच बनवले आहेत. फुकट बघता येतात, म्हणून आयपीएल पण झाल्या. याच्या जोडीला "मनोरंजन" म्हणून काहीतरी हवेच ना, म्हणून दिमतीला हाय फाय सिरीयल्स आहेतच !
सिरीयल्सच्या मधल्या जाहिरातींच काय करणार ? विचारांना एका ठिकाणी स्थिर बसू न देणाऱ्या रिमोटने दुसरी चॅनेल्स बदलली तरी तिथेही जाहिरातीच ! एकुणच काय, तुमच्या खिशातले पैसे आमच्या खिशात, आमच्यातचे तुमच्यात ! म्हणून भारतात एकवेळ थंडीची लाट येईल, पण मंदीची लाट कधीच येणार नाही.
95 % जनतेला सिरीयल्स मधला झामझौल मोहक वाटतो. मोह निर्माण झाल्यावर त्यातून इर्षा जन्माला येते. माझ्याकडे पण हा सगळा ताकझाक हवा, असे वाटू लागते, त्यासाठी खिशात असलेले पैसे पुरणारे नसतात. म्हणून अधिकाधिक प्रयत्न सुरू होतात. ज्या झोपेसाठी रात्र आहे, त्या झोपेच्या वेळी अशा सिरीयल्स पाहून आपल्या झोपेचं खोबरं तर करतोच, पण नको ते मानस रोग पाठी लागतात. आणि दिवस पण खराब करून टाकतो.
म्हणजे रात्रही गेली आणि दिवसही गेला.
एवढंही पुरत नाही, म्हणून हायफाय वायफाय सुरू करून घेतलं. नको ते चॅटींग, रात्री अपरात्री सुरू झालं. डोक्यावरून पांघरुण पांघरून गप्पा रंगू लागल्या. या मॅच्युअर गप्पा अजाण पालकांना समजू नये, याचा ताण सुरू झाला. नेहमीच्या गप्पागोष्टी नकोश्या वाटू लागल्या. वेळ कसा जातोय, ते लक्षात येईनासं झालं. अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडू लागलं. हुशार मुलांची आणि बुद्धिमान मुलींची बुद्धी गहाण पडू लागली. जागरणं घडू लागली आणि नको ती स्वप्न पडू लागली.
रात्रीचर्या बिघडू लागली.
तरूण तरूणींच्या चेहेऱ्यावरील चर्या बिघडू लागली.
दिवस आणि रात्रीची कामं पुरती बदलून गेली आणि समाजाची घडी सगळी विस्कटून गेली.
यम नियम न पाळता, अनावश्यक आरोग्य नियम, यम बनू लागला आणि "यम" आपला पाश आवळू लागला.
जगण्याची भीती वाटू लागली आणि मरण येऊ नये म्हणून औषधे ही गरज बनली.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.05.2017

ह्याचे ०.५-१.५ मी उंच वर्षायू क्षुप असते.काण्ड सरळ असून फांद्या मजबूत असतात.पाने २.५-८ सेंमी लांब किंचित गोल अथवा हृदयाकृती,एकान्तर असतात पत्र धारा दन्तुर असतात.फुले पिवळसर निळे पुष्प दंड मोठा व त्यात १-३० फुले गुच्छात उगवतात.फळ काळे व गुच्छात येते.बीज काळे लहान कोवळे व विशिष्ट उग्रगंधी असते.बीज मगज पांढरा असतो.
बाकुचीचे उपयुक्तांग बीज व बीज तैल आहे.हे चवीला गोड,कडू,तिखट असून उष्ण आहे.तसेच हल्के व रूक्ष आहे.बाकुची कफवातनाशक व पित्त प्रकोपक आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)कृमींवर ५ दिवस बाकुची चुर्ण देऊन मग त्यावर एरंडाचे तेल पोटात देतात संडासला पातळ होऊन कृमी पडून जातात.
२)श्वित्र कुष्ठात व जीर्ण त्वचारोगात बाकुचीचा उपयोग होतो.
३)उष्ण असल्याने बाकुची कामोत्तेजक आहे म्हणून ती क्लैब्यात वाजीकर कार्य करते.
४)खरजेवर बाकुचीबी व कारळे गोमुत्रात वाटून लेप लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
पाणी शुद्धीकरण भाग चार
पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात.
दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. ही वात ओली करावी. त्याचे दुसरे टोक बाहेर काढून खालील मडक्यात असे लोंबत ठेवावे की, वरच्या मडक्यातील पाणी थेंब थेंब वातीवरून खाली ठिपकत राहील. दोन्ही मडक्यावर नीट आच्छादन घालावे.
वरच्या मडक्यातील काही अशुद्धी, वातीमुळे खालील पाण्यात येणार नाही. फक्त वरच्या मडक्यातील तळापर्यंत गेलेल्या वातीच्या पातळीपेक्षा दुसरे टोक आणखी खालील पातळीवर आले पाहिजे, हे पहावे.
ही वात घसरून खाली येऊ नये यासाठी वरच्या मडक्यात वातीवर एखादी वाटी वजनासाठी ठेवावी.
टीप टीप बरसा पानी.... सुरू होईल.
वरच्या मडक्यातील पाणी गाळून आपोआप खालील मडक्यात जमा होईल. वरच्या मडक्यातील पाणी कमी होत जाईल. खालचे मडके भरत जाईल.
वातीला चिकटलेली धुळ, माती सारखी अशुद्धी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहाता येते. कापडाची वात धुवुन वाळवून ठेवली की, पुनः दुसऱ्या दिवशी वापरायला तयार !
खर्च म्हणाल तर काही नाही. मडक्यामुळे पाणी थंड पण होईल. वरील मडक्यात रोज एखाददुसरे सुगंधीत फूल किंवा पान किंवा बी किंवा वाळ्यासारखे सुगंधी असलेले एखादे मूळ ठेवावे. त्याचा वास, अर्क, आणि काही प्रमाणात सूक्ष्म औषधी गुण पाण्यात येतील.
दररोज औषधीयुक्त शुद्ध गाळलेले थंडगार पाणी मिळत जाईल.
करून तर बघा,
गंमत म्हणून !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.12.2016
घुसळण्याची' प्रक्रिया महत्वाची. दही 'घुसळण्याच्या' प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते.
या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो.
जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप धावले की पाय गरम होतात, विचार खूप झाले तर डोस्कंही गरम होते, वृक्ष एकमेकांना घासले की प्रत्यक्ष वडवानलच तयार होतो. घर्षणाचा अग्निशी अगदी जवळचा संबंध असतो, हे तर आपण व्यवहारातही बघतो.
हा अग्निच रूपांतरणाची प्रक्रिया घडवण्यासाठीचे मुख्य कारण आहे. जेवढा अग्नी जास्ती, तेवढे रूपांतरण जास्ती.
रूपांतरण म्हणजे बदल. किंवा आपण असेही म्हणू शकतो, की जिथे जिथे बदल होतो तिथे तिथे अग्निचे कार्य सुरू असते. बदल म्हणजे अग्नी.
तांदुळ आणि पाणी एकत्र करून बदल होत नाही, तर त्याला योग्य अग्नी दिला तर त्याचे रूपांतर भातामधे होते, नाहीतर एकतर मऊभात अन्यथा खरपूस खमंग !
कुठेही गेलात तरी अग्नीचे कार्य लक्षात घ्यावेच लागते.
हा अग्नी प्रमेहामधे विचारात घ्यावा लागतो. क्लेद कमी करण्यामधे अग्नी महत्वाचा. म्हणजे प्रमेहाचा मुख्य शत्रु जो क्लेद, तो नष्ट करणारा अग्नी, हा प्रमेहाचा शत्रू ठरतो. प्रमेहाचा शत्रू तो आपला मित्र !
दही घुसळण्याच्या प्रक्रियेत अशीच अप्रत्यक्ष उर्जा तयार होते.
आता दही घुसळणे कसे करतो यावर त्यातील क्लेदाचे रूपांतरण होणे अवलंबून आहे. ही युक्ती आहे.
हाताने लाकडी रविने दही घुसळणे, ताकमेढीला दोरी गुंडाळून दोन्ही हाताने उलटसुलट रवि घुमवणे, आणि मिक्सरमधून दही फिरवणे, आणि चमच्याने दही ढवळणे, या कृतीवर तयार होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता ठरत असते. चमच्याने दही कालवण्यामुळे केवळ त्यातील वायु बाहेर पडेल, त्याची वडी मोडेल, एवढेच काम होईल, पण 'क्लेद' कमी होणार नाही. क्लेद कमी होण्यासाठी आणखी उष्णतेची गरज असते.
हो. हो. हो. दही गरम करता येईल का असं अजिबात मनातही आणू नका. ओहोऽऽऽ.
दही गरम करायचे नाही. कधीही नाही. अगदी पंजाबी ग्रेव्हीमधे पण नाही.
कोणत्याही गोष्टीत इन्स्टंट, शाॅर्टकट उपयोगी नाही. ज्या गोष्टीला जेवढा वेळ जाणं अपेक्षित असते, तेवढा वेळ देणं अपेक्षितच असते. नाहीतर एक वर्षाच्या पोरग्यानं बाबांचा शर्ट घातला आणि बूटात पाय घातले तरी तो 'बाप' होत नाही ना !
तसंच दह्याचंही आहे. त्याचे रूपांतर ताकात करताना काही काळ जाणं अपेक्षित असतं. सावकाश आणि सतत घुसळणं,
हो, हातानं रवीनं घुसळणं वेगळं, रवी दोरीला बांधून घुसळणे वेगळे, मिक्सरमधून फिरवण्याची तऱ्हा वेगळीच ! आणि लस्सी करणं वेगळं. प्रत्येकावर होणारी अग्नीची प्रक्रिया वेगळी !
इथं प्रत्येकाचं वेगळेपण वेगळं....
त्याचंच नाव आयुर्वेद !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.01.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा
पोटात खड्डा पडावा.
सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे.
त्यामुळे काय होते ?
आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते.
पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व शरीराचे पोषण सुरू होते. आपण जे काही खातो पितो, त्यातूनच हे पोषण होत असते. जे काही खातो पितो, त्यातून पोषण झाल्यावर जो भाग शिल्लक रहातो, त्याला मल असे म्हणतात. जो टाकाऊ असतो. घाम, लघवी, संडास या मुख्य मार्गाने तो काढला जातो.
ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. पचन पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः तर काहीच करत नाही. जे काही करायचे तेवढे सर्व शरीरच करत असते. आध्यात्मिक भाषेत हे सर्व ईश्वर करत असतो. आणि वैज्ञानिक भाषेत यालाच "नेचर" असे म्हणतात.
आपला "मीपणा" यामधे आला की पचन बिघडते. आणि आम तयार होतो. या आमाचा स्वभाव चिकटून रहाण्याचा असतो. आणि कोणतीही गोष्ट पाण्याशिवाय चिकटतच नाही. म्हणजे जर या आमातील रस म्हणजे द्रव भाग, कमी केले गेले तर चिकटण्याची प्रक्रिया कमी होत जाईल.
अतिरिक्त पाणी काढण्यासाठी आजूबाजूला जर खड्डा असेल तर हेच पाणी वेगळे करण्याचे काम विनासायास होते. यालाच मी सोकपिट टेक्निक म्हणतो. आता हा खड्डा जर पोटात तयार केला तर ?
खड्डा म्हणजे रिकामी जागा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हे पोट भर भर भरत असतो. आतमधे तो जागा असतो, म्हणून खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. दर दोन तासांनी खा खा खाऊन ही जागा आपण कमी करत जातो. त्याच्या कामावरचा लोड जर आम्ही वाढवला तरच आम तयार होऊन चिकटणार आहे. म्हणून पोट थोडे रिकामे करावे, त्याच्यावरचा लोड कमी करावा, पोटात थोडा खड्डा तयार करावा. म्हणजे "आमातील रस म्हणजे द्रवांश" या खड्ड्यांमधे आपोआपच ओढला जाईल. चिकटणे कमी होईल, उरलेला आम सहजच सुकुन जाईल.
नियम म्हणून हा खड्डा ( सोकपिट ) तयार करून घेतला की, आम नष्ट झालाच म्हणून समजा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
03.05.2017
शेपूची भाजी हि ब-याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणा-या विशिष्ट गंधामुळे ती ब-याच लोकांना आवडत नाही.(मला देखील आवडत नाही). हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या बाळऔषधांत वापरतात.
हिचे झाड तीन फूट उंचीचे असते.हि भाजी चवीला गोड व उष्ण असते हि शरीरातील कफ व वात दोष कमी करते.भाजी म्हणून जरी हि तेवढी चांगली लागत नसली तरी हिचे देखील बरेच औषधी उपयोग आहेत बरे का!
चला मग शेपूचे औषधी उपयोग पहायचे ना!
१)जखमेवर हिच्या पाल्याची चटणी वाटून लेप करावा.
२)तोंडास रूची नसणे,जीभ जाड होणे,तोंडाला दुर्गंध येणे अशा तक्रारींमध्ये शेपूचा कोवळा पाला व आल्याचा एक तुकडा चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावी.
३)लहान मुलांना शेपूची ताजी पाने एक कपभर पाण्यात उकळावे व पाव कप पाणी शिल्लक ठेवावे व हे पाणी प्रत्येक दुग्धपानापुर्वी १-१ चमचा द्यावे त्यामुळे बाळाचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
४)शेपूची पाने घालून तीळाचे तेल उकडून ते गाळावे हे तेल मार लागणे,मुरगळणे,संधिवात ह्यांच्या वेदनांमध्ये लावल्यास उत्तम.
५)बाळंतीणीस रक्तस्राव कमी होण्यास व दुधभरपूर येण्यास शेपूची भाजी देतात.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पित्त वाढते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
प्रमेह हा कफाशी संबंधित आजार आहे. कफ दोषाचं विकृत झाल्यानंतरचं नाव क्लेद. क्लेद वाढवणाऱ्या पदार्थामधे दह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.पण दही न आवडणारा प्राणी तसा दुर्मिळच. दही म्हटलं की फक्त एकच प्राणी नाखुश असतो, तो म्हणजे आयुर्वेद वैद्य. खरंतर त्याच्याही जीवावर येतं, दही खाऊ नका म्हणून सांगायला. पण काय करणार? जे सत्य आहे ते कोणीतरी शेवटी सांगायलाच हवे ना ! ते अतिशय कठीण काम अखेर वैद्यालाच करावे लागते.
दही दूध म्हणजे काही अगदी विष नव्हे! अगदी बंद करण्याची आवश्यकता नाही. पण प्रकृती, लक्षणे, स्थळ काळ इ. ठरवून यांचे सेवन करावं लागतं.वाताचे काही आजार सोडले तर दही अनेक रोगांचे माहेरघरच आहे. युक्ती वापरून दही खाता येते. जिथे कायदा सांगितला जातो, तिथे पळवाट असतेच. ती युक्ती शोधून काढणारा वैद्य महत्वाचा !
दही लागते म्हणजे नेमके काय होते ? काही उपकारक जंतु विरजण स्वरूपात आपण त्या दुधात सोडतो. त्या दह्याच्या पहिल्या अवस्थेला आपण अदमुरे दही म्हणतो. साधारणपणे सात ते आठ तासात ही अवस्था येते. अजून तीन चार तास गेल्यावर पक्के वडी स्वरूप दही जमते. आणखी चार पाच तास गेले म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ते चांगलेच आंबट होते. तिसऱ्या दिवशी आंबटपणाचा कहर होतो. त्यावरची साय सुद्धा आंबट दिसायला लागते. रंग बदललायला सुरवात झालेली असते. वास बदलतो. बुडबुडे यायला सुरुवात होते. हे सगळं वर्णन का करतोय ? तेच तर दही न खाण्यामागचे इंगित आहे.
ही जी प्रक्रिया दह्यामधे सुरू झालेली असते ती थांबतच नाही. अदमुऱ्या दह्याचे रूपांतर एव्हाना आंबट्टढ्ढाण्ण दह्यात झालेले असते. या प्रक्रियांचा विचार केला तर दुधापासून दह्यात रूपांतरण होणारी ही प्रक्रिया रासायनिक स्वरूपाची असते. म्हणजे एकदा दही बनवायला सुरवात झाली की, थांबायचे नाव नाही. कितीही थांबवायचं म्हटले तरी आता परत दुधात रूपांतर होणे नाही. गुण आणि कर्माने सुद्धा! चव तर होत्याची नव्हती होऊन जाते. दह्यावरची ही प्रक्रिया पोटात गेली तरी तश्शीच सुरू राहते. ते आणखीनच आंबट होते. दह्याचा हा आंबटपणा पित्ताला हमखास वाढवतो. आणि त्यातील बुळबुळीतपणा कफाला वाढवतो.
वायुचा विचार केला तर दह्यामधे बुडबुडे पण तयार झालेले दिसतात. दही घुसळल्यावर, दह्याची वडी / कवडी मोडल्यावर आतील हा वायु निघून जातो, म्हणून तयार झालेले ताक सुपाच्य असते. म्हणूनच नुसते दही घेणे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण असे न घुसळलेले दही तिन्ही दोषांचा प्रकोप करते.
नक्तं न भुञ्जात्
दही कधीच रात्रीचे घेऊ नये, कारण दह्यामधे सुरू असलेली किण्वन प्रक्रिया कारणीभूत होत असावी. वात वाढवायला ही प्रक्रिया मदत करणारी असते. आणि सर्वात महत्वाचे सूर्य असेपर्यंत, त्याच्या अग्निवर पचन पूर्ण करून घेतले गेले पाहिजे, मग जाठराग्निवर अतिरिक्त ताण निर्माण होत नाही.
असे हे स्वभावतः कफ आणि पित्त वाढवणारे,क्लेद निर्माण करणारे, दही प्रमेहामधे वर्ज्य सांगितले गेले नसते तरच नवल !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.01.2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेबेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस
बाबा सांगतात...
सांगेन गोष्टी हिताच्याच चार....
निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत. केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे.
तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला "जीवन" असा आणखी एक पर्यायवाची शब्द सांगितलेला आहे. जीवन सुखी होण्यासाठी सावध तो सुखी. नाहीतर सुखाच राहाणार. समुद्री चहुकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. अशी अवस्था होऊ नये, याकरता आधीच विचार करावा, असे आयुर्वेद सांगतो.
याचा अर्थ असा नव्हे की, भविष्यात हाताच्या एखाद्या बोटाला चुकुन, अपघाताने, जखम झाली तर, "या जखमेचे रूपांतर पुढे कर्करोगात होऊ नये, म्हणून आत्ताच हे चांगले बोट आपण ऑपरेशन करून काढून टाकूया" असे म्हणण्यासारखे आहे. नाही का ? याला "प्रिकाॅशन" असे म्हणता येईल का ? आज व्यवहारात याला "प्रिकाॅशन" असे गोंडस असे नाव दिले जात आहे, आणि भीती उत्पन्न करून नको ती शस्त्रकर्मे जसे गर्भाशय निर्हरण, सिझेरीयन, अपेंडिक्स, थायराॅईड, पित्तखडे, मूतखडे आणि अगदी ह्रदयातील ब्लाॅकदेखील, लगेच इमर्जन्सीच्या नावाखाली, ही शस्त्रकर्मे केली जात आहेत. हे मी नव्हे तर अमीरखान सारखा सत्यशोधक सत्यमेव जयते मधून सांगतोय. पद्मभूषण डाॅ. बी एम हेगडे देखील आपल्या युट्युब मधील अनेक व्हिडिओ मधून सांगताहेत. हे व्हिडिओ शांतपणे यु ट्युबवर जरूर पहावेत.
मनात भीती कधी उत्पन्न होते ? जर अभ्यास नसेल तर. जर एखाद्या विषयाचा अभ्यास झालेला असेल तर परीक्षेत नापास होऊ अशी भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अमुक गोष्ट केल्यावर, ती जाणून घेतल्यावर, तुला भीती वाटण्याचे काही कारणच नाही, याची खात्री पटली की, भीती उत्पन्न होतच नाही, असे विवेकानंद म्हणतात. म्हणजेच अज्ञान हीच सर्वात मोठी भीती आहे. ही अंधश्रद्धा नाही. मी जर आरोग्याच्या नियमांचे योग्य रितीने पालन करत असेन, तर मला भविष्यात काही रोग होईल, अशी भीती वाटण्याचे काही कारणच नाही.
रोग झाल्यावर काय करावे, हे अभ्यासण्यापेक्षा रोग होऊ नयेत, म्हणून काय काय करावे, हे आयुर्वेदात खूप सखोल सांगितलेले आहे.
रोग होऊ नये, यासाठी शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक या चारही गोष्टींचा साकल्याने विचार करावा. केवळ दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार विहार पथ्यापथ्य पालन करणे म्हणजे स्वस्थवृत्त नव्हे, हा शारीरिक अंतर्गत एक भाग झाला. इतर गोष्टी दुर्लक्षून कश्या चालतील ? आपल्याला जर पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करायलाच हवा. म्हणून हा आयुर्वेदीय हितोपदेश.
काही जणांच्या मनात अज्ञानामुळे, अजूनही शंका आहेत, की " आई बाबा सांगतात" हे आयुर्वेदाच्या कोणत्या पुस्तकात सांगितले आहे ?
कृपया आपली जातीयवादी विकृत दृष्टी, निदान आरोग्याच्या क्षेत्रात तरी, जरा बाजुला ठेवावी.
जसे अग्निवेश, चरक, सुश्रुत होऊन गेले, तसे त्यानंतरच्या काळात 'वाग्भट' हे ग्रंथकार होऊन गेले. नागार्जुन, शारंगधर, काश्यप इ. अनेक ऋषी, आणि त्यांचे शिष्योत्तम, ही आरोग्य रहस्ये काळानुरूप त्यात योग्य ते बदल करीत, पुढील पिढीला देत गेले.
गुरूशिष्य संवाद रुपात हे ज्ञानदान करण्याची भारतीय परंपरा जशी भगवद्गीता सांगितली, तशीच गुरूशिष्य संवादरुपी विवेचन या आयुर्वेदीय ग्रंथामधे देखील दिसते. शिष्य प्रश्न विचारतात, आणि गुरू त्या शंकेचे समाधान करतात. अशी ही परंपरा. पण दुर्दैवाने ही गुरुकुल शिक्षण परंपरा बंद पडली आणि महाविद्यालयीन चाकोरीबद्ध शिक्षण सुरू झाले....
आई आणि बाबा हेच मोठे गुरू आहेत. जीवनाचे सार, चार हिताच्या गोष्टी, तेच अधिकाराने सांगत असतात. गुरुशिष्य परंपरा आई बाबा सांगतात, या नावाखाली सांगण्याचा हा प्रयत्न "वाग्भट" या ग्रंथाधाराने सुरू आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Copyright © 2025 | Marathisrushti