२६. कवल. म्हणजे गाल फुगवून तोंडात पाण्याची चुळ धरून ठेवणे. वेगवेगळ्या औषधी काढ्यांची, तेलाचे कवल अवस्थेनुसार प्रकृतीनुसार गुण दाखवतात, याविषयी लेखन झाले आहे. हा अस्सल भारतीय दैनंदिन उपचार होता. हा उपचार आता केवळ ‘चुळ भरणे’ एवढ्या स्तरावर आला आहे.
एका गंभीर सुरात सर्वानी मिळून म्हटलेले हे मंत्रपुष्प, केवळ ऐकत असताना देखील अंगावर रोमांच उभे राहातात.
विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36
नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा
नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.
शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.
सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.
हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )
नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.
या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
29.06.2017
आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले.
बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ?
होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना.
म्हणजे ही पिढी बदलाला समोरी गेली. आता जी पन्नाशीला आलेली पिढी आहे, त्यांच्या बदललेल्या आहारात पिझ्झा, बर्गर, थाय फूड, साॅस हे पदार्थ आले आहेत.
हे बदल होणारच आहेत. यालाच आपल्याला सामोरे जायचे आहे. आता ज्यांचे वय पंचवीस आहे, ते पन्नाशीच्या टप्प्यावर आले की, त्यांनासुद्धा आणखी एका बदलाला सामोरे जावे लागेल. ग्लोबलायझेशनच्या काळात, आहारात नवीन काॅम्बीनेशन्स तयार होणार आहेत. ती मान्य करताना त्यातील संभाव्य धोके लक्षात घेतले की झाले.
आता चटणीची जागा 'साॅसने' घेतली आहे. आंब्याच्या पाकाची जागा 'जॅमने' घेतली आहे. आईची जागा 'बाईने' घेतली आहे.
साॅस, जेली, जॅम,चीझ, मायोनीज, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ, बाईच्या ऐवजी आईने करायला सुरुवात केली तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. यासाठी या बदलाला आई बाबांनी सामोरे जायची, मानसिकता ठेवली पाहिजे.
साॅस करताना जे टोमॅटो वापरले जातात, ते नीट पिकलेले बघून घ्यावेत, नीट धुवावेत, नीट शिजवावेत, शिजवताना त्यात योग्य ते स्टॅण्डर्ड मसाले घालावेत, कृत्रिम रसायनाऐवजी नैसर्गिक स्वाद असलेले मसाले घातले तर नुकसान नक्कीच होणार नाही. बाईने केलेल्या साॅसमधे काय काय घातले जाते, ते आपण वाचतो आहोतच. प्रिझर्वेटीव्ह घातले की, टिकणारच, मग त्यातील टोमॅटो कितीही किडके आणि सडलेले असतील तरीही !
जेली जॅम करताना त्यात जिलेटीन मिसळले जाते, जे अॅनिमल सोर्सपासून बनवले जाते. त्यातील छापील घटकपदार्थांची यादी "कोडवर्ड" मधे असते. त्यावर प्रत्यक्ष नाव छापण्यामधे धोका असतो, त्यासाठी ही पळवाट असते.
कृत्रिम रंग हा आणखीन एक धोका. ते रंग प्रमाणित केलेले वापरले नसतील तर धोका आणखीनच वाढतो. आताच्या संशोधनानुसार हे कृत्रिम रंग कॅन्सरचा धोका वाढवतात.
त्याऐवजी नैसर्गिक रंग वापरले तर चव आणि वास आणि आरोग्य नक्की सुधारेल. म्हणून हे पदार्थ घरी करायची कृती शिकून घ्यावी. शिकायचं. पण कुठे कसं आणि कोणाकडून ?
मोबाईल कसा वापरावा. हे घरातीलच पंचवीशीची पिढी ज्येष्ठ नागरीकांना शिकवते आहे. तसेच, या नवीन पदार्थांची चव त्यांना कशी हवी आहे तशी बनवून देण्यासाठी सुद्धा त्या पिढीचीच मदत घ्यायला हवी. ते पदार्थ स्वतः खाऊन बघितले पाहिजेत. तरच त्यातील दोष लक्षात येतील.
पानावरील डाव्या बाजूचे पदार्थ बदलत आहेत. जे पदार्थ बदलले आहेत, तेच जास्ती गडबड करतात, म्हणून पानावरील डाव्या बाजूला होणाऱ्या बदलावर सावधपणे लक्ष ठेवले पाहिजे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
04.11.2016
काय हा पडवळ्या सारखा दिसतो लांबच लांब असा ठोमणा शरीरयष्टिने कृश व उंच व्यक्तीला मारला जातो.हि भाजी जर रात्री कुणी काळोखात जमिनीवर पाहिली तर साप आहे असे समजून किंचाळल्याशिवाय रहाणार नाही.असे लांबच लांब असे हे पडवळ.
ह्याची चटणी,कोरड,भाजी,भजी असे विविध प्रकार आपण करून खातो.आणि हे सगळेच पदार्थ अगदी चविष्ट लागतात बरं का.
ह्या पडवळाचे वेल असमतोल आपण ज्याची भाजी करून खातो ते पडवळ हे त्या वेलिचे फळ असते.औषधासाठी वापरतात ते पडवळ कडू असते पण स्वयंपाकात आपण गोड पडवळ वापरतो.त्यामुळे आपण गोड पडवळाचे औषधी उपयोग पाहूयात.
पडवळ हे चवीला गोड व थंड असते व हे शरिरातील तिन्ही दोष कमी करते.आता ह्याचे औषधी उपयोग पहायचे ना:
१)भूक न लागल्यास पडवळ उकडून वाटावे व सुप बनवा त्यात १/५ चमचा हिंग+१ चमचा जिरेपूड +१/२ चमचा ओवा घालून ३-४ दिवस प्या.
२)व्यवसाया निमित्त कायम ज्यांचा संपर्क उष्णतेशी येतो त्यांच्या आहारात कायम पडवळाची भाजी असायला हवी.
३)जाडी कमी करायची आहे पण उपाशी राहणे जमत नाही का?पडवळ २०० ग्राम+कुळीथ २० ग्राम एकत्र शिजवून सूप करून त्यात जिरे,दालचिनी,ओवा ह्यांची पूड मिसळून प्यावे.
४)कावीळ झालेल्या व्यक्तींच्या आहारात पडवळाची भाजी नियमीत ठेवावी.
५)अंगात उष्णता,हातापायांची आग होणे,चक्कर येते,संडासला साफ न होणे अशा तक्रारी मध्ये १०० ग्राम पडवळ+१० ग्राम काळ्या मनुका+२० ग्राम आवळकाठी यांचा काढा करून द्यावा.
कोवळा पडवळ खाण्याचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी!हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी हि रसरशीत जांभळे देखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घरकरून आहेत.मीठ लावून हि जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे म्हणजे एका अभूतपूर्व सुखांची अनुभूतीच जणू.
ह्याचा १०० फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने ३-६ इंच लांब भालाकार,स्निग्ध,चमकदार असतात.फुले हिरवी सफेद सुगंधित असतात.फळ १/२-११/२ इंच लांब ,अंडाकार असते.हे कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर जांभळे होते त्याच्या आत मोठी टणक बी असते.
जांभुळ हे चवीला तुरट,गोड,आंबट असते व थंड गुणाचे असते.त्यामुळे ते शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करते व वात दोष वाढविते.
जशी हि जांभळे खायला छान लागतात तसेच ह्यांचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.
१)अंगाची आग होत असल्यास जांभळाचा शिरका (अर्थात जांभळाचा आंबवलेला रस) तीळ तेलात मिसळून अंगाला लावावा.
२)डायबेटिस मध्ये रक्त व लघवीतील साखर नियंत्रणात ठेवायला जांभळाच्या बियांचे चुर्ण सकाळी व रात्री १-१ चमचा रिकामी पोटी घ्यावे.
३)जाभळाच्या कच्च्या फळाच्या रसात मीठ घालून गुळण्या केल्यास दातहलणे,हिरड्या सैल होणे,तोंड येणे,तोंडातून रक्त स्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
४)जुलाब होत असल्यास अथवा संडास मधून आव पडत असल्यास जांभळाच्या कच्च्या फळाचा रस १/२ कप + १ ग्लास ताक हे मिश्रण थोडे थोडे दिवसातून ३-४ वेळा प्यावे.
५)भुक न लागणे,तोंडाला चव नसणे,ह्यात पिकलेल्या जांभळाचा रस १ कप+ १ मोठा चमचा आल्याचा रस +१/४ चमचा काळी मिरीपूड हे मिश्रण २१ दिवस जेवणापुर्वी घ्यावे.
जांभळे खाण्याचा अतिरेक केल्यास बध्दकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते.
म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते.
लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही.
ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे कळते.
एका लिंबाचे आठ भाग केल्यावर त्यातील एक भाग पानावर वाढून घ्यावा. हे प्रमाण आहे. हवाच असेल तर जास्तीचा आणखी एक भाग. पण अर्धे किंवा एक लिंबू एकावेळी घेतले गेले तर ? आणि असे रोज !!! नक्कीच त्याचा त्रास होणार. असे अति करणारे रूग्ण अवस्थेत लवकर येतात. यासाठी ग्रंथांचा आणि व्यवहाराचा तौलनिक अभ्यास असणे महत्वाचा आहे.
आंबट चवीमुळे पोटातील पाचक स्राव वाढतात. चिंच आठवली तरी तोंडाला पाणी सुटते. साहाजिकच भूकही वाढते.
वाताला शरीराबाहेर यायला मदत करणारा असतो. याला अनुलोमक असे म्हणतात. पण हा आंबट रस पित्ताला आणि कफाला थोडा वाढवतोच. लिंबाचे सरबत घेतले तर काही जणांना पित्त वाढल्याचे जाणवते, तर काही जणांना पित्त कमी झाल्यासारखे वाटते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते ना ! आंबट अति झाले तर रक्तपित्तासारखे आजार वाढतात.
ह्रदयाला हितकर असा हा आंबट रस अन्नपदार्थांची चवही वाढवतो. वरणभातावर पिळलेले लिंबू आठवतेय ना किंवा झणझणीत मिसळीवर पिळलेले लिंबू. व्वा! लिंबाचा वास येण्यासाठी मात्र लिंबू ताजेच हवे.ताज्या लिंबाच्या सालीतून येणारा विशिष्ट तेलाचा वास हा पण औषधी असतो. त्याची स्वतःची अशी वेगळी चव लागते. वरणभात असो वा मिसळपाव लिंबाशिवाय तृप्ती होत नाही. पूर्णत्व नाही.
ह.
आंबट चव ही तृप्ती करणारी सांगितली आहे.
अति प्रमाणात आंबट चव ही नुकसान करणारी असते. पेशींमधली बंधने लवकर मोकळी करतो. सैल करतो. त्यामुळे शरीराचा घट्टपणा निघून जातो. तेलाने ओषट झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून, लिंबाच्या साली वापरल्या जायच्या. किंवा जेवताना हाताला लागलेला तेलाचा कट जाण्यासाठी लिंबाची फोड बोटांना चोळली जाते, ती याच गुणाचा आधार घेऊन !
अतिसर्वत्र वर्जयेत !
आवडते म्हणून रोज पाणीपुरी खाणे, आंबट साॅस खाणे, आंबट चीज खाणे, व्हिनीगर घातलेले सूप पिणे, बाजारी लोणचे खाणे, इ.इ. हे काही रोगलक्षणे वाढवतात, ते या आंबट चवीच्या अतिरेक केल्यामुळे !
जास्त आंबट खाल्ले जात असेल तर डोळ्यांचे आजार, घश्याचे जीभेचे आजार, ताप येणे, चक्कर येणे, खाज येणे, सूज येणे, रक्ताचे कमी होणे, किंवा रक्तासंबंधी आजार वाढतात. अंगावर उष्णतेचे फोड येणे, पित्ताचे व्याधी असतील तर जरा जास्तच खबरदार असावे.
पण घाबरून जायचे कारण नाही, या आंबट पदार्थांचा वापर युक्तीने केला तर फायदा होतो. त्या युक्तीसाठी वैद्याचा सल्ला घ्यायलाच हवा.
आवडत असेल तर आंबटगोड खावे, पण फार आंबटशौकीन नसावे
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
02.11.2016
नाम घ्या श्री हरीचे......
गजर करणे, जयजयकार करणे म्हणजे देवाचे नाव घेणे, त्याला हाक मारणे, आणि त्याला आपली सतत आठवण करून देणे.
या अन्नप्रार्थनेमधे खूप मोठा अर्थ सामावलेला आहे.
तू दिलेल्या वाचेने, तुझे नाम अगदी सहजपणे मी घेतोय, त्यासाठी कोणतेही मोल मला द्यावे लागत नाही. तुच दिलेले अन्न सेवन करतोय, पोटात ढकलतोय, आता पुढची जबाबदारी हे दयाघना, आता तू स्विकार !
कारण भगवंता, तूच गीतेमधे सांगितले आहेस,
अहं वैश्वानरो भूत्वां
प्राणीनां देहमाश्रितम ....
"*मीच* जठराग्नि आहे. चारही प्रकारचे अन्न मीचपचवतो. (तुम्ही फक्त माझ्यापर्यंत आणून पोचवा.) तुमच्या कर्मसिद्धांतानुसार मीच त्याचे योग्य ते फळ, योग्य त्या वेळी देणार आहे. आणि या मिळणार्या फळाची आसक्ती न ठेवता, तू तुझे कर्म केवळ कर्तव्य म्हणून करीत रहा."
तुझ्याशिवाय हे अन्न पचवणारा कोण आहे ? हा भाव मनी ठेवावा.
हे खरेच आहे.
आपण फक्त अन्न खातो. त्यापासून लाल रंगाचे रक्त तयार करणे, घट्ट असलेले मांस हाडे यांची निर्मिती करणे, मातृस्तनी पांढरे दूध निर्माण करणे, पाण्याच्या रंगाचे मूत्र बाहेर काढणे, इ. सर्व नियंत्रित करणारी एक शक्ती आहे,
(तिलाच आध्यात्मिक भाषेत ईश्वर आणि आयुर्वेदीय भाषेत अग्नि असे म्हणतात.)
आणि हे सर्व आपल्याच पोटात चालले आहे, याची साधी जाणीव सुद्धा आपल्याला नसणे हेच, त्याच्या अस्तित्वाचे लक्षण आहे. अदभुत यंत्र आहे हे शरीर ! म्हणूनच तर समर्थ म्हणतात, "या शरीरासारीखे दुसरे यंत्र नाही "
हे शरीर त्याने एवढे गुंतागुंतीचे बनवले आहे, पण प्रत्येक स्पेअर पार्टचे काम अगदी चोख.
कशासाठी हे अन्न मी सेवणार? याचा विचार अन्न घेत असताना व्हायला हवा. माझ्या आहाराने मला शक्ती मिळते आहे, आणि ही देहशक्ती मला देशभक्ती वाढवण्यासाठी वापरायची आहे, हेच माझ्यासाठीचे जीवन कर्म असेल,
उदरभरण नोहे म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर ही देवाला दिलेली जणुकाही आहुतीच आहे, माझ्या मीपणाची, अहंकाराची, आहुती मी या यज्ञात हवन करतोय, असा भाव निर्माण करणारी बुद्धी, याच अन्नातून निर्माण होणारी आहे, ती उत्तम गुणी बुद्धी फक्त तू मला दे ! हा देणारा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतःच अन्नरूप ब्रह्म आहेस !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
05.09.2016
ओवा आपण सर्वच जणांच्या परिचयाचा.तसेच भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात ह्याला एक वेगळे आणी महत्त्वाचे स्थान आहे.ओव्याचा वापर हा जेवणामध्ये फोडणीला,भजी बनवताना,ओव्याची कढी,अशा माफक पदार्थांमध्ये हा वापरला जातो.पण खरोखरच ओव्यामुळे त्या पदार्थांना एक वेगळी छान चव त्या पदार्थाला येते.तसेच ब-याच मंडळींना ह्याचे घरगुती औषधी प्रयोग माहीत देखील असणार.
ओव्याचे लहान क्षूप असते आणी त्याला लागलेली ही बारीक फळे असतात.ओवा चवीला तिखट कडवट असतो आणी उष्ण असतो.हा शरीरातील वात आणी कफ दोष कमी करतो पण पित्त वाढवितो.म्हणूनच पित्ताचा त्रास तसेच एॅसीडीटी मुळव्याधीचा त्रास असणा-यांनी ह्याचा वापर करू नये त्याचप्रमाणे उन्हाळयात ह्याचा वापर करू नये.
१)अजीर्ण आणी पोटदूखीचा त्रास होत असल्यास १ टीस्पून ओवा खाऊन त्यावर एक घोट गरम पाणी प्यावे.
२)जंतांचा त्रास वारंवार होत असल्यास विड्याच्या पाना सोबत ओवा खावा ही तक्रार लगेच कमी होते.
३)खोकला येत असल्यास ओवा आणी खडीसाखर हे मिश्रण विड्याच्या पानासोबत खावे.
४)पावसाळयात मधुमेह असणा-या व्यक्तींना वारंवार लघवी होते अशा वेळी १ चमचा ओवा + ४ चमचे बेलाच्या पानांचा रस हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.
५)४ चमचे ओवा + २ चमचे एरंडेल तेल तव्यावर परतून घ्या व त्याच्या पुरचुंडीने सांधेदुखी,मुरगळणे,मुकामार लागला असल्यास त्या भागावर शेकावे.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti