बाळक्रीडा अभंग क्र.३८

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ||१||
काय ऐसें पाप होते आम्हांपासी । बोलती एकासी एक एका ||२||
एकांचिये डोळा आसूं बाह्यात्कारी । नाहि ती अंतरी जळतील ||३||
जळतील एके अंतर्बाह्यात्कारे । टाकिलीं लेकुरे कडियेहुनि ||४||
निवांतचि एके राहिली निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ||५||
त्यांचे जीवावरी आले त्या सकळा । एका त्या गोपाळा वांचुनिया ||६||
वांचणें तें आता खोटे संवसारी । नव्हे भेटी जरी हरिसवे ||७||
सवे घेउनिया चाललीं गोपाळा । अवघीच बाळा नर नारी ||८||
नर नारी नाहीं मनुष्याचे नांव । गोकुळ हे गांव सांडियेले ||९||
सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनी जाती ||१०||
तिरी माना घालुनिया उभ्या गाई । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ||११||
यमुनेच्या तिरी झाडे वृक्ष वल्ली । दुःखे कोमाईलीं कृष्णाचिया ||१२||
यांचे त्यांचे दुःख एक झाले तिरी । मग शोक करी मायबाप ||१३||
मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरीच तीर न पवतां ||१४||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author