चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणे बरीं नाहीं म्हूण ॥२॥
न संपडे इंद्र चंद्र ब्रम्हादिकां । अभिमाने एका तिळमात्रे ॥३॥
तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसी । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यांसी करिती यातना । नाही नारायणा भजले जे ॥७॥
जे नाही भजले एका भावे हरि । तया दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तया दोषियांसी । का रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हा कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगती । न धराच चित्ती सांगितले ॥११॥
सांगितले संती तुम्हा उगवूनि । गर्भासी येऊनि यमदंड ॥१२॥
दंडू आम्ही रागे म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा येणे करूनि संहार । पूर्ण अवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामे रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्या ॥१५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.७
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.