तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळतां दिवस गमे ॥१॥
दिवस राती काही नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखें नये डोळीयांसी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥३॥
तटस्थ राहिले सकळ शरीर । इंद्रिये व्यापार विसरली ॥४॥
विसरल्या तान भुक घर दार । नाही हा विचार असों कोठें ॥५॥
कोठे असो कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥
एक जाल्या तेव्हा कृष्णाचिया सुखे । निःशंक भातुकें खेळतील ॥८॥
खेळती भातुके कृष्णाच्या सहित । नाही आशंकित चित्त त्यांचे ॥९॥
चित्ती तो गोविंद लटिके दळण । करिती हे जन करी तैसे ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनिया ॥११॥
करूनीं आपला वघा गोविंद । जना साच छंद लटिका त्या ॥१२॥
त्यांनी केला हरि सासुरे माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥
भावना राहिली एकाचियां ठायी । तुका म्हणे पायी गोविंदाचे ॥१४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.१६
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.