चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी | प्रवेश भीतरी केला देवें ||१||
देव आला घरा नंदाचिया गांवा | धन्य त्याच्या दैवा देव आले ||२||
आले अविनाशी धरुनी आकार | दैत्यांचा संहार करावया ||३||
करावया भक्तजनांचें पाळण | आले रामकृष्ण गोकुळासी ||४||
गोकुळी आनंद प्रगटलें सुख | निर्भर ते लोक घरोघरी ||५||
घरोघरी झाला लक्षुमीचा वास | दैन्य दारिद्र्यास त्रास आला ||६||
आला नारायण तयांच्या अंतरा | दया क्षमा नरा नारीलोकां ||७||
लोकां गोकुळींच्या झाले ब्रम्हज्ञान | केलियावांचून जपतप ||८||
जपतप काय करावी साधनें | जे त्या नारायणें कृपा केली ||९||
केली नारायणे आपुली अंकित | तोचि त्यांचे हित सर्व जाणे ||१०||
सर्व जाणे एक विष्णू साच खरा | आणिक दुसरा नाहीं नाहीं ||११||
नाहीं भक्ता दुजे तिहीं त्रिभुवनी | एका चक्रपाणिवांचुनी त्यां ||१२||
त्याच्या सुखासंगे घेती गर्भवास | तुका म्हणे आस त्यजुनियां ||१३||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
बाळक्रीडा अभंग क्र.३
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.