जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच देश – विदेशांत असंख्य मैफिली सादर करुन नावलौकीक प्राप्त केला. आपले गुरु कै. पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन श्री. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले आहे. जे अजूनही अविरत चालू आहे. गेले अनेक वर्षे ते विद्यादान करत असून त्यातील काही विद्यार्थ्यांनी संगीतातील उच्च पदव्या प्राप्त केल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठीसृष्टी
सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले.
नाशिक येथील रहिवासी असलेले कुलकर्णी तेथील स्थानिक परिसरात त्यांच्या विविध वैद्यकीय कौशल्यांसाठी व रोगांच्या अचुक निदानासाठी वाखाणले गेलेले आयुर्वेदिक तज्ञ आहेत.
अँटनी विल्यम टोनी ग्रेग उर्फ टोनी ग्रेग यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. सहा फूट सहा इंच उंची असलेले टोनी ग्रेग यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील क्वीन्सटाऊन येथे झाला होता. टोनी ग्रेग यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. परंतु, वडील स्कॉटलंडचे असल्यामुळे टोनी ग्रेग इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. ग्रेग यांनी अष्टपैलू कामगिरी करताना ५८ कसोटींत ४०.४३ सरासरीने ३ हजार ५९९ धावा केल्या. तसेच मध्यमगती आणि ऑफब्रेक मारा करत १४१ विकेट्स टिपल्या. मात्र २२ वनडेच त्यांच्या वाटय़ाला आल्या. टोनी ग्रेग यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने १९७६-७७ मध्ये भारताचा दौरा केला. त्यावेळी पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्या तीन कसोटी मोठ्या फरकाने इंग्लंडला जिंकून देण्यात ग्रेग यांचे मोलाचे योगदान राहिले. कर्णधार म्हणून भारताचा यशस्वी दौरा रहिला.
सर्वोत्तम कामगिरी करूनही वर्ल्ड सिरिज क्रिकेटमुळे टोनी यांची इंग्लंडसाठीची कारकीर्द केवळ पाच वर्षाची राहिली.
वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी ग्रेग यांनी अनेक आघाडीच्या आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटूंनाही वळवून घेतले. यामुळे संबंधित क्रिकेट बोर्डाच्या टीकेचे ते लक्ष्य बनले. वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळल्याने टोनी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही संपुष्टात आली. वर्ल्ड सिरिज बंद झाल्यानंतर ग्रेग ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांनी कारकीर्द संपविल्यानंतर समालोचक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली.
समालोचक म्हणून त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. क्रिकेटचा चांगला अनुभव तसेच रोखठोक स्वभावामुळे ऑस्ट्रेलियाच्या ‘चॅनेल नाइन’मधून तब्बल ३३ वर्षे क्रिकेट समालोचन केले. खेळादरम्यान काही मजेशीर प्रसंग घडला की, ग्रेग यांच्या खोचक समालोचनाने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध व्हायचे. मैदानावरील अंपायर्सच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याच्या (डीआरएस) प्रणालीला विरोध केल्यानंतर ग्रेग यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. टोनी ग्रेग यांचे निधन २९ डिसेंबर २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी लेखिका आणि कवयित्री. कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांच्या पत्नी व ‘स्मृतिचित्रकार’ लक्ष्मीबाई टिळक यांचा जन्म १ जून १८६६ रोजी झाला.
लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतिचित्रे' या अभिजात, अजरामर आणि श्रेष्ठ आत्मचरित्रातील एक अतिशय वेगळ्या प्रकारचे, विरोधाभासाने गुंफलेले लक्ष्मीबाईंचे आयुष्य त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रातून समाजासमोर आले आणि ‘युद्धस्थ कथा रम्या’ पद्धतीने लिहिलेले त्यांच्या स्मृतिचित्रातील एक एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिऱ्या रंगाने रंगलेले साऱ्यास महाराष्ट्राच्या मनावर विराजमान झाले. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव मनकर्णिका नारायण गोखले असे होते. वयाच्या ६ व्या वर्षी १८७९ मध्ये त्यांचे लग्न नारायण वामन टिळक यांच्याशी झाले, आणि मनकर्णिका गोखले झाली लक्ष्मी टिळक. १८९५ मध्ये टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. प्रथम ह्या घटनेने लक्ष्मीबाईंना धक्का बसला, तरी त्यानंतर ५ वर्षांनी त्यांनीही पतीप्रमाणेच, ख्रिस्ती धर्मावर खरीखुरी श्रद्धा बसल्यानंतर, डोळसपणे तो धर्म स्वीकारला.
लक्ष्मीबाईंचे शिक्षण केवळ लिहिण्यावाचण्यापुरतेच झालेले होते. तथापि जीवनातील दुःखांना आणि ताणतणावांना तोंड देत असताना त्यांच्यातील सुप्त कवित्वशक्ती प्रथम उत्स्फूर्तपणे प्रकट झाली. त्यांची पहिली कविता टिळक धर्मांतर करणार, असे समजल्यानंतरच्या वेदनेतून लिहिली गेली आहे. पुढे काव्यरचनेसाठी टिळकांचे उत्तेजनही त्यांना मिळत गेले. रेव्हरंड टिळकांनी ओवीवृत्तात लिहावयास घेतलेले ख्रिस्तायन हे प्रदीर्घ काव्य पूर्ण करण्याचे काम लक्ष्मीबाईंनी रेव्हरंड टिळकांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी हाती घेऊन तडीस नेले. एकूण ७६ अध्यायांच्या ह्या काव्यातील पहिले सु. १०।।• अध्याय रेव्हरंड टिळकांचे असून सु. ६४।। अध्याय लक्ष्मीबाईंचे आहेत. त्यामुळे ह्या काव्याचे बहुतांश कर्तृत्व लक्ष्मीबाईंकडेच जाते. एवढी दीर्घ आख्यानक रचना करणाऱ्या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत.
त्यांची स्फुट काव्यरचना भावगीतात्मक असून भरली घागर (१९५१) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. संसारातील सुखदुःखांचा, उत्कट ईश्वरनिष्ठेचा सहजाविष्कार तीत आढळून येतो. बालगीते, देशभक्तिपर गीते अशीही काही रचना त्यांनी केलेली असून तीही ह्या काव्यसंग्रहात अंतर्भूत आहे. तथापि ज्या ग्रंथामुळे लक्ष्मीबाईंचे नाव मराठी साहित्यसृष्टीत अजरामर झाले, तो त्यांचा ग्रंथ म्हणजे स्मृतिचित्रे. हा चार भागांत असून त्याचा पहिला भाग १९३४ साली, दुसरा १९३५ साली आणि तिसरा व चौथा १९३६ साली प्रसिद्ध झाले.
लक्ष्मीबाईंचे पुत्र देवदत्त ह्यांनी लिहावयास घेतलेल्या रेव्हरंड टिळकांच्या चरित्रासाठी केवळ सामग्री पुरविण्याच्या हेतूने लक्ष्मीबाईंनी आपल्या आठवणी लिहून काढावयास प्रारंभ केला. पुढे श्रीपाद कृष्णांना त्यांचे जमात आणि देवदत्तांचे स्नेही भा. ल. पाटणकर ह्यांच्याकडून लक्ष्मीबाईंच्या ह्या लेखनाची वार्ता समजली. पाटणकारांकडून ह्या आठवणी वाचून घेतल्यानंतर त्या प्रकाशात आल्याच पाहिजेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्ती केली. श्रीपाद कृष्णांचे पुत्र प्रभाकर कोल्हटकर ह्यांच्या संजीवनी ह्या पाक्षिकातून स्मृतिचित्रे प्रथम प्रसिद्ध झाली.
लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांची निर्मिती आत्मप्रेमातून झालेली नाही. जाणीवपूर्वक एखादी साहित्यकृती निर्माण करण्याची इच्छाही ह्या लेखनामागे नव्हती. तथापि लक्ष्मीबाईंच्या जीवनातील नानाविध अनुभवांचे कडूगोड सौंदर्य त्यातून सहजगत्या व्यक्त झाले. स्मृतिचित्रांची अकृत्रिम भाषाशैली, त्यांतून प्रत्ययास येणारी वृत्तीची निरागसता, मानवतेवरील नितांत प्रेम आणि श्रद्धा, स्वतःलाच हसणारी आणि स्वतःबरोबरच सभोवतालच्यांना सदैव प्रसन्न ठेवणारी लोकविलक्षण, मिस्किल विनोदबुद्धी ह्या सर्वच गोष्टींची मोहकता कधीही न कोमेजणारी अशी आहे. व्यक्ती, प्रसंग एवढेच नव्हे तर एक संपूर्ण कालखंड जिवंतपणे वाचकांसमोर उभा करण्याचे सामर्थ्य स्मृतिचित्रांच्या पानापानांत आहे.
शालेय शिक्षणाचा संस्कार न झालेल्या लक्ष्मीबाई यांनी एका अत्यंत सुसंस्कृत मनाने आपल्या विवाहपूर्व व विवाहोत्तर आठवणी लिहावयास घेतल्या खऱ्या्; परंतु प्रत्यक्षात त्या आठवणींचे स्वरूप असे झाले आहे, की त्यांची व्याप्ती ह्या सीमित जीवनापुरती मर्यादित न राहता त्यांतून अगदी स्वाभाविकपणे प्रकट होत गेले आहे, ते विविधरंगी, विविधढंगी मानवतेचे चित्र. आत्मचरित्रात्मक लेखन आपली मूळ प्रकृती न सोडता श्रेष्ठ कालकृतीच्या पातळीवर कसे पोहोचू शकते, ह्याचे मराठीतील एकमेव उदाहरण म्हणजे लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे.
१९३३ मध्ये नागपूर येथे भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याच वर्षी नाशिकच्या कविसंमेलनाचे त्यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले. १९३५ मध्ये आचार्य अत्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली नासिक शहरात त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. त्यांचे पुत्र देवदत्त टिळक ह्यांनी मराठीत दर्जेदार बालसाहित्यनिर्मिती केली आहे.
लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर ख्रिस्तायनाचा अखेरचा – ७६ वा–अध्याय त्यांनी लिहिला तसेच स्मृतिचित्रांच्या चौथ्या भागातील १२ ते २० ही नऊ प्रकरणे लिहून लक्ष्मीबाईंच्या निधनापर्यंतचा वृत्तांत दिला, टिळक दांपत्याच्या पुस्तकांचे साक्षेपी संपादनही केले. ज्ञानोदयाचेही ते अनेक वर्षे संपादक होते.
लक्ष्मीबाई टिळक यांचे २४ फेब्रुवारी १९३६ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत.
शांता शेळके यांची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत असत. ‘नवयुग’मध्ये त्या काम असताना मा.अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली. मा.शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या अनेक गीतांतून व्यक्त केल्यात. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे.
जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या मा.शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलानाच्या त्या अध्यक्षा होत्या. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गीतांचे लावण्या, कोळीगीते असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले.
शांता शेळके यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शांता शेळके यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=cjmmEnmf5IQ
चुकवू नये अशा शांता शेळके यांच्या वरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमाची लिंक
https://www.youtube.com/watch?v=Uu2aB9LY-AE&list=PLqhKd63J-s6FKAZgFh9i9EdWtfdRgmH0n
https://www.youtube.com/watch?v=nPvJrSERxXA
https://www.youtube.com/watch?v=MYdiWHCAvUQ
https://www.youtube.com/watch?v=g7MDSoFFJxQ
https://www.youtube.com/watch?v=2xA9mMiEO6g
https://www.youtube.com/watch?v=QJCggfj3gRs
https://www.youtube.com/watch?v=XSUlZIQxPWI
https://www.youtube.com/watch?v=ORaa2x980fY
https://www.youtube.com/watch?v=6CF8BWBj5WI
https://www.youtube.com/watch?v=5paqPYi6sM4
https://www.youtube.com/watch?v=iSGWoHWcZmw
हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !
कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते… ‘ भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला’ या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता.
आपल्याला जरी त्या फक्त 'हेलन' म्हणून माहीत असल्या तरी त्यांचे पूर्ण नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे व त्या जन्माने अॅग्लो बर्मीज. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ रोजी बर्मा मध्ये झाला. ती बॉलिवुड मध्ये त्यांच्या अनेक विवीध भुमिकांमुळे व विशेष करून नृत्याविष्कारामुळे 'हेलन' या भरपूर गाजल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनच्या आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलन यांनी शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यांची एक कुटुंब स्नेही अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायच्या, त्यांच्या ओळखीने हेलन यांना अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले.
हेलनचं अॅंग्लो व बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. त्या काळी आयटम नंबरसाठी ओळखल्या जाणा-या हेलन यांनी हावडा ब्रिज या सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या 'भारतीय नारी रोल'च्या विरूद्ध बऱ्याचदा 'हायलायटींग' म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या 'लिडींग' हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलन यांना खरे नाव व प्रसिद्धी ही त्यांच्या अनेक 'व्हॅम्प' व 'निगेटिव्ह' रोल्सनीच दिली. हेलन या त्यांच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होत्या. रस्त्यावरून जाताना त्यांना कधीही उघड चेहऱ्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. १९५८ च्या 'मेरा नाम चिं चिं चू' पासून ते १९७० च्या दशकातील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत हेलन यांनी चित्रपटसृष्टीवर 'कॅब्रे क्विन' म्हणून अधिराज्य गाजवले.
१९७० च्या दशकात नवीन प्रवेश झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलन यांची प्रसिद्धी बरीच खालावली व त्या आर्थिक अडचणीतही सापडल्या. त्या वेळी त्यांना साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची. जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलन यांना चांगली भूमिका देऊ केली. हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात गाणाऱ्या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. 'मेरा नाम चिं चिं चू' व इतर बरीच गाणी गीता दत्त यांनी, तर साठ च्या दशकात व सत्तर च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. 'तिसरी मंझिल' चित्रपटातील 'ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ...' हे गाणं 'रॉक अॅलन्ड रोल' या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त 'शोले' चित्रपटातलं "मेहबूबा मेहबूबा..." 'इन्तेकाम' मधलं "आ जानेजा...पुढे त्या सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात. हेलन यांच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे. भारत सरकारने मा.हेलन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गदीमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही तीन चित्रकथा ही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहे. युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. गदीमा हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या चित्रपटकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी होत्या. गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदीमा यांचीच. गदिमांचा उल्लेख कोणी महाकवी असा केला, की ते गमतीने म्हणत असत- अहो, मी महाकवी नाही, महाकाय कवी आहे! त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया, शशांक गिरडकर
Copyright © 2025 | Marathisrushti