(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी

    बालमजुरी आणि लहान मुलांची वाहतूक रोखण्याचे उद्दिष्ट ठेवून; तसेच सर्व मुलांना शिक्षण हे ध्येय ठेवून ‘बचपन बचाव संस्थे’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालकामगारांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने रग उत्पादक कंपन्यांमधील बालमजुरांचा समावेश आहे.

  • जेष्ठ समाजसेवीका रमाबाई रानडे

    रमाबाईंच्या जन्माला आज १५५ वर्षं झाली. त्यांचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी झाला व निधनालाही ९३ वर्षं होऊन गेली. पण अजूनही,‘सेवासदन’ म्हणले की रमाबाई रानडे यांना आपण विसरू शकत नाही. एकोणिसाव्या शतकात झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक, मादाम कामा, भगिनी निवेदिता अशा कर्तृत्ववान स्त्रिया जन्माला आल्या. त्यामध्ये रमाबाई रानडे यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. एक मध्यमवर्ग ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतलेली मुलगी आपल्या कर्तृत्वाने सर्व भारतभर प्रसिद्ध पावली. सातारा जिल्ह्य़ातील देवराष्ट्रे गावाचे जहागीरदार माधवराव कुर्लेकर हे रमाबाईंचे वडील. मा.रमाबाईंचे माहेरचे नाव यमुना. मुलगी मोठी म्हणजे साधारण १० वर्षांची झाल्यानंतर कुर्लेकर यमुनेला पुण्यास घेऊन आले. एखाद्या सुप्रसिद्ध घराण्यातील बुद्धिमान व इंग्रजी विद्येत प्रवीण असलेला वर मिळवावयाचा अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. अण्णासाहेब कुर्लेकर व गोविंदराव रानडे यांचा पूर्वीपासूनच परिचय होता. त्याच सुमारास माधवराव विधुर झालेले आहेत आणि गोविंदराव त्यांच्यासाठी मुली पाहात आहेत हे अण्णासाहेबांना समजले. वास्तविक माधवराव त्यावेळी ३१ वर्षांचे व यमुना ११ वर्षांची होती. अण्णासाहेबांनी गोविंदरावांची भेट घेतली व आपली मुलगी पाहण्याची विनंती केली. मुलगी पसंत पडली. पण माधवराव लग्नाला तयार नव्हते. ते विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते व एखाद्या विधवेशी लग्न करावयाचे त्यांच्या मनात होते. पण वडिलांनी हे लग्न झाले नाही तर तुमचा आमचा संबंध सुटला व मी करवीरास कायमचा निघून जाईन, असे निक्षून सांगितले. त्यामुळे माधवरावांना नाइलाजाने संमती द्यावी लागली व मार्गशीर्ष शुद्ध एकादशी (डिसेंबर १८७३) रोजी गोरज मुहूर्तावर लग्न झाले. माधवरावांनी कुठलाही समारंभ होऊ दिला नाही. ते आटोपल्यावर रात्री १०-३० वाजता माधवराव व रमाबाई दोघेही पायी चालत आपल्या घरी आले. घरी आल्यावर कोणाशी न बोलता माधवराव आपल्या खोलीत गेले व आत कडी लावून बसले. लग्नानंतर दोन-तीन दिवसांनी कोर्टातून आल्यावर माधवरावांनी रमाबाईंना गच्चीवर बोलावून घेतले व रमाबाईंना जाणून घेण्याकरिता विचारले. आपले लग्न झाले आहे, पण मी कोण आहे, माझे नाव काय हे तुला माहीत आहे का? रमाबाईंनी मानेनेच हो म्हणून सांगितले.

    मग सांग बघू. रमाबाईंनी सांगितले ‘महादेव गोविंद रानडे सदर अमीन. हे ऐकल्यानंतर पहिल्या भेटीत रमाबाईंच्या मनाची अकृत्रिमता, धीटपणा व तरतरीतपणा माधवरावांच्या लक्षात आला. त्यानंतर माहेरची चौकशी केली व लिहिण्याविषयी चौकशी केली. रमाबाईंना अक्षरओळखही नव्हती. त्याच रात्री त्यांनी एक पाटी-पेन्सिल आणली व रमाबाईंना ‘श्रीगणेशाय नम:’ लिहिण्यास शिकवले. रमाबाईंनी अक्षरे गिरवून दोन तासांत पक्की केली. दुसऱ्या दिवसापासून ते रोज रात्री दोन तास शिकवत असत. पंधराव्या दिवशी त्यांनी क्रमिक पुस्तकातील धडा वाचून दाखवला. त्यानंतर माधवरावांनी त्यांना व्याकरण, गणित, मोडी लेखन शिकवले. मध्यंतरी एक शिकवणी ठेवली होती. पण त्यात प्रगती दिसली नाही. म्हणून त्यांनी फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेतील पोक्त अनुभवी सगुणाबाई देव यांना शिकवण्यास ठेवले. १८७५ पर्यंत पाचवीपर्यंतच्या अभ्यासाची तयारी झाली. १८८१ मध्ये माधवरावांची असिस्टंट स्पेशल जज्ज या जागेवर बदली झाली व त्या निमित्ताने त्यांना फिरतीवर जावे लागणार होते म्हणून त्यांनी रमाबाईंना शिकवण्यास वानवडीच्या झनाना मिशनमधील मिस हरफर्ड यांची शिकवणी ठेवली. त्या रोज दोन ते साडेतीन त्यांना इंग्रजी शिकवीत. त्या शिकवून गेल्यानंतर रमाबाई वस्त्रांतर करून घरात काम करावयास गेल्या तेव्हा अक्कांनी ताकीद दिली, ‘मडमेला शिवल्यानंतर अंग धुवायचे नसले तर माडीवरच बसून राहा.’ त्यानंतर रमाबाई शिकवणीनंतर विहिरीवर जाऊन स्नान करत. पण काही दिवसांनी त्यांना ताप येऊ लागला. ही हकीकत माधवरावांना कळविण्यात आली. माधवरावांनी रमाबाईंना हरफर्डबाई शिकवून गेल्यावर स्नान करण्याचे कारण नाही असे कळवले. आक्कांनी निरोप पाठवला. आडावर अंग धुऊन आमच्याभोवती दुखणी आणू नको. तुम्ही हव्या तशा नाचा! रमाबाई जात्याच हुशार असल्यामुळे आठ-नऊ वर्षांत शिक्षण संपादन करून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत एवढी प्रतिष्ठा मिळविली की १८८२-८३ मध्ये म्हणजे वयाच्या २०व्या वर्षी फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकून मास्तरीण होण्याकरिता स्त्रियांची निवड करण्याकरिता लेडी सुपरिंटेंडंटना सहाय्य करण्याकरिता शिक्षण खात्याने जी कमिटी नेमली होती तीमध्ये सरकारने रमाबाईंना सभासद म्हणून घेतले. या कमिटीचे इतर सभासद महादेवराव रानडे, प्रो. भांडारकर, प्रा. केरुनाना छत्रे, आ. मोडक व कृ. ल. नुलकर होते. व मा.रमाबाई एकटय़ाच स्त्री सभासद होत्या. विल्यम वेडरबर्न हे सिव्हिल सव्‍‌र्हिसमध्ये सनदी नोकर. त्यांना १०,००० रुपये शिक्षणाच्या कामासाठी देणगी द्यायची होती. ही रक्कम सरकारी नॉर्मल फीमेल क्लासला देण्याचा त्यांचा विचार होता. त्यांनी माधवरावांना यासंबंधी विचारले. पण माधवरावांनी त्या रकमेत आणखी काही हजारो रुपयांची रक्कम जमा करून मुलींसाठी पुण्यात हायस्कूल सुरू करण्याचे ठरविले आणि समाजाच्या सर्वधर्मीयांची सभा घेतली. त्यात वेडरबर्नदेखील होते. तसेच इतर ब्रिटिश अधिकारी, पाच सहा संस्थानिक मिळून २ ते ३ हजार समुदाय उपस्थित होता. सभेस त्यावेळचे गव्हर्नर सर जेम्स फग्र्युसन यांच्यापुढे मुलींसाठी हायस्कूलची मागणी करण्याचे ठरले होते. त्याकरिता त्यांनी एक छोटेसे निवेदन इंग्लिशमध्ये लिहिले व ते सभेत वाचण्यासाठी रमाबाईंना देऊन त्यांची तयारी करून घेतली. रमाबाईंनी धैर्याने ते निवेदन इंग्लिशमधून वाचले. ही बातमी घरच्या बायकांच्या कानावर गेली. त्यांचा जळफळाट झाला. पण माधवरावांनी रमाबाईंना धीर देऊन त्यांना शांत राहण्यास सांगितले. कोणी कितीही बोलले तरी उलट उत्तर द्यावयाचे नाही. ‘मी तुला आहे ना’ असे म्हणून धीर दिला. पंडित नेहरूंची आई स्वरूपराणी नेहरू यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील अलाहाबाद येथील स्त्रियांच्या सभेत ही सभा सक्तीचे शिक्षण फक्त मुलांपुरते मर्यादित ठेवते व त्यांत मुलींना वगळण्यात येते, या योजनेचा निषेध करते असा ठराव पास करून तारेने रमाबाईंना कळवला. त्याअगोदर माधवराव यांची बदली नाशिक येथे झाली असताना तेथे वेळ भरपूर असल्याने जवळ असलेली एक बाग विकत घेऊन रमाबाईंनी भाज्या, फुलझाडे व फळझाडे लावली. जरुरीपुरत्या लागणाऱ्या भाज्या व फुले, फळे ठेवून उरलेल्या भाज्या, फळे, फुले गडय़ांबरोबर विकण्यास पाठवत. येणारी रक्कम बागेच्या खात्यात जमा करीत. याच वेळेस तेथे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी हे जॉईंट जज्ज होते. एक म्हणजे या दोघांनी नाशिक येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. रमाबाई व लोकहितवादी यांच्या पत्नी गोपिकाबाई गावातील बायकांना तेथे हळदी-कुंकवासाठी बोलवत व त्यांना प्राचीन साध्वी स्त्रियांची चरित्रे वाचून दाखवत व त्यांचे शिक्षणाकडे मन वळवण्याचा प्रयत्न करीत. नाशिक येथे शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर बक्षीस समारंभ व्हावयाचा होता तेथे ठाण्याचे मिस्टर कांगलन व मिसेस कांगलन आले होते व त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार होता. रमाबाईंनी गावातल्या बायकांना आमंत्रणे दिली. ५०-६० बायका उपस्थित होत्या. मुलींना थोडासा उपदेशपर मजकूर रमाबाईंनी वाचून दाखवला. त्यानंतर डेप्युटीने हारतुऱ्यांचे तबक रमाबाईंकडे दिले. एक हार रमाबाईंनी कांगलन यांना घातला नंतर त्यांच्या बहिणीला व आईलासुद्धा एकेक हार घातला. उरलेला हार तसाच तबकांत ठेवला व कांगलन यांना घालण्याचे नाकारले. शेवटी तो हार रा. व. देशमुखांनी कांगलनसाहेबांना घातला. माधवरावांनी त्यांना रात्री विचारले असता त्यांनी उत्तर दिले, ‘‘मी हिंदू नसते तर त्यांना हार घातला असता.’’ १८८१ मध्ये माधवरावांची बदली मुंबई प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून झाली. मुंबईत आल्यानंतर रमाबाई प्रार्थना समाजात भरणाऱ्या स्त्रियांच्या सभेला नियमितपणे जात. पुढील तीन महिन्यांत त्यांनी सभेपुढे दोन निबंध वाचले. पहिला- ‘स्त्रियांना अवश्य विद्या कोणती?’ आणि दुसरा- ‘स्त्रियांचे संसारातील कर्तव्य.’ विद्या म्हणजे ज्ञान. आईस जर ज्ञान नसेल तर किंवा चांगले शिक्षण नसेल तर मुलास कोठून येईल? मूल चांगले किंवा वाईट निपजणे हे आईच्या शिक्षणावर अवलंबून असते, हे त्यांनी आवर्जून सांगितले. एप्रिल १८८१ मध्ये पुण्यास सदर अमीन नेमणूक झाली. तेथे फीमेल ट्रेनिंगच्या कॉलेजच्या दिवाणख्यान्यात दर शनिवारी स्त्रियांची सभा भरू लागली. दहा-बारा बायका येत. या सभेत प्रा. छत्रे भूगोल, खगोलासंबंधी माहिती, आकृती फळ्यावर काढून चंद्र-सूर्य ग्रहणे वगैरेची माहिती देत. माधवरावांच्या निधनानंतर रमाबाई पुण्यास आल्या व १९०२ मध्ये आपल्या वाडय़ात ‘हिंदू लेडीज सोशल क्लब’ ही हिंदू स्त्रियांची संस्था आनंदीबाई भट यांच्या साहाय्याने चालू केली. संस्थेचा उद्देश स्त्रियांमध्ये ज्ञानप्रसार करून सामाजिक कर्तव्याची जाणीव उत्पन्न करणे हा होता. साप्ताहिक व्याख्यानांना पाऊणशे स्त्रिया येऊ लागल्या. क्लबने दुपारी तीन ते पाच व दोन-पाच असे मराठी व इंग्रजीचे वर्ग चालू केले. त्याचबरोबर धार्मिक ग्रंथ वाचण्याचे, शिवण कामाचे व फर्स्ट एडचे वर्ग चालू केले. १९०३ मध्ये लेडी नॉर्थकोट यांचा क्लबमधील स्त्रियांशी परिचय करून दिला. त्यानंतर १९०४ मध्ये मुंबईत ‘आद्य भारत महिला परिषद’ भरवली. त्यावेळेस भारतातील सर्व प्रांतातून स्त्रिया आल्या होत्या. पाश्चात्त्य देशातील सेवा वृत्तीने, आयुष्य काढणाऱ्या सेविकांचा-मिस्टर्सचा आदर्श आपण भारतीय स्त्रियांनी आपल्यापुढे ठेवावा, असे प्रतिपादन रमाबाईंनी केले. सेवासदनाची स्थापना मुंबईत १२ जुलै १९०८ मध्ये व पुण्याची शाखा १९०९ मध्ये २ ऑक्टोबर रोजी केली. सेवासदन संस्थेचे उपनाव ‘सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी’ असे होते. पुण्याच्या शाखेचे कार्य खूप विस्तृत व विविध प्रकारचे होते. १९१२ साली सेवासदनने न्या. रानडे यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ ४००० रु. जमवले. त्यापैकी १००० रु.च्या व्याजातून अलेक्झांड्रा गर्ल्स स्कूल व १५०० रु. व्याजातून स्टुडन्ट्स लिटररी सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीस न्या. रानडे यांच्या नावाने दरसाल बक्षिसे देण्याची सोय केली. शिवाय पंढरपूरच्या बालकाश्रमास ५०० रु. व हिंगण्याच्या अनाथ बालिकाश्रमातील विद्यार्थिनींसाठी एक लहानसा दिवाणखाना बांधून दिला. १९०९ मध्ये फेब्रुवारी ते जूनदरम्यान २४ व्याख्याने आयोजित केली. त्यात प्रामुख्याने गो. कृ. देवधर, न. चिं. केळकर, महर्षि कर्वे अशी मातब्बर मंडळी होती. याशिवाय स्वामी विवेकानंदाच्या दोन शिष्यांना (इंग्लिश व अमेरिकन) क्लबमध्ये बोलावून त्यांची वेदान्तावर व हिंदू धर्मावर भाषणे झाली. रमाबाईंनी पहिली पाच वर्षे आपल्या वाडय़ातील जागा सेवासदनसाठी मोफत दिल्याचा शिवाय स्वत:चे ५००० रु. इमारत फंडाला देणगी दिल्याचा उल्लेख आहे. लेडी वेलिंग्डन तेथे आल्या असताना देवधर यांनी ‘मिसेस रमाबाई हॅज बीन द गायडिंग स्पिरिट अँड गार्डियन एंजल ऑफ सेवासदन’ असे त्यांना सांगितले.

    १९०४ मध्ये मुंबई इलाख्याच्या सरकारकडून येरवडा येथील तुरुंगाच्या बिनसरकारी मानद अधीक्षक होण्याचे आपण मान्य कराल का? असे रमाबाईंना पत्राने विचारण्यात आले. रमाबाईंनी ते मान्य केले. रमाबाई स्त्री कैद्यांना वारंवार भेटत. त्यांची आस्थेने चौकशी करीत. एका भेटीत त्यांनी संत तुकाराम व नामदेव यांच्या अभंगांपैकी एक-दोन सोपे अभंग म्हणून त्याचा अर्थ त्यांना समजावून सांगितला. त्यांच्याजवळ असलेल्या मुलाबाळांची चौकशी करत व त्यांच्या अडचणी सोडविण्यास मदत करीत असत. १९०७ मध्ये रमाबाईंनी येरवडय़ाच्या सुपरिंटेंडंटला पत्र लिहून स्त्री कैद्यांबरोबर राहू दिलेल्या बालकांना विशेषत: सणाच्या दिवशी फळे व पक्वान्ने आणून देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुपरिंटेंडंटने आमची हरकत नाही असे कळवले.

    तेव्हापासून रमाबाई पाडवा, दसरा, दिवाळी वगैरे प्रमुख सणांच्या वेळी आपल्या घरी स्वत:च्या देखरेखीखाली लाडू, करंज्या वगैरे पक्वान्ने करवून घेऊन ती त्या कारागृहातील बालकांसाठी पाठवू लागल्या. हा त्यांचा नियम आयुष्याच्या अखेपर्यंत चालू होता. १९१३-१४ मध्ये परवानगीने दर शुक्रवारी सकाळी ८।। ते ९।। स्त्री कैद्यांना शिकवण्यास जात. सुरुवात ३-४ स्त्रियांनी झाली. तीन-चार महिन्यांत रमाबाईंचा शिष्यवर्ग वाचू व लिहू लागला. मुंबई इलाख्यात मुलींसाठी पहिले हायस्कूल स्थापन करण्याचा मान मुंबई शहरास न मिळता पुण्यास १८८४ मध्ये हुजूरपागेच्या स्थापनेमुळे मिळाला. १८८४ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात ‘हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल्स’ या नावाने मुलींचे हुजूरपागा हायस्कूल चालू झाले. मुंबईत यापूर्वी अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूल सुरू झाले होते. पण त्यात मुख्यत: धनिक पारशी, ख्रिश्चन व हिंदू मुली शिकत. १८८५ नंतर स्त्री शिक्षणेच्छू लोकांच्या मनात देणगीचा रूपाने फंड जमवून हिंदू मुलींसाठी हायस्कूल स्थापन करण्याचा विचार मूळ धरू लागला. न्या. रानडे यांचे स्नेही सॉलिसिटर नानू कोठारे. यांचे पक्षकार चंदारामजी ठक्कर हे एक होते. चंदारामजींचे निधन १८९५ मध्ये झाले. त्यांच्या लोहानी ट्रस्टमधील साडेतीन लाख रुपये शिल्लक राहिले. त्यामधून नानू कोठारे यांनी पुढाकार घेऊन २ एप्रिल १९०८ हा पाडव्याचा दिवस हायस्कूलकरिता निश्चित करून रमाबाईंना ‘चंदारामजी फीमेल हायस्कूल’च्या उद्घाटन समारंभास अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. उद्घाटनाला मुंबईत बरेच प्रतिष्ठित सुसंस्कृत हिंदू, पारशी, मुसलमान, ख्रिश्चन नागरिक उपस्थित होते. व्यवस्थापक मंडळींनी शाळेचा जो अभ्यासक्रम ठरवला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व भाषणात स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

    १९१८ मध्ये मुंबई कायदा कौन्सिलने मुंबई इलाख्यातील म्युनिसिपालिटय़ांना आपल्या हद्दीतील भागात पाच ते अकरा वर्षे वयाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा अधिकार प्राप्त झाला व त्याकरिता नवीन कर बसवण्यास संमती दिली. पण मुलींच्या मोफत शिक्षणासंबंधी उल्लेख नव्हता. सक्तीचे शिक्षण मुला-मुलींना एकाच वेळी लागू करावे असे मत असणाऱ्या सुधारक पक्षाच्या पंधरा दिवसांत पन्नास सभा झाल्या. त्यामध्ये धों. के. कर्वे यांचा अनाथ बालिकाश्रम, ना. दा. ठा. महिला विद्यापीठ या संस्थांनी सेवासदनच्या बरोबर भाग घेतला व त्यांत मुलांबरोबर मुलींनाही प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे झाले पाहिजे, असा ठराव पास झाला. त्याप्रमाणे म्युनिसिपालिटीकडे स्त्रियांचे डेप्युटेशन नेण्याचे ठरले. म्युनिसिपल कौन्सिलमध्ये हा प्रश्न १२ फेब्रुवारी १९२० रोजी चर्चेसाठी घेणार होते. सेवासदनपासून एक मिरवणूक निघाली. त्याचे नेतृत्व रमाबाईंनी केले. सभा होण्यापूर्वी रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखाली स्त्रियांचे एक डेप्युटेशन म्यु. कौन्सिलचे अध्यक्ष आपटे यांना भेटले व त्यांच्यापुढे आपली मागणी ठेवली. रमाबाईंच्या आंदोलनास दि सेंट कोलंबो हायस्कूल, मंगलोर येथील स्त्री वर्गानी, मद्रास येथील प्रमुख स्त्रियांनी पत्र पाठवून आपला पाठिंबा व्यक्त केला होता. एवढेच नव्हे तर पंडित नेहरूंची आई स्वरूपराणी नेहरू यांनी त्यांच्या अध्यक्षतेखालील अलाहाबाद येथील स्त्रियांच्या सभेत ही सभा सक्तीचे शिक्षण फक्त मुलांपुरते मर्यादित ठेवते व त्यांत मुलींना वगळण्यात येते, या योजनेचा निषेध करते असा ठराव पास करून तारेने रमाबाईंना कळवला. शेवटी पुणे म्युनिसिपालिटीने पत्रक काढले. मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यामध्ये आता मतभेद नाही, असे पत्रक काढले. यानंतर मुंबई इलाख्यातील स्त्री-मताधिकाराच्या चळवळीच्या कामासाठी २० प्रमुख स्त्रियांची कमिटी नेमण्यात आली. त्यामध्ये रमाबाई रानडे या प्रमुख अधिकार पदावर होत्या. तिच्यातर्फे इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी मिसेस एच. ए. टाटा आणि मिस टाटा यांना मुंबईहून २ ऑगस्ट १९१९ रोजी पाठवण्यात आले. मद्रास कायदे कौन्सिलात मिसेस कझिन्स यांनी पुढाकार घेऊन हा ठराव पास करून घेतला. तसेच बंगाल इलाख्यातदेखील स्त्री मताधिकाराचा ठराव पास झाला. मुंबई कायदे कौन्सिलात मात्र मताधिकाराची ही लढाई १९२१च्या मार्चपासून जुलै अखेपर्यंत उत्कट वृत्तीने लढली गेली. २५ जुलै १९२१ रोजी हरिलाल देसाई यांनी हे कौन्सिल सरकारला अशी शिफारस करते की विशिष्ट नियमामुळे मतदार यादीत नाव नोंदण्याविषयी स्त्रियांवर जी स्त्रीत्वमूलक अपात्रता (sex disqualification) ती स्त्रियांच्या बाबतीत रद्द करण्यात यावी.

    मुंबई इलाख्यात जे आंदोलन झाले त्याचा आधारस्तंभ रमाबाई रानडे आहेत असे मिसेस कजिन्सनी नि:संदिग्धपणाने लिहिले आहे. रँग्लर परांजपे, जहांगीर पेटीट वगैरे निवडक पुढाऱ्यांना स्त्रियांना मताधिकार असावा असे वाटत होते. पण सर्वसाधारण विरोध होता. तीन दिवसांनंतर शेवटी ठरावाच्या बाजूने ५२ विरुद्ध २५ अशा मोठय़ा बहुमताने ठराव संमत झाला. कौन्सिलचे काम संपल्यानंतर प्रमुख सभासद रमाबाई रानडे यांना भेटून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गर्दीने त्यांच्यासमोर आले.
    १९१३ च्या जानेवारीमध्ये रमाबाईंना त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल सरकारने कैसर-इ-हिंद हे पदक बहाल केले. परंतु ते घेण्यासाठी रमाबाई त्या समारंभास गेल्या नाहीत. मृत्यूच्या अगोदर काही दिवस त्या म्हणाल्या होत्या, जोपर्यंत काम करण्याची शक्ती आहे, तोपर्यंत जगण्यात अर्थ आहे. नाहीतर काय? जगात असून नसल्यासारखे घरात पडून राहावयाचे. मा.रमाबाईंच्या सन्मानाप्रीत्यर्थ भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९६२ ला मा.रमाबाईंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. मा.रमाबाई रानडे यांचा जीवनपट चित्रमय रूपात प्रदर्शित करणारी "उंच माझा झोका" ही मालिका २०१२ मध्ये झी मराठी ने प्रदर्शित केली होती. मा.रमाबाई रानडे यांचे निधन २६ एप्रिल १९२४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. श्री.वसंत गद्रे / इंटरनेट

    रमाबाई यांच्यावरील पुस्तके
    रमाबाई रानडे यांनी १९१० साली 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' हे आपलं आत्मचरित्र लिहून प्रकाशित केलं.न्या.महादेव गोविंद रानडे यांचं निधन झालं १९०१ साली. म्हणजे त्यांच्या निधनानंतर तब्बल नऊ वर्षांनी त्यांनी या आत्मपर आठवणी लिहिल्या. महाराष्ट्रीय स्त्रीने स्वतंत्रपणे लिहिलेलं हे पहिलंच आत्मचरित्र असा त्याचा उल्लेख केला जातो. शिवाय त्या रानडेंच्या सहधर्मचारिणी. त्यामुळे रानडेंविषयीही या पुस्तकात बरीच माहिती आहे.
    या पुस्तकाची लिंक http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5593731033121577112
    रमाबाई महादेव रानडे : व्यक्तित्व आणि कर्तृत्व / विलास खोले / मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
    रमाबाई यांचे नातू माधवराव विद्वांस यांनी 'श्रीमती रमाबाई रानडे - व्यक्ती आणि कार्य' हे चरित्र सरोजिनी वैद्य यांच्या सहकार्याने लिहून प्रकाशित केलं.
    या पुस्तकाची लिंक http://erasik.com/productdetails/PROD150300085803

  • कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे

    राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले.

  • कविता राऊत

    आंतरराष्ट्रीय पातळीवर भरवल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धा असोत, या स्पर्धामध्ये सर्वाधिक आकर्षणाचा आणि थरारकतेचा कोणता भाग असेल तर तो अ‍ॅथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्सचा! अ‍ॅथलेटिक्समध्ये तर अगदी ‘पळा पळा कोण पळे पुढे तो’ अशी चुरस आणि त्यामागे असणारी जिद्द यांचे प्रदर्शन असते. गुआँगझूमध्ये सध्या चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीजा श्रीधरन आणि कविता राऊत या दोघींनी पाठोपाठ येऊन अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले.

    प्रीजा श्रीधरन हिने ही स्पर्धा ३१ मिनिटे आणि ५०.४७ सेकंदांमध्ये जिंकली. तिच्यामागे अगदी सूतभरावरच असणारी कविता दुसरी आली आणि ती रौप्य पदकाची मानकरी ठरली. तिने हे अंतर ३१ मिनिटे आणि ५१.४४ सेकंदांत पार केले. म्हणजेच एका सेकंदापेक्षाही कमी वेळाने ती मागे पडली. कविताचा ही सर्वोत्तम वेळ आहे, असे म्हटले पाहिजे. गेल्याच महिन्यामध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत तिला एवढय़ाच अंतरासाठी ३३ मिनिटे आणि ५.२८ सेकंद एवढा वेळ लागला होता. त्या स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते. त्या तिच्या यशाविषयी ‘लोकसत्ता’ने ‘सावरपाडय़ाची कविता’ हा अग्रलेख (११ ऑक्टोबर) लिहिला होता. प्रीजा आणि कविता यांच्यात पहिला आणि दुसरा क्रमांक हा अक्षरश: ‘फोटोफिनिश’ने ठरवण्यात आला. प्रीजाला सुवर्णपदक मिळाले आणि आपल्याला ते मिळाले नाही म्हणून कविताला नक्कीच वाईट वाटलेले नाही. प्रीजा श्रीधरन ही केरळची मुलगी. तिचा जन्म १३ मार्च १९८२ रोजी इडुक्की जिल्हय़ात मुल्लकाणममध्ये झाला. २००६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती पाच हजार आणि दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत पाचवी आली होती. थोडक्यात तिचे पदक हुकले होते. २००७ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मात्र तिने रौप्यपदक मिळवले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत ती पात्र ठरली, पण प्रत्यक्ष तिचा क्रमांक पंचविसावा आला होता. गुआँगझूमध्ये तिचा धावण्याचा वेग हा तिचा विक्रमी आहे, असे म्हटले तरी चालेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यासाठी तिने ३२ मिनिटे आणि ४९.४७ सेकंद एवढा वेळ घेतला होता. ती तिची सर्वोत्तम वेळ होय. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत प्रीजा तापाने फणफणली होती. त्यामुळे तिला स्पर्धेपासून दूर राहावे लागले होते. आपल्या यशाचे श्रेय ती आपल्या आईला देते. तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिला तिच्या आईने अगदी तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपले होते. तिला एक भाऊ आहे आणि आई हे तिचे सर्वस्व आहे. तिने आपले पदक आई आणि तिचा भाऊ यांना अर्पण केले आहे. तिची आई आजही दुसऱ्यांच्या घरी काम करून आपला संसार चालवते. सुधा सिंग ही दुसरी सुवर्णपदक विजेती! अडथळय़ांच्या स्पर्धेत तिने तीन हजार मीटरसाठी नऊ मिनिटे आणि ५५.६७ सेकंद एवढा वेळ घेतला. गुआँगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला मिळालेले यश हे अनपेक्षित आहे, असे तिनेच म्हटले आहे. या स्पर्धेतल्या चिनी स्पर्धकांमुळे आपल्या मनावर प्रचंड दडपण होते, असे ती म्हणाली आहे. सुधा ही उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीची कन्या होय. तिने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असले तरी आपल्याबद्दल खेळाडूंची उपेक्षा वृत्ती आपल्याला बोचत होती, असे तिचे म्हणणे आहे. कदाचित त्यामुळेच तिला या यशाचे अप्रूप वाटत असले पाहिजे. शेवटच्या चारशे मीटरमध्ये तिने ही बाजी मारली, अन्यथा तिचे पदक हुकण्याचीच शक्यता होती. कविता राऊत ही महाराष्ट्राची कन्या. तिचे वडील वनखात्यात कामाला आहेत. ती आदिवासी भागातून आलेली आहे. तीही गरिबाघरची लेक आहे. घराची जमीन शेणाने सारवण्यापासूनची सर्व कामे तिने केलेली आहेत आणि आताही ती करताना तिला ओशाळवाणे वाटणार नाही. नाशिक जिल्हय़ात हरसूल तालुक्यातील सावरपाडा या गावची ही कन्या. दहावीस किलोमीटर पाण्यासाठी वणवण करायची सवय असलेली ही मुलगी एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत यशस्वी होईल, अशी महिन्याभरापूर्वी कुणी अपेक्षाही केली नसती. पण तिच्या पदरी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेचे यश होते. तिला मिळालेले कांस्यपदक तिला अधिक उंची गाठण्यासाठी खुणावत होते! ५ मे १९८५ रोजी जन्मलेली कविता लागोपाठच्या दोन महिन्यांत दोन पदकांची मानकरी ठरली आहे आणि याच क्रमाने पाहिले तर या तिघी २०१२ मध्ये लंडनला होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत यशस्वी होतील, अशी आशा करायला हरकत नाही. या तिघींमधला एक समान दुवा हा, की त्या सामान्य परिस्थितीतून पुढे आल्या आणि त्या ग्रामीण भागात वाढल्या आहेत. त्या जिंकतील आणि त्यांनी जिंकावे यासाठी अर्थातच समाजाने आणि सरकारने त्यांची जिद्द टिकावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारने त्यांना आतापासूनच धावण्यायोग्य वातावरण निर्माण केले तरी खूपच साहय़ होईल.

    -----------------------------------------------

    राऊत, कविता

    सावरपाडा एक्स्प्रेस अर्थात कविता राऊत. भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर रोवणा-या कविताने हे सारं अल्पावधीत कमावलेलं नाही. कित्येक वर्षांची तपश्चर्या यामागे आहे. धावणं तिच्या नसानसात आहे. तिने लहानपणासूनच काही गोष्टी ठरवून ठेवलेल्या होत्या. त्याप्रमाणेच तिची पावलं पडताहेत. पायाला भिंगरी लावून पळणारी कविता घरात मात्र अतिशय शांत आहे... सांगताहेत रामदास काशिनाथ राऊत.

    मला आजही ते दिवस लख्खपणे आठवताहेत. तेव्हा कविता ठाणापाडा आश्रमशाळेत होती. सणाच्या दिवशीही तिचं दर्शन आम्हाला दुर्लभ होतं. एकुलत्या एका मुलीसाठी मी डब्यात काही गोडधोड घेऊन जात असे. मी पोहोचलो की ती डबा उघडण्याआधी सुमित्राची, तिच्या आईची चौकशी करीत असे. त्यावेळी डोळे भरून यायचे. घरी असल्यावर कविता हाताला धरून शेतात जात असे. तिने लहानपणी कधीही उचलून घेण्याचा हट्ट केला नाही की तालुक्याच्या गावी बाजारला जाताना पायी चालण्याचा कंटाळा केला नाही. त्यातूनच की काय तिला भविष्य खुणावताना दिसलं असावं. झोळीतून उतरल्यावर बोट धरून चालायला ती शिकली असेल, पण आज सगळ्या जगाच्या पुढे पळूनही तिने माझं बोट सोडलेलं नाही. खेळता खेळता कविता कधी मोठी झाली ते कळलंच नाही. शाळेसाठी स्वत: तयारी करताना ना दप्तर ना खाऊसाठी पैसे. तिला परिस्थितीची जाणीव होती. सात किलोमीटर अनवाणी शाळेत जाणं, लहान भावांचा सांभाळ करून घरातील सर्व कामं करणं हे सारं ती प्रेमानं करायची. तिने कोणत्याही कामाला कधी नाक मुरडलं नाही. ठाणापाडा आश्रमात दाखल झाल्यावर तिचं जग आश्रमापुरतंच मर्यादित राहिलं. तिने हरसुल किंवा इतर तालुक्याचं ठिकाण कधी पाहिलं नाही. या आश्रमशाळेत प्रवेश घेतल्यानंतर ननाशी येथे प्रथमच १०० मीटरमध्ये विभागीय पातळीवर तिने प्रथम क्रमांक पटकावला. हे तिचं पहिलंवहिलं घसघशीत यश, त्यानंतर मात्र आयुष्यात तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

    ठाणापाडा आश्रमशाळेत मुख्याध्यापक खंडु भोये यांनी तिला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. पुढे कविताने सातवीसाठी हरसूल केबीएच विद्यालयात प्रवेश घेतला. येथे तिने पुन्हा प्रशिक्षक केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदकाची कमाई करून शाळेचं नाव उंचावलं. सुटीमध्ये घरी आल्यावर कविता विहिरीवर पाणी आणण्यास स्वत: जात असे. यशाची हवा तिच्या डोक्यात कधीच गेली नाही. तिचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. ती सुमित्राला स्वयंपाकातही मदत करत असे. घरकामाला तिने कधी नाही म्हटलं नाही. यावरून मला एक आठवण झाली, कविताला स्वयंपाकाचं खूप वेड आहे. स्वयंपाकघरात लुडबुड करायलाही तिला आवडत असे. एकदा तिच्यावर जबाबदारी सोपवून सुमित्रा बाहेर गेली होती. चुलीवर डाळ शिजत ठेवलेली, पण लक्षात न राहून कविता खेळायला निघून गेली. इकडे डाळीचा कोळसा झाला. घरी आल्यावर सुमित्राने तिला खुप सुनावलं परंतु कविताने हूं की चू न करता सर्व ऐकून घेतलं. चूक झाल्यावर ती स्वीकाराणं हा तिचा गुण आहे. त्यानंतर मात्र कविताने पुन्हा अशी चूक कधीच केली नाही. एका वेळी एकच काम हा खाक्या तेव्हापासून तिने स्वीकारला.

    विश्व हिंदु परिषदेच्या वसतीगृहात प्रवेश घेतल्यावर तिथल्या महिला व्यवस्थापक त्रैलोक्य यांनी कविताला पुढे जाण्यास मदत केली. या शाळेतर्फे कविता एका विभागीय स्पर्धेत सहभागी झाली. मात्र, योग्य प्रशिक्षण नसल्याने तिला या स्पर्धेच्या दोन दिवस आधी स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया(साई)च्या नाशिक केंद्रात आणलं गेलं. त्या स्पर्धेत कविताने एक पदक तर मिळवलंच पण तिला या केंद्राचे प्रशिक्षक विजेंदरसिंग यांच्या रूपाने गुरूही लाभले. तत्पूर्वी पुरेसं प्रशिक्षण नसतानाही तिने बंगलोरला झालेल्या शालेय स्तरावरील राष्ट्रीय स्पधेर्त एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई केली होती. कविता मला नेहमी विचारायची की, बाबा मला मोठ्या स्पर्धेत कधी भाग घ्यायला मिळेल. तिची ही आकांक्षा लवकरच पूर्ण होणार होती.

    भोसला मिलिटरी कॉलेजला गेल्यावर तेथे शहराच्या चमचमत्या विश्वात ही हरवून जाईल असं वाटलं होतं, मात्र तसं झालं नाही. तिला तिथे विजेंदर सिंग यांच्यासारखे प्रशिक्षक भेटले आणि तिचं आयुष्यच उजळून गेलं. विजेंदर तिचे प्रशिक्षकच नाही तर तिचे पालकही झाले. कविताच्या धावण्यात दम आहे, हे लक्षात आल्यावर विजेंदसिंग यांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केलं. प्रारंभीच्या काळात शनिवार सायंकाळ ते सोमवार सकाळ या काळात प्रशिक्षणासाठी कविता हरसूलहून नाशिक गाठत असे, पण हे अवघड होऊ लागल्यावर तिला नाशिकच्या 'भोसला'मध्ये प्रवेश देऊन विजेंदरसिंग यांनी स्वत:च्या घरीच कविताच्या राहण्याची सोय केली. ती आज यशस्वीतेच्या शिखरावर आहे, त्यामागे विजेंदर यांचा हा पाठिंबा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गाजवण्यासाठी गेलेली कविता आम्हाला तब्बल तीन वर्षांनी दिसली. सरावासाठी ती बेंगलोरला होती त्यावेळी आम्ही केवळ मोबाइलवर संपर्क साधायचो. सुमित्राचे डोळे नेहमी तिच्या आठवणीने ओले व्हायचे. मी तिची समजू्त काढायचो. आपली मुलगी देशासाठी खेळतेय, तिला असं भावनेत अडकवू नको, असं तिला सांगायचो. मात्र एकांतात असल्यावर मलाही तिची फार आठवण यायची. लहानपणचे सारे दिवस डोळ्यात गोळा व्हायचे. त्यावेळी कधी वाटायचं, तिला म्हणावं 'कविता सारं सोडून दे बेटा अन् निघून ये परत', पण मग माझ्यातील पित्यापेक्षा माझ्यातील समाजसेवक प्रभावी ठरायचा. सुमित्राचा जीव मात्र वरखाली होत असे. मी तिला म्हणायचो की, हे दिवस लवकरच जातील. राष्ट्रकुलच्या वेळी कविताला खेळताना पाहण्याची हरसूलच्या ग्रामस्थांची फार इच्छा होती. त्यासाठी नितीन देवरगावकर यांनी लाइव्ह सोय करून दिली. तिचं यश पाहून गावकर्‍यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मी भरून पावलो. कविताच्या यशामागे तिच्या मेहनतीबरोबरच तिच्या आईचा त्यागही आहे. सावरपाडा येथे आई एकटीच राहते. लहान भाऊ शिक्षणासाठी बाहेर, वडील नोकरीनिमित बाहेर. आई शेतामध्ये एकटीच राबते म्हणून मला तिने राजीनामा देण्यास सांगितलं. तिचा तो हट्टाचा निर्णय ऐकून ती माझी मुलगी नाही तर मुलगाच आहे असं वाटलं. वाटलं, आता कविता खर्‍या अर्थाने मोठी झाली आहे. जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा वाटतं की तिनं लग्न तर करायला हवं, पण आम्ही तो निर्णय तिच्यावर सोपवला आहे. आम्ही तिच्या भावना समजू शकतो. ती म्हणते की, 'भारतासाठी मला मेडल आणायचंय. लग्न वगैरे नंतर करू. मी राष्ट्रकुलनंतर ऑलम्पिकमध्ये तिरंगा फडकवला तर मला लग्नापेक्षा अधिक आनंद होईल.' कविताच्या या विचारांचा मला अभिमान वाटतो.

  • ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक विद्याधर गोखले

    ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी झाला.पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली.

    त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. संगीत सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला , जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा, जयजय गौरीशंकर ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण साक्षीदार, अमृत झाले जहराचे, मदनाची मंजिरी, स्वरसम्राज्ञी ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर बावनखणी हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. गझलसम्राट गालिब, शायरेआजम, शायरीचा शालिमार ही गालिबचे काव्य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे कविकथा हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. शंकर सुखकर हो हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच दृष्टी देऊन जातो. गोखले यांची लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. रंगशारदा ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. मा.विद्याधर गोखले यांचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ ग्लोबल मराठी

  • (पं.) शरद गोखले

    गोखले, शरद

    सरळ नाकाचा, डोक्यावरचे छप्पर जवळजवळ उडालेले, बोलताना जरासा अनुनासिक उच्चार, लाघवी वागणे अशी व्यक्ती बाजारात सहज भेटली तरीही तुमच्या लक्षात येणार नाही, की आदल्या रात्री रंगमंचावर आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे ते हेच शरद गोखले. वयाच्या पस्तिशीत संगीत रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शरद गोखले यांना आयुष्यभर संगीताने स्वरमय साथ दिली.

    जयराम आणि जयमाला शिलेदारांच्या संगीत रंगभूमीवर मनापासून सेवा करणारा हा व्रतस्थ कलावंत आयुष्यभर सहजपणे जगू शकला, याचे कारण त्याचे आयुष्य केवळ संगीतावरच अवलंबून होते. संगीत सौभद्र, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी अशा अनेक नाटकांमधून विविधरंगी भूमिका करताना शरदरावांनी आपल्या गायनावर नेहमी लक्ष केंद्रित केले. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीची पक्की तामील मिळाल्यामुळे अभिजात संगीताची उत्तम जाण होतीच. ग्वाल्हेर गायकावर लालित्याचे संस्कार करण्याचे कसबही विनायकबुवांनीच शिकवले असणे शक्य होते. कारण स्वत: विनायकबुवा हेही संगीत रंगभूमीचे पाईक होते. त्यांच्या काळात ही रंगभूमी ऐन भरात होती. शरद गोखले यांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. संगीत रंगभूमी जवळजवळ अस्तंगत होण्याच्या मार्गावर असताना छोटा गंधर्व आणि शिलेदार कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांमुळे ही संगीत रंगभूमी पुन्हा कात टाकू लागली होती. विनायकबुवांकडे गाणे शिकत असतानाच त्यांचे पुत्र रामचंद्र पटवर्धन यांच्याकडून तबला वादनाचे शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठीही गोखले यांनी कष्ट घेतले. लयतालावरील हुकमत आणि रागज्ञानाची शिदोरी यांच्या जोरावर संगीत रंगभूमीवरील पदार्पण करणे त्यांना शक्य झाले. ग. श्री. खैर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू झालेल्या ‘अनाथ विद्यार्थीगृह’ या एका अनोख्या सामाजिक चळवळीचा भाग होण्यासाठी शरद गोखले या संस्थेत अध्यापक म्हणून काम करू लागले. पण अध्यापनाबरोबरच संगीत स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती त्यांनी रंगभूमीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या जगण्यात खरा आनंद निर्माण करणारा ठरला. उत्तम मैफली गवई होण्याची क्षमता असतानाही गोखले यांनी रंगभूमीला आपलेसे केले. रंग लावून रंगमंचावर जाताना त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या गळ्यातील गाणे त्यांना सतत साद घालत होते. त्यामुळे शिलेदार कुटुंबातील जयराम, जयमाला, कीर्ती, दीप्ती यांच्यासारख्या तालेवार कलावंतांबरोबर काम करताना आपली गायन साधनाच आपल्याला मदत करू शकणार आहे, याची पुरेपूर जाणीव शरद गोखले यांना होती. या सगळ्या कलावंतांबरोबर देशभर दौरे करताना त्यांनी आपली अभिजात संगीताची तालीम बंद होऊ दिली नाही. ज्या काळात संगीत हा प्राधान्याचा विषय असणाऱ्या आकाशवाणीचे शरद गोखले हे नेहमीचे यशस्वी कलावंत ठरले. संगीत रंगभूमीवरील दीर्घ कारकीर्दीबद्दल मिळणारे पुरस्कार हा अविभाज्य भाग होता. परंतु गोखले यांनी संगीतावरील आपले चिंतन सतत सुरू ठेवले. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एक हुन्नर संपला आहे.
    ------------------------------------------------------------------------------

    पंडित शरद गोखले यांचे निधन

    जयराम शिलेदार यांच्या मराठी रंगभूमी संस्थेतील ज्येष्ठ गायक व अभिनेते पं. शरद घनश्याम गोखले (७१).

    संगीत सौभद्र, स्वयंवर, शाकुंतल, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी, विद्याहरण, शारदा, कान्होपात्रा, एकच प्याला ही त्यांची नाटके गाजली.

    गोखले ह्यांचा जन्म दि. २६ मे १९४० ला झाला. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे त्यांनी संगीत अलंकारापर्यंतचे धडे गिरवले.

  • हरदीपसिंग पुरी

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर भारताची अलीकडेच दोन वर्षांसाठी जी निवड झालीतिच्या मागे भारताच्या तिथल्या प्रतिनिधीचा मोठा वाटा आहे. हरदीपसिंग पुरी हे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले कायमचे प्रतिनिधी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन हे कायमचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना व्हेटोचा (नकाराधिकार) अधिकार आहे. व्हेटोचा अधिकार नसलेले दहा प्रतिनिधी निवडण्यात येतात. त्यात यंदा भारताची निवड झाली. भारताला १९१ मतांपैकी १८७ मते पडली हे विशेष आहे. पाच वर्षांमध्ये कोणत्याही एका देशाला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. आशिया विभागातून कझाकस्तानला प्रतिनिधीत्व हवे होते, पण ऐन वेळी कझाकस्तानने आपली उमेदवारी मागे घेतली आणि भारताने ही निवडणूक लढवायचे ठरवले. दरवर्षी कायम नसलेल्या पाच प्रतिनिधी देशांना अशी संधी मिळत असते. गेल्या वर्षी हरदीप बोस्निया, ब्राझील, गेबॉन, लेबानन । आणि नायजेरिया निवडले गेले होते. यंदा जपान, ऑस्ट्रिया, मेक्सिको, तुर्कस्तान आणि युगांडा हे देश निवृत्त होत आहेत. भारताबरोबर दक्षिण आफ्रिका, जर्मनी, कोलंबिया आणि पोर्तुगाल हे देश निवडले गेले आहेत. नव्याने निवडले गेलेले सदस्य आता सुरक्षा समितीवर १ जानेवारीपासून काम पाहायला लागतील. अशा पद्धतीने निवडून येण्याची भारताला जवळपास १९ वर्षांनी संधी लाभलेली आहे. विशेष हे की भारताच्या या प्रतिनिधित्वाला पाकिस्ताननेही पाठिंबा दिला होता. ज्यांनी या प्रतिनिधित्वासाठी कसोशीने प्रयत्न केले ते हरदीपसिंग पुरी हे गेल्या वर्षीच संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आले होते. त्याआधीचे प्रतिनिधी निरूपम सेन हे निवृत्त झाल्याने ती जागा रिकामी झाली होती. परराष्ट्र सेवेच्या १९७४ च्या तुकडीचे हरदीपसिंग पुरी हे संयुक्त राष्ट्रसंघात दाखल होण्यापूर्वी ब्राझीलमध्ये राजदूत होते. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आर्थिक सहकार्य वाढावे यासाठी निर्माण झालेल्या गटासाठीही त्यांचेच प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. ब्राझील हा देश आहे.

    अणुपुरवठादार अमेरिकेबरोबरच्या अणुकरारानंतर ब्राझीलचे महत्त्व भारताच्या दृष्टीने अधिकच वाढले होते. त्यातच ब्राझील, भारत आणि चीन असाही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा गट निर्माण करण्यात आला. जागतिक व्यापार संघटनेविषयीचा पुरी यांचा चांगलाच अभ्यास आहे, त्याचा ब्राझीलमध्ये उपयोग करून घेण्यात आला. ब्राझील हा देशही संयुक्त राष्ट्रसंघात कायमचे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे.

    भारताला कायमचे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, पण भारताचा त्यासाठीचा संपर्क कमी पडतो असा आक्षेप नेहमी घेतला जातो, पण तो वाढवण्यात आपल्याला यश येईल, असे पुरी यांचे म्हणणे आहे. भारताचा आत्मविश्वासही त्यामुळे वाढणार आहे. परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यावर पुरी यांना त्या खात्याचा आर्थिक विभाग सोपवण्यात आला. नवी दिल्लीमध्ये परराष्ट्र सेवेत त्यांनी इतर अनेक विभागही सांभाळले आहेत. ते परराष्ट्र सेवेत काही काळ सचिवही होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जीनिव्हामधील कार्यालयामध्येही त्यांनी कायम प्रतिनिधी या नात्याने काम पाहिले आहे. पुरी हे अतिशय धूर्त आणि कार्यतत्पर राजनैतिक प्रतिनिधी म्हणून परिचित आहेत परी हे अतिशय थोड्याच अवधीत न्यूयॉर्कमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी याही परराष्ट्र सेवेत आहेत. या दांपत्यास दोन मुली आहेत. ३५ वर्षांच्या परराष्ट्र सेवेत त्यांनी जपान, श्रीलंका, ब्रिटन या देशांमध्येही काम केले आहे. परराष्ट्र सचिवांच्या कार्यालयामध्ये ते सचिवपदीही होते. अमेरिकेच्या विभागावर ते सहसचिव होते. त्यांनी संरक्षण मंत्रालयामध्ये काही काळ नेमणुकीवर काम केले आहे. त्यांचे आतापर्यंत पाच 'पेपर्स' प्रसिद्ध झाले आहेत. बोस्नियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पुरी यांचा जन्म १९५४ मध्ये झाला.

  • सुनिता पुरुषोत्तम देशपांडे

    सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे “आहे मनोहर तरी” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राची तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून दाद मिळाली.

    १२ जुन १९४६ साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पुलं सोबत विवाहबध्द होउन पुढे संसाराची धुरा आनंदाने व यसस्वीरित्या पेलली “सोयरे सकाळ”, “प्रिय जी.ए.”, “समांतर जीवन”, “मण्यांचीमाळ”, याशिवाय “मनातलं अवकाश” हा सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह, २००४ ते २००६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकांमधुन प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.

    यासोबतच अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके व कादंबर्‍या लिहून सुनिता देशपांडे यांनी चौकस व प्रतिभावंत लेखिका म्हणुन स्वत:ची ओळख मिळविली आहे .

    ७ नोव्हेंबर २००९ रोजी सुनिता देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

    (लेखन व संशोधन - सागर मालडकर)

    अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

    सुनीता देशपांडे (7-Nov-2016)

    लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे (3-Jul-2017)

    मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे (3-Jul-2018)

  • जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर

    मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’.

    अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली.

    पुढे गोव्यात ‘अँग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली. तेव्हा अभिनयात करिअर करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही. गावी मॅट्रिकच्या परीक्षेचे केंद्र नसल्याने १९५० मध्ये ते परीक्षेसाठी मुंबईला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली.

    ‘बर्मा शेल’ मध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीत यशस्वी झाले, पण वैद्यकीय चाचणीत कमी वजन भरल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. बॅलार्डपिअर येथून चर्चगेटला चालत निघाले असताना मुंबईत राहून काय करायचे, पुन्हा गोव्याला जाऊ या असा विचार त्यांच्या मनात घोळायला लागला. फ्लोरा फाउंटनजवळ ते आले असता एक गाडी थांबली. गाडीत ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे सहसंपादक डी. के. रांगणेकर होते. रांगणेकर कुटुंब मूळचे गोव्याचे असल्याने ते सुखटणकर कुटुंबीयांना ओळखत होते. विचारपूस झाल्यानंतर रांगणेकर यांनी त्यांना गाडीत बसायला सांगितले व त्यांना चष्म्याच्या काचा व फ्रेम बनविणाऱ्या ‘माँटेक्स कॉर्पोरेशन’ कंपनीच्या मालकांकडे घेऊन गेले.

    ‘याला नोकरी द्या’ अशी विनंती मालकाला केली. येथे ‘टंकलेखक’ म्हणून सुमारे सहा महिने त्यांनी नोकरी केली. १ एप्रिल १९५१ मध्ये ‘ओरिएन्टल इन्शुरन्स’ मध्ये ते ‘लिपिक’ म्हणून लागले आणि ३० नोव्हेंबर १९९० मध्ये महामंडळाच्या सेवेतून ‘प्रसिद्धी अधिकारी’ म्हणून निवृत्त झाले. नोकरी करत असताना ते जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन ‘बी.ए.’ झाले. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी डॉ. चारुशीला गुप्ते यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून सुखटणकरांना सचिव बनवले. या वाङ्मय मंडळांतर्गत विविध कार्यक्रम झाले.. महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक करून मंडळाने निधी जमा केला. त्यार नाटकात मोहनदास यांनी ‘गोकर्ण’ची भूमिका साकारली होती. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी माणसेही त्यात होती.

    त्यानंतर सुखटणकर विविध एकांकिका स्पर्धांमधून भाग घेऊ लागले. त्यांनी एकांकिकांतून फक्त विनोदी भूमिकाच केल्या नाहीत, तर गंभीरही केल्या. ‘वहिनी’ या एकांकिकेत त्यांनी ‘वल्लभ’ची गंभीर भूमिका रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली.

    ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत चारुशीला गुप्ते यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले.

    भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले.१९५८ साली बी. ए. झाल्यावर मोहनदास सुखटणकर मुंबईतच ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मध्ये शिकू लागले.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या कॉलेजने सादर केलेल्या ‘बळी’ आणि ‘लाल गुलाबाची भेट’ या एकांकिकांसाठी त्यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली.

    १९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले. त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका विजया पाटील यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका मीनल मडकईकर यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले.

    मोहनदास सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून मोहनदास सुखटणकर यांनी कामं केलीत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून त्यांनी बहुतेक भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी चाळीस नाटकांमधून कामं केली आहेत. मत्स्यगंधा (चंडोल) , लेकुरे उदंड झाली (दासोपंत ), अखेरचा सवाल (हरिभाऊ), दुर्गी (मोरोबा नाडकर्णी), स्पर्श (नाटेकर), आभाळाचे रंग (आबा) ही काही त्यांची गाजलेली नाटकं.

    नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ आदी मराठी चित्रपटांतही काम केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रांवरील अनेक श्रुतिका, नभोनाटय़ यातही ते सहभागी झाले. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील विविध नाटके, ‘गजरा’ या कार्यक्रमात ते होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या निवडक मराठी मालिका तर ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदूी मालिका. पण दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत ते फारसे रमले नाहीत.

    नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा निकटचा सहवास त्यांना लाभला. शिरवाडकर यांचे मोठे ऋण आपल्यावर असल्याचे ते मानतात. शशी मेहता यांच्यासह सुखटणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील स्वगते, कविता यांचा समावेश असलेला ‘शब्दकळा कुसमाग्रजांच्या’ हा कार्यक्रम सादर केला. कुसुमाग्रज यांच्या सूचनेवरूनच ‘गोवा हिंदू’ने गोव्यात १९८१ ‘स्नेहमंदिर’ वृद्धाश्रम उभारला. रामकृष्ण नायक यांच्याबरोबर सुखटणकर यांचेही या कामात योगदान आहे. साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य, सुधीर मोघे, वसंत कानेटकर, भास्कर चंदावरकर, जयवंत दळवी, व. पु. काळे आदी मंडळी या ना त्या निमित्ताने अनेकदा त्यांच्या घरी आली आहेत.

    मोहनदास सुखटणकर यांना राजहंस प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे देण्यात येणारा 'राजहंस पुरस्कार' , नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • शापित योगी

    संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कन्या डॉ. अपर्णा मयेकर .पूर्वाश्रमीच्या रेखा डावजेकर यांनी जागवलेल्या आठवणी..

    १५ नोव्हेंबर १९१७ ला पुण्याजवळ कोंडुर येथे दत्तात्रेय शंकर डावजेकर ऊर्फ डी. डी. यांचा जन्म झाला. तो दिवस होता दिवाळीतला पाडवा. अतिशय शुभ दिवस. डी. डीं.चे वडील शंकर डावजेकर हे उर्दू, मराठी नाटके व कीर्तनात तबला वाजवीत असत. त्यामुळे डी. डीं.ना लहानपणापासूनच संगीताचे बाळकडू मिळाले. दुर्दैवाने डी. डी. चार वर्षांचे असतानाच त्यांची आई बाळंतपणात दगावली. डी. डी. पुण्याच्या नूतन मराठी हायस्कूलमध्ये शिकले. बुद्धीने अतिशय तल्लख. वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. इंजिनीअर व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती, पण गरिबीमुळे ते जमणे नव्हते. इयत्ता पाचवीत असताना साबणाच्या डबीत त्यांनी रेडिओ बांधला होता. ते सातवीत असताना लंडनला मेकॅनोची स्पर्धा होती. तेथे डी. डीं.च्या सर्किटला पहिले बक्षीस मिळाले. नूतन मराठीमध्ये असताना डी. डीं.च्या वर्गात दादा खरे म्हणून होते. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील मॅगझिन्स येत असत. ती वाचून डी. डी. नवनवीन काही बनवण्याचा प्रयत्न करीत असत. तबलाही डी. डी. दादांकडूनच शिकले.

    त्यावेळी स्वातंत्र्यलढय़ात प्रभातफेऱ्या निघत. या प्रभात फेऱ्यांतल्या गाण्यांना चाली लावून डी. डी. गात असत व इतरांनाही शिकवत असत. यादरम्यान नभोवाणीवरही ते गाण्यांना संगीत देऊ लागले. जलतरंग, दिलरुबा, हार्मोनियम व तबला ही वाद्ये ते लीलया वाजवीत. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये डी. डीं.चे अॅोपेंडिक्सचे ऑपरेशन झाले तेव्हा ते तिथे रोज दिलरुबा वाजवीत. डॉक्टर मंडळी ते ऐकायला येत असत.

    वाल्हे येथील इंदुमती बनसोड यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळेस डी. डी. कोल्हापुरात राहत होते. राजारामपुरीत मालती बंगला येथे ते वास्तव्यास होते. अभिनेत्री बेबी नंदा यांचे पिताश्री मा. विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ते संगीतकार म्हणून नोकरीस होते. एकदा विनायक त्यांना म्हणाले, ‘अरे दत्ता, आज एक मुलगी गाण्याची ऑडिशन द्यायला येईल.’ नंतर एक सडपातळ, खूप लांब केसवाली आणि दोन वेण्या घातलेली एक मुलगी ऑडिशनला आली. साधारण १३-१४ वर्षांची असावी. डी. डीं.ना वाटले, की एवढी लहान मुलगी काय गाणार? पण जसे तिने गाणे सुरू केले, डी. डी. आश्चर्यातच पडले. अतिशय गोड आवाज, उत्कृष्ट हरकती, तालाची उत्तम समज! तिला कुठे ठेवू अन् कुठे नको असे डी. डीं.ना होऊन गेले. ‘अजून एक गाणं म्हण.. एक चॉकलेट देतो,’ असे करत करत डी. डीं.नी तिच्याकडून सात-आठ गाणी गाऊन घेतली. धावतच ते मा. विनायकांकडे गेले व म्हणाले, ‘ती मागेल तो पगार द्या; पण तिला नोकरीत ठेवून घ्या. फार गुणी मुलगी आहे.’ यावर मा. विनायक हसून म्हणाले, ‘अरे दत्ता, ही लता. माझी पुतणी! दीनानाथ मंगेशकरांची मुलगी!!’ अशा तऱ्हेने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांची ऑडिशन घेण्याचा मान डी. डीं.ना मिळाला. ‘माझं बाळ’ या चित्रपटात पाचही मंगेशकर भावंडांना प्रथम पाश्र्वगायनाची संधी देण्याचा मानही डी. डीं.नाच मिळाला. तद्वत लतादीदींचे पहिले हिंदी चित्रपटगीत ‘पा लागू करजोरी’ (चित्रपट : ‘आपकी सेवा में’) हेपण डी. डीं.नीच कम्पोज केले होते. अशा तऱ्हेने या स्वरसम्राज्ञीचे पदार्पणाचे मराठी व हिंदी चित्रपटगीत देण्याचा मान डी. डीं.ना मिळाला. वसंतराव देशपांडेंसारख्या दिग्गज गायकाला ‘पेडगावचे शहाणे’मध्ये डी. डीं.नी प्रथम गाणे दिले. पंडित जितेंद्र अभिषेकींनीही पहिले पाश्र्वगायन डी. डीं.कडेच केले होते. ते म्हणजे.. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’!

    त्यांनी सुधा मल्होत्राला ‘गोवलकोंडा का कैदी’ या चित्रपटात पहिल्यांदा ब्रेक दिला. त्यांनी अभिनेता प्रेमनाथलाही या चित्रपटात गायला लावले. माणिक दादरकर (माणिक वर्मा) यांची पहिली एच. एम. व्ही. रेकॉर्ड डी. डीं.नीच काढली. पं. हरिप्रसाद चौरासिया व अनिल मोहिले यांनाही पहिला ब्रेक त्यांनीच दिला. कोल्हापुरात असताना डी. डी. आणि लताबाई एकत्र खेळतही असत. लताबाई व आशाबाई यांच्याकडून डी. डीं.ना बरेच काही शिकावयास मिळाले. आणि त्यांनीही डी. डीं.वर मोठय़ा भावाप्रमाणे माया केली. लताबाईंनी ‘आनंदघन’ नावाने संगीत दिले. त्या चित्रपटाचे संगीत संयोजन व पाश्र्वसंगीत डी. डीं.नी केले आहे. मुंबईत आल्यानंतर डी. डी. काही काळ एच. एम. व्ही.मध्ये नोकरीला होते. तेथे जी. एन. जोशी आणि गजानन वाटवेंशी त्यांची ओळख झाली. वाटवेंचे काही कार्यक्रमही डी. डीं.नी वाजवले. ‘थांबते मी रोज येथे’, ‘कुणी बाई गुणगुणले’ ही आशाबाईंची एच. एम. व्ही. रेकॉर्ड, त्याचप्रमाणे ‘गेला कुठे बाई कान्हा’, ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला’ ही लतादीदींची एच. एम. व्ही. रेकॉर्डही तेव्हाच प्रसिद्ध झाली. ही सर्व गाणी डी. डीं.नीच लिहिली व त्यांना चालीही दिल्या. नंतर सी. रामचंद्रन यांच्याकडे डी. डीं.नी साहाय्यक म्हणून काम केले. रोशनजी व चित्रगुप्त (आजचे संगीतकार आनंद-मिलिंद यांचे वडील) यांच्याकडेही त्यांनी काम केले. त्याबरोबरच स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन देणेही सुरूच होते. पण डी. डीं.ना खरा ब्रेक मिळाला तो ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटापासून! त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले. हा चित्रपट तवायफच्या जीवनावर होता. गाण्यात तो बाज असावा म्हणून डी. डी. व दिग्दर्शक राजा ठाकूर हे काही दिवस रेडलाइट एरियात जाऊन गाणी ऐकायचे. नंतर ‘तेरे वादे भी सपने दिखाते रहे’ हे गाणे आशाताईंच्या आवाजात रेकॉर्ड झाले व त्यांनासुद्धा उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.

    मग मात्र डी. डीं.कडे चित्रपटांची रीघ लागली. डी. डीं.चा पाश्र्वसंगीत देण्यात हातखंडा होता. त्यामुळे राजा परांजपेंनी त्यांना ‘पाठलाग’ हा भयपट दिला. फक्त पाच वादकांमध्ये केलेले ‘या डोळ्यांची दोन पाखरे’ हे गाणे प्रचंड गाजले. ‘नको मारूस हाक’ हे गाणेही लोकप्रिय झाले. डी. डीं.ना व आशाताईंना पुरस्कार मिळाले. पुन्हा ‘पडछाया’मध्ये ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘उठ शंकरा, सोड समाधी’ ही गाणी गाजली. गजानन जागीरदार, धर्माधिकारी, राजा ठाकूर, यशवंत पेटकर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या मातब्बर लोकांबरोबर डी. डीं.नी काम केले. वसंतराव जोगळेकर, राजदत्त यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. डी. डीं.ना नवनवीन प्रयोग करायला आवडत. ‘काका, मला वाचवा’ या चित्रपटात ‘सा सागर उसळे कैसा’ हे सप्तसुरांचे गाणे डी. डीं.नी ग. दि. माडगूळकरांकडून लिहून घेतले. ‘साऊंड अॅाण्ड म्युझिक’ या चित्रपटातील गाण्यावरून ती कल्पना घेतली होती. ‘आसावल्या मनाला’ या गाण्यात डी. डीं.नी तोडी रागात शुद्ध धैवत लावला होता. ‘रंगल्या रात्री अशा’, ‘पाठलाग’, ‘पडछाया’, ‘पाहू रे किती वाट’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘धरतीची लेकरे’ यासारखे अनेक चित्रपट डी. डीं.नी केले.

    याशिवाय रेडिओच्या अनेक संगीतिका, बालचित्रवाणीचे चित्रपट, अनेक माहितीपटही त्यांनी केले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आमचे नेहमी कार्यक्रम होत. एका हुतात्मादिनी ऑगस्ट क्रांती मैदानात मला इंदिरा गांधींच्या शेजारी बसून गाण्याची संधी मिळाली. डी. डी. हे बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. ते संगीतकार होते, तसेच कवी आणि लेखकही होते. त्यांनी लिहिलेली ‘सांतानेरीचा अपघात’ ही भयकथा वाचली की अंगावर काटा येतो. ‘विज्ञानयुग’ या मासिकात इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर त्यांची लेखमाला येत असे. माझा मोठा भाऊ विजय हा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर आहे. त्याच्या मदतीने त्यांनी अनेक म्युझिकल इन्स्ट्रमेंट्स बनवली. इलेक्ट्रॉनिक तानपुरा, स्वरमंजुषा, सूरपेटी, लेहेरासाथी. त्यात वेगवेगळे ६०० ताल होते. सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातील पहिला सिंथेसायझर डी. डीं.नी बनवला. त्याला तेव्हा क्लेव्हायोलिन म्हणत. पूर्वी परदेशी सिंथेसायझर अवाढव्य असत. डी. डीं.नी हा सिंथेसायझर सुटसुटीत बनवला. कौतुकाची गोष्ट म्हणजे आर. डी. बर्मनच्या साहाय्यकांनी तो आर. डीं.च्या जवळजवळ ३०० रेकॉर्डिग्जमध्ये वाजवला. डी. डी. उत्कृष्ट टॅप डान्सर होते. त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री बेबी आचरेकर हिच्याबरोबर डी. डीं.नी चित्रपटात टॅप डान्स केला होता. तसेच केवळ तीस सेकंदांत समोरच्या व्यक्तीचे रेखाचित्र डी. डी. काढत असत. आमच्या भीमराववाडीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्र नेहमी डी. डी.च काढत. एकदा एका काळ्या कागदावर तेली खडूंनी केशरी रंगात ‘मंगळावरचा माणूस’ हे चित्र त्यांनी काढले होते. ते ग. दि. माडगूळकरांना एवढे आवडले, की त्यांच्या ‘पंचवटी’ बंगल्यात ते त्यांनी हॉलमध्ये लावले होते. ग. दि. मा. एकदा म्हणाले होते, की- ‘मी लिहिलेल्या काव्यात जर कधी बदल करावयाचा असेल तर तो अधिकार मी फक्त डी. डीं.ना देईन. कारण त्यांना काव्याची जाण आहे.’

    डी. डीं.ना परिस्थितीमुळे स्वत:ला फार शिकता आले नाही. त्यामुळे आम्ही भावंडांनी खूप शिकावे असा त्यांचा व आईचा आग्रह असे. त्याप्रमाणे विजय इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर, विनय ऊर्फ पप्या सिव्हिल इंजिनीअर आणि मी डॉक्टर झाले. धाकटी बहीण ललिता (डॉली) हिचे ड्रॉइंग अतिशय सुंदर असल्याने तिने जे. जे. स्कूलमध्ये कलाशिक्षण घेतले. डी. डीं.कडे एवढे कलागुण असूनही त्यांचे म्हणावे तसे चीज झाले नाही. त्यामुळे मी त्यांना ‘शापित योगी’ म्हणते. योगी- कारण ते स्थितप्रज्ञ होते. कौतुक झाले, नाव मिळाले म्हणून गर्व नाही. आणि वाईट परिस्थिती आली म्हणून विषादही नाही. जेव्हापासून मला कळायला लागले- माझे वडील डी. डी. म्हणजे खूप ‘मोठा माणूस’ आहे- मला खूप आश्चर्य वाटायचे. माझ्या मैत्रिणींना खूप उत्सुकता असायची. ‘ए रेखा, एकदा आम्हाला डी. डीं.ना बघायचंय,’ असे त्या म्हणत. मग मी त्यांना घरी घेऊन आले की त्यांचा भ्रमनिरास व्हायचा. वडील नेहमी पांढरा सदरा, पायजमा किंवा पांढरी चड्डी अशा वेशात असायचे. एकदम साधे. डामडौल नाही. भपका नाही. लोकांच्या अपेक्षेत डी. डी. म्हणजे ‘स्टाईलबाज’ माणूस असावा. पण मग सहवासात आल्यावर त्यांचा साधेपणा, ज्ञान, मिश्कील स्वभाव याने ते समोरच्याला जिंकायचे. मला नेहमी म्हणायचे, ‘शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने काहीतरी शिकत राहावे. काहीतरी नवीन करावे, म्हणजे मेंदू तल्लख राहतो.’ एक गोष्ट आठवते. वयाच्या २४ व्या वर्षी मी रेखा डावजेकरची ‘सौ. अपर्णा मयेकर’ झाले. पण इतक्या वर्षांत मी त्यांना कधीही रागावलेले बघितले नाही.

    वसंतराव जोगळेकरांचा ‘शेवटचा मालुसरा’ हा चित्रपट डी. डीं.नी केला. ‘तुझे रूप राणी’ या गाण्यासाठी महेंद्र कपूरना अॅशवार्ड मिळाले. पुढचा ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट डी. डीं.नी साइन केला. त्यासाठी रवींद्र साठेंना घेऊन गाणेही बसवले. आणि अचानक वसंतराव जोगळेकरांकडून फोन आला- ‘डावजेकर, हा चित्रपट मी हृदयनाथला (बाळ) देत आहे.’ आम्ही सगळे नव्‍‌र्हस झालो. पण डी. डी. म्हणाले, ‘अरे वा! बाळ गुणी संगीतकार आहे. छान संगीत देईल. माझ्या त्याला शुभेच्छा!’ किती मोठे मन! चित्रपट हातातून गेला याचे दु:ख तर नाहीच; उलट बाळला मनापासून त्यांनी शुभेच्छा दिल्या. म्हणूनच मी डी. डीं.ना योगी म्हणते. अजातशत्रू असणे म्हणजे काय, हे त्यांना पाहून कळावे. आयुष्यात त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाचे, सूरसिंगार, लता मंगेशकर पुरस्कार, झी जीवनगौरव पुरस्कार, ग. दि. मा. पुरस्कार, वगैरे वगैरे. पण डी. डी. नेहमी जमिनीवरच!

    साधे घसरून पडण्याने माकडहाड दुखावले गेले आणि एका आठवडय़ातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते अनंतात विलीन झाले. कॉलनीतली माणसे म्हणाली, ‘अजून डी. डी. आम्हाला ‘वॉक’ करताना दिसतात.’ डी. डी. नेहमी म्हणायचे, ‘मला पुनर्जन्म नाही.’ कदाचित परमेश्वराला पण त्यांचे सुंदर संगीत कायम ऐकावेसे वाटले असेल.

    डॉ. अपर्णा मयेकर
    संकलन.संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट