जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
साने गुरुजींनी लिहिलेल्या “श्यामची आई”वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.
कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले.
१९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’ मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र' मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले.
१९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं.
बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत.
प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या.
मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली.
शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..
दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!'' राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सीमा नुसती शेती विषयात पदवीधर झाली नाही तर विद्यापीठात पहिली आली. त्याबरोबच ती बाळासाहेब सावंत आणि सर रॉंबट अलन Robart Alan सुवर्णपदकाची मानकरी ठरली. कृषी विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कुलपती पदक प्रदान करून तिच्या यशावर सुवर्ण कळस चढवला.
राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे.
हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, चालीतील वैविध्य, वाद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि गायन शैली यात प्रयोग केले जातात, दुर्दैवाने, असले प्रयोग बहुतांशी दुर्लक्षित होत असतात. वास्तविक चाल म्हणजे काय? हाताशी असलेल्या शब्दकळेला सुरांच्या सहाय्याने सजवून, गायक/गायिके पर्यंत पोहोचवायची!! चाल अशी असावी की ती गुणगुणताना, कविता वाचनापेक्षा अधिक सुरेल आणि खोल तरीही आशयाशी सुसंवादित्व राखणारी असावी. अशा थोड्या संगीतकारांच्या पंक्तीत रोशन यांचे नाव फार वरच्या स्तरावर घ्यावे लागेल. सुरवातीपासून, उर्दू भाषेची आवड आणि संगीताचा ध्यास, यामुळे सुरवातीचे शिक्षण पंडित रातरंजनकर, पुढे, उस्ताद अल्लाउद्दिन खान साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन, यामुळे रागदारी संगीताचा पाया तयार झालेला. दिलरुबा वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते.
सारंगी, Accordion, Spanish Guitar, बासरी या वाद्यांवर त्यांचा अधिक भर आहे. काही उदाहरणे बघूया. १] सलामे हसरत कबूल कर लो, २] मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है, ३] पांव छू लेने दो, ४] रहते थे कभी उनके दिल मे, या आणि अशा बऱ्याच गाण्यातील सारंगी मुद्दामून ऐकावी म्हणजे माझे म्हणणे पटावे. प्रेत्येक भाषिक वाक्यानंतर सारंगी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, सारंगीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे सारंगी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनाजे विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.
रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे - मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही. "तेरी दुनिया मे दिल लगता नही", "कहा हो तुम" ही गाणी ऐकावीत. कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. असाच उदासी परिणाम, तलतच्या "मै दिल हुं एक अरमान भरा" या गाण्यात अप्रतिम येतो. तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध कंप आणि त्याला साजेसा सुरावटीचा ढाला पाया, मनार गाढा परिणाम करते.
मात्र, साठीच्या दशकात रोशन यांची शैली बदलली. जिथे मंद्र सप्तक आणि ढाला स्वर होता, तिथे उच्चस्वरी वाद्यवृंद घेतो, असे आढळते. अर्थात, त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करूया. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. एकाच गीतात, एकाधिक ताल वा लयबंध वापरणे, हा त्यांचा खास प्रयोग म्हणता येईल. "बार बार तोहे क्या समझाये" किंवा "झीलामील तारे करे इशारा" ही गाणी बघूया. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका, या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून, त्यांची सादरीकरणे खास स्वरूपाची असतात. तसे बघितले तर, हे दोन्ही कालिक आकृतिबंध असतात, पण ताल हा मानसिक वा कल्पित कालिक नकाशा असून, त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होत असते. म्हणून एकाच तालाचे अनेक ठेके अस्तित्वात असतात आणि ते कानाला वेगवेगळे प्रतीत होतात. "सलामे आली हसरत कबूल कर लो" आणि "मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है" ही गाणी बघुया. या दोन्ही गाण्यांत निराळे ठेके योजले आहेत. "बहारो ने मेरा चमन लूटकर" या गीतात देखील १० मात्रांचा झपताल वापरला आहे पण तालाचा चेहरा-मोहरा ओळखीचा वाटत नाही.
"मैने शायद तुम्हे" या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर, जिला आपण "सम" म्हणतो, तिच्यावर जोर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या गाण्याची सम "निराघात" आहे. "शायद" या शब्दातील, "य" अक्षरावर सम येउन गेली, हे पहिल्यांदा ऐकताना ध्यानात देखील येत नाही!! मुळात, गाण्यात, ताल देखील अति हलक्या आवाजात आघाती ठेवलेला आहे, त्यामुळे गाणे फार बारकाईने ऐकायला लागते.
एकंदरीने, रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली आहे. अर्थात, याविरुद्ध देखील त्यानी रचना केल्या आहेत."कही तो मिलेगी", "सखी रे मोरा मन", "वो चले आये रे" ही सगळी गाणी चैतन्यपूर्ण, चमकदार चालींची झाली आहेत. द्रुत गती, चाल फार खाली नाही वा फार उंच स्वरांवर नेउन न ठेवणे, शब्दांच्या शेवटी खटके-मुरक्या इत्यादी नाजूक स्वरालंकार योजणे वगैरे सांगीतिक युक्त्या कुशलतेने योजलेल्या आहेत.
रोशन यांच्या गाण्यांकडे आणखी वेगळ्या नजरेने बघितल्यास, त्यांना युगुलगीतांचे आकर्षण अधिक होते, हे सहज समजून घेता येते. "हम इंतजार करेंगे","छा गये बादल","पाव छु लेने दो" ,"छुपा लो युं दिल मे प्यार" इत्यादी गाणी ऐकावीत. आपल्याकडील बहुतांशी युगुलगीते, नाट्यात्म होतात, ती संवादात्मक तत्वाच्या पाठपुराव्यामुळे, हे सर्वसाधारण सत्य लक्षात घेत, या गाण्यातील आगळेपण सहज सिद्ध होते. ही गाणी कुठेही अति नाट्यात्मक होत नाहीत तर संवाद्तत्वावर पुढे विस्तारत जातात.
आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. "मन रे तू काहे ना धीर धरे (यमनकल्याण), या गाण्यातील शांत स्वरवैभव केवळ अपूर्व आहे. निगाहे मिलाने को जी चाहता है (यमन), "बता दो कौन गली (तिलंग), "मदभरी अंखीयां" (जौनपुरी) किंवा "गरजत बरसत" (मल्हार) ही देखील उल्लेखनीय गाणी म्हणता येतील. प्रत्यक्षात तो राग जरी योजला नसला तरी त्या रागाच्या छायेत या गाण्यांच्या चाली अवतरत असतात. आता, यमन राग घेतला तरी, "सलामे हसरत","गमे हस्तीसे बस बेगाना","वळला क्या बात","युं अगर मुझको ना चाहो तो" ही सगळी यमन रागाच्या सावलीत वावरतात परंतु रागाची प्रकृती वेगळी गाण्याची रचना वेगळी, असा फरक या गाण्यांमधून अप्रतिमरीत्या दिसून येतो.
"कव्वाली" हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. "अगर ये दिल" (घर घर मे दिवाली),"ना तो कारवां की तलाश" (बरसात की रात), "निगाहें मिलाने को" (दिल ही तो है) या कव्वाल्या ऐकाव्यात. "निगाहें मिलाने को" या कव्वालीत, यमन नीटसपणे येतो, पण आशा भोसलेच्या कौशल्यपूर्ण आवाजाच्या लागावास (उदाहरणार्थ खालच्या "रे" वरून एकदम अचूक वरचा "रे" घेणे!!) शब्दांच्या अंती येणारी द्रुतगती फिरत यांना भरपूर जागा आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात,
"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे"
अनिल गोविलकर
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे दूरशिक्षणाच्या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ मोलाचे योगदान आहे. सध्याच्या ‘डिजिटल’ युगामध्ये बहुमाध्यम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरशिक्षणाची व्याप्ती आणखी वाढविणे शक्य आहे आणि याच आव्हानाला सामोरे जात डॉ. आर. कृष्णकुमार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारतील. डॉ. कृष्णकुमार हे मूळचे नागपूरचे. पदार्थविज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण व पीएच.डी. दर्जाचे संशोधन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते रुजू झाले. नागपूर विद्यापीठातील महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपद सांभाळत त्यांनी विद्यापीठीय प्रशासन-व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. उच्चशिक्षण क्षेत्रात पंचवीसहून अधिक वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची केरळच्या राज्यपालांचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती झाली. आता मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षणाची चळवळ ते उभारणार आहेत. ‘भारताकडे जागतिक महासत्ता म्हणून पाहिले जात आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले नाही, तर लोकसंख्येतील ही लाभजन्य स्थिती अल्पावधीतच देशासाठी मोठी डोकेदुखी ठरेल. सध्याच्या बहुतांश पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यांचा अभाव आहे. सामाजिक, आर्थिक गरजांमुळे रोजगारप्राप्तीच्या मार्गाने गेलेल्या फक्त दहा टक्के मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष कंपनीच्या आवारामध्येच जाऊन कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा मानस आहे. ‘उच्चशिक्षणाच्या विस्ताराबरोबरच ज्ञानाधारित समाजात कालानुरूप कौशल्यांचा दर्जा वाढविण्याचे आव्हानही मुक्त विद्यापीठाला पेलायचे आहे. त्यासाठी अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याची मोहीम मी हाती घेणार आहे,’ असे कृष्णकुमार सांगतात."
बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक. शोषितांच्या आणि पददलितांच्या जीवनावर त्यांनी भेदक लिखाण केलं आहे. ‘धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि परिवर्तनवादी असणाऱ्या बागुल यांनी अण्णा भाऊ साठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून योगदान दिलं.
दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू' ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण नसलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी दासूंचे बालपण गेले. तिथे कुस्तीचे फड रंगत होते, तरीही निसर्गाशी जोडले राहिल्याने कविता बहरली. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या.
"आई-वडील व भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे. दासू वैद्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मराठी या विषयात एम.ए. तसेच डिप्लोमा इन ड्रामा शिक्षण घेतले. यु.जी.सी. तर्फे त्यांना रिसर्च फेलोशिप देखील मिळाली होती. तर एम.फिलसाठी 'भारत सासणे यांच्या दीर्घकथा' तर पीएच.डी.साठी 'भारत सासणे यांचे साहित्य' हे विषय निवडून सदर विषयांवर त्यांनी प्रबंध लेखन केलेले होते. काहीकाळ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. वृत्तपत्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पुरस्कृत 'शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२००९' त्यांना प्रदान करण्यात आलेला होता.
१९८७ पासून मराठीतील वाड्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने ते कविता लेखन करत आहेत. मौज, अनुष्टुभ, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची, साक्षात, ललित, अक्षर चळवळ, कवितारती, शब्दवेध, अभिधानंतर, महाराष्ट्र टाईम्स, मिळून साऱ्याजणी, शब्दालय, साधना इत्यादी अनेक वाड्मयीन अंकांमधून आजवर त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला 'तूर्तास' हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह. मान्यवर समीक्षक व रसिक वाचकांनी गौरविलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांमध्ये रा.ना.पवार प्रतिष्ठान, सोलापूरचा काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'मराठी कविता राजधानी पुरस्कार', बुलडाणा साहित्य संघाचा ना.घ.देशपांडे साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचा विशाखा पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे ललित मासिकाच्या लक्ष्यवेधी पुस्तकात व अंतर्नाद मासिकाने निवडलेल्या शंभर वर्षांतील पन्नास पुस्तकांत 'तूर्तास' या कविता संग्रहाची निवड झालेलीं आहे. दासू वैद्य यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हस्तलिखित कवितांसाठीच्या 'कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार', ललित लेखनासाठीच्या लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार, समग्र लेखनासाठीच्या कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलेले आहे. पॉप्युलर प्रकाशन प्रस्तुत 'चौघांच्या कविता' या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केलेले आहे. दासू वैद्य हे केवळ कविता लेखनच करतात असे नाही तर कवितांचा इंग्रजी, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमधून प्रभावीपणे अनुवाद देखील करतात.
दासू वैद्य यांनी बालसाहित्यामध्ये देखील आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. 'भुर्रर्र' या त्यांच्या बालकथा संग्रहाला महाराष्ट्र बालसभा, कोल्हापूरचा २००७ सालचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार मिळालेला असून 'क-कवितेचा' या बालकविता संग्रहाला सौ.शशिकला आगाशे स्मृती बालवाड्मय पुरस्कार, बुलडाणा व मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार, आजरा, जि.कोल्हापूर असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. महावीर जोंधळे यांच्या 'आसवं गाळती कासवं' या बालकादंबरीचे त्यांनी नाट्यरुपांतर करून त्याचे महाराष्ट्रात यशस्वीरीत्या व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या 'सुगम भारती' क्रमिक पाठ्यपुस्तकात 'पक्ष्यांना घर हवे' या बालनाट्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी, अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर, कविता विभागासाठी तसेच विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सवात नाटक, कविता या कला प्रकारांसाठी परीक्षक व तज्ञ म्हणून त्यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुद्रेमनी, ता.जि. बेळगांव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद देखील त्यांनी यशस्वीपणे भूषविलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, साहित्य अकादमीच्या महोत्सवांमध्ये त्याचप्रमाणे आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेकवेळा कविता वाचन करण्याची संधी त्याला लाभलेली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये व कवितांच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदविलेला आहे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत त्यांच्या 'वाळवी' या नभोनाट्याला लेखनासाठीचा पुरस्कार मिळालेला असून या नभोनाट्याचा इतर भारतीय भाषांमधून अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे.
मदुराई येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्यविभागाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावलेले आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्टीत एकांकिका स्पर्धांमधून 'एक लेखक लिहिणार आहे..' 'आम्हाला बांधायचय मंदिर..' या सारख्या एकांकिकांसाठी व 'च्यानल झीरो' या पथनाट्यासाठी लेखन, दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील दिग्दर्शनासाठी पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. एवढेच नव्हे तर साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य लेखन व सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या मरून पडलेला पांडुरंग, एकदा मी, भीती मेंदूत आरपार या सारख्या अनेक कवितांचा, 'तूर्तास' या कविता संग्रहाचा तसेच 'देता आधार का करू अंधार' या एकांकिकेचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या वाड्मयीन मुलाखती विविध अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. 'बिनधास्त' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगुळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार मिळालेला आहे. 'भेट' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी-गौरव पुरस्कार मिळालेला असून या व 'सावरखेड एक गांव' या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी म. टा. सन्मानासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. 'सोनियाचा उंबरा' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी म. टा. सन्मान पुरस्कार तर 'पदरी आलं आभाळ'च्या शीर्षक गीतासाठी लक्स सह्याद्री माणिक सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे.
'गाभ्रीचा पाऊस', 'खाली डोकं वरती पाय' तसेच 'तुकाराम', सावरखेड एक गाव अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेले आहे. ई टीव्ही, झी टीव्हीवरील 'पिंपळपान', 'टिकल ते पॉलिटिकल', 'एक होता राजा', 'आपली माणसं', 'रंग माझा वेगळा', 'घर श्रीमंताचं' इत्यादी मालिकांसाठी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तर 'लेक वाचवा' अभियानासाठी अभियानगीत लिहून सामाजिक उपक्रमांत देखील त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती.
बॉलीवुड चे दिग्गज गिटार वादक गोरख शर्मा यांचा जन्म २८ डिसेंबर १९४६ रोजी झाला. गोरख रामप्रसाद शर्मा हे संगीतकार प्यारेलाल यांचे धाकटे बंधू होते. गोरख शर्मा यांनी आपल्या वयाच्या १२ व्या वर्षापासून मेन्डोलिन वाजवण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात ते हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात मेन्डोलिन वाजवत असत.
वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी संगीतकार रवी यांच्या चौदवीका चांद या गाण्याला मेन्डोलिन वाजविले होते. जागतिक कीर्तीचे गोरख शर्मा यांनी अनेक अविस्मरणीय गाण्यांना गिटार वादन केले ते 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल' यांचे मुख्य सहाय्यक होते. त्यांनी आपल्या १९६० ते २००२ मधील करीयर मध्ये १००० हून अधीक गाण्यांना गिटार वादन केले व ५०० हून अधीक चित्रपटात गिटार व इतर तार वाद्य वाजवली होती.
'कर्ज़' या चित्रपटातील 'एक हसीना थी, एक दीवाना था' च्या गाण्याचा गिटार गोरख शर्मा यांचा होता. आशिकी या चित्रपटातील गिटारचा पिस पण गोरख शर्मा यांचाच होता. गोरख शर्मा यांचे २७ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti