भरत सासणे

‘‘माणसाचा शोध, त्याच्या नात्यांच्या जाळ्याचा शोध, हे माझे आकर्षण आहे. इथली माती, इथली परंपरा, जीवनपद्धती, बुद्धिवाद्यांना वाटते तितकी सोपी नाही. इथे विसंगतीत सुसंगत एकात्मता आहे. ही रहस्यांची दालने आहेत. हाडामांसाचा माणूस स्त्री आणि पुरुष, त्यांचे परस्परांशी असलेले गूढ संबंध, त्यांची संदर्भसुसंगत जीवनपद्धती या सर्वाचे माझ्या लेखनाला मोठे आकर्षण आहे.

त्यातूनच प्रेरणा मिळते. माणूस शोधणे ही माझ्यातल्या लेखकाची प्रतिज्ञा आहे. ते जमेल असे वाटते, बघू या.’’ दोनेकच पुस्तके प्रकाशित असताना ललित मासिकाच्या १९८८ सालातील विशेषांकामध्ये कथेविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या या लेखकाची भविष्यातील लेखनघोडदौड ठरलेली होती. कारण माणूस अंतर्बाह्य़ शोधण्याची प्रतिज्ञा दीर्घ कथांद्वारे जमवून दाखविण्याची किमया भारत सासणे यांनी आजही कायम ठेवलेली आहे.

शतकभरापासून कायम पिछाडीवर पडलेल्या आणि साहित्यमरतडांकडून अवहेलना वाटेला आलेल्या कथा या साहित्यप्रकाराला मर्यादा निश्चित असली, तरी मराठी ललित साहित्य जगतात नवकथेच्या कालखंडापासून ते आजच्या टेक्नोसॅव्ही जगापर्यंत वाचनव्यवहार म्हणून जो काही भाग अस्तित्वात आहे, त्यात कथांचे स्थान अढळ आहे. एके काळी गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर, मोकाशी लेखक पंचकांनी कथांची मोहिनी विस्तारली. जी.ए.कुलकर्णी यांनी त्याच वेळी आपल्या कथेची वेगळी यक्षनगरी उभारली. त्यानंतरही अनेक दिग्गजांनी आपल्या लेखन कारकीर्दीचा काही काळ कथांना विभागून दिला. या दिग्गजांमध्ये सातत्याने दीर्घकथा या फॉर्मशी खेळत आणि त्यातील सर्व शक्यता सूक्ष्म पातळीवर आजमावणारी कथा घेऊन येणारे लेखक म्हणजे भारत सासणे.

बीड जिल्ह्य़ाचे माजी जिल्हाधिकारी म्हणूनही नावाजलेल्या सासणे यांनी गेली तीन दशके कविता, एकांकिका, नाटके, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यक्षेत्रांत सारख्याच ताकदीने आपली जादुई लेखणी चालविली. मात्र साहित्य जगतात त्यांची कथाकार म्हणून जी ओळख आहे, ती आभाळाएवढी नक्कीच आहे. धुळे शहरामध्ये बालपण घालविलेल्या सासणे यांनी आपल्या लहानपणीच्या भोवतालाचे ठसे लेखनात उमलून आल्याचे नुकतेच कुठेतरी शब्दबद्ध केले आहे.

जॉन आणि अंजिरी पक्षीपासून त्यांच्या प्रत्येक संग्रहात उत्तरोत्तर माणसाचा शोध गहिरा होत गेला आहे. डफ, उंट, कॅम्प, दुश्चिन्ह आणि चाफ्याचं झाड, रात्र, क्षितिजावरची रात्र, उपसंहार, ठकाजी रामाच्या स्मरणातील रात्र, दु:ख, लग्न, दूर तेथे, दूर तेव्हा, रंगराजाचा अजगर आणि कितीही वाढवत न्यावीत आणि न संपावीत, अशी सासण्यांच्या कथारत्नांची नावे त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांकडून सांगितली जातील. सूक्ष्म तपशील, खोलवरची चिंतनशीलता, वाचकाला बोट धरून आपल्या विलक्षण सुख-दु:खांच्या जगात नेऊन सोडण्याची हातोटी, तरल काव्यात्मकता आणि तत्त्वज्ञानात्मक आशय ही त्यांच्या कथेची बलस्थाने आहेत. त्यांच्या जमलेल्या कथामफिलीतून दरवर्षी मोजक्याच कथारत्नांद्वारे परिघाबाहेरच्या आणि कल्पनातीत आयुष्यांचे पट सादर होत असतात.

चिरतरुण दु:खांचे बुरूजदर्शन घडविणाऱ्या या यक्षनगरीच्या सम्राटाला साहित्यातील असाधारण कामगिरीबद्दल जाहीर झालेला लाभसेटवार पुरस्कार त्यांच्या कथांना मिळालेला यथोचित सन्मान म्हणावा लागेल.



‘‘माणसाचा शोध, त्याच्या नात्यांच्या जाळ्याचा शोध, हे माझे आकर्षण आहे. इथली माती, इथली परंपरा, जीवनपद्धती, बुद्धिवाद्यांना वाटते तितकी सोपी नाही. इथे विसंगतीत सुसंगत एकात्मता आहे. ही रहस्यांची दालने आहेत. हाडामांसाचा माणूस स्त्री आणि पुरुष, त्यांचे परस्परांशी असलेले गूढ संबंध, त्यांची संदर्भसुसंगत जीवनपद्धती या सर्वाचे माझ्या लेखनाला मोठे आकर्षण आहे.

त्यातूनच प्रेरणा मिळते. माणूस शोधणे ही माझ्यातल्या लेखकाची प्रतिज्ञा आहे. ते जमेल असे वाटते, बघू या.’’ दोनेकच पुस्तके प्रकाशित असताना ललित मासिकाच्या १९८८ सालातील विशेषांकामध्ये कथेविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या या लेखकाची भविष्यातील लेखनघोडदौड ठरलेली होती. कारण माणूस अंतर्बाह्य़ शोधण्याची प्रतिज्ञा दीर्घ कथांद्वारे जमवून दाखविण्याची किमया भारत सासणे यांनी आजही कायम ठेवलेली आहे.

शतकभरापासून कायम पिछाडीवर पडलेल्या आणि साहित्यमरतडांकडून अवहेलना वाटेला आलेल्या कथा या साहित्यप्रकाराला मर्यादा निश्चित असली, तरी मराठी ललित साहित्य जगतात नवकथेच्या कालखंडापासून ते आजच्या टेक्नोसॅव्ही जगापर्यंत वाचनव्यवहार म्हणून जो काही भाग अस्तित्वात आहे, त्यात कथांचे स्थान अढळ आहे. एके काळी गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर, मोकाशी लेखक पंचकांनी कथांची मोहिनी विस्तारली. जी.ए.कुलकर्णी यांनी त्याच वेळी आपल्या कथेची वेगळी यक्षनगरी उभारली. त्यानंतरही अनेक दिग्गजांनी आपल्या लेखन कारकीर्दीचा काही काळ कथांना विभागून दिला. या दिग्गजांमध्ये सातत्याने दीर्घकथा या फॉर्मशी खेळत आणि त्यातील सर्व शक्यता सूक्ष्म पातळीवर आजमावणारी कथा घेऊन येणारे लेखक म्हणजे भारत सासणे.

बीड जिल्ह्य़ाचे माजी जिल्हाधिकारी म्हणूनही नावाजलेल्या सासणे यांनी गेली तीन दशके कविता, एकांकिका, नाटके, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यक्षेत्रांत सारख्याच ताकदीने आपली जादुई लेखणी चालविली. मात्र साहित्य जगतात त्यांची कथाकार म्हणून जी ओळख आहे, ती आभाळाएवढी नक्कीच आहे. धुळे शहरामध्ये बालपण घालविलेल्या सासणे यांनी आपल्या लहानपणीच्या भोवतालाचे ठसे लेखनात उमलून आल्याचे नुकतेच कुठेतरी शब्दबद्ध केले आहे.

जॉन आणि अंजिरी पक्षीपासून त्यांच्या प्रत्येक संग्रहात उत्तरोत्तर माणसाचा शोध गहिरा होत गेला आहे. डफ, उंट, कॅम्प, दुश्चिन्ह आणि चाफ्याचं झाड, रात्र, क्षितिजावरची रात्र, उपसंहार, ठकाजी रामाच्या स्मरणातील रात्र, दु:ख, लग्न, दूर तेथे, दूर तेव्हा, रंगराजाचा अजगर आणि कितीही वाढवत न्यावीत आणि न संपावीत, अशी सासण्यांच्या कथारत्नांची नावे त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांकडून सांगितली जातील. सूक्ष्म तपशील, खोलवरची चिंतनशीलता, वाचकाला बोट धरून आपल्या विलक्षण सुख-दु:खांच्या जगात नेऊन सोडण्याची हातोटी, तरल काव्यात्मकता आणि तत्त्वज्ञानात्मक आशय ही त्यांच्या कथेची बलस्थाने आहेत. त्यांच्या जमलेल्या कथामफिलीतून दरवर्षी मोजक्याच कथारत्नांद्वारे परिघाबाहेरच्या आणि कल्पनातीत आयुष्यांचे पट सादर होत असतात.

चिरतरुण दु:खांचे बुरूजदर्शन घडविणाऱ्या या यक्षनगरीच्या सम्राटाला साहित्यातील असाधारण कामगिरीबद्दल जाहीर झालेला लाभसेटवार पुरस्कार त्यांच्या कथांना मिळालेला यथोचित सन्मान म्हणावा लागेल.

Author