जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
अर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली.
सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा आवाज आणि पावरफुल स्क्रिन प्रेझेंस या जोरावर या खलनायकाने अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारलाही रुपेरी पडद्यावर तगडी टक्कर दिली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ रोजी सिक्किममध्ये झाला.अग्निपथचा कांचा चीना, मेरे अपनेमधला सडकछाप संजू, धुंदमधला अपंग तरीही क्रूर पती, हममधला बख्तावर, क्रांतीवीरचा चतुर सिंग चीता किंवा मग कातिया…या खलनायकाचे निर्दयी आणि बेदरकार हावभाव आणि डोळ्यातला अंगार समोरच्याचा थरकाप उडवणारा..हा तो व्हिलन आहे ज्याच्या हुकुमशाहीत ‘हर गलती की सजा मौत है’…
डॅंनींचा पडद्यावरचा खतरनाक असला तरीही त्यांच्यामध्ये एक सोफॅस्टिकेशन आणि डिग्निटी आहे. त्यांच्या कमांडिंग पर्सनॅलिटीमुळे त्यांच्या भूमिका नेहमीच लार्जर दॅन लाइफ वाटल्या.
डॅनी डेन्ग्झोपा यांना घोडेस्वारीची आवड होती. त्यांचं कुटुंब घोडे पालनाच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांची घोडेस्वारीची आवड जोपासली गेली. डॅनी यांना खरंतर भारतीय सैन्यदलात सहभागी व्हायचं होतं. पश्चिम बंगालमधून बेस्ट कॅडेट म्हणून निवड होऊन त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही सहभाग घेतला होता. पण त्यावेळी चीनसोबतच्या युद्धाच्या काळात अनेक जवान शहिद झाले. हे पाहून डॅनी यांची आई घाबरुन गेली. अखेर आईच्या सांगण्यावरुन डॅनींनी सैन्यात जाण्याचा निर्णय बदलला आणि पुण्यातल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. सिक्किमसारख्या प्रदेशातून पुण्यातल्या एफटीआयआयमध्ये आलेल्या डॅनींसाठी हा काळ उदासीचा होता. गुरखा, चायनीज, नेपाळी किंवा चिंकी अशा अनेक कुचकट कमेंट्सना त्यांना सामोर जावं लागलं. कॅम्पसमध्ये अनेकदा त्यांची खिल्ली उडवली जायची. अशा वातावरणात टिकून राहाणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. डॅनी डेन्ग्झोपा यांचे मूळ नाव त्शेरींग फिन्सो डेंग्झाँप्पा या नावाने त्यांना पुकारणं अनेकांना जमत नसे. त्यावरुन त्यांची चेष्टाही होऊ लागली. तेव्हा एफटीआयआयमध्ये त्यांचे जिच्याशी मैत्रीचे बंध जुळले त्या जया बच्चन यांनी डॅनींना नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बदललेलं नावच पुढे त्यांची ओळख बनून राहिलं. डॅनींना सहजासहजी काम मिळू शकत नव्हतं. त्याकाळी बनत असलेल्या फॅमिली ड्रामांमध्ये डॅनी फिट होत नव्हते. ‘ना तू वडिलांसारखा दिसतोस, ना भावासारखा. त्यामुळे केवळ नोकराचे रोल मिळतील’ असंही त्यांना ऐकवलं गेलं. बोलणारे खूप काही बोलायचे पण डॅनींना स्वत:वर आणि स्वत:च्या मेहनतीवर विश्वास होता. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्येही ते टिकून राहिले. डॅनींना हिरोच्या रोलमध्ये रस नव्हता कारण हिरोला नाच गाणं तर करावंच लागे. त्यामुळे डॅनी अँटी हिरो भूमिकांकडे वळले. मेहनतीशिवाय लक मिळणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे एफटीआयआयमध्ये असताना डॅनी यांनी हिंदी भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.
१९७० मध्ये काही सिनेमात त्यांनी छोट्या भूमिका केल्या. पण ‘लहू दे दो रंग’नंतर खऱ्या अर्थाने त्यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या. डॅनी यांनी बी आर इशरांच्या ‘जरूरत’ या बी ग्रेड सिनेमातून सुरुवात केली. त्यानंतर गुलजार यांच्या ‘मेरे अपने’मधून डॅनी यांना मेजर ब्रेक मिळाला. ही फिल्म करण्याचं आणखी एक कारण म्हणजे अभिनेत्री मीनाकुमारी. मीनाकुमारी या डॅनी यांची फेवरेट नायिका होती. ‘तू तो मेरा असली बच्चा है, तेरी नाक बिलकूल मेरे जैसी है’..मीनाकुमारी यांचे हे आपुलकीचे शब्द डॅनींना खूप धीर देणारे होते. मेरे अपनेनंतरची डॅनी यांच्या करिअरमधली आणखी एक महत्त्वाची फिल्म ठरली धुंद. फिल्ममधला निष्ठूर आणि निर्दयी नवरा डॅनींनी खुबीने साकारला.
‘चोर मचाए शोर’, ‘खोटे सिक्के’, ‘काला सोना’ अशा सिनेमात त्यांनी यादगार भूमिका साकारल्या. खलनायकाच्या भूमिकेत ‘अंदर बाहर’, ‘आंधी तूफान’, ‘भगवान दादा’, ‘अग्निपथ’, ‘हम’, ‘घातक’, ‘क्रांतीवीर’ अशा अनेक सिनेमांमध्ये डॅनींनी अमिताभ, धमेंद्र ते सनी देओलपर्यंतच्या नायकांना शह दिला.
‘अग्निपथ’मधला कांचा चीना किंवा ‘घातक’मधला कातिया यांच्या क्रूरपणा आणि निर्दयतेने प्रेक्षकांचा थरकाप उडवला. हिरोइतकाच भाव खाऊन गेला डॅनींना साकारलेला व्हिलन.
याच दरम्यान रमेश सिप्पी ‘शोले’ बनवत होते. ‘शोले’च्या गब्बरसाठी सिप्पींची पहिली पसंती डॅनींना होती. पण त्यावेळी डॅनी फिरोज खान यांची धर्मात्मा फिल्म करत होते. धर्मात्मासाठी आधीच तारखा दिल्यामुळे डॅनींना शोले करणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे गब्बरची भूमिका अमजद खान यांच्या वाट्याला आली. गब्बरच्या भूमिकेबद्दल विचारताना डॅनी सांगतात की,
“मी फिरोज खान यांना आधी शब्द दिला होता. मी होकार दिला असता तर इंडस्ट्रीला अमजद खान यांच्या रुपात एक आयकॉनिक खलनायक मिळाला नसता. त्यामुळे शोलेच्या यशात माझाही वाटा आहे. त्यानंतर अमजद यांनी त्यांचं मानधन वाढवलं आणि मी सुद्धा. त्यानंतर कॅरॅक्टर आर्टिस्टचं मानधनही वाढू लागलं”. जया बच्चन डॅनींची एफटीआयआयमध्ये वर्गमैत्रिण होती. बच्चन्ससोबत त्यांचे खूप चांगले संबंध होते. पण तरीही डॅनींनी तब्बल १८ वर्षे अमिताभसोबत काम करणं टाळलं. त्याच कारण म्हणजे अमिताभ यांच्यासारख्या बड्या अभिनेत्यासमोर आपली भूमिका झाकोळली जाईल असं डॅनींना वाटलं होतं. पण जेव्हा मुकुल आनंद यांनी अग्निपथची कथा ऐकवली तेव्हा डॅनींना असा विश्वास वाटला की विजय दीनानाथ चौहानसमोर कांचा चीना दुर्लक्षित राहाणार नाही आणि झालंही अगदी तसंच..डॅनींचा कांचा चीना आजही एक अजरामर व्हिलन आहे.
‘अग्निपथ’च्या सेटवरचा एक किस्सा असाही आहे की शूटिंगसाठी सारं युनिट मॉरिशसला रवाना झालं. सकाळी साडे आठ वाजता मेकअप करुन सारे कलाकार तयार झाले. पण अजून डॅनींना स्क्रिप्ट मिळाली नव्हती. मनात थोडा नव्हर्सनेस असल्यामुळे डॅनी अक्षरश: आपल्या असिस्टंटवर वैतागले. पाचच मिनिटात अमिताभ सुद्धा सेटवर पोहोचले. त्यांनी डॅनीचा चढलेला आवाज ऐकला होता. त्यामुळे अमिताभ डॅनीकडे गेले आणि म्हणाले की, मलाही आत्ताच स्क्रिप्ट मिळाली. आपण एकत्र रिहर्सल करुया. आणि इथून मैत्रीचं एक नवं पर्व सुरु झालं. त्यानंतर अमिताभसोबत डॅनींनी हम, खुदा गवाहमध्ये एकत्र काम केलं. सनम बेवफा आणि खुदा गवाह या सिनेमात डॅनींनी हिंदी भाषेवर घेतलेली मेहनती उपयोगी पडली. या दोन्ही फिल्मसाठी डॅनींना सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डॅनी यांनी केवळ निगेटीव्ह भूमिकाच केल्या असं नाही तर सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही तितक्याच सहजतेने साकारल्या. हिंदी सोबतच अनेक नेपाळी, तेलगू आणि तमिळ भाषेतही डॅनींनी काम केलं. अनेक फिल्मसाठी त्यांना फिल्मफेअरचे नॉमिनेश मिळाले. अभिनयासोबतच डॅनी उत्तम लिहितात. त्यांनी फिर वही रात आणि राम या दोन सिनेमांचं दिग्दर्शनही केलं.
डॅनींचं फिमेल फॅन फॉलोईंग जबरदस्त होतं. इतकंच नाही तर काही मेल फॅन्सही त्यांना रक्ताने पत्र लिहायचे आणि त्यांना गुरु मानल्याचं सांगायचे. दरम्यानच्या काळात डॅनी यांच्या आयुष्यात आली परवीन बाबी. परवीन आणि डॅनी चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्याकाळी ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर परवीन कबीर बेदींच्या प्रेमात पडली आणि हे नातं तुटलं. ब्रेकअपनंतरही परवीन त्यांच्या घरी येत राहिली. पण त्यावेळी डॅनींची नवी गर्लफ्रेण्ड असलेल्या किमला हे रुचलं नाही. काही दिवसांतच परवीन स्किझोफेनियाची रुग्ण असल्याचंही समोर आलं. त्यावेळी डॅनी यांचं सिक्किमची प्रिन्सेस गावा डॅन्ग्झोपासोबत लग्न झालं होतं. तर परवीनच्या आयुष्यात महेश भट आले होते. पण दिवसेंदिवस परवीनचा आजार बळावत राहिला. एकेकाळी सतत ग्लॅमरच्या वलयात राहिलेल्या परवीनने एकाकीपणे जगाचा निरोप घेतला. परवीनच्या अंत्यविधीवेळी उपस्थिती असणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये डॅनी होते. डॅनी यांना मनमोहन देसाईंनीही अनेकदा सिनेमासाठी विचारलं होतं. पण दरवेळी डॅनी नकार देत राहिले. डॅनींना देसाईंबद्दल आदर होता पण तरीही एकदा त्यांनी स्पष्टपणे देसाईंना सांगितलं की तुमचे सिनेमे इंडस्ट्रीला आणखी २० वर्षे मागे नेतात. तुम्ही एक हिट सिनेमा देता आणि मग बाकी सारे तुम्हाला फॉलो करतात. ते ऐकून देसाईंनीही त्यांना अगदी ठेवणीतलं ऐकवलं. पण डॅनी स्पष्टवक्ता होते. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी भारंभार सिनेमे अजिबात केले नाही. पण जे सिनेमे केले त्यातून आपले फॅन्स नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली. डॅनींनी नेहमी स्वत:च्या अटींवर काम केलं. डॅनी उत्तम अभिनेताच नाही तर उत्तम पेंटर आणि गायकही आहेत. ते उत्तम बासरी वाजवतात. डॅनींनी लतादीदी, आशाताई, रफी, किशोर कुमार अशा अनेक दिग्गज गायक – गायिकांसोबत गाणी गायली आहेत. काही नेपाळी सिनेमांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं आहे.
काळ मागे सरत राहिला पण डॅनी यांची जादू ओसरली नाही. बदलत्या काळातही नव्या पिढीसोबत डॅनी काम करत राहिले. पुकार, अशोका, १६ डिसेंबर, चायना गेट, लक, रोबोट, जय हो, मेरी कोम, बँग बँग अशा अलीकडच्या काळातल्या सिनेमातही डॅनी यांनी आपली छाप सोडली आहे.
डॅनींनी काही इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्येही काम केलं. २००३ साली भारत सरकारने डॅनींना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. डॅनी आजही मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घेत ते पर्वतरांगांमधल्या शांततेत रमतात. घरातल्या बागेत त्यांचा अधिकाधिक वेळ जातो. साठी उलटल्यानंतरही फिटनेसच्या बाबतीत आजच्या यंग स्टार्सनाही डॅनी मागे टाकतात. केवळ हिंदी सिनेमातला खलनायक इतकीच डॅनी यांची ओळख मर्यादित राहात नाही. डॅनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कानन देवी यांचे नाव 'कानन बाला' होते. कानन देवी यांचा जन्म बंगाली परिवारात झाला. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ रोजी झाला. आपल्या वडिलाच्या निधनामुळे लहानपणीच आईला मदत करू लागल्या होत्या. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी 'ज्योति स्टूडियो' निर्मित 'जयदेव' या बंगाली चित्रपटात काम केले. १९३४ साली आलेल्या मा या चित्रपटापासून नाव झाले. नंतर कानन देवी मुंबईला आल्या व न्यू थिएटर मध्ये हिंदी चित्रपटात गाणे व अभिनय असे दोन्ही काम करू लागल्या, त्या साठी उस्ताद अल्ला रखा व भीष्मदेव चटर्जी याच्याकडून संगीताचे धडे घेऊ लागल्या. १९३७ मध्ये आलेल्या 'मुक्ति' या चित्रपटाने कानन देवी यांना न्यू थिएटरच्या पहिल्या कलाकारा मध्ये नेऊन बसवले. १९४१ मध्ये कानन देवी यांनी न्यू थिएटर सोडले व स्वतंत्रपणे काम करू लागल्या. १९४२ साली आलेल्या 'जवाब' हा चित्रपट कानन देवी यांचा सर्वाधिक हिट समजला जातो. यातील "दुनिया है तूफान मेल", हे गाणे खूपच गाजले. या नंतर कानन देवी यांचे 'हॉस्पिटल', 'वनफूल' व 'राजलक्ष्मी' असे हिट चित्रपट आहे.
१९४८ साली आलेला 'चंद्रशेखर' हा कानन देवी यांचा शेवटचा चित्रपट. ज्यात अशोककुमार हिरो म्हणून होते. १९४९ मध्ये कानन देवी यांनी 'श्रीमती पिक्चर्स' या नावाखाली वामुनेर में, अन्नया, मेजो दीदी, दर्पचूर्ण, नव विद्यान, आशा, आधारे आलो, राजलक्ष्मी ओ श्रीकांता, इंद्रनाथ, श्रीकांता, औ अनदादीदी या चित्रपटांची निर्मीती केली होती. १९७६ साली त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. कानन देवी या पहिल्या बंगाली अभिनेत्री होत्या ज्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी साठ चित्रपटात काम केले. त्यांचे उल्लेखनीय चित्रपट 'जयदेव', 'प्रह्लाद', 'विष्णु माया', 'माँ', 'हरि भक्ति', 'कृष्ण सुदामा', 'खूनी कौन', 'विद्यापति', 'साथी', 'स्ट्रीट सिंगर', 'हार-जीत', 'अभिनेत्री', 'परिचय', 'लगन', 'कृष्ण लीला', 'फैसला' और 'आशा'.
कानन देवी यांनी अभिनय व पार्श्वगायन या दोन्ही क्ष्रेतात नाव कमवले होते. कानन देवी यांचे १७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ पार्श्वगायक व सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला.त्यांचे वडील जाफर खान हे स्वतः एक अष्टपैलू कलाकार व गायक होते. त्यामुळे लहानपणापासूनच उस्ताद अब्दुल खान यांच्यावर संगीत व गायनाचे संस्कार झाले होते. अब्दुल खान यांना संगीत आणि वाद्य वादनाची प्रचंड आवड होती. अब्दुल खान यांनी सतार वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली व रागांवर आधारीत एका कार्यक्रमात अब्दुल खान यांच्या सतारवादनाचे प्रसिद्ध भारतीय संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी कौतुक केले होते. उस्ताद खान यांनी सतारवादनात स्वतःचा `जाफरखानी’ बाज निर्माण केला होता. तसेच त्यांनी संगीत जगतात स्वतःची एक स्वतंत्र सतारवादनाची शैलीही त्यांनी निर्माण केली होती. हिंदी सिनेसृष्टीतील फिरोज निजामी, अनिल-विश्वास, शंकर-जयकिशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई आदी दिग्गज संगीतकारांसोबत काम केले. `मधुबन मे राधिका नाचे रे’, `ये जिंदगी उसी की हैं’, या चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यातील सतार वादन उस्ताद अब्दुल खान यांनी केले. तसेच `मुगल-ए-आझम’, `झनक झनक पायल बाजे’ या भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यातील त्यांच्या सतार वादनाने गाण्यांना एक उंची मिळाली. मा.अब्दुल खान यांच्या सतार वादनाच्या दिलखेच शैलीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. सतारवादनाच्या क्षेत्रातली त्रिमूर्ती म्हणजे रविशंकर, विलायत खान आणि अब्दुल हलीम जाफर खान. पं.रवीशंकर, उस्ताद विलायतखान आदी दिग्गज व प्रसिद्ध सतारवादकांच्या बैठकीत अब्दुल हालीम जाफर खान यांना मानाचे स्थान मिळाले. तसेच त्यांच्या बरोबरीने उस्ताद अब्दुल खान यांचे नाव घेतले जाऊ लागले. तसेच भारतीय सिनेसृष्टीसाठी उस्ताद खान यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. उस्ताद अब्दुल खान यांना संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, जीवन गौरव,`पद्मश्री’, `पद्मभूषण’ यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मा.अब्दुल हलीम जाफर खान यांनी लहान वयात यश आणि कीर्ती संपादित केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अथक परिश्रम आणि अचाट कल्पनाशक्ती. सतारवादन ध्रुपदाच्या अंगाने करणारी एक शैली आहे. रविशंकर या अंगाने वाजवत. विलायत खान गायकी अंगाने वाजविण्याचा दावा करीत. त्यांची शैली ही मध्यसप्तकप्रधान आहे. मा.हलीम खान यांनी आपली स्वतंत्र शैलीच निर्माण केली. सतारीतून वेगवेगळे नाद निर्माण करणारी, सतारीची भाषा समृद्ध करणारी आणि अधिकाधिक सांगू पाहणारी. पुढे त्यांनी त्याला ‘जाफरखानी बाज’ असे नाव दिले. मा.हलीम खान यांनी दक्षिण भारतीय संगीतातील अनेक राग हिंदुस्तानी पद्धतीत आणले. ‘किरवाणी’, ‘लतांगी’, ‘कनकांगी’ वगैरे राग यापूर्वी आपल्याला अपरिचित होते. त्यांची चित्रपट संगीताच्या क्षेत्रातली कामगिरी अतुलनीय आहे. सर्व प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले आणि गाण्यांचे माधुर्य वाढविले. सतारवादनाची कला त्यांनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता १९७६ ला मुंबईत `हलिम अकादमी ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सतारवादन शिकविले. जुनेन खान, राजेंद्र वर्मन, हरीशंकर भट्टाचार्य, रवींद्र चारी, झुबेर शेख आदी शिष्य परिवारातील काही ठळक नावे आहेत.
उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ते अगदी सामान्य जीवन जगले. तसेच पुरस्कार व प्रसिद्धीपेक्षा त्यांनी कलेलाच अधिक महत्त्व दिले. ते अखेरपर्यंत कलेची निष्ठेने सेवा करत राहिले. मा.अब्दुल हलीम जाफर खान यांचे ४ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव) येथे झाला.
‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार व पारतंत्र्यात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते नाना पाटील हे ‘येडे मच्छिंद्र’ येथेच व्हर्नाक्युलर फायनल ही त्या काळी असणारी मराठी सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हा त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव होता नंतर ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले.
नोकरी सांभाळत त्यांनी गावोगावी सभा घेऊन समविचारी तरुणांच्या संघटना बांधल्या. ते आपले भाषण रोजच्या व्यवहारातील दाखले, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी शैली, विनोदाची पेरणी यांच्या आधारावर प्रभावी करत. त्यामुळे ते साहजिकच लोकप्रिय वक्ते झाले. त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्याचवेळी ( १९३० मध्ये) म.गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चालवलेल्या असहकाराच्या चळवळीने त्यांना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आणले. त्यांनी असहकाराच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक कॉंग्रेस कमिटीमध्येही कार्यकर्ते म्हणून त्यांची निवड केली गेली. ‘छोड़ो भारत’ या कॉंग्रेसच्या घोषणेनंतर देशभर उठाव झाला. इतर कालखंडांतील चळवळीपेक्षा अगदी वेगळ्या लढ्याचा, तंत्राचा, पुढारीपणाचा आणि विचारांचा आविष्कार त्यावेळी झाला होता. त्याच क्रांतिकारक आविष्काराचे नवीन प्रतीक म्हणजे – पत्रीसरकार!
समांतर सरकार सातारा, सांगली, वाळवे या भागात शेतकरी गढ्यांमध्ये उभे राहिले (तशाच प्रकारचा पण जरासा निराळा प्रकार बंगालच्या मिदनापूर भागात उभा झाला होता). त्याचे प्रतीक होते नाना पाटील. म्हणून ते ‘क्रांतिसिंह’ नाना पाटील असे ख्यातनाम झाले. स्वातंत्र्यचळवळीच्या नवीन प्रकाराची व प्रतीकाची अशी काही अपूर्व चिन्हे होती, की त्याने महाराष्ट्र मनाची चांगलीच पकड घेतली होती. पहिले म्हणजे सत्याग्रह, अहिंसा वगैरेंची गांधीवादी बंधने पत्री सरकारने गुंडाळून बाजूला ठेवली होती. दुसरे, त्यांनी स्वत:ला ‘सरकार’ म्हणून जाहीर केले आणि ‘मावळ’ प्रांतातील गढ्यांतून ब्रिटिश राजवट संपली असा अंमल बसवला.
तिसरे, स्वत:ला ‘सरकार’ म्हणून घोषित केल्यावर आपली स्वतंत्र अशी हत्यारी सेना असावी लागते, म्हणून पत्रीसरकारने अशी ‘हत्यारबंदी’ उभी केली. भाले-बरच्या, लाठी-काठीपासून ते बंदुकीपर्यंत. चौथे, ‘सरकार’ चालवायला पैसा लागतो. त्यासाठी इंग्रजांचे खजिने लुटले(उदाहरणार्थ, धुळ्याचा दरोडा) आणि पाचवे म्हणजे या ‘सरकार’चा मुख्य पाया शेतकरी हा झाला होता. त्यामुळे शेतकरी विमोचनाचे काही प्रश्न ताबडतोब सोडवण्यात आले. सावकारी व मोठ्या जमीनधारकांची गुंडगिरी नष्ट केली गेली होती. त्यांना साहाय्य करणार्या गावगुंडांचा नि:पात केला गेला होता. त्यांना शिक्षा देण्यात आल्या होत्या. शिक्षेचा एक प्रकार ‘पत्री मारणे’ हा होता. अनेकांना गोळ्या घालून देहदंडही करावा लागला होता. त्यामुळेच या ‘सरकार-सत्ते’ला खरा लढाऊ, विश्वासू ‘मास बेस’ लाभला होता. तेथूनच नानांना ‘क्रांतिसिंह’ हे बिरुद्ध चिकटले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या घरादाराकडे पाठ फिरवली ती १९३० साली, तीही कायमची. त्यांची पत्नी तारुण्यात निधन पावली. त्यांनी पुन्हा लग्न न करता देशाचा संसार हा आपला संसार मानला.
नाना पाटील १९४२ च्या क्रांतीपू्र्वी एकूण आठ वेळा तुरुंगात गेले होते. पण १९४२ च्या ८ ऑगस्टच्या ‘करेंगे या मरेंगे’ या महात्मा गांधीच्या आदेशानंतर नाना पाटील व त्यांच्या सहकार्यांानी ‘आता पोलिसांच्या ताब्यात जायचे नाही’ असे ठरवले. महात्मा गांधी यांनीच ‘करेंगे या मरेंगे’ या आदेशानंतर सांगितले होते, की जर राष्ट्रीय नेते तुरुंगात गेले तर प्रत्येक भारतीयाने स्वत:स स्वतंत्र समजून आपल्या स्वत:च्या बुद्धीला पटेल त्यानुसार इंग्रजांना घालवून देण्याची चळवळ उभारावी. त्याप्रमाणे नाना पाटील यांनी १९४४ मध्ये त्यांची व महात्मा गांधींची पाचगणीस भेट झाली तेव्हा त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले.
त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्या्ने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.’ . प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.
नाना पाटील यांच्या या ‘प्रतिसरकार’चे लष्करी व पोलिसी अंग म्हणजे ‘तुफान सेना’ हे होते. जर्मनीच्या हिटलरची ‘storm troopers’ व नेताजी सुभाषचंद्र यांची ‘आझाद हिंद सेना’ हे लष्करी संघटनांचे आदर्श समोर ठेवून नाना पाटील व त्यांचे सहकारी जी.डी. लाड, अप्पासाहेब लाड, नागनाथ नायकवडी, राजुताई पाटील इत्यादींनी ‘तुफान सेने’ची निर्मिती (१९४३-४४) केली. जी.डी. लाड हे ‘तुफान सेने’चे फिल्ड मार्शल होते. ‘तुफान सेने’च्या सैनिकांपुढे त्या काळच्या अनेक नामवंतांची व्याख्याने व बौद्धिके होत असत. अच्युतराव पटवर्धन व साने गुरुजी यांचेही मार्गदर्शन ‘तुफान सैनिकां’ना झालेले आहे अशी आठवण भाई भगवानराव पाटील यांनी सांगितली आहे.
नाना पाटील भूमिगत अवस्थेत ज्या ज्या मंडळींकडे आश्रयाला असत तेव्हा ते त्यांना सांगत, की ‘माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर मला लगेच पुरून टाका. फक्त सुरेशबाबूंस सांगा. (म्हणजे नाथाजी लाड. ते क्रांतिसिंहांचे चिटणीस होते. तसेच १९४२च्या लढ्यातील भूमिगत नेतेही होते. त्यांचे भूमिगत अवस्थेतले टोपणनाव) चळवळीतील इतर कोणासही ते कळता कामा नये. चळवळ जिंवत राहिली पाहिजे.’
मुंबईचे प्रख्यात असे बंड म्हणजे आपल्या आरमाराचे.
नाविकांच्या संपाचे, फेब्रुवारी १९४६ मधील; त्या दिवशी मुंबईच्या कम्युनिस्ट पक्षाने सार्वत्रिक संपाची हाक दिली. त्या वेळेस मुंबईतही क्रांतिसिंह यांच्या ‘पत्रीसरकारची’ झाक येऊन गेल्याची आठवण कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी सांगितलेली आहे. ‘पत्रीसरकार’च्याच विरुद्ध कॉंग्रेस सत्तेने संपूर्ण सत्तांतर व्हायच्या अगोदरच पत्री मारून हुकूम काढला, की हत्यारे ताबडतोब सरकारजवळ द्या, नाहीतर सरकारी फौज पाठवू. एवढ्यावरच न थांबता काहींना बेरड, दरोडेखोर, खूनी ठरवून फाशी देण्यात आले. असे डांगे यांनी १२ डिसेंबर १९७६ च्या साप्ताहिक ‘युगांतर’मध्ये लिहिले आहे.
पुढे, नाना पाटील व त्यांच्या मित्रांनी ‘शेतकरी कामगार पक्षाचे’ स्वरूप घेतले. नंतर ते कम्युनिस्ट पक्षातही दाखल झाले. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथ अण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
नाना पाटील सातारा व बीड या मतदारसंघातून अनुक्रमे १९५७ व १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकींतून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्त्व केले. दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहाला मदत केली.
नाना पाटील सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा चळवळींमध्ये अखेरपर्यंत कार्यरत राहिले. नाना पाटील यांचे ६ डिसेंबर १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
लोकेश गुप्ते हे नाव छोट्या पडद्यावर तसेच चित्रपट नाटकांतून अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या परिचयाचे आहे. लोकेश गुप्ते ह्यांच्या अभिनयाची सुरूवात विनय आपटे ह्यांच्या अभिनेत्री नाटकांना झाली.
लक्ष्मीकांत बेर्डे हे हे मराठी रंगभूमी व चित्रपट तसंच हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता होय, त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ ला झाला.लहानपणापासूनच लक्ष्मीजींना विविध कलांची आणि अभिनयाची आवड असल्यामुळे गणेशोत्सवात व इतर सार्वजनिक कार्यक्रमा व महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये भाग घेत आणि त्यामध्ये अनेकवेळा पारितोषिके पटकावली होती.
महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ आजगावकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी झाला.
'कवन-कुतूहल' (पद्यरचना), “प्रणय विकसन”, “प्रणयानंद” ही नाटके आणि “मुकुंदराजाचा सार्थ-परमाकृत” हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके त्यांनी लिहिली.
Jagannath Raghunath Ajgaonkar
प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांचे नाव उच्चारताच डोळयांसमोर अनेक व्यक्तिरेखा उभ्या राहतात. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी झाला. लखोबा लोखंडे, औरंगजेब, प्रो. विद्यानंद अशा कितीतरी भूमिका पंतांनी आपल्या अभिनय सामर्थ्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. प्रल्हाद केशव अत्रेलिखित 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे मा.प्रभाकर पणशीकर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. 'इथे ओशाळला मृत्यू' ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखील पंतानी अजरामर केली. जवळजवळ ५० वर्षे मा.प्रभाकर पणशीकर यांनी रंगभूमीची इमाने-इतबारे सेवा केली. घरच्यांचा विरोध पत्करूनही पंत या क्षेत्रात उतरले होते. 'हा तोंडाला रंग फासून घरच्यांच्या तोंडाला काळं फासतो', असा घरच्यांनी आरोप करूनही पंतांचे चित्त विचलीत झाले नाही. सुरुवातीला मो. ग. रांगणेकर यांच्या 'नाटयनिकेतन' संस्थेत पंत पडेल ते काम करत राहिले. एखाद्या कलाकाराच्या गैरहजेरीत पंतांना त्या कलाकाराची भूमिका करणे भाग पडायचे. पण ह्या भूमिका अगदीच नगण्य होत्या आणि त्यामुळे त्या भूमिका करणारे प्रभाकर पणशीकर लोकांच्या लक्षात राहणे शक्यच नव्हते. तरीही पोटापाण्याकरता पंत पडेल ते काम करत राहिले. 'राणीचा बाग', 'कुलवधू' यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्यावर मात्र पणशीकर नाटयनिकेतन मध्ये चांगलेच स्थिरावले. 'तो मी नव्हेच' हे आचार्य अत्रे लिखित नाटक जेव्हा नाटयनिकेतन संस्थेतर्फे करायचे ठरले. तेव्हा नाटकातील प्रमुख भूमिका करणारा नट हा संस्थेतला असावा म्हणजे तो आपल्या आवाक्यात राहील, अशा धोरणी भूमिकेतून पणशीकरांनीच ही भूमिका करावी असा रांगणेकरांनी हट्ट धरला. आचार्य अत्रेंना सुरुवातीला हा निर्णय मान्य नव्हता. पण रांगणेकरांच्या हट्टापुढे अत्रेंचे काही चालले नाही आणि ती भूमिका पणशीकरांना मिळाली. नंतर मात्र 'तो मी नव्हेच' मधला खलनायकी लखोबा लोखंडे पणशीकरांनी असा काही रंगवला की, लखोबा लोखंडे आणि पणशीकर यांचे घट्ट नातेच बनले. प्रभाकर पणशीकरांशिवाय 'तो मी नव्हेच' या नाटकाचा विचार करणे त्या काळीही कोणाला शक्य झाले नाही. 'तो मी नव्हेच'चा फिरता रंगमंच ही पंतांची कल्पना. भूतकाळातील कोणतीही घटना ते इतक्या तपशिलवार सांगत की जणू त्या घटना कालपरवाच घडल्या असाव्यात. बरोबरीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे अशी पंतांची ख्याती होती. नाटकांच्या निमित्ताने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला होता. वसंत कानेटकरांचं 'इथे ओशाळला मृत्यू' हे नाटक त्यांनी संभाजीला न्याय मिळावा याकरता लिहिलं. पण प्रत्यक्षात जेव्हा ते रंगभूमीवर उभं राहिलं तेव्हा मात्र नाटकाचा पूर्ण प्रकाशझोत औरंगजेबाच्या भूमिकेतील पंतांवर स्थिरावला. संभाजीपेक्षाही त्या नाटकात औरंगजेब प्रभावी ठरू लागला. याविषयी त्यांना विचारताच ते म्हणत की, औरंगजेबाची भूमिका करताना त्या भूमिकेचा प्रत्येक पैलू समजून घेऊन तो लोकांसमोर यावा याकरता मी प्रयत्न केला होता. 'अश्रूंची झाली फुले' या नाटकातील प्रो. विद्यानंद मा.पणशीकरांनी खूपच सुंदर साकार केला होता. ज्या काळी नाटकांचे दौरे करणं आजच्याइतकी सुखाची बाब नव्हती तेव्हापासून आत्तापर्यंत पंतांनी 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे तब्बल ११११ प्रयोग केले आहेत. प्रा. विद्यानंद याची मानसिक द्विधावस्था खूप चांगल्या प्रकारे सादर केली होती. तसेच 'कटयार काळजात घुसली'च्या निमित्ताने संगीत नाटकाचं पुनरुज्जीवन हेही पंतांचं रंगभूमीला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन.
'तो मी नव्हेच'च्या अभूतपूर्व यशानंतर पणशीकरांनी मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या साथीने 'नाटयसंपदा' ही नाटय संस्था स्थापन केली. 'अश्रूंची झाली फुले', 'कटयार काळजात घुसली', 'इथे ओशाळला मृत्यू', 'थँक्यू मि. ग्लाड', 'मला काही सांगायचंय' यांसारखी नाटकं त्यांनी नाटयसंपदा या आपल्या संस्थेद्वारे रंगभूमीवर आणली. 'कट्यार काळजात घुसली' हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. चार मराठी चित्रपट, चार मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे राज्य रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. मा.प्रभाकर पणशीकर यांचे १३ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
प्रभाकर पणशीकर यांची नाटके
मोहिनी, मदनाची मंजिरी, अमृत झाले जहराचे, सुवर्णतुला, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू. कट्यार काळजात घुसली, इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, वीज म्हणाली धरतीला, संत तुकाराम, तो मी नव्हेच, विकत घेतला न्याय, महारामी पद्मिनी, लागी करेजवा कटार (हिंदी), होनाजी बाळा, बेईमान, प्रश्नक नाजूक आहे, तो राजहंस एक, त्या कातरवेळी, तीन लाखांची गोष्ट, थॅंक यू मि. ग्लाड, तुझी वाट वेगळी, राजसन्यास, भटाला दिली ओसरी, पुत्रकामेष्टी, मी मालक या देहाचा, निष्पाप, अवनु नानल्ला (कानडी-तो मी नव्हेच), जिथे गवतास भाले फुटतात, किमयागार, घर अण्णा देशपांडेंचं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti