जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्घ होते. आर्. एन्. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी. रामचंद्र व अण्णासाहेब अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. वडिलांची ठिकठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीताची अतोनात आवड होती. नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले. ‘न्यू थिएटर्स’ च्या चित्रपटांतल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्या स्वरलिप्या (नोटेशन्स) बनविणे हाही त्यांचा एक छंद होता. चित्रपटात काम करण्याचीही त्यांना ओढ होती. नागानंद ह्या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; परंतु तो चित्रपट यशस्वी झाला नाही. प्रसिद्घ चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक सोहराब मोदी ह्यांच्या ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ ह्या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियमवादनाचे काम त्यांना मिळाले आणि संगीतदिग्दर्शनाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. तेथे हूगन आणि मीरसाहेब ह्या संगीतकारांशी त्यांचा संबंध आला. हूगन हे पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवीत. त्यांच्या संगतीने सी. रामचंद्रांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज त्यांना आला. हूगन ह्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या चालींच्या स्वरलिप्या तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्या करताना स्वतःला सुचलेले नवीन काही ते त्यांत घुसडून देत. हूगन ह्यांच्याकडून त्याबद्दल कधी आक्षेप आला नाही. मीरसाहेबांचे बनारसी पद्घतीच्या गायकीवर प्रभुत्व होते. चाली कशा बांधतात ह्याचे प्रात्यक्षिकच ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ मध्ये सी. रामचंद्रांना मिळाले. थोर संगीतकार अनिल विश्वास ह्यांनी हिंदी संगीतात पाश्चात्त्य संगीताचे स्वर बेमालूमपणे मिसळण्याचे तंत्र आत्मसात केले होते. त्यांच्या चालींचे संस्कारही सी. रामचंद्रांवर झाले. पाश्चात्त्य संगीताचा बाज, सुरावट व वाद्यवृंद हिंदी सिनेसंगीतात आणण्याचे व लोकप्रिय करण्याचे श्रेय मुख्यत्वे सी. रामचंद्र यांच्याकडे जाते. त्याच वेळी भारतीय संगीतातील गोडवा व सुरावटही त्यांनी आपल्या संगीतातून जपली. हिंदी स्टंटपटांतून काम करणारे अभिनेते मा. भगवान ह्यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे त्यांना जयक्कोडी हा तमिळ चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी मिळाला. त्यांचे संगीत असलेला हा पहिला चित्रपट. त्यानंतर वनमोहिनी हा आणखी एक तमिळ चित्रपट त्यांना मिळाला. मा. भगवान यांच्या सुखी जीवन ह्या चित्रपटातील ‘सारे जहाँसे अच्छा’ ह्या गीतामुळे संगीतकारांच्या जगात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. ‘जयंत देसाई प्रॉडक्शन्स’ चे जबान, मनोरमा, ललकार, चंद्रगुप्त असे काही चित्रपटही त्यांनी केले. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कवी प्रदीपजी ह्यांच्यामुळे शशीधर मुखर्जी ह्यांच्या ‘फिल्मिस्तान’ ह्या चित्रपटसंस्थेत सी. रामचंद्रांचा प्रवेश झाला. या चित्रपटसंस्थेच्या शहनाई ह्या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत-विशेषतः त्यातील ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणे-अत्यंत लोकप्रिय झाले. ह्या चित्रपटामुळे त्यांचे नाव भारतभर झाले. अनेक चित्रपट त्यांच्याकडे आले. मा. भगवान ह्यांच्या अलबेला ह्या अफाट लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यातील ‘भोली सूरत दिलके खोटे’, ‘शोला जो भडके’ , ‘शाम ढले खिडकी तले’, ‘मेरे दिल की घडी करे टिक टिक’, ‘ओ बेटाजी ओ बाबूजी’ ही गाणी अतिशय गाजली. त्यांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. विशेषतः ‘धीरे से आजा रे अखियनमे निंदिया’ ही लोरी (अंगाई गीत) हिंदी चित्रपटांतल्या गाजलेल्या अविस्मरणीय लोरींपैकी एक मानली जाते. त्यानंतर फिल्मिस्तानच्या अनारकली ने यशाचा उच्चांक गाठला. या यशात सी. रामचंद्रांच्या संगीताचा वाटा सर्वाधिक होता. ‘ये जिंदगी उसीकी है’ हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत अवीट गोडीमुळे अजरामर ठरले. आझाद, इन्सानियत, तिरंदाज, यास्मिन, शहनाई, नवरंग, नास्तिक, झांझर, शिनशिनाकी बबला बू, दुनिया गोल है हे त्यांच्या संगीत दिग्दर्शना-खालील काही उल्लेखनीय चित्रपट होत. त्यांपैकी झांझर व दुनिया गोल है यांची निर्मिती त्यांनी १९५५ मध्ये अभिनेते ओमप्रकाश यांच्याबरोबर ‘न्यू साई प्रॉडक्शन्स’ तर्फे केली होती. तिरंदाज व यास्मिन या चित्रपटांच्या संगीतात त्यांनी अरबी संगीताचा कौशल्यपूर्ण वापर केला होता.
सी. रामचंद्र यांनी संगीतबद्घ केलेली काही हिंदी चित्रपटगीते उत्कृष्ट व अविस्मरणीय ठरली. उदा. ‘जाग दर्दे इष्क जाग’ , ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’, ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘देख तेरे संसार की हालत’, ‘ कैसे आऊँ जमुना के तीर’, ‘कितना हसीन है मौसम’ , ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ , ‘इना मिना डिका’, ‘कटते है दुख मे ये दिन’ व ‘तुम क्या जानो, तुम्हारी याद मे’ , ‘आँखो मे समा जाओ, इस दिलमें रहा करना’, ‘जलनेवाले जला करे’ इत्यादी. मा.सी. रामचंद्र यांनी हिंदीबरोबरच काही मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले. सुरूवातीच्या काळात आर्. एन्. चितळकर या नावाने त्यांनी काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायिली. १९६० च्या दशकात त्यांनी धनंजय व घरकुल हे मराठी चित्रपट निर्माण केले, त्यांना संगीत दिले व त्यांत प्रमुख भूमिकाही केल्या. घरकुल मधील गाणी, विशेषतः ‘पप्पा सांगा कुणाचे’ हे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु ह्यांच्या उपस्थितीत सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर ह्यांच्या आवाजात दिल्ली येथे २७ जानेवारी १९६३ रोजी सादर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ह्या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. कवी प्रदीपजींनी भारत-चीन युद्घाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या भावोत्कट गीतात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याचे आवाहन सर्व भारतीयांना केलेले आहे. मा.सी.रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे.
सी. रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मराठी विश्वकोश
January 5, 2017
किशोरी आमोणकर यांच्या जीवनपटावर एक नजर...
जन्म - एप्रिल १०, इ.स. १९३१ (मुंबई)
मृत्यू - 3 एप्रिल 2017 (मुंबई)
पारिवारिक माहिती
आई मोगूबाई कुर्डीकर
वडील माधवदास भाटिया
जोडीदार रवी आमोणकर
संगीत साधना
प्रशिक्षण संस्था एलफिन्स्टन कॉलेज
गुरू मोगूबाई कुर्डीकर
गायन प्रकार :- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
घराणे जयपूर घराणे
गौरव
गौरव संगीत नाटक अकादमी फेलोशिप, इ.स. २००९
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९८५, पद्मभूषण पुरस्कार, इ.स. १९८७, संगीत सम्राज्ञी पुरस्कार, इ.स. १९९७, पद्मविभूषण पुरस्कार, इ.स. २००२, संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, इ.स. २००२
किशोरी आमोणकर या (एप्रिल १०, इ.स. १९३१ - हयात) ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका असून जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करीत होत्या. त्या एक श्रेष्ठ गायिका आहेत व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जाते.
किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे इ.स. १९३१ मध्ये झाला. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. इ.स. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. किशोरीताईंना दोन मुले आहेत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.
सांगीतिक कारकीर्द
किशोरीताईंनी इ.स. १९५० चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' (इ.स. १९६४) साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जात होते. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते.
शिष्य
माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात.
पुरस्कार
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९८५
पद्मभूषण पुरस्कार, इ.स. १९८७
संगीत सम्राज्ञी पुरस्कार, इ.स. १९९७
पद्मविभूषण पुरस्कार, इ.स. २००२
संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, इ.स. २००२
संगीत नाटक अकादमी फेलोशिप, इ.स. २००९
April 3, 2017
अरुण कोलटकर हे महाराष्ट्रातील बहुभाषिक कवी होते. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषेत कविता लिहिल्या आहेत.
December 15, 2010
चेतन आनंद दिग्दर्शित हिमालय फिल्म्सचा ‘हकिकत’ (१९६४) हा आपल्याकडचा सर्वोत्तम युद्धपट मानला जातो. १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चेतन आनंद यांनी ‘हकिकत’ घडवला आणि रसिकांना प्रचंड भावला देखील.
July 6, 2017
बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा, कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास असे.
May 4, 2022
अनेक स्पर्धांपैकी एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी आले होते. त्यांनी त्यांचा अभिनय पाहिला आणि बिनधास्त चित्रपटासाठी विचारले. ह्या चित्रपटामुळे त्यांची अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटासाठी त्यांना व्हिडिओकॉन स्क्रीन आणि फिल्मफेअरची अभिनयाची पारितोषिके मिळाली. पण त्यांचा पहिला चित्रपट मात्र ‘सरकारनामा’ हा होय. १९९९ मधील चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘बिनधास्त’ चित्रपटानं तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटामधील ‘वैजयंता’ ही भूमिका गाजली. ‘मायबाप’, ‘पाश’, ‘कायद्याचं बोला’, ‘सरकारनामा’, ‘मिशन चॅम्पियन’, ‘सावरखेड एक गाव’ हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट.
May 31, 2022
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
April 24, 2021
कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला. कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य करुण काव्य आहे. कोठा आणि तवायफ हा हिंदी चित्रपटांमध्ये तसा खूप वेळा येणारा विषय. केवळ याच विषयाला वाहिलेले चित्रपटही बरेच आहेत. पण भव्यतेचे आणि परिपूर्णतेचे कमालीचे आकर्षण असणार्या कमाल अमरोहींच्या दिग्दर्शनाने एरवी घिस्या-पिट्या विषयावरील या चित्रपटाला सौंदर्याचे एक वेगळेच मूल्य मिळवून दिले आहे. पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला.कमल अमरोही यांचे निधन ११ फेब्रुवारी १९९३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 17, 2017
आबासाहेब मुजुमदार हे स्व तः उत्ताम सतारवादक होते. तंतूवाद्यावर त्यांंची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनीटांत तंबोरा लावत असत. ब्रिटीश कालावधीत ते फर्स्ट क्लास सरदार होते. त्या काळात सरदार, इनामदार, जहागिरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब मुजुमदार त्यााचे प्रतिनिधित्वी करत.
February 1, 2022
शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. स्वप्नवत वाटणारं हे यश मिळवताना स्वप्नात देखील बहुदा तो गाण्याचाच विचार करत असतो. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे.
महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, जेव्हा त्याची आई शास्त्रीय संगीताचे तास घेत असे, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर मा.रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्याग अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे. दहावीच्या सुट्टीमध्ये महेश अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. गेल्यावर्षी जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले. लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत. कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला. भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. राहुल देशपांडे आणि महेश काळे हे दोघेही समृद्ध गायक आहेत. राहुलच्या अनुभवाचाही उपयोग महेशला नक्कीच झाला आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटात सदाशिवची भूमिका सुबोध भावे यांनी केली तरी महेश काळेनी सदाशिवची गाणी गायली. अरुणी किरणी या गीतामध्ये तर त्याने संपूर्ण चित्रपटाची झलकच प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. त्याचा आवाज, त्याची क्षमता आणि संगीताबद्दलची त्याची आसक्ती या गीतामधून आधोरेखित होते. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti