जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
साधारण २००० साली ‘निर्धार’या संस्थेच्या श्रीमती शीला पद्मनाभन यांनी नागरिकांना एक आवाहन केले की, त्यांना स्कूल गेट व्हॉलेंटियर हवेत. कल्पना अशी होती की, शाळा भरताना आणि सुटताना शाळेसमोरील रस्त्यावर हे कार्यकर्ते विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळतील आणि ट्राफिक कंट्रोल करतील. प्रभा नेने या आजींनी आपले नाव त्यासाठी नोंदवले आणि त्यांनी ह्या सेवेस सुरवात केली. सकाळी ७-७.३० वाजता सिंबायोसिस शाळेबाहेर उभ्या राहून बेशिस्त वाहतुकीतून मुलांना सुखरूप शाळेत वा रिक्षेपर्यंत पोहचवणे. प्रसंगी वाहतूक थाबवून मुलांना रस्ता करून देणे हे सुरु झाले.
भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला. भीमसेना यांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. व १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. उस्ताद अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खाँ, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले. अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले.
भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी १९३६ ते १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.
भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी ते ठुमरीही अतिशय छान गात. भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणार्याी संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते. आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्यास विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. महान गायक मा. भीमसेन जोशीं यांचे २४ जानेवारी २०११ निधन रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज ६ नोव्हेंबर..आज “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार यांची पुण्यतिथी.
जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला.
जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला. निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .
सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल. बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा र्वष. मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण मा.जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.
राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्हीठ. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्द र्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.
'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत. 'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून मा.जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते. मा.जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नारायणराव व्यास हे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य होते. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९०२ रोजी कोल्हापूर येथे झाला. ते ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. मा. नारायणराव व्यास यांचा जन्म संगीत उपासकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, काका हे कोल्हापुरात संगीत क्षेत्रात नाव कमावून होते. विख्यात संगीतकार व गायक शंकरराव व्यास हे नारायणरावांचे वडील बंधू होत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी लाहोर येथे विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केलेल्या गंधर्व महाविद्यालयात 'गुरुकुल' पद्धतीत संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिथे त्यांचे थोरले बंधूही संगीत शिकत होते. १९२२ मध्ये आपले संगीत शिक्षण संपवून दोन्ही बंधू अहमदाबाद येथे गंधर्व महाविद्यालयाच्या स्थानिक शाखेत संगीत शिकवू लागले. १९३७ मध्ये नारायणराव आपले थोरले बंधू शंकरराव यांच्यासमवेत मुंबईला आले व दादर येथे त्यांनी 'व्यास संगीत विद्यालय' नावाने संगीत शिक्षण संस्था सुरु केली. नारायणरावांच्या थोरल्या बंधूंनी संगीत दिग्दर्शक म्हणून तेव्हाच्या चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. परंतु नारायणरावांनी तो मार्ग चोखाळला नाही. त्यांनी संगीत अध्यापन व गायकी कायम ठेवली. ते आकाशवाणीवरही गायचे. त्यांनी भारतातील अनेक संगीत मैफिली, महोत्सव आपल्या गायनाने गाजवले. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी भारतात खूप दौरे केले. रसिक श्रोत्यांना त्यांचे गाणे प्रचंड आवडत असे. त्यांच्या काळातील ते एक लोकप्रिय गायक होते. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन एच. एम. व्ही. ने त्यांना १९२९ मध्ये ध्वनिमुद्रणासाठी बोलावले. १९२९ ते १९५५ ह्या काळात त्यांनी ७८ आर.पी.एम. च्या १५० ध्वनिमुद्रिकांमध्ये साधारण प्रत्येकी तीन ते साडे-तीन मिनिटांचा कालावधी असलेली ३०० गाणी गायली. ही गाणी हिंदी भाषा, मराठी व गुजराती भाषांतील होती. नारायणरावांनी त्यांत हिंदुस्तानी रागांवर आधारित व वडील बंधू शंकररावांनी रचलेल्या मराठी बंदिशी आणि भजने गायली. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांचे व एच. एम. व्ही. कंपनीचे नाव सर्वदूर झाले. ठिकठिकाणच्या ध्वनिमुद्रिका वितरकांनी आपल्याकडील सूचीपत्रकांवर नारायणरावांचे फोटो छापले. त्यांना 'तान कप्तान', 'संगीत प्रवीण', 'आधुनिक तानसेन' अशा पदव्या देऊन लोकांनी त्यांचे सत्कार केले. वृद्ध वयातही नारायणराव व्यास संगीत क्षेत्रात कार्यरत राहिले.
त्यांचे १९३४ मध्ये ध्वनिमुद्रित केलेले 'राधे कृष्ण बोल मुख से' हे मिश्र काफी रागातील भजन अतिशय लोकप्रिय झाले. त्यांनी राग मालगुंजी मधील आपले गुरुबंधू विनायकबुवा पटवर्धन यांच्या बरोबर केलेले ध्वनिमुद्रण इतर ध्वनिमुद्रिकांपेक्षा दीर्घ काळाचे आहे.
भारत सरकारने मा.नारायणराव व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. तसेच मध्य प्रदेश शासनाने त्यांचा तानसेन पुरस्कार देऊन सन्मान केला होता. नारायणराव व्यास यांचे निधन १ एप्रिल १९८४ रोजी झाले. आपल्या समुहा तर्फे नारायणराव व्यास यांना आदरांजली.
नारायणराव व्यास यांची काही लोकप्रिय ध्वनिमुद्रणे
सखी मोरी रुम झूम (राग दुर्गा), नीर भरन कैसे जाऊं (तिलक कामोद), तुम जागो मोहन प्यारे (भैरव), नीर भरन मैं चली जात हूँ (मालकंस), बलम मोरी सुनी हो (मांड), बहुत सही तोरी सांवरिया (भैरवी).
https://www.youtube.com/watch?v=1vJ8hF3UFvw
https://www.youtube.com/watch?v=Y0SZnY-DxxI
https://www.youtube.com/watch?v=K7w_KvGYxio
https://www.youtube.com/watch?v=xa6k64cBQ6I
https://www.youtube.com/watch?v=WAhnX5PMKDY
#NarayanraoVyas
गणपती वासुदेव बेहेरे उर्फ ग.वा. बेहेरे हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक आणि संपादक होते. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९२२ रोजी झाला.
त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. ग.वा. बेहेरे यांचे वडील रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत.
त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक नूतन मराठी विद्यालयातून झाले.
शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. सर परशुराम कॉलेजात गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या परशुरामियन नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची गोमंतकाचे अश्रू नावाची कथा छापली गेली होती.
ग.वा.बेहेरे यांचे ३० मार्च १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आमीरचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान. त्यांचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी झाला. आमीरचा जन्म मुंबई येथे ताहिर हुसैन व झीनथ हुसैन , या चित्रपट निर्माताच्या घरात झाला. आमीर चार भावंडांत सर्वात मोठा, त्याला एक भाऊ अभिनेता फैजल खान आणि दोन बहिणी फरहात आणि निखात खान आहे. पुतण्या इम्रान खान एक समकालीन हिंदी चित्रपट अभिनेता आहे. आमीर खानचे शिक्षणासाठी जे.बी. पेटिट शाळेत. व नंतर त्याने इयत्ता आठवी पर्यंत चे शिक्षण संत ॲन च्या महाविद्यालयात घेतले आणि इयत्ता नववी व दहावी चे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम येथून पूर्ण केले. गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमीर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. 'यादो की बारात' या सुपरहिट चित्रपटात या चिमूकल्या आमीर खानने बॉलीवूड एण्ट्री केली होती. १९७३ साली आलेल्या यादों की बारात ह्या चित्रपटामध्ये आमीर खानने बाल कलकार म्हणून काम केले होते. पुढील वर्षी, त्याने आपल्या वडीलांच्या निर्मित मधहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधू ची तरुण भूमीका निभवलि. त्यानंतर १९८४ सालच्या होली ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. आपल्या प्रेमीकेवर होणाऱया बलात्काराचा सूड घेण्याच्या इर्शेने गुन्हेगारी पार्श्वभूमीत खेचला जाणारा आमिर खान 'राख' या क्राईम थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील साम्यता दाखवून देणाऱया 'रंग दे बसंती' मधून आमिरने पुन्हा एकदा सामाजिक आणि ऐतिहासिक विषयाला हात घातला होता अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या सत्यमेव जयते ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. आजवर आमिरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला युनिसेफने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने मेधा पाटकर चालवित असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये आमिरने अनेक सिनेमांसाठी लूक बदलले आणि प्रत्येकवेळी तो वेगळ्या अंदाजात दिसला. 'दंगल' या नवीन सिनेमात आमिर कुस्तीवीर महावीर सिंह फोगटच्या भूमिकेत दिसला आहे. या सिनेमासाठी त्याने वजन वाढवून ९० किलो केले होते. आमिरचे सध्या एका सिनेमासाठी ८ कोटी रुपये मानधन आहे. तसेच, आमिर नफ्यात ४० टक्के शेअर्ससुध्दा ठेवतो. तो एका जाहिरातसाठी ४ कोटी रुपये घेतो. त्यांच्याकडे Titan, Godrej सारखे प्रसिध्द ब्रँड्स आहेत.आमिरने 'सत्यमेव जयते' या टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी ३ कोटी रुपये घेतले होते. सोबतच, तो टीव्ही शोचा सर्वात महागडा होस्ट बनला होता. आमीर खान आणि किरण राव २००५ मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले होते. आमीर आणि किरण यांची भेट 'लगान' चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. आशुतोष गोवारिकर यांनी निर्मिती केलेल्या चित्रपट 'लगान' मध्ये किरण राव असिस्टंट डायरेक्टर होत्या. लग्नानंतर किरण राव यांनी 'धोबी घाट' या चित्रपटाचे डायरेक्शन केले. आजाद असे या दोघांच्या मुलाचे नाव आहे. किरण राव आमिर खान याची दूसरी पत्नी आहे. रीना दत्ता ही आमिरची पहिली पत्नी आहे. २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी “राष्ट्रगीत’ वाजविले. १९७० साली ते पुण्यात आले.
डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.
गजानन उर्फ डॉ.बाळ फोंडके यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा संपादन, संशोधन, अतिथी प्राध्यापक, पीएच.डी.चे मार्गदर्शक आणि विज्ञान लेखन या क्षेत्रात उमटवला. विज्ञान लेखन ते पूर्वी फावल्या वेळेत करीत असत. पुढे हाच त्यांचा छंद आणि व्यवसाय बनला.
त्यांनी ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोकणासह राज्य, देशातीलही अनेक धांडसी विषयांचे कव्हरेज दिनेश केळुसकर यांनी केले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti