जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संजय गायकवाड हे फिल्मी रिळांऐवजी देशभरातील सिनेमागृहात थेट सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण दाखविण्याच्या पद्धतीची सुरुवात करणाऱ्या यूएफओ या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.
व्हॅल्युएबल ग्रुपच्या माद्यमातून त्यांनी ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती घडवून आणली आहे.
## Sanjay Shankar Gaikwad
डोक्यावर भरपूर वाढलेले अस्ताव्यस्त केस, शिडशिडीत अंगकाटी असलेला मकरंद देशपांडे म्हणजे अभिनयाचा बंदा रूपाया. त्यांचा जन्म ६ मार्च १९६६ रोजी रत्नागिरी येथे झाला.‘दगडी चाळ’ आणि ‘स्वदेश’, ‘सत्या’ ‘कयामत से कयामत तक’ या हिंदी सिनेमांसह अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेते मकरंद देशपांडे यांचे दिग्दर्शन हे वेगळे असते. त्याचसोबत लूक, व हेअर स्टाईल यामुळेही त्यांची एक वेगळी ओळख आहे. मकरंद देशपांडे याच्या भूमिका असलेले चित्रपट रिस्क, डरना जरूरी है, हनन, एक से बढकर एक, स्वदेश, चमेली, विस्फोट, मकडी, लाल सलाम, रोड, प्यार दिवाना होता है, जंगल, घात, सरफरोश, सत्या, उडान, नाजायज, अंत, तडीपार, पहला नशा, सर इत्यादी. त्यांचा ‘दगडी चाळ’ हा चित्रपटात नुकताच येवून गेला. यात त्यांनी साकारलेली अरूण गवळीशी साधर्म्य दाखवणारी भूमिका चांगलीच गाजली आहे. त्यातला ‘चुकीला माफी नाही’, हा डायलॉग तर फारच प्रसिद्ध झाला आहे. आत्ता पर्यत ४० चित्रपट व नाटके त्यांनी केली आहेत. त्यांनी ५ पेक्षा अधिक चित्रपटासाठी दिग्दर्शक केले आहे. मकरंद देशपांडे यांनी कन्नड चित्रपटातही काम केले आहे. 'दंडूपाल्या' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्यांची खलनायकाची भूमिका आहे. मकरंद देशपांडे यांनी अनेक नाटके लिहिली आहेत. त्यांची अंश नावाची थिएटर कंपनी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जेष्ठ गायिका अमीरबाई कर्नाटकी बिजापूर जिल्ह्यातील बेलागी मध्ये जन्मल्या.
अमीरबाई यांचे संगीत आणि नाटक प्रेमी कालाराकारांचे घराणे. अमीरबाई पंचवीस वर्षांच्या असताना त्यांसनी एच. एम. व्ही. कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा तेथील कलाक्षेत्रात प्रवेश सुलभ झाला. अमीरबाई यांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला तो गोहरबाईंमुळे.
अमीरबाई मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत सहजपणे काम करू लागल्या. त्या वेळेला कंपनी नाटक आणि हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील अनेक नट आणि गायक हे सुद्धा चित्रपटक्षेत्रात प्रवेश करत होते. अमीरबाई यांनी चित्रपटामध्ये पार्श्वगायन सुरु केले तेव्हा, मुबारक बेगम, सुरय्या, जोहरा अम्बालावाली, नूरजहाँ, शमशाद बेगम, उमादेवी यांसारख्या प्रसिद्ध गायिका होत्या. लता मंगेशकर तेव्हा लहान होत्या. त्या सर्वांमध्ये अमीरबाई त्यांच्या अपूर्व आवाजामुळे वैशिष्ट्यपूर्ण होत्या. बहुतेक १९४० चे दशक त्यांचे यशस्वी दशक ठरले. त्या किर्तीशिखारावर पोहचल्या ते 'किस्मत' (१९४२) या चित्रपटामुळे. भारतीय चित्रपट इतिहासात त्याने जमवलेला गल्ला (एक कोटी) हा त्यावेळचा विक्रमच होता. तो विक्रम त्यानंतर आठ वर्षांनी आलेला 'आवरा' या चित्रपटाने मोडला. 'दूर हटो जी दुनियावालो', 'घर घर में दिवाली', 'धीरे धीरे आरे बादल' ही त्या वेळची सुप्रसिद्ध गाणी होती. गायन त्यांचे खरोखरच अभिव्यक्तीचे रूप होते. मा.अमीरबाई यांचे गायन वैशिष्ट्य पूर्ण होते. त्या मागे मजरूह सुलतानपुरी यांसारख्याच्या रचना गाऊन प्राप्त केलेली साहित्यिक जाणीव, शास्त्रीय संगीताचे ज्ञान आणि तार स्वरामध्ये गाण्याचा रंगभूमी वरील सराव अशी अनेक कारणे होती. अमीरबाई यांनी मुख्यत्वे उल्हासपूर्ण गाणी गायली आहेत. लता बरोबर त्यांनी गायलेली गाणी ('समाधी') लोकप्रिय झाली होती. वहाब पिक्टुरेसच्यात 'शहनाझ' (१९४२) चित्रपटासाठी स्वतः अमीरबाई यांनी संगीत दिले.
अमीरबाईनी मराठी, मारवाडी, गुजराती चित्रपटामध्ये गायन केले. लता मंगेशकर ह्याच्या पार्श्वगायानाक्षेत्रातील प्रवेशानंतर अमीरबाई यांचे युग संपले.
अमीरबाई कर्नाटकी यांचे ३ मार्च १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट

मराठीतील व हिंदीतील जेष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदीमा उर्फ ग. दि. माडगूळकर जन्म १ ऑक्टोबर १९१९
रोजी झाला.
गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला.
‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही तीन चित्रकथा ही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहे. युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.
गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. गदीमा हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या चित्रपटकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी होत्या.
गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदीमा यांचीच.
गदिमांचा उल्लेख कोणी महाकवी असा केला, की ते गमतीने म्हणत असत- अहो, मी महाकवी नाही, महाकाय कवी आहे!
त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले आहे.
ग.दि.माडगूळकर यांचे १४ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे ग.दि.माडगूळकर यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक काशिनाथ बोडस यांचे ख्याल, तराना आणि भजन यावर प्रभुत्व होते.
वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली.
प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर... वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी).
राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी' ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.
अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदुंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो.
वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना - सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले.
वसंत देसाई यांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली अनेक वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे.
‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली.
१९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. www.vasntdesai.com या वेब साईटवर वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.
वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३४ रोजी झाला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. इन्साफ का मंदिर चित्रपटातून लेखक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ३४ चित्रपटांपैकी बहुतेकांचे लेखन त्यांनीच केले होते. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. इशारा यांनी चित्रपटसृष्टीत "बोल्ड‘ विषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले.
"चेतना‘मध्ये त्यांनी वेश्यां्च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता. बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी "प्रेम शस्त्र‘, "औरत और इंतकाम‘, "वो फिर आयेगी‘, "हम दो हमारे दो‘, "जरूरत‘, "मिलाप‘ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चेतना, हम दो हमारे दो, एक नजर, मिलाप, लोग क्या कहेंगे, सौतेला पती, औरत का इन्तेकाम, घर की लाज असे विविध वादग्रस्त विषयांवरील सिनेमे त्यांनी केले. अभिनेत्री परवीन बॉबीला रूपेरी पडद्यावर झळकवण्याचे श्रेय इशारा यांनाच जाते.
त्याशिवाय रेहाना सुल्तान, राकेश पांडे, विजय अरोरा या कलावंतांनाही त्यांनीच पहिला ब्रेक दिला.चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या. ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी. आर. इशारा यांच्या पत्नी होत.मा.बी.आर.इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.
प्रसिद्ध लेखक, नाटककार, पत्रकार, अनिल बर्वे यांचा जन्म १७ जुलै १९४८ रोजी पुणे येथे झाला. अगदी २२ वर्षी त्यांनी म रा नाट्यस्पर्धेसाठी दोन नाटके सादर केली. त्यात “कोलंबस वाट चुकला” या नाटकास सोविएत (Soviet Land) नेहरू पुरस्कार मिळाला. साप्ताहिक माणूस मध्ये ७०च्या दशकात “रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता” ही नक्षलवादी चळवळीचा आढावा घेणारी त्यांची लेखमाला गाजली. त्यांनी फुलवा नावाचे एक फिल्मी मासिक काही दिवस काढले पण त्यांचा मूळ पिंड डाव्या विचारसरणीचा असल्याने त्यानंतर “रणांगण” सारखे राजकीय साप्ताहिक त्यांनी काही दिवस चालवले पण जाहिरतिअभावी ते बंद पडले.
पुढे नक्षलवादी पत्रके छापल्याच्या आरोपात ते दीड वर्षे तुरुंगात होते. तुरुंगाच्या वास्तव्यात त्यांनी “थांकयु मी. ग्लाड” ही कादंबरी लिहिली. ती इमर्जन्सीच्या काळात ‘सा. माणूस’ मध्ये छापून आली व अतिशय गाजली. पुढे त्या कादंबरीवर त्यांनी प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदा या संस्थेसाठी नाटक लिहिले. तेही लोकप्रिय झाले. त्यानंतर “हमिदाबीची कोठी” हे वेश्यावस्तीतील जीवनाचे यथार्थ दर्शन देणारे नाटक विजया मेहता यांनी अशोक सराफ, नाना पाटेकर आदि दिग्गज कलाकारांना घेऊन रंगमंचावर आणले. त्याला समिक्षकान्नी उचलून धरले.
त्यानंतर त्यांनी लिहिलेली निपुत्रीकांच्या समस्येवर‘पुत्रकामेष्टी’ (प्र.भु. डॉ प्रभाकर पणशीकर), राजकीय नेत्यांवर आधारित ‘आकाश पेलताना’ (प्र.भु. डॉ श्रीराम लागू), आणि मर्सी किलिंग वर आधारित ‘मी मालक या देहाचा” (प्र.भु. विक्रम गोखले) आदि रंगमंचावर आली. आपल्या लिखाणात अगदी वेगवेगळे विषय अभ्यास करून हाताळणे ही त्यांची खासियत होती. ‘डोंगर म्हातारा झाला’ (आदिवासी जीवन) ‘११ कोटी गालन पाणी’ (चासनाला खाणीची दुर्घटना)‘होरपळ’ (अभयारण्ये) ‘स्टडफॉर्म’, ‘फाशिगेट’ अशा विविध विषयांचा वेध घेणाऱ्या त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या.
त्यांना महाराष्ट्र शासनाचे साहित्याचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या लेखनाचे अनेक भाषांमध्ये रुपांतर झाले. त्यावर हिंदी मराठी सिनेमेही आले. अनिल बर्वे यांचे ६ डिसेंबर १९८४ ला निधन झाले. फुलवा खामकर व राही बर्वे ही त्यांची मुलं आज आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ.चंद्रकात बर्वे
श्रीनाथ त्रिपाठी उर्फ एस.एन.त्रिपाठी यांची धार्मिक आणि पौराणिक चित्रपट अधिक संख्येने वाट्याला येऊन देखील सातत्याने श्रवणीय गाणी देणारे संगीतकार म्हणून ओळख होती.
त्यांचा जन्म १४ मार्च १९१३ रोजी झाला. पौराणिक चित्रपट संगीताचा बादशाह म्हणून ते प्रसिद्ध होते.
एस.एन.त्रिपाठी यांचे आजोबा पंडित गणेशदत्त त्रिपाठी काशी येथील संस्कृत विद्यापीठाचे प्राचार्य, तर वडील पंडित दामोदरदत्त त्रिपाठी हे काशीच्याच सरकारी विद्यापीठाचे प्राचार्य. त्यामुळे श्री नाथजींचं शालेय शिक्षण वाराणसी येथे, बी.एस्सी. झाल्यावर अलाहाबाद विद्यापीठातून संगीतविशारद एन.व्ही. भातखंडें यांच्या विद्यालयातून, संगीत प्रवीण प्रयाग संगीत समितीतून तर लाइट क्लासिकल शिक्षण लखनौ येथील मैना देवींकडे झालं. या शिदोरीवर त्यांनी थेट मुंबई गाठली अन बॉम्बे टॉकीजला येऊन मिळाले. व्हायोलनिस्ट म्हणून पगार होता १००/-.
त्यांना गायक म्हणून संधी मिळाली ती ‘जीवननैया’ मध्ये. ‘ऐरी दैया लचक लचक चलो..’ हे पहिलं गाणं. चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँझ ऑस्टिन. बाँबे टॉकीज सोडल्यावर पहिला ब्रेक मिळाला संगीत दिग्दर्शनासाठी तो १९४१च्या ‘चंदन’साठी. पहिलं गाणं- ‘नन्हासा दिल देती हूँ..’ हे राजकुमारीबरोबर त्यांनी स्वत: गायलेलं युगलगीत होतं. पण पहिले यश मिळालं १९४३च्या ‘पनघट’मध्ये. प्रथम अभिनय केला ‘रामभक्त हनुमान’मध्ये हनुमानाच्या भूमिकेमध्ये! दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा १९५७चा ‘राम हनुमान युद्ध’.
मुळात शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या त्रिपाठींनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील ‘रानी रूपमती’ (१९५९) आणि ‘संगीतसम्राट तानसेन’ (१९६२) हे महत्त्वाचे चित्रपट. त्यांतील शास्त्रीय संगीताला नौशाद सारख्यांनी देखील दाद दिली. जसा नौशाद यांचा ‘बैजू बावरा’ तसा त्रिपाठींचा ‘तानसेन’. त्यात शास्त्रीय संगीत गायकांनादेखील त्यांनी आग्रहाने गायला बोलावलं. ‘रानी रूपमती’तदेखील त्यांनी तसा प्रयोग केला.
एस.एन.त्रिपाठी यांनी आपल्या प्रदीर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले.
एस.एन.त्रिपाठी यांची पौराणिक चित्रपटांमधे मात्र मक्तेदारी कुणीच मोडू शकलं नाही. पौराणिक चित्रपट हे तसे पाहिले तर लो बजेटचे. त्यामुळे त्यांचा दर्जाही दुय्यम समजला जायचा. पण तरीही एकेकाळी अशा चित्रपटांची लाटच होती. बी ग्रेडच्या चित्रपटांचं संगीत देऊन एखादा खचून जाईल, पण एस.एन.त्रिपाठी यांनी या चित्रपटांवर आपली अनोखी मोहोर उमटवली. आणि ती ही संगीताच्या सुवर्णयुगात, म्हणजेच एकोणीसशे पन्नासच्या दशकात!
‘सप्तसूर तीनग्राम..’ (मन्ना डे), ‘सुधबिसर गयी आज..’ (मन्नाडे-रफी), ‘अब आयी बरखा बहार.’ (मन्नाडे-रफी), ‘टूट गयी रे मनकी बीना..’ (पंढरीनाथ कोल्हापुरे- पूर्णा सेठ), ‘सखी कैसे धरू मैं धीर..’ (लता मंगेशकर), ‘दीपक जलाओ, ज्योती जगाओ..’ (रफी), ‘प्रथमशांतरस जाके..’ (मन्नाडे, मूळ तानसेनची रचना), ‘हे नटराज..’ (महेंद्र कपूर- कमल बारोट, मूळ रचना तानसेन) ही गाणी असलेला ‘संगीतसम्राट तानसेन’ हा कृष्णधवल चित्रपट. त्यातील एक गाणं ‘घिर घिर के आयो रे मेघा.’ हे रंगीत चित्रित केलं होतं. (जसं ‘मुगल-ए-आझम’ १९६० मधील ‘प्यार किया तो डरना क्या..’ हे नौशादचं गाणं. पन्नास वर्षांनी संपूर्ण ‘मुघल-ए-आझम’ डिजिटली कलर्ड झाला. तर ‘संगीतसम्राट तानसेन’ विस्मृतीत गेला.)
‘रानी रूपमती’ या रूपमती आणि सुलतान बाजबहादूर यांची प्रेमकहाणी मांडणाऱ्या चित्रपटातदेखील अव्वल शास्त्रीय बाज असलेली गाणी होती- ‘बात चलत नई चुनरी रंग डारी..’ (कृष्णराव चोणकर- रफी), ‘उडम् जा माया कमलसे..’ (मन्नाडे), ‘सुन बगीयां में बुलबुल बोले..’ (लता मंगेशकर). या चित्रपटातीलच ‘आ लौट के आजा मेरे मीत..’, ‘संगीतसम्राट तानसेन’मधील ‘झूमती चली हवा..’ अथवा ‘पिया मिलन की आस रे..’ (लता- पिया मिलन की आस- १९६१) या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाण्यांचं संगीत देताना शास्त्रीय बाज सांभाळला होता. कदाचित ही त्यांची शास्त्रीय संगीताची बैठकच तत्कालीन सामाजिक आधुनिक चित्रपटांसाठी मर्यादा ठरली असावी.
१९४१ ते १९८५ अशी पंचेचाळीस वर्षांची कारकीर्द (‘चंदन’ ते ‘महासती तुलसी’) असूनही तसे चित्रपट अभावानेच मिळाले. उत्तम गुणवत्तेला योग्य कोंदण लाभणं, हा नशिबाचा भाग. जे लक्ष्मी-प्यारेंना लाभलं. ‘सती-सावित्री’, ‘हरिश्चंद्र तारामती’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘पारसमणी’, ‘आया तूफान’ वगैरे चित्रपटांबरोबर ताराचंद बडजात्यांचा ‘दोस्ती’ मिळणं हे नशीब. त्या संधीची उत्तम गुणवत्तेशी सांगड घालून त्यांनी कुठल्या कुठे झेप घेतली.
अशी कित्येक लोकप्रिय गाणी देणारे त्रिपाठी चित्रपटाच्या ग्रेडची पर्वा न करता या क्षेत्रात भरपूर रमले. सव्वाशे ते दीडशे चित्रपटात विविध भूमिका त्यांनी केल्या. ९० वर चित्रपटांचं संगीत, २३ चित्रपटांचं दिग्दर्शन, त्यातील काही स्वनिर्मित, कथा-पटकथा-संवादलेखक, गायक, अभिनेता अशा विविध भूमिकांतून वावरले.
एस.एन.त्रिपाठी यांचे २८ मार्च १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रभाकर बोकील
संगीतकार एस.एन.त्रिपाठी यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=aXX-84r5Eg4
https://www.youtube.com/watch?v=jRcgvNN5L80&list=PLoYmSmY92nUwKTlCcsqskIxMoktpV987A&index=3
https://www.youtube.com/watch?v=ThuSY1LVJnw
Copyright © 2025 | Marathisrushti