(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विनोदी बॉलिवूड कलाकार मोहम्मद उमर अली मुक्री

    मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे आणी त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.' वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.

    शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ' असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.

    कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिओच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवाजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.

    अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा' चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम और श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता.

    स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसले. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला.

    विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.

    सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बॉम्बे टू गोवा'पासून ते थेट `शराबी'पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. `तय्यब अली प्यार का दुश्मन' हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या.

    चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.

    त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मा.मुक्री यांचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ समीर परांजपे

  • विख्यात उर्दू शायर निदा फाजली

    दुनिया जिसे कहते है', 'होश वालों को खबर क्या', 'चुप तुम रहो, चुप हम रहें' यासारख्या अनेक लोकप्रिय गझल लिहीणारे मुक्तिदा हसन निदा फाजली उर्फ निदा फाजला यांचा जन्म एका काश्मिरी कुटुंबात, दिल्ली येथे झाला, शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला. १९५८ साली त्यांनी ग्वाल्हेर कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. निदा फाजली यांचे वडीलही उर्दू शायर होते. लहान वयातच फाजली यांनी लिखाणाला सुरूवात केली. एकदा ते एका मंदिरासमोरून जात असताना एक व्यक्ती सूरदासाचे भजन म्हणताना त्यांनी ऐकले. त्या पदाच्या सौंदर्यामुळे प्रभावित झालेल्या निदा यांनी कविता लिहीण्यास सुरूवात केली. मात्र उर्दू कवितांमधे फारसा वाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मीर व गालिब यांना आत्मसात केले आणि स्वत:च्या भावना नेमक्या शब्दांत मांडू लागले. नोकरीच्या शोधात १९६४ साली ते मुंबईत आले.

    सुरूवातीच्या काळात त्यांनी धर्मयुग आणि ब्लीट्स मासिकांसाठीही लेखन केले. त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे हिंदी व उर्दूतील अनेक साहित्यिक तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रभावित झाले. विख्यात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या 'रझिया-सुलतान' चित्रपटासाठी गीते लिहीणारे जान निसार अख्तर यांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर अमरोही यांनी फाजली यांच्याकडे विचारणा केली असता चित्रपटातील दोन गाणे लिहून दिली व अशाप्रकारे त्यांनी चित्रपट गीतांसाठी लेखन करण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांनी अनेक गीते तसेच गझल लिहील्या. प्रसिद्ध टी.व्ही. मालिका 'सैलाब'च तसेच 'जाने क्या बात हुई' आणि 'ज्योती' यांचे शीर्षकगीतही त्यांच्याच लेखणीतून उतरले. त्यांच्या यादगार गझला आणि शायरींची यादी लांबलचक आहे. परंतु ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता,’ ‘होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है.... ’ आणि ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ या जीवनातील क्लिष्टता सहजसाध्या तऱ्हेने मांडणाऱ्या या गझला निदा फाजलींच्याच.

    निदा फाजली यांच्या बहुतांश गझलांना जगजित सिंह यांनीच आवाज दिला. १९९४ साली त्यांनी प्रसिद्ध गजलगायक जगजित सिंग यांच्यासोबत काढलेला आल्बम 'इनसाईट' मधील कविता आणि संगीत खूप नावाजले गेले. मा.फाजली यांना १९९८ साली 'साहित्य अकादमी पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. तर 'सूर' या चित्रपटातील गीतलेखनासाठी २००३ साली त्यांनी 'उत्कृष्ट गीतकारा'चा पुरस्कार देण्यात आला. २०१३ साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवले. मा.निदा फाजली यांचे ८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

    फाजली यांची साहित्यसंपदा काव्यसंग्रह : - लफ़्ज़ों के फूल - मोर नाच - आँख और ख़्वाब के दरमियाँ - खोया हुआ सा कुछ (१९९६) - आँखों भर आकाश - सफ़र में धूप तो होगी

    फाजली यांच्या लोकप्रिय गझल्स व गीते : - तेरा हिज्र मेरा नसीब है, तेरा गम मेरी हयात है ( चित्रपट - रझिया सुलतान) - आई ज़ंजीर की झन्कार, ख़ुदा ख़ैर कर (चित्रपट - रझिया सुलतान) - होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है (चित्रपट - सरफ़रोश) - कभी किसी को मुक़म्मल जहाँ नहीं मिलता ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता) - तू इस तरह से मेरी ज़िंदग़ी में शामिल है ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता) - आ भी जा.. ( चित्रपट - सूर) - चुप तुम रहो, चुप हम रहें (चित्रपट - इस रात की सुबह नहीं) - दुनिया जिसे कहते हैं, मिट्टी का खिलौना है (गझल) - हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी (गझल) - अपना ग़म लेके कहीं और न जाया जाये (गझल) - टी.व्ही. मालिका 'सैलाब'चे शीर्षकगीत

  • ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव

    अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातही त्यांनी चौफेर मुशाफिरी केली होती. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. मा. आनंद यादव यांना यादव यांच्या नटरंग कादंबरीवरून चित्रपटनिर्मिती झाली होती. मा.आनंद यादव यांनी सुमारे ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

    आनंद यादव यांचे २७ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर)

    उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वा. वीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता.

  • ज्येष्ठ कवी, व गीतकार सुधीर मोघे

    काच वाटेवर न रमणारे अन्‌ नवनव्या वाटा सतत शोधत राहणारे मनस्वी कलाकार अशी त्यांची ओळख होती.

  • (डॉ.) भूषण पटवर्धन

    पटवर्धन, (डॉ.) भूषण

    तीन-चार महिन्यांपासून डॉ. भूषण पटवर्धन हे नाव राज्यातील उच्चशिक्षणविश्वामध्ये चर्चेत होते. ते म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या ‘शर्यती’मधील एक प्रमुख उमेदवार म्हणून! काही कारणांमुळे कुलगुरू निवडीचे फासे डॉ. पटवर्धन यांच्यासाठी अनुकूल पडले नाहीत. अर्थात, डॉ. पटवर्धन याला अपयश मानत नाहीत. यामुळे स्थितप्रज्ञ होणे तर त्यांना मुळीच मान्य नाही. बंगळूरू येथील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद अ‍ॅण्ड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’ या संस्थेच्या संचालकपदी डॉ. पटवर्धन यांची झालेली निवड हे त्याचेच द्योतक आहे.

    राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सॅम पित्रोदा यांनी ही निवड जाहीर केली. आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय ज्ञानशाखेचे महत्त्व वेळोवेळी सिद्ध होत असले तरी त्याचा व्यावहारिक वापर करण्यासाठी आरोग्य-उपचार ज्ञानपरंपरांचा समन्वय साधण्यात आपण कमी पडतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदासारख्या ऐतिहासिक परंपरेच्या कसोटीवर उतरलेल्या ज्ञानसाधनेचे शास्त्र, अत्याधुनिक विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध करण्याचे क्षमताविकसन आपण केलेले नाही. या पाश्र्वभूमीवर डॉ. पटवर्धन यांची आयुर्वेद इन्स्टिटय़ूटच्या संचालकपदी नियुक्ती सयुक्तिक ठरत आहे. पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केल्यानंतर अहमदनगरला प्रो. जॉन बार्नबास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जैवरसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुंबईच्या हाफकिन संस्थेतून पीएच.डी. संपादन केल्यानंतर औषधनिर्माणशास्त्र उद्योगामध्ये संशोधक व व्यवस्थापक या नात्याने भरीव कामगिरी केली. १९९४च्या सुमारास डॉ. पां. वा. सुखात्मे यांच्या प्रेरणेने पुणे विद्यापीठात ‘स्कूल ऑफ हेल्थ सायन्स’ असा स्वायत्त विभाग सुरू करण्यात आला आणि डॉ. पटवर्धन यांचा विद्यापीठीय अध्यापन-प्रशासनामध्ये प्रवेश झाला. आरोग्यशास्त्र व सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत आधुनिक-प्राचीन अशा सर्व ज्ञानपरंपरा, कौशल्ये, प्रणालींचा समन्वय साधून विभागामार्फत समाजाभिमुख संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले. अगदी जागतिक बँकेपर्यंतच्या प्रकल्पांना पुणे विद्यापीठाने संशोधनाचे पाठबळ दिले ते डॉ. पटवर्धन यांच्या या विभागामुळेच! जनतेचा महाविज्ञानसोहळा म्हणून गौरविण्यात आलेल्या २००० सालच्या अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पुण्यातील अधिवेशनाच्या मुख्य संयोजन सचिवपदाची जबाबदारी डॉ. पटवर्धन यांनी यशस्वी केली. युरोप-अमेरिकेतील आघाडीच्या उद्योगांसमवेत सहकार्य करार करतानाच पुणे महापालिका, जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून तळागाळातील जनतेच्या आरोग्याचे प्रश्न त्यांनी चार भिंतींमध्ये बंदिस्त राहिलेल्या विद्यापीठीय संशोधनाच्या कक्षेत आणले. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाप्रमाणे आंतरआरोग्यशाखीय प्रकल्प उभारण्याचे कार्य डॉ. पटवर्धन यांनी केले आहे. बंगळूरू येथील या संस्थेमार्फत त्याला आंतरराष्ट्रीय व्याप्ती लाभणार आहे. भारतीय उच्चशिक्षणाची निर्यात करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचे सदस्य म्हणून व त्यानंतर मणिपाल विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख या नात्याने त्यांना देशोदेशीच्या उच्चशिक्षण व संशोधन व्यवस्थेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. डॉ. पित्रोदा, डॉ. रघुनाथ माशेलकर आदींच्या प्रेरणेने केंद्रीय स्तरावर ‘न्यू मिलेनियम टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत वनौषधी विकासाकरिता कार्यरत असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तीन आघाडीच्या संशोधकांमध्ये डॉ. पटवर्धन यांचा समावेश आहे. ‘प्राचीन शास्त्र-परंपरेचा त्याग केला तरच आयुर्वेदाचे आधुनिकीकरण करणे शक्य आहे, असा गैरसमज आपल्याकडे आहे. त्याऐवजी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या प्राचीन ज्ञानशाखेला अधिक बळकटी प्राप्त होत आहे. जनुकीय समस्या, जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र, कर्करोगाबरोबरच एचआयव्ही-एड्ससारख्या व्याधी आदींवर प्राचीन परंपरांमधील शास्त्र आधुनिकीकरणाच्या माध्यमातून प्रयोगशाळांमधून ताडून पाहणे शक्य आहे. त्यासाठी आयुर्वेदावर आधारित आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यासपीठ उभारण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने बंगळुरू येथील ही नवीन जबाबदारी आश्वासक ठरते आहे,’ असे डॉ. पटवर्धन सांगतात.

  • संत जनाबाई

    मराठी संतकवियित्री परभणी जिल्हातील गंगाखेड येथे जन्म. माता लहानपणीच वारल्यामुळे बापाने तिला पंढरपुरास दामाशेटीच्या घरी ठेवले आणि तेथेच ती लहानाची मोठी झाली. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवास ती सापडली, अशी हि एक आख्यायिका आहे. पूढे नामदेवास आपले सर्वस्व मानून नामयाची दासी जनी या नावाने ती वावरली ती शेवटपर्यत अविवाहित होती.

    जनाबाईने सु. साडेतीनशे अभंग लिहिले. तिच्या नावावर हरिश्चदाख्यात, प्रल्हादचरित्र कृष्णजन्म बाळकीडा,थालीपाक द्रौपदीस्वंयवर वगैरे स्फुट काव्यग्रंथही आढळतात. विठ्ठलाची ती अतिशय उत्कटतेने व तन्मयतेने भक्ती करीत असल्याचे तिच्या अभंगात दिसून येते तिची काव्यरचना साधी रसाळ आणि अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे.

  • हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

    हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.

    पं. गोविंदराव पटवर्धन शिकवणीबद्दल आदित्य ओक म्हणतात,''बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये. पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे - ''येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.'' यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली.

    माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं. बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.''

    काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ''आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.''

    आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. 'बालगंधर्व'सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. या वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक 'जादूची पेटी हा कार्यक्रम अतिशय रंजक पणे सादर करतात.
    आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • हळुवार मनाचा कलंदर माणूस

    संगीतकार सी. रामचंद्र अर्थात 'अण्णा' यांच्याबद्दलचे सुप्रसिद्ध पण विखुरलेले किस्से एकत्र गुंफले की एक विलक्षण असं मिश्रण तयार होतं. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या झाडांवरची फुलं एका गुच्छात बांधली की त्याचं बहुरंगीपण जसं आकर्षक होतं तसंच !

    "पतंगा" या चित्रपटाची गाणी तयार होत असताना 'राजेंद्रकृष्ण' यांनी एक ओळ लिहीली, 'ओ दिलवालॊ दिलका लगाना अच्छा है' ! खरं म्हणजे किती छान आणि सरळ अर्थ होता या ओळीचा! पण शेजारी बसलेल्या अण्णांना गंमत करायची लहर आली . ही ओळ एेकून, हातातल्या ग्लासकडे पहात, अण्णा खट्याळपणे म्हणाले, "पर कभी कभी! मग काय विचारता? गाण्याचा सगळा नूरच एकदम पालटून गेला ... "किसीकी खातिर जान जलाना अच्छा है - पर कभी कभी!" "दिलमें किसीका प्यार बसाना अच्छा है - पर कभी कभी" ...... अण्णांच्या चेष्टेखोर स्वभावामुळे एका धमाल गाण्याचा जन्म झाला.

    "चित्रपटाची सगळीच्या सगळी गाणी (आणि पार्श्वसंगीत) दहा दिवसात तयार झाली पाहिजेत" या "आजाद"च्या निर्मात्याच्या 'आदेशा'चं पालन करण्यासाठी सी. रामचंद्र व राजेंद्रकृष्ण मद्रासला रवाना झाले खरे पण या दोघांनी पहिले नऊ दिवस 'आवडत्या छंदा'त बुडवले ! निर्माते टेन्शनमधे ! मग शेवटच्या दिवशी (म्हणजे रात्री) जोडी 'बसली'! नऊ सुंदर गाणी जन्मली ! निर्माते टेन्शनमधून 'आजाद' आणि श्रोते गाण्यांच्या माधुर्यात कायमचे "कैद!"

    बरं अश्या 'बिनधास्त- 'हॅपी-गो-लकी'- वृत्तीच्या माणसाला 'perfection' शी काय देणं घेणं असं आपल्याला वाटतं . पण इथं अण्णा आपल्याला चकवतात.

    मोहोब्बत ही न जो समझे या तरल गाण्याचं रेकॉर्डिंग, तलतच्या तलम आवाजात पूर्ण झालं होतं. शूटिंग मात्र नंतर होतं. सी रामचंद्र सहज सेटवर गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा सेट गाण्याच्या चालीशी पूर्णपणे विसंगत आहे. शांतारामबापूंनी तर सेटवर बराच पैसा खर्च केला होता. सेट बदलायचा तर त्यांचा पैसा वाया जाणार होता. पण सी रामचंद्रनी गाण्याची चाल व सेट यातली विरुपता "बापूंना" पटवली आणि पूर्ण सेट बदलायला लावला.

    कधी कधी 'खट्याळ युक्त्या' योजून ते स्वतःला हवं ते साध्य करत. "साजन" या चित्रपटातली गाणी नायक 'अशोककुमार'ने म्हणू नयेत असं त्यांना मनापासून वाटत होतं. पण अशोककुमार पडला सुपरस्टार! त्याला ही गोष्ट सांगायची कोणाची हिंमत नव्हती. शेवटी अण्णांनी शक्कल लढवली. 'अशोककुमार'च्या वेगवेगळ्या शूटिंगच्या तारखा मिळवल्या आणि गाण्याची रेकॉर्डिंगज् बरोबर त्याच तारखांना ठरवू लागले . रेकॉर्डिंगला दरवेळी 'नाही' म्हणणं अशोककुमारला अवघड वाटू लागलं तेव्हा तो वैतागून म्हणाला, 'दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्या'. अण्णांना हेच हवं होतं. त्यांनी 'आज्ञाधारकपणे' रफीच्या आवाजात गाणी रेकॉर्ड केली.

    पण हा कलंदर माणूस 'आतून' खूप हळवा होता. नौशादजी गंभीर आजारी होते तेव्हा सी रामचंद्र त्यांना म्हणाले, 'तुम्ही लवकर बरे ह्वावं म्हणून मी रोज आमच्या देवाला प्रार्थना करतो'. तेव्हा नौशाद म्हणाले की त्यापेक्षा मी लवकर 'जावं' अशी प्रार्थना करा म्हणजे माझी वेदनांतून सुटका होईल आणि त्याचबरोबर तुमची 'competition' सुद्धा कमी होईल. अण्णा म्हणाले, अहो पण तुम्ही आहात म्हणून तर आमच्या हातून काही चांगली निर्मिती होते - तुमच्या समोर टिकाव लागावा म्हणून ! तुम्ही गेलात तर आम्ही आळशी होऊ!' हे ऐकून नौशाद गहिवरले !

    लताबरोबर वितुष्ट आल्यावर सी रामचंद्र यांच्या अनेक मित्रांनी त्यांना सुचवलं की त्यांनी लताशी 'समझोता' करावा. 'जी गोष्ट एस् डी बर्मन आणि शंकर यांनी केली ती अण्णांनी का करु नये?' पण अशा वेळी त्यांचा 'मोडेन पण वाकणार नाही' हा बाणा जागृत व्हायचा आणि ते उसळून म्हणायचे, 'समझोता तर तिने केला पाहिजे . मी तह करायला तिनं मला घडवलेलं नाही - मी तिला घडवलयं!' कदाचित, लता किती उंचीवर पोहोचली आहे हे त्यांना कळूनही वळलं नसावं.

    या ब्रेकअप नंतर काही वर्षांनी घडलेला प्रसंग :
    अनिल बर्वे एका संध्याकाळी अण्णांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. अण्णा एकटेच बसले होते. समोर टेबलावर त्यांची आवडती 'बॅगपाईपर' होती. पण ते नेहमीच्या मूडमधे नव्हते. उदास वाटत होते. बर्वेनी विचारलं, 'अण्णा, काय झालं ?' तेव्हा म्हणाले, 'अरे गळ्याच्या उपचारांसाठी लता लंडनला गेलीय. खूप काळजी वाटतेय रे ! या जगात गाणारे गळे खूप आहेत पण शहनाईचा स्वर फक्त लताच्या गळ्यात आहे !' अण्णांमधल्या सच्च्या कलावंताचं दर्शन घडवणारे हे उद्गार आहेत !

    लता-सी रामचंद्र वितुष्टाचा 'फायदा' मिळावा या हेतूने एका मासिकाचे उपसंपादक अण्णांकडे आले व म्हणाले, 'लतापेक्षा आशा श्रेष्ठ आहे' यावर मी एक फीचर करत आहे, तुम्ही बोला त्यात'!
    तेव्हा, 'तुम्हाला संगीतातलं काडीइतकं सुद्धा समजत नाही' असं म्हणून अण्णांनी त्यांची बोळवण केली.

    अण्णा 'साई-सावली' मध्ये रहायला आल्यावर प्रभाकर मोने गमतीने म्हणाले, "अहो तुमचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर ! जिना अरुंद , लिफ्ट नाही! वर माणूस मेला तर 'बॉडी' खाली आणणं पण अवघड".

    अण्णा नेहमीच्या 'श्टाईल'मधे म्हणाले, "पर भैय्या हम तो बाहर के बाहरही मरके जानेवाले है" .. आणि त्यांनी आपला शब्द पाळला. डिसेंबर 1981 च्या शेवटच्या आठवड्यात, के.ई.एम्. मध्ये अॅडमिट झालेल्या अण्णांनी 5 जानेवारी 1982 या दिवशी हॉस्पिटलमधेच प्राण सोडला. त्यांचं शव अंत्यदर्शनासाठी साई-सावलीत खालीच ठेवलं आणि हजारो चाहत्यांचा सोबतीनं सरळ 'चंदनवाडी'कडे रवाना झालं.

    -- धनंजय कुरणे
    कोल्हापूर

    9325290079

  • कुमार गंधर्व (शिवपूत्र कोमकली)

    कुमार गंधर्वाचे कलाक्षेत्रातील बहुमोल योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण‘ किताबाने गौरविलं तसेच गांधर्व महाविद्यालय , विक्रम विश्वविद्यालय , भारत भवन , मध्यप्रदेश कला अकादमी व संगीत नाटक अकादमी या संस्थांनीही कुमारांना सन्मानित केलं.