(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • अनंत वामन बरवे

    अनंत वामन बरवे हे नाट्यकला या पाक्षिकाचे संस्थापक व संपादक होते. नाट्यशिक्षण विषयक पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. त्यांनी १५ नाटके लिहीली होती.

    अनंत वामन बरवे यांचे २६ ऑक्टोबर १९२३ रोजी निधन झाले.

    ## Anant Waman Barve

  • भाऊसाहेब झंवर

    क्रीडापटू या नात्याने जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, हे तर ते सांगायचेच पण काय टाळायला हवे याविषयी त्यांच्याइतकी माहिती देणारे दुसरे कुणीही सापडले नसते. त्यांनी या गोष्टीचा जणू ध्यास घेतला होता. उत्तमोत्तम क्रीडापटू तयार करून त्यांना स्पर्धेत उतरवण्याच्या एकमेव उद्देशाने ते मैदानामध्ये उतरायचे. एखादा खेळाडू चांगला दिसतो आहे, पण मार्गदर्शनाअभावी तो वा ती मागे पडण्याची शक्यता आहे असे दिसले तर ते त्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्याशिवाय राहणार नाहीत.

    पुण्याच्या स. प. महाविद्यालयामध्ये अनेक वर्षे क्रीडाप्रशिक्षक या नात्याने काम पाहणारे बाबुलाल प्रेमराज झंवर आता आपल्यात नाहीत. ९४ व्या वर्षांपर्यंत आयुष्य लाभलेले बाबुलाल झंवर हे दोन वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या स्वयंचलित दुचाकीवरून हिंडायचे आणि सायंकाळच्या सुमारास मैदानावर उभे राहायचे. या वयातही ते खेळ पाहून चुका दाखवून देत असत. त्यांनी सांगितलेले शास्त्रशुद्ध व्यायाम प्रकार अनेक वर्षे अनेकांना उपयुक्त ठरले आहेत. तुम्ही शारीरिकदृष्टय़ा त्या त्या क्रीडाप्रकारांसाठी तंदुरुस्त आहात की नाही हे तपासायचे त्यांचे मार्ग निराळे होते. ते म्हणायचे की, पाच मिनिटांमध्ये शंभर जोर, तीन मिनिटांमध्ये शंभर बैठका, १४ सेकंदांमध्ये शंभर मीटर धावणे, सहा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर धावणे, हे सगळे तुम्ही न दमता करू शकणार असाल तर तुम्ही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धाना पात्र आहात, असे मानायला हरकत नाही. सर्व प्रकारच्या खेळात महत्त्व कशाला असेल तर ते तुमच्या पूर्ण तंदुरुस्त असण्याला.

    नृत्य असो की गायनकला, त्यासाठीही तुम्हाला शारीरिकदृष्टय़ा सक्षमच असावे लागते. त्यासाठी त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह रेझिस्टन्स प्रोग्राम’ या नावाची संकल्पना अस्तित्वात आणली. त्याला त्यांनी ‘आयसोमेट्रिक’ प्रशिक्षणाची जोड दिली. त्यांच्या या प्रशिक्षणाचा अनेक पातळ्यांवर उपयोग करून घेतला गेला. शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि त्याबरोबरच स्वास्थ्य यांना त्यांच्या लेखी अधिक महत्त्व होते. स्वास्थ्य म्हणजे केवळ काहीही न करता बसून राहणे नव्हे तर त्यात त्यांना निसर्गोपचार पद्धती अपेक्षित होती. तुम्ही जो काही खेळ खेळाल तो उत्तम खेळा आणि त्यात प्रावीण्य मिळवा, एवढेच त्यांचे सांगणे असे. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धापर्यंत असंख्य स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतील असे खेळाडू घडवले. त्यांच्या प्रशिक्षणात शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शिक्षणशास्त्र, क्रीडामानसशास्त्र, अशा वेगवेगळ्या शास्त्रप्रकारांचा समन्वय असे. आपले मनगट मजबूत तर सर्व काही तुम्ही त्या जोरावर करू शकता हा त्यांचा विश्वास होता. ते कडवे गांधीवादी होते. साधी राहणी आणि स्वावलंबन यांना आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये स्थान दिले होते. त्यामुळेही ते विद्यार्थीप्रिय होते. भारतात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर क्रीडाक्षेत्रावर पैसे खर्च होऊनही चांगले ‘स्टॅमिना’बाज खेळाडू तयार होत नाहीत, ही त्यांची खंत होती.

    कुस्ती, खो-खो, वेटलिफ्टिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, अ‍ॅथलेटिक्स, सायकलिंग, शरीरसौष्ठव, पोहणे, क्रिकेट अशा कितीतरी क्रीडाप्रकारांमध्ये त्यांनी घडवलेले खेळाडू केवळ महाराष्ट्रभरच नव्हे तर सगळ्या जगात पसरलेले आहेत. त्यांच्या नावामधली ‘बा. प्रे.’ अशी आद्याक्षरे त्यांच्या शरीरसंपदेचे दर्शन घडवण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यांच्याकडे पाहून कुणीही एकदम चकीत होऊन ‘बापरे’ असे म्हणत असे आणि तीच त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांच्या कारकिर्दीची पावती म्हणावी लागेल.

    कुस्ती खेळायची असेल तर त्यासाठी मांसाहारच हवा हे थोतांड आहे, असे ते सांगायचे आणि त्यांच्या प्रचाराचाही तोच महत्त्वाचा मुद्दा ठरला. सामाजिक दृष्टय़ा अत्यंत प्रगत विचार आणि केव्हाही कुणालाही मदतीसाठी पुढे हे तर त्यांचे ब्रीद होते. ते १९३० च्या जंगल सत्याग्रहामध्ये होते आणि ते १९४२ च्या चळवळीत भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करण्यात अग्रभागी होते. एका निरलस अशा क्रीडा प्रशिक्षकाला जो मानसन्मान मिळायला हवा होता तो मात्र त्यांना कधीच मिळाला नाही.

  • दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री सिल्क स्मिता

    ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिता यांची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत.

    दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिताचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला. तिचे बालपणीचे नाव विजयलक्ष्मी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्क स्मिता यांनी सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान सिल्क स्मिता अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून त्याही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होत्या. सिल्क स्मिता यांना १९७८ मध्ये 'बेदी' या कानडी सिनेमात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तिला मोठा ब्रेक 'वांडीचक्रम' सिनेमातून मिळाला होता. या सिनेमात त्यांनी स्मिताचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. सोबतच, त्यांनी मद्रासी चोलीची फॅशनसुध्दा ट्रेंडमध्ये आणली. या पात्राच्या प्रसिध्दीने त्यांना सिल्क स्मिता हे नाव मिळाले. १९८३ मध्ये त्यांनी 'सिल्क सिल्क सिल्क' नावाचा एक सिनेमा केला होता. करिअरमधील तीन वर्षांमध्ये त्यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले. सिल्क यांची जादू हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये चालायला लागली होती.तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. त्यामुळे स्मिता एका दिवशी ३ शिफ्टमध्ये काम करत होत्या. दक्षिणेचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनिकांत, कमल हसन, चिरंजीवी या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच स्मिताचे एक गाणे आपल्या सिनेमात असावे अशी इच्छा असायची. एकापाठोपाठ एक सिनेमा करून त्यांनी १० वर्षांमध्ये जवळपास ५०० सिनेमांमध्ये काम केले. सिल्क यांच्या यशाची जादू बॉलिवूड मध्ये सुध्दा चालली होती. त्यांनी 'जीत हमारी' सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.त्यानंतर 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही',विजय पथ' सारख्या सिनेमांमध्ये काम केले.

    सिनेमां मधून काम केल्यानंतर स्मिता यांनी निर्मितीत हात आजमावला. मात्र पहिल्या दोन सिनेमांमध्ये त्यांना दोन कोटींचा तोटा झाला. सिनेमांमध्ये झालेल्या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.ती मानसिकरित्या खचून गेली होती.

    २०११ मध्ये आलेला 'द डर्टी पिक्चर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमामुळे विद्या बालनचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.या सिनेमाच्या यशामागे एक नाव दडलेले आहे, ते म्हणजे अभिनेत्री सिल्क स्मिता. दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता.

    सिल्क स्मिता यांचे २३ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार दीनानाथ मंगेशकर

    दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवलं. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे मा.दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’ मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही मा.दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. त्यांनी मैफली गाजवल्या, संगीत समारोहांत स्वतःचे स्थान सिद्ध केले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून निराळे. सुंदर गाणे रसिकांना ऐकवले. मा.रामकृष्णबुवा वझे ह्यांचे ते गंडाबंद शागीर्द होत; तथापि इतर अनेकांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य, शिकार हे त्यांचे आवडते छंद होते. १९३४ मध्ये ’बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. कृष्णार्जुन युद्ध हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मा.लता मंगेशकर, मा.आशा भोसले, मा.मीना खडीकर, मा.उषा मंगेशकर व मा.हृदयनाथ मंगेशकर ही मा.दीनानाथ व त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमती (ऊर्फ माई) यांची अपत्ये होत. या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे. मा.दीनानाथांना श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. मा.दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. १९२२ साली इंदूर असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर कसे तेच आहेत वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे खास मित्र. मास्टर दीनानाथ हे सी. के. नायडू यांची क्रिकेटची मॅच बघायला यायचे, तर नायडू हे मास्टर दीनानाथांची नाटके पाहायला येत. मा. मास्टर दीनानाथ यांचे २४ एप्रिल १९४२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी विश्वकोष

  • वीर तानाजी मालुसरे

    शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले.

  • वसंतराव गोवारीकर (डॉ.)

    भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची पाया रचणार्‍या डॉ.वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला! अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे.

  • ब्राझीलियन फुटबॉलपटू काका

    काका हा २००७ मध्ये बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणारा व त्याच साली फीफाचा सर्वोत्तम खेळाडू (‘प्लेअर ऑफ द इयर’) या पुरस्काराने गौरवण्यात आलेला खेळाडू होत. त्याला हा पुरस्कार देण्यासाठी स्वत: पेले हजर होते, हा ब्राझीलच्या फुटबॉलचा मान म्हणायला हवा.

  • सोन्या काशिनाथ पाटील

    सोन्या पाटील यांचे नाव आज तळागाळातील लोकांच्या तोंडावर चांगलेच रुळलेले दिसते, कारण आदिवासी वस्त्यांमध्ये काम करून तिथल्या जनतेची होईल ती सेवा करण्याचा व या जनतेचे राहणीमान उंचावण्याचा शिरस्ता गेली कित्येक वर्षे जोपासला आहे.

    सोन्या पाटील यांचा जन्म वेहेळे गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आज राजकारणामध्ये ते सक्रिय असले तरी पहिल्यापासून त्यांचा खरा ओढा हा समाजकारणाकडे होता. “समाज कल्याण न्यास” या भारत सरकारच्या उपक्रमामुळे एकत्रित आलेल्या संघटनेने त्यांच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने वळण दिले. या संघटनेच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला पुर्णपणे समाजसेवेमध्ये झोकून दिले. बालकामगारांसाठी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या असून हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. कापड उद्योगात सर्वाधिक बाल कामगार असतात हे ताडून, त्यांना शिक्षण उपलब्ध करुन पुढे स्वावलंबी बनविण्याचा प्रभावी प्रयत्न सोन्या पाटीलांनी केला.

    “समाज कल्याण न्यास संस्थे”च्या विद्यमाने त्यांनी तत्काळकालीन व मोफत रूग्णवाहिका सेवादेखील सुरू केली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, वाडा, जव्हार, मोखाडा इत्यादी आदिवासी पाडयांना भेटी देवून त्यांना कपडे, धान्य, मिष्टान्न, औषधे, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य अशा जीवनावश्यक गोष्टींचे ते वाटप करतात. विविध सणांच्या प्रसंगी ते या आदिवासी वस्त्यांमधील मुलांसोबत राहून आनंद द्विगुणित करतात. सरकारच्या कल्याणकारी योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सोन्या पाटील यांच्याकडून झालेला दिसून येतो.

    विद्यार्थ्यांमध्ये खिळाडू वृत्तीचा व विविध कलांचा विकास व्हावा यासाठी मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला, निबंध, नृत्य, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे . एक कुशल व्यावसायिक आणि उद्योगाचे मालक असण्यासोबतच, अनेक सामाजिक, शैक्षणिक तसंच सांस्कृतिक व उद्योग संस्थांचे अध्यक्ष व महत्त्वाची पदं सोन्या पाटील यांनी भुषवली आहे.

  • प्रदीप कबरे

    कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

    आपल्या वक्तृत्वानच्या जोरावर लाखो चाहत्यां मध्ये लोकप्रिय असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणामुळे नेहमी चर्चेत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या भोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.