जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सबनीस कुटुंब मूळचे पुसाळकर. कोकणातल्या पुसाळहून देशावर आलेले. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी सोलापूर येथे झाला.
पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. 'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.
मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली.
'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, त्यांची १८ नाटके व एकांकिका प्रसिध्द झाल्या, विप्छा माजी पुरी करा, कार्टी श देवी, घरोघरी हीच बोंब, निळावंती, म्हैस येता माझ्या घरा, सौजन्याची ऐशी तैशी, मेजर चंद्रकांत, अप्पाजींची सेक्रेटरी, हे ही दिवस जातील, प्रेक्षकांनी क्षमा करावी, घरमालक, यम हरला यम जिंकला. त्यांचे एकूण १२ कथा संग्रह प्रसिध्द झाले, बोका झाला संन्यासी, पसंद अपनी अपनी, गुदगुल्या, विनोद द्वादशी, परसूच्या पशुकथा, थापाड्या, खांदेपालट, पानदान, गारुड, पंगत, परवाळ, आलपड. त्यांची दोन पुस्तके, पहिलं `माझेश्वरी' दुसरं `सबनीशी`.
जयवंत दळवींच्या निवडक ठणठणपाळचे संपादन ही त्यांनी केलं. त्यांच्या दोन विनोदी नाटयकृतींना १९६३ व १९७२ सालचे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ते काही काळ किशोर मासिकाचे संपादक होते. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंत सबनीस यांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. `खणखणपूरचा राजा' या वगनाट्यापासूनच दादा कोंडके, वसंत सबनीसांची जोडी जमली. आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला.
'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विच्छा माझी पुरी करा नाटक
https://www.youtube.com/watch?v=08xqwTnglME
भीमसेन जोशी म्हणजे 'गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.
पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.
कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे ४ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म. १६ भावंडांमध्ये सर्वात थोरले. वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक. घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने ११ व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले. विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती. ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण. जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर १९३६ पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण. वयाच्या १९ व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम. २२ व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन. १९४३ मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी. समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद. उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये. शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग. गुरूंना श्रद्धांजली म्हणून १९५३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.
२४ जानेवारीला भीमसेन जोशी यांची माहिती समूहावर आलेली आहे, त्यामुळे आज माहिती न टाकता काही दिग्गज व्यक्तीनी सांगीतलेल्या भीमसेन जोशी यांच्या आठवणी...........
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' अशा एकापेक्षा सरस अभंगवाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले. हे स्व:ता डॉ. कलाम यांनी एका मुलाखतीत सांगीतले होते.
श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असत, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ?
त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर इतक्या अवीट गोडीची आहेत कि त्यावर काय बोलावे. या संगीत रत्नाने विश्वरत्न संत तुकाराम यांच्या रचना संगीत बद्ध करताना, त्या दोन भारतरत्नांकडून गाऊन घेतल्या. 'अभंगवाणी ' यासाठी पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांचा आवाज त्यांनी संगीतबद्ध केला. त्यांनी संगीत दिलेल्या, पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील - 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥'
आणि ,लताजींच्या आवाजातील - 'सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ '
ही अशी रचना अशी आहे कि त्यातील स्वरांची आर्तता सुरांमुळे इतक्या पराकोटीला जाऊन पोहचते कि , विठुरायाचे ते रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आला तरी त्यात नवल नाही.
गौतम राजाध्यक्ष यांनी भीमसेन जोशी यांची सांगितलेली आठवण
मी पुण्याला चाललो होतो. फर्स्ट क्लासच्या डब्यातही ब-यापैकी गर्दी होती. दिवसभराच्या कामाने मी थकलेला होता. डोळे मिटून पडून राहावं, असा विचार करत असतानाच त्याच्या कानावर गाण्याचे सूर पडले. वरच्या बर्थवर सगळ्यांकडे पाठ करून आडवे पडलेले एक गृहस्थ स्वत:शीच गुणगुणत होते. ते सूर इतके अद्वितीय होते की गौतम सांगायचा, ‘‘मी माझा सगळा थकवा विसरलो आणि इतकं महान कोण गातंय, हे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.’’ लोणावळ्याला गाणी थांबली तसा मी डब्याच्या बाहेर लावलेली प्रवाशांची यादी पाहू लागलो. त्यावर नाव होतं- बी. जोशी. इतका वेळ आपण प्रत्यक्ष पंडीत भीमसेन जोशींचं गुणगुणणं ऐकत होतो, या विचाराने त्याला शहारा आला.तेव्हा माझी आणि पंडिंतजींची ओळख नव्हती. त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यानंतर २१ वर्ष जावी लागली. आणि ते माझ्यासाठी भीमअण्णा झाले. फोटो काढताना मी नम्रपणे त्यांना गायची विनंती केली आणि त्या दुपारी ‘‘आसवानी तोडी’’ गाऊन त्यांनी ती पूर्णही केली.
किशोरी अमोणकर यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
आम्ही एका कार्यक्रमासाठी अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला भयंकर थंडी, रात्रीच्या वेळी बाहेर मी एका साध्या खाटल्यावर झोपले होते. तेव्हा तिथून भीमसेन दादा चालला होता. त्यांचं माझ्याकडं लक्ष गेलं. तो म्हणाला, अरे रे, अशी थंडीत उघडयावर कशी झोपली आहे ही ? त्याने ताबडतोब त्याच्या अंगावरची शाल काढून माझ्या अंगावर घातली. तो भीमसेन दादा मी आजही विसरत नाही.
सुधीर गाडगीळ यांनी भीमसेन जोशी यांची सांगीतलेली आठवण.
"पंडित भीमसेन जोशी" म्हटले की, सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातले काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येणार. पण "ऑटोमोबाईल" म्हटले तर कसे वाटेल. गाडगीळ सांगतात, पंडीतजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरगाव सोडण्यात जसा त्यांच्या हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यात ही ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्ट ची माहिती पंडीतजींना असायची. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती गॅरेज वाल्याला ते अगदी बिनचुक सांगत असत. एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते, पंडीतजींनी नुकतीच नवीन मर्सिडिज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडिज काढली आणी म्हणाले 'बसा'. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फुल स्पीड मध्ये सोडली होती. तासाभरात ते कोरेगावभिमाला पोहोचले. समोर नदीवरचा पुल होता. पलीकडून एक ट्रक येताना दिसत होता. पुल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता. गाडगीळांनी न राहवून 'हुश्श' केले. त्यावर पंडितजी म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.
पु.ल.देशपांडे यांनी भीमसेन जोशी यांची घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश.
पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?
भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.
पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.
भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.
पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?
भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?
पु.ल. : पुण्याला.
भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.
पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?
भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.
सचिन तेंडूलकर यांच्या आठवणीतील भीमसेन जोशी.
मी एकदा काही खाजगी कामाकरता मुंबई वरून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून मला म्हणाले,
"नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"
त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'
लता मंगेशकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल आठवणी.
मला भारतरत्न मिळाल्यानंतर "या भारतरत्न' असे
नेहमी म्हणणारे... "अहो लताबाई, घरी या की एकदा. गरम थालिपीठ आणि त्यावर लोणी हा बेत करायला सांगतो' असा आग्रह करणारे पं. भीमसेन जोशी... ‘त्यांचे नाव झाले नव्हते त्या वेळेपासून मी त्यांना ओळखत होते. अनेकदा आम्ही भेटत असू. त्यांच्या घरी माझे जाणे-येणे असे. ते प्रत्येक भेटीत दिवसभर संगीत आणि संगीताविषयीच बोलत असच. चित्रपट, शास्त्रीय संगीत हे त्यांच्या चर्चेचे विषय असत. इतर विषयांचा समावेशच त्यांच्या बोलण्यात कधी नसे. त्यांना भरधाव गाडी चालविण्याची सवय होती. नव्हे तर दूरवरचा प्रवास करून थकल्यानंतरही ते दुसऱ्या दिवशी गायनास बसत होते, हे विशेष!
पं. संजीव अभ्यंकर यांनी सांगितलेली पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दलची आठवण.
१९८१ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी मी पहिल्यांदा कुंदगोळ येथे भरलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात प्रथम गायलो. पंडितजींच्या गुरू भगिनी गंगुबाई हनगल यांनी मला त्या महोत्सवासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्थातच माझा आवाज सुटलेला नव्हता. मी त्या ठिकाणी काळी पाचमध्ये गायलो. गाणं संपल्यानंतर ग्रीन रूममध्ये पंडितजींनी पाठिवर कौतुकाची थाप मारली आणि मला आशीर्वाद दिले. त्यावेळी पंडितजींसोबत काढलेलं छायाचित्र आजही माझ्या संग्रही आहे. त्याच वर्षी एका खासगी कार्यक्रमात मी पंडितजींबरोबर गायलो. पंडितजींनी माझं गाणं ऐकलं आणि ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा ज्ञानदेवांच्या कुळातील मुलगा आहे.’ त्यांच्या या शब्दांमुळेच आई-वडिलांनी माझी संगीतक्षेत्रातील कारकीर्द निश्चित केली.या क्षेत्रात मी स्थान पक्कं करू शकलो यामागे पंडितजींनी त्यावेळी दिलेला आशीर्वाद आहे. १९९० च्या सवाई गंधर्व महोत्सवात ‘मोस्ट ब्राईट यंग आर्टिस्ट’ म्हणून माझा पंडितजींच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पंडितजींनी माझी आत्मियतेने चौकशी केली. त्यानंतर अनेकदा पंडितजींच्या भेटी होत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा साधेपणा मनाला भावत राहिला. इतका मोठा, जागतिक किर्तीचा कलावंत असूनही पंडितजींच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनीमी लहान असताना आई-वडिलांना माझ्या बाबतीत दलेले सल्ले फार मोलाचे ठरले. एकदा ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा मुलगा छान गातोच. पण, त्याच्या तब्येतीकडेही लक्ष द्या.’ पंडितजींनी दिलेला हा सल्ला मला फार मोलाचा वाटला. केव्हाही भेटले तरी त्यांच्याशी गप्पांची मैफल सहज जमून यायची. अशा वेळी त्यांना वयाचं, ज्येष्ठतेचं बंधन आड यायचं नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामंही केली. मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. या महाविद्यालयात म. ना. अदवंत, राजा महाजन अशा ‘साहित्यिक’ प्राध्यापकांकडून महानोरांना भरपूर प्रोत्साहन मिळालं, परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना त्यांची गरज होती. महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले.
ना. धों. महानोर या रानकवीने मराठी साहित्यावर अमीट नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी, त्यातल्या रंग-गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे. रानात राहणारा हा कवी निसर्गाची भाषा बोलतो, निसर्गाशी संवाद करतो, रसिकाचं बोट धरून त्याला निसर्गात घेऊन जातो. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. या कवितेत निसर्गाचे विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आहे. या कवितेत मातीशी जडलेली नाती आहेत, त्यातल्या वेदना-संवेदना आहेत. महानोरांची उत्कट अभिव्यक्ती रोमँटिक-भावनिक वळणाने जाते. महानोरांनी गद्य लेखनही भरपूर केलं आहे. ‘गांधारी’ ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावाकडच्या गोष्टी’ हे लोककथांचे संग्रह, ‘ऐशी कळवळ्याची जाती’ हा व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखांचा संग्रह असं विविधांगी ललित लेखन त्यांच्या नावावर आहे. याशिवाय ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’ तसेच ‘आनंदयोगी पु.ल.’ या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील ही मोठी व्यक्तिमत्त्वं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, महानोरांचं पहिलं प्रेम कवितेवरच आहे. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी कवितेत त्यांचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. त्यांचे ११ कवितासंग्रह व ‘अजिंठा’ हे खंडकाव्य प्रकाशित आहे. ‘वही’ आणि ‘पळसखेडची गाणी’ हे त्यांच्या लोकगीतांचे संग्रह आहेत. त्यांनी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. ‘जैत रे जैत’ या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या रूपाने आविष्कृत झाल्या आहेत.
महानोरांचं लोकसाहित्याबद्दल प्रचंड प्रेम व जिव्हाळा आहे. या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं व लोककथा शोधून, एकत्रित करून संग्रहरूपाने त्यांचा परिचय महाराष्ट्राला घडवला आहे. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ‘वही’ हा मराठवाड्यात लोकप्रिय असलेला लोकगीतांचा प्रकार. महानोरांनी लिहिलेल्या ‘वह्या’ त्यांच्या ‘वही’ या संग्रहात आहेत.
‘चांद केवड्याची रात आलीया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधाया गजरा’
अशी भावुक, मधाळ शब्दकळा लाभलेल्या ‘वही’चं राजस रूप असं आहे,
‘राजसा... जवळि जरा बसा
जीव हा पिसा तुम्हाविण बाऽईऽ
कोणता करू शिणगार सांगा तरि काऽही!’
विलक्षण लयकारी लाभलेल्या या कवीने मुक्तछंदही भरपूर लिहिला आहे. ‘प्रार्थना दयाघना’ मुक्तछंदात आहे, ‘अजिंठा’तली गिल-पारूची कथा मुख्यत्वाने मुक्तछंदात आहे आणि ‘तिची कहाणी’सुद्धा. महानोरांच्या कवितेचे असे विविध पैलू आहेत. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पहिली ओळख नामवंत शास्त्रज्ञ अशी असताना त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी आपल्या अलौकिक कामगिरीने देशाची नवी ओळख निर्णाण करून दिली.
गिटारवादक, अभिनेता आणि 'किंग ऑफ द रॉक अँड रोल' एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला.
कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती.
दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं. हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना.
रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं. गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama". १९६० च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता.
आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं. एल्व्हिस प्रिस्लेची मुलगी लिसा मेरी हिच्याशी मायकेल जॅक्सननं मे १९९४ मध्ये विवाह केला.
'एल्व्हिस' यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे. मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा.
'एल्विस' यांचे एक गाणं आहे, "Jailhouse Rock". 'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस' यांनी आपलं करीअर पुन्हा सुरु केलं.
संगीत, काव्य याबरोबरच त्यांनी अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्यांची लोकप्रियता कैक पटीने वाढली. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. एल्व्हिस प्रिस्टले यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची काही गाणी.
http://www.youtube.com/watch?v=zRu3tw9fYxE&feature=related
http://www.youtube.com/watch?v=-rS55BtfNtI&feature=related
http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc
‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू’ अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली ते मराठीतील श्रेष्ठ विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
‘बेळगावातला मॅट्रिकच्या परीक्षेत जेमतेम ५५ टक्क्यांनिशी उत्तीर्ण झालेला एक साधारण विद्यार्थी’ ते कष्टाने उच्चशिक्षण घेऊन ‘अमेरिकेतला एक कल्पक, यशस्वी व्यावसायिक’ बनण्यापर्यंतचा ठाणेदार यांचा हा प्रवास त्यांच्या ‘ही ‘श्री’ची इच्छा’ या आत्मकथनात त्यांनी प्रांजळपणे सांगितला आहे.
गोविंदराव आदिक हे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष होते
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे - नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली. सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे. एक अत्यंत उत्कृष्ट गायक एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील शब्दाच्या खेळाने तथा कोटीने मजा उडवून देत अंर्तमुख करणयास लावणारा एक कोटयाधीश, फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सदगुरु, समाजाला देवदत्त स्वर्गिय सुस्वरां च्या स्वशक्तिपाताने सन्मार्गा नेणारा महामानव, परिवारातील स्वजनांना आपली थोरीव विसरुन आपला जिवलग, सखा वाटणारा मायबाप अशा अनेकविध पैलूनीं प्रकाशणारे बाबामहाराज सातारकर यांचे व्यक्तिमत्व बहु आयामी आहे.
बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत. त्यांना घोडसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वातही रस आहे. फोटोग्राफी तर त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसरीच्या अनोख्या रचनांबरोबरच दगड, चित्रे, ईत्यादिंचा मोठा संग्रहदेखील त्यांच्याकडे आहे. एक कसलेले शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, पदवीधर वकील, वारकरी फडाचे सर्वोसर्वा, किर्तनाचे प्रशिक्षक, स्तंभलेखक, टिकाकार, साहित्यीक, अभ्यासक या सगळ्या भुमिकाही लिलया ते पार पाडत असतात. बाबामहाराज सातारकर यांची पुरस्कार यादी खूप मोठी आहे. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे, पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. बाबामहाराज सातारकर यांचे संकेतस्थळ www.babamaharajsatarkar.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीधर फडके हे ख्यातनाम मराठी संगीतकार आणि गायक आहेत. ख्यातनाम गायक व संगीतकार स्व. सुधीर फडके आणि ख्यातनाम गायिका स्व. ललिता फडके यांचे ते सुपुत्र. श्रीधर फडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti