(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक

    जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.

  • ज्येष्ठ नाट्यनिर्माते आणि व्यवस्थापक सुरेंद्र दातार

    मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली नाट्यसंस्थेत त्यांनी व्यवस्थापक म्हणून काही काळ काम केले रातराणी, पांडगो इलो रे ब इलो, आई रिटायर होतेय अशा अनेक नाट्यप्रयोगांचे त्यांनी व्यवस्थापन केले नंतर १९९२ मध्ये चंद्रलेखा या मान्यवर संस्थेत त्यांना मोहन वाघांनी बोलावून घेतले आणि २०१० पर्यंत(चंद्रलेखा संस्था बंद होई पर्यंत) ते चंद्रलेखामध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

  • (डॉ.) अनंत फडके

    फडके, (डॉ.) अनंत

    प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. अनंत फडके यांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांच्या रूपाने देशातील भूशास्त्रीय वैशिष्टय़ांची जगाला ओळख करून देणारा एक अवलिया आपल्याला सोडून गेला. भारतात अनेक वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक, भौगोलिक गोष्टी असल्या तरी त्यांची जागतिक पातळीवर ओळख असतेच असे नाही. कारण आपल्यालासुद्धा त्यांची नेमकेपणाने माहिती नसते, मग जगाची गोष्ट तर लांबचीच! पण काही माणसांच्या प्रयत्नांमुळे ही माहिती जनसामान्यांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविणे शक्य झाले.

    भूशास्त्राबाबत हे महत्त्वाचे काम डॉ. फडके यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले होते. महाराष्ट्रातील काळय़ा पाषाणाची (बेसॉल्ट) एक ओळख म्हणजे त्यातील पोकळय़ांमध्ये आढळणारी वैशिष्टय़पूर्ण खनिजे! त्यापैकी सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे ‘झिओलाईट्स’ खनिजांचा! रंगाने, आकाराने आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या वैशिष्टय़पूर्ण रचनेने ही खनिजे अतिशय आकर्षक दिसतात. त्यांचे हे आकर्षक स्वरूप जगापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. फडके यांचा समावेश होता. पण तेवढय़ावरच न थांबता त्यांनी या खनिजांचे संशोधन करून त्याचे गुणधर्म शोधण्याचे आणि वर्गवारी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे हे कार्य जगभरातील भूशास्त्रज्ञांचे या खनिजांकडे लक्ष वेधण्यास उपयुक्त ठरले. काही दशकांपर्यंत ब्राझीलमधील अशा खनिजांना जगभरातून मागणी होती, पण आता त्यांच्या तोडीस तोड अशी महाराष्ट्रातील अशा खनिजांची गणना केली जाते. त्यांच्या अशा प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी दोन खनिजे नव्याने जगाला माहिती करून दिली. त्याबाबतकाही तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण त्यांची काही वैशिष्टय़े त्यांनी वेगळेपणाने दाखवून दिली. त्यातील एक म्हणजे- केळकराईट! आपले गुरू डॉ. के. व्ही. केळकर यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठीच त्यांच्या नावावरून या नव्या खनिजाला त्यांनी हे नाव दिले. पुण्यातील वाघोली येथे आढळणारे निळय़ा रंगाचे आकर्षक ‘कॅव्हेन्झाईट’ हे खनिज भारतात आढळत असल्याची पहिली नोंदही त्यांनी केली. नागपूरजवळील ‘सौसर’ नावाच्या रूपांतरित खडकांच्या सखोल अभ्यासाचे श्रेय, तसेच गुजरातमधील राजपिपळा, गरुडेश्वर येथे आढळणाऱ्या माशांचे ठसे शोधून काढण्याचे श्रेयसुद्धा त्यांच्याच नावावर आहे. आपल्याकडील गोष्टींना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इग्लंड अशा अनेक देशांमधील भूशास्त्राच्या परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथे अनेक संशोधन प्रबंध वाचले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी संशोधनपर लेखनही केले. विविध देशांमधील प्रसिद्ध भूशास्त्रांसोबत एकत्रितपणे काम करूनही त्यांनी आपला हा उद्देश साध्य केला. महाराष्ट्रात आढळणाऱ्या खनिजांचा औद्योगिक वापर करता येईल का, यासाठीसुद्धा डॉ. फडके यांनी संशोधन केले. शीतीकरणाच्या (रेफ्रिजरेशन) प्रक्रियेत ‘क्लिनोप्टोलाईट’चा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारच्या संशोधनात मोठे यश मिळाले नसले, तरी खनिजांच्या या बाजूकडे लक्ष वेधण्यास त्यांचे कार्य निश्चितपणे उपयुक्त ठरले. भूशास्त्रातील खनिजशास्त्र, भूरचनाशास्त्र आणि ज्वालामुखीविज्ञान यांसारख्या विषयांतही त्यांचे योगदान मोठे आहे. १९५०च्या दशकात या विषयांमध्ये संशोधनाला विशेष वाव नसताना त्यांनी धडपड करून हे काम केले. संस्थात्मक पातळीवरही त्यांनी योगदान दिले. पुणे विद्यापीठात भूशास्त्र विभाग वाढविण्यात त्यांचा वाटा होताच, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी घडविण्यातही त्यांनी हातभार लावला. निवृत्तीनंतरही आयुष्याच्या अगदी शेवटच्या आठवडय़ापर्यंत (वयाच्या ७४व्या वर्षांपर्यंत) ते सक्रिय होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘डेक्कन व्होल्कॅनोलॉजिकल सोसायटी’ची स्थापना केली. त्याद्वारे भूशास्त्र हा विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करत होते. त्या दृष्टीने लोणारच्या विवरासंबंधी विस्तृत परिषद भरवून त्यांनी त्याच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परदेशात तेथील छोटी छोटी भूशास्त्रीय वैशिष्टय़े जपली जातात आणि त्यांची उत्तम प्रकारे नोंद केली जाते. याबाबत आपल्याकडे असलेली उणीव दूर करण्याच्या कामाला डॉ. फडके यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या निधनामुळे हे कार्य अपूर्ण राहिले आहे. भूशास्त्रातील संशोधक व विद्यार्थ्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले तर तीच खऱ्या अर्थाने डॉ. फडके यांना श्रद्धांजली ठरेल.

  • विलासराव देशमुख

    कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.

  • राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त

    काव्यातून जनजागृती करून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतविणा-या मैथिलीशरण गुप्त यांना महात्मा गांधीजींनी राष्ट्रकवी म्हणून गौरविले होते. ३ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस ‘कवि दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

  • लेखिका प्रिया तेंडूलकर

    विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार मा.विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका - अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या.

    वडिलांबरोबर त्या नाटयसृष्टीत आल्या पण नंतर तेथे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. 'तो राजहंस एक' हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी 'बेबी', 'एक हट्टी मुलगी', 'सखाराम बाईंडर', 'कन्यादान', 'कमला', 'गिधाडे', 'फुलराणी' आदी नाटकांत भूमिका केल्या. शिरिष पै यांच्या 'कळी एक फुलत होती' या नाटकात वयाच्या अठराव्या वर्षी काम करण्याची संधी त्यांना लाभली. बासू चतर्जींनी तिला 'रजनी' या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले. अगदी अलीकडे त्यांनी 'प्रिया तेंडूलकर टॉक शो' सुरू केला. या 'शो'त त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांना स्थान दिले. त्याचबरोबर 'अडोस-पडोस', 'जिंदगी', 'खानदान', 'बॅ. विनोद', 'हम पाँच', 'दामिनी' यांसारख्या मालिकांतून त्यांनी आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले.

    श्याम बेनेगल यांना १९७४ साली 'अंकुर' चित्रपट बनवताना त्यातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिला घ्यावेसे वाटले आणि ही अभिनेत्रीही बनून गेली. 'गोंधळात गोंधळ', 'माळावरचं फूल', 'मायबाप', 'देवता', 'राणीने डाव जिंकला', 'मुंबईचा फौजदार', 'माहेरची माणसं', 'सस्ती दुल्हन महँगा दुल्हा', 'कालचक्र', 'माझं सौभग्य', 'हे गीत जीवनाचे', 'और प्यार हो गया', अशा चित्रपटांत, त्यांनी भूमिका केल्या. गुजराती मराठी चित्रपटांतील काही भूमिकांबद्दल त्यांनी अभिनयाचे पुरस्कारही मिळवले.

    आपल्या चित्राची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती. बी. ए. झाल्यानंतर जे. जे. मधून चित्रकला विषयातील प्रशिक्षणही दोन वर्षे घेतलेल्या प्रियाला केवळ चित्रकला शिक्षिका व्हायचे नव्हते. 'जन्मलेल्या प्रत्येकाला' हा तिचा कथासंग्रह दमाणी साहित्य पुरस्कार देऊन गेला. 'जगले जशी', 'ज्याचा त्याचा प्रश्न', 'जावे तिच्या वंशा' आदी पुस्तकांनी तिला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळवून दिला. एक वेगळया वाटेने जाणारी कथालेखिका म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला.मा.प्रिया तेंडुलकर यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर

    वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजे म्हणजे चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. त्यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांच्या कादंबऱ्यांचे चरित्रात्मक , आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या आणि प्रासंगिक आणि अन्य कादंबऱ्या असे वर्गीकरण केले जाते.

  • राम गणेश गडकरींचा समृद्ध वारसा – जुई गडकरी

    आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.
    मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.

    जुईचा चेहरा फोटोजेनिक आहे. जुईचे फोटोशूट करण्याचा योग अनेकदा आला. फोटोशूटपूर्वी आणि शूटदरम्यान जुईशी तिच्या अभिनयातल्या अनुभवांबद्दल आम्ही बोलतो. जुई अभिनय क्षेत्रात कशी आली याविषयी तिच्याशी गप्पा मारत असताना ती भरभरून बोलते. अनेक गोड – कटू अनुभव ती सांगते. सहायक दिग्दर्शकाच्या भूमिकेतून तिने या इंडस्ट्रीत प्रवेश केला खरा. मात्र पुढे तिने अभिनयात यावं यासाठी तिच्या सहकाऱयांनी आणि विशेषतः तिच्या आईने तिला प्रोत्साहन दिले. जुई या क्षेत्रात येण्यापूर्वी तिला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष यांचं. गौतमजींनी योग्य वेळी आणि योग्य लोकांशी ओळख करून दिल्याने जुईचा प्रवास पुढे सुखकर झाल्याचं ती सांगते. ‘बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’ या एकापाठोपाठ एक मालिकांतून जुईचा चेहरा दिसू लागला, तर पुढे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील ‘कल्याणी’ हे पात्र महाराष्ट्रभर चांगलंच गाजलं. कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ या मालिकेतूनही जुईने रसिक मनावर मोहिनी घातली.

    राम गणेश गडकरींचा इतिहास आणि जुईच्या त्याकाळी सुरू असलेल्या मालिका हे लक्षात घेऊन आम्ही जुईचं पारंपरिक वेशभूषेत फोटोशूट करायचं ठरवलं. यासाठी लाल रंगाची साडी आम्ही निवडली होती. पारंपरिक वेशभूषा, कपाळावर सजलेली चंद्रकोर टिकली, नाकात पिटुकली नथ, अंबाडय़ावर लगडलेला गजरा, दागिन्यांचा देखणा साज असा मराठमोळा शृंगार केलेल्या जुईचं मोहक रूप मी कॅमेराबद्ध करत होतो.

    पोर्ट्रेट टिपताना त्या व्यक्तीची चांगली बाजू, डोळ्यातली चमक आणि चेहऱयावरचे भाव हे प्रत्येक वेळी महत्त्वाचं असतं. अनेकदा ही आपली बाजू कलाकारांना माहीत असते, तर काही वेळा व्यक्तीचा चेहरा बघताच क्षणी छायाचित्रकाराला त्या व्यक्तीच्या प्रिफरेबल साईडचा अंदाज येतो. जुईच्याही बाबतीत जुईची एक बाजू फोटोसाठी जास्त चांगली आहे. जुईचे फोटो टिपत असताना जुईच्या स्मितहास्यामुळे तिच्या गालावर हलकीशी खळी पडत असल्याचं मला ध्यानात आलं, तर तिच्या डोळ्यांजवळही दोन नैसर्गिक रेषा असल्याचं मला लक्षात आलं. हीच बाब हेरून जुईचा प्राधान्य असलेल्या बाजूने फोटो टिपायचे मी ठरवलं. जुईचे मोहक स्मितहास्य यावेळी मला कॅमेराबद्ध करता आलं.

    जुईचे अनेकदा पारंपरिक वेशभूषेत छायाचित्र टिपल्यानंतर साधारण वर्षभराने तिचं एका मॉडर्न लूकमध्ये फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. तिचा हा लुक कुठे अनैसर्गिक वाटणार नाही ना, तसंच तिची प्रतिमा यातून वेगळी निर्माण नाही ना होणार याची काळजी आम्ही घेतली. पहिल्या शूटसाठी हिरव्या रंगाचा वन पीस तिने परिधान केला. या कॉस्च्यूमची गरज असलेली वेशभूषा आणि मेकअप आम्ही करून घेतला.

    जुईला काही वेगळे कॉस्च्यूम दाखवले, त्यावरचा लूक सांगितला. काही फोटोंचे रेफरन्स दाखवले. जुईला शूट करायची इच्छा होती, परंतु तिची मानसिक तयारी नव्हती हे तिच्या देहबोलीतून समजत होतं. शूटला ती तयार होती, सांगेल तशी पोजेस देत होती, परंतु चेहऱयावर चिंतेचे भाव होते. जुईला यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही काही काळ शूट थांबवलं. कॅमेरा बाजूला ठेवून तिच्याशी बोलून, गप्पा मारून तिला थोडं फ्री करून आम्ही पुन्हा फोटोशूटला सुरुवात केली. नंतर आमच्या समोर आली ती बिनधास्त वावरणारी, मॉडर्न लूकमधली, नेहमीच्या चेहऱयापेक्षा वेगळी, ग्लॅमरस जुई. तिचे वेगवेगळ्या कॉस्च्यूममध्ये नंतर आम्ही शूट केलं. जुई हळूहळू अधिक खुलत गेली आणि मला तिचे हवे तसे फोटो मिळत गेले. जुईचे नंतर काही काळ्या रंगाच्या वन पीसमध्ये आम्ही फोटोशूट केले. या फोटोत ती अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस वाटत होती.

    चौकटीत राहून आपला पिढीजात मराठी बाणा जपणारी जुई पारंपरिक वेशभूषेत सुंदर दिसतेच, परंतु आजच्या युगात स्वच्छंद वावरणारी मॉडर्न जुईदेखील कॅमेऱयात तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू शकते हे तिने सिद्ध केलंय. कलाकाराला त्याच्या चेहऱयावर रंग घेऊन वावरताना त्याच्या वैयक्तिक मतापेक्षा त्या रंगांना न्याय देण्यासाठी नेहमी धडपड करावी लागते. ही धडपड अनुभव आणि अभ्यासाच्याच जोरावर करता येऊ शकते हे जुईशी बोलताना, शूट करताना जाणवतं.

    धनेश पाटील

  • आकाशवाणी पुणे केंद्र

    २ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली.

    गेली ६४ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी " बहुजन हिताय बहुजन सुखाय " ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे... !!!
    सुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ अशा अनेकांची वृत्त निवेदनाची कारकीर्द आकाशवाणी पुणे केंद्रात बहरली.
    आकाशवाणीवर सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती वरील सकाळी शास्त्रीय संगीत विषयाला वाहलेला हा आणि जुन्या हिंदी गाण्यांचा भुले बिसरे गीत हा कित्येक वर्षे सुरु असलेला कार्यक्रम आजही अनेक श्रोते ऐकत असतात. कुठल्याही विषयाचे बंधन नाही, अतिशय आशयपूर्ण, माहितीपूर्ण असे विविध कार्यक्रम प्रत्येक पुणे आकाशवाणीवर वर्षी येत असतात.

    मराठी साहित्याशी निगडीत असलेले पुस्तक वाचनाचे कार्यक्रम असो, किंवा बऱ्याच वेळेला आकाशवाणीच्या खजिन्यातून निवडक कार्यक्रम पुन:प्रसारित करतात, त्यातही गेल्या पिढीतील कलाकार, व्यक्ती यांची ओळख होत राहते. दुपारचे कार्यक्रम जास्त ऐकले जात नाहीत असे वाटते,पण गृहीणी त्याचा आस्वाद घेत असतात. संध्याकाळचे, विशेषत: रात्रीचे कार्यक्रम जसे नभोनाट्य, राष्ट्रीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, हे देखील दर्जेदार असतात. पुणे विविधभारतीवरील रात्रीचा छायागीत हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील कित्येक वर्ष चालू आहे. भारताची, तसेच महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे कार्यक्रम जसे संकृत भाषेवरील गीर्वाण भारती, संगीत नाटकांच्या इतिहासावरील कार्यक्रम, असे वैविध्य असते.

    सामाजिक बांधिलकी जपणारे, आणि त्या निमित्त वेगवेगळया व्यक्ती, संस्था यांचा परिचय करून देणारे कार्यक्रम देखील अतिशय उद्भोधक असतात. पुणे आकाशवाणीवर ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला १९६० च्या दशकात सादर केलेला गीतरामायण हा कार्यक्रम तर दंतकथा होवून बसला होता. पण आज काल प्रायोजित कार्यक्रमांचा देखील आकाशवाणीवर भडीमार असतो, त्यातही काही चांगले प्रायोजित कार्यक्रम आहेत,पालखीवर दरवर्षी "पायी वारी पंढरीची "ही कार्यक्रम मालिका प्रसारित करण्याची परंपरा आकाशवाणी पुणे केंद्रानं जपली आहे.

    या वर्षी पुणे आकाशवाणीने "निवेदक आपल्या भेटीला" या कार्यक्रमा अंतर्गत पुणे आकाशवाणीचे निवेदक श्रोत्यांच्या भेटीस आणले होते.
    यात मंगेश वाघमारे, गौरी लागू, सिद्धार्थ बेंद्रे, प्रतिमा कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी,डॉ.प्रतिमा जगताप, कैलास जगताप, संजय भुजबळ या निवेदकांनी आयोजित केलेल्या बहारदार रंजक कार्यक्रमाचा आस्वाद रसीकांनी घेतला.पुणे आकाशवाणीचा ब्लॉगदेखील आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • राजमाता जिजाबाई (जिजाऊ)

    महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी घडवलं आणि महाराष्ट्राचं बवितव्यच बदललं.

    जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

    राजांचे संगोपन आणि कुशल कारभार

    शिवाजीराजे १४ वर्षांचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला, शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले.

    आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात जिजाबाईंच्या प्रेरणेचा खूप मोठा हातभार होता.

    जीवन

    शहाजी राजांनी बंगळूरात तुकाबाईंशी दुसरे लग्न केल्यावर जिजाबाईंच्या वाटयाला फारसे पती प्रेम व राजांच्या वाटयाला पिताप्रेम आले नाही. परंतु आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

    राजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्म-राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढंच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

    राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णतः जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

    शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर थोडयाच दिवसांत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.