(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • दादा जेपी वासवानी

    साधू वासवानी मिशनचे संस्थापक, सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू हा लौकिक परिचय असलेले दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान दिले. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी पाकिस्तानमधील सिंध प्रातांतील हैदराबाद येथे झाला. जे. पी. ऊर्फ जशन पहलाजराय वासवानी असे त्यांचे मूळ नाव. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांचे ते पुतणे होते.

    साधू वासवानी यांच्यासमवेत १२ नोव्हेंबर १९४८ रोजी दादा भारतामध्ये आले. ‘इंडियन डायजेस्ट’ आणि ‘ईस्ट अँड वेस्ट सिरीज’ या मासिकांचे संपादन करणाऱ्या दादांनी १९६२ ते १९७६ या कालावधीत सेंट मीरा कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. २५ नोव्हेंबर १९८६ या साधू वासवानी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘शाकाहार दिन’ ही चळवळ दादांनी सुरू केली. दादा जे. पी. वासवानी यांनी शाकाहारासाठी देश-विदेशात प्रचार केला. जे. पी. वासवानी हे अविवाहित होते. त्यांचे भौतिकशास्त्रात त्यांनी एमएस्सीपर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यानंतर एल.एल.बी.चीही पदवी संपादन केली होती.

    दादा जे. पी. वासवानी यांच्या आयुष्याचा सारांश 'प्रेम' या शब्दात होते. लहानपणाासून त्यांच्यात सेवा आणि दयेचा अंकुर विकसित झाला होता. अत्यंत बुद्धिमान अशी त्यांची ख्याती होती. केवळ सतराव्या वर्षी त्यांनी एमएस्सीची पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली होती. भौतिकशास्त्रातील प्रबंधांची त्यावेळचे नोबेल विजेते सर व्ही. व्ही. रामन यांनी प्रशंसा केली होती. वासवानी यांचे इंग्रजी; तसेच सिंधी या भाषांवर प्रभुत्व होते. ते सतत वाचन व मननात मग्न असत. जगातील प्रख्यात लेखकांच्या पुस्तकांतील परिच्छेद ते आपल्या भाषणांतून नेहमी सांगत असत. दादांची राहणी साधी होती.

    अंगात पांढरा शर्ट, पायजमा, पांढरी शाल आणि पायात साधी चप्पल. हसरा चेहरा आणि चमकदार डोळे, मोठे कान ही दादांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. दिलखुलास हास्य आणि अंगभूत समयसूचकतेने ते इतरांची मने जिंकून घेत. हसताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू ओसंडून वाहात असे.

    दादा जे. पी. वासवानी यांनी साधू वासवानी मिशनतर्फे अनेक सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले होते. सेंट मीरा स्कूल व कॉलेज सुरू केले. त्यांनी इंग्रजी, सिंधी भाषेत सुमारे १९० पुस्तके लिहिली. देशभरात १८ शाळा काढल्या, तर पुण्यात इनलॅक्स बुधरानी हे हॉस्पिटल; तसेच शांती क्लिनिकदेखील सुरू केले.

    विदेशी भाषेत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. जगातील अनेक नामांकित नेत्यांसह धर्मगुरू त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दादा जे. पी. वासवानी यांचे १२ जुलै २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पं. त्र्यंबकराव जानोरीकर

    भेंडीबाजार घराण्याचे गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांचा जन्म १३ जुन १९२१ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचेकडे पुणे येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच अहमदनगमध्ये व रत्नागिरीत संगीतप्रसार करण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. १९४६ मध्ये त्यांनी मुंबई येथे भेंडीबाजार घराण्याचे पं. शिवकुमार शुक्ला यांचा कार्यक्रम ऐकला, आणि त्यांच्या सांगीतिक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले.

    पं. शिवकुमारांच्या गाण्याने व भेंडीबाजार घराण्याच्या गायनशैलीने प्रभावित होऊन पं. जानोरीकर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खाँ यांचे गंडाधारी शागीर्द बनले. उस्तादांच्या निधनानंतर १९५३ मध्ये पं. जानोरीकरांनी त्याच घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती अंजनी मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना पं. जानोरीकरांच्या गायकीला वेगळेच पैलू प्राप्त झाले. पं. जानोरीकरांनी भारतभर आपले कार्यक्रम केले, तसेच संगीताचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीलाही त्यांनी तयार केले. १९६० ते ७०च्या दशकात ही विशिष्ट गायकी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना जानोरीकरांनी देशभर मैफिली करून ती सर्वदूर पोहोचवली आणि लोकप्रियही केली. कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत १९८९ च्या नोव्हेंबरापासून इ.स. १९९१ च्या जूनपर्यंत त्यांनी संगीत गुरू म्हणून काम पाहिले. त्यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीविषयी सप्रात्यक्षिक व्याख्यानांसाठी ते विशेष लोकप्रिय होते.

    जानोरीकर बुवांचा वल्लभ संप्रदायाशी जवळचा संबंध होता. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये हिंदू देवी-देवतांची सुरेख वर्णने आढळतात. पंडित जानोरीकरांनी अनेक शिष्य तयार केले. डॉ. साधना जोशी, डॉ. सुहासिनी कोरटकर, शरद करमरकर, पद्माकर कुलकर्णी, श्रीकांत पारगावकर, अनुराधा कुबेर, किशोरी जानोरीकर, केदार बोडस, कुमुदिनी मुंडकर आणि अनुराधा मराठे ही त्यांतली काही ठळक नावे आहेत. त्यांच्या शिष्या किशोरी जानोरीकर या सध्याच्या पिढीतील प्रतिभावंत गायिका आहेत. पं.त्र्यंबकराव जानोरीकर यांचे २३ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • राम पटवर्धन

    साक्षेपी संपादक आणि अनुवादक म्हणून ख्याती असलेल्या राम पटवर्धन यांचा जन्म २१ मार्च १९२८ रोजी रत्नागिरीतील गणेशगुळे गावात झाला.महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी अनुवाद करायला सुरुवात केली.१९४९ मध्ये ते “मौज” साप्ताहिकात काम करू लागले तसंच मुंबईतल्या काही महाविद्यालयांत काही काळ अध्यापन देखील केलं .त्यांनी “नाइन फिफ्टी टू फ्रिडम” या पुस्तकाचा “अखेरचा रामराम” या नावाने मराठी अनुवाद केला. तसेच बी. के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक “योगदीपिका” नावाने मराठी साहित्यात आणले.

  • वॉलमार्ट’चे जनक सॅम वॉल्टन

    १९८० च्या सुमारास ‘वॉलमार्ट’चे २७६ मॉल्स अमेरिकेत उभे राहिले. पुढे तर त्यांनी वर्षाला १०० मॉल्स हे उद्दिष्ट ठेवेल आणि गाठलेही होते. आजच्या तारखेला वॉलमार्टचे जगभरात अकरा हजार तीनशे हून अधिक मॉल्स आहेत. १९८५ साली जगप्रसिद्ध नियतकालीक फोर्ब्जने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन ‘सॅम वॉल्टन’ यांना घोषित केले होते.

  • मराठीतील व हिंदीतील जेष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदीमा

    गदीमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही तीन चित्रकथा ही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहे. युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. गदीमा हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या चित्रपटकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी होत्या. गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदीमा यांचीच. गदिमांचा उल्लेख कोणी महाकवी असा केला, की ते गमतीने म्हणत असत- अहो, मी महाकवी नाही, महाकाय कवी आहे! त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकिपीडिया, शशांक गिरडकर

  • कोथरुडचे शिल्पकार मा. शशिकांत सुतार

    भाऊ अशी ओळख असलेले मा.शशिकांत सुतार हे त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शिवसेनेचे उपनेते म्हणून कायम चर्चेत राहिले आहेत. साधेपणा हे तर भाऊंचे आभूषण, पांढऱ्या पायजमा कुर्त्यात वावरणाऱ्या भाऊ हे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी होत.

  • प्राच्यविद्या संशोधक काशिनाथ त्र्यंबक तेलंग

    १८९२ साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे पहिले भारतीय कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.

  • पं. जितेंद्र अभिषेकी

    पंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाईल. ‘मत्स्यगंधा’ हे पंडितजीनी संगीत दिग्दर्शन केलेले ना टक १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले आणि खूप गाजलं.

  • अनंत मराठे ऊर्फ अनंतकुमार

    अनंत मराठे हे गायक पं. राम मराठे यांचे कनिष्ठ बंधू. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. रामशात्री या चित्रपटात त्त्यांनी बेबी शकुंतला यांच्या बरोबर बाल अभिनेता म्हणून काम करून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अनेक मराठी हिंदी गुजराथी बंगाली चित्रपटात त्त्यांनी कामे केली होती. बरखा, सीता स्वयवर, जय संतोषी मा, संपूर्ण रामायण भरत मिलाप अशा दोनशेहून अधिक पौराणीक चित्रपटात कामे केली. मनोज कुमार यांच्या शहिद या चित्रपटातील राजगुरू यांची भूमिका व हमारी याद आयेगी या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका खूप गाजली होती. सोनाराने कान टोचले या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. जावई माझा भला या चित्रपटातील भुमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.

    प्रपंचमाया या दूरदर्शन मालिकेतही त्यांनी अभिनय केला होता. प्रभातच्या 'रामशास्त्री' य गाजलेल्या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले व त्यांनी स्वतः गायलेले 'दोन घडीचा डाव' हे गाणे खूप गाजले होते. अनंत मराठे यांचे १९ फेब्रुवारी २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मनोहर कोतवाल

    कोतवाल, मनोहर
    भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने निर्णायक वळण घेतले त्याच कालखंडात, ब्रिटिश राजवटीत राजकीय आंदोलनांबरोबर कामगारांचेही समांतर लढे सुरू होते. पुढे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात राजकीय चळवळीइतकेच कामगार चळवळीला महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळेच बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या कामगार संघटना स्थापन केल्याचे दिसते.

    इंटक, आयटक, एचएमएस, बीमएस ही काही त्याची ठळक उदाहरणे. परंतु त्या काळातील नेतृत्वाने राजकीय विचारांची बांधीलकी मानूनही केवळ कामगारांच्या हितासाठी या कामगार चळवळीचे अस्तित्व जाणीवपूर्वक वेगळे व स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. देशातील संघटित व विशेषत: कंत्राटी कामगारांचे ज्यांनी समर्थपणे नेतृत्व केले, त्यात भाई मनोहर कोतवाल यांचे नाव अग्रभागी होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या अगदी जागतिकीकरणापर्यंत जे काही बरे-वाईट कामगारवर्गावर परिणाम झाले, या संबंध ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील राजकीय, आर्थिक व कामगारविषयक घडामोडींचे ते साक्षीदार होते. एक अभ्यासू, लढाऊ आणि कामगार संघटनांमध्येही शिस्तीचा आग्रह धरणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. अध्ययन सुरू असतानाच त्यांनी लोकसेना संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीतही भाग घेतला. एका बाजूला स्वातंत्र्याची चळवळ निर्णायक टप्प्यात आली असताना कामगारांचे लढेही ब्रिटिश सरकारपुढे आव्हान म्हणून उभे होते. अशा वातावरणात कामगार चळवळीचे पितामह म्हणून ज्यांना ओळखले जात होते, त्या ना. म. जोशी यांच्या संपर्कात कोतवाल आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बीपीटी रेल्वेमेन्स युनियनच्या माध्यमातून त्यांनी कामगार चळवळीत प्रवेश केला. या युनियनचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे एक संस्थापक नेते पी. डी’मेलो यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. देशातील प्रमुख बंदरातील कामगार व गोदी कामगार महासंघाच्या मुख्य प्रवाहात ते आले. पुढे डॉ. शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी आदी नेत्यांच्या बरोबरीने कोतवाल यांनी गोदी कामगारांचे यशस्वी नेतृत्व केले. गोदी कामगारांच्या न्याय-हक्काच्या लढय़ांमध्ये ते कायम अग्रभागी राहिले. देशात १९७५ मध्ये लादल्या गेलेल्या आणीबाणीने राजकारणाबरोबर कामगार चळवळही ढवळून निघाली होती. कामगार चळवळींच्या नेतृत्वामध्येही आणीबाणीचे समर्थक व विरोधक अशी विभागणी झाली. मनोहर कोतवाल हे समाजवादी विचारातून तयार झालेले नेतृत्व, परंतु काँग्रेस विचारांशी थोडी जवळीक ठेवणारे होते. अंतर्गत राजकीय मतभेदांचा गोदी कामगार चळवळीवर परिणाम झाला. देशव्यापी बंदर व गोदी कामगार महासंघाचे दोन गट पडले. एका गटाचे नेतृत्व शांती पटेल करीत आहेत, दुसऱ्या गटाचे नेतृत्व एस. आर. कुलकर्णी व मनोहर कोतवाल यांच्याकडे गेले. तरीही नेतृत्वांमधील सामंजस्य, सभ्यता आणि समजूतदारपणामुळे गोदी कामगारांमध्ये कधी अंतर्गत संघर्ष उभा राहिला नाही. निर्णायक क्षणी सारे नेते एकत्र येऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देत. या अर्थाने मनोहर कोतवाल मोठे व वेगळे नेते होते. समाजवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या हिंद मजदूर सभेचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. भारतीय अन्न महामंडळातील कंत्राटी कामगारांचा लढा त्यांनी यशस्वीपणे लढविला. सरकारी उपक्रमात काम करूनही या कामगारांचे प्रचंड आर्थिक शोषण होत होते. त्याविरुद्ध त्यांनी आंदोलन केले. कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. पुढे कंत्राटी कामगारांचे कोतवाल म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा.