जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बातमी कोणतीही असो ती सर्वप्रथम आपल्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी ईर्षां मनात बाळगणे हा आजचा प्रकार नाही. ज्यावेळी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र मर्यादित होते व फक्त सरकारी माध्यमे, मोजकी वृत्तपत्रे व वृत्तसंस्था होत्या तेव्हापासून ही ईर्षां कायम आहे. मात्र आपण देत असलेली बातमी नुसती सर्वप्रथम देऊन उपयोग नाही ती बिनचूक असली पाहिजे, असा खाडे यांचा आग्रह असे. याच आग्रहामुळेच त्यांचा पत्रकारितेत दबदबा होता. त्यांचे पूर्ण नाव कदाचित कोणाला आठवणार नाही पण ‘दि. बा.’ म्हटले की पत्रकार व राजकीय नेत्यांच्या मनात लगेच खाडे हे नाव आलेच पाहिजे, अशी त्यांची ख्याती होती.
दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. यांचे मंगळवारी वयाच्या ८२ व्या वर्षी मधुमेहाने निधन झाले. शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या पिढीतला आणखी एक दुवा आता निखळला आहे. मितभाषी, मनमिळावू आणि नेहमीच सर्वाना माहिती देण्यात अग्रेसर असलेल्या पत्रकारांपैकी ते एक होते. २००५ च्या अतिवृष्टीत घर पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे जमवून ठेवलेला माहितीचा खजिना नष्ट झाल्यावर खाडे हताश झाले होते. खाडय़ांच्या त्या साहित्याचे मोल फक्त अभ्यासकांनाच कळू शकते. त्यावेळी सरकारने फक्त पाच हजार रुपये मदत देऊ केली.
वर्षांनुवर्षे मेहनतीने जमा केलेली माहिती पाच हजार रुपयांत परत मिळणार नव्हती. १९५२-५३मध्ये पत्रकारितेत आलेल्या खाडे यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रसिद्धी सहाय्यक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची पदोन्नती होत होत ते वृत्त विभागात आले आणि नंतर ते वृत्तसंपादक या पदापर्यंत पोहोचले. कोयनेचा भूकंप झाला तेव्हा खाडे त्यांच्या अंधेरी येथील घरी होते. मुंबईत त्या भूकंपाचे धक्के बसताच सगळी पळापळ झाली. मध्यरात्रीची वेळ व वीज बंद झालेली.
खाडे यांनी आपल्या कुटुंबाला बाहेर काढले, पण स्वत: मात्र पुन्हा घरात शिरून मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी सर्वप्रथम कुलाबा वेधशाळा तसेच संबंधित यंत्रणांकडून भूकंपाबाबत माहिती घेतली. नंतर लाइटनिंग कॉल लावून (त्या काळात मुंबईबाहेर फोन करण्यासाठी ट्रंककॉल किंवा लाइटनिंग कॉल लावावा लागत असे) दिल्ली रेडिओवर भूकंपाची बातमी दिली. पुढल्याच बातमीपत्रात रेडिओवरून महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाची माहिती देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाडे यांच्या नावासहित समजली. त्या काळी रेडिओवरून बातमी देणाऱ्या बातमीदाराचे नाव सांगण्यात येत नसे. तरीही त्यांच्या नावासहित ही बातमी देण्यात आली होती, याचे कारण त्यांनी घेतलेली मेहनत!
त्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या चमूसहित कोयना येथे जाऊन तेथील भूकंपग्रस्तांच्या मुलाखती घेत तो अनुभव श्रोत्यांसाठी जिवंत केला होता. त्यांची बदली शिलाँग येथे काही काळासाठी झाली होती. मुंबई दूरदर्शन सुरू झाले तेव्हा त्यांची बदली दूरदर्शनच्या वृत्त विभागात झाली. मुंबई दूरदर्शनचे ते पहिले वृत्तसंपादक होते. पण तेथे त्यांचे मन काही रमेना. ते पुन्हा आवर्जून ऑल इंडिया रेडिओत आले. जनता पक्ष सत्तेवर असताना जयप्रकाश नारायण मुंबईत जसलोक इस्पितळात उपचार घेत होते. अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेमध्ये जाहीर केले.
सभागृहात श्रद्धांजलीही वाहण्यात आली. प्रत्यक्षात मात्र जयप्रकाश नारायण यांची प्रकृती फक्त चिंताजनक झाली होती. पण त्यांच्या निधनाचे वृत्त खरे की खोटे याची खातरजमा न करताच संसदेमध्ये त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि संसदेचे कामकाज थांबविण्यात आले. बातमीची पक्की खातरजमा करून घेण्याची सवय खाडेंना स्वस्थ बसू देईना. त्यांनी इस्पितळात धाव घेतली तेव्हा खरी परिस्थिती उघड झाली. खाडे यांनी तातडीने दिल्लीला खरे वृत्त कळविले. यामुळे सरकारचे हसे झाले. मात्र त्यानंतर प्रत्येक वृत्तसंस्था व वृत्तपत्राचा पत्रकार जसलोकमध्ये तळ ठोकून बसू लागला व इस्पितळातूनही रोज अधिकृतपणे माहिती देण्यात येऊ लागली. आता अशी माहिती देणे हे नेहमीचे झाले आहे. मात्र या पायंडा खाडे यांच्यामुळे पडला हे विसरता येत नाही. बिनचूकपणा हाच खरा बातमीचा आधार, असा आग्रह धरणारे खाडे यांच्यासारखे पत्रकार आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात सापडणे कठीण!
मंत्रालयात तेव्हा पीटीआय व युएनआय या दोन वृत्तसंस्थांचे पी.के. व व्ही.के. नाईक आणि रेडिओचे खाडे या त्रिमूर्तीचा दबदबा होता व त्यांच्यामुळे पत्रकार परिषदाही रंगत असत. तिघेही अत्यंत गप्पिष्ट असत आणि मैफल रंगविण्यात तिघांचाही हातखंडा असे. त्यातही खाडे नेहमीच आघाडीवर असत. कमी पण योग्य शब्दांत समोरच्याचे वर्णन करण्याची खाडे यांची हातोटीही वाखाणण्यासारखीच होती.खाडे यांच्या जाण्याने आता ती रंगत निघून गेली आहे.
‘अरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींच्या बरोबर केले आणि वयाच्या ८४ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत असत.
विख्यात प्राच्यविद्या संशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक.
धुळे जिल्ह्यात जिथे अवर्षण नित्याचे झाले होते, त्या भागात आता लोक वर्षाला तिसर्या पिकाचा विचार करु लागल्याचे चित्र शिरपूर पॅटर्नमुळे तयार झाले. भूगर्भाच्या अचूक अभ्यासाने जमिनीची अॅंजिओप्लास्टी करण्याचे अभिनव तंत्र भूगर्भशासस्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांनी इथे विकसित केले. शिरपूर पॅटर्न नावाने ओळखली गेलेली या जलक्रांतीचा प्रसार आता राज्यभर होतो आहे.
शिरपूर पॅटर्नचा जनक
समाजवादी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते श्री. वसंतराव नाचणे यांनी कै. दत्ताजी ताम्हणे यांच्या बरोबर खेडोपाडी खूप काम केले.
स्टार प्रवाह वरील “लक्ष्य” या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली.
मौलाना ... हसरत मोहानी यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) येथे झाला.संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!
सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले.
४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या. कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती. हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते. मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली. १८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे.
मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची. दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या.
मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!
अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला.
अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला. मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.
हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात -
मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक पैगामे वफा बादे सहर लेके गयी है.
(हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते -
मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से सिधारे आज तिलक बलवंत तिलक, महाराज तिलक, आझादी के सरताज तिलक
मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
मनमोहन श्याम से नैन लाग निसदिन सुलग रही तन आग मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है , हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है, व खूब-रुयोंसे यारियाँ न गई
या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स मा.हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई
हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर
खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g
हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
=========================================
उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
=====================================
कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
=====================================
जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
======================================
तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
देखता था मै तुने भी इशारा कर दिया
इश्कने उसको सीखा दी शायरी
अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई
पाच वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर १८९७ मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरीत्या तयार केले. हे दणकट इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, मंदगतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते. रुडॉल्फ डिझेल हे १९७८ सालचे ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेम’चे मरणोत्तर मानकरी ठरले होते.
माधव गोडबोले हे एक सचोटीचे, कर्तव्यदक्ष, नियमानुसार काम करणारे सनदी अधिकारी होते.. पक्के सेक्युलर पण सनदशीर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. गृहसचिव म्हणून निवृत्त व्हावे लागल्यावर ‘द अनफिनिश्ड इनिंग्ज ‘ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चांगलेच गाजले.
भारतातील सर्व संगीत महोत्सवासह भारताबाहेर यूरोप, अमेरिका, इग्लंड, ऑस्ट्रेलिया, द दक्षिण अफ्रीका, रशिया, चीन आदी देशांमध्ये आपली कला सादर करुन रसिकांची वाहवाही मिळवली आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचे फ्युजन करण्याचे अनेक प्रयोग इतर भार परदेशी कलाकारांच्या साथीने ‘Vibgyor’,’ताल यात्रा’, ‘साउंड ऑफ इंडिया ‘माईल्स फ्रॉम इंडिया’ अशा कार्यक्रमातून सादर करून त्यांनी संगीत क्षेत्रातील ही वेगळी वाट सुद्धा समर्थपणे हाती आहे जी रसिकांच्या पसंतीस उतरली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti