जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार मा.विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. त्याच प्रिया तेंडुलकरने नंतर बँक कर्मचारी, मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, चित्रवाणी मालिकांतील यशस्वी सूत्रसंचालिका - अशा निरनिराळया भूमिका जीवनात यशस्वीपणे वठवल्या.
वडिलांबरोबर त्या नाटयसृष्टीत आल्या पण नंतर तेथे त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. 'तो राजहंस एक' हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर त्यांनी 'बेबी', 'एक हट्टी मुलगी', 'सखाराम बाईंडर', 'कन्यादान', 'कमला', 'गिधाडे', 'फुलराणी' आदी नाटकांत भूमिका केल्या. शिरिष पै यांच्या 'कळी एक फुलत होती' या नाटकात वयाच्या अठराव्या वर्षी काम करण्याची संधी त्यांना लाभली. बासू चतर्जींनी तिला 'रजनी' या दैनंदिन जीवनातील अन्यायाविरूध्द लढणा-या सामान्य गृहिणीची मालिका दूरदर्शनसाठी करायला लावली आणि या मालिकेने प्रिया तेंडूलकर या नावाला ख-या अर्थाने वलय मिळवून दिले. अगदी अलीकडे त्यांनी 'प्रिया तेंडूलकर टॉक शो' सुरू केला. या 'शो'त त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांना स्थान दिले. त्याचबरोबर 'अडोस-पडोस', 'जिंदगी', 'खानदान', 'बॅ. विनोद', 'हम पाँच', 'दामिनी' यांसारख्या मालिकांतून त्यांनी आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले.
श्याम बेनेगल यांना १९७४ साली 'अंकुर' चित्रपट बनवताना त्यातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिला घ्यावेसे वाटले आणि ही अभिनेत्रीही बनून गेली. 'गोंधळात गोंधळ', 'माळावरचं फूल', 'मायबाप', 'देवता', 'राणीने डाव जिंकला', 'मुंबईचा फौजदार', 'माहेरची माणसं', 'सस्ती दुल्हन महँगा दुल्हा', 'कालचक्र', 'माझं सौभग्य', 'हे गीत जीवनाचे', 'और प्यार हो गया', अशा चित्रपटांत, त्यांनी भूमिका केल्या. गुजराती मराठी चित्रपटांतील काही भूमिकांबद्दल त्यांनी अभिनयाचे पुरस्कारही मिळवले.
आपल्या चित्राची प्रदर्शनेही त्यांनी भरवली होती. बी. ए. झाल्यानंतर जे. जे. मधून चित्रकला विषयातील प्रशिक्षणही दोन वर्षे घेतलेल्या प्रियाला केवळ चित्रकला शिक्षिका व्हायचे नव्हते. 'जन्मलेल्या प्रत्येकाला' हा तिचा कथासंग्रह दमाणी साहित्य पुरस्कार देऊन गेला. 'जगले जशी', 'ज्याचा त्याचा प्रश्न', 'जावे तिच्या वंशा' आदी पुस्तकांनी तिला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळवून दिला. एक वेगळया वाटेने जाणारी कथालेखिका म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला.मा.प्रिया तेंडुलकर यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला.
अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला, पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते. साहिरबद्दल लिहिताना अमृता प्रीतम एके ठिकाणी म्हणतात- "साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं.
अमृता प्रीतम रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट - आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासंतास लेखन करत राहायच्या. अमृता प्रीतम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. आपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणार्या अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या, त्या मुक्त होत्या.
अमृता प्रीतम यांचे ३१ आक्टोबर २००५ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्यांच्या अश्रूंची झाली फुले गाजलेल्या नाटकवरून हिंदीमध्ये ‘ आसू बन गये फूल ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात अशोककुमार, निरुपा रॉय , प्राण आणि देब मुखर्जी यांनी काम केले होते. त्या चित्रपटाच्या कथेसाठी वसंत कानेटकर याना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले होते.
“उज्वला” या काव्यसंग्रहामुळे कवी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. “ऊर्मिला”, “अनुबंध”, “अभ्र”, “पंख-पल्लवी” आदी काव्यसंग्रह तसेच “सायसाखर” हा बालगीतसंग्रह आणि “मृगावर्त” हे खंडकाव्यही त्यांनी लिहिले. “पारख” हा त्यांचा जुन्या-नव्या कवितांचे समीक्षण करणारा लेखसंग्रह असून १८७० ते १९२० या काळातील कवितेचा इतिहासही त्यांनी लिहिला होता.
अनुताई वाघ ह्या आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ अशी ख्याती असलेल्या समाजसेविका.
त्या पुण्यातील हुजूरपागा शाळेत १३ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. महात्मा गांधीजींच्या “खेडयाकडे चला” या आदेशाने प्रेरित होऊन १९४५ साली ग्रामसेविकांच्या शिबिरात दाखल झाल्या. तेथे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. बोर्डी येथे बालवाडीत शिक्षिका म्हणून अनुताईंनी काम केले. त्याकाळात बालवाडीत मुले येत नसल्यामुळे अनुताईंनीच मुलांच्या अंगणात जायचे ठरवले. त्यातूनच आंगणवाडी या संकल्पनेचा जन्म झाला.
१९५६ पासून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर “कोसबाडच्या टेकडीवरून” , “कुरणशाळा” , “टिल्लूची करामत”, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले.
अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र, आदर्श माता, सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार, रमाबाई केशव ठाकरे या पुरस्कारांसोबतच भारत सरकारच्या “पद्मश्री” या किताबाने देखील सनमानित करण्यात आले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.
१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.
आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती.
फाटक, कमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
कमल फाटक म्हणजे स्त्रीमुक्ती संघटनेतील लोभस व्यक्तिमत्व! लाल निशाण पक्षाच्या कम्युनमधील सर्व मुलांची आई म्हणजे कमलताई.
त्यांना ओळखणारे सर्व त्यांना कमलआई म्हणूनच ओळखत. कमलताई म्हणजे नितळ वागणे, स्वयंशिस्त, कामाचा प्रचंड उरक आणि टापटीप. कम्युनमध्ये सगळी कामे तन्मयतेने त्या करीत असत. कोणत्याही चर्चेत बोलणे जवळजवळ नाही, पण तपशील हवा असेल तर तो त्यांनीच द्यावा. कधीही अटक न झालेल्या त्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. पण भूमिगत कामे करणे, पुढाऱ्यांचे गुप्त संदेश पोहोचविणे, कार्यकर्त्यांची काळजी घेणे आदी कामे त्या करीत असत. कमलताईंचा जन्म १९२१ मधला. आजी आणि आई या दोघींचेही संस्कार त्यांच्यावर झाले होते. देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आई-वडिलांकडून मिळाले होते. १०-११ वर्षांच्या कमलताईंना वडील प्रभातफेरीसाठी ओंकारेश्वराच्या देवळात नेऊन सोडत असत. आई न चुकता ‘केसरी’चे वाचन करीत. सोन्याचांदीच्या कपाटात स्वराज्याच्या सनदा ठेवण्याचे विचार त्याकाळी त्या व्यक्त करीत. समजत नसले तरी जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना स्वातंत्र्याचाच ध्यास होता. परदेशी साखरेवर बहिष्कार घातल्यामुळे त्यांनी कधी चहा घेतला नाही पण त्यांनी बनविलेल्या चहाची चव कधी बिघडली नाही. स्वयंपाक आणि मुले यांची त्यांना कधीच आवड नव्हती, पण त्यांनी केलेला स्वयंपाक आणि मुलांचे करणे दोन्हीही लाजवाब असायचे. सर्वच कामे त्यांनी कर्तव्यबुद्धीने पण मनापासून केली म्हणूनच त्या कमलआई म्हणून सर्वाच्या हृदयात विराजमान झाल्या. कमलताईंच्या आईला जडीबुटी औषधांची जाण होती. त्यांचे आजोबा (वडिलांचे वडील) ग्वाल्हेर संस्थानाचे दिवाण होते. घरात पिढीजात सावकारी होती, पण ती त्यांनी अनुभवलीही नाही. वडील देवाच्या शोधात गेले आणि नंतर परत आले. कमलताईंच्या अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या वडिलांनी खंडाळ्याच्या घाटातील (जुना रस्ता) रस्त्याचे काम केले होते. पुण्यात देवळाजवळच भाऊ फाटकांचे घर. भाऊंबरोबर कमलताईही हॅट घालून आणि सायकलवरून फिरायची. पण घरातून विवाहाला विरोध होता. सदूभाऊ गोडबोले यांनी त्यांचे लग्न लावून दिले. चणे-कुरमुरे (लेनिन मिक्श्चर) खाऊन भाऊ आणि कमलताईंनी अनेक दिवस काढले होते. कमलताईंना वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. भाऊंनी त्यांना प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्य चळवळीतल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घ्यायचे आणि जमेल तितका देश-विदेश पाहायचा हेच त्यांचे ध्येय. कॉ. एस. ए. डांगे आणि त्यांच्या पत्नीचा सहवासही त्यांना लाभला होता. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अरुणा आसफअल्लींच्या हस्ते झालेले ध्वजारोहणही त्यांनी पाहिले. एस. के. लिमयेंच्या वैद्यकीय उपचाराच्या निमित्ताने त्यांनी सोविएत संघराज्य पाहिले तर ‘मुलगी झाली हो’ च्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया पाहिला. १९७४-७५ मध्ये त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या बैठकांतून श्रवणभक्ती करीत. ‘मुलगी झाली हो’ या नाटकातील एका भूमिकेसाठी त्या स्वत:हून पुढे झाल्या. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचा हा उत्साह तरुण कार्यकत्यांना लाजविणारा होता. बरोबरीचे सर्व सोबती, मुलगी, जावई काळाच्या पडद्याआड जात असताना वार्धक्याने थकलेल्या कमलताई शेवटपर्यंत आपले आयुष्य सर्वाच्या कारणी लागावे यासाठी धडपडत होत्या. त्यांच्या निधनाने एक सार्थक जीवन काळाच्या पडद्याआड गेले आहे.
कृष्ण गणेश फुलंब्रीकर तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला.
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव.
त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशी झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले.
१९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या. गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली.
त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत. वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो.
मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Copyright © 2025 | Marathisrushti