(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • महान अष्टपैलू आणि वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गारफील्ड सोबर्स

    सर गारफील्ड सोबर्स म्हणजेच गॅरी सोबर्स. गॅरी सोबर्स यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान अष्टपैलू म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची कारकिर्द १९५४ ते १९७४ पर्यत राहिली. त्यांचा जन्म २८ जुलै १९३६ बार्बाडोस मधील ब्रिजटाऊन येथे झाला. सोबर्स यांच्याकडे तब्बल पाच प्रकारची कौशल्य होती. फलंदाज-क्षेत्ररक्षक-स्पीन-मनगटाच्या जोरावर स्पीन आणि जलद-मध्यमगती मारा अशा पाच प्रकारची कौशल्य त्यांना अवगत होती.

    प्रामुख्याने विकेटजवळ किंवा कुठेही ते चपळाईने क्षेत्ररक्षण करायचे. पाकिस्तानविरुद्ध त्यांनी केलेली ३६५ धावांची नाबाद खेळी हेच त्यांचे कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक होते. त्या इनिंगचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांचे पहिलेवहिले शतक होते. त्याआधी त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती ८०. दहा तास चौदा मिनिटांच्या खेळीत त्यांनी आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले. २७ फेब्रुवारी १९५८ रोजी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ते २० धावांवर नाबाद होते.

    तिसऱ्या दिवसअखेर २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी २२८ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर १ मार्च रोजी त्यांनी हटनचा उच्चांक मोडल्यानंतर विंडीजचा डाव घोषित करण्यात आला. ३८ चौकारांसह त्यांनी नाबाद ३६५ धावांची खेळी केली. त्यावेळी सोबर्स केवळ २१ वर्षाचे होते. त्यांचा वैयक्तिक धावांचा विक्रम ३६ वर्षे अबाधित राहिला. गॅरी सोबर्स वेस्ट इंडिजकडून १९५४ ते १९७४ असे २० वर्षे प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी वेस्ट इंडिजकडून ९३ कसोटी सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी ८००० हून अधिक धावा केल्या तर २३५ विकेट घेतल्या.

    कसोटीत २६ शतके ठोकताना नाबाद ३६५ अशी त्रिशतकाची खेळीही त्यांनी एकदा केली होती. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यांनी ४० हजाराहून अधिक धावा केल्या तर १४०० च्या घरात विकेट घेतल्या. तर ५५० हून अधिक झेल टिपले. त्याच्या काळात वन डे क्रिकेट जन्माला आले नव्हते. ते निवृत्तीच्या उंबरट्यावर असताना वन डे क्रिकेटचा शुभारंभ झाला होता. गॅरी सोबर्स आयुष्यात एकमेव असा वन डे सामना खेळले. मात्र ते शून्यावर बाद झाले. मात्र त्यांनी १ गडी बाद केला होता. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना त्यांनी माल्कम नॅश याच्या गोलंदाजीवर एकाच षटकात ६ षटकार ठोकून क्रिकेट विश्वात एक विक्रम नोंदवला होता.

    सोबर्स यांच्या कारकिर्दीचे आकडे थक्क करणारे आहेत. त्यांच्यावेळी क्रमवारीची पद्धत नव्हती. नंतर विस्डेनने ती लागू केली. त्यावेळी सोबर्स यांना तब्बल आठ वेळा मोसमातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला होता. अशा सोबर्स यांच्याच नावाने हा पुरस्कार आज दिला जातो, जो त्यांचा नव्हे तर क्रिकेट खेळाचाच सन्मान होय.‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ (१९६४) तसेच ‘विस्डेन’च्या शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये सोबर्स यांचा समावेश होता. १९७५ मध्ये त्यांना ‘सर’ किताबानेही गौरवण्यात आले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • किशोर आयलवार

    कर्करोगामुळे स्वरयंत्र गमावलेतरी केवळ नाटकाच्या प्रेमापोटी 'मी मूकनायक' या नाटकाच्या माध्यमातून नागपूरचे किशोर आयलवार यांनी रंगमंचावर रिएन्ट्री घेतली. नागपुरातील नाट्यक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय आहेत. रसिकांकडून वाहवा मिळवणारे किशोर आयलवार हे रंगस्वानंदीच...

    रंगस्वानंदी रंगकर्मी

  • संजय बेलोसे

    बेलोसे, संजय

    एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात यशाची पहाट फुलत असावी आणि त्याच वेळी त्याचे आयुष्य संपावे, हा दैवदुर्विलास शनिवारी रात्री घडला. यावेळी काळाचा घाला पडला तो संजय बेलोसे या कल्पक लेखकावर! यांच्या प्रतिभेने नुकती कुठे भरारीला सुरुवात केली असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

    कोकणातल्या दापोली तालुक्यात, ‘सानेगुरुजींचे गाव’ अशी ख्याती असलेल्या पालगड या गावी संजय यांचे बालपण गेले. दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. मुंबईत आल्यानंतर संजय बेलोसे यांनी अभिनयाचे विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली काही नाटकांत कामे केली. त्यांनी अभिनय केलेले ‘नागमंडल’ हे नाटक विशेष गाजले. या काळात त्यांच्यावर बाईंच्या दिग्दर्शनाचा प्रभाव पडला नसता तरच नवल! संजय बेलोसे यांनी या कालावधीत प्रचंड निरीक्षण केले. ‘पगला घोडा’ हे नाटकही त्याच काळातले. त्यानंतर ‘लफडं सोळातलं’ आणि ‘खरंच, माझ्यासाठी?’ या दोन नाटकांसाठी तर त्यांना अभिनयासाठीचा नाटय़दर्पण पुरस्कारही मिळाला. संजय बेलोसे यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी केवळ अभिनय एके अभिनय न करता आपल्या प्रतिभेला इतर मार्गानीही वाव दिला. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेली अनेक नाटके गाजली. ‘घर आईचं’, ‘लढ बापू लढ’, ‘मोस्ट वॉण्टेड’ ही काही नाटके वानगीदाखल सांगता येतील. ही नाटके प्रेक्षकांच्या पसंतीला तर उतरलीच, पण त्यातील गुणात्मक मूल्यामुळे त्यांनी समीक्षकांचीही पसंती मिळवली. ‘भैरू पहेलवान..’ या चित्रपटाच्या संवादलेखनात त्यांचा सहभाग होता. त्यात त्यांनी छोटी भूमिकाही केली होती. याच दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीही त्यांचा दरवाजा ठोठावत होती. नीरज व्होरा यांच्यासाठी त्यांनी ‘फिर हेराफेरी’ आणि ‘खट्टामिठा’ हे दोन चित्रपटही केले. नुकताच त्यांचा ‘काय करू नि कसं करू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एका मोठय़ा संघर्षांनंतर आयुष्यात स्थैर्य येत असतानाच अपघाताने गाठले आणि या कलाकाराची अनपेक्षित एग्झिट झाली.

  • भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड

    त्याकाळी सुमारे आठ कोटींचं साहित्य स्क्रॅप करण्याऐवजी त्यांनी तेच साहित्य दुसऱ्या कारला असेंबल करण्याचं ठरवलं. त्यांनी ते करुन दाखवलं. हणमंत गायकवाड यांच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक टाटा प्रशासनाला आली.

  • केशव विष्णू बेलसरे

    त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला.

  • संगीतकार हंसराज बेहल

    संगीतकार हंसराज बेहल यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी अंबाला येथे झाला. हंसराज बेहल यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन १९४४ साली ते मुंबईत आले. तिथे त्यांचे एक नातेवाईक चुन्नीलाल बेहल यांनी त्यांची ओळख पृथ्वीराज कपूर यांच्याशी करून दिली. या ओळखीमुळे हंसराज बेहल यांना त्यांचा पहिला स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी चित्रपट मिळाला. तो होता दिग्दर्शक ए.बी. इराणी यांचा “पुजारी”. या चित्रपटात बेबी मुमताज (म्हणजेच मधुबाला) हिने गायलेले एक गाणे खूप गाजले ते म्हणजे “भगवान मेरे ग्यान का दीपक जला दे”.

    १९४७ साली “दुनिया इक सराय” या चित्रपटात त्यांनी मीनाकुमारी कडून सुध्दा काही गाणी गाऊन घेतली. त्यातले हे एक “सावन बीत गयो, माई री”. मा.हंसराज बेहल यांच्याकडे सुरवातीच्या काळातील काही गाणी जसे “दिल-ए-नौशादको जीने की हसरत हो गई तुमसे” गायल्यानंतर मा.हंसराज बेहल यांनी लता मंगेशकर यांना आपल्या मूळ मोकळ्या आवाजात गायचा सल्ला दिला आणि त्यांच्याकडून मेहनतीने तशी गाणी गाऊन घेतली. बॉलीवूड मध्ये मा.हंसराज बेहल हे “मास्टरजी” या टोपणनावाने प्रसिध्द होते.

    मोहम्मद रफी मास्टरजींकडे गायले तेव्हा त्यांनी रफी साहेबांना मोकळ्या आवाजातच गायला लावले. मास्टरजींनी अनेक नवीन लोकांना संधी दिली. त्यात एक नाव आहे मधुबाला झवेरी. तसेच गीतकार वर्मा मलिक आणि गीतकार नक्श लायल्पुरी यांना सुध्दा मास्टरजींनी पहिली संधी दिली. पण मास्टरजींची सर्वात मोठी फाईंड म्हणजे आशा भोसले. मास्टरजींच्याच “चुनरिया” चित्रपटातील एका कोरस मध्ये गाणाऱ्या आशाजींचा आवाज मास्टरजींनी बरोबर हेरला. आणि आपल्या पुढच्या चित्रपटात मध्ये त्यांना गायची संधी दिली. त्यांचे पहिले गाणे “है मौजमें अपने बेगने, दो चार इधर दो चार उधर”. त्यानंतर आशाजींना आपल्या चित्रपटात गाऊन घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली.

    हंसराज बेहल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कलेची, संगीताची निस्सीम सेवा केली. आपल्या भावासोबत त्यांनी एन. सी. फिल्म नावाची एक कंपनी बनवून काही चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली. “लाल परी”, “मस्त कलंदर”, “राजधानी”, “चंगेज खान” यासारखे काही चित्रपट त्यांनी बनवले. संगीताचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. “जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देस है मेरा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मा.हंसराज बेहल यांनी हिंदी चित्रपटसंगीताला आपल्या पंजाबी ढंगाच्या संगीताने नुसतेच नटवले नाही तर अनेक संगीतात अलौकिक देणग्या दिल्या. मा.हंसराज बेहल यांचे २० मे १९८४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    हंसराज बहेल यांच्याबद्दल आणखी एक माहिती जाता जाता..........
    आपल्या कामाबद्दल आणि शांत मनमिळाऊ स्वभावाने अगदी लाखात एक असे गणले जाणारे मा.हंसराजजी आणखी एका बाबतीत लाखात एक होते. म्हणजेच त्यांचे हृद्य हे शरीराच्या उजव्या बाजूला होते. सर्वसाधारणपणे माणसाचे हृद्य हे डाव्या बाजूला असते पण उजव्या बाजूला हृद्य असणे हे लाखात एकाचेच असते. अर्थात ही गोष्ट त्यांच्या डॉ. कडून कळलेली आहे. (चेंबुरचे डॉ. रवी साठे).
    संदर्भ.इंटरनेट/ misalpav.com

    हंसराज बहेल यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=1VrSAH4BbIU
    https://www.youtube.com/watch?v=GVYS2Hv-xLg
    https://www.youtube.com/watch?v=uhAObadBSkA

  • ज्येष्ठ अभिनेते मा. दत्ताराम

    मा. दत्तारामांनी हाताशी आलेली प्रत्येक भूमिका अशीच जिवंत केली. रंगभूमीकडे त्यांनी एक व्रत म्हणून पाहिले आणि व्रताचा सांभाळ देवव्रताच्या निःस्पृह प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आयुष्यभर केला. त्या अर्थाने मास्टर दत्ताराम म्हणजे मराठी रंगभूमीवरचे देवव्रतच. मास्टर दत्ताराम यांनी ‘ मत्स्यगंधा ‘ या नाटकात केलेली देवव्रताची भूमिका विशेष गाजली.

  • रशियन-अमेरिकन लेखिका आणि तत्त्वज्ञ आयन रँड

    आयन रँड यांची सर्वात जास्त गाजलेली ‘ॲ‍टलास श्रग्ड’ ही कादंबरी १९५७ मध्ये प्रकाशित झाली. ॲ‍टलास हे स्वतःच्या खांद्यावर पृथ्वी तोलून धरणारे ग्राीक पुराणकथेतील पात्र. या कादंबरीत जग तोलून धरणाऱ्या आदर्शवत मानवांची अशीच कल्पना केली आहे. त्यांनी एखाद्या क्षणी जर ही जबाबदारी नाकारली आणि खांद्यावरील ओझे झटकले तर काय.. मात्र हे आदर्श पूर्णपणे वस्तुनिष्ठतावादाला धरून आहेत. हे काही पारंपरिक नैतिक कसोटीवरचे सामाजिक धार्मिक आदर्श नव्हेत! स्वार्थ, आत्मकेंद्रित असणे म्हणजे पाप नाही हे यात ठासून सांगितले आहे.

  • सुरेंद्रनाथ निफाडकर

    मराठी माणसं या मासिकाचे सह-संपादक. १९७१ ची रोमांचक युद्धगाथा या पुस्तकाचे लेखक.

  • भालजी पेंढारकर

    मराठी चित्रपट सृष्टीत 'तांबड्या माती'तील साधा माणूस भालजी पेंढारकर यांचा जन्म २ मे १८९९ रोजी झाला.
    भालजी पेंढारकर कोल्हापूरच्याच गुरुवर्य विभूते यांच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकले. भालजी हुशार पण अभ्यासात लक्ष नसे. नाटकांचे वेड होतंच. मेळेही लिहित. परिणामी मॅट्रिक नापास झाले. आई रागावल्यावर हेही भडकून पुण्याला गेले. घरोघर सकाळी ‘केसरी’ टाकायचे. वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. पंजाब व आसपासचा भाग भटकून पाहिला. ते सोडून पुढे पुण्याच्याच ‘लक्ष्मी’ व ‘अपोलो’ या सिनेमागृहात मॅनेजर म्हणून काम केले.

    बोलपट सुरू होण्याआधीचा तो काळ, त्या काळात नाटकांची चलती होती. भालजींना लिहिण्याचं वेड. त्यांनी ‘राष्ट्रसंसार’, ‘क्रांती’, ‘अजिंक्यतारा’, ‘आसुरी लालसा’, ‘कायदेभंग’ अशी राष्ट्रप्रेमाने भारलेली नाटके लिहिली. नाटके लिहिण्याचा हा अनुभव त्यांना लवकरच उपयोगी पडला. १९३२ साली ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचप्रमाणे कथा-पटकथा-संवाद-गीते अशी सारी जबाबदारी भालजींवर सोपविण्यात आली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’. शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.

    शाहू मोडक यांचा हा पहिला चित्रपट आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. त्यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन (आकाशवाणी, कालियामर्दन), श्याम सिनेटोन (पार्थकुमार), सरस्वती सिनेटोन (सावित्री, राजा गोपीचंद), शालिनी सिनेटोन (कान्होपात्रा), अरुण पिक्चर्स (नेताजी पालकर, गोरखनाथ) फेमस अरुण (सूनबाई) या चित्रसंस्थांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन व कथा-पटकथा-संवाद व गीते ही सारी जबाबदारी सांभाळली. १९४५च्या सुमारास भालजींनी छत्रपतींच्या मालकीचा ‘कोल्हापूर सिनेटोन’ हा स्टुडिओ विकत घेऊन त्याचे ‘जयप्रभा स्टुडिओ’ (जयसिंग व प्रभाकर यांच्या नावावरून) असे नामकरण केले.

    भालजींचा हा स्टुडिओ एखाद्या आश्रमासारखा होता. सगळीकडे स्वच्छता, टापटीप व प्रसन्न वातावरण होते. पण शिस्त मात्र कडक होती. स्टुडिओच्या आवारात कागदाचा कपटा व सिगारेटचं पाकीट, सिगरेट-विडीचे उरलेले तुकडे काहीच दिसत नसत. त्याकरिता ठिकठिकाणी पेट्या होत्या. त्यातच कचरा टाकला पाहिजे, असा नियम होता. स्टुडिओत सुमारे साडेतीनशे माणसे नोकरीला असूनही कुठेही गडबड गोंधळ नसे. भालजींना सारे ‘बाबा’ म्हणत. ते स्टुडिओत असो वा नसो त्यांचा दराराच एवढा होता की लोक उगाचच इकडे तिकडे चकाट्या पिटताना कधी दिसत नसत. स्टुडिओत ठिकठिकाणी नियम व सूचनांचे फलक लावलेले होते. काही ठिकाणी तर सुविचारांचेही फलक दिसत. चित्रपटाच्या वेळी काम नसले तरी सर्वांना स्टुडिओत यावेच लागे.

    सकाळी साडेदहा वाजता सर्वांना स्टुडिओत यावे लागे. कामाची सुरुवात चौकात भगव्या ध्वजासमोर प्रार्थनेने व्हायची. बाबा स्वत: प्रार्थनेला सुरुवात करीत. त्यांच्या मागून सारेजण म्हणत. कधीकधी बाबांचे सहायक जयशंकर दानवे प्रार्थना म्हणत.

    सकाळची प्रार्थना
    ‘कृषिवलांची वीरवरांची देवांची जननी पतिव्रतांची सद्धर्माची महत् जन्मभूमी’
    अशी होती तर संध्याकाळी परत प्रार्थनेनंतर काम थांबे.

    संध्याकाळी ‘मारूनि मेले अमर जाहले स्वतंत्रतेसाठी प्रणाम त्यांना तुला दंडवत माते कोटी कोटी’ या प्रार्थनेने दिवस संपे.
    भालजींच्या प्रत्येक चित्रपटाची सुरुवात ‘बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या महाराष्ट्रगीताने होत असे. बाबांचा पोषाख म्हणजे अत्यंत साधा पांढरा सफेद बिनकॉलरचा सदरा, पांढरी हाफपॅन्ट व कोल्हापूरी चपला. विशेष प्रसंगी ते भगवी टोपी घालत.

    चित्रपटासाठीसुद्धा नाटकातल्यासारखी नटांची खच्चून तालीम करून घेणारे भालजी हे बहुतेक शेवटचे दिग्दर्शक म्हणावे लागतील. तालीम हॉलमधले भालजी म्हणजे एक प्रकारे शिक्षकच असायचे. बोलावं कसं, चालावं कसं, उभं रहावं कसं याबरोबरच एखाद्या भूमिकेतील हालचाल कशी असायला पाहिजे हे सारं ते करून दाखवत व करून घेत. अभिनय उत्तम व्हावा यावर त्यांचा कटाक्ष असे. चुकल्यावर भल्याभल्यांना ते छडी मारत. पण त्यांचं मारणं प्रेमाचं असे. कलाकारांच्या अभिनयाच्या आवाका आजमावून त्याप्रमाणे ते समजावून सांगत. वेळ प्रसंगी थोडी मोकळीकही देत.

    भालजींचे बहुतेक चित्रपट ऐतिहासिक होते. शिवाजीचं किंवा संभाजींचं काम करणार्या अभिनेत्याला ते सांगत- ‘हा छत्रपतींचा पोषाख अंगावर असताना तू कुणालाही, अगदी मलासुद्धा वाकून नमस्कार करायचा नाहीस. तुला कोणी नमस्कार केला तर फक्त गळ्यातल्या माळेला हात लावून ‘जगदंब जगदंब’ एवढंच म्हणायचं. आता तू छत्रपती आहेस!’ बाबांची शिवभक्ती आणि निष्ठा एवढी जाज्वल्य होती की चित्रपटातला छत्रपतींचा पोषाखही त्यांना वंदनीय वाटायचा. त्याक्षणी ते शिवमय असायचे.

    भालजींच्या चित्रपटात संगीताला फारसं महत्त्व कधीच नसे. भालजी स्वत: गीतलेखक. संगीताची त्यांना उत्तम जाण. पूर्वी नाटकात अभिनयाबरोबर गाणीही त्यांनी म्हटली होती. काही दिवस अल्लादियाखांची शागिर्दीही केलेली. तिथे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले असे असतांनासुद्धा भालजींच्या चित्रपटात संगीताला महत्त्व नव्हतं. याचं कारण भालजींचा चित्रपट निर्मितीमागचा हेतू अगदी स्पष्ट होता.

    स्वातंत्र्यपूर्वी काढलेल्या चित्रपटांच्या निर्मितीचा उद्देश म्हणजे पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीतील जनतेची अस्मिता जागृत करून मरगळलेल्या महाराष्ट्राला परकीय सत्तेविरूद्ध झुंजण्याची स्फूर्ती देणं तर स्वातंत्र्यानंतरही स्वराज्य मिळाले तरी सुराज्य करण्यासाठी बळकट मनगट आणि उरात अभंग आवेश असणारी नवी पिढी निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली.

    याविशिष्ट हेतूने चित्रपट काढण्याचा प्रक्रियेतूनच भालजींचं खास वैशिष्ठ्य असलेल्या ‘खटकेबाज संवादा’चा जन्म झाला. त्यांच्या अनेक चित्रपटातील खटकेबाज संवाद त्यांच्या चमकदार लेखणीची चुणूक दाखवतात. त्यांचे संवाद तालासुरात असतात. त्यांना वजन असतं. चित्रपटातील कित्येक प्रसंगांना तर भालजींच्या संवादामुळे रंगत आली आहे, उठाव आला आहे. प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे धारदार संवाद हे त्यांच्या चित्रपटांचं प्रमुख आकर्षण असायचं. समाजातील दुबळेपणा, लाचारी पराधीनता, लाळघोटेपणा, स्वकीयांचा घात, फंदफितुरी या अशा कित्येक दुर्गुणांवर आपल्या कडक संवादातून फटकार्यादसारखे कोरडे त्यांनी ओढले आहेत. याबरोबरच सुविचारांची पखरणही त्यांच्या संवादात असे. चित्रपट मग तो ऐतिहासिक असो, ग्रामीण असो वा सामाजिक असो... भालजींनी त्यांच्या संवादातून काही ना काही संदेश प्रेक्षकांना दिलाच आहे!

    बाबांची शिष्यपरंपरा फार मोठी आहे. शाहू मोडकला तर त्यांनी ‘श्यामसुंदर’मधून बालनट म्हणून आणले. त्याचप्रमाणे मा. विठ्ठल, ललिता पवार, चंद्रकांत, सूर्यकांत, जयशंकर दानवे, सुलोचना, राजकपूर ही बाबांचीच शिष्यमंडळी. बाबांच्या तालमीत अभिनयाबरोबरच शिस्त व स्वाभिमानाचीही दीक्षा मिळत असे. कारण बाबांच्या स्वभावाचा तो मानबिंदू होता. गांधी वधोत्तर झालेल्या जाळपोळीच्या वणव्यात बाबांचा जयप्रभा स्टुडिओ लोकांच्या रागामुळे आगीत जळून खाक झाला. कारण काय? तर गांधींचा मारेकरी हिंदुमहासभेचा कार्यकर्ता आणि बाबा हे हिंदूमहासभेचे कट्टर अनुयायी. बाबा त्यावेळी पन्हाळ्याला होते. जयप्रभा स्टुडिओ जळाल्याचं दु:ख भालजींना वेगळ्याच कारणासाठी झालं. एकतर साडेतीनशे कामगारांवर बेकारीची कुर्हायड कोसळली आणि दुसरं म्हणजे भालजीचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज.

    महाराजांवर भारताबाहेरच्या विशेषत: पोर्तुगीत फ्रेंच व इटालियन इतिहास संशोधकांनी जे काही लिहिलंय त्यांची इत्यंभूत माहिती राजाराम कॉलेजचे प्राचार्य, इतिहासाचे प्राध्यापक व अभ्यासक व भालजींचे मित्र डॉ. बाळकृष्ण यांनी परिश्रमपूर्वक व गोळा केली होती. त्यावर संशोध करून प्रबंध लिहिला होता. भालजी तो प्रसिद्धही करणार होते. तो प्रबंध त्या आगीत जळून भस्मसात झाला. या गोष्टींचे भालजींना अतोनात दु:ख झालं.

    जळितात नष्ट झालेला ‘मीठभाकर’ त्यांनी पुन्हा नव्याने काढला. त्यानंतर शिलंगणाचे सोने (१९४९), मी दारू सोडली (१९५०), शिवा रामोशी (१९५१), छत्रपती शिवाजी (१९५२), मायबहिणी (१९५२), माझी जमीन (१९५३), महाराणी येसूबाई (१९५४), येरे माझ्या मागल्या (१९५५), पावनखिंड (१९५६), नायकिणीचा सज्जा (१९५७), आकाशगंगा (१९६५), तांबडी माती (१९६९), गनिमी कावा (१९८१), शाबास सूनबाई (१९८६) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करून दिग्दर्शनही केले. १९८६ साली ‘शाबास सूनबाई’ हा चित्रपट करताना त्यांचं वय ८६ होतं. दृष्टी जवळजवळ अधू होती. परंतु कलाकारांचे संवाद ऐकून ते दिग्दर्शन करीत. त्या वयातही ते सेटवर सतत उभे राहात. चित्रपटसृष्टीत आयुष्य घालवून बाबा सन्मान वा सत्कार स्वीकारण्यापासून दूर राहिले. उतारवयात मात्र त्यांच्यावर अनेक पुरस्कारांची खैरात झाली.

    चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, कोल्हापूरचा हुकुमतपनाह पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. पण भालजी पडले विरक्त कर्मयोगी. त्यांनी या सर्व पुरस्कारांची रोख रक्कम त्या त्या संस्थेला किंवा गरजू व योग्य व्यक्तीला देऊन टाकली. भालजी ही व्यक्ती मान-सन्मानाच्या पलिकडची होती. १९९२ साली त्यांना चित्रपटातील व्यक्तीला देण्यात येणारा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. पण वयोवृद्ध भालजींकरिता हा नियम बाजूला ठेवून राष्ट्रपतींच्या प्रतिनिधीने कोल्हापूरात येऊन हा पुरस्कार दिला.

    संस्कार, ध्येय, समाजप्रबोधन यापासून आजची चित्रपटसृष्टी फार दूर गेली आहे. मात्र आपल्या चित्रपटातून समाजाच्या अन्त:करणात देव, देश आणि धर्म याची ज्योत सदैव तेवत ठेवणारे भालजी पेंढारकर बदलत्या काळाच्या ओघात निश्चि तच वंदनीय आहेत! मा.भालजी पेंढारकरांचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ - मधू पोतदार