(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • काळू-बाळू

    काळू-बाळू

    किस्सा तसा फारच जुना! शिवा-संभा कौलापूरकर यांचा तमाशा त्यावेळी फारच लोकप्रिय होता. कोल्हापूरमध्ये त्यांच्या तमाशाचा खेळ रंगला असताना राजर्षी शाहू महाराज तमाशा पाहायला आले. महाराज आल्याबरोबर कनातीमधले सगळे प्रेक्षक, तमाशातील कलाकार त्यांना वाकून नमस्कार करायला लागले. संभा त्यावेळी राजा विक्रमादित्याची भूमिका साकारत होता. त्याने मात्र शाहू महाराजांना नमस्कार केला नाही. लोकांना खूपच आश्चर्य वाटले आणि रागही आला. वग संपल्यानंतर शाहू महाराज कलाकारांना भेटायला गेले आणि संभाने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला आणि दिलगिरी व्यक्त केली. संभा म्हणाला, महाराज माफ करा.

    तुम्ही आल्याबरोबर नमस्कार केला नाही, कारण मी त्यावेळी राजाची भूमिका करत होतो आणि तुम्हाला नमस्कार केला असता तर राजाचा अपमान झाला असता. संभाचे हे उत्तर ऐकताच शाहू महाराज प्रचंड खुश झाले आणि त्यांनी संभाला शाबासकी दिली. आपल्या भूमिकेशी, तत्त्वांशी इतके प्रामाणिक असलेले कलाकार म्हणजे शिवा-संभा कौलापूरकर आणि त्यांचा तमाशाचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे नेणारे काळू-बाळू ही त्यांची पुढची पिढी. याच काळू-बाळू कौलापूरकर यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने बुधवारी पुरस्कार जाहीर होणे, हा एक चांगला योगायोग आहे. आयुष्यात बऱ्याच खस्ता खाऊनही उभ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारी सोंगाडय़ाची जोडी म्हणजे काळू-बाळू. खरे नाव लहू आणि अंकुश खाडे. हे दोघे जुळे भाऊ. शिवा-संभा कौलापूरकरपैकी संभाची ही दोन मुले. आज २०० वर्षांची तमाशाची परंपरा या कौलापूरकरच्या घराण्याने जोपासली आहे. सातू हिरू हा या घराण्याचा मूळ पुरुष. त्यांचा तमाशा पुढे शिवा-संभा यांनी चालवला आणि पुढे काळू-बाळूने सबंध महाराष्ट्रात नाव कमावले. बालगंधर्व एकदा शिवा-संभायांचा तमाशा पाहायला गेले होते आणि त्यावेळी त्यांनी शिवा-संभा यांना तमाशात हार्मोनियम वापरण्याची सूचना केली. तेव्हापासून तमाशात हार्मोनियमची पद्धत सुरू झाली. सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावात महार जातीत १६ मे १९३३ रोजी काळू-बाळूंचा जन्म झाला. दोघेही दिसायला इतके सारखे की त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांचा रंग, केसांची रचना, दंतपंक्ती, चष्म्याची फ्रेम, उंची सगळेच सारखे. त्यामुळे अनेकांची तर पंचाईत व्हायचीच परंतु त्यांच्या बायकांची पंचाईत तर जास्तच व्हायची. तमाशात याच गोष्टीचा फायदा उचलत काळू-बाळू यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांची अनेक वगनाटय़े गाजली. त्यात प्रामुख्याने जहरी प्याला, राजा हरिश्चंद्र, रक्ता रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम ३०२, शेराला भेटला सव्वाशेर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले. तमाशा डबघाईला आलेला. अशा भीषण परिस्थितीत गरिबीचा सामना करत काळू-बाळू वाढत गेले. मात्र काही झाले तरी घराण्याने नावारूपाला आणलेला तमाशा बंद होऊ द्यायचा नाही, असा निर्धार त्यांनी लहानपणापासूनच केला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी चुलतीच्या मदतीने त्यांनी पुन्हा एकदा तमाशाचा फड उभा केला आणि अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्राला वेड लावले. काळू-बाळूंना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मात्र त्यात १९९८ सालचा महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार आणि २००१ सालचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अधिक महत्त्वाचा आहे. दादा कोंडके हे काळू-बाळू यांचे मोठे ‘फॅन’ होते. मुंबईला काळूृ-बाळूंचा प्रयोग असला की दादा कोंडके दररोज तिकीट काढून त्यांच्या प्रयोगाला जाऊन बसायचे. इतका मोठा कलाकार दररोज येतो हे पाहून काळू-बाळू खूपच ओशाळायचे. मात्र तुमच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळत आहे, असे दादा कोंडके सांगायचे, तेव्हा काळू-बाळूंना स्फुरण चढायचे. दिसण्यात कमालीचे साधम्र्य हेच काळू-बाळू यांच्या अभिनयाचे खास वैशिष्टय़ होते. जहरी प्याला या वगात दोघेही शिपाईची भूमिका करायचे आणि त्यात त्यांची नावे काळू-बाळू अशी होती. तेव्हापासूनच लऊ-अंकुश खाडे या नावाऐवजी ते काळू-बाळू कौलापूरकर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या विनोदाची एक स्वतंत्र अशी बैठक आहे. वगनाटय़ात जोडगोळीचा एकसूत्रीपणा दिसत असल्यामुळे लोकांना आनंद मिळायचा. आजघडीला जवळपास सगळे तमाशा फड मालक कर्जबाजारी असताना काळू-बाळू यांच्या तमाशाचा फड कधीही कर्जाच्या विळख्यात सापडला नाही हे विशेष. याचे कारण म्हणजे इतर तमाशा फडांप्रमाणे त्यांनी कधीही बडेजाव केला नाही. मोजकेच परंतु महत्त्वाचे साहित्य घेऊन त्यांनी तमाशाचा फड सुरू केला आणि त्याचे नियोजन इतके व्यवस्थित केले की त्यांची आर्थिक घडी कधीच विस्कटली नाही. अशा या काळू-बाळूंना राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार जाहीर होणे हे त्यांच्या करवीर नगरीसाठी खरोखरच भूषणावह आहे.

  • दिलीप दांडेकर

    दांडेकर, दिलीप

    मराठी उद्यमशीलता वाढविण्या-जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या कुटुंबांमध्ये दांडेकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन काकासाहेब दांडेकरांनी गिरगावातील एका छोटय़ा खोलीत ‘उंट’ छाप शाई तयार करण्याच्या व्याप सुरू केला. १९३० सालचा काळ. महिन्याकाठी ४५ ते ५० रुपये मिळत. आज त्यांनी लावलेले हे रोपटे ४०० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आणि बहुराष्ट्रीय पसारा असलेल्या उद्योगवृक्षाच्या रूपात फोफावले आहे.शालोपयोगी स्टेशनरी आणि रंगसाहित्याची विविध २००० उत्पादने आणि देशभरात ५० हजाराहून अधिक विक्रेत्यांचे जाळे असलेल्या आजच्या ‘कॅम्लिन’चा भार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या नात्याने दिलीप दांडेकर सांभाळत आहेत.

    औद्योगिक संस्कृतीची उपासना करताना गुणवत्ता, प्रामाणिकता, पारदर्शकता, नम्रता अशा सुसंस्कृतपणाची जपणूक करणे, असा मेळ आजच्या उद्योगसंस्कृतीत विरळाच आढळतो. उद्योगजगताची शिखर संघटना इंडियन मर्चंट्स चेंबरच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या उद्योजकीय कर्तबगारीबरोबरीच त्यांच्या संयमी व शांत नेतृत्वगुणाची घेतली गेलेली स्वाभाविक दखल होय. घरचा उद्योग असतानाही दिलीप दांडेकर यांनी कॅम्लिनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नोकरी करीत आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याकाठी त्याच श्रेणीचे वेतन मिळत असे. कॅम्लिनच्या सर्व विभागांमध्ये अशा तऱ्हेने रीतसर प्रशिक्षण पूर्ण करून, कामाचे बारकावे शिकून मगच अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली, असे ते अभिमानाने सांगतात. दिलीप दांडेकर यांनी कंपनीचा मार्केटिंग विभाग सांभाळायला घेतला आणि कॅम्लिन या ब्रॅण्डला खऱ्या अर्थाने बहर आला. नवनवीन उत्पादने, तीही बडय़ा बहुराष्ट्रीयकंपन्यांशी स्पर्धा करीत बाजारात आणणे आणि विविध उपक्रमांद्वारे ग्राहकांच्या नजरेसमोर सतत भिरभिरत राहणे ही कॅम्लिनच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्याच कल्पकतेतून पुढे आली. बालचित्रकारांपासून, व्यावसायिक चित्रकारांपर्यंत सर्वांपर्यंत पोहचता येईल अशी कमावलेली सर्वसमावेशक ब्रॅण्ड इक्विटी मग कार्यशाळा, स्पर्धा, प्रदर्शने या माध्यमातून उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेली. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात स्पर्धेचे आव्हान ज्यांना पेलता आले ते टिकून राहिले. अन्यथा अनेक नावाजलेले उद्योग आणि ब्रॅण्ड्स पाल्यापाचोळ्यासारखे उडून गेले. अनेकांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी हातमिळवणी केली. स्पर्धेत मारले जाण्यापेक्षा मोठय़ा प्रवाहात सामील होऊन जिवंत राहण्याचा हा पर्याय कॅम्लिनपुढेही आला होता. पण खुल्या आर्थिक धोरणाने निर्माण केलेल्या स्पर्धेला आव्हान नव्हे तर संधी मानून दिलीप दांडेकर यांनी वाटचाल सुरू ठेवली. कॅम्लिनशी स्पर्धेत उतरलेल्या बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्याच देशात जाऊन आव्हान निर्माण करणारा आक्रमक बाणाही त्यांनी दाखविला. आज कॅम्लिनच्या उत्पादनांची निर्यात युरोप-अमेरिकेत सातत्याने वाढत आहे, तर देशांतर्गत बाजारातही किंमत व गुणवत्तेत ती बिनतोड ठरली आहेत. चीन आणि कोरियातून २० टक्के कमी खर्चात उत्पादने घेऊन बाजारपेठेत टिकाव धरून राहण्याची किमया खुलीकरणाच्या धोरणामुळेच शक्य झाली, असे तेच सांगतात. पिढीजात उद्योगाची धुरा वाहत असताना, काळानुरूप बदल वेळच्या वेळी स्वीकारणे किती आवश्यक आहे, याचा वस्तुपाठच त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फिक्की, इंडियन र्मचट्स चेंबर आणि अन्य अनेक उद्योगसंघटनांच्या व्यासपीठांवरून काम करताना, त्यांनी नवउद्योजकांना प्रेरक असा उद्योगशीलतेचा कानमंत्र दिला आहे. वाळवंटातही अथक प्रवास करणे हा उंटाचा गुणधर्म, आपल्या उत्पादनांसाठी उंट छाप निवडताना काकासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवला होता. भरपूर मेहनत, सचोटीचा व्यवहार आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगण्याची निश्चयी वृत्ती या पायावर दांडेकर कुटुंबीयांच्या प्रत्येक पिढीने हा व्यवसाय वाढवीत नेला. भविष्यातही कॅम्लिनच्या विस्ताराच्या योजना तयार आहेत, दांडेकर कुटुंबाची तिसरी पिढी राजीव, दीपक, श्रीराम व आशीष त्या साकारायला समर्थ आहे.

  • ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते

    मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सुमती गुप्ते. त्यांचा जन्म १९१९ रोजी वाई येथे झाला. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण मात्र बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘प्रभात’मध्ये दाखल झाल्या. तिथे ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांना पहिले काम मिळाले. त्यानंतर त्यांना बाबासाहेब तोरणेंच्या ‘नवरदेव’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘थोरातांची कमळा’ या ऐतिहासिक चित्रपटात संभाजीच्या प्रेयसीची कमळेची मध्यवर्ती भूमिका दिली. त्यापाठोपाठ त्यांच्या ‘सूनबाई’नेही रौप्यमहोत्सवी यश मिळविले आणि सुमतीबाईंचे नाव एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वतोमुखी झाले. पुढे त्यांनी विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ यासारखे काही चित्रपट केले.

    ‘चिमुकला संसार’चे दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांच्या रूपाने त्यांना जीवनाचा जोडीदारही इथेच लाभला. वसंतराव जोगळेकर यांच्या साथीने त्यांनी मीरा पिक्चर्स या संस्थेची स्थापना करून त्या बॅनरखाली ‘शेवटचा मालुसरा’, ‘जानकी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपटांची निर्मितीही केली. अभिनयाबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा', 'जानकी' आणि 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. ‘ऊनपाऊस’, ‘थोरातांची कमळा’, ‘चिमुकला संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट, तसेच ‘मौसी’, ‘उर्वशी’, ‘हमारा संसार’, ‘वक्त’, ‘एक मंझिल, दो राहें’ इत्यादी हिंदी चित्रपटांतून आणि ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘लग्नाची बेडी’, ‘विकारविलसित’ आदी नाटकांतून सुमती गुप्ते यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांना रसरंगचा दादासाहेब फाळके पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-माता पुरस्कार, शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. नाटककार अच्युत वझे हे त्यांचे जावई आहेत. मा.सुमती गुप्ते यांचे ३१ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • कमलाबाई विष्णू टिळक

    “हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्‍या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले.

  • भारताचे आठवे राष्ट्रपती आर. वेंकटरामन

    गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे तसेच चीनला अधिकृत भेट देणारे वेंकटरामन हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती । कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी त्यांना सोव्हिएट लँड-नेहरू पारितोषिक देण्यात आले.

  • पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल

    पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल यांचा जन्म १५ जून १९५० रोजी सादुलपूर, राजस्थान येथे झाला.

    लक्ष्मी मित्तल हे ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत भारतीय समजले जातात. लक्ष्मी मित्तल यांचे शालेय शिक्षण कोलकाताच्या श्री दौलतराम नोपानी स्कूल मध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये झाले. तेथे त्यांनी बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या 'ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स' या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत. त्या काळी लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी ‘मित्तल इस्पात’ असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला. इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले. मित्तल बंधूंमध्ये १९९४ साली संपत्तीची वाटणी झाल्यानंतर दोन वेगळे उद्योग समूह अस्तित्वात आले होते. त्यानंतर लक्ष्मी मित्तल यांनी २००६ ‘आर्सेलर मित्तल’ची स्थापना केली. सध्या लक्ष्मी मित्तल ‘आर्सेलर मित्तल’चे सीईओ व चेयरमेन काम बघत आहेत. २००७ मध्ये भारत सरकारने लक्ष्मी मित्तल यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच २००८ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना फोर्ब्ज मासिकाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. २०१३ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना ‘चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे इंग्लिश फुटबॉल क्लब 'क्वींस पार्क रेंजर्स'ची ३३ % मालकी आहे.

    अमेरिकेतील ‘केल्लोग्स स्कूल ऑफ मैनेजमेंट’ च्या सल्लागार बोर्डवर व 'क्लीवलैंड क्लिनिक' च्या 'बोर्ड ऑफ ट्रस्टीज' चे सदस्य लक्ष्मी मित्तल राहिले आहेत.२००३ मध्ये लक्ष्मी मित्तल व त्यांच्या ऊषा मित्तल फाउंडेशनने राजस्थान सरकार बरोबर जयपुर मध्ये 'एल.एन.एम. इंस्टीट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी' ची स्थापना केली आहे.

    लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नीचे नाव उषा मित्तल आहे. उषा मित्तल या फारच हुशार असल्याचे बोलले जाते. आपल्या पतीच्या व्यवसायात त्यांना त्या नेहमी मदत करत असतात. उषा मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगले काम उभे केले आहे. त्यांचे चिरंजीव हे त्यांच्या बरोबरच आदित्य मित्तल या व्यवसायात आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य

    चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी दिग्दर्शक म्हणून 'तिसरी कसम' मधून आपला वेगळा ठसा उमटवला. 'तिसरी कसम'ला १९६६ मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालं.

    पुढे १९७० आणि १९८० च्या दशकांत त्यांनी समांतर चित्रपट चळवळीत अनुभव आविष्कार आणि गृहप्रवेश असे काही चांगले चित्रपट दिले; मात्र 'तिसरी कसम'ची सर त्यांना आली नाही.बासू भट्टाचार्यांचा ’अनुभव’ हा आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेमधे पारंपरिक लग्न व्यवहाराचे सांधे जुळून येताना ही लग्नव्यवस्था आपलं पारंपरिक रुप कसं बदलत गेली (किंवा अजिबात बदलत गेली नाही) याचं यथार्थ चित्रण करणारा ठरला.आश्चर्य वाटाव्या इतक्या खरेपणाने लग्नसंबंधांमधली गुंतागुंत यात बासूदांनी दाखवली. 'अनुभव' हा चित्रपट ब्लॆक ऍन्ड व्हाईट होता. कलात्मक सिनेमांची जी लाट नंतरच्या काळात आली त्यातलाच हा आर्टी सिनेमा म्हणून अनेकांनी तो हेटाळलाही. पण शहरांमधल्या बदलत्या लग्नसंबंधांचे चित्रण थेट वास्तवाने या आधी कोणीच केले नव्हते.

    बासूदांची फ़िल्म खर्‍या अर्थाने मॉडर्न आणि धीट होती. आधुनिक बदलत्या समाजशैलीतल्या लग्नांचे असे चित्रण अगदी आताच्या काळातही नंतर फ़ारसे कोणी केले नाही. बासू भट्टाचार्य यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी बंगाली चित्रपटांची उंची एव्हरेस्टला भिडवली. भारतीय संस्कृतीची नाळ बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेत असताना समाज ज्या स्थित्यंतरांमधून जात होता ते सिनेमाच्या पडद्यावर स्पष्टपणे दाखवू शकणारे असे फ़ार थोडे दिग्दर्शक त्या पैकी एक म्हणजे बासूदा. बासूदांनी त्यानंतर अजून दोन सिनेमांमधून, आविष्कार आणि गृहप्रवेश, हाच धागा पुढे नेला आणि भारतीय विवाहसंस्थेवर विशेषत: आधुनिक शहरांमधल्या पती-पत्नी संबंधांचे विश्लेषण करणारी एक उत्तम ट्रिलॉजी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आली.

    बासू भट्टाचार्य यांचे २० जुन १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • गायिका माणिक वर्मा

    माणिक वर्मा यांनी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १९३९ साली दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली आणि दोन ध्वनिमुद्रिकामध्ये गाऊन ह्या क्षेत्रात त्या आल्या. अर्थात चित्रपटगीतांच्या बाबतीतही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. प्रभात कंपनीच्या हिंदी ‘ गोकुल ‘ या चित्रपटात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत त्यांनी प्रथम गायले. परंतु त्यांनी जास्त गाणी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांसाठी गायली. माणिक वर्मा यांनी असंख्य भावगीते , भक्तिगीते , चित्रगीते गायली आणि ती सर्व गाणी आजही आपल्या संस्कृतिक जीवनाचा भाग बनून राहिली आहेत.

  • गायक शब्बीरकुमार

    ब्बीर कुमार यांनी सर्व मोठ्या संगीतकारांसोबत काम केले आणि अमिताभ बच्चन ते अनिल कपूर आणि सनी देओल यांच्यासाठी गाणी गायली. देशभरात नवरारात्रीत कायम गायले जाणारे ‘मर्द’ चित्रपटातील ‘माँ शेरों वाली’ हे प्रसिद्ध गाणे शब्बीर कुमार यांनी गायले होते

  • आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित

    "देवकी पंडित"....मराठी संगीत जगतातलं, सध्याचं एक आदरणीय नाव.....सारेगमप मधला त्यांचा "पण" नेहमीच अचूक असयचा.....एखाद्या गाण्याबद्दलचं त्यांचा अभ्यास अगदी वाखडण्याजोगा असतो.त्यांचा जन्म ६ मार्च १९६५ रोजी झाला.
    आभळमाया, वादळवाट, अवघाची संसार....आणि अश्या अनेक सीरियल्स ची टाइटल गाणी देवकीजींच्या आवाजात अगदी सुरेल आणि सुमधुर वाटतात. ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी व्यासपीठावर गाणे गाऊन श्रोत्यांच्या ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. सुरांच्या काटेकोरपणाबद्दलचा त्यांचा आग्रह, परखडपणा हे त्यांचे वैशिष्टय़ असूनही सामान्य रसिकांच्या मनात स्थान मिळविणारे हे नाव. शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणाऱ्या, मालिकांच्या शीर्षकगीते करणाऱ्या देवकी पंडित यांनी सुरुवातीला आपली आई उषा पंडित यांच्याकडे गाणे शिकल्यानंतर त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर किशोरी आमोणकर, व जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकायची संधी त्यांना मिळाली. गुरूंकडून सतत शिकत रहावे या वृत्तीने त्या पुढेहा बबनराव हळदणकर, डॉ अरुण द्रविड यांची मार्गदर्शन घेत राहिल्या. पंडित वसंतराव कुलकर्णीकडे शिकत असताना ते पूर्वीच्या गायकांची उदाहरणे द्यायचे. पूर्वी गायक कसे १२-१२ तास रियाज करत असत हे सांगायचे. एकदा ते दोन महिन्यांकरता बाहेरगावी जात असताना रियाज व्यवस्थित चालू ठेवण्यास सांगून गेले. तेव्हा देवकी पंडित यांनी ते ते इतके मनावर घेतले, की भरपूर रियाज करायचा एवढा एकच विचार मनात ठेवून त्या गात राहिल्या. दोन महिने सतत गायल्यामुळे त्यांचा आवाज बंदच झाला. त्यानंतर त्या जवळजवळ तीन वर्षे गाऊच शकल्या नाहीत. त्या दोन-तीन वर्षांच्या काळात देवकी पंडित तंबोरा लावून बसायच्या आणि गाता येत नसल्याने केवळ सूर ऐकत राहायच्या. त्या काळात त्यांनी सगळ्यांची खूप गाणी ऐकली. तंबोरा योग्य रीतीने कसा लावला पाहिजे, खर्ज, पंचम कसा लावायचा या गोष्टी पुन्हा पुन्हा करून त्यांनी आत्मसात केले. याच काळात देवकी पंडित हार्मोनियम व तबला शिकल्या. गेल्या तीन दशकांपासून देवकी पंडित संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांत, वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे. तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. ‘सावली’, ‘अर्धागी’ अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. ‘आभाळमाया’, ‘हसरतें’, ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांमधून देवकी पंडित या घराघरांत पोहचल्या. ‘रिअॅलिटी शो’च्या परीक्षक म्हणून काम करताना देवकी पंडित यांच्या मधील सुरांच्या अचूकतेबाबत आग्रही असणारी गायिका सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    देवकी पंडित यांनी गायलेली काही गाणी
    जाळीमधी झोंबतोया गारवा
    तुम्ही जाऊ नका हो रामा
    वादळे उठतात किनारे
    सप्तसुरांनो लयशब्दांनो जगेन
    सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा
    माझी उदास गीते तू ऐकतोस

    https://www.youtube.com/shared?ci=e-aIoBrIpJY

    https://www.youtube.com/shared?ci=JB8x9xCvQmc

    https://www.youtube.com/shared?ci=0xW4b9zNlc4