जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वैजयंतीमाला यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात तामिळ भाषेतील ” वड़कई ” या चित्रपटापासून केली.
लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा आहे
सुष्मिता सेनने १९९४ मध्ये जेव्हा ‘मिस यूनिव्हर्स’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. तिचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ रोजी हैदराबाद येथे झाला. सुष्मिता तेव्हा एक मध्यम वर्गातील मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेत जाताना तिने तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता तिच्या आइने आणि मीना बाजारातील एका टेलरने मिळून शिवले. सुष्मिताने वयाच्या २५व्या वर्षी आपली पहिली मुलगी रिनी हिला दत्तक घेतले. तिच्या या निर्णयाने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला होता. असे सांगितले जाते की, सुष्मिताने मिस युनिव्हर्स ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली. सुष्मिताचा सामना ऐश्वर्याबरोबर होता. दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. पण एका मुलाखतीच्या फेरीमध्ये सुष्मिता वरचढ ठरली. दोघांनाही एकच प्रश्न विचारला गेला. दोघींना विचारण्यात आले की, जर तुम्हाला अशी एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असेल? यावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते की, माझ्या जन्माची तारीख. तर सुष्मिताने उत्तर दिले, इंदिरा गांधी यांचा मृत्यू. असे मानले जाते की या प्रश्नाच्या उत्तराने त्यांच्या भविष्याचा निर्णय केला होता. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या सिनेमातून सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुष्मिताचा ‘बीवी नंबर वन’ हा सिनेमा फार गाजला होता. या सिनेमासाठी सुष्मिताला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत त्यांनी काही तमिळ व इंग्लिश भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सांगली हायस्कूलमध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे शिक्षण झाल्यानंतर तेथेच कांही काळ ते शिक्षकही होते. मराठी गद्य रंगभूमीचे जनक, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला. कॉलेजमध्ये शिकत असतांना नाट्यवाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास केला. तत्वज्ञान हा त्यांचा खास विषय होता. `सवाई माधवरांचा मृत्यू `हे नाटक लिहून त्यांनी आपल्या नाट्यलेखनास प्रारंभ केला. काकासाहेब वकील व्हावे या उद्देशाने मुंबईस अभ्यासासाठी गेले होते. पण राजकीय जागृतीच्या शिक्षणाचा जनतेत प्रसार करण्याची कामगिरी सुशिक्षित तरुणांनी अवश्य केली पाहिजे असे काकांना वाटत होते. त्यामुळेच ते टिळकभक्त झाले. गौतमबुद्ध हा तत्वज्ञानावरील चरित्रपट प्रबंध विविध ज्ञानविस्तार मासिकांत प्रसिद्ध झाला. पुढे काका लो.टिळकांना भेटले.
पहिल्या भेटीत काकांना केसरीसाठी लेख लिहण्यास त्यांनी सांगितले. १ सप्टेंबर १८९६ रोजी काकासाहेबांचा हा पहिला लेख अग्रलेख म्हणून टिळकांनी प्रसिद्ध केला. पहिल्याच लेखाला अग्रलेखाचा मान मिळाला. लेखाचा विषय होता. `राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता `.त्यानंतर केसरीच्या संपादकीय खुर्चीवर काका विराजमान झाले. त्यातूनच काकांचे जळजळीत देशप्रेम व सडेतोड विचार प्रगट होऊ लागले. सोलापुरात दुष्काळ निवरणाचे काही काळ गेले. तेथे त्यांनी लोकजागृतीचे काम केले. यामुळेच पुढे `कांचनगडची मोहना ` नाट्यकृती जन्माला आली. `कीचकवध ` हे अप्रतिम नाटक त्यांनी लॉर्ड कर्झनने केलेल्या फाळणीवर लिहिले. ते २३-२-१९०७ रोजी पुण्यात विजयानंद थिएटरमध्ये रंगमंचावर सादर झाले. ते ऑक्टोबर १९०८ मध्ये `मराठा ` चे संपादक झाले. १९१० साली कीचकवध नाटकावर बंदी आली. प्रेमध्वज, मानापमान, विद्याहरण, सत्वपरीक्षा इ. नाटके त्यांनी लिहिली.
त्यांची नाटके समाज प्रबोधनाबरोबर जनजागृतीसाठीही होती. ते दोन वेळेला नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. मे १९०७ व जून १९१७. १९३३ साली एका साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्षही झाले. १९२० साली त्यांनी केसरीचे संबंध तोडले. मुंबईस दैनिक `लोकमान्य ` च्या संपादकपदाची धुरा सांभाळू लागले. एप्रिल १९२३ साली स्वत:च्या संपादकत्वाखाली स्वत:चा `नवाकाळ ` दैनिकाची सुरुवात केली. १९३५ मध्ये मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सुलोचना संगीत मंडळाकडून `बायकांचे बंड ` नाटकाचा प्रयोग झाला. १९३८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची भेट घेतली. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र सूर्योदय त्यांनी पाहिला आणि आपल्या गुरुबद्दलचे विचार त्यांनी आकाशवाणीवरुन मांडूनच आपला देह कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे २६ ऑगस्ट १९४८ रोजी निधन झाले.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विजय बक्षी
लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९२० रोजी झाला.मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या. लीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ मे १९४०रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले.
भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१ मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व द.ग. गोडसे यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले. मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला.
साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदी नंतर सुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले. लीलावती भागवत यांचे २५ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय़ लेखनाला सुरुवात केली.
सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि ‘दळवी, हे बंद करा!’ नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. ‘सभ्य गृहस्थ हो!’ हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळय़ा टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. तुम्ही तो नाद सोडा!’ या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली!
मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले. काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. मा.जयवंत दळवी नाटककार, कथा, कादंबरी लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते पण 'ठणठणपाळ' या नावाने ललितमध्ये जे सदर लिहिले तसे यश आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. एकदा बॉम्बे बुक डेपोमध्ये स्वाक्षरी सप्ताहात ठणठणपाळ स्वाक्षरी देण्यासाठी येणार म्हणून वाचकांनी मोठी गर्दी केली. ठणठणपाळच्या मोठ्या कटआऊट शेजारी जयवंत दळवी बसले होते. उपस्थितांची मागणी अशी होती की आम्हाला ठणठणपाळ कोण आहे ते कळू द्या. शेवटी जयवंत दळवींना आपला मुखवटा दूर करावा लागला. असे भाग्य फार थोड्या लेखकांना मिळते.
जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे. मात्र दळवी आत्मचरित्र लिहिण्याच्या पूर्ण विरोधात होते. स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची लेखकाची कल्पना असते. पण पृष्ठभागावर येणा-या आठवणी म्हणजे आत्मचरित्र नसून अंतरंग खरवडत जाऊन उमटणे हे कठीण कर्म म्हणजे आत्मचरित्र! मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, आशा वासना – ज्यांचा सभ्य संस्कृतीत उच्चारही करता येत नाही ते लिहिणे म्हणजे खरे आत्मचरित्र! मात्र आत्मसमर्थनासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात-ती एकांगी असतात आणि स्वत:च स्वत:ला दिलेली प्रशस्तिपत्रे असतात असे दळवींचे मत होते. मा. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-प्रहार / विकिपीडिया
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा
उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)
वसंत खेर यांनी पाटर्नर, डॉ. तुम्हीसुद्धा, आमच्या या घरात आदी नाटकांच्या जाहिरातीही तयार केल्या. ‘मंगलगाणी, दंगलगाणी’, व ‘भले तरी देवू’ हा भक्तीरसपूर्ण कार्यक्रम याची त्यांनी निर्मिती केली. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, आचार्य अत्रे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूळ आवाजातील भाषणे कॅसेटच्या माध्यमातून त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचविली.
महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक महिला नेत्यांनी आपल्या कार्याद्वारे स्वत:ची छाप पाडली, त्यात प्रभा राव याही होत्या. राजस्थानच्या राज्यपालपदी असलेल्या प्रभाताईंनी राज्य मंत्रिमंडळात सहकार, पर्यटन, सांस्कृतिक आणि महसूलसारखी महत्त्वाची खातीही सांभाळली. अ. भा. काँग्रेस समितीच्या सरचिटणीस तर त्या पुढे झाल्याच, पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षपदही त्यांनी दोनदा भूषविले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या भूमीत वाढलेल्या प्रभाताईंवर लहानपणापासूनच आधुनिक विचारांचे संस्कारही झाले.
त्यांचे वडील गुलाबराव वसू हे वर्धा जिल्ह्याच्या सहकार चळवळीतील कार्यकर्ते होते. जातीपातीच्या पलीकडे पाहणारे हे घराणे होते. यामुळेच प्रभाताई व त्यांच्या बहिणीने त्या काळात केलेल्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा पाठिंबा होता. वर्धा जिल्ह्यात राजकारणाची सुरुवात करणाऱ्या प्रभाताईंना १९७२ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली, तेव्हा चंद्रशेखर, मोहन धारिया आदी तरुण तुर्काचा दबावगट काँग्रेसमध्ये जोरात होता. महाराष्ट्रात शरद पवार, उल्हासदादा पवार हे काँग्रेस फोरम फॉर सोशालिस्टद्वारे सक्रिय होते. या दबावगटांमुळेच अनेक तरुण कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली होती, प्रभा राव यांचा समावेश त्यातच होता. प्रभाताई प्रथम उपमंत्री, राज्यमंत्री, मग कॅबिनेट मंत्री झाल्या. इंदिरा, राजीव आणि सोनिया या गांधी घराण्यातील तीनही नेत्यांच्या त्या जवळच्या मानल्या जात. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. पराभवानंतर खचून न जाता इंदिरा गांधी यांनी देशभर दौरे सुरू केले, तेव्हा प्रभा राव प्रवासात त्यांच्याबरोबर होत्या. इंदिरा गांधी प्रवास करीत असलेली गाडी उत्तर प्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर थांबताच, जमाव त्यांच्या बोगीवर चालून गेला. त्यावेळी प्रभाताई जमावाला सामोऱ्या गेल्या, त्यांना मारहाण झाली, पण जमाव इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असल्या तरी चंद्रपूर येथील घटनेनंतर आपल्या पत्राची दखल इंदिरा गांधी यांनी घेतली नाही, म्हणून १९८० च्या सुमारास त्या काही काळ शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसमध्ये गेल्या. खमक्या राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. यामुळेच राजीव गांधी यांनी हरयाणामध्ये भजनलाल यांना चाप लावण्यासाठी प्रभाताईंकडे हरयाणा काँग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे दिली. आयाराम-गयारामांच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या भजनलाल यांना तिकीट वाटपात झुकते माप मिळू नये याची खबरदारी तर तेव्हा प्रभाताईंनी घेतलीच, पण हरयाणा, केरळ आदी राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता असताना काँग्रेसच्या त्या-त्या राज्यांच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झालेल्या प्रभाताईंनी काँगेसची सत्ता आणण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. १९८५ मध्ये राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यावर वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रिपदी फेरनिवड झाली. मात्र प्रदेशाध्यक्षपदी प्रभा राव यांची झालेली निवड दादांना रुचली नाही आणि त्यांनी तीन महिन्यांतच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुढे २००४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील गटबाजी चव्हाटय़ावर आली असताना सोनिया गांधी यांनी प्रभा राव यांच्याकडे दुसऱ्यांदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले. २००४ ते २००८ अशी एकूण चार वर्षे त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद भूषविले. दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपदी आल्यावर विलासराव देशमुख यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला त्यांनी जेरीस आणले. काँग्रेस संघटनेचे काम करण्याची इच्छा असतानाही काँग्रेस नेतृत्वाने निवडणुकीच्या तोंडावर विलासरावांना मुक्त वाव देण्याच्या उद्देशाने प्रभाताईंची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानायचे त्यांचे धोरण असल्याने त्यांनी सिमल्याच्या सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त होण्याचा निर्णय घेतला. तरी सुरुवातीचा काही काळ त्यांचे महाराष्ट्राचे दौरे कमी झाले नव्हते. पुढे त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. खो-खो, अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या प्रभाताई संगीत क्षेत्राच्या जाणकार होत्या. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी २००७ मध्ये त्यांच्याकडे चालून आली होती, पण नशिबाचे फासे तेव्हा योग्य पडले नव्हते.
काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले.
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी घडवलं आणि महाराष्ट्राचं बवितव्यच बदललं.
जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.
राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
शिवाजीराजे १४ वर्षांचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला, शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले.
आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात जिजाबाईंच्या प्रेरणेचा खूप मोठा हातभार होता.
जीवन
शहाजी राजांनी बंगळूरात तुकाबाईंशी दुसरे लग्न केल्यावर जिजाबाईंच्या वाटयाला फारसे पती प्रेम व राजांच्या वाटयाला पिताप्रेम आले नाही. परंतु आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्म-राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढंच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णतः जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर थोडयाच दिवसांत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti