जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
१९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली.
मूळचे नागपूरचे असलेले संजय सुरकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५९ रोजी झाला. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या अनेक एकांकिका गाजल्या. संजय सुरकर यांना अभिनेता व्हायचं होत कारण स्पर्धांमधील अनेक एकांकिकांमध्ये दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनयही केला होता. ‘वंश’ ही सुरकर आणि मंगेश कदम यांनी एकत्रित दिग्दर्शित केलेली एकांकिका राज्य नाट्य स्पर्धेत पहिली आली होती.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर यांचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाला. त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं.अनंत मनोहर जोशी व नंतर आग्रा घराण्याचे उस्ताद फैय्याज खान यांचेही मार्गदर्शन लाभले. किशोर वयातच त्यांनी अनेक संगीत परिषदांना आपली उपस्थिती लावली.
१९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. १९२६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.
पं.रातंजनकर हे अनेक वर्षे लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. नंतर त्यांची छ्त्तीसगड राज्यातील खैरागढ येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. मुंबईच्या भारतीय विद्या भवनाच्यी ’भातखंडे संगीत आणि नर्तन विद्यापीठा’ची स्थापना रातंजनकरांनी केली. तसेच शीव येथील ’श्रीवल्लभ संगीतालय’ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकारास आले.
त्यांच्या शिष्यवर्गात के.जी. गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही.जी. जोग, दिनकर कैकिणी, शन्नो खुराणा, सुमती मुटाटकर, आचार्य प्रभाकर चिंचोरे, सी.आर. व्यास, पं.एस.सी.आर. भट्ट, चिन्मय लाहिरी व संगीत दिग्दर्शक रोशनलाल यांचा समावेश होतो. त्यांनी आग्रा घराण्याच्या ध्रुपद व ख्याल शैलीतील अनेक रचना गायल्या. आपले उस्ताद भातखंडेबुवा यांप्रमाणेच त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिजा रचल्या. या चिजा त्यांनी 'सुजन' या टोपणनावाने बांधल्या होत्या. त्यांचे शिष्य के.जी. गिंडे यांनी त्या चिजांची पद्धतशीरपणे कागदोपत्री नोंद करून ठेवली आहे.
त्यांनी अभिनव गीतमंजरी, अभिनव संगीत शिक्षा, तानसंग्रह, हिंदुस्थानी संगीताची स्वरलिपी, यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली. तसेच रजनी कल्याण, केदार बहार, सावनी केदार, मार्ग बिहाग, यमनी बिलावल, सालग वराळी, गोपिका वसंत, हंसरंजनी अशा नव्या रागांचीही रचना पंडित रातंजनकरांनी केली. अण्णासाहेब रातांजनकर यांचे १४ फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज १२ सप्टेंबर....शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील जयकिशन यांची पुण्यतिथी
जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल होते.
जयकिशन यांचे हार्मोनियम वरती उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या या छंदाला नवीन आकार देण्याच्या वेडापोटी ते मुंबई सारख्या मायानगरी मध्ये आले. शंकर (पूर्ण नाव शंकरसिंह रघुवंशी) यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्याखला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते.
दुसर्या चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या.शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला. त्याचे नाव राज कपुर. पृथ्वी थिएटर ची निर्मिती "बरसात" या चित्रपटासाठी राज कपूर हे संगीतकार म्हणून नवीन जोडीच्या शोधात होते त्यांनी शंकर आणि जयकिशन यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. आणि १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "बरसात" ची गाणी सुपरहिट झाली आणि इथून पुढे शैलेंद्र, हसरत जयपुरी, लता मंगेशकर, मुकेश आणि शंकर - जयकिशन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक इतिहास घडवला. हे दोघेही काही काळ त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल- भगतराम यांच्या हाताखाली सहायक म्हणून काम करत होते.
शंकर - जयकिशन या जोडीने जवळजवळ १७० हून जास्त चित्रपटांना संगीतसाज चढवला. ज्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेले बादल, सीमा, बसंत बहार, चोरी - चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश मे गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, दिल अपना और प्रीत पराई, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सुरज, तिसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली इत्यादी चित्रपटाचा समावेश होतो. त्यांना चोरी - चोरी , अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सुरज, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, पहचान, आणि बेईमान या चित्रपटासाठी एकूण नऊ वेळा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफ़ेअर पुरस्कार मिळाला आहे. शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो व मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो.
'शंकर-जयकिशन' यांनी गोपनीयता म्हणून कुठल्याही गीताची चाल वैयक्तिक कुणी बांधली ते कुणालाही सांगायचे नाही असा एक अलिखित नियम पाळला होता. मात्र संगम चित्रपटातील एक गीत "ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज न होना!" हे बिनाका गीतमाला या नभोवाणीवरील एका कार्यक्रमामध्ये खूप दिवस प्रथम क्रमांकावर वाजू लागले आणि जयकिशन यांनी हे गीत मी रचले असे सांगून तो नियम मोडला. मो. रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातील मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण केला.
'शंकर-जयकिशन' या संगीतकार जोडीतील संगीतकार ... संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंतरही १६ वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
कल खेल मे हम हो ना हो
गर्दीश मे तारे रहेंगे सदा
भूलोंगे तूम भूलेंगे वो
पर हम तूम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहा अपने निशा
इसके सिवा जाना कहा
जयकिशन यांच्याही ओठांवर मृत्यूसमयी हीच ओळ असेल.
जयकिशन १२ सप्टेंबर १९७१ रोजी निधन झाले.
शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही गीते.
बहारो फुल बरसाओ मेरा मेहबूब आया है (सूरज)
आजा सनम मधुर चांदनी ( चोरी चोरी)
जाऊ कहा बताए दिल ( छोटी बहन)
तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी कि नजर न लगे ( ससुराल)
दिलके झरोखे मे तुझको बिठाकर (ब्रह्मचारी)
जिंदगी एक सफर है सुहाना ( अंदाज)
जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर)
तेरा जाना दिल के अरमानोंका लुट जाना (अनाडी)
किसी कि मुस्कुराहटो पे हो निसार (अनाडी)
हम तेरे प्यार मे सारा आलम (दिल एक मंदिर)
जिना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां (मेरा नाम जोकर)
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी.
चित्रकलेच्या क्षेत्रात ठाण्याचे नाव उज्वल करणारे प्रसिद्ध चित्रकार व नामवंत संस्थांच्या बोधचिन्हांचे निर्माते श्री. शांताराम काशिनाथ राऊत.
मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. “कायद्याच बोला” या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.
प्रतिभावान बासरीवादक पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष यांना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता.
कामगारांबाबत व्ही. व्ही. गिरी यांना कमालीची आस्था होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. कामगारांसंबंधीचे विचार इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री, जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले.
आपल्या नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजा गोसावी यांनी मुंबई गाठली. त्यांचा जन्म २८ मार्च १९२८ रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे झाला.त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले. दामुअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरू. दामुअण्णांच्या प्रभाकर नाटय़मंदिरात ते प्रॉम्टरची नोकरी करत. याच कंपनीच्या ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंध जुळले ते कायमचेच. ‘अखेर जमलं’ या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक राजा परांजपेंनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात त्यांना घेतलं. हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला. ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकीत झाले. ‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला त्या वेळी मा.राजा गोसावी ‘भानुविलास टॉकीज’मध्ये बुकिंग क्लार्क होते. स्वत:च्या सिनेमाची तिकिटे स्वत:च विकत असत आणि काही वेळा त्यांनी ब्लॅकमध्ये विकली. जागतिक सिनेमा इतिहासातला हा अचाट प्रकार. ‘लाखाच्या गोष्टी’ची ही गोष्ट मा. राजा गोसावी पुढे अनेक काळ रंगवून सांगत असत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्यांच्या यादीमध्ये मा.राजा गोसावी यांचा क्रमांक आघाडीवर होता. मा.राजा गोसावी वाढले पुण्याच्या सदाशिवपेठेत, त्यामुळे त्यांचा विनोद सुशिक्षित मध्यमवर्गीय असे. राजा गोसावींचा आवडता कलाकार म्हणजे हॉलिवूडचा डॅनी के! आपल्या सहजसुंदर अभिनयाने राजा गोसावी संपूर्ण पडद्यावर वावरत असत. त्यांच्यातील हजरजबाबीपणाची झलक चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासूनच दिसत असे. एक सुंदर मराठी चित्रपट म्हणजे देखणा नायक, मध्यमवर्गीय नायिका, तिचे आई-वडील, चित्रपटाचे सुंदर शांत संगीत, गाणी हे सारे काही विलक्षणच असे. १९५० ते १९७० पर्यंतची दोन दशके मा.राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: गाजवली. जयश्री गडकर, स्मिता, रेखा, सीमा, नीलम अशी विविध नायिकांची साथ मा.राजा गोसावी यांना लाभली. अवघाची संसार, पैशाचा पाऊस, झालं गेलं विसरून जा, राजमान्य राजश्री, याला जीवन ऐसे नाव, बाप माझा ब्रह्मचारी, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, सुधारलेल्या बायका, दिसतं तसं नसतं, शेरास सव्वाशेर, श्रीमंत मेहुणा पाहिजे इत्यादी अनेक चित्रपटांतून वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, राम कदम यासारख्या लोकप्रिय संगीतकारांच्या सुंदर गाण्यांनी चित्रपटांना मजा आणली. मा.राजा गोसावी यांनी अडीचशे चित्रपटातून त्यांनी काम केले. केवळ विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका विशेष लक्षात राहिली. मा.राजा गोसावींच्या अभिनयातील सहजता, मुद्रेवरील भाव व संवादफेकीचं अचूक टायिमग अगदी दाद देण्यासारखं होतं. त्यांच्या या गुणांमुळेच लोकांनी त्यांना भरघोस दाद दिली. त्यांच्या शंभराहून अधिक विनोदी चित्रपटात फार विविधता नसली तरी त्यांनी लोकप्रियता अफाट मिळविली. त्यांची ही लोकप्रियता पाहून १९५९ मध्ये वसंत पिक्चर्सचे निर्माते वाडिया यांनी ‘राजा गोसावींची गोष्ट’ या नावाचा चित्रपटच निर्माण केला होता. मुंबई दूरदर्शनवरील ‘रंगतरंग’ या कार्यक्रमात बोलताना मा.राजा गोसावी म्हणाले होते,‘‘माझ्या जीवनात पैसा हा योगायोगाने आला आणि भोगाभोगाने गेला! ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाचे मला मिळाले अवघे पाचशे रुपये! परंतु, त्यातील एकही रुपया आजतागायत खर्च झालेला नाही. उलट माझ्या या जनता जनार्दन बँकेत लक्षावधी ‘टाळ्या व हशे’ जमा आहेत. म्हणूनच आडनाव ‘गोसावी’असले तरी रसिक मला विनोदाचा ‘राजा’ म्हणतात!’’ चित्रपटसृष्टीत यश मिळवूनही ते रंगभूमीला विसरले नाहीत. ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेम संन्यास’, ‘एकच प्याला’, ‘नटसम्राट’ ही त्यांची गाजलेली नाटके. मा.विनायकांचं ‘सहजतेचे हास्य स्कूल’चा खरा वारसदार असणाऱ्या मा.राजा गोसावींना पदरी वाक्य पेरण्याचं अगदी व्यसन होतं. आचार्य अत्र्यांच्या अनेक नाटकातही त्यांना हा मोह आवरला नाही, तर चित्रपटात कॅमेऱ्यासमोर अशा शेकडो ऑडिशन्स मा.राजा गोसावींच्या नावावर आहेत. १९९५ ला झालेल्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाटय़ परिषदेने ‘बालगंधर्व’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. मा.राजा गोसावी यांना मराठीतील ‘दिलीपकुमार’ म्हणत असत. मा.राजा गोसावी यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अचूक संवादफेकीने निखळ विनोद निर्माण करून जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य केले. मा.राजा गोसावी यांचे २८ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजा गोसावीयांनी अभिनय केलेल्या चित्रपट व गाण्याची लिंक
रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला https://www.youtube.com/watch?v=qmXHU1m-5SA
अशी निशा पुन्हा दिसेल का https://www.youtube.com/watch?v=601Fy9v3DVk
मानसीचा चित्रकार तो https://www.youtube.com/watch?v=PP7XEtn4ljQ
‘लाखाची गोष्ट’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=AAXcdz0vg9c
‘चिमण्यांची शाळा’ चित्रपट https://www.youtube.com/watch?v=Yg4f1d87_2s
Copyright © 2025 | Marathisrushti