ब्रिटिशकाळ असो वा स्वातंत्र्यानंतर आलेली लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामातील निष्ठा कधीच ढळू न दिलेल्या मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये ई. एस. मोडक यांचा समावेश होता. ब्रिटिशांची चोख सेवा करतानाही एतद्देशीयांविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाचा तसेच त्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीचा दाखला यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी दिला आहे. मोडक यांचा जन्म साताऱ्यात २५ मार्च १९२० रोजी झाला. वडील जिल्हाधिकारी होते. शिकायला ते पुण्याच्या शाळेत आले. नंतर मुंबईतील महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली.
त्याच काळात ब्रिटिशांची इंडियन पोलिस परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये साताऱ्याला सहायक पोलिस अधीक्षक पदावर रुजू झाले. ४२ च्या आंदोलनाचा तो काळ होता आणि त्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी कामे ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतरावदादा पाटील यांना अटक करावी लागली. तरीही त्यांचे सर्वाशी संबंध सौहार्दाचेच राहिले. याच धामधुमीत १९४३ मध्ये किरण सेनगुप्ता या बंगाली युवतीबरोबर त्यांनी विवाहाचे नाजूक बंधही गुंफले. साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर आणि नंतर मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती मिळाली. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मानही १९६५ मध्ये त्यांना मिळाला. १९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचविले आणि त्यांनी ते सार्थही ठरविले. पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक १९७६ मध्ये झाली आणि ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. प्रामाणिक, हुशार आणि कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. कामाबाबत जितके कडक तितकेच ते वैयक्तिक संबंधांमध्ये मृदूही होते. त्यांचे जीवन अनेक नाटय़मय घटनांनी भरलेले होते. याचे रोमहर्षक वर्णन ‘सेंटिनेल ऑफ सह्य़ाद्री’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुण्यात गणेशोत्सवातील हल्याची दंगल हाताळताना तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गोळीबार न करण्याचा आदेश मोडक यांना दिला, पण मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो रद्द केला. त्यानंतर आपण असा आदेश दिलाच नव्हता असे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्याबाबतचे प्रसंग मोडक यांनी नाटय़मयरीत्या मांडले आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाल्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश करू दिला जाणार नाही, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले. त्यावेळचा तणाव शमविण्यासाठी त्यांनी मोरारजींची गाडी अचानक रस्ता बदलून सुरक्षितपणे पोहोचवली. ठाकरे यांना अटक करण्याची कारवाई असो वा दंगलीस सामोरे जाण्याचा प्रसंग, त्यातून मोडक यांच्यातील कणखर प्रशासकच दिसला. दंगल कशी हाताळायची, पोलिस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याबाबतचे आपले स्पष्ट मत ते मांडत. पोलिस दलातील राजकीय चबढब त्यांना सहन होत नसे. पोलिस दलातील नेतृत्व कसे असावे याबाबत ते लिहितात, ‘नेतृत्वाचा आपल्या संघावर विश्वास असावा. स्वयंनियंत्रण, आत्मविश्वास, देशाभिमान, निष्ठा हे गुण नेत्यात असलेच पाहिजेत.’ धावपळीच्या कामामधून वेळ काढून ते अफाट वाचन करीत. सम्राट अशोकाच्या जीवनावर तब्बल १४१ पुस्तके वाचून त्यांनी कादंबरी लिहिली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत ती प्रकाशित होण्यासाठी त्यांच्या संजय आणि रवि या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच पत्नी इहलोक सोडून गेल्याने हताश झालेल्या मोडक यांची प्रकृती ढासळली. गेल्या आठवडय़ात मोडक काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसऱ्याच दिवशी ही कादंबरी प्रकाशित झाली. सर्वच क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप असण्याच्या या काळात मोडक यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची गरज अधिकच भासणार आहे.
ब्रिटिशकाळ असो वा स्वातंत्र्यानंतर आलेली लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामातील निष्ठा कधीच ढळू न दिलेल्या मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये ई. एस. मोडक यांचा समावेश होता. ब्रिटिशांची चोख सेवा करतानाही एतद्देशीयांविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाचा तसेच त्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीचा दाखला यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी दिला आहे. मोडक यांचा जन्म साताऱ्यात २५ मार्च १९२० रोजी झाला. वडील जिल्हाधिकारी होते. शिकायला ते पुण्याच्या शाळेत आले. नंतर मुंबईतील महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली.
त्याच काळात ब्रिटिशांची इंडियन पोलिस परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये साताऱ्याला सहायक पोलिस अधीक्षक पदावर रुजू झाले. ४२ च्या आंदोलनाचा तो काळ होता आणि त्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी कामे ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतरावदादा पाटील यांना अटक करावी लागली. तरीही त्यांचे सर्वाशी संबंध सौहार्दाचेच राहिले. याच धामधुमीत १९४३ मध्ये किरण सेनगुप्ता या बंगाली युवतीबरोबर त्यांनी विवाहाचे नाजूक बंधही गुंफले. साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर आणि नंतर मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती मिळाली. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मानही १९६५ मध्ये त्यांना मिळाला. १९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचविले आणि त्यांनी ते सार्थही ठरविले. पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक १९७६ मध्ये झाली आणि ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. प्रामाणिक, हुशार आणि कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. कामाबाबत जितके कडक तितकेच ते वैयक्तिक संबंधांमध्ये मृदूही होते. त्यांचे जीवन अनेक नाटय़मय घटनांनी भरलेले होते. याचे रोमहर्षक वर्णन ‘सेंटिनेल ऑफ सह्य़ाद्री’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुण्यात गणेशोत्सवातील हल्याची दंगल हाताळताना तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गोळीबार न करण्याचा आदेश मोडक यांना दिला, पण मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो रद्द केला. त्यानंतर आपण असा आदेश दिलाच नव्हता असे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्याबाबतचे प्रसंग मोडक यांनी नाटय़मयरीत्या मांडले आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाल्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश करू दिला जाणार नाही, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले. त्यावेळचा तणाव शमविण्यासाठी त्यांनी मोरारजींची गाडी अचानक रस्ता बदलून सुरक्षितपणे पोहोचवली. ठाकरे यांना अटक करण्याची कारवाई असो वा दंगलीस सामोरे जाण्याचा प्रसंग, त्यातून मोडक यांच्यातील कणखर प्रशासकच दिसला. दंगल कशी हाताळायची, पोलिस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याबाबतचे आपले स्पष्ट मत ते मांडत. पोलिस दलातील राजकीय चबढब त्यांना सहन होत नसे. पोलिस दलातील नेतृत्व कसे असावे याबाबत ते लिहितात, ‘नेतृत्वाचा आपल्या संघावर विश्वास असावा. स्वयंनियंत्रण, आत्मविश्वास, देशाभिमान, निष्ठा हे गुण नेत्यात असलेच पाहिजेत.’ धावपळीच्या कामामधून वेळ काढून ते अफाट वाचन करीत. सम्राट अशोकाच्या जीवनावर तब्बल १४१ पुस्तके वाचून त्यांनी कादंबरी लिहिली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत ती प्रकाशित होण्यासाठी त्यांच्या संजय आणि रवि या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच पत्नी इहलोक सोडून गेल्याने हताश झालेल्या मोडक यांची प्रकृती ढासळली. गेल्या आठवडय़ात मोडक काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसऱ्याच दिवशी ही कादंबरी प्रकाशित झाली. सर्वच क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप असण्याच्या या काळात मोडक यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची गरज अधिकच भासणार आहे.