जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
घारे, (डॉ.) मुकुंद
सध्याच्या ओव्हर स्पेशलायझेशनच्या काळात आपापल्या क्षेत्रापुरता संकुचित विचार न करता त्या पलीकडे पाहणारे लोक सापडणे दुर्मिळच! निसर्ग, पर्यावरण, पाणी हे विषयही त्याला अपवाद नाहीत. अशी व्यापक दृष्टी असलेले पर्यावरण व जलअभ्यासक डॉ. मुकुंद घारे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. भूशास्त्र, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती, ग्रामीण समस्या आणि सध्याच्या सामाजिक स्थितीचे भान, अशा विविध गोष्टींचे नेमके आकलन हे घारे सरांचे वैशिष्टय़ होते.
त्यासाठी ते अनेक दिग्गजांसाठीसुद्धा गुरुतुल्य होते. कोकणातील खाणींविषयी भूशास्त्रीय सल्लागार, भूजलतज्ज्ञ तसेच ‘अफार्म’च्या माध्यमातून पाणलोट व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनेकांना ज्ञात आहे; पण त्याच्या पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. बोलणे, जगणे आणि विचारातील साधेपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे विविध विषयांतील तज्ज्ञांपासून ते सामान्य माणसापर्यंत त्यांचा उत्तम संवाद असायचा. त्यांची विविध समस्या आणि प्रश्नांची उकल करणारी मांडणीसुद्धा अशीच साधी, सरळ असायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका तज्ज्ञाबरोबरचकार्यकर्तासुद्धा दडलेला होता आणि समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संवादही होता. त्यामुळे अनेक तज्ज्ञांमध्ये पाहायला मिळणारा समाजापासूनचा तुटलेपणा त्यांच्यामध्ये कधीच जाणवला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध घटकांशी ते इतक्या सहजतेने व मिसळून वावरू शकायचे. म्हणूनच ते ज्ञान, अनुभव व वयाने मोठे असले तरी त्यांचे कधी दडपण येत नसे. त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विदारक वास्तवाची माहिती व नेमकी जाणीव झाल्यामुळे येणारी निराशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी दिसली नाही. समस्या परखडपणे मांडतानाही ते आशावादी होते. विविध प्रश्न, मुद्दे जाणून घेण्यासाठी त्या त्या भागात जाणे वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्यांनी सुरूच ठेवले. अनेक तरुण विद्यार्थी घडविले. विषयाच्या माहितीबरोबरच त्यांना शहाणपणही दिले. त्यामुळेच त्यांचा सहवास म्हणजे शिकणे व शहाणेही होणे होते. सध्या पाणी, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती आणि शाश्वत विकास याबाबत अनेक समस्यांनी गंभीर रूप धारण केलेले असताना घारे सरांचे जाणे हे मोठे नुकसान आहे. त्यांनी दिलेले शहाणपण वापरणे आणि या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे हीच घारे सरांना खरी आदरांजली ठरेल!
--------------------------------------------------------------------------------------------
घारे, (डॉ.) मुकुंद
पाण्यासाठी पावसावरच अवलंबून राहणार्या शेतकर्यांना 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा मंत्र देऊन याबाबतच्या समस्येवर ठोस उपाय देणारे डॉ. मुकुंद घारे.
फर्ग्युसन कॉलेजमधून १९६६ मध्ये डॉ. मुकुंद घारे यांनी भूशास्त्राची पदवी मिळवून पुराजीवशास्त्रात पीएच.डी. मिळवली. परंतु आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने त्यांनी राज्यभर फिरून विविध विभागांच्या भूरचना, पर्यावरण, जलसाठे आदींचा अभ्यास केला. सुरुवातीच्या काळात भूशास्त्रज्ञ म्हणून खाणींसाठी सल्लागार म्हणून काम केल्यावर त्यांनी पाणी या मुख्य समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राज्यात पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे भूजलसाठे आणि त्याचा शेतकर्यांना होऊ शकणारा फायदा याचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी इस्त्रायलमध्ये भूजलावर संशोधन केले. अखंड भटकंती आणि अभ्यासातून सापडलेला 'पाणी अडवा-पाणी जिरवा'चा मंत्र त्यांनी प्रभावीपणे विविध माध्यमांच्या साह्याने शेतकरी बांधवांपर्यंत नेला.
राज्यात पाणलोटाची चळवळ सुरू झाली. पाऊस कोठे अधिक प्रमाणात पडतो, तर कुठे कमी. काही भाग अतिवृष्टीचे, तर काही अवर्षणग्रस्त. अशा विषम स्थितीत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन करून शेतीसाठी वापरण्याचे तंत्र घारे यांनी शेतकर्यांना दाखवून दिले. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अनेक कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा भरू लागल्या. राज्यात गावोगावी शेकडो शिबिरे घेऊन त्यांनी या विषयातील कार्यकर्तेही घडवले. आज राज्यात पाणी, पर्यावरण आणि कृषीक्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत कार्यकर्ते डॉ. घारे यांचेच शिष्य आहेत. डॉ. घारे यांनी हे काम सुरू केले, तेव्हा सरकारी पातळीवर पाणलोट क्षेत्रात विशेष पुढाकार घेण्यात आला नव्हता. मात्र, त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखत राज्य सरकारनेही पाण्याबाबतच्या योजनांसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून नेमले. 'अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्यूएशन इन महाराष्ट्र' (अफार्म) या संस्थेच्या माध्यमातून डॉ. घारे यांनी राज्यात जलव्यवस्थापनाचा जागर केला.
पाणी या विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तके सर्वसामान्यांपासून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसाठी जणू गाइड आहेत. हे सारे करताना सर्वसामान्यांशी असणारी बांधिलकी डॉ. घारे यांनी कायम ठेवली. अत्यंत साधे राहत आणि सर्वसामान्यांना समजेल असे बोलत त्यांनी पाणी आणि जमिनीचे विज्ञान तळागाळात रुजवले. म्हणूनच त्यांना या क्षेत्रात गुरूचे स्थान मिळाले.
वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते कालवश झाले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले.
शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते. मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली. व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी या चित्रपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांनी न्याय दिला. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी.
प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे.
मंदार परब हे सध्या ‘झी चोवीस तास’ या प्रादेशिक बातम्या देणार्या, व मराठी भाषिकांचे जग व त्यांच्या जीवनांत घडलेल्या विवीध घडामोडी उलगडुन दाखविणार्या लोकप्रिय वाहिनीचे संपादक आहेत. त्यांनी संपादकस्थान स्वीकारल्यापासुन या वाहिनीचा अंतरबाह्य कायापालट झाला आहे. या वाहिनीच्या अंतररुपात व बाह्यररूपांत जे अमुलाग्र बदल घडले आहेत, त्यालादेखील मंदार यांची आभ्यासु व नव्या तंत्रज्ञानांना कवटाळण्याची वृत्ती जबाबदार आहे.
वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती. शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे.
घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मोहन गोखले वावरले.
सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. त्यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी ह्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरविण्यास सुरवात केली.
बाबूरावांना चित्रपटांपेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते, तसेच त्यांच्या चित्रपटनिर्मितीत व्यावसायिक बाबींचा अभाव होता. परिणामत: त्यांचे सहकाऱ्यांशी मतभेद झाले व त्यांपैकी काहीजण कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी “लंका” या चित्रपटानंतर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली.
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधीच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती.
Copyright © 2025 | Marathisrushti