(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • विनायक लक्ष्मण भावे

    प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक अशी ख्याती असलेल्या विनायक भावे यांचा जन्म ६ नोव्हेंबर १८७१ साली कोंकणातील पळस्पे या गावी झाला होता. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. विनायक भावे यांनी विल्सन विद्यापीठातून बी. एस्सी ची पदवी संपादन केली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.

    विनायक भावे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले सारे आयुष्य महाराष्ट्र कवी नावाच्या मासिकासाठी अर्पण केले. या मासिकाने सलग चार वर्षे रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविताना अनेक ग्रामीण व होतकरू कविंच्या व लेखकांच्या, उजेडात न आलेल्या कवितांना व इतर कलाकृतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या मासिकाने अनेक मराठी काव्ये, बखरी, व इंग्रजी अमदानीच्या पुर्वी होऊन गेलेल्या कवींच्या कवीतांना पुन्हा उजाळा देऊन या सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन करण्याची धडक मोहिम राबवली होती. हे एकीकडे सुरु असताना, दुसरीकडे त्यांचे वाचून झालेल्या ग्रंथसंपदेचे विवेचनात्मक व रसभरित विश्लेषण करणेही चालूच होते. त्यांनी इतिहास संशोधनाची नवी व प्रगल्भ दालने इतरांसमोर उघडली होती.

    साहित्य व इतिहासाव्यतिरीक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक यांवर अतिशय उपयुक्त टिपणवजा माहिती त्यांनी संग्रहित करून ठेवलेली आहे. विनायक भावे यांनी आजवर अनेक जुने अप्रकाशित लेखक व कवींच्या, काव्य-लेखनसंपत्तीचे आभ्यासपुर्ण मंथन केले. आध्यात्मिक व वृत्तालंकारादी व्याकरणाच्या जंजाळात फसलेल्या कवितांपेक्षा, त्यांनी मुक्तेश्वरांच्या व शाहिरांच्या कवितांचे, रसग्रहण करण्यात अधिक धन्यता मानली. कारण या कवितांमध्ये भक्तीरसापेक्षा, त्या कवितेच्या आशयाला व भावनेला अधिक आपलेसे केले गेले होते. “महाराष्ट्र सारस्वत“ ही तर त्यांच्या काव्यप्रेमाने गाठलेली उत्कटतेची परिसीमा मानली जाते. ह्या कधीही विसरता न येणार्‍या दर्जेदार साहित्य विवेचकी वृत्तीने रसिकांसमोर उलगडुन दाखविले होते.

    महाराष्ट्र सारस्वतची पहिली आवृत्ती ग्रंथमाला नावाच्या मासिकामध्ये प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. भावे यांनी पुढे त्यात सतत भर घातली. त्यामुळे हा ग्रंथ तिसर्‍या आवृत्तीपर्यंत ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. “ग्रंथमाला“त पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे “चक्रवर्ती नेपोलियन“ हा देखील त्यांच्यामधील प्रतिभावंत व बोलक्या लेखकाचा, एक विनम्र प्रयत्न होता. भावे हे कोणताही ऐतिहासिक प्रसंग आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या बळावर जिवंत करण्यात तज्ञ होते, याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना वारंवार येतो.

    १२ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.

  • उर्दू शायर’, व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी

    मौलाना ... हसरत मोहानी!

    संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!

    त्यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. मा.हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले. ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या.

    कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती. हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते. मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली. १८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे. मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची.

    दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!

    अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला. अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला.

    मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.

    हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात -
    मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक
    पैगामे वफा बादे सहर लेके गयी है

    (हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
    टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते -
    मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से
    सिधारे आज तिलक
    बलवंत तिलक, महाराज तिलक,
    आझादी के सरताज तिलक

    मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
    मनमोहन श्याम से नैन लाग
    निसदिन सुलग रही तन आग

    मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
    चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है
    हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है

    खूब-रुयोंसे यारियाँ न गई

    या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई
    हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर

    खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
    https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
    चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
    https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g

    हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
    =========================================
    उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
    किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
    =====================================
    कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
    उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
    =====================================
    जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
    अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
    ======================================
    तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
    देखता था मै तुने भी इशारा कर दिया
    इश्कने उसको सीखा दी शायरी
    अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई

  • काजोल

    काजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट् अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला.

  • शिरीष कारळे

    २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची छायाचित्रण क्षेत्रातील हुकुमत सांगून जातो. जे.जे. कलामहाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते आणि गेली २७ वर्षांत त्यांनी काळाप्रमाणेच पुढे पुढे जात आपला छायाचित्रण क्षेत्रातला आलेख उंचावला आहे. त्यांचं नाव शिरीष कारळे!

  • जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

    नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे.

    नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीस ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली मा.नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील.

    प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.१९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्या वर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्याटवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले.

    हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. मा.नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मा.नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे. पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार.

    नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जुन्या काळातील जेष्ठ संगीतकार नौशाद अली

    नौशाद यांचे लहानपण लखनौमध्ये गेले. ते ज्या ठिकाणी राहायचे त्याच्या बाजूलाच एक थिएटर होतं. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला.पूर्वी चित्रपट चालू असताना त्याचं पार्श्वसंगीत पडद्यासमोर बसलेली मंडळीच द्यायची. घरात बसल्या बसल्या या पार्श्वसंगीताचे सूर नौशाद यांच्या कानांवर पडायचे. यामुळे ते संगीताकडे खेचले गेले. लादनसब हे अशा प्रकारचे संगीत देण्यास माहीर होते. त्यांचा वाद्यवृंद पार्श्वसंगीत देत असताना नौशाद त्यांच्या सार्या गोष्टी टिपून घ्यायचे. यामुळे त्यांच्या शाळेला दांड्या व्हायला लागल्या. पावलं आपोआप थिएटरकडेच वळायची. त्यांचे वडील तापट होते. त्यांना मा.नौशादचा हा नाद मुळीच पसंत पडलेला नव्हता. वयात आल्यावर नौशादनी घरदार सोडलं. ते सोडणं त्यांना क्रमप्राप्तच होतं. त्या वेळी लखनौमध्ये अनेक वाद्यवृंद तेव्हा कार्यरत होते. त्यात नौशादनी आपला स्वतःचा 'विंडसर एंटरटेनर' नावाचा वाद्यवृंद सुरु केला. दहा वर्ष त्यांच्या कानांवर जे संगीत पडलं होतं त्यातून त्यांना चाली स्फुरायला लागल्या. हा वादयावृदं स्वतःचा असल्याने त्यांचा स्वतंत्रपणे सारं काही करायला लागल्या. हा वादयवृदं स्वतःचा असल्याने त्यांना स्वतंत्रपणे सारं काही करायला मिळायचं यामुळे त्यांची प्रातिभा फुलली.

    मुख्य म्हणजे आपणही संगीतकार होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांना लखनौमधल्या कार्यक्रमातून मिळाला. विंडसर एंटरटेनचे कार्यक्रम घेऊन त्यांनी मग जयपूर, जोधपूर, सिकर, माऊंट अबू, सिरोही, विरमगाम अशा ठिकाणी दौरे काढले. विरमगामला शेवटचा कार्यक्रम झाल्यावर त्यांना मुंबई साद घालायला लागली. स्वप्नाची नगरी मुंबई एवढी जवळ आली असताना आपण माघारी लखनौला जाण्यापेक्षा मुंबईत जाऊन अपलं नशीब अजमावावं या विचाराने ते मुंबईला आले. तेव्हा ते फक्त १६ वर्षांचे होते आणि त्यांच्या खिशात दमडीही नव्हती. जवळ होता तो फक्त संगीतकार होण्याचा आत्मविश्वास. दादरला शिवाजी पार्क आणि ब्रॉडवे सिनेमाच्या आवारात रात्रीचे ते झोपायचे. सकाळी छोटंमोठं काम मिळतं का ते शोधत फिरायचे. पण याच ब्रॉडवेला एके दिवशी आपण संगीत दिलेला चित्रपट झळकेला याची त्यांना खात्री होती. सुरुवातीला एन्. ए. (म्हणजे नौशाद अली) दास या नावाने त्यांनी काही गाणी स्वरबध्द केली. उस्ताद झंडे खाँ यांच्याकडे त्यांना शेवटी ४० रु. महिना पगार असलेली नोकरी मिळली. नंतर रणजित स्टुडिओत जाऊन काम मिळतं का ते पाहायला लागले आणि रणजित स्टुडिओच्या सरदार चंदूलाल खेमजी यांनी त्यांना आपले संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्याकडे साहाय्यक म्हणून ठेवून घेतलं. या ठिकाणी नौशादंना खेमचंदजींकडून बरंच काही शिकायला मिळालं. पण अजूनही त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. दरम्यान गीतकार दीनानाथ मधोक त्यांना घेऊन मोहन भवनानी या निर्मात्याकडे घेऊन गेले. या भवानानींना एक नवा संगीतकार हवा होता. मधोकनी त्यांना नौशादचं नाव सुचवलं. मधोक यांनी नौशादमधले गुण पक्के हेरलेले होते. पण तेव्हा नौशाद अवघे वीस वर्षांचे होते. हा एवढा कोवळा पोरगा काय कपाळाचं संगीत देणार, असंच तेव्हा भवनानींना वाटलं होतं. पण तरीही मधोक यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी महिना १०० रुपये पगारावर आपल्या 'प्रेमनगर' चित्रपटाला संगीत देण्याचं काम नौशाद यांच्याकडे सोपवलं. मा.नौशादनी अवघ्या तीन महिन्यांत 'प्रेमनगर' ला संगीत दिलं. त्यांना फक्त तीनशे रुपये मिळाले. पण त्यापेक्षा त्या चित्रपटाच्या श्रेयनामावली संगीतकार म्हणून त्यांचं नाव झळकलं होतं याचं त्यांना विशेष अप्रूप वाटलं. १९४० च्या सुरुवातीला झळलेल्या 'प्रेमनगर'च संगीत लहानथोरांना आवडलं आणि संगीतकार नैशादचा उदय झाला. यानंतर्च नौशाद यांना छोटी-मोठी कामं मिळत गेली. विजय भट, कारदार यासारखे निर्माते त्यांच्यावर फिदा झाले. यामुळे 'माला', 'दर्शन', 'शारदा', 'कानून'. 'कीमत', 'पहले आप', नमस्ते', 'सन्यासी', 'संजोग', 'जीवन', 'गीत', 'शहाजहान', 'नाटक', 'दर्द', 'दिल्लगी', 'दुलारी', 'दिवाना' असे मा.नौशादजीचें चित्रपट आले.

    नौशाद यांचा या चित्रपटसृष्टीत त्यामुळे जम बसला. पण त्यांची बऱ्याच जणांनी फसवणूकही केली. एका चित्रपटाद्वारे त्याकाळी लाख रुपये गोळा करणारे हे निर्माते त्यांच्या हातावर नाममात्र पैसे ठेवायचे. १९४४ साली गुलाम हैदर यांच्यापासून स्फूर्ती नौशादनी 'रतन' मध्ये उत्तर भारतीय ढंगाचं संगीत बेमालूमपणे वापरलं आणि 'रतन'च संगीत अफलातून लोकप्रिय झालं. नौशाद यांचा 'रतन'मुळे खूप गाजावाजा झाला. 'द मास्टरो विथ मिडास टच संगीतसम्राट नौशाद', 'नौशाद नौशद चालीस करोड में एकही नौशाद' अशी त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली जाऊ लागली. १९५७ मध्ये 'मदर इंडिया'ची जुळवाजुळव सुरु होती. मेहबूब खानच्या आधीच्या 'अंदाज'ला नौशादनीच लाजवाब संगीत दिलेलं होतं म्हणून त्यांचीच 'मदर इंडिया'च्या संगीतासाठी त्यांनी निवड केली होती. पण आता नौशादनी पहिल्यांदा आपली रॉयल्टी मेहबूब खान यांच्याकडे मागितली आणि त्यांनीही ती दिली. यानतंर त्यांची आर्थिक चणचण संपली. नौशाद यांनी नंतर दर्जेदार संगीत देण्याचा सतत प्रयत्न केला. वर्षभरात ते एकच चित्रपट यासाठी करायचे. त्यांना गायकांकडून कसून तयारी करुन घेतल्याशिवाय गाणं रेकॉर्डिंग करायला आवडायचं नाही. लता मंगेशकर, रफी ही मंडळा त्यांच्याकडे तासनतास एकाच गाण्यासाठी रिहर्सल करायला न कंटाळता यायची. आजही नौशाद म्हणतात, 'आपल्याकडे गायक, गायिकांना संगीतकारांपेक्षा अधिक मान मिळतो हे सपशेल चुकीचे आहे. गाण्याची चाल, त्यावरचे संस्कार संगीतकार करत असतो. त्या गाण्याच्या सुरेलपणाचा वा बेसुरीपणाचा मालक तो संगीतकार असतो. आम्हा संगीतकारांमुळे अनेक गायक - गायिकांचं नावं झालं हे लक्षात घ्या. संगीतकाराविना गायक काहीच करु शकत नाही. लता, रफी हे चांगले गायक असल्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्यांच्याकडून उत्तम प्रकारे गाऊन घेणार्या, संगीतकारांना तुम्ही कमी लेखू नका.' लताकडूनही आपल्या मनासारखं गाणं जोवर येत नाही तोवर तिला गायला लावण्याचा हट्ट नौशाद धरायचे. रफीने गायलेलं 'कोई सागर दिल को बेहलाता नही' किंवा शमशाद बेगमचं 'छोड बाबुल का घर' ही गाणी केवळ मा.नौशाद हा संगीतातला चमत्कार होता. यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असायचे. ते जे काही करायचे ते मात्र मनापासून असायचं. ते श्रध्दापूर्वक रेकॉर्डींगही करायचे. 'बैजू बावरा'तल्या 'मोह भूल गये सावरियाँ' गाण्याच्या रेकॉर्डींगची गोष्ट अशी आहे. हे गाणं भैरव रागातलं असल्याने भैरव म्हणजे शिवशंकर म्हणून नौशादनी रेकॉर्डिंग करायच्या आधी सर्वाना स्नान करुन शुचिर्भूत होऊन रेकॉर्डिंग करायचा आग्रह धरला होता.

    'बैजू बावरा'ने नौशादना तुफान लोकप्रियता तर दिलीच, पण त्यांना स्वतःला फार मोठं समाधान दिलं. या एका चित्रपटात त्यांनी बहुतेक सगळ्या रागांचा वापर केला. रफीच्या आवाजातली 'मन तडपत हरी दर्शनको आज' मालकंसमध्ये, ओ दुनियाके रखवाले' दरबारीमध्ये त्यांनी तयार केलेलं होतं 'तू गंगांकी मौज मै', 'दूर कोई गाये', 'इन्सान बनो' ही सगळी गाणी गाजली. नौशाद यांच्या कारकीर्दीतला 'बैजू बावरा' हा कोहिनूर हिरा ठरला. पलुस्कर आणि उस्ताद आमिर खान यांची जुगलबंदीही पेश केली. सुरुवातीला 'बैजू बावरा'मध्ये दिलीपकुमार - नर्गिस अशी जोडी घेतली जाणार होती. पण नौशादनीच यामुळे प्रेक्षक निव्वळ या जोडीला पाहायला येतील. याचं कथानक, संगीत उपेक्षित राहील अशी शंका व्यक्त करुन नव्या कलाकारांना घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार मीनाकुमारी, भारतभूषण ही जोडी घेतली गेली आणि या जोडीलाही पुढे स्थिरावता आलं. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात बँडवर 'छोड बाबुलका घर' वाजवलं गेलं होतं आणि त्यांच्या सहाव्या आणि सर्वात धाकट्या मुलीच्या लग्नालाही बँडवर. हेच गाणं वाजवलं गेलं तेव्हा त्यांना भरुन आलं होतं. आपण दिलेलं संगीत चिरकाल टिकणात्रं आहे याचीच साक्ष बँडवाल्यांनी दिली होती. याचं कारण हे गाणं यांनीच 'रतन'साठी शमशाद बेगमकडून गाऊन घेतलेलं तर होतं! मा.नौशाद यांचे निधन ५ मे २००६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री विदुषी कीर्ती शिलेदार

    वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए. ‘ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली.

  • अशोक सराफ

    मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत..

  • सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक

    सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक व्यवसायाने खरे डॉक्टर आहेत. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला.

  • डॉ.अमोल कोल्हे

    आज १८ आक्टोबर
    आज डॉ.अमोल कोल्हे यांचा वाढदिवस.
    जन्म.१८ आक्टोबर १९८०

    शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांची छबी डोळ्यासमोर उभी राहते. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील शिवरायांच्या अप्रतिम भूमिकेमुळे अमोल कोल्हे यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
    डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आण १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी जी.एस. महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. डॉ. अमोल कोल्हे हे मराठीतील प्रसिध्द अभिनेते. स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले.
    डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी डॉक्टर अश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
    डॉ. अमोल कोल्हे हे एक प्रभावशाली वक्ते आहेत आणि ते सध्या शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३