जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला. `माझीया जातीचे मज भेटो कोणी, ही माझी पुरवून आस, जीवीचे जिवलग असे भेटला की दोघांचा एकच श्वास' अशी कवितेवर निष्ठा असणारा कवि म्हणून वसंत बापट ओळखले जातात. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा `बिजली' हा पहिला काव्यसंग्रह सेतु, अकरावी दिशा, सकीना, मानसी हे त्यांनंतरचे. त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी, वाचली, अनुभविली. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्नर होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली.
'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली. पु.ल. यांनी एकदा वसंत बापट यांना, `बापट, बापट रोज गाणं थापट' म्हटलं पण वसंत बापटांनी मात्र आपलं गाणं `थापटत' असतांना कधी-कधी `थोपटलं' ही आहे असं म्हणंत. ते म्हणंत, नव्या कवितेतून गाणे हरविले आहे, तरुणाईने गाणी गुंफायला हवेच. बापट हे केशवसुतांच्या मालिकेतील कवी होते. देशात घडणार्याु घटनांची दखल घेऊन मत मांडले पाहिजे असे मानणारे ते कवि होते. कवींच्या संस्कृति समृध्दीमुळे त्यांच्या कवितेत भाववलयं उठत राहतात. माणसांबद्दलचे प्रेम आणि सामाजिक जिव्हाळ्यातून बापट यांचे मन घडले होते. त्यांच्या कवितेला अनेक घुमारे आहेत. रचनाशुध्दता, विलक्षण शब्दचापल्य हेवा वाटावा अशी शैली ही बापट यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. अंतर्गत लय सांभाळून त्यांनी अनेक रचनाप्रकार हाताळले.
१९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांना अनेक मित्र मंडळी होती. तीही वेगवेगळ्या स्तरांतली, त्यांच्या मित्र मंडळीत पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, जेष्ठ नेते नाथ पै, मधु दंडवते, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे असत. महाराष्ट्र्सेवादलातल्या सर्वांना, `साधने'त त्यांच्याबरोबर काम करणार्या सहकार्यां नाही ते आपले वाटतात. त्यांचे मराठी, संस्कृत भाषेवरचे प्रभूत्व आणि प्रेम तर सर्वश्रुतच होते. पण त्यांचे इंग्रजीवरही प्रभूत्व होते. `शतकाच्या सुवर्णमुद्रा' हे त्यांचे अखेरचे पुस्तक. वसंत बापट यांचे १७ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. माय मराठी
त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात म्युझिक ॲरेंजर म्हणून काम करणाऱ्या भिडे यांनी कालांतराने चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरुवात केली.
इंडियाना जोन्स ऊर्फ इंडी ही भूमिका फक्त हॅरिसन फोर्डनेच करावी. इंडीमधल्या कमतरता, त्याचा अभ्यासूपणा, अतिधाडसीपणा हॅरिसन इतक्या ताकदीने रंगवतो की तो निव्वळ ही भूमिका करणारा अभिनेता राहत नाही. हॅरिसन फोर्डच्या धाडसाबाबत बोलायचं तर सिनेमातले स्टंट तो करतो. फक्त सिनेमातलेच नाही तर प्रत्यक्षात अचाट साहस करतो. विमानं उडवणं त्याला आवडतं. एकदा त्याच्या विमानाला अपघात झाला तेव्हा त्याची प्रतिक्रीया मजेशीर होती. त्याला विचारलं नेमकं काय झालं. तो म्हणतो, मी ते (विमान) मोडलं.
अजीत हे हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या पिढीतील प्रसिद्ध खलनायक अभिनेता होते. त्यांचे खरे नाव हामिद अली खान असे होते.
आज २२ आक्टोबर. प्रसिद्ध बॉलिवूड खलनायक अभिनेता अजीत यांची पुण्यतिथी. अजित यांचा जन्म २७ जानेवारी १९२२ रोजी झाला.
अजीत यांनी जंजीर सिनेमात सेठ धरम दयाल तेजा हे पात्र साकारले होते. अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. 'जंजीर'नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली. खरं तर त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांची एन्ट्री ही हीरोच्या रुपात झाली होती.
अजित यांचे अनेक डॉयलॉग प्रसिध्द आहेत.
मोना डार्लिंग, सारा शहर मुझे 'लायन' के नामसे जनता है, वाटस युवर प्रॉब्लम?, आई लास्ट मई ग्लासेस, स्मार्ट बॉय , हव वैरी इंटरेस्टिंग...
लिली डोंट बी सिली, मोना लूटलो सोना,
अजित यांचा कालीचरण मधील डायलॉग तर खूप गाजला होता.,तो म्हणजे "मै तुम्हे लिक्वीड ऑक्सीडजनमे रखुंगा. लिक्वीड तुम्हे जीने नही देगा, ऑक्सीतजन तुम्हे मरने नही देगा‘.
अजीत यांचे २२ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
‘खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली.
नम्र, साधेपणा, कामाप्रती प्रामाणिकपणा या वैशिष्टय़ांनी सुरुचीची छायाचित्रं खुलतात…
अनेक मराठी कलाकारांना शून्यातून यशाच्या शिखरापर्यंत पोहचताना मी पाहिलंय. काहींचा हा प्रवास अगदी वर्षा – दोन वर्षांत झालाय. तर काहींना त्यासाठी बरीच वर्षे खर्ची पाडावी लागलीत. यातील काहीजण अनेक वर्षांच्या अंती अजूनही एका सीमेपर्यंतच पोहोचलेत तर काही या इंडस्ट्रीतूनच बाहेर फेकले गेलेत. या सगळ्यांचा प्रवास पाहता एक वाक्य नेहमीच समोर येत ते म्हणजे,’ अक्रॉस प्रोफेशन्स, कन्सिस्टन्सी इज अ डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ वर्क एथिक’. आपल्या कामात सातत्य राखण तस फार कमी लोकांना जमत. त्यातही स्त्रियांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्यांमुळे हे सातत्य राखण कठीण जात. आपल्या कामात सातत्य राखत, त्यातल्या नीतिमूल्यांना जरा देखील धक्का लागणार नाही याची नेहमीच काळजी घेत गेली अनेक वर्षे विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाच्या जोरावर सतत दिसणारा चेहरा म्हणजे सुरुची अडारकर.
सुरुचीने आजवर अनेक माध्यमांसाठी काम केलय. छोटयापडद्यावर, रंगभूमीवर, रुपेरी पडद्यावर ती लीलया वावरलीये. आज प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या याच सुरुचीचा अभिनय क्षेत्रातला हा प्रवास किती खडतर होता हे गेल्या दशकातल्या तिच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येईल. प्रभाकर पणशीकर निर्मित ’अवघा रंग एकचि झाला’ या नाटकातून सुरुचीने २००७ साली अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा केला. यानंतर ’उंच माझा झोका’, ’ओळख, ’कूंकु’, ’जन्मगाठ’, ’राम राम महाराष्ट्र’, ’लेक लाडकी या घरची’, ’पेहचान’, ’एक तास भुताचा’, ’आपलं बुवा असं असतं’, अशा नाना मालिकांतून ती सतत दिसत होती. या मालिकांनी तिच्यातला अभिनय जिवंत ठेवण्याचं काम केलं. मात्र, सुरुचीला ओळख दिली ती झी मराठीच्या ’का रे दुरावा’ या मालिकेनी. या मालिकेतली ’आदिती’ चांगलीच लोकप्रिय ठरली आणि सुरुची या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर घरघरांत पोहचली. आदितीने सुरुचीला प्रसिद्धी दिली, चेहरा दिला आणि बघता बघता तिचा चेहरा सातासमुद्रापारही सुपरस्टार झाला. या मालिकेनंतर सुरुचीने कमबॅक केलं ते झी युवाच्या ’अंजली’ मालिकेतून. मालिकेतली मध्यवर्ती भूमिका तरुणाईत चांगलीच लोकप्रिय ठरली आणि सुरुचीला तिच्या यशाचा आलेख चढता राखण्यात यश मिळालं.
सुरुचीने छोटया पडद्यावरच्या अभिनयाच्या अनुभवाच्या जोरावर रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ’मात’, ’नारबाची वाडी’, ’तथास्तु’ अशा मराठी आणि हिंदी सिनेमांतून तिचा अभिनय पाहायला मिळाला. मात्र ती लक्षात राहिली आदिती आणि अंजली या भूमिकांमुळेच. आदितीची भूमिका संपल्यानंतर आणि अंजलीच्या भूमिकेत वावरण्यापूर्वी सुरुचीने ’स्ट्रॉबेरी’ नाटकातून रंगभूमीवर काम बॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला फारस यश आलं नाही.
साधारण २०१२ साली मला दिवाळी निमित्त विशेष शूट करण्यासंदर्भात विचारण्यात आलं होत. यासाठी मला मराठी चेहरा हवा होता. पारंपरिक वेशभूषा, मराठमोळा शृंगार असल्याने यासाठी आम्ही सुरुचीचा चेहरा निश्चित केला. मेकअप, हेअर, कॉश्च्युम हे सारं आधीच ठरलं होत. चंद्रकोर टिकली, नाकात नथ, गळ्यात, कानात दागिने असा मराठमोळा शृंगार सुरुचीवर फारच शोभून दिसत होता. तिच्या या लुकच्या सोबतीला दिवाळीसाठीच कंदील, दिव्यांच तोरण असं सगळं शूटसाठी वापरलं होत. सुरुची यावेळी फार नम्र होती. शूटच्यावेळी नम्रतेनं सर काही समजून घेऊन अदबीने बोलत होती.
या शूटनंतर सुरुचीच एका मराठी वृत्तपत्रासाठी शूट करण्याची संधी मला मिळाली. त्याकाळात सुरुची थोडी बिझी होती. परंतु ठरल्याप्रमाणे वेळ काढून सुरुची शूटला आली. मराठमोळ्या वेशातली सुरुची मी टिपली होती. वेस्टर्न लूकमधली सुरुची टिपण्यासाठी सुरुचीच दोन – तीन कौस्च्युममध्ये आम्ही शूट प्लॅन केलं. ठरल्याप्रमाणे सुरुची स्टुडिओला आली. सुरुवातीला सुरुचीचे काही पोर्ट्रेट मी टिपले. प्रत्येक चेहरा काहीतरी बोलतो. त्याला त्याची एक विशिष्ट अशी भावमुद्रा असते. त्यावर कितीही रंगरंगोटी केली तराही त्यातली सात्विकता बदलत नाही. आणि असा प्रयत्न केला तर ते खूप कुत्रिम वाटत. सुरुचीचा चेहरा तसा खूप भोळा, नम्र आणि पारंपरिक ठेवणीसाठी उत्तम आहे. हेच लक्षात घेऊन तिला फार मॉडर्न लूक न देता तिच्यातला साधेपणा, सहजपणा टिपण्याचा प्रयत्न मी करत होतो. सुरुचीचा वेस्टर्न लूक आणि तो ग्लॅमरस वाटावा म्हणून लाइटिंगची वेगळी योजना स्टुडिओत केली. तिचा हा लूक तिच्या हावभावातून न दाखवता लाईटिंगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होता.
कॅमेयाच्या समोर लाईट ठेवून फोटो टिपण हे खरंतर शास्त्रानुसार चुकीचं मानलं जात. मात्र या शूटसाठीची हि गरज होती. या लाईटिंगमुळे एक ड्रमॅटिक लाईट मला मिळवता आला. कॅमेयाच्या लेन्सवर आलेल्या ग्लेअर्समुळे हा लाईट इफेक्ट आणखी सुंदर वाटत होता. या लाईटिंगमध्ये निळ्या – गुलाबी रंगाची शेड असलेले काही फोटो मी टिपले. यानंतर स्टुडिओत सुरुचीचे काही पोट्रेट आणि कँडिड फोटो टिपण्यात मला यश आलं. साधारणपणे पाच ते सहा तास हे शूट चाललं. सुरुची न कंटाळता, न थकता शूट करत होती. शूटच्यावेळी सुरुची फारच मदतशीत असल्याने शूटसाठीच दडपण माझ्यावर नव्हतं.
सुरुचीने नाटक, मलिका आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कलाकृती किती गाजल्या यापेक्षा त्यातली सुरुचीची भूमिका, तिचा अभिनय हा किती उंचीचा होता हे तिला पुढे मिळत गेलेल्या अभिनयाच्या संधीवरून समजतं. सुरुचीला नेमकं काय करायचंय हे तिला माहित असतं. परंतु नवीन कलाकृतीला ती नाही म्हणत नाही. कारण त्यातली आव्हानं पेलण्याची तयारी तिने केलेली असते. सुरुचीच्या याच अभिनयातल्या सातत्यामुळे, तिने जपलेल्या नीतिमूल्यांमुळे आणि आव्हानं पेलण्यासाठी नेहमीच दाखवलेल्या तयारीमुळे गेल्या बारा वर्षांत सुरुचीच्या अभिनयाच्या प्रवासानं जोरदार वेग पकडलाय.
धनेश पाटील
साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यात करण्यात आली.
स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे. लहानपणापासून अंगपिंडाने गुटगुटीत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते. उंचीने काहीसे बुटके असलेला, उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. १९२५ मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती उत्तम वठली. त्यानंतर ‘सीतावनवास’, ‘राम-रावण युद्ध’ या मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाई’मध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हाद’मध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेली’मध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले.
हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात शिंदे जवळजवळ सगळ्या खात्यांमधील कामे शिकून आले. या काळात त्यांनी फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली १९ मूकपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. फाळकेंकडे नोकरी करताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला होता दरमहा ५ रुपये! पाच वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्या वेळी शिंदे यांचा पगार होता दरमहा १८ रुपये. पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले, तर त्याला निश्चितच भोवळ येईल. पण त्या काळच्या स्वस्ताईच्या जमान्यात एवढे पैसेही पुरेसे होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९२३ पासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते. मुंबईतील कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते. त्यांचे व फाळक्यांचे अनेकदा मतभेद होत. त्याचमुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत आले होते. मात्र तिसर्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा तिथे कधीही फिरकले नाहीत. ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले, त्यात वसंत शिंदेही होते. ते वर्ष अदमासे १९२८-२९ असे असावे. सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. पोट भरण्यासाठी हातपाय तर हलवायला हवे होते. नियतीने त्यांना या वळणावर नेऊन सोडले पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीत. लहान मुलांसाठी नाटके करणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्योग. बालमोहनचे मालक होते दामूअण्णा जोशी.
वसंत शिंदे ज्या वेळी या कंपनीत गेले, तेव्हा तिचीदेखील ती सुरुवातच होती. संस्थेने तोवर एकही नाटक बसवलेले नव्हते. सगळी जमवाजमव सुरू होती. त्या दोन महिन्यांच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटय़ाला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही. त्यामुळे ते अखेर वैतागून पुन्हा नाशिकला परतले. ११ ऑगस्ट १९२९ रोजी स्थापन झालेल्या अरुणोदय नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडाव होता. या नाटय़मंडळीत त्यांनी चार वर्षे काढली. त्या कालावधीत गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले. त्यामुळे एक नाटय़कलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळू लागली. त्या वेळी नाटकमंडळ्यांचे संसारही अल्पजीवीच असायचे. अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यानंतर वसंत शिंदे यांची पावले वळली ती नवजीवन संगीत मंडळीमध्ये. मोराचा नाच, व्याही-विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली.नाटक-चित्रपटाचा व्यवसाय एकूण अस्थिरच.
नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या ‘आनंद व्यंगपट’ या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचीही नोकरी केली. आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते. विवाहानंतर सांसारिक जबाबदाऱयांतही वाढ झाली होती. १९४१च्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करते झाले. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे. ‘भावबंधन’मधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यांना पुढे ‘कामण्णा’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. दिनकर ढेरेंनंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची भूमिका मुळाबरहुकूम करून गाजवली. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रेमसंन्यास’मधील गोकुळ, ‘राजसंन्यास’मधील जिवाजी कलमदाने अशा काही भूमिका केल्या. राजाराम संगीत मंडळीनंतर ‘ललित कला कुंज’च्या नाटकांत काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला मोहरा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला. बोलपटांची एव्हाना चलती सुरू झालेली होती. वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित ‘मायाबाजार’.
१९३९ मध्ये झळकलेल्या या चित्रपटात त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती. १९४६मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘सासुरवास’मध्ये सुभान्याच्या भूमिकेत वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले. त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. १९२४ ते १९२९ या काळात त्यांनी १९ मूकपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९३९ पासून ते १९९६पर्यंत १९०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्याशिवाय सात हिंदी चित्रपटांतही कामे केली. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले, तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांत प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते. अशाच अप्रदर्शित राहिलेल्या नऊ चित्रपटांतही वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या. पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही. वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाटय़ कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा सुमारे ५७ लोकनाटय़ांतून वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या होत्या. विनोद, कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते.
माधवराव जोशी, आचार्य अत्रे, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्यंकटेश माडगूळकर आदी सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या. त्यांनी १०५ नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगडय़ाची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवलेली आहे, असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे. पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येईल. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तेवढेच रंगून जात. सुमारे ७५ वर्षे मूकपट, नाटके, बोलपट यांच्यात वसंत शिंदे यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली.
वसंत शिंदे यांच्या वर ‘विनोदवृक्ष’ हे मधू पोतदार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ‘विनोदवृक्ष’ या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना शरद तळवलकर यांनी म्हटले होते, ‘वसंत म्हणजे ऋतूंतला श्रेष्ठ ऋतू! सृष्टीचे वातावरण त्या वेळी प्रसन्न असतं. तेच नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले. त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावांवर येऊन पडली असं म्हणायला हरकत नाही.’ वसंत शिंदे यांचे ४ जुलै १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / समीर परांजपे
‘विनोदवृक्ष’ या पुस्तकाची लिंक
http://erasik.com/productdetails/PROD150300028501
इ.स. १९०८ साली त्यांनी ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक रंगभूमीवर ७ सप्टेंबर १९१८ रोजी आलेले ‘ हाच मुलाचा बाप ‘ हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली आणि लेखनावरच लक्ष एकवटले.
शाहिद कपूरचा मुंबईत पंजाबी कुटुंबात जन्म झाला. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी झाला.बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर आणि अभिनेत्री व शास्त्रीय नर्तिका नीलिमा हे शाहिद कपूरचे आईवडील. शाहिदने लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पर्दापण केले होते. एक उत्कृष्ट अभिनेत्याशिवाय तो उत्तम डान्सरदेखील आहे. शाहिद ३ वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले होते. यानंतर तो आपल्या आईसोबत दिल्लीत आजी-आजोबांसोबत राहू लागला. मोठा झाल्यानंतर त्याने मुंबई वापसी केली. मुंबईत आल्यानंतर तो कोरिओग्राफर शामक दावरच्या डान्स अकॅडमीत सहभागी झाला. नव्वदच्या दशकात शाहिदने काही सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. त्यानंतर तो म्युझिक व्हिडीओंसहीत काही जाहिरातींमध्येही झळकला. शाहरुख खान, काजल आणि राणी मुखर्जीसोबत केलेली 'पेप्सी'ची त्याची पहिली जाहिरात. यानंतर तो किट-कॅट, ओनिडा टीव्ही वगैरेसारख्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसला होता. सुभाष घई यांनी शाहिदला डान्स करताना पाहिले आणि त्याचा डान्स आवडल्यानंतर त्यांनी 'ताल'मध्ये या आपल्या सिनेमात शाहिदला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून घेतले. ‘कहीं आग लगे लग जावे’ या गाण्यात शाहिदने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत डान्स केला. यानंतर २००३ मध्ये आलेला रोमँटिक कॉमेडी ‘इश्क विश्क’ सिनेमातून शाहिदनं ख-या अर्थानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमासाठी शाहिदला फिल्मफेअरच्या 'बेस्ट मेल डेब्यू' अवॉर्डने गौरवण्यातही आले. २००५ मध्ये शाहिद कपूर, करीना कपूर आणि फरदीन खानचा 'फिदा' हा सिनेमा आला होता.
या सिनेमाच्या निमित्ताने करीना आणि शाहिद एकमेकांच्या जवळ आले. सुरज बडजात्या यांच्या 'विवाह' सिनेमातील 'प्रेम' या भूमिकेमुळे शाहिदला आणखी लोकप्रियता मिळाली. या सिनेमामुळे शाहिदची वेगळीच प्रतिमा चाहत्यांमध्ये निर्माण झाली. शाहिद आणि करीनाचा 'जब वी मेट' सिनेमाला सिनेरसिकांनी भरभरुन प्रेम दिलं. हा सिनेमा सुपर-डुपर हिट ठरला. मात्र, या वर्षी शाहिद आणि करीना यांच्या नात्यात कटुता आली आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' सिनेमाने शाहिदची इंडस्ट्रीमधील इमेज बदलली. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि सिनेमाला अवॉर्डसही मिळाले. यामध्ये शाहिदने डबल रोल साकारला होता. करीना कपूरसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर शाहिदने मीरा राजपूतसोबत २०१५ मध्ये लग्न केले. शाहिद आणि मीरा या नावाहून त्यांनी आपल्या मुलीचे नाव मीशा असे ठेवले. शाहिदने आतापर्यंत जवळपास ७५-८५ सिनेमांमध्ये काम केले आहे. यातील अनेक सिनेमे हिट झाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ठाणे स्कुल ऑफ आर्टच्या प्राचार्य, चित्रकार व नृत्यांगना निलिमा भालचंद्र कढे म्हणजे ठाणे शहराला अभिमान असणारे कलाकार व्यक्तिमत्व त्यांनी सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून कलाक्षेत्रातील शिक्षण घेतलं. कला, वाणिज्य, विज्ञान, मेडिकल, इंजिनियरिंग, एम.बी.ए. इत्यादी सर्व शिक्षण शाखांची सोय उपलब्ध असलेल्या ठाणे शहरात चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्याची मात्र सोय नव्हती.
Copyright © 2025 | Marathisrushti