(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल

    पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल यांचा जन्म १५ जून १९५० रोजी सादुलपूर, राजस्थान येथे झाला.

    लक्ष्मी मित्तल हे ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत भारतीय समजले जातात. लक्ष्मी मित्तल यांचे शालेय शिक्षण कोलकाताच्या श्री दौलतराम नोपानी स्कूल मध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये झाले. तेथे त्यांनी बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या 'ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स' या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत. त्या काळी लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी ‘मित्तल इस्पात’ असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला. इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले. मित्तल बंधूंमध्ये १९९४ साली संपत्तीची वाटणी झाल्यानंतर दोन वेगळे उद्योग समूह अस्तित्वात आले होते. त्यानंतर लक्ष्मी मित्तल यांनी २००६ ‘आर्सेलर मित्तल’ची स्थापना केली. सध्या लक्ष्मी मित्तल ‘आर्सेलर मित्तल’चे सीईओ व चेयरमेन काम बघत आहेत. २००७ मध्ये भारत सरकारने लक्ष्मी मित्तल यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच २००८ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना फोर्ब्ज मासिकाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. २०१३ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना ‘चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे इंग्लिश फुटबॉल क्लब 'क्वींस पार्क रेंजर्स'ची ३३ % मालकी आहे.

    अमेरिकेतील ‘केल्लोग्स स्कूल ऑफ मैनेजमेंट’ च्या सल्लागार बोर्डवर व 'क्लीवलैंड क्लिनिक' च्या 'बोर्ड ऑफ ट्रस्टीज' चे सदस्य लक्ष्मी मित्तल राहिले आहेत.२००३ मध्ये लक्ष्मी मित्तल व त्यांच्या ऊषा मित्तल फाउंडेशनने राजस्थान सरकार बरोबर जयपुर मध्ये 'एल.एन.एम. इंस्टीट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी' ची स्थापना केली आहे.

    लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नीचे नाव उषा मित्तल आहे. उषा मित्तल या फारच हुशार असल्याचे बोलले जाते. आपल्या पतीच्या व्यवसायात त्यांना त्या नेहमी मदत करत असतात. उषा मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगले काम उभे केले आहे. त्यांचे चिरंजीव हे त्यांच्या बरोबरच आदित्य मित्तल या व्यवसायात आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी स्टालिन

    तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीअसलेले स्टालिन यांचं पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टालिन आहे. सोव्हिएत संघ युनियनचे प्रसिद्ध नेते जोसेफ स्टालिन यांच्या नावावरुन एम. के. यांच्या नावामागे स्टालिन लावण्यात आलं. स्टॅलिन हे एम. करुणानिधी आणि त्यांची दुसरी पत्नी दयालू अम्मल यांचे चिरंजीव होत.

  • सचिन मुळाणे

    अस्सल महाराष्ट्रीय वडापाव आणि भारतीय खवय्येगिरीची आठवण देणारी कुल्फी, बर्फाचा गोळा या गोष्टींनी लंडनमध्येही धडक मारली. स्वस्त दरांच्या स्पर्धेला तोंड देत आपल्या गुगली रेस्तरॉंद्वारे नाशिकच्या सचिन मुळाणे या मराठी तरुणाने लंडनवासियांना अस्सल भारतीय लज्जतीने भुरळ पाडली आहे.

    सचिन मुळाणे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मराठी तडका हा लेख पुढील पानावर वाचा.

    सचिन मुळाणे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मराठी तडका हा लेख वाचा.

    mulane-sachin-modified

  • गायिका मंजुश्री ओक

    पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये १२२ भारतीय भाषांमधील गाणी सलग १३ तासांच्या कार्यक्रमात सादर केली. भारतात बोलल्या जाणाऱ्या ७८० भाषांपैकी अनुसूचित (शेड्युल्ड) असलेल्या २२ भाषा, नॉन शेड्युल्ड प्रकारच्या ३४ भाषा, तसेच उपभाषा, बोलीभाषा व मातृभाषा प्रकारातील ६४ भाषांमधील गीते या कार्यक्रमासाठी निवडण्यात आली होती. महाराष्ट्रातील आदिवासी भाषांमधील काही नवीन गाण्यांचाही अंतर्भाव करण्यात आला होता. ईशान्य भारतातील दुर्लक्षित ४१ भाषा, तसेच काश्मीरमधील व अगदी निकोबारी भाषेचाही यात समावेश होता.

  • प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर

    आज १५ सप्टेंबर..आज मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांची जयंती

    जन्म:- १५ सप्टेंबर १९२१

    दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणार्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली. दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृ त नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञान शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली. दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. मा.दाजी भाटवडेकर यांचे २६ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.दाजी भाटवडेकर यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- विकीपीडीया

    दाजी भाटवडेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यातील त्यांची भूमिका

    एकच प्याला (सुधाकर), कृष्ण द्वीप (हिंदी), दुर्गा (जिवाजीराव), मानापमान (लक्ष्मीधर, विलासधर), मृच्छकटिक (शकार), बॉर्न येस्टरडे (इंग्रजी, दिग्दर्शक - हर्बर्ट मार्शल), भाऊबंदकी (तुळोजी, राघोबा, सखाराम बापू), भावबंधन (घनश्याम, धनेश्वर, मोरू), म्युनिसिपालिटी (पांडोबा), लग्नाची बेडी ( कांचन, गोकर्ण, तिमिर), शारदा ( कांचनशेट, भद्रेश्वर), संशयकल्लोळ (फाल्गुनराव, वैशाखशेठ), सौभद्र (बलराम)
    स्वयंवर (रुक्मी).

  • मराठी व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले

    “शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले.

  • सौरभ रामदास सांगवेकर

    जलतरण क्रीडाप्रकारात ठाण्याचे नाव मोठं करण्यात वाटा असलेला सौरभ सांगवेकर हा जलतरणपटू म्हणजे अनवाटांनी जाऊनही आपल्या आयुष्याचं ध्येय गाठणारा ध्येयवादी आहे.

  • (डॉ.) श्याम भास्करन

    जपानने अंतराळात पाठवलेली हयाबुसा ही अंतराळ कुपी ऑस्ट्रेलियातील वूमेरा तळावर उतरली, त्यावेळेस जपान आणि अमेरिकेबरोबरच मुंबईतही जल्लोष साजरा झाला. कारण या अंतराळ कुपीच्या परतण्यामध्ये एका भारतीय वैज्ञानिकाचे यश सामावलेले होते. या वैज्ञानिकाचे नाव डॉ. श्याम भास्करन. ४६ वर्षांचे असलेल्या डॉ. भास्करन यांचा जन्म मुंबईत माटुंगा येथे झाला. बालपण मुंबईतच गेले. हा लहान मुलगा त्याहीवेळेस रात्री आकाशाकडे डोळे लावून बसलेला असायचा, अशी आठवण श्यामचे वडील गोिवदन सांगतात.

    हा मुलगा आता जगभरातील अनेक महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांचा दिशादर्शक ठरला आहे. काही वर्षांपूर्वी नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल एक महत्त्वाची शोधमोहीम हाती घेतली होती. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा ठरणारा पाण्याचा अंश आणि प्रत्यक्ष जीवदेखील पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणातून आले असावेत, असे संशोधकांना वाटते आहे. या दोन्ही महत्त्वाच्या बाबी अशनी - धूमकेतूच्या शेपटा- तून आल्या असाव्यात असा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची नेमकी माहिती घेण्यासाठीच डीप इम्पॅक्ट ही मोहीम नासातर्फे हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत यान थेट टेम्पल- वन या धूमकेतूवर ३६ हजार ८०० प्रति तास या वेगाने हे यान आदळवण्यात आले.

    धूमकेतूचा वेग आणि यानाचा वेग याचे गणित करून ही मोहीम पार पाडण्यात आली. ही सारी योजना फत्ते करण्यात डॉ. भास्करन यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र त्यावेळेस त्यांच्या नावाची फारशी चर्चा झाली नाही. आताची ही मोहीमदेखील डीप इम्पॅक्टपेक्षा अधिक नेमकेपणाची गरज असलेली होती. म्हणूनच जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने त्यासाठी नासाची मदत मागितली. या मोहिमेमध्ये अंतराळ कुपी प्रत्यक्ष एका अशनीवर उतरणार होती आणि त्यावरील अनेक नमुने गोळा करून कुपीच्या माध्यमातूनच ते पृथ्वीवर आणले जाणार होते. अशनीवरून गोळा केलेल्या या नमुन्यांवरून भविष्यात संशोधन केले जाणार असून त्यामुळे पृथ्वीची निर्मिती आणि भूतलावरील जीवाचे अस्तित्व या सर्व बाबींची उकल होणे अपेक्षित आहे.

    अशनीवर उतरण्यासाठी नेमकेपणा खूप गरजेचा होता. म्हणूनच नासाने जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेला डॉ. भास्करन यांच्या नेतृत्त्वाखालील चमू मदतीसाठी दिला. डॉ. भास्करन सध्या नासाच्या आऊटर प्लॅनेटस् नेविगेशन ग्रुपमधील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी नासाने हाती घेतलेल्या अनेक मोहिमांमधील नेविगेशन टीमचे नेतृत्व त्यांनी यशस्वीरीत्या केले आहे. जपानने हाती घेतलेल्या या मोहिमेला सुमारे सात वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती. ही अंतराळ कुपी हयाबुसा गेली सात वर्षे फिरतेच आहे. २५ नोव्हेंबर २००५ रोजी ही अंतराळ कुपी इटोकोवा या अशनीवर यशस्वीरीत्या उतरली. सुमारे ३० मिनिटे ती त्यावरच होती. त्या काळात गोळा केलेले नमुने घेऊन ही कुपी आता परत आली आहे. या कुपीने आणलेले नमुने भविष्यातील संशोधनासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या मोहिमेचे सर्व यश हे कुपी यशस्वीरीत्या परत येण्यामध्ये आहे. त्याची प्रमुख जबाबदारी नेविगेशन करणाऱ्या डॉ. भास्करन यांची होती.

    कुपी वळविण्यासाठी हायड्रेझाईन इंधन वापरले जाते. मात्र तेच संपुष्टात आल्याने या मोहिमेच्या यशस्वितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या शिवाय त्याचा समतोल साधणाऱ्या यंत्रणेमध्येही तीन बिघाड निर्माण झाले होते. त्यामुळे अशनीपर्यंत मजल मारून यशस्वी ठरलेली ही कुपी परत येणार का, असा प्रश्न होता. मात्र डॉ. भास्करन यांनी कसब पणाला लावले आणि मोहीम यशस्वी करून दाखवली. गेली ११ वर्षे डॉ. भास्करन नासाच्या जेट प्रोप्लशन लॅबोरेटरीमध्ये कार्यरत आहेत. याच ठिकाणी त्यांचा नेविगेशन ग्रुप काम करतो. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवातच गॅलिलोओ मिशनपासून केली. मंगळाच्या ओडिसी मिशनमध्येही त्यांचा मोलाचा सहभाग होता. डीप स्पेससाठी त्यांनी नवीन नेविगेशन यंत्रणाच विकसित केली होती.

    टेक्सास विद्यापीठातून त्यांनी बी. एस. व एम. एस. केले तर पी. एचडी कोलोरॅडो विद्यापीठातून पूर्ण केली. भारताचे चांद्रयान-एक अंतराळात झेपावले त्याहीवेळेस ते नासाच्या चमूचे सदस्य या नात्याने बंगळुरूला उपस्थित होते. सध्या ते अमेरिकेत असले तरी आयुष्यातील अनेक चांगल्या आठवणी या मुंबईमध्ये पेडर रोडवरील बीएआरसीच्या केनिलवर्थ या निवासी संकुलाशीच संबंधित असल्याचे ते अभिमानाने सांगतात. मुंबईकरांनाही त्यांचा अभिमान आहेच!

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंत

    ‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात ३७ हिंदी , ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे डेहराडून येथे प्रारंभीचे शिक्षण झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली व नंतर हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथे त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. १९४८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले व साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. राज कपूर अभिनित सुनहरे दिनचे ते साहाय्यक दिग्दर्शक होते.

    तसेच त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उदा., फणी मजुमदार दिग्दर्शित बादबान व धोबी डॉक्टर. बहुहा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला कथाचित्रपट होय. त्यानंतर त्यांनी इन्स्पेक्टर, शेरु, डिटेक्टिव्ह व हिलस्टेशन हे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वतःची चित्रपटनिर्मिती संस्था १९५७ मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या निशाणाखाली त्यांनी हावडा ब्रिज हा पहिला चित्रपट निर्माण केला. त्याने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले.

    त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये हावडा ब्रिज, चायना टाऊन, काश्मीर की कली, ॲन इव्हनिंग इन पॅरिस, आराधना, कटी पतंग, अमर प्रेम इ. उल्लेखनीय आहेत. एकच चित्रपट दोन भाषांत (हिंदी व बंगाली) निर्माण करण्याचा प्रयोग प्रथमतः करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी अमानुष हा चित्रपट हिंदी व बंगाली या दोन्ही भाषांत १९७४ मध्ये निर्माण केला. भारत व बांगला देश यांच्या संयुक्त विद्यमाने, सहनिर्मिती असलेला पहिला चित्रपट सामंतांनी १९८४ मध्ये बनवला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सामंतांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्ना यांना नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले. त्यांपैकी आराधना, कटी पतंग व अमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले.

    राजेश खन्नाला सुपरस्टार पदावर पोहोचवण्यात या चित्रपटांचा मोलाचा वाटा होता. आराधना ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. शर्मिला टागोर यांनी ‘अॅ्न इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घातली आणि प्रचंड खळबळ उडवून दिली. चित्रपटाची नायिका ही पॅरिससारख्या ठिकाणी स्वत:च्या जीवावर युरोपभर प्रवास करत असल्याने तिचे अत्याधुनिक असणे अटळ होते. साहजिकच ही बिकिनी अत्यंत वेलस्क्रिप्टेड होती आणि मा.शक्ती सामंत या दिग्दर्शकाने ती अत्यंत योग्य रितीने शूट केली होती. ‘अमर प्रेम’ मधील ‘चिंगारी कोई भडके...’ या गाण्याचे शुटिंग कोलकता येथील हावडा ब्रिजखाली असलेल्या पाण्यामध्ये एका जहाजात करायचे, अशी योजना ठरली परंतु दिग्दर्शक मा.शक्ती सामंत यांना राजेश खन्नाच्या लोकप्रियतेची जाणीव होती. लोकांची हावडा ब्रीजवर एवढी गर्दी जमेल की, तो ब्रीज तुटेल अशी भीती त्यांना वाटली त्यामुळे त्यांनी एका स्टुडिओमध्ये हावडा ब्रीजचा सेट उभारुन शुटिंग करण्याचे ठरवले.

    काश्मीर की कलीपासून सामंत रंगीत चित्रपटनिर्मितीकडे वळले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय चित्रपटांत जाने-अन्जाने, मेहबूबा, आनंद आश्रम, अनुरोध, बरसात की एक रात व अलग अलग इत्यादींचा समावेश होतो. अतिरंजित भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत, लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही त्यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची बलस्थाने होत. सामंतांच्या पत्नी व त्यांचे बंधू त्यांच्या काही चित्रपटांचे निर्माते होते. त्यांचा मुलगा अशीम सामंत याने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट त्यांनी निर्माण केले. १९८५ मध्ये त्यांच्या शक्ती फिल्म्स संस्थेने ‘आराधना साऊंड सर्व्हिस’ ही ध्वनिसेवा सुरु केली. मुंबईच्या बॉलिवुड व पाश्चात्त्य हॉलिवुडमध्ये तयार झालेल्या काही चित्रपटांना या यंत्रणेने ध्वनिसेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या हावडा ब्रिज, आराधना आणि बरसात की एक रात या अभिजात चित्रपटांचे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे ॲनिमेशन फिल्ममध्ये रुपांतर करण्यात आले.

    सामंत यांना आराधना, अनुराग व अमानुष ह्या चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’ चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांना ‘झी’ वाहिनीतर्फे ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ एकूण चित्रपट कारकीर्दीसाठी देण्यात आला. त्यांचे काही चित्रपट बर्लिन, ताश्कंद, मॉस्को, कैरो, बैरुत इ. ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून दाखवले गेले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट-प्रमाण मंडळाचे अध्यक्ष तसेच कोलकात्याच्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ चे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. शक्ती सामंत यांचे ९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • क्रांतिसिंह नाना पाटील

    क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव) येथे झाला.

    ‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार व पारतंत्र्यात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते नाना पाटील हे ‘येडे मच्छिंद्र’ येथेच व्हर्नाक्युलर फायनल ही त्या काळी असणारी मराठी सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. तेव्हा त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव होता नंतर ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले.

    नोकरी सांभाळत त्यांनी गावोगावी सभा घेऊन समविचारी तरुणांच्या संघटना बांधल्या. ते आपले भाषण रोजच्या व्यवहारातील दाखले, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी शैली, विनोदाची पेरणी यांच्या आधारावर प्रभावी करत. त्यामुळे ते साहजिकच लोकप्रिय वक्ते झाले. त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्याचवेळी ( १९३० मध्ये) म.गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चालवलेल्या असहकाराच्या चळवळीने त्यांना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आणले. त्यांनी असहकाराच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक कॉंग्रेस कमिटीमध्येही कार्यकर्ते म्हणून त्यांची निवड केली गेली. ‘छोड़ो भारत’ या कॉंग्रेसच्या घोषणेनंतर देशभर उठाव झाला. इतर कालखंडांतील चळवळीपेक्षा अगदी वेगळ्या लढ्याचा, तंत्राचा, पुढारीपणाचा आणि विचारांचा आविष्कार त्यावेळी झाला होता. त्याच क्रांतिकारक आविष्काराचे नवीन प्रतीक म्हणजे – पत्रीसरकार!

    समांतर सरकार सातारा, सांगली, वाळवे या भागात शेतकरी गढ्यांमध्ये उभे राहिले (तशाच प्रकारचा पण जरासा निराळा प्रकार बंगालच्या मिदनापूर भागात उभा झाला होता). त्याचे प्रतीक होते नाना पाटील. म्हणून ते ‘क्रांतिसिंह’ नाना पाटील असे ख्यातनाम झाले. स्वातंत्र्यचळवळीच्या नवीन प्रकाराची व प्रतीकाची अशी काही अपूर्व चिन्हे होती, की त्याने महाराष्ट्र मनाची चांगलीच पकड घेतली होती. पहिले म्हणजे सत्याग्रह, अहिंसा वगैरेंची गांधीवादी बंधने पत्री सरकारने गुंडाळून बाजूला ठेवली होती. दुसरे, त्यांनी स्वत:ला ‘सरकार’ म्हणून जाहीर केले आणि ‘मावळ’ प्रांतातील गढ्यांतून ब्रिटिश राजवट संपली असा अंमल बसवला.

    तिसरे, स्वत:ला ‘सरकार’ म्हणून घोषित केल्यावर आपली स्वतंत्र अशी हत्यारी सेना असावी लागते, म्हणून पत्रीसरकारने अशी ‘हत्यारबंदी’ उभी केली. भाले-बरच्या, लाठी-काठीपासून ते बंदुकीपर्यंत. चौथे, ‘सरकार’ चालवायला पैसा लागतो. त्यासाठी इंग्रजांचे खजिने लुटले(उदाहरणार्थ, धुळ्याचा दरोडा) आणि पाचवे म्हणजे या ‘सरकार’चा मुख्य पाया शेतकरी हा झाला होता. त्यामुळे शेतकरी विमोचनाचे काही प्रश्न ताबडतोब सोडवण्यात आले. सावकारी व मोठ्या जमीनधारकांची गुंडगिरी नष्ट केली गेली होती. त्यांना साहाय्य करणार्या गावगुंडांचा नि:पात केला गेला होता. त्यांना शिक्षा देण्यात आल्या होत्या. शिक्षेचा एक प्रकार ‘पत्री मारणे’ हा होता. अनेकांना गोळ्या घालून देहदंडही करावा लागला होता. त्यामुळेच या ‘सरकार-सत्ते’ला खरा लढाऊ, विश्वासू ‘मास बेस’ लाभला होता. तेथूनच नानांना ‘क्रांतिसिंह’ हे बिरुद्ध चिकटले.

    क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या घरादाराकडे पाठ फिरवली ती १९३० साली, तीही कायमची. त्यांची पत्नी तारुण्यात निधन पावली. त्यांनी पुन्हा लग्न न करता देशाचा संसार हा आपला संसार मानला.

    नाना पाटील १९४२ च्या क्रांतीपू्र्वी एकूण आठ वेळा तुरुंगात गेले होते. पण १९४२ च्या ८ ऑगस्टच्या ‘करेंगे या मरेंगे’ या महात्मा गांधीच्या आदेशानंतर नाना पाटील व त्यांच्या सहकार्यांानी ‘आता पोलिसांच्या ताब्यात जायचे नाही’ असे ठरवले. महात्मा गांधी यांनीच ‘करेंगे या मरेंगे’ या आदेशानंतर सांगितले होते, की जर राष्ट्रीय नेते तुरुंगात गेले तर प्रत्येक भारतीयाने स्वत:स स्वतंत्र समजून आपल्या स्वत:च्या बुद्धीला पटेल त्यानुसार इंग्रजांना घालवून देण्याची चळवळ उभारावी. त्याप्रमाणे नाना पाटील यांनी १९४४ मध्ये त्यांची व महात्मा गांधींची पाचगणीस भेट झाली तेव्हा त्यांना आपल्या ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले.

    त्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, सातार्या्ने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात. भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शुराची हिंसा परवडेल असे मानणारा मी आहे.’ . प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

    या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

    नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.

    १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.

    नाना पाटील यांच्या या ‘प्रतिसरकार’चे लष्करी व पोलिसी अंग म्हणजे ‘तुफान सेना’ हे होते. जर्मनीच्या हिटलरची ‘storm troopers’ व नेताजी सुभाषचंद्र यांची ‘आझाद हिंद सेना’ हे लष्करी संघटनांचे आदर्श समोर ठेवून नाना पाटील व त्यांचे सहकारी जी.डी. लाड, अप्पासाहेब लाड, नागनाथ नायकवडी, राजुताई पाटील इत्यादींनी ‘तुफान सेने’ची निर्मिती (१९४३-४४) केली. जी.डी. लाड हे ‘तुफान सेने’चे फिल्ड मार्शल होते. ‘तुफान सेने’च्या सैनिकांपुढे त्या काळच्या अनेक नामवंतांची व्याख्याने व बौद्धिके होत असत. अच्युतराव पटवर्धन व साने गुरुजी यांचेही मार्गदर्शन ‘तुफान सैनिकां’ना झालेले आहे अशी आठवण भाई भगवानराव पाटील यांनी सांगितली आहे.

    नाना पाटील भूमिगत अवस्थेत ज्या ज्या मंडळींकडे आश्रयाला असत तेव्हा ते त्यांना सांगत, की ‘माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर मला लगेच पुरून टाका. फक्त सुरेशबाबूंस सांगा. (म्हणजे नाथाजी लाड. ते क्रांतिसिंहांचे चिटणीस होते. तसेच १९४२च्या लढ्यातील भूमिगत नेतेही होते. त्यांचे भूमिगत अवस्थेतले टोपणनाव) चळवळीतील इतर कोणासही ते कळता कामा नये. चळवळ जिंवत राहिली पाहिजे.’
    मुंबईचे प्रख्यात असे बंड म्हणजे आपल्या आरमाराचे.

    नाविकांच्या संपाचे, फेब्रुवारी १९४६ मधील; त्या दिवशी मुंबईच्या कम्युनिस्ट पक्षाने सार्वत्रिक संपाची हाक दिली. त्या वेळेस मुंबईतही क्रांतिसिंह यांच्या ‘पत्रीसरकारची’ झाक येऊन गेल्याची आठवण कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी सांगितलेली आहे. ‘पत्रीसरकार’च्याच विरुद्ध कॉंग्रेस सत्तेने संपूर्ण सत्तांतर व्हायच्या अगोदरच पत्री मारून हुकूम काढला, की हत्यारे ताबडतोब सरकारजवळ द्या, नाहीतर सरकारी फौज पाठवू. एवढ्यावरच न थांबता काहींना बेरड, दरोडेखोर, खूनी ठरवून फाशी देण्यात आले. असे डांगे यांनी १२ डिसेंबर १९७६ च्या साप्ताहिक ‘युगांतर’मध्ये लिहिले आहे.

    पुढे, नाना पाटील व त्यांच्या मित्रांनी ‘शेतकरी कामगार पक्षाचे’ स्वरूप घेतले. नंतर ते कम्युनिस्ट पक्षातही दाखल झाले. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथ अण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
    नाना पाटील सातारा व बीड या मतदारसंघातून अनुक्रमे १९५७ व १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकींतून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्त्व केले. दादासाहेब गायकवाड यांनी उभारलेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहाला मदत केली.

    नाना पाटील सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा चळवळींमध्ये अखेरपर्यंत कार्यरत राहिले. नाना पाटील यांचे ६ डिसेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट