(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • अरुण फडके

    अरूण फडके हे ठाण्यामधील नावाजलेले शब्दकोशकार व व्याकरणतज्ज्ञ आहेत.

  • अनंत जनार्दन करंदीकर

    पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म ३० डिसेंबर १९०१ रोजी झाला.

    वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनदर्शन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुध्द पूर्वार्ध हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.

    ## Anant Janardan Karandikar

  • जेष्ठ मराठी अभिनेत्री शुभांगी जोशी

    आपल्या अतिशय सहज अभिनयाने घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी या टीव्हीवरची लाडकी आजी म्हणुन प्रसिध्द होत्या.

  • मोदकांनी भारतीताईना उद्योजिका बनवलं……

    बाप्पानेच मला ही संधी दिली. आजही तोच ताकद, हिम्मत देतो आणि समाधानही!

    गणेश चतुर्थीला विशेष मान असतो तो उकडीच्या मोदकांचा. अकरा किंवा एकवीस मोदकांचा हा नैवेद्य देवाला दाखवायचा तर तो ताजाताजाच असायला हवा शिवाय एकाच आकाराचा, एकाच चवीचा हवा. ते काम अति कौशल्याचं. मग हे मोदक आयते हातात मिळाले तर? पुण्याच्या भारती मेढी दरवर्षी गणेश चतुर्थीला तब्बल २० हजार मोदक तयार करतात आणि मुंबई, पुण्यातल्या अनेक घरांत रवाना करतात. गणपतीबाप्पांच्या नैवेद्यात सामील होणाऱ्या या मोदकांनी भारतींना उद्योजिका बनवलं. त्याविषयी..

    बाप्पाचा सण त्याच्या लाडक्या मोदकांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. गणेश चतुर्थीला विशेष मान असतो तो उकडीच्या मोदकांचा. तांदूळ धुऊन वाळवून दळायचे, उकड काढायची, एकीकडे सारण करायचं मग पाकळ्यापाकळ्यांनी कळीदार मोदक करायचे. मग ते उकडून घ्यायचे. जेव्हा हे वाफाळते मोदक प्रसादाच्या रूपाने केळीच्या पानावर मांडले जातात तेव्हा कुठे सुगरणीच्या मनाला शांतता मिळते आणि समाधानही. असे मोदक बनवणं म्हणजे अगदी सोनारकाम. एक ग्रॅम इकडचं तिकडे झालं तरी चालायचं नाही. एकीकडे बाप्पासाठी फक्त २१ मोदक करताना आपली धावपळ होते, पण पुण्याच्या भारती मेढी मात्र तब्बल २०,००० मोदक करतात. तेही गणपतीच्या पहिल्या दिवसासाठी. पुण्यात कर्वेनगरला त्यांचा मोदकांचा एक लहानसा कारखानाच आहे. त्यांच्या ‘ओम चैतन्य कॅटिरग’तर्फे त्या मोदकांची ही उलाढाल करतात. यंदा मोदकांचा हा आकडा ३० हजार करण्याचा त्यांचा मानस आहे.

    मोदकांचा हा विक्रमी आकडा काही एका दिवसात आलेला नाहीच. त्यामागे आहे प्रचंड मेहनत आणि बचतगटाची कमाल. अगदी ६-७ वर्षांपूर्वी भारती मेढी या गृहिणीला वाटलंही नव्हतं की आपण चतुर्थीला जे मोदक बनवतो तेच आपल्याला एक नवी ओळख देणार आहेत. त्याचं कारण झालं बचत गट! त्यांनी बचत गटात जायला सुरुवात केली. एक दिवस बचत गटातून एक नवं आव्हान मिळालं. प्रत्येकीनं आपल्याला जमेल असा पदार्थ करून आणायचा. भारती कोकणातल्या, साहजिकच त्यांनी उकडीचे मोदक केले. नेहमीप्रमाणे ते फर्मास झाले होतेच. मग त्यांच्या मॅडमनी सांगितलं, ‘‘आपण भीमथडी जत्रेत स्टॉल लावायचा.’’ ही जत्रा म्हणजे बचत गटातल्या महिला वर्गाचं एक स्नेहसंमेलनच असतं म्हणा ना. इथे अनेक स्टॉल्स लागतात, विक्री होते. विक्री, ग्राहकांशी संवाद, स्टॉलची मांडणी या सगळ्या गोष्टींवर बक्षीसंही मिळतात. या मानाच्या जत्रेत भारतींनी आणि त्यांच्या मोदकांनी चक्क पहिला क्रमांक पटकावला. त्यांच्या मोदकांना ग्राहक पहिली पसंती देतात खरं, पण हा स्टॉल लावणं काही सोपं नव्हतं. अशा प्रकारे घराबाहेर जाऊन काम करायला त्यांच्या पतीचा सक्त विरोध होता. पण सासूबाईंचा, सुशीलाबाईंचा पाठिंबा होता. दोघींनी विरोधाला न जुमानता, जिद्दीने स्टॉल उभारला आणि यश मिळवलंच. त्या यशाने त्यांच्यातला आत्मविश्वास इतका वाढला की, भारतींनी मोदकांच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. हळूहळू मोदक, पुरणपोळ्या आणि इतरही पदार्थाच्या ऑर्डर्स त्या घेऊ लागल्या. अर्थात म्हणून त्यांनी भीमथडी जत्रेत स्टॉल लावणं थांबवलेलं नाही. दरवर्षी त्या स्टॉल लावतात आणि पुरस्कारही मिळवतात.

    या पुरस्कारानेच त्यांना २०११ मध्ये व्यवसाय व्यवस्थापनाचा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम करण्याची संधीही दिली. या अभ्यासक्रमाने काय दिलं, याबद्दल भारती म्हणतात, व्यवसाय म्हणजे काय? तो कसा करायचा? विक्री कशी करायची? किंमत कशी ठरवायची? मुख्य म्हणजे माणसांकडून काम कसं करून घ्यायचं? हे सगळं मी इथे शिकले. आम्ही गृहिणी. त्यामुळे कामाची सवय होती पण काम करून घ्यायचं माहिती नव्हतं. या अभ्यासक्रमात माणसांकडून काम कसं करून घ्यावं हे समजलं. यामुळे कामात अधिक सुसूत्रता आली, वेळ वाचला. कामाचा व्याप हळूहळू वाढत गेला. त्यानंतर भारतींनी व्यवसायासाठी विविध यंत्रसामग्रीही घेतली. आता त्यांच्याकडे नारळ खवायला, सारण शिजवायला, पीठ मळायला आणि मोदक उकडण्यासाठीही यंत्रं आहेत. पण मोदकांच्या बाबतीतली अत्यंत महत्त्वाची आणि कौशल्याची गोष्ट म्हणजे मोदक करणं. हे काम मात्र हातीच होतं, कारण त्याची एक एक पाकळी करून एकसारखे कळीदार मोदक होणं गरजेचं असतं.

    मोदकांचं हे काम नेमकं चालतं तरी कसं, हा प्रश्न आपल्याला पडतोच. गणेश चतुर्थीसाठीच्या मोदकांची तयारी भारतींकडे साधारण १५-२० दिवस आधी सुरू होते. सर्वात आधी दळणं होतात. दळलेल्या तांदळांच्या विशिष्ट मापांच्या पिशव्या करून ठेवल्या जातात. मशीनवर नारळ फोडून, खवून, त्यात गूळ घालून सारण तयार होतं. ते थंड करून नीट साठवून ठेवलं जातं. भारतींकडे प्रत्येक वस्तूचं माप ठरलेलं आहे, त्यानुसार अगदी तंतोतंत मोजून प्रमाण घेतलं जातं, ज्यामुळे मोदक जास्तीत जास्त चांगला होतो. आता हे करायचंसुद्धा एक कारण आहे. कुठलीही गोष्ट घाऊक आणि विक्रीयोग्य करायची म्हटली की त्याला प्रमाण आणि दर्जा तर पद्धतशीर हवाच. पण कधी कधी अंदाज चुकल्याने जबरदस्त नुकसानही सोसावं लागतं. भारती म्हणाल्या, एकदा मोदकांची सगळी ऑर्डर पूर्ण करून बसलो होतो. शेवटच्या घाण्यातले १००० मोदक उकडले जात होते. आता काम संपलं म्हणून सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण उकडण्याच्या प्रक्रियेमध्ये काय घोळ झाला माहीत नाही, सगळ्या मोदकांना तडे गेले. तुकडेच पडायला लागले. परत सगळे मोदक करायला बसलो. कधी कधी खूप काळजी घेऊनही प्रमाणात थोडा फरक पडतो आणि सगळी ‘बॅच’ खराब होते. अगदी आयत्या वेळी असं काही घडलं तर नुकसान सोसावं लागतं किंवा मग ग्राहकांचा संताप सहन करावा लागतो.

    गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून मोदक करायला सुरुवात होते. मोदक करण्याचं मुख्य काम असतं. त्यासाठी भारतींकडे तब्बल २०-२२ माणसं काम करतात. रोजच्या १०जणी असतातच, पण गणेश चतुर्थीच्या काळात ऑर्डरप्रमाणे या मदतनीसांमध्ये वाढ होते. मोदक करणं तसं कौशल्याचं काम. हातानेच त्याची एकेक पाकळी वा कळी करत नंतर हातानेच गोलाकार आकार देत मोदक करावा लागतो. साहजिकच नवीन आलेल्या कोणत्याही मदतनीसाला थेट मोदक करण्याचं काम दिलं जात नाही. त्यांना आधी २-३ दिवस व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं. मगच त्यांना मोदक करायला दिले जातात. ज्यांना ते कौशल्य जमत नाही त्यांना सरळ बाकीची कामं दिली जातात. कारण ग्राहकांपर्यंत पोहोचणारा पर्यायाने बाप्पापर्यंत पोहोचणारा प्रत्येक मोदक सारख्याच आकाराचा, चवीचा आणि पाकळ्यांचा असायला हवा, असा भारतींचा आग्रह असतो. पहिल्या दिवशी दुपारी चार-साडेचापर्यंत जेवढे मोदक तयार होतील ते सारे मुंबईला विक्रीसाठी जातात. तरीही हा आकडा ५-६ हजारांवर नक्की जातोच. ज्याप्रमाणे पेढय़ाला कागद लावलेला असतो तसंच या मोदकांना प्रत्येकी प्लास्टिकचा कागद लावून ते साच्यांच्या ट्रेमध्ये पॅक केले जातात. त्यामुळे न हलता सुरक्षितपणे वेष्टनबंद मोदकांचा प्रवास सुरू होतो.

    मुंबईतल्या ग्राहकांसाठीचे सगळे मोदक पाठवल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पुण्यातल्या ग्राहकांसाठीच्या मोदकांचं काम सुरू होतं. रात्री १२ वाजल्यापासून विक्रीसुद्धा सुरू होते. ग्राहक एकामागोमाग मोदक घेऊन जायला हजर होतात. सगळ्यात मोठी ऑर्डर सकाळी ६ पर्यंत पूर्ण व्हायलाच हवी, असा भारतींचा दंडक असतो. बाकीच्या लहानमोठय़ा ऑर्डरची कामं गणपतीच्या पहिल्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरूच असतात. भारती म्हणतात, मोदकांचा आकडा ऐकला की सगळ्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. दरवर्षी आम्ही सगळ्या जणी आपल्याला मागच्यापेक्षा जास्त मोदक करायचेत, याच उत्साहाने काम करत असतो. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही २०,०००चा टप्पा गाठला. यंदा तो ३०,००० वर नेण्याचा मानस आहे. गणपतीच्या दहा दिवसांत आमची ही अशीच लगबग सुरू असते. ही सगळी उलाढाल करायची म्हणजे घरच्यांचा सहभाग हवाच. भारतींनाही तो मिळतो. त्यांच्या स्वत:च्या घरीसुद्धा गणपती आणला जातो. त्याचं सगळं नियोजन त्यांच्या जाऊबाई करतात. भारतींच्या सासूबाई मात्र पहिल्यापासून त्यांच्या पाठीशी होत्या आणि अगदी आज वयाच्या ८५व्या वर्षीही देखरेख आणि आर्थिक व्यवहारांचं नियोजन त्या सांभाळतात. सुरुवातीच्या काळात यंत्रसामग्री नसताना अगदी पारी थापून देण्यापासूनची कामं त्यांनी केलेली आहेत. सुरुवातीला विरोध करणारे भारती यांचे पती किशोर मेढी आता मात्र या उद्योगात मनापासून मदत करतात. मार्केटिंगचं काम तेच सांभाळतात. भारती म्हणतात, त्यांचा विरोध होता तरीही मला काही तरी वेगळं करायची इच्छा होतीच. बचत गटासारखं चांगलं व्यासपीठही मिळत होतं, त्यामुळे घराबाहेर पडून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मला सोडायची नव्हती. आणि मी ती सोडली नाही. शेवटी इच्छा असेल तिथे मार्ग मिळतोच. बाप्पानेच मला ही संधी दिली. आजही तोच ताकद, हिम्मत देतो आणि समाधानही!

    संजीव वेलणकर पुणे.
    9422301733
    साभार- लोकसत्ता

  • रा.जे देशमुख

    स्वयंभू प्रकाशन संस्थेचे रा.जे. देशमुख हे संस्थापक आहेत. त्यांची प्रकाशन पध्दत ही त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच अनोखी अशी आहे. वि.स.खांडेकर, रणजित देसाई यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकांची आपल्या पुण्यातल्या गढावर राहण्याची व्यवस्था करून, खांडेकरांकडून “ययाती”, आणि रणजित देसाईंकडून, “स्वामी” व “श्रीमान योगी” यांसारख्या दर्जेदार कादंबर्‍या त्यांनी लिहून घेतल्या. त्यासाठी त्यांची प्रचंड सरबराई केली व बडदास्त देखील राखली. तसंच या कादंबर्‍यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली. त्यांच्या मोठमोठया आवृत्त्या काढून व वितरणासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून, त्या अल्प किंमतीत वाचकांना उपलब्ध करून दिल्या. रणजित देसाईंच्या स्वामी या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या कादंबरीचे त्याकाळी तीन रूपये इतकी किंमत होती.

    राजे देशमुखांचे हे अभूतपूर्व उपक्रम काही काळच सुरू राहिले. त्यांचे प्रकाशन संस्थेचे बोधचिन्ह कासव होते. आता त्यांच्या प्रकाशन कार्याचा आवेग व अवाका फार नसला तरी, त्यांचे साहित्य व प्रकाशन क्षेत्रातील योगदान अतुलनीयच म्हणावे लागेल.

  • ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं.सत्यशील देशपांडे

    शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू! त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, कुमारजींप्रमाणेच पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे.

    पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता. संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं.

    मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे. कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.

    तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य.

    कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा! थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात.

    मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे.

    सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • प्रमोद निफाडकर

    निफाडकर, प्रमोद

    रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणाऱ्यांमध्ये डॉ. प्रमोद निफाडकर यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. त्यांच्या निधनामुळे अस्थमा रुग्णांचा आशेचा किरण हरपला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतातील अस्थमा रुग्णांची सेवा करण्यात घालवले. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी कॅन्सरने झालेले त्यांचे निधन वैद्यक क्षेत्रालाही चटका लावून गेले.

    जे.जे. रुग्णालय व ग्रँट मेडिकल कॉलेजमधून ‘एमडी’ केल्यानंतर अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकमधून अस्थमा व अ‍ॅलर्जीतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. खरे तर अमेरिकेतच सुखासीन जीवन त्यांना जगता आले असते. मात्र भारतातील गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी ते मुंबईत परत आले. खासगी तसेच शासनाच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या माध्यमातून ते हजारो अस्थमा रुग्णांवर उपचार व संशोधन करीत होते. ‘अ‍ॅलर्जी’ या विषयातही त्यांची मास्टरी होती. भारतात मधुमेह, हृदयविकाराबरोबरच अस्थमा रुग्णांची संख्याही भयावह म्हणावी एवढय़ा वेगाने वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात २०२० मध्ये भारत ही अस्थमा रुग्णांची राजधानी बनेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर डॉ. निफाडकर यांनी शहरी व ग्रामीण भागातील अस्थमा रुग्णांसाठी केलेल्या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण म्हणावे लागेल. प्रामुख्याने शहरी भागात लहान मुलांमध्ये अस्थमा होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. एकटय़ा मुंबईत १० लाख अस्थमा रुग्ण असून त्यामध्ये लहान मुलांची संख्या सहा लाख एवढी आहे. या रुग्णांच्या औषधावरील खर्च मोठा असून डॉ. निफाडकर यांनी केलेल्या संशोधनातून योग्य आहारविहार, घरात खेळती हवा ठेवल्यास तसेच अन्य काही उपाय केल्यास औषधाचा खर्च निम्म्याने कमी होतो हे दाखवून दिले. यामुळेच त्यांच्या संशोधनकार्यात कधीही वैद्यकीय कंपन्यांनी मदत केली नाही. ‘अस्थमा अ‍ॅण्ड ब्राँकायटीस असोसिएशन ऑफ इंडिया’चे ते २० वर्षांहून अधिक काळ सचिव होते. या संस्थेच्या माध्यमातून तीन आंतरराष्ट्रीय परिषदा, अस्थमासंदर्भात फॅमिली डॉक्टरांना प्रशिक्षण देणाऱ्या ५० हून अधिक कार्यशाळा, अस्थमा रुग्णांमध्ये आत्मविश्वास जागा करण्यासाठी ४०० हून अधिक शिबिरांचे आयोजन, शिक्षण, प्रबोधन, रुग्णांसाठी व्याख्याने, शोधनिबंध, पुस्तक लिखाण, वाचनालय असे जनजागृतीचे अनेक उपक्रम त्यांनी गेल्या तीन दशकांमध्ये केले. हा उपक्रम राबविताना त्यांनी दिल्लीच्या सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. बलराम घोष यांच्या सहकार्याने एक संशोधनही केले होते. यात शिखराच्या पायथ्याशी असताना अस्थमा रुग्णांच्या फुप्फुसाची क्षमता व शिखरावर चढल्यानंतर त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून स्टिरॉईड न घेताही फुप्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येते हे दाखवून दिले. यावर अधिक संशोधन सुरू होते. औषध कंपन्यांच्या मुळावर येणाऱ्या या संशोधनासाठी कोणतीच औषध कंपनी पुढे येणे शक्य नव्हते. मात्र पदराला खार लावून त्यांनी आपले संशोधन व अस्थमा रुग्णांसाठीचे उपक्रम सुरूच ठेवले हेते. त्यांच्या खासगी दवाखान्यातही येणाऱ्या शेकडो गोरगरीब रुग्णांवर ते मोफत उपचार करीत असत. त्यांच्या निधनामुळे अस्थमा रुग्णांच्या जीवनातील आशेचा एक किरण हरपला आहे.

  • सुभाष भेंडे

    प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.

  • क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख १

    इंग्रजांनी चापेकर बंधूंना फासावर चढवले आणि सावरकर मनातून पेटून उठले. त्यांची कुलदेवता भगवती (कालिका) होती. असे म्हणतात की चापेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकर घरातील देव्हाऱ्यातील देवी समोर संतापाने स्वतःचे प्राण त्याग करण्याच्या मनःस्थितीत होते. या देशाला स्वातंत्र्य दिलेस तर मी माझी मान सुद्धा कापून तुझ्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक करीन असे ते देवी समोर बसून गाऱ्हाणे घालीत होते. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ त्यांनी देवी समोर घेतली. मनात जी क्रांतीची ठिणगी पेटली त्यामुळे सावरकर अत्यंत अस्वस्थ होते.

  • श्री. तात्या अभ्यंकर यांनी लिहिलेला गोविंदराव पटवर्धन यांच्यावरील लेख

    दामू-गोविंदा जोड रे...
    राम राम मंडळी,

    १९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.
    मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.
    मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.

    "अरे तू इथे कुठे?"
    "बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"
    "अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे.
    "त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
    शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.
    पं गोविंदराव पटवर्धन!

    संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर.
    गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला. त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.
    पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.

    एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!
    मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.

    त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
    गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.
    पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.
    कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.

    नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!

    बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!
    मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!

    गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!
    "पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!
    साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!
    साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला, "तात्या, गोविंदराव गेले."
    मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
    तात्या अभ्यंकर.

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट