जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बॉबी मधील गाण्याने ज्या ‘मैं शायर तो नहीं मगर ऐ हसीं’ या गाण्याने जी धमाल उडवली. या गाण्याचे गायकानी हे गाणे आपल्या जीवनात पहिल्यांदा गायले होते व जो या फिल्मी सृष्टीत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आला होता. त्यांचे नाव शैलेंद्रसिंग.त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला.
शैलेंद्र सिंग, यांचा जन्म मुंबईतलाच, कॉलेज झाल्यानंतर अभिनेता होण्याचे भूत त्यांच्या अंगात होते त्यामुळे त्यांनी पुण्याच्या FTTI मध्ये प्रवेश घेतला. राजकपूर ऋषी कपूर यांना घेऊन नवीन चित्रपट ‘बॉबी’ सुरु करणार होते. सर्व दिग्गज गायक किशोरकुमार, मो. रफी, मुकेश त्यावेळेस आपल्या चरमसीमेवर होते, पण राजकपूर ह्यांच्या मनात आणखी काही वेगळे होते. राजकपूर यांनी शैलेंद्र सिंग यांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कडे पाठविले. ऑडिशन नंतर ठरल्या गेले कि बॉबी चे गाणे शैलेंद्रसिंगच गाणार आहेत. तेथूनच त्यांचे गायकीचे करियर सुरु झाले आणि अभिनय बाजूला पडले.
त्यांनतर शैलेंद्रसिंग यांनी ऋषीकपूर साठी खूप चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांना ऋषीकपूर चा आवाज मानल्या जाऊ लागले. पण पुढील कालावधीत स्पर्धात्मक वातावरणात ते टिकाव धरू शकले नाही आणि हळू हळू फिल्मी सृष्टी तून मागे पडले. पण चित्रपटांविषयी असलेले प्रेम आणि मराठी नसताना पण मराठी बद्दल असलेली आपुलकी त्यामुळे ते काही मराठी सिनेमाचे निर्माते होते. मराठीतून सुद्धा त्यांनी काही गाणी गायली आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.शशांक गिरडकर
संपूर्ण गावात सुंदरबाई या नावाला एक विशिष्ट वलय आहे—आदराचं, सोज्वळतेचं आणि धार्मिकतेचं. सुंदरबाई या संपूर्ण गावच्या आधारस्तंभ आहेत.
डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी झाली असे आज अभिमानाने सांगितले जाते.
वडील शांताराम यांच्या नोकरीच्या निमित्ताने कोटणीस कुटुंबीय नंतर सोलापुरात स्थायिक झाले, मात्र त्या कुटुंबाचे वेंगुर्ल्याशी असलेले ऋणानुबंध मात्र कधीच तुटले नाहीत. वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर रोडलगतच असलेले“कोटणीस हाऊस” हे डॉ.कोटणीस यांचे मूळ घर. हे घर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात “काँग्रेस हाऊस”म्हणून ओळखले जाई. त्या काळात महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते या “कोटणीस हाऊस”मध्ये मुक्कामाला येत असत.
डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे काका काही वर्षे वेंगुर्ले नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते. डॉ.कोटणीस यांच्या पत्नी डॉ.को-चिंग-लान यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ल्याशी ऋणानुबंध उत्तमरित्या जपले होते. वेंगुर्ले आणि एकूणच परिसरातील सार्वजनिक आरोग्याची दैनावस्था पाहून त्या सद्-गतीत होत. ही दैनावस्था दूर करण्यासाठी आपण काही तरी केले तरच आपल्या पतीच्या ऋणातून आपला देश(चीन) काही प्रमाणात मुक्त होईल असे त्यांना वाटे. डॉ.कोटणीस या महान माणसाच्या सेवाभावी वृत्तीचे गोडवे आजही चीनमध्ये गायले जातात. १९३६ मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना या महायुद्धात जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यात चीनच्या जखमी सैनिकांचे खूप हाल झाले. चीन सरकारच्या विनंतीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मदतीसाठी पाच डॉक्टरांचे मदत पथक पाठविले होते. या मदत पथकाचे प्रमुख होते डॉ. द्वारकानाथ कोटणीस. डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.वैद्यकीय क्षेत्रातले त्यांच्या हाताचे कौशल्य मात्र चीनच्या भूमीवर जखमी झालेल्या प्रचंड चीनी सैनिकांच्या शुश्रुषेसाठी उपयोगी पडले.
कित्येक सैनिकांना औषधपाणी केले, कित्येकांच्या वेदना दूर केल्या तर अनेकांना मृत्यूच्या दाढेतून त्यांनी आपल्या शल्य कौशल्याने ओढून आणले. हे सर्व करीत असताना सैनिकांना वाचविण्याची पराकाष्ठा, अतिश्रम, दूषित हवामान, खाण्यापिण्याची आबाळ आणि वेळ काळ न पाळल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. परंतु त्याही अवस्थेत स्वतःकडे लक्ष न देता आपले कर्तव्य पार पाडण्यात कोटणीस गुंतलेले होते. कोटणीसांनी तेथील चिनी नर्सिंग प्रशिक्षिका को चिंग लान यांच्याशी विवाह केला.
चीनच्या हेबेई प्रांतात कुटाँग खेडे आहे. तेथे डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीरूपात जुने हॉस्पिटल जतन केले आहे. त्यांची खोली जतन केली आहे. या खेड्यात प्रवेश केल्यानंतर चौकातच डॉ. कोटणीसांचा अर्धपुतळा आहे. त्यांच्या कृतज्ञतेसाठी चीनमध्ये आजही त्यांचे भव्य स्मारक उभे आहे. डॉ. कोटणीस यांनी देश जाती, धर्म याबंधनाच्या पलीकडे जात मानवतेची खऱ्या अर्थानं पूजा केली असं म्हणनं काही वावगे ठरणार नाही. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी १९४६ साली “डॉ.कोटनीस की अमर कहाणी” हा हिंदी चित्रपट तयार करून डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील मानवतावादी कार्याचा साऱ्या भारतवासियांना परिचय करून दिला. हा चित्रपट जगभर गाजला.
डॉ. कोटणीसांचा जीवनप्रवास ‘काळी आई’ हा माहितीपट पण अतिशय सुंदर आहे. चिनी भाषेत डॉ. कोटणीसांना काळी आई असे संबोधले जाते. त्यावरूनच माहितीपटाला नाव दिलेले आहे. देवदूत' ही डॉ. संजीव शहा यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावरील चरित्रपर कादंबरी लिहिली आहे. सरळ साध्या शैलीतील ही कादंबरी वाचनीय आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.
अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला.
विजया मेहता उर्फ बाई हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड आहे. फक्त मराठी रंगभूमीच नव्हे, तर हिंदी इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रांत मा.विजया मेहता वावरलेल्या आहेत. पण त्या खऱ्या रमल्या त्या नाटकातच. विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्या नूतन, तनुजा यांच्यामुळे मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊन देखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली.
दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर देखील हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये न गुरफटण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला हे पहाता ‘आपल्या मराठी रंगभूमीचे नशीब बलवत्तर‘ असेच म्हणावयास हवे. साठ सत्तरच्या दशकांत तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार व इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची, नाट्यक्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारुन वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटकेएकांकिका ‘रंगायन‘ वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. ‘रंगायन‘ संस्था व त्या अनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग सुध्दा उभारुन प्रायोगिक एकांकिकानाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहाबारा वर्षे जोमाने चालवली.
सतत काहीतरी नवीन करण्याचा देण्याचा ध्यास घेतलेल्या विजया मेहता प्रायोगिक समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे दुर्दैवाने जेव्हा ‘रंगायन‘ अंतर्गत बेबनाव मतभेदांमुळे फुटली तेव्हा प्रायोगिकतेच्या चौकटीतच कायम रहाण्याच्या विचारांचे गाठोडे ओझे ऊराशी न बाळगता व्यावसायिक रंगभूमीवर सुध्दा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. वैयक्तिक जीवनात सुध्दा, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच पदरात दोन लहान मुलं असताना पतिनिधनाचा प्रचंड आघात सोसून व त्यामुळे आयुष्याला मिळालेली विलक्षण कलाटणी पचवून, बाई न खचता परत कंबर कसून उभ्या राहिल्या. पुढे कालौघात फरोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह करुन त्या पुनश्च स्थिरस्थावर झाल्या.
‘पाश्चांत्य रंगमंचावरील जे भावले ते मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे‘ या भावनेने बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल‘चे रुपांतर ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, आयनेस्को यांच्या ‘चेअर्स‘ या एकांकिकेचे अनुवादित रुप ‘खुर्च्या‘ या व अशा इतर काही विदेशी नाट्यकृती त्यांनी मराठी रंगमंचावर आणल्या. याच धर्तीवर ‘मराठी नाटकांतील काही उत्तम कृती सुध्दा पाश्चाकत्य प्रेक्षकांसमोर सादर झाल्या पाहिजेत‘ असा विचार करुन जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीने ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘मुद्राराक्षस‘, ‘शाकुंतल‘, ‘हयवदन‘, ‘नागमंडल‘ या नाटकांचे प्रयोग मूळ व/वा रुपांतरित वेषात परदेशी मंचांवर सादर केले. भाषिक सांस्कृतिक भौगोलिक मर्यादा ओलांडून त्यांनी मराठी नाटक सीमेपार नेले.
‘श्रीमंत‘, ‘मादी‘, ‘एक शून्य बाजीराव‘, ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘पुरुष‘, ‘बॅरिस्टर‘, ‘महासागर‘, ‘हमीदाबाईची कोठी‘, ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हयवदन‘, ‘सावित्री‘ अशी अनेक लक्षणीय नाटकेएकांकिका तसेच ‘पेस्तनजी‘, ‘रावसाहेब‘, ‘स्मृतिचित्रे‘ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या म्हणजेच ‘गल्ल्याच्या गणिता‘च्या दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली तरारली फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं.
मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडतघडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनय निपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली. ‘संध्याछाया‘ मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा ‘बॅरिस्टर‘ मधील केशवपन केलेली आलवण नेसलेली भावनेच्या कोंड माऱ्याने घुसमटणारी मावशी असो किंवा ‘हमीदाबाईची कोठी‘ मधील कोठी संस्कृतीतील गायकी परंपरेचा ऱ्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा ‘वाडा चिरेबंदी‘ मधील पति निधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला.
गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहऱ्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारक पणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो. भारत सरकारने विजया मेहता यांना ‘पद्मश्री‘ देऊन गौरव केला. याचबरोबर त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार‘, ‘कालिदास सन्मान‘, ‘तन्वीर सन्मान‘, ‘विष्णुदास भावे सुर्वणपदक‘, महाराष्ट्र शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार‘, ‘नाट्यदर्पण पुरस्कार‘, चतुरंग प्रतिष्ठानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार‘, ‘रावसाहेब‘मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एस.एन.डी.टी विद्यापीठाची डॉक्टररेट, इचलकरंजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान किताब मानमरातब मिळाले आहेत.
विजया मेहता यांनी ‘एन.सी.पी.ए‘ च्या संचालकपदाची धुरा तब्बल सतरा वर्षे सांभाळली. नाटकांच्या प्रयोगांच्या कारणाने त्यांचे होत असलेले झंझावाती आंतरराष्ट्रीय दौरे विशेषतः युरोपमधील अथक भ्रमंती पहाता, मराठी साहित्य कलाजगतातील कोणालाही न सोडता आपल्या निखळनिर्विष विनोदाने कोपरखळ्या मारणाऱ्या ठणठणपाळाने त्यांचे ‘विजयोस्की मेहतोविच‘ असे नामकरण केले.
‘झिम्मा : आठवणींचा गोफ‘ हे मा.विजया मेहता यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. यात १९५१ सालापासून ते आजतागायत नाटकासाठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या आणि रंगभूमीच्याही अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा या पुस्तकात आहे.
तसेच
बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास.
विजया मेहता यांच्या नाट्य कारकिर्दीचा आणि व्यक्तित्वाचा वेध घेणारं हे आणखी एक पुस्तक. विजयाबाईंच्या शिष्य मंडळींनी, सुहृदांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. बाईंची गॅंग या नावानं ओळखले जाणार्या महेश एलकुंचवार, नाना पाटेकर, दिलीप कोल्हटकर, विक्रम गोखले, सुहास जोशी, रिमा, विजय केंकरे, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष अशा अनेकांनी विजया मेहता यांचं व्यक्तिचित्र तयार केलं आहे. वेगवेगळ्या कलाकृती तयार होतानाची प्रक्रिया, बाईंचं कौशल्य, त्या-त्या वेळचे अनुभव अशा गोष्टी त्यामुळे उलगडतात. विजया राजाध्यक्ष, महेश एलकुंचवार यांनी घेतलेल्या एका मुलाखतीचा पुस्तकात समावेश आहे. भास्कर चंदावरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाचा अनुवादही या पुस्तकात समाविष्ट आहे. याशिवाय पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे अशा दिग्गजांनी बाईंबद्दल यापूर्वी लिहिलेल्या लेखांचं संकलनही पुस्तकात आहे. अंबरीश मिश्र यांनी संपादन केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विजय आनंद यांना गोल्डी म्हणून सुद्धा ओळखले जायचे. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९३४ रोजी झाला. १९५४ साली दिल्ली येथे अखिल भारतीय महाविद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये एक नाटक करण्यात आले. नाटकाचे दिग्दर्शन करणारी आणि नाटकामध्ये दिग्दर्शकाची भूमिका करणारी व्यक्ती एकच होती. दोन्हींसाठी पहिले पारितोषिक पटकावणारे मा.विजय आनंद हे देव आनंद आणि चेतन आनंद यांचे लहान भाऊ. मुंबईत आल्यानंतर विजय आनंद यांनी देवआनंद याच्या नवकेतन या चित्रपट निर्मिती संस्थेतून नौ दो ग्यारह पासून ज्वेलथीफपर्यंत पडद्याच्या मागची भूमिका साकारली. नंतर त्यांना अभिनयाची ओढ वाटू लागली. काला बाजारमध्ये विजय आनंद यांचा चेहरा पडद्यावर दिसला होता. परंतु तेरे मेरे सपने या चित्रपटातून विजय आनंद यांनी अभिनयाकडे गांभीर्याने पाहायला सुरूवात केली. चोर-चोर, कोरा-कागज, डबलक्रॉस आणि मैं तुलसी तेसे आंगनकी इतके चित्रपट केल्यानंतर अभिनय ही आपल्याला जमणारी गोष्ट नाही हे त्यांच्या लक्षात आले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी (१९५४) देव आनंदच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पटकथा लिहून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्या मा.विजय आनंदने दिग्दिर्शित केलेला पहिला चित्रपट हा नौ दो ग्यारह. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या भूमिका असलेल्या या रहस्यपटानंतर त्याने काला बाझार (१९६०) मध्ये नोकरी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात अपयशी ठरलेल्या, आणि मग वाममार्गाला लागलेल्या तरूणाची कथा सादर केली. यात त्याने एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली होती (नायिकेचा भूतपूर्व प्रियकर). या चित्रपटात एका गाण्याच्या आधी एक अप्रतीम दृश्य आहे. नायक देव आनंद वाममार्गाने भरपूर पैसे कमावतो आणि एके दिवशी आई-बहिणीसाठी कपडे आणि दागिने घेउन घरी येतो. जिना चढताना त्याला ठेच लागते, सगळे दागिने वगैरे वस्तू इतस्ततः पडतात आणि त्याच वेळी सुरु झालेल्या भजनातल्या 'ना मै धन चाहूं, ना रतन चाहूं' या शब्दांनी सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला नायक एकदम चपापतो.
विजय आनंद यांना सस्पेन्स सिनेमांचा बादशाह समजले जायचे. त्याचे 'तिसरी मंझिल', 'काला पानी', 'ज्वेल थीफ' हे रहस्यमय सिनेमे आज इतक्या वर्षांनंतरही वारंवार पाहिले जातात, त्यातलं रहस्य माहिती असूनही!
चित्रपट्सृष्टीतील अनेक कलावंतांप्रमाणे विजय आनंदही काही काळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होते. पण त्याने केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला. विजय आनंद यांचे २३ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या महाबळेश्वर मोरजे यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला, हुबळी आणि पार्ल्यातील पार्ले टिळक विद्यालयात झाले. चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून ते १९६४ मध्ये एल.एल.एम. झाले. याशिवाय एम.कॉम. (कॉस्टिंग) ही पदवीही त्यांनी संपादन केली होती. त्यांनी लंडनच्या इन्शुरन्स व चार्टर्ड सेक्रेटरी या पदविका घेतल्या होत्या. ज्येष्ठ वकील आर. सी. बेलोसे, रामराव आदिक व न्या. जी. एन. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली व्यवसायाचे धडे घेतले. त्यांनी मुंबई, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठांत अध्यापनाचे काम केले. जगभरातील फ्लॅटओनर्स व रेंट अॅक्ट याच्या शोधनिबंधाबद्दल त्यांना १९६७ मध्ये पुरस्कार मिळाला. त्यांनी कायद्याच्या अभ्यासानिमित्त लंडन, अमेरिका येथे दौरे केले. १९७८ मध्ये ते सरकारी वकील; तर १९८७ मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचे सदस्य होते. 'आय लव्ह मुंबई' या समितीचे ते ट्रस्टी होते.
मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा व तत्कालिन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वच्छ मुंबई व तिच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले. पर्यावरण व वृक्षारोपण कामाबद्दलही त्यांचा गौरव झाला होता. महाराष्ट्र विधानसभा बरखास्ती, इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान आणि आणीबाणीच्या काळातील खटल्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. हाऊसिंग पॉलिसी ऑफ इंडिया, पंचायत राज, एन्व्हायर्नमेंट लॉ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांतून त्यांनी कायदेविषयक विपुल लेखन केले. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सुकथणकर कमिटीचे ते सदस्य होते.
मुंबईतील जुन्या चाळींचा प्रश्न व फ्लॅटओनर्सच्या समस्या हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सामान्य माणसाचे फ्लॅटचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी १९८३ मध्ये फ्लॅट ओनर्स असोएशिनची स्थापना केली. सामान्यांची फसवणूक करणार्या बिल्डर व डेव्हलपर यांच्यावर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटओनर्स अॅक्टअंतर्गत कारवाई करण्यासाठी सरकारला कायदेविषयक मार्गदर्शन केले. मुंबईतील पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. मुंबईकरांच्या न संपणार्या समस्यांचा कायद्याच्या दृष्टीने अभ्यास करणार्या या ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाला मुंबई हायकोर्टाने त्यांच्या कर्तृत्वाचा बहुमान म्हणून सिनीअर कौन्सिलचा सन्मानही दिला होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडित म्हणून त्या काळात प्रसिद्ध असलेले गोविद शंकर बापट यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे झाला. त्यांचे वडील हे व्युत्पन्नशास्त्री होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी-बदलापूर या मतदार संघातून कपिल मोरेश्वर पाटील खासदार म्हणुन विजयी झाले आहेत;
सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष असलेल्या कपिल पाटील यांनी १८ मार्च २०१४ या दिवशी ऐन लोकसभा प्रचाराच्यावेळी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदीं यांच्या विकासकामांच्या दुरदृष्टीचा आपल्या मतदारसंघाला फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी भा.ज.प प्रवेश केल्याचे जाहिर केले होते.
जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेचे अध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक, अशीही त्यांची ओळख आहे. ग्रामविकास या संकल्पनेला मध्यभागी ठेवून आरोग्य, शिक्षण प्रसार, जलसंधारण या ग्रामविकासासाठी अत्यावश्यक असणार्या घटकांना प्राधान्य देणार्या कित्येक दुरदर्शी व सर्वस्पर्शी योजनांचे ते जनक आहेत. आजपर्यंत कपिल पाटील यांनी अनेक जिल्हा अधिकारी व नगरसेवकांना बरोबर घेवून स्वयंपुर्ण प्रभावी योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.
पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे जगात प्रथमच कॉम्प्युटरवर ‘मराठी डिक्शनरी’, पहिली ‘ऑनलाइन मराठी डिक्शनरी’ व आता पुन्हा एकदा सर्वप्रथम भारतीय भाषेतील ‘मोबाइल डिक्शनरी’ प्रत्यक्षात आणणारा सुनील आजही आपल्या गावातल्या मातीशी निष्ठेने इमान राखून आहे.
आपल्या अभिनव आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे आजमितीस दररोज लाखभराहून अधिक जणांना आपल्या वेबसाइटकडे आकर्षित करणाऱ्या सुनीलची पाश्र्वभूमी अत्यंत सामान्य.
नाशिकजवळच्या महिरावणी या खेडेगावात टिपिकल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या सुनीलने पहिल्यांदा नाशिक पाहिले ते दहावीच्या परीक्षेसाठी आणि प्रथम मुंबई पाहिली तीदेखील एकविसाव्या शतकातच. जात्याच बुद्धिमान असणारा सुनील कोश वाङ्मयासारख्या अत्यंत किचकट क्षेत्राशी बांधला गेला तो जीवनाची गरज म्हणून. दहावीला चांगले मार्क मिळविल्यावर त्याने अहमदनगरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इन्स्ट्रमेंटल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला, पण खेडय़ातल्या मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे त्याला तेथे माध्यमाची आणि भाषेची चांगलीच अडचण जाणवू लागली. अगोदरच मराठीऐवजी इंग्रजी माध्यम आणि त्यातही संपूर्ण अपरिचित अशा तांत्रिक शब्दांचा भरणा. कुणाला विचारण्याची सोय नाही.
अशा वातावरणात सगळा अभ्यास त्याच्या डोक्यावरून जाऊ लागला. त्याने मग वर्गात न समजलेले इंग्रजी शब्द वहीत उतरवून घ्यायचे आणि रूमवर आल्यावर त्याचे ‘डिक्शनरी मिनिंग’ जाणून घ्यायचे, असा परिपाठ सुरू केला. त्यामुळे त्याची ‘व्होकॅबिलिटी’ समृद्ध होऊ लागली आणि प्रथम वर्षांला ६० पैकी जे केवळ चौघे उत्तीर्ण झाले, त्यातही अव्वल म्हणून स्थान पटकावत त्याने बाजी मारली. तीन वर्षांंत त्याच्याकडे तब्बल २० हजार शब्द जमले. त्याचा आपल्याला फायदा झाला, तसाच हजारो-लाखो तरुणांनाही तो व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या वापरात सुलभता यावी, या उद्देशाने सुनीलने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. अनेकांची मदत व मार्गदर्शन घेत अत्यंत चिकाटीने त्याने वर उल्लेखलेले एक-एक उपक्रम अथक मेहनतीने पूर्ण केले.
सुनीलच्या घरची पाश्र्वभूमी शिक्षणाची अजिबातच नाही. वडील केवळ चौथीपर्यंत शिकलेले, तर आई निरक्षरच. सुनील आणि त्याच्या भावांनी आईला चांगली अक्षर ओळख करून दिल्याने ती वाचू लागली आहे. नाशिकच्या महात्मानगर परिसरात त्याने सध्या आपले कार्यालय सुरू केले असले तरी आजदेखील त्याचे वास्तव्य आहे ते महिरावणी गावातील शेतातल्या घरातच. त्यामुळेच त्याच्या सामाजिक जाणिवा अजूनही घट्ट आहेत. तो गावाकडच्या मुलांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. हजारो रुपये फी भरण्याची ऐपत नसल्याने संगणकाच्या अधिकृत अभ्यासक्रमापासून आपल्याला वंचित राहावे लागले, तसे इतरांना लागू नये, ही त्याची मनस्वी इच्छा आहे. त्यातूनच त्याने ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’ विकसित केल्यावर आपल्या गावातील मुलांवर एक प्रयोग केला. अर्धवट शाळा सोडावी लागलेल्या वा शिक्षण थांबवून शेतीकडे वळलेल्या काही तरुणांच्या मोबाइलवर त्याने ही डिक्शनरी लोड करून दिली व महिन्याभराने त्यांच्या इंग्रजी शब्दसंग्रहाची चाचणी केली. यामध्ये त्याला सकारात्मक प्रतिसाद आला आणि मग हुरूप वाढवून त्याने हा उपक्रम तडीस नेला. आता अन्य भारतीय भाषांवरही त्याचे अशाच स्वरूपाचे काम सुरू आहे.
शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख अजय बोरसे यांनी सुनीलच्या ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’चा उपक्रम उचलून धरत तरुणांसाठी अशा पाच हजार डिक्शनरी पुरस्कृत केल्या आहेत. त्याला अर्थातच उत्तम प्रतिसाद मिळतोय, पण शासनस्तरावरून मात्र या बाबतीत अजूनही ‘सारे कसे शांत शांत’ अशीच स्थिती आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti