(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लोकनेता गोपीनाथ मुंडे

    परिणामकारक, क्रांतिकारी बदल करणारे निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे, याला फार महत्त्व असते. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना गुन्हेगारीविरोधात धडक कार्यवाही केली. पोलिसांना अधिकार दिले. ‘एन्‌काऊंटर’ हा शब्द त्याच काळात रूढ झाला. राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या संगनमताच्या काळात एन्‌काऊंटर हा शब्द रूढ करणे, ही खरी गुणवत्ता होती.पोलीसदलामध्ये सुधारणा, मुंबईतल्या टोळी युद्धाला आळा घालणे, आणि जनसामान्यांनमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो. पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर गोपीनथ मुंडे, हे भाजप-सेना युतीमधला दुवा होते. दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. तर निवळण्याचं काम गोपीनाथराव करायचे.

  • गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

    अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते.

  • बॉलिवूडच्या जेष्ठ गायिका मीना कपूर

    मीना कपूर यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुकर झाला. मीना कपूर यांनी आपल्या लहानश्या करीयरची सुरवात १९४६ साली नीनु मुजुमदार यांच्या आठ दिन या चित्रपटापासून केली. याला संगीत एस.डी.बर्मन यांचे हो. गायिका मीना कपूर या संगीतकार अनिल विश्वास यांच्या पत्नी. मीना कपूर यांचा संगीतकार अनिल विश्वास यांच्याशी १९५९ मध्ये विवाह झाला.

    मीना कपूर यांचे नाव घेताच चटदिशी आठवते ते गाणे म्हणजे "कुछ और जमाना केहता है" हे 'छोटी छोटी बाते' या स्वर्गीय मोतीलाल निर्मित चित्रपटातील अनिल विश्वास यानीच संगीतबद्ध केलेले सुरेख गीत, जे नादिरा यांच्यावर चित्रीत झाले होते. 'परदेसी' मधील 'रसिया रे मन बसिया रे' हे एक आणि "आँखे" मधील 'मोरे अटरिय पे कागा' हे आणखीन एक प्रकर्षाने आठवणारे गीत. अनिलदांच्या निधनानंतर 'अमर उत्पल' या त्यांच्या मुलांजवळ राहात असत अमर उत्पल या जोडीने बिग बी च्या 'शहेनशहा' चे संगीत दिग्दर्शन केले होते. मीना कपूर यांनी १२५ हून अधिक गाणी गायली होती. यातील सी रामचंद्र यांच्या बरोबरचे मेरी जान संडे के संडे', व'रसिया रे मन बसिया रे' ही त्यांची गाजलेली गाणी. मीना कपूर यांचे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मीना कपूर यांची गाणी
    https://www.youtube.com/playlist…
    मेरी जान संडे के संडे'
    https://www.youtube.com/watch?v=eQT_HmOUdRc
    https://www.youtube.com/watch?v=Va739fEuuZg

  • ॲ‍पलचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष स्टीव्ह जॉब्स

    जन्म. २४ फेब्रुवारी १९५५ ग्रीन बे अमेरिका येथे.

    सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन - जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्यानंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. सहा महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते.

    हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाकसोबत ओळख झाली. जॉब्स आणि रीड कॉलेजमधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. १९७१ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स १६, तर व्होज्नियाक २१ वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. ७०च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्स यांनी १९७६ मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने ॲ‍पलची सुरुवात झाली. त्यांना ५० कॉम्प्युटर्सची पहिली ऑर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला. तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकार्याने निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला ॲ‍पल-१ हा पीसी लाँच केला. ॲ‍पलच्या सहकाऱ्या सोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. १९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला नाव देण्यात आले पिक्सार. येथे ॲ‍निमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नीसोबत करारही करण्यात आला होता. १९९७ मध्ये तोट्यात चालत असलेल्या ॲ‍पलच्या सल्लागारपदावर ते परतले. २००७ मध्ये ॲ‍पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन आणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला.

    २००१ साली ॲ‍पलने ५ गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. ॲ‍पलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.

    ॲ‍पल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणाऱ्या जिम कार्लटन यांनी ॲ‍पल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स ॲ‍पल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार ॲ‍पल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव ॲ‍पल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले ॲ‍पल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.

    २००७ वर्षात आयफोनच्या लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईल वेड्यांना आणखीच वेड लावले. २०१० साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-२ मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या.

    जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. ॲ‍पलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे.

    स्टीव्ह जॉब्स यांचे निधन ५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • अभिनय बेर्डे

    अभिनय बेर्डे

    अभिनय बेर्डे – मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन फळीतील हे एक नाव. अभिनय सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्यांचा मुलगा आहे.

  • अभिनेत्री मुक्ता बर्वे

    जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणा‍‍‍र्‍या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.

  • चिंतामणराव कोल्हटकर

    चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी नेवरे रत्नागिरी येथे झाला.चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्‌भुत असाच आहे. कोल्हटकर १९११ मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. १९१४ साली ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.

    कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले. राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला. १९३३ च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला. तेव्हा चिंतामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. मा.चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्च र्समध्ये रूपांतर केले. पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्यास, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपट व्यवसायातून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले. चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले.

    अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. त्यांचा मुलगा मा.चित्तरंजन कोल्हटकर हे सुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणराव यांच्या नात आणि मा.चित्तरंजन कोल्हटकर यांची ज्येष्ठ कन्या, मा.विनीता करमरकर यांनी मा.चिंतामण कोल्हटकर यांचे बलवंत चिंतामणी या नावाने चरित्र लिहिले आहे. मा.विश्राम बेडेकर, मा.पु.ल. देशपांडे, मा.चंद्रकांत गोखले, मा.वसंत शिंदे, मा. शांता जोग हे सर्व मा.चिंतामण कोल्हटकर यांचे नाट्यक्षेत्रातले शिष्य म्हणून पुढे नावारूपाला आले. मा.चिंतामणराव कोल्हटकर १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके
    आंधळ्यांची शाळा, आशीर्वाद, एकच प्याला, कमला, काकाची शशी, कांचनगडची मोहना, जग काय म्हणेल, झुंझारराव, तानसेन, तुकाराम, तोतयाचे बंड, त्राटिका, द्रौपदी, नेकजात मराठा, पाणिग्रहण, पुण्यप्रभाव, प्रेमध्वज, बेबंदशाही, ब्रह्मकुमारी, भाऊबंदकी, भाग्यवान, भावबंधन, माते तुला काय हवंय?,
    मानाजीराव, मानापमान, रणदुंदुभी, राजमुकुट, राजसंन्यास, विद्याहरण, वैजयंती, शिवसंभव, संन्यस्त खड्ग, संशयकल्लोळ, सोन्याचा कळस, स्वयंसेवक, हॅम्लेट, हाच मुलाचा बाप, हिरवा चुडा.

  • चंद्रकांत खोत

    चंद्रकांत खोत

    चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला “मर्तिक” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित “उभयान्वयी अन्वय” ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.

  • ‘रोमन हॉलिडे’ प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ऑड्रे हेपबर्न

    ऑड्रे हेपबर्न चे खरे नाव ऑड्रे रस्टन. ऑड्रे हेपबर्न ही मूळची ब्रसेल्सची. ऑड्रे रस्टनने पुढे आपल्या नावातले रस्टन काढून हेपबर्न केले. त्यांचा जन्म ४ में १९२९ रोजी झाला. तिच्या लहानपणी वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे तिचे वास्तव्य बेल्जियमखेरीज इंग्लंड आणि हॉलंडमध्येही झाले. त्यामुळे ती डच, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन आणि स्पॅनिश सफाईदारपणे बोलत असे. ब्रसेल्समध्ये प्रथम बॅले नृत्याचे शिक्षण घेतल्यावर ती लंडनच्या वेस्ट एंड या संगीत नाटक कंपनीत कोरस गायिका आणि छोटय़ामोठय़ा भूमिका करू लागली. पुढे ब्रॉडवेवर समावेश झाल्यावर तिची ओळख युरोप- अमेरिकेत एक होतकरू कलाकार म्हणून झाली. १९५१ साली ब्रॉडवेच्या ‘जिगी’ या नाटकात ऑड्रेने केलेल्या भूमिकेने तिला एक अभिनेत्री म्हणून उंचीवर नेऊन ठेवले.

    हॉलीवूडची एक आघाडीची चित्रतारका म्हणून ऑड्रेचे नाव झाले ते १९५३ साली प्रकाशित झालेल्या ‘रोमन हॉलिडे’ या चित्रपटाने. रोमन हॉलिडेमध्ये तिने राजवाडय़ाच्या बंदिस्त आयुष्याला कंटाळून बाहेरचे मुक्त जग अनुभवण्यासाठी पळून शहरात गेलेल्या एका राजकन्येची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या अल्लड, अवखळ, निरागस राजकन्येने ऑड्रेला १९५४ सालचे उत्कृष्ट अभिनेत्रीचे अकॅडमी अॅजवॉर्ड म्हणजेच ऑस्कर अॅावॉर्ड मिळवून दिले. त्यानंतरच्या तिच्या साब्रीना (१९५४), द नन्स स्टोरी (१९५९), ब्रेकफास्ट अॅकट टिफनीज (१९६१), शराड (१९६३), माय फेअर लेडी (१९६४) तसेच वेट अन्टिल डार्क (१९६७) या चित्रपटांतील अभिनयाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या चित्रपटांपकी पाच चित्रपटांतील सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे ऑस्कर पुरस्कार ऑड्रेला मिळाले आणि बाकी चित्रपटांसाठी तिला गोल्डन ग्लोब, सेसिल डिमेलो अॅिवॉर्ड, ग्रॅमी अॅकवॉर्ड, सिने अॅिक्टर्स गिल्डतर्फे जीवनगौरव हे पुरस्कार मिळाले.

    १९८८ साली चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारल्यावर ऑड्रेने तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३ पर्यंत युनिसेफसाठी इथिओपिया, सुदान, सोमालिया वगरे दुष्काळग्रस्त आणि गरीब देशांतील कुपोषित मुलांसाठी मदतकार्य केले. ऑड्री हेपबर्न यांचा अभिनय, त्यांचे सौंदर्य व त्यांची सामाजिक जाणीव या विषयी विनिता महाजनी यांनी ‘मृगनयनी मनस्विनी : ऑड्री हेपबर्न’ हे पुस्तक लिहिले आहे. ऑड्रे हेपबर्नचे २० जानेवारी १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • स्मरण एका कलायात्रीचे – जयशंकर दानवे

    नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्य त्यांच्याबद्द्लच्या जागवलेल्या आठवणी.

    आयुष्यभर अभिनयकलेची व्रतस्थपणे सेवा करून त्या कलेचे अनेकांना दान करून कलाकारांची ललाटरेखा कालातीत बनविणारे मराठी रंगभूमी व रुपेरी पडद्यावरील नायक,खलनायक,चरित्र नायक आणि दिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे असंच एक अनोखं व्यक्तिमत्व........

    कोल्हापूर-कलानगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर,पंचगंगेचा अवखळपणा आणि सह्याद्रीचा कणखरपणा असा विलोभनीय संगम असलेल्या या नगरीने महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या राष्ट्राला अनेक रत्ने बहाल केली.कलेचा समृद्ध वारसा असल्याने जुन्यांचे पडद्याआड जाणे आणि नव्यांचे चमचमणे हे नियतीचे रहाटगाडगे....असे अविरत चाललेले...ज्यांचा उमेदीचा काळ कोल्हापुरात गेला त्या सर्वांचे कार्यकर्तुत्व खरं तर बंदिस्त करणे कठीण;पण मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीच्या कळसावर विराजमान झालेले आणि अभिजात शिष्य कलावंतांच्या मांदियाळीत पताका घेऊन पुढे उभे असणारे व आपल्या कसदार अभिनयाने मराठमोळ्या जनतेच्या हृदयसिंहासनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांच्या परंपरेतील एक कलाकार म्हणजे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे.

    नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे उत्कृष्ट खलनायक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म पुणे येथे १ मार्च १९१० रोजी महाशिवरात्रीला झाला.३ सप्टेंबर १९८६ रोजी कोल्हापूर येथे त्यांचे देहावसान झाले.या ७५ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण १०० चित्रपट आणि १३४ नाटके व त्यांचे असंख्य प्रयोग त्यांच्या नांवावर आहेत.त्यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओत चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी बराच काळ व्यतीत केला.

    राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे होते जयशंकर दानवे. सुलोचना या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्रीला “ करीन ती पूर्व ” या रंगमंचावरील नाटकाद्वारे प्रथम अभिनय क्षेत्रात आणणारे आणि “ जयभवानी ” या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रथमच त्यांना मुख्य नायिकेची संधी देणारे होते जयशंकर दानवे. “ ऐका हो ऐका ” या नाटकातून गणपत पाटील यांना नाच्याची पहिली टाळी शिकविणारे व राजशेखर यांना रंगभूमीवर याच नाटकाद्वारे प्रथम दिग्दर्शन करणारे होते जयशंकर दानवे.

    चंद्रकांत,सुर्यकांत मांडरे,सोहराब मोदी,विक्रम गोखले,जयश्री गडकर,पद्मा चव्हाण, रत्नमाला,रमेश देव अशा कलाकारांना अभिनयाच्या पाउलवाटेवर प्रथम संधी देऊन सिने-नाट्य सृष्टीची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणारे होते जयशंकर दानवे.त्यांनी एक काळ हैद्राबादला ‘हैम्लेट’ नाटकाचे असंख्य प्रयोग करून गाजवला होता. उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असूनही मुंबईच्या अभिनय महासागरात न जाता कोल्हापुरात राहून त्यांनी अनेक कलाकार शिष्य घडविले.

    करवीर वाचन मंदिर,करवीर नाट्य मंदिर,देवल क्लब,मेडिकल असोसीएशन, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल,न्यू हायस्कूल अशा कोल्हापुरातील अनेक संस्थाना नाटकांच्याद्वारे उर्जितावस्था आणली अशा कलाकाराचे चिरंतन स्मरण करणे आवश्यक आहे.म्हणूनच २०११ सालापासून “नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार ” हा मानाचा पुरस्कार दानवे परिवारातर्फे प्रदान करण्यात येतो.

    आजपर्यंत रंगकर्मी “श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,श्री.सदाशिव अमरापूरकर,श्री.शरद पोंक्षे, श्री.अरुण नलावडे,श्री.सुबोध भावे” यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    अशा नाट्य-सिनेदिग्दर्शकाचे व कलाकाराला ही भावांजली.......

    “ स्मृतीत तुमच्या मिळते स्फूर्ती, गातो आम्ही तुमची कीर्ती
    भावफुले ही तुम्हास अर्पण, स्मृतीस तुमच्या शतश: वंदन ”

    जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर
    (९८६०४४७५९७)

    ३ सप्टेंबर २०१६