जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
फॅशनफोटोग्राफी, व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रातल्या विश्वातील अग्रगण्य मराठी नाव म्हणजे “गौतम राजाध्यक्ष”! १६ सप्टेंबर १९५० रोजी मुंबई येथे जन्मलेल्या गौतम राजाध्यक्षांचे घराणे मुळातच बुध्दीवादी व्यक्तींनी संपन्न असल्यामुळे शिक्षण व करियरसाठी उत्तम वाव होता. मुंबईतल्या सेंट झेविअर हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमातील शिक्षण व याच महाविद्यालयातून बी.एस्सी पर्यंतच पदवीचं शिक्षण गौतमजींनी पूर्ण केले.
राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट म्हणून प्रख्यात अभिनेते राम नगरकर यांनी मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविले. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९३० रोजी झाला. ‘रामनगरी’ हे त्यांच्या आत्मकथनाचे धम्माल विनोदी पुस्तकही खूप गाजले. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले. ‘रामनगरी’ ला पुलंची प्रस्तावना आहे. त्यामुळेच हे पुस्तक तमाम मराठी जनतेने डोक्यावर घेतले. या पुस्तकावरून ‘रामनगरी’ या हिंदी सिनेमाचीही निर्मिती झाली होती व त्यात अमोल पालेकर हे प्रमुख भूमिकेत होते. हे सर्व होत असताना ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम १९८० साली मा.राम नगरकर यांनी सुरु केला. याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले. त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा नेहमीच पाहायला मिळाला. स्वतःची थट्टा-मस्करी करणाऱ्या या कलावंताने आपल्या अदाकारीने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.‘‘ दादा कोंडके, निळू फुले हे नगरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. १९९५ साली मा.राम नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांनीही रामनगरीचे असंख्य प्रयोग केले आहेत. रामनगरी हे राम नगरकर यांचे आत्मचरित्र खूपच गाजले आहे.
राम नगरकर यांचे ८ जून १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
एचआयव्ही / एड्स' वरील संशोधनासाठी पुण्यात भोसरी येथे कार्यरत असलेल्या नॅशनल एडस् रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्थेचा (नारी) इतिहास त्याचे संचालक डॉ. रमेश परांजपे यांच्याविषयी पूर्ण होऊ शकत नाही. 'एचआयव्ही' च्या विषाणूंशी लढा देणार्या शास्त्रज्ञांच्या या 'सेनापती' बद्दल...
डॉ. रमेश परांजपे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला एचआयव्ही विरोधी लढ्याचे सेनापती हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. रमेश परांजपे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला एचआयव्ही विरोधी लढ्याचे सेनापती हा लेख वाचा.

Dr Ramesh Paranjape
ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी झाला.पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली.
त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. संगीत सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला , जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा, जयजय गौरीशंकर ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण साक्षीदार, अमृत झाले जहराचे, मदनाची मंजिरी, स्वरसम्राज्ञी ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर बावनखणी हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. गझलसम्राट गालिब, शायरेआजम, शायरीचा शालिमार ही गालिबचे काव्य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे कविकथा हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. शंकर सुखकर हो हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच दृष्टी देऊन जातो. गोखले यांची लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. रंगशारदा ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. मा.विद्याधर गोखले यांचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ ग्लोबल मराठी
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. अशा वातावरणात शहरयार यांना शायरीची गोडी कशी लागली याचे अनेकांना आश्चर्य वाटते. त्यांचे शिक्षण बुलंदशहर आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठात झाले. अंजुमन तरक्की ए उर्दू या संस्थेत त्यांनी कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ते अलिगड मुस्लीम विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेच ते उर्दूचे विभागप्रमुख म्हणून सेवा निवृत्त झाले. जेव्हा उर्दू साहित्यात नवतेची आणि आधुनिकतेची लाट आली होती, त्याच काळात शहरयार यांनी उर्दू साहित्यलेखनात प्रवेश केला. त्यांचे अनेक समकालीन काळाच्या ओघात बाजूला पडले, पण शहरयार यांनी नव्या पिढीलाही आपल्या शायरीची भुरळ घातली. उमराव जान या चित्रपटासाठी त्यांनी लिहीलेल्या ‘दिल चीज क्या है आप मेरी...’, ‘यह क्या जगह है दोस्तो’, ‘इन आँखो की मस्ती में’ या गझला आजरामर ठरल्या. त्यांनी बॉलीवूडमध्ये गमन, अंजुमन यासह अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्या अभिजात दर्जामुळे चित्रपट गीतेही चिरस्मरणीय ठरली. ख्वाब का दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८७ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे इस्मे आजम, सातवाँ दर आणि हिज्र के मौसम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शहरयार यांचे निधन १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपण नेहमी ऐकतो ती गाणी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, ते नयन बोलले, पाहुनी पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला ही सर्व रमेश अणावकर यांनी लिहली आहेत.
सुरेल व अवीट गाणी देणारे रमेश अणावकर ह्यांची गाणी लताजी, आशाजी, अशा अनेक गायक, गायकानी गायली, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचली. आपण लहान पणापासून ऐकत असलेले हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग चेडवा दिसता कसा खंडाळ्याचो घाट हे गाणेही रमेशजीचे आहे.
रमेश अणावकर यांनी मालवणी भाषेतही अनेक गाणी लिहली आहेत. रमेश अणावकर यांचे ३० जानेवारी २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
रमेश अणावकर यांनी लिहिलेली काही गाणी
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
असा मी काय गुन्हा केला
आले मनात माझ्या
केशवा माधवा तुझ्या
गुपित मनिचे राया
ते गीत कोकिळे गा
ते नयन बोलले काहितरी
दिनरात तुला मी किती
नकळत सारे घडले
नाम घेता तुझे गोविंद
निरोप तुज देता ऊर्मिला मी
पत्र तुझे ते येतां अवचित
प्रभाती सूर नभी रंगती
बोले स्वर बासरिचा
मज सांग सखे तू सांग
मस्त ही हवा नभी
मी एकला वेड्यापरी
मी मनात हसता प्रीत
मुकुंदा रुसू नको इतुका
मृदुल करांनी छेडित तारा
रविकिरणांची झारी घेउनी
रंग तुझा सावळा दे मला
लाजली सीता स्वयंवराला
लाजवी मला हे नाव गडे
वार्यामवरती घेत लकेरी
सजणा तू सांग कधी
संगीत विश्वात सरदार मलिक यांना ‘सुरांचा सरदार’ म्हणून ओळखलं जात असे. हिंदी सिनेसृष्टी मध्ये भरीव काम करुन सुध्दा पहिल्या पाच मध्ये नाव न मिळवु शकलेला एक संगीतकार म्हणजे सरदार मलिक.
सरदार मलिक उत्तर प्रदेशमधील अल्मोडा गावचे. आयुष्यभर सर्वधर्मसमभावाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यासाठी ‘सरदार’ नाव धारण केलं. ते स्वत: सरदार, पत्नी बिल्किस तर मुलं अन्नू, अबू आणि डेबू. हिंदुस्थानी संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी अल्लाउद्दीन खाँ साहेबांकडे गिरवले. उस्ताद अली अकबर खाँ, पंडित रविशंकर हे त्यांचे गुरुबंधू होते. गायनाचं शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी पंडित विष्णुपंत शिराळी यांच्याकडून घेतलं. उदय शंकर यांच्याकडे नृत्यकला शिकले. पुढे सरदार मलिक संगीत दिग्दर्शनाकडे वळले. १९४७ मधील जयंत देसाईंचा ‘रेणुका’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट. ‘नायक मुबारक’साठी त्यांनी पार्श्वगायनही केलं; पण चित्रपट अपयशी ठरला. पुढे काही काळ ते एच.एम.व्ही.त काम करत होते. सरदार मलिक यांची संगीतकार म्हणून ओळख झाली ती ‘ठोकर’(१९५३)पासून.
‘ठोकर’मधलं तलतच्या आवाजातील शम्मी कपूरवर चित्रित झालेलं ‘ऐ गमे दिल क्या करू’ हे गीत माधुर्य, अर्थपूर्ण शब्द सौंदर्यामुळे मन वेडावून टाकत होतं. इंटरव्हलनंतर हाच मुखडा घेऊन पुढचा भाग आशाच्या आवाजात आहे. एक गाणं, तोच विचार दोन वेळा चित्रपटात द्यायची कल्पना सरदार मलिक यांचीच! हा चित्रपट पाहायला निर्माते-दिग्दर्शक पी. एन. अरोरा आले होते. ही दोन्ही गाणी ऐकून ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी ‘चोर बाजार’ या पुढच्या चित्रपटासाठी मलिकना करारबद्ध केलं. ‘हुई थी हम से नादानी, तेरी महफिल में आ बैठे, जमीं की खाक होकर, आसमां से दिल लगा बैठे.’ केवळ आपल्या आवाजाच्या जादूने भावनांमधील विविध छटांचा आविष्कार करण्याच्या बाबतीत त्या काळात लता मंगेशकरांना तोड नव्हती. ज्याला नाव देता येणार नाही, अशी एक अप्रतिम छटा त्यांनी सरदार मलिक यांच्या या गाण्यातून व्यक्त केली आहे. ‘झुक झुक जाए नजर शरमाए, किसी को कहां न जाए’ हसरत जयपुरीची ही हळुवार भावना गीता दत्तच्या आवाजात त्यांनी तितक्याच समर्थपणे पेश केली आहे.
विष्णुपंत शिराळींच्या गायकीचा जबरदस्त प्रभाव सरदार मलिक यांच्यावर होता. झोपाळयासारखा स्वरांचा चढ-उतार करत ते गाण्याची लज्जत वाढवत असत. त्यांच्या गायकीची झलक सरदार मलिक यांनी ‘आब-ए-हयात’मधील हेमंतकुमारच्या गाण्यातून दाखवली आहे. ‘मैं गरीबों का दिल हूं वतन की जुबां.’ वेळात वेळ काढून हेमंतकुमार यांनी सरदार मलिक यांच्यासाठी पार्श्वगायन केलं. हेमंतकुमार यांचं हे एक विशेष उल्लेखनीय गीत आहे. चोखंदळ रसिकांनी सरदार मलिक, आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतलेली काही गाणी ऐकल्यास त्यांना हा ‘सुरों का सरदार’ काय होता, याची थोडीफार कल्पना येईल. धीरूभाई देसाईंचा ‘सारंगा’ म्हणजे त्यांच्या प्रतिभाशक्तीचा उत्कृष्ट नमुना. रसिक श्रोत्यांसाठी जणू मेजवानीच. ‘पिया कैसे मिलू तुमसे, मेरे पाव पडी जंजीर’ (लता-रफी) या गाण्यातील अगतिक विरहिणी, ‘लागी तुमसे लगन साथी छुटे ना’ (मुकेश-लता) यातील लाडीक नखरा, लताच्या ‘कोई घर आएगा प्यार जगाएगा’मधील ढोलकीची रसपूर्ण साथ, सुमन कल्याणपूरच्या गाण्यातील मधुर दर्द आणि शेवटी लक्षात राहतो, तो मुकेश. ‘हाँ दिवाना हूँ मैं, गम का मारा हुआ इक बेगाना हूँ मैं..’ सरदार मलिक यांनी मुकेशच्या आवाजाचा अतिशय कुशलतापूर्वक उपयोग केला आहे. त्याच्या आवाजातील वजन कमी करून दिलेलं ‘सारंगा तेरी याद में, नैन हुए बेचैन’ हे गाणं म्हणजे, मुकेशच्या कारकिर्दीतला मानबिंदू आहे.
सरदार मलिक यांनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवून गाण्याच्या यशाचं श्रेय तारशहनाईवादक डी. एम. टागोर यांना दिलं आहे. टागोर यांना सर्व वादक कलाकार दुखींदा म्हणून ओळखत असतं. ते तारशहनाई वाजवताना इतकी व्याकूळता निर्माण करत, की ऐकणा-याच्या डोळय़ांतून अश्रू पाझरत असत. ‘सारंगा’ चित्रपटाने जितका बिझनेस केला, त्यापेक्षा अधिक बिझनेस त्याच्या ध्वनिमुद्रिकांनी केला. मा.सरदार मलीक यांनी सहाशेच्यावर गाण्यांना संगीत दिले आहे. संगीतकार अन्नु मलिक हे मा.सरदार मलीक यांचे चिरंजीव. सरदार मलीक यांचे निधन २७ जानेवारी २००६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / अरुण पुराणिक
सखा कलाल मूळचे बेळगावचे. ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. ग्रामीण जीवनातल्या वेदना आणि दु:ख सखा कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडलं आहे. त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांच्या तोंडचे संवाद परिणामकारक असतात. सखा कलाल हे कोल्हापूर भागातले प्रसिद्ध साहित्यिक आहेत. सखा कलालांनी आपल्या कथेतून माणसापुढे निर्माण होणाऱ्या अनेक गुंतागुंती मांडल्या. दुःखाची जटीलता माणसाचे सहजसुलभ जगणे कसे अवघड करते याविषयी विचार मांडला.
ग्रामीण माणसाचे दुःख किती गहिरे असते हे त्यांची कथा वाचून समजते. त्यांच्या कथेत दुःखांनी घेरलेली माणसे येतात. गरिबीतून बाहेर पडता येत नाही, मृत्यूचे सावट सतत असते, अकाली वैधव्यामुळे संघर्ष निर्माण होतो आणि संकटांना टाळता येत नाही, अशा हवालदिल जीवनाचा उलगडा त्यांच्या कथा करतात. एकूणच दुःखांनी बांधून टाकणाऱ्या माणसांची अस्वस्थ करणारी कथा सखा कलाल लिहितात. त्यामधील संवाद हे वाचकांना चिंतनशील बनवतात. 'ढग' आणि 'सांज' हे दोन कथासंग्रह त्यांनी 'पार्टी'आधी प्रसिद्ध केले. त्यातल्या 'ढग'ला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार लाभला, तर 'सांज'ला ते ज्या विद्यापीठात शिकले, त्याच विद्यापीठात क्रामिक पुस्तकाचा दर्जाही मिळाला. कलालांचं लेखन त्याउप्परही सुरु होतंच.
विविध नियतकालिकांतून कलालांनी लेख लिहिले. त्या लेखांचा संग्रह म्हणजे 'पार्टी'. हे फावल्या वेळचं लेखन नव्हे, हे स्पष्ट होतंच पण लेखकाची त्यामागची आंतरिक तळमळही जाणवत राहते. लेखनातला नितळ आत्मपर भाव आणि त्यांची घटना- प्रसंगांच्या निवेदनाची समर्थ शैली हळुवार बोचकारे घेत वास्तवाचं भान देत जाते, संस्कारांचं दर्शन घडवीत जाते आणि जगण्याचं वेगळं भान आणि अर्थ देऊन जाते. एक चांगला, विचारगर्भ लेखसंग्रह वाचल्याचा आनंद 'पार्टी' देत राहतो.
सखा कलाल यांच्या ‘सांज’ या कथासंग्रहातील ‘नीती’ ही कथा वाचकांना अस्वस्थपणाचा अनुभव देते. समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुरेश वाडकर यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५४ रोजी झाला. त्यांनी पाश्र्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले.
१९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्या मधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. १९७६ नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.
‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. प्रेमरोग, सदमा या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. मा. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने मराठी व अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार किळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
https://www.youtube.com/watch?v=_hfck-AakUg
मा.सुरेश वाडकर यांनी गायलेली काही मराठी गाणी
https://www.youtube.com/watch?v=7H4CU8vHuys
https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE
‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध नि:शब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा.
Copyright © 2025 | Marathisrushti