३० ते ३५ वर्षं चित्रपट क्षेत्रात, सुरुवातीच्या काळात यशराज फिल्म्स मध्ये स्टिल फोटोग्राफर नंतर रमेश तलवारकडे चिफ असि., मराठी चित्रपट, दिग्दर्शन व लेखन, आतापर्यंत २२ फिल्म्स.
नाट्य – सिने क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अजोड कामगिरी करुन दाखविणारे लेखक, दिग्दर्शक सुभाष फडके हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. ३० ते ३५ वर्षं चित्रपट क्षेत्रात लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतलेल्या सुभाष फडके यांनी सुरवातीच्या काळात यशराज फिल्म्स मध्ये “नुरी”, “सिलसिला” साठी स्टील फोटोग्राफी केली. नंतर रमेश तलवार यांच्याकडे मुख्य सहाय्यक म्हणून काम केले. या सर्व कामाच्या अनुभवातून पुढे १९९७ पासून स्वतंत्रपणे दिग्दर्शनाकडे वळले. आतापर्यंत त्यांनी २२ चित्रपटांचे, तसेच अनेक मालिकांचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकांमध्ये हेमा मालिनी प्रॉडक्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील “सोंगटी” व ई.टि.व्ही. मराठी वाहिनीवरील “उंबरठा” या दोन डेलीसोपचा समावेश होतो. याशिवाय “कोवळी मने”, “मुक्ती”, “संगम”, “छायागीत” अशा अनेक हिंदी, मराठी मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे “सेम टू शेम” या मराठी नाटकाचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. याशिवाय “आभास (२००६)”, “वारस झाले सरस (२००६)” इत्यादी अनेक टेलिफिल्म्स चे दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये “हसरी(१९९८)”, “तू न मी (२००४)”, “भिती(२००५)”, “अधांतरी(२००५)”, “चौकट(२००५)”, “बंड्या आणि बेबी(२००९)”, “शिवामृत (२०१०)” अशा अनेक १८ चित्रपटांचा समावेश होतो.