जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
नवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्या लढायांची झालर प्राप्त करून देणार्या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या.
ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे गावी झाला.
आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर ज्यांनी ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं.
त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे.
ज्योत्स्ना भोळे यांना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. ज्योत्स्ना केशव भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर होत. त्यांचा जन्म गोव्यातल्या बांदिवडे या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव वामन केळेकर होते. एकूण चौदा भावंडांपैकी त्या एक होत्या. त्यांना गाण्याचे उपजतच अंग आणि फार वेड होते.
वयाच्या आठव्या वर्षी पहिल्या दोन इयत्ता बांदिवड्याच्या शाळेत पूर्ण करून दुर्गा आपल्या थोरल्या गायिका भगिनी गिरिजाबाई यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आल्या. संगीत शिक्षणासाठी मुंबईस येणे भागच होते. त्या लॅमिंग्टन रोडवर राहत असत व तिथल्याच महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. संगीत हेच मुख्य ध्येय असल्याने त्यांनी शाळा सोडली.
गिरिजाबाई आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गवई खाँसाहेब विलायत हुसेन यांच्याकडे तालीम घेत असत. ज्योत्स्नाबाईही आग्रा घराण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम घेऊ लागल्या. मुंबईत शालेय, आंतरशालेय गायनस्पर्धांमध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावून त्यांचे बरेच नाव झाले होते. ‘बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या आकाशवाणीवर ज्योत्स्नाबाई महिन्यातून तीन-चार वेळा गात असत. बालगायिका म्हणून त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. तेराव्या-चौदाव्या वर्षापर्यंत त्या रागदारी संगीतातही उत्तमपणे पारंगत झाल्या.
याच सुमारास महाराष्ट्रात, खास करून मुंबईत काव्यगायन, त्यातूनच निर्माण होऊ पाहणारे ‘भावगीत’ हा गानप्रकार मूळ धरू लागला होता. केशवराव भोळे हे यात अग्रेसर असून, भावगीत गायक म्हणून संगीत शौकिनांमध्ये चांगलेच प्रसिद्ध व लोकप्रिय होते. त्यांच्या नाट्यपदांनी त्यांनी अगोदरच नाव मिळविले होते. केशव ‘एकलव्य’ या टोपणनावाने संगीतावर समीक्षापर लेखनही करीत होते. त्यामुळे याही क्षेत्रात त्यांच्या नावाची खूप चर्चा होती.
ज्योत्स्नाबाईंचा भाऊ रामराय हा केशवराव भोळ्यांचा मित्र व चहाता होता. त्याने केशवराव भोळ्यांना आपल्या बहिणीला भावगीत शिकवण्याची विनंती केली. या वेगळ्याच, नवीन व सुंदर गानप्रकाराचे ज्योत्स्नाबाईंना वेडच लागले. मनापासून, लक्षपूर्वक शिकून घेऊन त्यांनी ‘भावगीत’ आत्मसात केले. गाण्यातले भावनेचे महत्त्व त्यांना जाणीवपूर्वक असे प्रथमच या वेळी कळले. तोवरचे त्यांचे गायन हे नकळतपणे स्वाभाविक भावनेने होत असे. लवकरच ज्योत्स्नाबाई भावगीत गायिका म्हणूनही अतिशय लोकप्रिय झाल्या.
केशवराव भोळ्यांशी १९३२ साली त्यांचा विवाह झाला. केशव भोळे यांचे संगीत असलेल्या ‘कृष्ण सिनेटोन’ या कंपनीच्या ‘संत सखू’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. ज्योत्स्नाबाई यात सखूची भूमिका करीत होत्या. त्या वेळी त्यांचे नाव दुर्गा भोळे असेच होते; पण सिनेमात आणखी एक दुर्गा शिरोडकर नावाच्या नटी काम करीत होत्या. या दोन दुर्गांमुळे जरा गोंधळ होऊ लागल्याने लहान दुर्गाचे ‘ज्योत्स्ना’ असे नामकरण झाले व त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या.
केशवराव भोळ्यांचे, ज्योत्स्नाबाईंच्या सांगीतिक आयुष्यातलेही स्थान आत्यंतिक महत्त्वाचे होते. विवाहानंतर त्यांचे कलागुण अधिकच बहरू लागले. विवाहसमयी त्या जेमतेम अठरा वर्षांच्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच प्रो. बा.र. देवधर यांच्या म्युझिक सर्कलमध्ये मैफल करून ज्योत्स्नाबाईंनी देवधर मास्तर व जाणकार श्रोत्यांची दाद मिळवली.
केशवराव भोळे यांचा मंजी खाँ, रामकृष्णबुवा वझे, मल्लिकार्जुन मन्सूर, मास्तर कृष्णराव इ. अनेक गवयांशी स्नेह होता. त्यांनी अनेक बंदिशींचा संग्रह केला. वेगवेगळ्या घराण्यांच्या रंगांमुळे ज्योत्स्नाबाईंच्या गायकीचे एक स्वतंत्र, प्रभावी असे रसायन तयार झाले. पक्का सूर, लय-तालावरची पकड, तडफ, लालित्य आणि माधुर्य या गुणांनी युक्त असे त्यांचे गायन श्रोत्यांना खिळवून ठेवी.
बशीर खाँ, घम्मन खाँ (ठुमरीची तालीम) या उस्तादांकडेही त्यांनी थोडी तालीम घेतली. बरीच वर्षे त्या ‘तानरस खाँ’ घराण्याचे खाँसाहेब इनायत हुसेन यांच्याकडे शिक्षण घेत होत्या. त्यांनी अनेक गुरूंकडे डोळसपणे तालीम घेतली.
गोरख कल्याण, भीम, मधमाद सारंग, शुद्ध भटियार, शामकल्याण, जलधर-केदार इ. काही राग खास ज्योत्स्नाबाईंचे म्हणून लोकप्रिय झाले. भेंडीबाजार घराण्याचे मोहंमद हुसेन खाँ (सारंगिये कादरबक्ष यांचे चिरंजीव) यांनी बांधलेला ‘शिवकंस’ हा रागही ज्योत्स्नाबाईंनी गाऊन लोकप्रिय केला.
ज्योत्स्नाबाईंनी देशभरातल्या महत्त्वाच्या संगीत सभांमधून अनेक वर्षे गायन केले. असरदार गायन, तसेच आवाजावरची हुकमत, उत्तम दमसास, सूक्ष्म सांगीतिक जाण, रंगतदार आलापी, प्रभावी तानक्रिया, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ आणि सुधमुद्रा-सुधबानी म्हणजेच ज्योत्स्नाबाई.
लग्नानंतर वर्षभरातच, म्हणजे १९३३ मध्ये ज्योत्स्नाबाईंना नाटकात काम करण्याचा योग आला. ‘आंधळ्यांची शाळा’ हे ते नाटक. लेखक वर्तक, के.नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव दाते, केशवराव भोळे या नवमतवादी मंडळींनी ‘नाट्य मन्वंतर’ ही संस्था स्थापन केली.
रंगभूमीवर स्त्रियांनीच स्त्रियांची कामे करावीत या आग्रहाने ज्योत्स्नाबाई व वर्तकांची पत्नी रंगभूमीवर उभ्या राहिल्या. यापूर्वीही हिराबाई बडोदेकर व त्यांच्या भगिनींनी नाटकमंडळी काढून रंगभूमीवर कामे केली होती. पण ‘आंधळ्यांची शाळा’ हे सर्वार्थाने आधुनिक नाटक तर होतेच; पण यात संगीत म्हणजे अनंत काणेकरांची भावगीते घेतली होती व ती फार परिणामकारक, प्रसंगोचित होती. त्यामध्ये पार्श्वसंगीताचा वापरही प्रथमच केला होता. केशवराव भोळेच याचे संगीतकार होते.
ज्योत्स्नाबाईंचे हे प्रथम पदार्पण त्यांच्या ठायी असलेल्या रूप, संगीत व अभिनय या त्रिवेणी संगमामुळे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. पुढे १९४१ साली ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्हणून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या. त्यांनी या संस्थेत एकूण अकरा नाटकांतून प्रमुख भूमिका केल्या, पैकी ‘संगीत कुलवधू’ने त्यांना अजरामर कीर्ती दिली.
मास्तर कृष्णरावांचे संगीत या नाटकाचे महत्त्वाचे यश होते. ज्योत्स्नाबाईंचे अभिनयमंडित गायन, तेही संयम ठेवून नेटके व वेधक असे. हा बदल घडवून आणण्याचे मोठे श्रेय ज्योत्स्नाबाईंना, लेखक-दिग्दर्शक मो.ग. रांगणेकरांना, तसेच मास्तर केशव, श्रीधर पार्सेकर, स्नेहल भाटकर इ. संगीतकारांनाही जाते. ज्योत्स्नाबाईंच्या अत्यंत लोकप्रिय नाट्यपदांमध्ये, ‘कुलवधू’तील सर्व पदे, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मन रमणा मधुसूदना’, ‘बोला अमृत बोला’; ‘एक होता म्हातारा’मधील ‘छंद तुझा मजला’, ‘ये झणी येरे माघारी’; ‘कोणे एके काळी’मधील ‘का रे ऐसी माया’ ही भैरवी; ‘राधामाई’ या नाटकातले ‘खेळेल का देव माझिया अंगणी’; ‘भूमिकन्या सीता’मधील ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन’, ‘मानसी राजहंस पोहतो’ इ. वानगीदाखल सांगता येतील. ‘कुलवधू’तील ‘बोला अमृत बोला’ने लोकांच्या अंत:करणाचा ठाव घेतला.
ज्योत्स्नाबाईंना उत्कृष्ट भावगीत गायिकेचाही मान मिळाला. आकाशवाणीवरही त्यांच्या भावगीतांना वाढती मागणी येऊन अधिक प्रसार झाला. त्या बहुतांशी राजा बढे, अनंत काणेकर, कवी अनिल, मो.ग. रांगणेकर अशा कवी-गीतकारांच्या रचना गात असत.
त्यांच्या लोकप्रिय भावगीतांमध्ये राजा बढे यांची ‘माहेर’विषयीची तीन गीते, यांतील ‘माझिया माहेरा जा’ हे पुलंनी चाल दिलेले फारच लोकप्रिय झाले. अनंत काणेकरांचे ‘किती गोड गोड वदला’ व ‘आला खुशीत समींदर’; मो.ग. रांगणेकरांचे ‘नको वळून बघू माघारी’ इ.च्या ‘यंग इंडिया’, ‘कोलंबिया’, ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ अशा कंपन्यांनी ध्वनिमुद्रिकाही काढल्या.
ज्योत्स्नाबाईंच्या भावगीतांत विस्तार-शक्यता असूनही त्या खूप तारतम्याने, जडपणा आणू न देता, चालीच्या अंगाने आकर्षकपणे गायल्या याची प्रचिती त्यांची कोणतीही ध्वनिमुद्रिका ऐकताना येते.
खानदानी गाण्याच्या तालमीमुळे आवाजाला जी झिलई व तेज लाभले, त्याचा त्यांनी नाट्यपदे व भावगीते यांत वेगळा आणि खुबीने वापर केला. त्यांनी गीतांचा व नाट्यगीतांचाही दर्जा जो प्रथमच उंच करून ठेवला, याचे महत्त्व फार मोठे आहे. ती त्यांची या क्षेत्राला देणगी आहे. कारण त्यामुळेच श्रोत्यांना विशिष्ट दर्जाची भावगीते ऐकण्याची चोखंदळ वृत्ती आली. त्यांची अभिरुची घडली.
ज्योत्स्नाबाईंनी गीतापासून भावगीत, भावगीतापासून पद, पदापासून ख्याल ही सगळी स्थित्यंतरे मोठ्या सहजपणे केली. सुगम संगीत पुढे नेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात एक पद्धत अशी की, आकार तोच ठेवायचा; पण त्यात स्वत:च्या आवाजाच्या पोताची भर घालायची, आणि हे ज्योत्स्नाबाईंनी केले.
ज्योत्स्नाबाईंनी थोडे लेखनही केले. १९६० च्या सुमाराला त्यांनी ‘आराधना’ हे संगीत नाटक लिहिले. निर्मिती, दिग्दर्शन, काव्य, संगीत सर्वकाही त्यांचेच होते. चारएक वर्षांनी ‘अंतरीच्या खुणा’ हे पत्ररूपी पुस्तक, तसेच नभोवाणीसाठी ‘घराण्याचा पीळ’ ही नाटिका लिहिली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार, ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार (१९८०), संगीत नाटक अकादमीचा संगीत अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७७), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, चौसष्टाव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून १९८४ साली बिनविरोध निवड, गोमंतक मराठी अकादमीचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९५), महाराष्ट्र सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९९) असे काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. १९९९ मध्ये, त्यांच्या निधनाच्या तीन वर्षे आधी ‘तुमची ज्योत्स्ना भोळे’ हे आत्मचरित्र लिहिले होते.
पुण्यातील सृजन फाऊंडेशन ही संस्था २००९ सालापासून दरवर्षी दोन दिवसांसाठी ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’ नावाचा कार्यक्रम आयोजित करते. ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ वंदना खांडेकर
वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालेल्या बर्व्यांनी नक्षलवादी चळवळीसंबंधी “रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता” हे पुस्तक लिहिले. तसेच त्यांनी “स्टडफार्म” (कादंबरी) थॅंक्यू मि. ग्लाड, पुत्रकामोष्टी, आकाश पेलताना आदी नाटके आणि “मा निषाद”, “फाशीगेट” हे कथासंग्रह लिहिले.
संगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे?” यावर उत्तर,”देवाला आपण लॅरी एलिसन आहोत असं वाटत नाही.” यातूनच लॅरी एलिसन हा किती महत्वाकांक्षी माणूस होता याची कल्पना येईल. ओरॅकल नावाच्या त्याच्या कंपनीने मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरेल अशी जबरदस्त मुसंडी मारली. विशेष करुन माहिती साठवायच्या म्हणजेच डेटाबेसेसच्या तंत्रज्ञानात तर अशी मुसंडी मारली की त्याच्यापुढे भल्याभल्यांनी हार मानली. सुमारे २७०० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा माणूस २००० सालच्या “फ़ोर्ब्स” मासिकात बिल गेट्सच्या खालोखाल जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जागा मिळवून गेला.
ज्यांच्या कथांवर अनेक मराठी आणि 'बीवी ओ बीवी' हा हिंदी चित्रपट निघाला, ते प्रा.प्रभाकर तामणे यांनी 'पुनर्मीलन', 'रात्र कधी संपू नये', 'जीवनचक्र' आदी कादंबऱ्या पण लिहिल्या पण प्रा.प्रभाकर तामणे गाजले ते विनोदी कथाकार म्हणून. मा.प्रभाकर ताम्हणे यांचे ७ मार्च २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठीतले उत्तम संकलक राजा ठाकूर व एक यशस्वी दिग्दर्शक राजा ठाकूर यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला. राजा ठाकूर यांचे वडील नोकरी निमित्त मुंबईला आले आणि पोलिस खात्यात नोकरीला लागले. नोकरीतल्या बढतीमुळे वडिलांची वारंवार तालुक्याच्या ठिकाणी बदली होई. वडील पोलिसात असूनही रसिक होते. गंधर्व कंपनीची नाटके ते आवर्जून पाहत. तालुक्याच्या ठिकाणी नाटकं आली तर मालकाला व नटवर्गाला ते घरी जेवायला बोलावत.
अडीअडचणीला मदत करीत. राजा ठाकूरांची नाटकाची व नाट्यसंगीताची आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्याला रत्नागिरीला खेळ करीत असलेल्या ‘देशबंधू नाटक मंडळी’त स्वत: नेऊन पोचवले. ही घटना १९४० सालची. दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. १९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं. राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. त्यांनी राजाला तार करून बोलावून घेतलं व त्याच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं- ‘बलिदान’. १९४७च्या ‘बलिदान’पासून ते १९५३पर्यंत सुमारे १५ चित्रपटांचं संकलन राजानं केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून नाव मिळवलं. संकलक राजा ठाकूर हे दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे घनिष्ठ सहकारी होते. छायाचित्रकार बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते.
बाळ बापट व राजा ठाकूर हे वेळ मिळेल तेव्हा पुण्यातील कॅम्प एरियात असण्याऱ्या ‘वेस्टएन्ड’, ‘एम्पायर’, ‘कॅपिटल’ अशा चित्रपटगृहांमध्ये जाऊन इंग्रजी चित्रपट बघत. त्यातील कथेचे नावीन्य, तंत्राची ताकद त्यांना आवडे. फ्रँक काप्रा, बिसी वायलर, हिचकॉक या दिग्गज दिग्दर्शकांबद्दल ते वारंवार बोलत. मा.राजा ठाकुरांनी संकलक म्हणून नाव कमावलं. परंतु त्यांच्या मनात एक ‘प्रतिभावंत’ कल्पक दिग्दर्शक दडला होता. १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूरांची अनेक वैशिष्ठ्ये होती.
राजा ठाकुरांचे वाचन चांगले होते. मराठी व इंग्रजीतील उत्तमोत्तम पुस्तके वाचण्याचा त्यांना नाद होता. त्यामुळेच त्यांच्या सर्वच चित्रपटांच्या कथा सकस होत्या. उत्तम साहित्यिकांकडून त्यांनी पटकथा-संवाद लिहून घेतले. त्यात ग. दि. माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, शं. ना. नवरे, राम केळकर, पु. भा. भावे, सुरेश खरे, रणजित देसाई अशी मंडळी होती. यातील शं. ना. नवरे, पु. भा. भावे, सुरेश खरे, राम केळकर व रणजित देसाई यांना त्यांनीच आग्रह करून पटकथा-संवाद लेखक बनवले. ठाकुरांच्या चित्रपटांचे मूळ कथा लेखक दत्त रघुनाथ कवठेकर, अरविंद गोखले, चिं. वि. जोशी, पं. महादेव शास्त्री जोशी, द. ग. गोडसे, बाबुराव अर्नाळकर, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे, ग. वा. बेहेरे असे ख्यातकीर्त साहित्यिक होते.
मराठी चित्रपटसृष्टीत त्याकाळी तमाशा, लावणी, पाटील व कुर्हाटड यांचा वापर करणार्या ग्रामीण चित्रपटांची चलती होती. पण राजा ठाकूर त्या वाटेला गेले नाहीत. त्यांच्या चित्रपटांपैकी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ आणि ‘रंगल्या रात्री अशा’ या दोन्ही चित्रपटांचं कथानक जरी तमाशाप्रधान असलं तरी तिथे चाळांचा किंवा लावण्यांचा उपयोग गल्ल्यासाठी केला नव्हता. किंबहुना या चित्रपटात उपेक्षित कलावंतांचं अंतरंग उलगडून दाखवण्याची राजा ठाकुरांची तळमळच अधिक जाणवते. मानवी भावना आणि माणसांची आपापसातील साधी वाटणारी पण गुंतागुंतीची नाती हा ठाकुरांचा लाडका विषय होता.
राजा ठाकुरांनी सामाजिक चित्रपट दिले. पण त्याबरोबर ‘गजगौरी’सारखा पौराणिक, ‘राजगडचा राजबंदी’सारखा ऐतिहासिक, ‘गोरा कुंभार’सारखा संतपट आणि ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ व ‘रंगल्या रात्री अशा’सारखे थोडा तमाशा दाखवणारे चित्रपट दिले. ‘बिरबल माय ब्रदर’सारखा इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक होते. याच चित्रपटानं त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचं दार खुलं केलं. राजाभाऊंच्या मराठी चित्रपटांनी अनेक पारितोषिके मिळवली होती पण रौप्यमहोत्सव साजरा केला नव्हता. मात्र ‘जखमी’ने अनेक ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा केला. ‘जखमी’नंतर ‘रईसजादा’ हा हिंदी चित्रपट राजा ठाकुरांनी करायला घेतला. पण त्यांच्या यशाला कुणाचीतरी दृष्ट लागली. हा चित्रपट त्यांच्या हयातीत पुरा होऊ शकला नाही.
राजा ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सहा वेळा उत्कृष्ट चित्रपटाचा व सहा वेळा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या तंत्रज्ञालाही अनेक पुरस्कार मिळाले. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एकटी’ व ‘मुंबईचा जावई’ या चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. शांत स्वभावाचे राजा ठाकूर साहित्यिक, कलावंत नट, यांच्यात रमत. त्यांचा सुसंस्कृतपणा बोलण्यात व आचरणातून दिसत असे. मा.राजा ठाकूर यांचे २६ जुलै १९७५ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ मधू पोतदार
जे पी नाईक यांनी वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. जे पी नाईक यांचे पूर्ण नाव ‘विठ्ठल हरि घोटगे! असहकार चळवळीत १९३० मध्ये भूमिगत असताना त्यांनी आपले नाव बदलले व ते जयंत पांडुरंग नाईक झाले. पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. जे पी नाईक यांनी महात्मा फुलेंची परंपरा पुढे चालवून वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी आयुष्य खर्च केले.
अपर्णा संत यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण श्री बैरागी बुवा, प्रभाकर जोशी. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९७० रोजी झाला. श्रीमती वसुमती भागवत यांच्याकडे कोरेगाव आणि सातारा येथे झाले. श्रीमद् भगवद् गीतेतील तील तत्त्वज्ञान सांगणाऱ्या पंचवीस हिंदी व पंचवीस मराठी गाण्यांना अपर्णा संत यांनी चाली दिल्या आहेत. सध्या हा कार्यक्रम अपर्णा संत व आर्या आंबेकर सादर करत असतात. सुप्रसिद्ध दिग्दर्शक पंडित श्रीनिवास खळ्यांनी अपर्णा संत यांच्यासाठी जनाबाईचे अभंगाना चाली दिल्या आणि २००७ साली ‘अभंग जनाईचे’ ही अपर्णा संत यांची सी.डी यांच्या श्रीनिवास खळे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली प्रसिद्ध झाली आहे. अपर्णा संत यांनी संगीत क्षेत्रातील नामवंत ज्योत्स्ना भोळे गजानन वाटवे, अरुण दाते, सुरेश वाडकर, रवींद्र साठे श्रीधर फडके, सलील कुलकर्णी, स्वप्निल बांदोडकर यांच्या बरोबर कार्यक्रम केले आहेत.
अपर्णा संत या भावसंगीत व चित्रपट संगीतावरील सांगीतिक विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करतात. संगीतकार मदन मोहन किंवा इतर अनेक संगीतकारांवरचे संगीतकारांच्या विविध सांगीतिक परिभाषेतील बद्दलचे कार्यक्रम त्या त्यांच्या विद्यार्थिनींना घेऊन कार्यक्रम सादर करत असतात.
‘गुरुवंदन’, ‘मधुबोली’, ‘इंडेमाऊ ची गाणी’ (बालगीते), ‘ही बहिण बहिणाबाईची’ हे अल्बम अपर्णा संत यांनी संगीत बद्ध केले आहेत. या अल्बम्स मध्ये सुरेश वाडकर, रवींद्र साठे, स्वप्निल बांदोडकर. आर्या आंबेकर. प्रियांका बर्वे प्रांजली बर्वे यांनी आवाज दिलेला आहे. तसेच शांताबाई शेळके यांच्या कवितांवर कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम अपर्णा संत यांनी बसवलेले आहेत.
‘गाणं मनातलं’ हा स्वतः संगीत दिलेल्या वचनांचा रंगमंचीय आविष्कार त्या सादर करतात. ‘मल्हार अकॅडमी ऑफ म्युझिक” ही त्यांची स्वतःची संस्था असून या संस्थेद्वारे अपर्णा संत सुगम संगीत व ओंकार साधना प्रशिक्षण वर्ग १९९९ सालापासून घेत आहेत. अपर्णा संत यांना गाण्यासाठी उषा अत्रे पुरस्कार व रोटरी क्लब कडून पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा आगामी प्रोजेक्ट म्हणजे सुधीर मोघे यांच्या कवितांचा रंगमंचीय अविष्कार सादर करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘अजिंठा’, ‘मराठवाडा’ या दैनिकांपासून त्यांनी चित्रपट समीक्षा लेखनास आरंभ केला. महाराष्ट्रातील विविध दैनिकांत चित्रपट, दूरदर्शन या विषयावर जसे दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत, मराठवाडा, अजिंठा इत्यादी ठिकाणी त्यांनी विपुल प्रमाणात स्तंभ लेखन केले आहे. चित्रपट समीक्षक म्हणून आजवर त्यांनी तब्बल ३३६५ मुलाखती घेतल्या आहेत. चित्रपट विषयास वाहिलेला नवरंग रुपेरी नामक दिवाळी अंकाची स्थापना त्यांनी १९८७ साली केली व जवळपास ३० वर्षे त्याचे संपादन केले.
तेजस्वी पाटील… नावाप्रमाणेच तेजस्वी चेहरा… तरल भावछटा अभिनेत्रीबरोबरच ती अभ्यासू कलाकार आहे….
भगवानदादा यांच्या आयुष्यावर चितारलेला ’एक अलबेला’ हा सिनेमा मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी एक माईलस्टोन ठरला. सिनेमात भगवानदादांच्या मध्यवर्ती भूमिकेत मंगेश देसाई झळकला. तर याच सिनेमात लक्षवेधी भूमिका ठरली ती भगवानदादांच्या पत्नीची. एरवी मॉडर्न गर्ल म्हणून मराठी इंडस्ट्रीत वावरणारी तेजस्वी पाटील हि चक्क सोज्वळ, घरंदाज, साध्या वेषात भगवानदादांच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाली. आपल्या कसदार अभिनयानं तेजस्वीनं या वेगळ्या भूमिकेचं सोन केलं.
लग्नानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या काही मोजक्या यशस्वी कलावती आहेत. तेजस्वी पाटील ही यापैकी एक. स्वदीप पाटील या व्यावसायिक तरुणाशी तेजस्वीचं लग्न झालं आणि लग्नानंतर व्यवसयिक कलाकार म्हणून तेजस्वीने ओळख निर्माण करावी अशी स्वदीपची इच्छा होती. तेजस्वीचं कलाकार होण्याचं स्वप्न स्वदीपच्या मदतशीर स्वभावामुळेच शक्य झाल्याचं तेजस्वी सांगते. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली मी आणि तेजस्वी फोटोशूटसाठी तिच्या अंधेरीच्या घरी भेटलो होतो. त्यावेळी ती सांगत होती. यावेळी तेजस्वीचा एमबीएपर्यंतचं शिक्षण तर यापुढे एचआरमध्ये तिने केलेलं स्पेशलायझेशन या सगळ्यावर आम्ही गप्पा मारत होतो. सणानिमित्ताने तेजस्वीचं फोटोशूट आम्ही करत होतो. हे करताकरता तेजस्वी तिच्या आवडीनिवडी, तिचा सिनेइंडस्ट्रीतला प्रवास आणि त्यातल्या गमतीजमाती सांगत होती. या गप्पांमुळे तेजस्वी रिलॅक्स झाली होती. तिच्यावर शूटचं टेन्शन अजिबात जाणवत नव्हतं आणि म्हणूनच शूटच्या दरम्यान बोलक्या तेजस्वीचे हसरे, प्रसन्न फोटो मला टिपता आले.
२०१३-१४ साली तेजस्वी ’प्राजक्ता’ या तिच्या ’मी मराठी’ चॅनलवरील प्रमुख भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तर यानंतर झी टीव्हीवरील ’भाग्यविधाता’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. यानंतरचा तेजस्वीचा प्रवास मला आमच्यातल्या संभाषणामुळे वेळोवेळी समजत होता. २०१३ साली पुन्हा आम्ही एका शूटच्या निमित्ताने एकत्र काम केलं. मराठी सणवार बेतलेलं हे शूट होतं. हा मराठमोळा साज लक्षात घेऊन तेजस्वीचा लूक काय असेल यावर माझी टीम काम करत होती. सगळ्यात आधी तिचा लूक ठरला. त्यानंतर कॉस्च्युम मग मेकअप आणि हेअर आणि सगळ्यात शेवटी त्यावरचे दागिने आणि इतर बाबी ठरवण्यात आल्या. या लूकला तेजस्वीचीही पसंती मिळाली आणि शूटचा दिवस ठरला.
नेहमीच ठरलेला मराठमोळा लूक न निवडता यावेळी तेजस्वीसाठी मॉडर्न लूक निवडण्यात आला होता. या मॉडर्न लूकमध्ये तेजस्वीचा चेहरा अधिक खुलून दिसत होता. तेजस्वीचं स्मितहास्य, डोळ्यांतली चमक आणि प्रसन्न चेहऱयामुळे हे शूट यशस्वीपणे पार पडलं. याच शूटनंतर तेजस्वीचे वेस्टर्न आऊटफिटमध्ये एक फोटोशूट करण्यात आलं. शॉर्ट वन पीसमध्ये तेजस्वीचं ग्लॅमर शूट करण्यात आलं. यावेळी तेजस्वीच्या चेहऱयावर थोडीशी भीती दिसत होती. एरवी मॉडर्न कपडय़ांत सहज वावरणारी तेजस्वी यावेळी थोडी शांत शांत दिसली. आम्ही काही फोटो काढले; परंतु हवे तसे फोटो मिळत नव्हते. थोडावेळ थांबून तेजस्वीशी बोलून मग पुन्हा हे फोटोशूट करण्यात आलं. तेजस्वी आता थोडी खुललेली दिसली आणि मग बिनधास्त तेजस्वीचे हटके फोटो मला यावेळी टिपता आले.
या शूटनंतर पुन्हा मला तेजस्वीचं फोटोशूट करण्याची संधी मिळाली. व्यावसायिक फोटोशूटची संधी जितकी हवीहवीशी वाटते तितकीच त्याची जबाबदारीही जास्त असते. शूटचा दिवस ठरला आम्ही स्टुडिओ १०९ मध्ये भेटलो. तेजस्वीच्या शूटच्या आधी ‘झाला भोबाटा’ या गाजलेल्या मराठी सिनेमातील मोनालिसा बागलाच फोटोशूट मला करायचं होत. हे शूट थोडं लांबलं आणि तेजस्वीच्या शूटला आम्हाला उशीर झाला. तेजस्वी मेकअप रूममध्ये शांत बसली होती. एखाद्या कलाकाराचं शूट ठरलेल्या वेळेत सुरू व्हावं म्हणून माझी टीम शूटच्या किमान तासभर आधी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असते आणि शूट वेळेतच सुरू झालं पाहिजे असा माझा नेहमीच आग्रह असतो; परंतु त्यादिवशी तेजस्वीच्या शूटला उशीर झाला. तेजस्वीने नेहमीप्रमाणेच त्यादिवशीही शूटसाठी मदतशीर होती. साधारणपणे अर्धा तास हे शूट उशिरा सुरू झालं. स्टुडिओत तेजस्वीचं शूट सुरू झालं आणि तिच्या चेहऱयावर एक वेगळंच तेज यावेळी मला पाहायला मिळालं. संयमी स्वभावाच्या तेजस्वीचं हेच रहस्य तिच्या सिनेमातल्या कामातही बघायला मिळतं. उगीच मिळतील ते सिनेमे, वरवरची कामं तेजस्वी टाळते. संयमानं चांगल्या कामाची वाट बघते आणि मिळालेल्या संधीच ‘सोनं’ करण्यासाठी अपार मेहनत घ्यायची तयारी दाखवते हेच तेजस्वीच्या यशाचं गमक असावं.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti