जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. सुमित्रा भावे या मुळच्या पुण्याच्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुणे येथे झाला. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन त्यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या कला विभागात नृत्यामध्ये यांचा सहभाग होता. तरुण वयात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी वृत्त निवेदन ही केले. १९६५ साला पर्यत त्या टाटा इन्स्टिट्यूट मध्ये काम करत होत्या. टाटा इन्स्टिट्यूट सोडल्यावर त्या १९८५ पर्यत सोशल वर्क फिल्डमध्ये काम करत होत्या. त्यात दहा वर्षे पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्याचे अध्यापन, अनेक सामाजिक संशोधने आणि शोधनिबंध, उरुळीकांचन येथे सर्वोदय अध्ययन केंद्र हा शिक्षण प्रयोग, मुंबईच्या कास्प- प्लान या झोपडपट्टी वस्त्यामधील मुले व कुटूंबे यांच्या विकास योजना प्रकल्पाच्या प्रमुख पदाचा कार्यभार या अनुभवानानंतर त्यांनी पुण्याच्या स्त्री-वाणी या संस्थेच्या संचालक पदावरही काम केले.
या दरम्यान दलित, अशिक्षित स्त्रीं यांच्या स्वप्रतिमेच्या अभ्यासाचे निकष त्यांच्या पर्यंत पोहचविण्याच्या ईर्षेतुन त्या १९८५ सालापासून चित्रपट माध्यमाकडे वळल्या. सुमित्रा भावे या काही मूळच्या चित्रपट किवा कला क्षेत्रातील नाहीत. त्यांचा पिंड समाजसेवकाचा. समाजसेवा करताना आलेले अनुभव, प्रसंग, त्यांच्या सर्जनशील मनाने सूक्ष्मपणे टिपले. त्याच्या अभिव्यक्तीसाठी चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम त्यांनी वापरले. त्यावेळी वाणिज्य शाखेत शिक्षणारा आणि नाट्य उपक्रमामध्ये रमलेला विद्यार्थी सुनिल सुकथनकर त्यांना सहकारी म्हणुन लाभला. त्यांचा बाई हा पहिला लघुपट राष्ट्रपती पदक विजेता ठरला. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर या दोन व्यक्तीमत्वांचे कार्यक्षेत्र भिन्न होते, परंतु ध्येय एकच होते, ते म्हणजे सामाजिक जागृती. योगायोगाने ते एकत्र आले. समांतर चित्रपट आजपर्यंत सरंजामशाही, शोषण, अत्याचार, विवाहबाह्य संबंध या पलिकडे गेला नव्हता. या दिग्दर्शक द्वयीने ' दोघी, वास्तूपुरूष' यासारखे गंभीर विषय हाताळून या चित्रपटाला त्यापलीकडे पोहोचविले.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडीने चौदा चित्रपट, ५० हुन अधिक लघुपट, ३ दुरदर्शन मालिकांची निर्मिती व दिग्दर्शन केले. जिंदगी जिंदाबाद, १० वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, हा भारत माझा, संहिता, अस्तु,दोघी, कासव असे त्यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट व लघुपटांना तीन आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० हुन अधिक राज्य पुस्कार, तसेच झी, स्क्रीन, म.टा. सन्मान आदी पुरस्कार मिळाले आहेत. देश विदेशातील अनेक महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शनही झाले आहे. या दिग्दर्शक द्वयीला दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या चित्रपटांचे स्वतंत्र कथा- पटकथा- संवाद लेखन, सुमित्रा भावे यांनीच केले असुन संहिता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सुनिल सुकथनकर यांनी यातील अनेक चित्रपटांसाठी तसेच इतरही काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. कर्नाटकातील शाश्वकती या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी एका भाषेतील अभिजात साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा कामधेनु पुरस्कार सुमित्रा भावेंना मराठी भाषेसाठी त्यांच्या संहिता लेखनातील साहित्यिक मुल्यांसाठी २०१३ मध्ये देण्यात आला.
सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी यांच्या चित्रपटातुन मानवी मन, नाते संबंध आणि समाज मन यांच्या गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एम.के.सी.एल. या संस्थेसाठी ‘ माझी शाळा’ ही शिक्षणातील ज्ञानरचनावादाची कथात्मक मांडणी करणारी दुरदर्शन मालिका निर्माण केली होती. मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ही मालिका ४० भागांमध्ये दाखविण्यात आली. त्यांना केरळ मधील अरविंदन स्मृती पुरस्कार, सह्याद्री चित्ररत्न पुरस्कार, साहिर लुधियानवी - बलराज सहानी प्रतिष्ठान तर्फे दिला गेलेला के.ए.अब्बास स्मृती पुरस्कार मिळाले आहेत.
सुमित्रा भावे नेहमी म्हणतात माझा सिनेमा गल्ला भरण्यासाठी कधीच नव्हता आणि भविष्यातही नसेल. त्याचे दुःखही मला वाटत नाही. या सिनेमांसाठी प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी व्हावी, असेही कधी वाटले नाही. मी एक सिनेमाची अभ्यासक आहे आणि मानवी भाव-भावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. त्यामागे केवळ सकस समाजनिर्मितीचाच प्रामाणिक उद्देश असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.
त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.
त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.
कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.
त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. मा.कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या.
त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.
पं.दिनकर कैकिणी यांचे २३ जानेवारी २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.
समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले.
दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.
प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या गिरिजा ओक. तिचा जन्म २७ डिसेंबर रोजी झाला. १५ वर्षाची असताना तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळे मडगुळे' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' या झी मराठी वरिल मालिका हि तीची पहीली मालिका होती. जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या तिचं ‘दोन स्पेशल हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. ही हरहुन्नरी अभिनेत्री बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
एकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.
शाहिर साबळे यांच्या लोकधारेतून पुढे आलेल्या संतोष पवार यांनी आपली घोडदौड ‘यदा कदाचित’ पासून चालू केली.
सातार्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेला एक मुलगा हुषारी आणि इच्छाशक्तीच्या बळावर लंडनमध्ये अर्थशास्त्रातील पीएच . डी . मिळवतो आणि पुढे कॅनडाचे मानवी हक्क आयुक्त हे पद भूषवीत जगभरातील मानवी हक्क यंत्रणांवर आपला ठसा उमटवतो, हे कर्तृत्व अपवादात्मकच. भाऊसाहेब उबाळे या एका मराठी माणसाच्या नावे ते जमा असावे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब.
भाऊसाहेबांचे वडील सरकारी कर्मचारी असले, तरी स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सहभाग होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या मूल्यांचे भाऊसाहेबांवर बालवयातच संस्कार झाले. कॉलेज शिक्षणासाठी ते मुंबईत आले. नोकरी करीत त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे काही काळ त्यांनी सरकारी नोकरीही केली. पुढे गाठीला फारसे पैसे नसतानाही त्यांनी लंडनला प्रयाण केले. उबाळे यांनी तेथे अर्थशास्त्रातील पीएच. डी. मिळवली. या काळात त्यांनी पत्रकारिताही केली.
१९७५ मध्ये त्यांनी कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पात्रता असूनही त्यांना तेथे सुमारे दोन वर्षे कारकुनाखेरीज अन्य नोकरी दिली गेली नाही. हा अर्थातच वांशिक भेदभावाच्या मनोवृत्तीचा परिणाम होता. उबाळे यांनी समाजातील सर्व घटकांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. त्या काळात ईस्ट इंडियन्स तसेच पाकिस्तानी स्थलांतरितांच्या विरोधात कॅनडात हिंसक दंगे होत होते. उबाळे यांनी या हल्ल्यांचा तपशीलवार अभ्यास करून अहवाल तयार केला. पत्रकारितेतील अनुभवाचा वापर करीत, त्यांनी एका लहान मुलीच्या हस्ते तो जाहीर सभेत सरकारला 'सादर' केला . 'अहवालात काय आहे हे मला कळत नाही, पण माझं भविष्य त्यावर अवलंबून आहे,' हे त्या मुलीचं विधान माध्यमांनी उचलून धरलं आणि नंतर खुद्द पंतप्रधानांनी जाहीर सभेत या अहवालातील सर्व शिफारशी स्वीकारल्या ! 'उबाळे अहवाल' म्हणूनच तो ओळखला जातो. कॅनडातील समाजातील बहुविधता जपतानाच, त्यातील विविध वांशिक गटांत भावनिक एकजिनसीपणा आणणे, संधीच्या समानतेचे तत्त्व रुजविणे, याकरिता उबाळे कार्यरत राहिले.
कॅनडा सरकारनेही देशाचे मानवी हक्क आयुक्त तसेच वांशिक संबंध आयुक्त या पदांवर त्यांची नियुक्ती करून, त्यांच्या कल्पकतेचा आणि तळमळीचा सुयोग्य वापर करून घेतला. गरिबी निर्मूलन हा मानवी हक्कांचाच अविभाज्य भाग आहे, यावर त्यांचा भर होता. त्यामुळे मानवी हक्क चळवळीबरोबरच, 'इंटरनॅशनल सेंटर फॉर पॉव्हर्टी इरॅडिकेशन' ही संस्थाही त्यांनी स्थापन केली होती आणि त्यातून ग्रामीण विकासाला चालना देणारी कामे केली जात होती.
कॅनडात १९७५ सालापासून वास्तव्य असलेल्या आणि तेथील राजकीय - सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळवलेल्या भाऊसाहेबांनी जगाचा निरोप घेतला तो मात्र त्यांच्या मायदेशात आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण जेथे झाले त्या पुण्यात.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले!
विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.
विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. मा.विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले.
जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत.
दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला आहे. मा.चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti