(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गणपतराव जोशी

    चंद्रसेन (हॅम्लेट), झुंझारराव (ऑथेल्लो), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.

  • ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे

    ज्येष्ठ गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे गावी झाला.

    आपल्या अथक परिश्रमांच्या बळावर ज्यांनी ‘स्वरज्योत्स्ना’ असं नावं मिळवलं.
    त्या गायला लागल्या, की वाद्यं आपोआप झंकारायला लागत, असं म्हटलं जात असे. गायिका म्हणूनच नव्हे, तर अभिनेत्री म्हणूनही नाव कमावलेल्या जुन्या पिढीतील कलावंत ज्योत्स्ना भोळे.

    ज्योत्स्ना भोळे यांना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. ज्योत्स्ना केशव भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर होत. त्यांचा जन्म गोव्यातल्या बांदिवडे या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव वामन केळेकर होते. एकूण चौदा भावंडांपैकी त्या एक होत्या. त्यांना गाण्याचे उपजतच अंग आणि फार वेड होते.
    वयाच्या आठव्या वर्षी पहिल्या दोन इयत्ता बांदिवड्याच्या शाळेत पूर्ण करून दुर्गा आपल्या थोरल्या गायिका भगिनी गिरिजाबाई यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आल्या. संगीत शिक्षणासाठी मुंबईस येणे भागच होते. त्या लॅमिंग्टन रोडवर राहत असत व तिथल्याच महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. संगीत हेच मुख्य ध्येय असल्याने त्यांनी शाळा सोडली.

    गिरिजाबाई आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गवई खाँसाहेब विलायत हुसेन यांच्याकडे तालीम घेत असत. ज्योत्स्नाबाईही आग्रा घराण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम घेऊ लागल्या. मुंबईत शालेय, आंतरशालेय गायनस्पर्धांमध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावून त्यांचे बरेच नाव झाले होते. ‘बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या आकाशवाणीवर ज्योत्स्नाबाई महिन्यातून तीन-चार वेळा गात असत. बालगायिका म्हणून त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. तेराव्या-चौदाव्या वर्षापर्यंत त्या रागदारी संगीतातही उत्तमपणे पारंगत झाल्या.

    याच सुमारास महाराष्ट्रात, खास करून मुंबईत काव्यगायन, त्यातूनच निर्माण होऊ पाहणारे ‘भावगीत’ हा गानप्रकार मूळ धरू लागला होता. केशवराव भोळे हे यात अग्रेसर असून, भावगीत गायक म्हणून संगीत शौकिनांमध्ये चांगलेच प्रसिद्ध व लोकप्रिय होते. त्यांच्या नाट्यपदांनी त्यांनी अगोदरच नाव मिळविले होते. केशव ‘एकलव्य’ या टोपणनावाने संगीतावर समीक्षापर लेखनही करीत होते. त्यामुळे याही क्षेत्रात त्यांच्या नावाची खूप चर्चा होती.

    ज्योत्स्नाबाईंचा भाऊ रामराय हा केशवराव भोळ्यांचा मित्र व चहाता होता. त्याने केशवराव भोळ्यांना आपल्या बहिणीला भावगीत शिकवण्याची विनंती केली. या वेगळ्याच, नवीन व सुंदर गानप्रकाराचे ज्योत्स्नाबाईंना वेडच लागले. मनापासून, लक्षपूर्वक शिकून घेऊन त्यांनी ‘भावगीत’ आत्मसात केले. गाण्यातले भावनेचे महत्त्व त्यांना जाणीवपूर्वक असे प्रथमच या वेळी कळले. तोवरचे त्यांचे गायन हे नकळतपणे स्वाभाविक भावनेने होत असे. लवकरच ज्योत्स्नाबाई भावगीत गायिका म्हणूनही अतिशय लोकप्रिय झाल्या.

    केशवराव भोळ्यांशी १९३२ साली त्यांचा विवाह झाला. केशव भोळे यांचे संगीत असलेल्या ‘कृष्ण सिनेटोन’ या कंपनीच्या ‘संत सखू’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. ज्योत्स्नाबाई यात सखूची भूमिका करीत होत्या. त्या वेळी त्यांचे नाव दुर्गा भोळे असेच होते; पण सिनेमात आणखी एक दुर्गा शिरोडकर नावाच्या नटी काम करीत होत्या. या दोन दुर्गांमुळे जरा गोंधळ होऊ लागल्याने लहान दुर्गाचे ‘ज्योत्स्ना’ असे नामकरण झाले व त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या.

    केशवराव भोळ्यांचे, ज्योत्स्नाबाईंच्या सांगीतिक आयुष्यातलेही स्थान आत्यंतिक महत्त्वाचे होते. विवाहानंतर त्यांचे कलागुण अधिकच बहरू लागले. विवाहसमयी त्या जेमतेम अठरा वर्षांच्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच प्रो. बा.र. देवधर यांच्या म्युझिक सर्कलमध्ये मैफल करून ज्योत्स्नाबाईंनी देवधर मास्तर व जाणकार श्रोत्यांची दाद मिळवली.

    केशवराव भोळे यांचा मंजी खाँ, रामकृष्णबुवा वझे, मल्लिकार्जुन मन्सूर, मास्तर कृष्णराव इ. अनेक गवयांशी स्नेह होता. त्यांनी अनेक बंदिशींचा संग्रह केला. वेगवेगळ्या घराण्यांच्या रंगांमुळे ज्योत्स्नाबाईंच्या गायकीचे एक स्वतंत्र, प्रभावी असे रसायन तयार झाले. पक्का सूर, लय-तालावरची पकड, तडफ, लालित्य आणि माधुर्य या गुणांनी युक्त असे त्यांचे गायन श्रोत्यांना खिळवून ठेवी.

    बशीर खाँ, घम्मन खाँ (ठुमरीची तालीम) या उस्तादांकडेही त्यांनी थोडी तालीम घेतली. बरीच वर्षे त्या ‘तानरस खाँ’ घराण्याचे खाँसाहेब इनायत हुसेन यांच्याकडे शिक्षण घेत होत्या. त्यांनी अनेक गुरूंकडे डोळसपणे तालीम घेतली.

    गोरख कल्याण, भीम, मधमाद सारंग, शुद्ध भटियार, शामकल्याण, जलधर-केदार इ. काही राग खास ज्योत्स्नाबाईंचे म्हणून लोकप्रिय झाले. भेंडीबाजार घराण्याचे मोहंमद हुसेन खाँ (सारंगिये कादरबक्ष यांचे चिरंजीव) यांनी बांधलेला ‘शिवकंस’ हा रागही ज्योत्स्नाबाईंनी गाऊन लोकप्रिय केला.

    ज्योत्स्नाबाईंनी देशभरातल्या महत्त्वाच्या संगीत सभांमधून अनेक वर्षे गायन केले. असरदार गायन, तसेच आवाजावरची हुकमत, उत्तम दमसास, सूक्ष्म सांगीतिक जाण, रंगतदार आलापी, प्रभावी तानक्रिया, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ आणि सुधमुद्रा-सुधबानी म्हणजेच ज्योत्स्नाबाई.

    लग्नानंतर वर्षभरातच, म्हणजे १९३३ मध्ये ज्योत्स्नाबाईंना नाटकात काम करण्याचा योग आला. ‘आंधळ्यांची शाळा’ हे ते नाटक. लेखक वर्तक, के.नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव दाते, केशवराव भोळे या नवमतवादी मंडळींनी ‘नाट्य मन्वंतर’ ही संस्था स्थापन केली.

    रंगभूमीवर स्त्रियांनीच स्त्रियांची कामे करावीत या आग्रहाने ज्योत्स्नाबाई व वर्तकांची पत्नी रंगभूमीवर उभ्या राहिल्या. यापूर्वीही हिराबाई बडोदेकर व त्यांच्या भगिनींनी नाटकमंडळी काढून रंगभूमीवर कामे केली होती. पण ‘आंधळ्यांची शाळा’ हे सर्वार्थाने आधुनिक नाटक तर होतेच; पण यात संगीत म्हणजे अनंत काणेकरांची भावगीते घेतली होती व ती फार परिणामकारक, प्रसंगोचित होती. त्यामध्ये पार्श्वसंगीताचा वापरही प्रथमच केला होता. केशवराव भोळेच याचे संगीतकार होते.

    ज्योत्स्नाबाईंचे हे प्रथम पदार्पण त्यांच्या ठायी असलेल्या रूप, संगीत व अभिनय या त्रिवेणी संगमामुळे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. पुढे १९४१ साली ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्हणून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या. त्यांनी या संस्थेत एकूण अकरा नाटकांतून प्रमुख भूमिका केल्या, पैकी ‘संगीत कुलवधू’ने त्यांना अजरामर कीर्ती दिली.

    मास्तर कृष्णरावांचे संगीत या नाटकाचे महत्त्वाचे यश होते. ज्योत्स्नाबाईंचे अभिनयमंडित गायन, तेही संयम ठेवून नेटके व वेधक असे. हा बदल घडवून आणण्याचे मोठे श्रेय ज्योत्स्नाबाईंना, लेखक-दिग्दर्शक मो.ग. रांगणेकरांना, तसेच मास्तर केशव, श्रीधर पार्सेकर, स्नेहल भाटकर इ. संगीतकारांनाही जाते. ज्योत्स्नाबाईंच्या अत्यंत लोकप्रिय नाट्यपदांमध्ये, ‘कुलवधू’तील सर्व पदे, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मन रमणा मधुसूदना’, ‘बोला अमृत बोला’; ‘एक होता म्हातारा’मधील ‘छंद तुझा मजला’, ‘ये झणी येरे माघारी’; ‘कोणे एके काळी’मधील ‘का रे ऐसी माया’ ही भैरवी; ‘राधामाई’ या नाटकातले ‘खेळेल का देव माझिया अंगणी’; ‘भूमिकन्या सीता’मधील ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन’, ‘मानसी राजहंस पोहतो’ इ. वानगीदाखल सांगता येतील. ‘कुलवधू’तील ‘बोला अमृत बोला’ने लोकांच्या अंत:करणाचा ठाव घेतला.
    ज्योत्स्नाबाईंना उत्कृष्ट भावगीत गायिकेचाही मान मिळाला. आकाशवाणीवरही त्यांच्या भावगीतांना वाढती मागणी येऊन अधिक प्रसार झाला. त्या बहुतांशी राजा बढे, अनंत काणेकर, कवी अनिल, मो.ग. रांगणेकर अशा कवी-गीतकारांच्या रचना गात असत.

    त्यांच्या लोकप्रिय भावगीतांमध्ये राजा बढे यांची ‘माहेर’विषयीची तीन गीते, यांतील ‘माझिया माहेरा जा’ हे पुलंनी चाल दिलेले फारच लोकप्रिय झाले. अनंत काणेकरांचे ‘किती गोड गोड वदला’ व ‘आला खुशीत समींदर’; मो.ग. रांगणेकरांचे ‘नको वळून बघू माघारी’ इ.च्या ‘यंग इंडिया’, ‘कोलंबिया’, ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ अशा कंपन्यांनी ध्वनिमुद्रिकाही काढल्या.

    ज्योत्स्नाबाईंच्या भावगीतांत विस्तार-शक्यता असूनही त्या खूप तारतम्याने, जडपणा आणू न देता, चालीच्या अंगाने आकर्षकपणे गायल्या याची प्रचिती त्यांची कोणतीही ध्वनिमुद्रिका ऐकताना येते.

    खानदानी गाण्याच्या तालमीमुळे आवाजाला जी झिलई व तेज लाभले, त्याचा त्यांनी नाट्यपदे व भावगीते यांत वेगळा आणि खुबीने वापर केला. त्यांनी गीतांचा व नाट्यगीतांचाही दर्जा जो प्रथमच उंच करून ठेवला, याचे महत्त्व फार मोठे आहे. ती त्यांची या क्षेत्राला देणगी आहे. कारण त्यामुळेच श्रोत्यांना विशिष्ट दर्जाची भावगीते ऐकण्याची चोखंदळ वृत्ती आली. त्यांची अभिरुची घडली.

    ज्योत्स्नाबाईंनी गीतापासून भावगीत, भावगीतापासून पद, पदापासून ख्याल ही सगळी स्थित्यंतरे मोठ्या सहजपणे केली. सुगम संगीत पुढे नेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात एक पद्धत अशी की, आकार तोच ठेवायचा; पण त्यात स्वत:च्या आवाजाच्या पोताची भर घालायची, आणि हे ज्योत्स्नाबाईंनी केले.

    ज्योत्स्नाबाईंनी थोडे लेखनही केले. १९६० च्या सुमाराला त्यांनी ‘आराधना’ हे संगीत नाटक लिहिले. निर्मिती, दिग्दर्शन, काव्य, संगीत सर्वकाही त्यांचेच होते. चारएक वर्षांनी ‘अंतरीच्या खुणा’ हे पत्ररूपी पुस्तक, तसेच नभोवाणीसाठी ‘घराण्याचा पीळ’ ही नाटिका लिहिली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार, ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार (१९८०), संगीत नाटक अकादमीचा संगीत अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७७), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, चौसष्टाव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून १९८४ साली बिनविरोध निवड, गोमंतक मराठी अकादमीचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९५), महाराष्ट्र सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९९) असे काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. १९९९ मध्ये, त्यांच्या निधनाच्या तीन वर्षे आधी ‘तुमची ज्योत्स्ना भोळे’ हे आत्मचरित्र लिहिले होते.

    पुण्यातील सृजन फाऊंडेशन ही संस्था २००९ सालापासून दरवर्षी दोन दिवसांसाठी ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’ नावाचा कार्यक्रम आयोजित करते. ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपटही निघाला आहे. ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २००१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ वंदना खांडेकर

  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले

    नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी झाला. गोपाळ कृष्ण गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडीलबंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या वहिनींनी स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले. १८८४ मध्ये बी.ए. पदवी घेऊन जानेवारी, १८८५ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक करण्यात येणाऱ्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.

    बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्विकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता / जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमातून समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशाप्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.

    त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. १८८९ मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा काँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. डिसेंबर, १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी काँग्रेसचे कार्य भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Society) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते. त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती.

    या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले. न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत. भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली.

    सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत. ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे , असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्स' नावाची संस्था स्थापन करण्यात आली. ते संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगले नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे १९ फेब्रुवारी १९१५ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • भारताचे दहावे उपराष्ट्रपती  कृष्णकांत

    कृष्णकांत हे १९९७ ते २००२ या कालखंडात भारताचे दहावे उपराष्ट्रपती होते. त्याआधी १९८९ सालापासून १९९६ सालापर्यंत सात वर्षे ते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते.

  • बॉलिवूडची ब्युटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय

    सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. अनेकांकडे सौंदर्य असतं आणि वरचा मजला रिकामा असतो. ऐश्वर्या त्याही बाबतीतही ऐश्वर्यसंपन्न आहे. तिच्या व्यक्तीमत्वात नैसर्गिक कलागुण व बुद्धिमत्तेचा सुयोग्य मिलाफ झालेला आहे. तिचा जन्म १ नोव्हेबर १९७३ रोजी झाला. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. तिच्या जन्मानंतर राय कुटुंबीय मुंबईत आलं. तिचं बालपण मुंबईतंच गेलं. लहानपणापासून बहुभाषिक, बहुसांस्कृतिक वातावरणाचा संस्कार झालेल्या ऐश्वर्याचे व्यक्तिमत्वही म्हणूनच कॉस्मोपॉलिटिन वाटतं. दाक्षिणात्य ठसा तिच्यात नाही. त्याचप्रकारे ती कुठल्याही एका प्रांताची वाटत नाही. म्हणून जगातल्या दहा ऐश्वर्यवतींमध्ये ती शोभून दिसते. टाईमच्या मुखपृष्ठावरही झळकते. आणि कान्सच्या चित्रपट महोत्सवातही कॅमेऱ्याचे झोत आपल्यावर आकर्षून घेते. ऐश्वर्याची आई वृंदा राय या लेखिका आहेत आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. थोडक्यात तिची पार्श्वभूमी अगदी उच्चशिक्षित कुटुंबाची आहे.शिक्षण, संशोधन व साहित्य अशा संगतीत वाढलेल्या ऐश्वर्यावर हे संस्कार होणे अगदी सहाजिक होते.

    व्यक्तिमत्वातल्या सौंदर्याने ऐश्वर्याला जगाकडे बघण्याची सुंदर नजर दिली. म्हणूनच वास्तूत सौंदर्य कसे असावे हे सांगणाऱ्या आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात शिक्षण घेणारी ऐश्वर्या पुढे आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात कशी ओढली गेली ते तिला कळलेही नाही. मॉ़डेलिंगकडे वळविण्यासाठी तिला काही करण्याची गरजही कधी पडलीच नाही. कारण या मॉडेलिंग जगालाच या लोभस चेहऱ्याची गरज होती. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर पुढे सौंदर्यस्पर्धामध्ये भाग घेणंही आलंच. मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण सुश्मिता सेनच्या स्पर्धेत तिला दुसरा क्रमांक मिळाला. पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूटही तिच्या डोक्यावर चढला. या स्पर्धेत केवळ सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ताही पणाला लागली होती. तिच्या चटपटीत, हजरजबाबी आणि बौद्धिक चातुर्याच्या उत्तरांनी परीक्षकांचंही मन जिंकलं.

    ऐश्वर्याने जगावर राज्य करायला सुरवात केली तो क्षण हाच. मिस इंडिया, मिस वर्ल्ड या स्पर्धांनंतर बॉलीवूडची वाट चालण्याची पूर्वापार प्रथा ऐश्वर्यानेही जपली. पण यापूर्वी आलेल्या ग्लॅमरस मॉडेल या चांगल्या अभिनेत्री कधी झाल्याच नाहीत. पण हे केवळं सौंदर्याचंच ऐश्वर्य नाही, अभिनयाचंही आहे, हे ऐश्वर्याने खर्याउ अर्थाने दाखवून दिलं. ज्याच्या चित्रपटात काम मिळते याचा कलावंतांना अभिमान वाटतो, अशा मणिरत्नम यांच्या 'इरूवर' चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवल सोबतचा 'और प्यार हो गया' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. ‍दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा 'जीन्स' या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला.तिच्या सौंदर्यापेक्षाही अभिनयासाठी लक्षात राहिलेले चित्रपट आठवा. हम दिल दे चुके सनममध्ये ती अप्रतिम दिसली होतीच. पण अभिनयाच्या बाबतीतही कमालीची समज पहिल्यांदा दिसून आली. मग देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट हे चित्रपट खास तिच्या अभिनयासाठी ओळखले जातात. याशिवाय अनेक टुकार चित्रपटही तिने केले. पण चांगले काय नि वाईट काय हे समजण्यासाठी अखेर काही चित्रपटांचे दान हे द्यावेच लागते. तिचा जोधा अकबर, सरकार राज हे महत्त्वाचे चित्रपट आहेत.

    मिसेस ऑफ स्पाईसेस, ब्राईड अँड प्रिजुडाईस, प्रोव्होक्ड, द लास्ट लिजन ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही तिने अभिनयगुणाची छाप सोडली. आर्थिक उदारीकरणाचा काळात भारत जागतिक पातळीवर जात असताना ऐश्वर्या हा भारताचा ब्रॅंड आहे हेही ठसायला सुरवात झाली आहे. म्हणूनच कान्सच्या चित्रपट महोत्सवात म्हणूनच 'ज्युरी' बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. 'टाइम' मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे.कॅमलिन पेन्सिलपासून सुरु झालेला मॉडेलिंगचा ऐश्वर्याचा प्रवास आजही यशस्वीपणे सुरु आहे. टाइटन वॉचेज, लॉन्जिस वॉचेज, लॉरियल, कोका-कोला, लॅक्मे कॉस्मेटिक्स, फिलिप्स, पामोलिव, लक्स, फूजी फिल्म्स, नक्षत्र डायमंड्स, कल्याण ज्वेलर्स, प्रेस्टीज यांसारख्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्ससाठी ऐश्वर्याने काम केले आहे.

    लंडनमधील 'वॅक्स म्युझियम'मध्ये तिचा मेणाचा पुतळा आहे. एकीकडे दिसामासी तिची कीर्ती वृद्धिंगत होत असताना दुसरीकडे बॉलीवूडमध्ये तिच्याविषयीची चर्चाही रंगात आली होती. गॉसिप तिला कधी चुकली नाहीत. सलमान खानबरोबर तिचे अफेअर हम दिल दे चुके सनमपासूनच जोडले गेले होते. पण दोघांमधील मतभेद व सलमानच्या विचित्र वागण्याच्या बातम्या एकामागोमाग आल्या. मधल्या काळात विवेक ओबेरॉयबरोबरही तिचे नाव जोडले गेले. नंतर मात्र अभिषेक बच्चनबरोबर तिचे नाव आले आणि अखेर तिचे लग्नही त्याचाशीच झाले. या सगळ्या प्रवासात सतत समोर दिसतो तो तिचा कामातला प्रामाणिकपणा, उत्साह, जिद्द आणि निरागसता. ‘आखोंकी गुस्ताकिया माफ हो’ गाण्यातून सौंदर्याचीही व्याख्या बदलायला लावणारी ऐश्वर्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ कलाकार अशोक कुमार

    अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही. दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे मा.अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.
    मा.अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • चित्रकार रावबहादूर माधव विश्वनाथ धुरंधर

    जलरंगांची सखोल जाण हे त्यांचे वैशिष्टय़. आपल्या निष्ठांशी आणि कलेशी प्रामाणिक राहिलेल्या या कलावंताने हिंदुस्थानात प्रथमच १८९५ मध्ये, बॉम्बे आर्ट सोसायटीचे सर्वोच्च असे सुवर्णपदक मिळविले. मेयो मेडल, बेंबल पारितोषिक यांसह अन्य पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या धुरंधरांनी भारतीय धार्मिक सण, उत्सव, दरबार, प्राचीन काव्ये व ऐतिहासिक प्रसंगांची शेकडो चित्रे रेखाटली. विजयी शिवछत्रपतींचे तैलरंगातील त्यांनी काढलेले चित्र हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय होता.

  • शैलेश बालाजी माळोदे

  • भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.

    भारताचे तेरावे राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द आदर्शवत अशीच आहे. माध्यम क्षेत्रातील एका खासगी पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे.

  • सुधीर गाडगीळ यांचा गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील लेख

    सुप्रसिद्ध निवेदक, लेखक सुधीर गाडगीळ यांची खासियत म्हणजे नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं आणि खाण्यावर बोलणं. त्यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक म्हणजे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींबरोबर मांडलेली पंगतच जणू. कलयांकित व्यक्ती काय खातात, त्यांच्या खाण्याच्या आकडीनिकडी याबाबत आपल्याला उत्सुकता असतेच. सुधीर गाडगीळ यांनी या विषयाला धरून घेतलेल्या खुसखुशीत मुलाखती लेख स्करूपात या पुस्तकात आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील या पुस्तकातील लेख काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता.आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.रियाजाचं गांभीर्य सोडलं तर एरवी अवखळ, खटय़ाळ, खिदळणारी, जरा वरच्या स्वरात, अनुनासिक नादात खदखदणारी, चैतन्यदायी आरती.`अहो, तुमचं घर सापडायला फार वेळ लागला. ताडदेव डेपोपासून दोन चौक चालत यावं लागलं,’ असं फोटोग्राफरनं कुरकुरता क्षणीच `तुमचा वॉक चांगला झाला ना? गुड! तब्येतीला उत्तम!’ असा सट्टदिशी चौकार मारणारी आरती.

    भरपूर खादाडणं, भटकणं, चेष्टामस्करी करणं आवडतं. मी सोशल प्राणी आहे, असं म्हणता म्हणता हळूच जीभ चावत, खालच्या पट्टीत म्हणून सोसलं तेवढंच गाते, असा `पी.जे.’ मारत कन्येची, स्वानंदीची टाळीही घेते. `माझ्या माहेरी लहानपणी घरात भाज्या कमी असायच्या. कर्नाटकाचा तो दुष्काळीच भाग. तीळ, कारळं, दाण्याच्या सुक्या चटण्या आणि पोळी. खूप आग्रह खाण्याचा. कुठलाही रोग झाला तरी `खाणं’ हेच औषध मानत. माझे काका तापातही शिस्तीत जेवायचे. एक ताप असला तरी `काही तरी खा’ असंच म्हणत. `आई अस्सल कानडी. बॉर्डरवरची असली तरी माझं बालपण मुख्यत्वे माटुंग्यातलं. आसपास सगळी अंबा भुवन, आनंद भुवन, नायक, मद्रास कॅफे ही किंग्ज सर्कलची टिपिकल उडपी हॉटेल. तिथे महिन्यातून एकदा इडली, डोसा खायचा म्हणजे ग्रेट ट्रीट. हॉटेल संस्कृती एवढी बोकाळली नव्हती; पण खाण्यात रस असायचा. वडील कुणाकुणाच्या गाण्याच्या मैफलींना घेऊन जायचे, तेदेखील `बटाटे वडा देईन’ हे आमीष दाखवून!’ `खवय्या सो गवय्या’ हे माझं आवडीचं तत्त्व. जो चांगला खातो, पितो तो गवई. त्यामुळे मी कुठलेही पथ्यपाणी करत नाही. पाण्यानं पोट बिघडतं, वगैरे मनाचे खेळ. कैरीचं लोणचं चाखताना, खोकला येणार असं मनात आलं तर खोकला येणारच; नाही तर काही होत नाही. खाणाऱ्यानं, गाणाऱ्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं!

    `आरती, तुझं हे सकाळी हल्ली पेपरात प्रवचन येतं तसं चाललंय. तो तुझा स्वभाव नाही. थेट काय मन:पूर्वक खायला आवडलं ते सांग.’ `पालकाची मीठ पेरून भाजी, घट्ट साईचं दही, मेथीचं वरणं, त्यावर लाल सुक्या मिरच्यांची फोडणी आणि पुरणाचे कडबू प्रचंड आवडतात. मात्र खाताना गणित कच्चं पाहिजे, तरचं भरपेट जेवलं जातं. मुळात आम्हा धारवाडकडच्या लोकांना कुठल्याही प्रकारचे पोहे कधीही खायला आवडतात. झोप येत नसली तरी खा पोहे! हसू नका, खरंच सांगतेय! कार्यक्रमापूर्वी दोन दिवस मात्र पचायला हलकं खाणं पसंत करते. चहा रोज मी स्वत: करूनच पिते. ब्रेकफास्टला गरम पोळी भाजी. मग तासाभरानं दूध. जेवण संपूर्ण शाकाहारीच आवडतं, चाळीशीपर्यंत तिखट जास्त आवडायचं. वाचन, फिरणं वाढलं. जेवणातल्या व्हॅल्यूज कळल्या आणि मसालेदारपणा कमी केला. मात्र मिळमिळीत चालतच नाही. विशेषत: दुधीभोपळ्याची भाजी तर शक्यच नाही.’

    उदय (टिकेकर) पक्का मांसाहारी. त्याला चिकन -फिश आवडतं. मी खात नसले तरी करते. कॉन्टिनेंटल ते भाकरी सगळंच करायला आवडतं. स्वानंदीच्या डिमांडस् पहिल्या पुरवते. जराशी तिखट, सर्व प्रकारची सँडविचेस, माझ्या हातचा डोसा सर्वांना आवडतो. पीठ कालवून तापत्या तव्यावर विशिष्ट लयीत, विशिष्ट प्रेशरनं फिरवणं ही कला आहे. डोशाखेरीज टम्म फुगलेली, एकही डाग नसलेली कागदासारखी भाकरी मी उत्तम बनू शकते. अर्थात, स्वयंपाक करायची वेळ कमी येते’.

    एक तर माझ्या सासूबाई (सुमती टिकेकर) उत्तम स्वयंपाक करतात. त्या शेवयाची खीर, फ्रूट सॅलड, साजूक तुपातला शिरा, बासुंदी अप्रतिम बनवतात आणि उदयचं शूटिंगमुळे शेडय़ुल अनिश्चित असतं. तो रात्री उशिरा आल्यावर स्वयंपाकाचा सरंजाम मांडण्यापेक्षा आम्ही हॉटेलात जाणं पसंत करतो. चर्चगेटचं `पिझेरिया’, गिरगावातलं `ग्रीन हाऊस’, नाना चौकातला `श्रीकृष्ण’ उडपी किंवा आमच्या शास्त्री हॉलजवळचं `स्वाती स्नॅक्स!’

    `स्वाती’मध्ये एकतर अतिशय स्वच्छता असते. शुद्ध पाण्याचा वापर असतो. `पानगी फदुरा खिचडी’ केळीच्या पानावर आली की मी फस्तच करते. फलाफल इथं मिळतं. सीताफळ शेक इथे उत्तम असतो. तुमच्या पुण्यात आले की माझ्या सर्व शिष्या आमच्या घरी जमतात. तिथे आठ तास रियाज, उरलेल्या वेळात पीठ पेरलेल्या पालेभाज्या आणि पोळ्या आम्हीच सगळ्याजणी करतो नि खातो. पुण्यात वाडेश्वरचा `डोसा’ आणि वैशालीची इडली आणि खूप चटणी.
    `दौऱ्यात ठळकपणे लक्षात राहिलेली चव?’

    `कोलकात्यातले टपरीवरचे रसगुल्ले, इंदौरचा सराफा, अमेरिकेत मॅकडोनॉल्डचं सॅलड, अमृतसरची गरमागरम तंदुर रोटी आणि काळी डाळ, ओ। हो।हो। सुभान अल्ला! जिथे जाते तिथून ताज्या भाज्या आणायला मला आवडतं. गाजर, मुळा, मटार, फ्लॉवर, कोबी घरी स्वयंपाक करताना त्या ताज्या भाज्यांच्या गंधात मूड लागतो. डोक्यात रुंजी घालत असलेला `राग’ गुणगुणणं सुरू होतं. जीवन पुरी किंवा अहीर भैरव गुणगुणायला लागले की, माझा उत्तम मूड जमल्याचं माझं मला जाणवतं.

    लेखक - सुधीर गाडगीळ
    संकलन - संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३