जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संगीतरंगभूमीवरील सुप्रसिद्ध मराठी गद्यनट आणि नाट्यनिर्माते अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर जन्म १२ मार्च १८९१ रोजी झाला. चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील वर्तमानपत्र लेखक व उत्कृष्ट वक्ते होते. चिंतामणरावांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना नाटके वाचण्याची आणि करण्याची अतिशय आवड होती. ते महाराष्ट्र नाटक मंडळीत १९११ मध्ये दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते ’भरत नाटक मंडळी’त गेले. १९१४ मध्ये ते ’किर्लोस्कर नाटक मंडळी’त आले आणि त्यांचा भाग्योदय झाला.
१९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी ’बलवंत नाटक कंपनी’ काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक विविध भूमिका पार पाडल्या. अगदी होतकरू नटापासून सुरुवात करून मग प्रमुख भूमिका केल्या. १९३३ मध्ये चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली भूमिका गाजली. पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या ’राजाराम संगीत मंडळी’त प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ मध्ये गेले. अखेरीस त्यांनी 'ललित कला कुंज' नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंमी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला ’बहुरूपी’” हे नाव दिले आहे.
जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. जेष्ठ नट चित्तरंजन कोल्हटकर हे चिंतामणरावांचे सुपुत्र होते. चिंतामणराव कोल्हटकरांच्या भूमिकांनी गाजलेली नाटके : पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन वगैरे. 'वेड्यांचा बाजार' हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक पुढे मा.चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.
चिंतामणराव हे १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि इ. स. १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. मा.चिंतामणराव कोल्हटकर यांना रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला. मा.चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.
धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले.
यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते.
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.
१९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरूवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चधू लागले. १९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.
१९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायत पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.
१९८१ साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर १९८३ साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.
१९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरूष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. १९७७ मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून २००७ साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर होती. धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.
तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे.
थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुध्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शीकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाअक्षरांनी लिहुन ठेवले आहे. धीरूभाई अंबानी यांचे निधन ६ जुलै २००२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज चैत्यन्याचा रुपेरी झरा अशा वैशिष्ट्याने पडद्यावर वावरलेल्या देव आनंद यांची जयंती. त्यांनी आपल्या अजरामर भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले. त्यातील सर्वोत्तम दहा चित्रपट.
१. गाईड (दिग्दर्शक विजय आनंद)
राजू गाईड(देव आनंद) व विवाहीत रोझी (वहिदा रेहमान) यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होते, पण हे प्रकरण खूप वेगळे वळण घेते. या चित्रपटातील देव आनंद यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सर्वोत्तम अभिनय ठरला. चित्रपटाच्या शेवटी त्याचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे, हा देखील त्यांच्या कारर्किदीतील दुर्मिळ योग.
२. ज्वेल थीफ (दिग्दर्शक विजय आनंद)
देव आनंद यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट. आपण चित्रपटाच्या नायकावर( अर्थात देव आनंद) तोच गुन्हेगार असल्याचा संशय ठेवतो (हे दिग्दर्शकाचे कसब). चित्रपटाचा शेवट धक्कादायक. वैजयंती माला आणि अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत.
३. जॉनी मेरा नाम (दिग्दर्शक विजय आनंद)
देवचा सर्वोत्तम गुन्हेगारी पट. हेमा मालिनीशी त्याची जोडी छान शोभली. प्रेमनाथ, प्राण, पद्मा, रंधावा अशा कितीतरी कलाकारांनी हा मसालापट खुलवला. प्रत्येक गाण्यात देव आनंद यांचा मस्तच वापर करण्यात आला आहे.
४. तेरे घर के सामने (दिग्दर्शक विजय आनंद)
गाण्यांतून दिसणारा देव आनंद..अनुभवणाऱयांसाठी हा चित्रपट उत्तम! ‘एक घर बानाऊंगा तेरे घर के सामने’ असो वा ‘दिल का भंवर करे पुकार’ असो पडद्यावर गाणे कसे सजवायचे हे देव आनंद यांनी दाखवून दिले. अर्थात नूतन यांनीही तितक्याच ताकदीने योगदान दिले आहे.
५. तेरे मेरे सपने (दिग्दर्शक विजय आनंद )
सायकलवरचे एक मैने कसम ली असो अथवा जीवन की बगियाँ महकेगी असो मुमताजसोबतची देव यांची जोडी मस्त जमली. गाण्यातून दिसणारा देव आनंद हा देखील त्यांच्या व्यक्तीमत्त्व व अभिनयाच्या शैलीचाच प्रकार.
६. हरे राम हरे कृष्ण (दिग्दर्शक देव आनंद)
देवने प्रेम पुजारी पासून दिग्दर्शनात पाऊल टाकले, पण ठसा मात्र हिप्पी संस्कृतीवरील हरे राम..मध्येच उमटला. झीनत अमानची हिप्पी गर्ल खूपच धाडसी. काठमांडूच्या परिसराने विषय प्रवाभी ठरला.
७. देस परदेस (दिग्दर्शक देव आनंद)
विदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये रोजगारासाठी जाणाऱया भारतीयांच्या वाट्याला नेमके काय येते? या विषयाची ‘देव’ शैलीत मांडणी.
८. हम दोनो (दिग्दर्शक अमरजीत)
देव आनंदची दुहेरी भूमिका. जोडीला साधना व नंदा, तर जयदेवच्या संगीतामुळे आणखी आकर्षण वाढले. मूळचा हा कृष्णधवल चित्रपट कालांतराने रंगीत स्वरुपात आला. देवने आपण नवीन चित्रपटाच्या तयारीत गुंतलो आहोत हा व्यक्त केलेला आशावाद सतत पुढेच पाहायचे ही त्याची वृत्ती दर्शवणारा होता.
९. वॉरंट (दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती)
सत्तरच्या दशकातील तद्दन मसालापट. त्यात पन्नाशीपार देव आनंदचा झीनत अमानला उद्देशून केलेला ‘रुक रुक..रुक झाला हमसे दो बाते करके जाना, यह मौसम हे दिवाना’ हा आग्रह त्यालाच शोभला व देव आनंद यांनी रौप्य महोत्सवी यश संपादन केले.
१०. फंटूश (दिग्दर्शक चेतन आनंद)
दूखी मन मेरे सून मेरा कहना जहाँ नही चैना वहा नही रहना.. देवची भावूक मुद्रा व्यक्त करणारे हे सर्वकालीन लोकप्रीय गीत. याच चित्रपटात ‘ए मेरी टोपी पलट के आ’ गात सवयीने तो मोकळेपणाने वावरलाही. शैला रामाणी या चित्रपटात नायिका होत्या.
देव आनंद यांची रुपेरी वाटचाल खूपच मोठी आहे. प्रभातच्या हम एक है (१९४६) पासून नवकेतनच्या ‘जाना जा दिलसे दूर’पर्यंत (२०१० हा चित्रपट अप्रकाशीत) देव आनंद सतत खुलला. फुलला.
चार्जशीट(२०११) हा त्याचा त्यानेच दिग्दर्शित केलेला व प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट..
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
सुरवातीला त्यामध्ये विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी काम करीत असे. इतके जबरदस्त नाटक होते कि त्यामध्ये नातू आणि आजोबा यांच्या संघर्षामध्ये सध्याच्या दोन पिढ्यातील अंतर इतक्या प्रभावीपणे मांडला आहे कि हे नाटक पाहताना डोळ्यात अक्षरश अश्रू येतात.
मृणाल सेन यांचे मूळ नाव माणिकबाबू; पण ‘मृणालदा’ या नावानेच ते चित्रपटसृष्टीत ओळखले जात. त्यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी फरिदपूर (बांगला देश) येथे झाला. मृणाल सेन यांच्या मातोश्री सूरजूबाला सेन स्वातंत्र्य चळवळीच्या मोठमोठय़ा सभांतून देशभक्तीपर गीत गायच्या. बिपिनचंद्र पाल यांचं त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम होतं. मृणाल सेन यांचे वडील दिनेशचंद्र सेन हे वकील होते. ते कमाईतला मोठा हिस्सा क्रांतिकारकांना शस्त्रांसाठी पैसा पुरवायला द्यायचे. चित्तरंजनदास, नेताजी बोस अशी दिग्गज मंडळी फरीदपुरात त्यांच्याकडेच उतरायची. अशा वातावरणाचा योग्य तो परिणाम होऊन वयाच्या सातव्या वर्षी मृणालकांती दिनेशचंद्र सेनने पोलिसांच्या तोंडावर ‘वंदे मातरम’ नारा घुमवला आणि काही तास पोलीस ठाण्याची हवा चाखली..
त्यांचे माध्यमिक शिक्षण फरिदपूर येथे झाले. पुढे कोलकात्यामधील स्कॉटिश कॉलेजात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्ययन केले. या काळात त्यांचा संबंध कम्युनिस्ट पक्षाशी व पक्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांशी आला. मात्र ते पक्षाचे सदस्य झाले नाहीत. तसेच ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या संघटनेशी ते संबंधित होते (१९४३–४७). दरम्यान चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्रावरील ब्लादिमीर नेल्सन यांचे सिनेमा अॅतज ग्राफिक्स आर्ट हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. तेव्हापासून त्यांची चित्रपटविषयक आस्था आणि रुची वाढीस लागली. सुरुवातीला काही काळ पत्रकारिता व वैद्यकीय प्रतिनिधीची नोकरी केल्यानंतर कोलकात्यामधील एका चित्रपट स्टुडिओत ध्वनितंत्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. येथपासूनच त्यांच्या चित्रपटकारकीर्दीस सुरुवात झाली.
मृणाल सेन यांनी १९५५ मध्ये रात भोरे (द डॉन ) हा पहिला बंगाली चित्रपट दिग्दर्शित केला; मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यानंतरच्या नील आकाशेर नीचे (अंडर द ब्लू स्काय, १९५८) या चित्रपटाने ते सर्वसामान्य लोकांमध्ये परिचित झाले; तर त्यांचा बैशे श्रावण (१९६०) हा चित्रपट व्हेनिस चित्रपटमहोत्सवात दाखवला गेल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. पुढील काळात पुनश्च५ (ओव्हर अगेन, १९६१), प्रतिनिधी (द रेप्रिझेन्टेटिव्ह, १९६४), आकाशकुसुम (अप इन द क्लाउड्स, १९६५) आणि माटीर मानिष (मॅन ऑफ द सॉइल, १९६६) हे चित्रपट त्यांनी निर्माण केले. त्यानंतर शासकीय अनुदानातून कमी खर्चात बनविलेल्या भुवन शोम (१९६९) या हिंदी चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर मानाचे स्थान मिळवून दिले.
मृणाल सेन यांचे नेटके कलात्मक दिग्दर्शन, उत्पल दत्त व सुहासिनी मुळ्ये यांचा प्रमुख भूमिकांतला उत्कृष्ट अभिनय, हलकाफुलका निरागस विनोद, अर्थगर्भ संहिता, अमिताभ बच्चन यांनी सूत्रधार म्हणून दिलेला उसना आवाज अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत युगप्रवर्तक ठरला. ह्या चित्रपटापासून भारतातील वास्तवदर्शी चित्रपटचळवळीला चालना मिळाली, तसेच सेन यांच्या कारकीर्दीला नवे वळण लाभले. पुढील काळात सेन यांनी राजकीय पार्शभूमी असलेले सामाजिक आशयाचे चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. त्यामुळे मार्क्सवादी कलावंत अशी त्यांची ख्याती झाली. या काळातील कोलकात्यामधील राजकीय अस्थिरतेस व अनागोंदीच्या स्थितीस मध्यमवर्गीय समाजाची उदासीन, निष्क्रिय वृत्ती कारणीभूत असल्याची त्यांची भूमिका होती. त्याचे प्रभावी दर्शन त्यांनी कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांतून घडवले. उदा., इंटरव्ह्यू (१९७१), कोलकाता ७१ (१९७२) आणि पदातिक (द गूरिला फायटर, १९७३) इत्यादी. हे चित्रपट व त्यांमागील त्यांची मध्यमवर्गीय समाजाला दोषी ठरवण्याची भूमिका त्या काळात काहीशी वादग्रस्त ठरली. १९७९ नंतर त्यांच्या चित्रपटाचा रोख बदलला. चित्रपटातील सामाजिक वास्तवाच्या चित्रणाऐवजी मानवी अंतर्मनाच्या चित्रणाकडे ते वळले. आपल्या एकूण कारकीर्दीत त्यांनी सु. २८ चित्रपट, १४ लघुपट व ५ अनुबोधपट निर्माण केले. सेन यांनी चित्रपटमाध्यमाचा वापर कुशलतेने व समर्थपणे केला. केवळ एकाच पठडीतील साचेबद्ध चित्रपट न बनविता त्यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या चित्रपटांतून अस्तित्ववाद, मार्क्सवाद, जर्मन अभिव्यक्तिवाद, इटालियन नववास्तववाद अशा विविध विचारसरणी व शैली यांचा प्रत्यय येतो.
त्यांच्या चित्रपटांचे शेवट हे प्रेक्षकांना अंतर्मुख व्हावयास भाग पाडणारे, अगदी अनपेक्षित आणि वेगळे असतात. चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी औपरोधिक विनोदाच्या साहाय्याने ग्रामीण भारताचे वास्तववादी दर्शन घडविले. कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांमध्ये त्यांनी नवीन चित्रीकरणशैलीचा प्रयोग करून तुकड्यातुकड्यांतून आविष्कृत होणाऱ्या निवेदनपध्दतीचा वापर केला. मध्यमवर्गीयांची नैतिकतेबद्दल असणारी मनोवृत्ती आणि तिच्या विविध सूक्ष्म पैलूंचे दर्शन त्यांनी इक दिन प्रतिदिन (अँड क्वाएट रोल्स द डे, १९७९) आणि खारिज (द केस इज क्लोज्ड, १९८२) या चित्रपटांतून घडविले. त्यांच्या अस्तित्ववादी आशयसूत्र असलेल्या खंडहर (द रुइन्स, १९८३) या चित्रपटाची पटकथा इंग्रजीत पुस्तकरूपात उपलब्ध आहे (१९८४). कोरस (१९७४) या त्यांच्या चित्रपटात पाश्चिमात्य प्रभावाखालील उद्योगजगताचे अतिवास्तववादी शैलीत चित्रण आहे, तर मृगया (१९७६) या हिंदी चित्रपटात ब्रिटिश राजवटीच्या वर्चस्वाखालील आदिवासी जमातीचे चित्रण आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीने साकारलेली आदिवासी नायकाची भूमिका राष्ट्रीय पारितोषिक विजेती ठरली. त्यांनी बंगालीशिवाय अन्य भाषांतही चित्रपट निर्माण केले. त्यांत भुवन शोम व एक अधुरी कहानी (१९७२) हे हिंदी चित्रपट; माटीर मानिष हा ओडिया चित्रपट; ओका ऊरी कथा (अ व्हिलेज स्टोरी, १९७७) हा तेलुगू चित्रपट आदींचा समावेश होतो. अशा बहुभाषिक चित्रपटांमुळे राष्ट्रीय पातळीवर दिग्दर्शक म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली.
सामान्य प्रेक्षकांना रुचणारे राजकीय विषयांवरचे बुध्दिवादी चित्रपट काढल्याने त्यांना भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचे स्थान प्राप्त झाले. अशा नव्या वळणाच्या राजकीय चित्रपटांच्या प्रवाहाचे ते प्रवर्तक मानले जातात.
मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये विविध पारितोषिके मिळाली. कान्स, बर्लिन, व्हेनिस, मॉस्को, कार्लोव्ही व्हेरी, माँट्रिऑल, शिकागो, कैरो इ. चित्रपटमहोत्सवांतून त्यांचे चित्रपट गौरविण्यात आले. भुवन शोम, इक दिन प्रतिदिन आणि अकालेर सान्धने (इन सर्च ऑफ फॅमिन, १९८०) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली. तसेच भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९८१), भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार (२००४) हे त्यांना लाभलेले अन्य पुरस्कार होत. ते संसदेच्या सभागृहाचे सन्माननीय सदस्यही होते (१९९८–२००३). फ्रान्स सरकारने त्यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या फ्रान्समधील सर्वोच्च पुरस्काराने गौरविले (१९८५). रशियन सरकारनेही ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप या किताबाने त्यांना सन्मानित केले (२००१). अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल केली.
त्यांनी ऑलवेज बीइंग बॉर्न हे आत्मचरित्र लिहिले (२००४). त्यांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले (२००८; २००९; २०१२). मृणाल सेन यांचे ३० डिसेंबर २०१८ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नांदी' हे नाटक हृषिकेश जोशी यांनी मराठी रंगभूमीवरील आणले. चार निर्माते, दहा कलाकार आणि २३ व्यक्तिरेखा हाच मुळात या वेगळा प्रयोग होता. नाट्यसंमेलनात झालेले हे नाटक त्यांनी आता व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे आत्तापर्यंत गाजलेल्या काही नाटकांचे कोलाज करून त्यातून मराठी रंगभूमीचे एकंदर चित्र तयार करण्याचा हृषिकेश जोशी यांचा हा यशस्वी प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. यलो, हरीशचंद्राची फॅक्टरी,देऊळ, भारतीय, रंगभूमी, चीटर,पोश्टर गर्ल अशी काही हृषिकेश जोशी यांचे गाजलेले चित्रपट. ‘केबीसी’ला लेखक असतो हे कोणाच्या कल्पनेतही नव्हते. मराठी केबीसी पहिल्या तीन भागांमध्येच स्पर्धकांची ओळख, त्यासाठी वापरण्यात आलेली काव्ये, छोटी छोटीच पण आकर्षक वाक्ये यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. हे हृषिकेश जोशी लिहिले होते. हृषिकेश जोशी केबीसीसाठी स्क्रीप्ट लिहिले आहे हे आपणापैकी खूप कमी जणाना माहित असेल. ‘स्टार प्रवाह’वर होत असलेल्या विकता का उत्तर या नव्या को-या गेम शोमध्ये हृषिकेश जोशी हे थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल ५२ भूमिकांमध्ये होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हंटर थॉम्प्सन हे ‘गॉन्झो जर्नालिझम’ या नवीन विक्षिप्त संकल्पनेचा जन्मदाता होत. एखाद्या बातमीच्या किंवा घटनेच्या निवेदकाने, स्वतःच त्या घटनेचा किंवा प्रसंगाचा एक भाग होऊन, मनात एकामागोमाग एक उसळून येणाऱ्या विचारांच्या आवर्तनांना दिलेलं शब्दरूप असा काहीसा हा प्रकार. समजायला काहीसा क्लिष्ट. १९५६ ते ५८ अशी दोन वर्षं अमेरिकन एअर फोर्समध्ये काढल्यावर ते पत्रकारितेकडे वळले.
‘वस्त्रहरण’चा पाच हजारावा प्रयोग कुणीही विसरू शकणार नाही, असा ‘न भूतो न भविष्यती’ असा झाला. सर्वच मोठय़ा कलाकारांनी यामध्ये भाग घेतला आणि या नाटकाचे ५०० रुपयांचे तिकीट काळाबाजारात तब्बल १२ हजार रुपयांना विकले गेले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti