(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • जेष्ठ संगीतकार जयदेव

    जयदेव यांचा जन्म ३ आॅगस्ट १९१९ रोजी झाला. काही गाणी पहिल्या भेटीत फक्त कुतूहल निर्माण करतात.. तर काही स्लो पॉयझनिंगसारखी आपल्यात भिनत जातात. काही त्यातल्या चमत्कृतीपूर्णतेनं आपले लक्ष वेधून घेतात. तर काही आपल्या माधुर्याने गारूड करतात. अशा काही गाण्यांबद्दल आणि त्यांच्या संगीतकारांबद्दल.. त्यांतले पहिले मानाचे पान जाते ते संगीतकार जयदेव यांना!

    ‘ये दिल और उनकी निगाहोंके साए’, ‘मैं जिंदगी का साथ’, ‘अभी न जाओ छोडम्कर’ यांसारखी सुरेख गाणी देणारे जयदेव एक अत्यंत प्रयोगशील संगीतकार. मा.जयदेव यांचा लुधियानात बालपण आणि मुंबईत कारकीर्द असा प्रवास असणाऱ्या जयदेव यांनी चित्रपटांत अभिनय करण्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली. ‘वामन अवतार’, ‘काला गुलाब’ यांसारख्या चित्रपटांत काम केल्यावर ते उस्ताद अली अकबरखाँ साहेबांकडे सरोद शिकले. ‘आँधियाँ’, ‘हमसफर’ यांसारख्या खाँ साहेबांचं संगीत असलेल्या चित्रपटांसाठी संगीत साहाय्यकाचीही त्यांनी भूमिका निभावली. दरम्यान, सचिनदेव बर्मनदादांनाही ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘कालापानी’ यांसारख्या चित्रपटांच्या संगीतात सहाय्य केलं. जयदेव यांचं उर्दू-हिंदी काव्याचं ज्ञान, अनवट संगीतरचना श्रवणीय करण्याचं कसब बर्मनदा जाणून होते आणि ही जबाबदारी म्हणूनच त्यांच्यावर सोपवीत होते. (‘कालापानी’) ही रचना खरंतर जयदेव यांची.

    गायकीला वाव देणाऱ्या अनवट जागा (phrases) आपल्या गाण्यात गुंफणारे, गीताचा ढाचा (Structure) मुळापासून बदलू शकणारे जे अत्यंत मोजके संगीतकार झाले, त्यात जयदेव यांची गणना करावी लागेल. नव्हे, त्यांचे स्थान मानाचे असेल. यासाठी लागणारी प्रतिभा, काळाच्या पुढे असणारी नजर आणि सौंदर्यदृष्टी पुरेपूर होती. त्यांच्याकडे नशिबाची साथ नसेल कदाचित (नव्हतीच), पण प्रतिभेने साथ सोडली नाही. अनेक संगीतकारांचा सृजनाचा आलेख हा पुढे ओसरता उतार दाखवतो, पण एस. डी.नंतर जयदेव हे असे एकमेव संगीतकार म्हणावे लागतील की, शेवटच्या चित्रपटापर्यंत (‘अनकही’) गाण्यांचा दर्जा आणि जयदेव टच कायम होता. मानवी भावसंबंध, नात्यातली गुंतागुंत, स्वभावातले कंगोरे, काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवणं जसं कर्मकठीण, तसेच हे सगळं सुरावटीत बांधणं किती अवघड असेल. मग झाली चाल अवघड त्याला काय करणार? म्हणूनच बर्मन सल्ला देत बहुतेक की, थोडी सोपी चाल बांध! जयदेव यांच्या चाली नेहमीच वेगळ्या अर्थानी आव्हानात्मक होत्या.. जिथे जिथे त्या सोप्या करता येऊ शकल्या असत्या असं वाटतं, तिथे हा मोह टाळलेला आहे. आपल्या गळ्यातून त्या जागा अलवारपणे जाव्या याचा ध्यास लागतो, असं काही विलक्षण या चालींमध्ये आहे. पाहा ना, ‘प्रभु तेरो नाम’ (‘हम दोनो’) सारखं गाणं, पुढच्या ओळीत- ‘तेरी कृपा हो जाए’- या शब्दांना दोन वेगळ्या चाली का? याला उत्तर नाही.

    अंतऱ्यात ‘हर बिगडी बन जाए’मध्ये जाऽऽए वरची तान मोत्याची लड ओघळावी, तसे अनवट स्वरसमूह घेऊन येते. केवळ अप्रतिम! या प्रकारची त्यांची कितीतरी गाणी- ‘कभी खुदपे, कभी हालात पे’ या गाण्यात या ओळीलासुद्धा लगेचच वेगळ्या चालीत गुंफले आहे. शास्त्रीय संगीतातल्या improvisation (बढत) या सौंदर्यतत्त्वाचा हा किती सुंदर आविष्कार! जयदेवजींच्या गाण्यांतल्या, मुरक्या किंवा खास (phrases) हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. काही जागा खास गायकी अंगाच्या! गमक, मींड, फिरत अशा गाणाऱ्याला स्वत:ची सारी आयुधं परजायला लावणाऱ्या जागा. किंबहुना ही आयुधं परजल्याशिवाय जयदेव यांच्या गाण्यांना हात (गळा) लावूच नये!

    कितीतरी उदाहरणं ‘ये दिल और उनकी’मध्ये ‘उनकी’वरची जागा, ‘हर आस अश्कबार हैं’मध्ये ‘तेरे बगैर जिन्दगी’वरची जागा, ‘आपकी याद आती रही’मध्ये ‘आपकी’वरची मोहक करामत..

    गाणं एका विशिष्ट तालात चाललेलं असतं. दादरा-केरवा आणि मध्येच एखादी ओळ त्या तालाच्या कचाटय़ातून पूर्णपणे सुटून पुन्हा, त्याच्या कवेत अलगदपणे विसावते. हे अप्रतिमच! अत्यंत कमी काळासाठी तालापासून घेतलेली ही फारकत इतकी गोड की पुन:पुन्हा गाण्याचा मोह पडावा. एखादी वेडी-वाकडी उडी मारून जिम्नॅस्टने दोन पायांवर नीट उभं राहावं, अगदी तसंच ‘तुम्हे हो ना हो’ (‘घरोंदा’)मध्ये अशी एक ओळ येते. ‘मगर फिर भी इस बात का तो यकीन है’- ‘तू चंदा मैं चाँदनी’ या गाण्यातही ‘अपने हाथों से पिया मोहे लाल चुनर ओढा’हीसुद्धा अशीच कसरत- लाजबाब.. जयदेव यांचं ‘गंधार’ स्वरावरचं विलक्षण प्रेम कधी कधी अवचित समोर येतं. कित्येक गाणी गंधाराचं प्राबल्य मुखडय़ात घेऊनच येतात. तो गंधार एखाद्या guiding star सारखा समोर येत राहतो. लुभावत राहतो. ‘आपकी याद आती रही’, ‘अल्ला तेरो नाम’, ‘सीने में जलन’ अशी कितीतरी गाणी.

    गौडसारंग (‘अल्ला तेरो नाम’), धानी (‘रात भी हैं कुछ’), पहाडी (‘ये दिल और उनका’), तिलक कामोद (‘ये नीर कहाँ से बरसे हैं’), माँड (‘तू चंदा मैं चाँदनी’) असे राग भारदस्तपणे जयदेवजींच्या गाण्यांत डोकावतात, पण गाण्यांवरचा जयदेव ठसा हाच खरा त्या गाण्यांचा स्थायीभाव आहे.

    काही काही स्वरसमूह जयदेवचे लाडके होते आणि विशिष्ट सेन्सुअस गाणी असली की हमखास हे स्वरांचं मोहोळ रंग जमवतं. दोन मध्यम आणि कोमल गंधाराचं हे अफलातून कॉम्बिनेशन ‘रात भी हैं कुछ, प्यास थी फिर भी तकाजा न किया’ (‘आलिंगन’), ‘जब से लगन लगायी’ (‘रेश्मा और शेरा’) या गाण्यात जादुई प्रभाव करते.

    सुनील दत्तची कामुक नजर, वहिदाचं अप्रतिम सौंदर्य आणि हा स्वरसमूह यांचा एकत्रित परिणाम म्हणजे रोमांचकारी अनुभव आहे. ‘रात भी हैं कुछ भीगी भीगी’ हा स्वरसमूह दत्ता डावजेकरांच्या ‘चांदणे फुलले माझ्या मनी’ या गाण्यातही आढळतो. डीडी आणि जयदेव हे असोसिएशन होतंच नाही. तरी गाण्यांचा पोत, त्यांचा भाव, visualisation power गाणं प्रत्यक्ष पडद्यावर न पाहता निर्माण होणारं दृष्टिचित्र याबाबतीत या दोन प्रतिभावंतांमध्ये साधम्र्य आढळतं.
    गाण्याच्या बंदिस्त चौकटीत मन न रमणाऱ्यांपैकी जयदेव असल्याने अनेकदा अंतरे, मुखडा यांच्या रचनेत वेगळ्याच कल्पना साकार होतात. पहिला अंतरा सप्तकाच्या खालच्या भागात lower middle बांधणं (जे जोखमीचं ठरू शकतं) ही अशीच एक धाडसी शैली. धाडसी अशासाठी की ऐकणाऱ्याचं लक्ष गाण्यावरून उडण्याची भीती अशा वेळी असते. जयदेव यांच्या समकालीन संगीतकारांमध्ये उंच पट्टीत मुखडे-अंतरे बांधण्याची लाट येत असताना हे धाडसच.
    ‘पहाडों की चंचल किरन चूमती है’ (‘ये दिल और उनकी’), ‘अभी अभी तो आई हो’ (‘अभी न जाओ छोडकर’), ‘इन भूलभुलैया गलियों में’ (‘दो दिवाने शहर में’), ‘संस्कृती के विस्तृत सागर में’ (‘कोई गाता मैं सो जाता’).

    जयदेवजींच्या गाण्यांत अंतऱ्याची शेवटची ओळ मुखडय़ाला अशा अजोड, अतूट धाग्याने विणलेली असते की तो ‘जोड’ खटकू नये. ही काही गाणी जयदेव साहेबांची
    ‘अस्मानी, या आसमानी!
    अस्मानी रंग की आँखों में
    बसने का बहाना ढूँढते हैं- ढूँढते है।
    आबोदाना, ढूँढते है, इक आशियाना ढूँढते है’ (‘दो दिवाने’)- (‘घरोंदा’).
    ‘कोई मेरा सिर गोदी में रख सहलाता – मैं सो जाता- कोई गाता मैं सो जाता’ (‘आलाप’).

    सगळं कसं सलग-अव्याहत. अंतऱ्यातून मुखडय़ावर आलो कसे अलगदपणे- कळणारही नाही. वाद्यवृंदाचा orchestration वापर जयदेवजींनी अगदी नेमका केल्याचं आढळतं. जयदेव यांचे निधन ६ जानेवारी १९८७ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / लोकसत्ता

  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू बापू नाडकर्णी

    बापू नाडकर्णी हे खऱ्या अर्थाने ऑल राऊंडर स्पोर्स्टमन होते , ऑल राऊंडर होते. ते कॉलेजमधून स्टेट लेव्हलला टेनिस खेळले . क्रिकेट खेळतच होते. नॅशनल लेव्हलला बॅडमिंटन खेळले , खो-खो , टेबल टेनिस हे सर्व खेळ खेळले . इतकेच नव्हे ते अभ्यासामध्येही ग्रेट होते .

  • ठुमरी विश्वाची सम्राज्ञी शोभा गुर्टू

    ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती इत्यादी उपशास्त्रीय संगीत प्रकार हे शोभाताईंची खासियत होते. आपल्या गायनात शास्त्रीय संगीतातील आलापी त्या खुबीने वापरत असत.

  • सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा

    ६० आणि ७० च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा यांचा आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्‍या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव गृहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला.

  • गीतकार कमर जलालाबादी

    ओमप्रकाश भंडारी हे कमर जलालाबादी यांचे मूळ नाव. अमृतसरनजीकचे जलालाबाद हे त्यांचे मूळ गाव.

    कमर यांना लहानपणापासूनच कवितेची आवड. लहानपणी त्यांच्या या छंदाला वेडेपणा म्हणून हिणवण्यात आले. मात्र अमर नावाच्या एका शायराने कमर यांच्या शब्दांतील जादू हेरली. त्यांनी कमरच्या काव्यलेखनाला प्रोत्साहन दिले. कमर शिक्षणासाठी लाहोरला गेले. शिक्षण घेत असतानाच पत्रकारितेकडे ओढा वाढला. लाहोरच्या अनेक नियतकालिकांतून त्यांची मुशाफिरी चाले. मात्र चित्रपटांचे वेड आणि आकर्षण स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच मनासारखे लिखाण करता यावे, यासाठी त्यांनी स्वत:चे ‘स्टार’ नावाचे चित्रपटविषयक साप्ताहिक सुरू केले. मात्र चित्रपटांबद्दल लिहिण्यापेक्षा चित्रपटांसाठी लिहावे, ही ईर्षा वरचेवर उचंबळून येत होती. चित्रपटाच्या या वेडानेच पुढे त्यांना पुण्यात आणले. दलसुख पांचोली तेव्हा ‘जमीनदार’ नावाच्या चित्रपटात व्यग्र होते. त्यांनी कमरविषयी ऐकले होते. ‘जमीनदार’च्या गीतलेखनाची जबाबदारी त्यांनी कमरवर टाकली. कमरने मग ‘दुनिया मे गरीबों को आराम नहीं मिलता...’ अशा आशयघन गाण्यातून सर्वांना बेचैन केले. या संधीने कमरला चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. कमर या प्रतिभावंताला मग विष्णुपंत दामले-फत्तेलाल-व्ही. शांताराम यांच्या ‘प्रभात फिल्म्स’मध्ये संधी मिळाली.

    ‘चाँद’ या चित्रपटाचे गीतलेखन त्यांनी केले. ‘चाँद’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हुस्नलाल-भगतराम या पहिल्या संगीतकार जोडीने दिलेले संगीत. यातील ‘दो दिलों को ये दुनिया मिलने नहीं देती’, ‘मेरे दिलरुबा आ जा’ आणि ‘ए दिल मुझे रोने दो’ ही कमर यांची गाणी चांगलीच गाजली. नंतर ‘प्रभात’च्या अनेक चित्रपटांसाठी कमर यांनी संवाद, गीतलेखन केले. ‘प्रभात’च्या अस्तानंतर कमर यांचे सूर जुळले ते फेमस स्टुडिओशी. ओघवती शैली, सरळसाधे परंतु काळजाला भिडणारे शब्द, भाव-भावनांना उपमांनी सजवलेला साज व त्यातून सहज लयीत गुंफलेल्या शाब्दिक फुलो-यातून रसिकांच्या हृदयाला घातलेला हात हे कमर जलालाबादी या शायराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य.

    इक दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा, बहते हुए आँसू रुक न सके, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा..(प्यार की जीत)मधली प्रेमभंगाची भावना, त्याच चित्रपटातले ओ दूर के जानेवाले वादा न भूल जाना, रोते हुई अंधेरी तुम चांद बन के आना...मधली प्रेमाची भावना हीच तर आहे कमर यांच्या लेखणीची जादू. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी कमर यांची वेव्हलेंथ ख-या अर्थाने जुळली होती. पिया पिया न लागे मोरा जिया(फागुन), मैं सोया अंखियाँ मीचे, तेरी जुल्फों के नीचे, इक परदेसी मेरा दिल ले गया (फागुन), छून-छून घुंगरू बोले (पतंगा), छोटा सा बलमा, मैं बंगाली छोकरा, मेरा नाम चिन-चिन चू (हावडा ब्रीज), आइए मेहेरबां बैठिए जानेजां (हावडा ब्रीज), रुक रुक कहा चली दीवानी अशा अनेक माइलस्टोन गीतरचना कमर-ओपी या कॉम्बिनेशनचे प्रत्यंतर देतात. ओपींनंतर कमरचे सूर जुळले ते संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याशी. डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा, छलिया मेरा नाम, मेरे टूटे हुअेय दिल से, तेरी राहों में खडे हैं (छलिया), मंै तो एक ख्वाब हूँ, इस ख्वाब से तू प्यार न कर (हिमालय की गोद में), तुम ही मेरे मीत हो (प्यासे पंछी), दीवानों से ये मत पूछो (उपकार) अशी अनेक अवीट गोडीची गाणी या कॉम्बिनेशनने दिली. ‘शहीद भगतसिंग’मध्ये सरफरोशी की तमन्ना... सारखे देशभक्तिपर गीत लिहिणा-या कमर यांनी हमने तेरी जफा का वफा नाम रख दिया (चले हैं ससुराल) असा टोकाचा भावही अनेक गाण्यांतून व्यक्त केला.

    पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपल्या गीतरूपी चांदण्यातून कमर जलालाबादी यांच्या गाण्यांनी नेहमीच रसिकांच्या मनाला शीतलता दिली. मात्र प्रेमात धोका देणा-यांना खडसावण्यात त्यांच्या लेखणीने कधीच कसूर केली नाही. दोनों ने किया था प्यार मगर, मुझे याद रहा तू भूल गयी (महुआ) अशा कमर म्हणजे चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्रमा. चंद्राची शीतलता, चंद्राला ग्रहण लागल्यानंतरचा विरक्त भाव, टिपूर चांदण्यातील प्रेमळ झुळूक आणि अर्थपूर्ण गीतांतून चंद्रप्रकाशाचा हवाहवासा शिडकावा कमर जलालाबादी यांच्या प्रत्येक गीतातून अनुभवाला येतो. ‘कमर’ गीतांच्या चांदण्याने रसिकांच्या मनाचे अंगण नेहमीच चमकत राहील. ‘दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है’ हे गाणे अजून ही एक तारीखेला रेडीओ सिलोन लागते. ते गाणे कमर जलालाबादी यांचेच. सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेल्या आणि किशोरकुमारच्या आवाजाने नटलेल्या या गाण्याचे रसिकांच्या मनात वेगळे स्थान आहे.

    रसिकांच्या मनातील भाव-भावनांना सोप्या, आशयसंपन्न शब्दांत गुंफणारा गीतकार हीच कमर जलालाबादी यांची खरीखुरी ओळख होती. कमर जलालाबादी यांचे निधन ९ जानेवारी २००३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ अजय कुलकर्णी

  • गायिका डॉ. रेवा नातू

    मुळच्या पुण्यातील असलेल्या डॉ.रेवा नातू यांचे वडील पं. विनायक फाटक हे प्रसिद्ध तबलावादक असल्याने त्यांचे संगीत शिक्षण घरातूनच झाले. दत्तोपंत आगाशे, पं. शरद गोखले आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या कडून त्यांनी संगीताचे शिक्षण केले. त्यांनी काही काळ मा.वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या कडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी एसएनडीटी महाविद्यालयातून संगीतात एम.ए व पी.एच.डी केली व प्रथम क्रमांक मिळविला. अखिल भारतीय गांधर्व विद्यालय, पुणे मार्फ़त त्यांनी संगीताचार्य ही पदवी मिळविली. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवत टी. डी. जानोरकर पुरस्कार आणि ललकारी यांसारख्या नऊ पुरस्कारावर मोहोर उमटविली. रेडियोवर संगीत कलाकार म्हणून त्या कार्यरत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मध्येही डॉ. रेवा नातू कायम गायन करत असतात. कामगिरी उल्लेखनीय अशी आहे. हसले मनी चांदणे‘ या कार्यक्रमातून प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा, ज्योत्सना भोळे, किशोरी आमोणकर या दिग्गज गायिकांच्या गायलेली दुर्मिळ गीते डॉ. रेवा नातू सादर करतात. तिन्ही गायिकांच्या आवाजातील नजाकत, रागदारीवरील हुकूमत, त्यांच्या गीतांतील सौंदर्याचे तंतोतंत दर्शन डॉ. रेवा नातू घडवितात. ऑल इंडिया रेडियो मध्ये शास्त्रीय संगीत स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येऊन राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांनी संपादन केलेली आहे तसेच नेहरू सेंटर, मुम्बई आयोजित भारत डिस्कव्हरी स्पर्धेमध्ये त्या विजेत्या झालेल्या आहेत. विष्णु दिगंबर पलुस्कर पुरस्कार, पं.विनायकबुवा पटवर्धन पुरस्कार, २०१५ चा इंद्रधनु सुधीर फड़के युवोन्मेष पुरस्कार, ललकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. डॉ. रेवा नातू यांच्या कान्हा, तराना,गणेश सहस्त्रनाम अशा सी.डी पण प्रकाशित झाल्या आहेत.

    डॉ. रेवा नातू यांचे गायन

    https://www.youtube.com/watch?v=Ip4caZ3Kj7U

    https://www.youtube.com/watch?v=f7hf5QnYDog

    https://www.youtube.com/watch?v=DY1LO_a8l0I

    https://www.youtube.com/watch?v=lMUvf-OzKKA

    https://www.youtube.com/watch?v=mjvqDGf1Dp4

    #Dr.RevaNatu

  • बॉलिवुड गायिका सुनिधी चौहान

    दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९८३ रोजी झाला. वयाच्या केवळ सुनिधी चौहानचे बालपणीचे नाव निधी चौहान असे होते. चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते.

    शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. तबस्सुम यांनीच सुनिधीची भेट प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी सोबत घालून दिली. त्यांनी सुनिधीला त्यांच्या ग्रुपमध्ये गाण्याची संधी दिली होती.

    वयाच्या १३व्या वर्षी 'मेरी आवाज सुनो' या शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सुनिधीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. मस्त या सिनेमातील रुकी रुकीसी जिंदगी... हे तिने गायलेले पहिले बॉलिवूड गाणे आहे. हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्यासाठी सुनिधीला तब्बल 14 वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी दोन अवॉर्ड्स सुनिधीने आपल्या नावी केले. त्यानंतर सुनिधीने कधीही मागे वळून पाहिले नाही.

    सुनिधीने केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेत गाणी गायली आहेत. सुनिधी चौहानने लग्न २००२ मध्ये वयाच्या १८ वर्षी दिग्दर्शक बॉबी खानबरोबर केले होते. पण फार काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला. एप्रिल २०१२ मध्ये सुनिधीने दुसरे लग्न केले. बालपणीचा मित्र आणि म्युझिक डायरेक्टर हितेश सौनिकबरोबर सुनिधीने संसार थाटला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मायकेल जॅक्सन

    मायकेल जॅक्सन नावाचे एक भन्नाट आणि बेभान, चित्तथरारक आणि अचाट तुफान मनात आणि तनात १९८० ते १९९५ या काळात ते तुफान घोंघावले.त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ रोजी झाला.मायकेल जॅक्सनमध्ये अशी काय ‘मॅजिक’ होती, असे काय गूढ होते, की ज्यामुळे प्रभुदेवा, मिथुन चक्रवर्तीपासून राज ठाकरेंपर्यंत आणि युरोपपासून जपानपर्यंत, जवळजवळ जगभरचे तत्कालीन तरुण-तरुणी त्याच्या प्रभावाखाली आले होते? मायकेल जॅक्सनची विलक्षण ऊर्जा? त्याचा झपाटा? त्याच्या ‘साँग-डान्स’मधील इलेक्ट्रिकल चार्ज? त्याचा आवाज? गाण्याच्या ओळी? मायकेल नावाची मॅजिक जगभर पसरली ती त्याच्या १९८३च्या ‘थ्रिलर’ या थरारक अल्बमनंतर. त्याच्या लाखो चाहत्यांना त्याच्या गाण्यांमधले शब्द व त्यांचे संदर्भ समजतही नसत. परंतु असेही कित्येक कोटी तरुण होते, की जे त्याची गाणी, नृत्य, हावभाव आणि वैचित्र्यपूर्ण भासणारे पदन्यास या सर्वाचे सहीसही अनुकरण करायचा प्रयत्न करीत असत.

    मायकेल जॅक्सन अजिबात न आवडणाऱ्यांचाही एक मोठा वर्ग होता. पण साधारणपणे तो वर्ग तेव्हा पन्नाशीच्या आसपास वा पलीकडे गेला होता. तरुण वर्गातही थोडेफार ‘अॅाण्टी-जॅक्सन’ होते, पण चाहत्यांचा दबदबा (आणि दहशत!) इतकी प्रचंड होती, की त्या ‘विरोधकांचा’ आवाज त्या अफलातून आणि कान भेदून जाणाऱ्या तडाखेबंद ड्रम्सच्या ध्वनी-प्रतिध्वनींमध्ये पूर्णपणे बुडून जात असे. ज्यांना ‘जॅक्सन फिनॉमिनन’ने कधीच संमोहित केलेले नव्हते, त्यांना त्याची ‘मॅजिक’ही उमजली नव्हती आणि आता सुरू झालेले ‘ग्लोबल मोर्निग’ ही उमजलेले नाही.

    मायकेल जॅक्सन ही अगदी चपखल असे ‘अमेरिकन फिनॉमिनन’ होते. त्याच्या अगोदर असेच तुफान एल्विस प्रिस्ले या नावाने अमेरिकेत आणि मग जगभर पसरले होते; पण प्रिस्लेच्या काळात टेलिव्हिजन आणि खासगी वाहिन्या आजच्यासारख्या जगभर फोफावल्या नव्हत्या. कम्प्युटर आणि इंटरनेट क्रांतीच्या दोन दशके अगोदर एल्विसचे पर्व होते. त्या दोघांच्या ‘ब्रॅण्ड’चा बाज जरी वेगळा असला तरी एक पर्व संपले आणि काही वर्षांतच दुसरे पर्व सुरू झाले असे म्हणण्यासारखी स्थिती होती. विशेष म्हणजे आज जगभर अमेरिका ओळखली जाते ती केवळ त्यांच्या व्हिएतनाम-अफगाणिस्तान-इराक येथील हिंस्र कारवायांमुळे नव्हे; तर हॉलिवूड-एल्विस- मायकेल जॅक्सन अशा ‘मॅजिक मेकर्स’मुळे अमेरिकेत निर्माण होणारी अशी तुफाने झपाटय़ाने ‘लेजंड्स्’ होतात. हा हा म्हणता ती ‘लेजंड्स्’ जगभरच्या लोकांच्या मनाचा कब्जा घेतात. त्यांचे वर्णन योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक अशा निकषांवर करणे म्हणजे तो हंगामा, ते ‘फिनॉमिनन’, ते अनोखे चैतन्य न समजून घेण्यासारखे आहे.

    अमेरिकेतील अशी ‘फिनॉमिना’ झपाटय़ाने कॉर्पोरेट रूप धारण करतात. हा हा म्हणता ती ‘ग्लोबल कॉर्पोरेट्स्’ बनतात. एकदा अशी ‘लेजंड्स्’ जागतिक कॉर्पोरेट झाली, की त्यात अब्जावधी डॉलर्स गुंतवले जातात, कोटय़वधी लोक त्यांचे ग्राहक होतात, त्या संशोधनातून एक सामूहिक झिंग तयार होते; मग ती झिंग मार्केट केली जाते, सीडी-डिव्हीडीज्, कॅसेट्स्, टी. व्ही. चॅनल्सच्या माध्यमातून ती झिंग घराघरात पोहोचते- लहान मुले आणि तरुण-तरुणी त्यात इतके दंग होतात, की त्यांच्या पालकांना हे कळेनासे होते, की ‘या पिढीला कशाने झपाटले आहे?’ भुताने झपाटल्यावरही माणूस (म्हणजे तरुण-तरुणी) जसे वागणार नाही तसे वर्तन पाहून काही पालक भयभीत होतात. तेही स्वाभाविकच म्हणावे लागेल. मायकेल जॅक्सनच्या (आणि इतरही ‘डान्स-साँग शोज्’च्या) वेळेस ज्या प्रकारच्या आर्त किंकाळ्या, अश्रूपात, छाती बडवून घेत त्याबरोबरच होणारा अक्षरश: लाखो चाहत्यांचा भन्नाट नाच हे सर्व वरकरणी वेताळाने झपाटल्यासारखेच वाटते/ दिसते. त्याच्या मरणानंतरही तो ‘पेनकिलर’ घेऊन मरण पावला, की हृदयविकाराच्या झटक्याने यावर वादंग सुरू झाला आहे. मायकेल जॅक्सनचे निधन २५ जून २००९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / लोकसत्ता

  • विमल मुंदडा

    महाराष्ट्राच्या विधानसभेत पाचव्यांदा निवडून जातानाच केज मतदारसंघातील आमदार विमल मुंदडा जगण्याशी लढाई देत होत्या. आजारपणामुळे केवळ उमेदवारी अर्ज भरण्यापुरतेच त्यांचे दर्शन झाले. त्यानंतर त्या जवळजवळ दुप्पट मतांनी निवडून आल्या, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे पत्र घेण्यासही त्या जाऊ शकल्या नाहीत.

    सतत पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या मुंदडा यांच्या निधनाने त्यांच्या मतदारसंघातीलच नव्हे, तर त्यांच्या मोठय़ा सामाजिक परिवारातील सर्वानाच दु:ख होणे स्वाभाविक आहे. मतदारसंघाशी नाळ जुळणे याचा अर्थ विमल मुंदडा यांना समजला होता. सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक लढवली, तेव्हा त्या भाजपचे मुंडे यांच्या गटात होत्या. दोन वेळा भाजपकडून त्यांना विजय मिळाला, परंतु मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर तीन वेळा त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्या. या काळात १९९९ पासून २००९ पर्यंत त्या मंत्रिमंडळात राहिल्या.

    मतदारसंघातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असत. परंतु त्याहीपलीकडे आपल्या मतदारांचा जो विश्वास त्यांनी कमावला होता, तो कोणत्याही राजकीय व्यक्तीला हेवा वाटण्यासारखा होता. वसुंधरा महिला सहकारी बँक आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठान या संस्थांची त्यांनी उभारणी केली. मंत्रिपदाच्या काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

    व्यक्तिगत जीवनातील अनेक धक्के सहन करता करता त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य मात्र जोमाने सुरू ठेवले होते. राजकीय जीवनात येणाऱ्या अनेक छोटय़ा मोठय़ा वादळांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणारी खंबीरता त्यांच्यापाशी होती. सतत कार्यमग्न राहून मतदारांना आपलेसे करण्याची त्यांची हातोटी कौतुकास्पद होती. अनुसूचित जातीतून डॉक्टर झालेल्या त्या काळातील अगदी मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी राजकीय क्षेत्रात काम करायचे ठरवले आणि त्यात काम करता आले, याबद्दल त्या नेहमीच समाधान व्यक्त करीत. त्यांच्या निधनाने एका उमद्या राजकीय व्यक्तीचा अंत झाला आहे.

  • दादा गावकर

    गावकर, दादा
    लोकसंस्कृतीमध्ये अश्वत्थाचा पट नावाचं एक व्रत आहे. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानांचं पूजन या व्रतात केलं जातं. त्यातलं हिरवं पान असतं सौंदर्यासाठी, कोवळं पान असतं नवजात पुत्रासाठी, पिकलेलं पान असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वाळलेलं पान असतं सुख-समृद्धीच्या वृद्धीसाठी आणि फाटलेलं पान असतं अमर्याद संपत्तीसाठी. आपल्या कार्याप्रती अविचल निष्ठा असणाऱ्या आणि संघसंस्कारांनी भारल्या गेलेल्या भिवा केशव तथा दादा गावकर नावाच्या गिरणगाववासीयानं गेल्या साठ-पासष्ट वर्षांत हे व्रत कधी केलं असावं अशी शक्यताच नाही,

    पण त्यानं ऐकलेली ‘पिंपळपानांची सळसळ’ मात्र आयुष्याच्या प्रवासाची धगधगती आणि रोमांचकारी कथानकं रेखाटती ठरली. कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेला हा मुलगा आपल्या वाटय़ाला आलेलं आयुष्य जगत असताना दुसऱ्याच्या आयुष्याचाच विचार करीत राहिला, त्याला जगण्याची दिशा आणि बळही देत राहिला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीनं म्हणूूनच गोखले न्यासाच्या वतीनं दिला जाणारा एक लाख रुपयांचा अंत्योदय पुरस्कार देऊन गावकरांच्या कार्याला समुचित अभिवादन केलं आहे. दादा गावकर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी त्यांची नाळ जुळली आणि आयुष्याला नवी दिशाच मिळाली. गिरणगावातलं तेव्हाचं वातावरण पोरांच्या टवाळखोऱ्या, गुंडांच्या मारामाऱ्या यासाठी प्रसिद्ध होतं, संघ जीवनात आला नसता तर माझ्या हातात कदाचित पत्ते आले असते, दारूची बाटली आली असती, खिशात रामपुरी आला असता आणि मीही सातरस्त्यावरच्या पोरांसारखा भाईगिरी करताना दिसलो असतो हे ‘पिंपळपानांची सळसळ’मधलं गावकरांचं वाक्य त्यांच्या आयुष्याला मिळालेली दिशा दर्शविणारं आहे. गिरणगावातील विद्यार्थ्यांभोवतीचीप्रतिकूल परिस्थिती त्यांना अस्वस्थ करीत होतीच. त्यांच्याच उत्कर्षांसाठी त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ स्थापन केलं. गेली पंचावन्न र्वष ते अविरत कार्यरत आहे. या मंडळानं सुरू केलेली विवेकानंद व्याख्यानमाला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, नव्हे एक ज्ञानतीर्थ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तिकिटं लावून व्याख्यानमाला आयोजित करण्याचा धाडसी उपक्रम मंडळानं मुंबईतल्या गिरणगावासारख्या वस्तीत प्रथमच सुरू केला आणि त्याचा सुवर्णमहोत्सवही गेल्या वर्षी पार पडला. गावकरांनी विद्यार्थी क्षेत्रात तर डोंगराएवढं काम केलंच, पण त्याशिवाय सामाजिक, धार्मिक आणि काही अंशी राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम केलं. त्यांच्या एकसष्टीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांना जो निधी अर्पण करण्यात आला, त्यात तेवढीच स्वत:ची रक्कम घालून गावकरांनी एक प्रतिष्ठान स्थापन केलं. समाजात काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून चार हात दूर राहणाऱ्या गुणवंत कार्यकर्त्यांचा सत्कार आणि गिरणगावातील महापालिका शाळांतील तसंच खाजगी शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचा या प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणला गेला आहे. गावकर फारसे शिकले नाहीत, पण त्यांनी जो सहकाऱ्यांचा-सोबत्यांचा परिवार उभा केला त्याचं वर्णन करताना डॉ. शिवाजीराव भोसले यांनाही गावकर हे चालतंबोलतं विद्यापीठच आहे, समाजसेवेची ती एक सांस्कृतिक मुद्रा आहे असं म्हणावंसं वाटलं. गावकरांनी सव्‍‌र्हेलन्स इन्स्पेक्टर म्हणून सातपुडय़ासारख्या आदिवासी भागात तीन र्वष नोकरीही केली. आदिवासी जनजीवन, त्यांच्या चालीरीती, त्यांच्यात वावरताना आलेले प्रत्ययकारी अनुभव याचं वर्णन ‘पिंपळपानांची सळसळ’मध्ये आलं आहे. त्याचा मोठा वाटा त्यांच्या जीवनातील यशाच्या आरेखनात आहे. यश काही सहजासहजी प्रत्येकाच्या वाटय़ाला येत नाही, त्यासाठी परिस्थितीशी झुंजावं लागतं, परीक्षांचे पत्थर फोडावे लागतात. शून्यातून विश्व उभं करण्याची महत्वाकांक्षा उरी बाळगावी लागते. गावकर हा असा एक समाज-विश्व उभा करणारा शिल्पी आहे, कोकणी काव्‍‌र्हर आहे. सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठीचं चालतंबोलतं पाठय़पुस्तक आहे. पिंपळ हा पुण्यवृक्ष मानला जातो. आदिवासी समाज तर याला राज्याचा द्वाररक्षक मानतात. गावकर हा असा पिंपळवृक्ष आहे, त्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन.