जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
असे जे आपणापाशी असे , जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे , जगाला प्रेम अर्पावे '
साने गुरुजी यांच्या ' खरा तो एकची धर्म ' या कवितेतील या ओळींचा आदर्श ठेवून दत्ता पुराणिक यांनी आपले आयुष्य वेचले . साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते . ते त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळले . गुरुजींच्या ' श्यामची आई ' या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा त्यांचा संकल्प गेल्या वर्षीच पूर्ण झाला होता . हा उपक्रम आणखी पाच वर्षे राबविण्याचा मानस त्यांनी त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला होता . ऐंशीव्या वर्षी असा संकल्प करुन तो तडीस नेण्यासाठी अविरत काम करणार्या पुराणिक यांच्यासारख्या व्यक्ती विरळ्याच ; पण हा संकल्प पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला . मात्र , तोपर्यंत त्यांनी साने गुरुजींसंबंधातील २५ हजारांपेक्षाही अधिक माहितीपत्रकांचे वाटप आणि सुमारे पाच हजार सीडींची विक्री केली होती .
पुराणिक मूळचे अमळनेरचे . १९५० मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले . साने गुरुजींचा सहवास त्यांना लाभला होता . शाळेसमोरून जाताना गुरुजी रोज विचारपूस करीत , अशी आठवण ते नेहमी सांगत . इंग्रजांच्या जाचामुळे गुरुजी काही काळ भूमिगत झाले होते . त्यावेळी त्यांची सेवा पुराणिक यांनी केली होती . त्यांचे सारे जीवनच साने गुरुजीमय झाले होते . ' श्यामची आई ' या पुस्तकाने कित्येक पिढ्या घडवल्या . आपल्या खडतर बालपणाची कहाणी सांगत आणि संवेदनशील भावविश्व उलगडत त्यावेळच्या समाजजीवनाचे चित्रण गुरुजींनी या पुस्तकात केले होते . या पुस्तकाची ओळख आणि त्याद्वारे गुरुजींच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी हे पुस्तक पुराणिक यांनी घराघरात पोहोचविले . या पुस्तकावर ते कथाकथनही करीत असत . इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची दाद मिळाली होती . ' संगम रंगभूमी ' च्या माध्यमातून त्यांनी बालनाट्येही बसविली होती . पुणेकरांनी त्यांच्या या कार्याची कृतज्ञता त्यांचा सत्कार करून वेळोवेळी व्यक्त केली होती . ' हा माझा सत्कार नसून प्रत्येक आईचा सन्मान आहे ,' अशी विनम्र भावना त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती . व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकाकडे जात असलेल्या आजच्या काळात प्रत्येकालाच गरज आहे , ती साने गुरुजींची आणि त्यांचे विचार घराघरांत पोहोचविणार्या पुराणिक यांचीही.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
-----------------------------------------------------------------------------------
साने गुरूजींनी आपल्या संस्कारपुर्ण पुस्तकांमधून स्वातंत्र्यपुर्व भारताची पिढी घडविली होती, मातृप्रेमाने पावन झालेले अमृत, अक्षररूपांनी त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यगंगेमध्ये रूजविले होते. अशा महान साने गुरूजींचे अजरामर साहित्य दीर्घकाळाकरिता जीवंत व तजेलदार ठेविण्याची जबाबदारी अमळनेरच्या दत्ता पुराणिकांनी स्वीकारली. साने गुरूजींचा सहवास त्यांना लाभला होता. साने गुरूजींच्या विचारांनी, व त्यांच्या पुस्तकांमधून वेळोवेळी दिसून आलेल्या देशाबद्दलच्या तळमळीने तसेच काळजीने प्रेरित होवून पुराणिकांनी त्यांचे सर्व साहित्य, व ग्रंथसंपदा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अजून व्यापक स्वरूपात पोहोचावी याकरिता आपले जीवन समर्पित केले. गुरूजींच्या श्यामची आई ह्या मातेची थोरवी पटवून देणार्या, व हरवत चाललेल्या मातृप्रेमाला साद घालणार्या अप्रतिम पुस्तकाची आजच्या पिढीला नितांत गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा आगळावेगळा संकल्प त्यांनी हाती घेतला. हा संकल्प तडीस नेऊन दाखविताना त्यांनी तब्बल २० हजार पुस्तकांच्या प्रतींचे वाटप, साने गुरूजींसंबंधीच्या २५ हजार माहितीपत्रकांचे वाटप, आणि सुमारे ५ हजार सीडींची विक्री असा मोठा पल्ला पार करून दाखविला. या पुस्तकावर आधारित असलेल्या कथाकथनांची सत्रे आयोजित करणे, हेदेखील त्यांनी गुरूजींच्या विचारमंथनाकरिता निवडलेल विशेष प्रभावी माध्यम होते. उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अशी कित्येक सत्रे यशस्वी करून दाखविली. इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली होती. संगम रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाटये बसविली, व गुरूजींच्या विचारांना विविध कलारूपांत प्रेक्षकासमोर आणले. पुणेकरांनी त्यांच्या या कार्याचा अनेकदा सन्मानाद्वारे व सत्काराद्वारे यथोचित गौरव केला होता. 'हा माझा सत्कार नसून, प्रत्येक आईचा सन्मान आहे', या त्यांनी एका कार्यक्रमा दरम्यान केलेल्या विधानावरून त्यांची विनम्रता झिरपते. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी गुरूजींच्या विचारांना, तत्वांना व स्वप्नांना सामान्या माणसाच्या स्पंदनांशी जोडण्याचे अतुलनीय कार्य केले. हा उपक्रम आणखी पाच वर्षे पुढे चालू ठेवण्याचा पुराणिकांचा मानस होता. परंतु ही पाच वर्षे उलटण्याअगोदरच ते पंचतत्वांत विलीन झाले.
चित्रकलेवर ‘दिनानाथ शैली’चा ठसा उमटविणारे दिनानाथ दामोदर दलाल. राजकीय, सामाजिक व्यंगचित्रे अतिशय मार्मिकपणे रेखाटता रेखाटता बोजडपणा आणि रसहीनता यापासून आपला कुंचला दूर ठेवून त्यांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठात अमूलाग्र बदल घडवून आणला.
३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!”
डॉ. खडसे यांची आजवर ३४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या ‘काला सुरज’ या कादंबरीला १९९२ चा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. जयवंत दळवी यांच्या ‘कालचक्र’ या मराठी नाटकाचा तसेच ‘रामनगरी’ या राम नगरकर यांच्या आत्मचरित्राचा हिंदी अनुवाद त्यांनी केला आहे. ‘अपने ही होने पर’ या हिंदी काव्य संग्रहात विं. दा. करंदीकरांच्या कवितांचा अनुवाद संग्रहित केला आहे.
राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका, ‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका, ‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी, ‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व, ‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत, ‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत.
महात्मा गांधींची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सर बेन किंग्जले यांचा जन्म ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाला.
बेन किंग्जले हे मूळत: भारतीय वंशाचेच आहेत आणि त्याचं मूळ नाव कृष्णा भानजी. ते मूळचे गुजरातीच. त्याचे वडील गुजराती होते. किंग्जले यांच्या वडीलाचां जन्म केनियात झाला.त्यांचे आजोबा व्यापारी म्हणून जांजीबार स्थायिक झाले. किंग्सले यांचा जन्म जांजीबारचा ते वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या वडीलाच्या बरोबर इंग्लण्डला गेले. बेन किंग्जले हे गांधी चित्रपटात इतके गांधींच्या भूमिकेत फिट्ट बसले, की आजही हॉलिवुडमध्ये आणि भारतात ‘गांधी’मधील त्या भूमिकेसाठीच ते ओळखले जातात. बेन किंग्जले यांना आपल्या सुरुवातीच्या काळात ‘गांधी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्या मुळे त्यांनी अभिनयाचे शिखर लवकरच सर केलं.
बेन किंग्जले यांनी साकारलेल्या गांधी या भूमिकेत सर्वाधिक लक्षात राहिले ते डोळे. त्यांनी निर्धार, करुणा, संताप, दु:ख आणि बरीचशी मिश्किली अशा विविध मुद्रा बेननं सहजपणे दाखवल्या. दांडी यात्रेत तरातरा चालणारे ‘सुपरफिट’ गांधीजी, उपोषणांमुळे थकलेले तरीही न खचलेले गांधीजी, त्यांचे भक्तगण बनलेल्या अनेक गोऱ्या मंडळींच्या फिरक्या घेणारे गांधीजी, कस्तुरबांच्या निधनामुळे प्रचंड व्यथित झालेले गांधीजी, फाळणीच्या अपरिहार्यतेपुढे अगतिक झालेले गांधीजी अशा कितीतरी छटा. अॅटमबरो आणि किंग्जले यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणावी तर त्यांनी भारताचे राष्ट्रपिता नवीन पिढीसमोर पुन्हा जिवंत केले. बेन किंग्जले यांनी शटर आयलंड, आयर्न मॅन, प्रिंस ऑफ पर्शिया अश्या हॉलीवूड मधील चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच जंगलबुक मध्ये मोगलीचा मित्र बगिराला याचा आवाज त्यांनी दिला आहे, त्यांनी बॉलीवूड मधील 'तीन पत्ती' 'ताज' या चित्रपटात काम केले आहे.
बेन किंग्जले यांना अकादमी पुरस्कार, बाफ्टा, गोल्डन ग्लोब पुरस्कार व स्क्रीन एक्टर्स गिल्ड अवार्ड्स असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गांधी चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=XyWRx_2MFbk
मे १९४७ च्या एके सकाळी, अण्वस्त्र चाचणी झाली. अण्वस्त्राचे सांकेतिक नाव होते, ‘हसरा बुद्ध.’ चाचणी स्थळाचे निरीक्षण करताना इंदिराजी, डॉ. रामण्णा व डॉ. होमी सेठना यांची छबी दुस-या दिवशीच्या दैनिकांमध्ये झळकली आणि डॉ. रामण्णांचे नाव साऱ्या जगात झाले. त्यावर्षीचा भारताचा नागरी सन्मान त्यांना लाभला.
अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण दीनानाथ मंगेशकर यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे मा.दीनानाथ मंगेशकर यांचे गुरू. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला.त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवलं. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता.
१९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका मास्टर दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते.
‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे उपपद लावले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे पक्के दोस्त. मास्टर दीनानाथ हे सी. के. नायडू यांची क्रिकेटची मॅच बघायला यायचे, तर नायडू हे मास्टर दीनानाथांची नाटके पाहायला येत. मास्टर दीनानाथ यांचे २४ एप्रिल १९४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीकांत खाडे (बाळू) यांना २०१३ या वर्षाचा राज्य शासनाच्या विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने तसेच वाई येथील लालासाहेब खुडे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन सन्मानित करण्यात आले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti