(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • ललकारचे आपटे म्हणून प्रसिद्ध असलेले नानासाहेब आपटे

    यशवंत सीताराम आपटे उर्फ नानासाहेब आपटे हे मुळचे साताऱ्याजवळील सायगावचे. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १९०९ रोजी झाली. नानासाहेबांचे आईवडील प्लेगने गेले त्यामुळे पुण्यात आजोबांकडे आजोळी आले, शिक्षण पुण्यातच घेतले व पुणेकर झाले. नानासाहेब आपटे यांनी नोकरी कधीच केली नाही. पुण्यात बी.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातच डेक्कन जिमखान्यावर आज जिथे जिमखाना पोस्ट ऑफिस आहे त्याच्याच ओळीत एक दुकान घेऊन, स्टेशनरी सामानाचा व्यवसाय केला. नंतर ६०२ सदाशिव, या सदाशिव पेठ हौदाजवळच्या आपल्या राहण्याच्या ठिकाणी रस्त्यालगतच्या जागेत त्यांनी ‘रेकॉर्ड लायब्ररी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. तिथे हिंदी, मराठी रेकॉर्डस ऐकायला लोक यायचे. तिथे एका खोलीत बसून लोकांना आपल्या पसंतीची गाणी अल्पदरात ऐकायला मिळायची. त्या दुकानाच्या आतल्या बाजूला असलेल्या खोलीत रेडिओ-दुरुस्ती आणि विक्री ही कामे चालायची.

    नानासाहेब आपटे यांना असल्या गोष्टींसाठी लागणारे तंत्रज्ञानही न शिकता अवगत होते. १९४० च्या दशकात काही काळ मा.नानासाहेबानी अमेरिकन मोटारसायकलींची एजन्सी घेतली होती. त्यांनी ‘म्युझिक’ या नावाची एक रेकॉर्ड लायब्ररी १९४३-४४ च्या सुमारास साताऱ्यातपण उघडली होती. नानासाहेब आपटे उपक्रमशील असल्यामुळे त्याची झेप रेकॉर्ड लायब्ररीपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी सातारकरांसाठी साताऱ्यात बालगंधर्व, गजाननराव वाटवे, गोविंद कुरवाळीकर यासारख्या लोकप्रिय गायकांचे गाण्याचे कार्यक्रमही आयोजित केले होते. पुढे १९४२ मध्ये त्यांनी रेडीओची एजन्सी घेऊन त्यांचा तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी रेडीओ सर्व्हीसिंगचा अमेरिकन पोस्टल कोर्स त्या काळी केला. त्यांनी रेडीओच्या तंत्राचा अभ्यास करून “आकाशवाणी “ नावाचे पुस्तक १९५० साली लिहून प्रसिद्ध केले.

    दुसऱ्या महायुद्धामुळे रेडीओची आयात बंद झाल्याने पर्यायी व्यवसाय म्हणून भानुविलासमध्ये नाटकाचे वेळी आणि संभाजी उद्यानात मनोरंजनासाठी ग्रामोफोन रेकॉर्ड्स वाजवण्याचे कंत्राट घेतले व त्यातूनच रेकॉर्ड लायब्ररी आणि ध्वनिक्षेपण(लाउडस्पीकर) या व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. त्याकाळी कार्यक्रमाच्या वेळी कर्णे वापरले जात. नानासाहेबांनी त्यात बदल करून बॉक्स स्पीकर वापरात आणले. नानासाहेब आपटे हे तंत्रज्ञानाचे पाईक होते. ते काळाच्या पुढे दोन पावले असत.

    गजानन वाटवे, सुधीर फडके यांची व नानासाहेबांची रेकार्डसच्या निमित्ताने मैत्री होतीच, गजानन वाटवे, सुधीर फडके कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेचे काम नानासाहेबांना मिळू लागले. या व इतर कलाकाराकडून कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था नानांचीच उत्तम असा विश्वास त्यांनी मिळवला. यामुळे १९५२ मध्ये सवाई गंधर्व पुण्यतिथी ची व्यवस्था साहजिकच नानासाहेबांकडे आली त्यानंतर १९५४ मध्ये खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांचे हस्ते झाले, या कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेचे काम त्यांच्या कडे आले व हे अत्यंत मोठे आणि जबाबदारीचे काम यशस्वी झाले. त्यानंतर ललकारची पुण्यातील सास्कृंतिक क्षेत्रात घोड दौड सुरु झाली. साहजिकच पुणेकर नानासाहेबांना ललकार”चे नानासाहेब आपटे या नावाने ओळखू लागली.

    नानासाहेब आपटे यांना सर्वदूर लोकप्रियता आणि आर्थिक स्थैर्य दिले ते ध्वनिक्षेपण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे. त्यांच्या लाऊडस्पीकर्सच्या व्यवसायाचे ‘ललकार’ हे नाव जवळजवळ शिकागो या ध्वनिक्षेपण व्यवसायातील दुसऱ्या एका प्रसिद्ध नावाइतकेच गाजले. सवाई गंधर्व महोत्सव, सुधीर फडके यांचे गीत-रामायणाचे कार्यक्रम, भीमसेन, वसंतराव देशपांडे यांचे गायनाचे कार्यक्रम, मोठमोठे समारंभ, भाषणे, असे कित्येक कार्यक्रम ललकारने पुरवलेल्या ध्वनिक्षेपण सेवेच्या साह्य़ाने झाले आहेत. ललकार म्हणजे निर्दोष, समाधानकारक सेवा असे समीकरणच झाले होते. जसजशी मोठी कामे येऊ लागली त्याबरोबरीने अधिक चांगल्या कामाची अपेक्षा होऊ लागली. नानासाहेबांना माणसाबरोबर तांत्रिकतेची पण ओढ होती. नानांनी नवीन मोठ्या शक्तीचे अम्प्लीफायार्स वापरायला सुरवात केली.

    त्या बरोबरीने नवे मायक्रोफोन आणले. स्पीकर बॉक्सेस स्वतः बनवून घेत असत. त्यासाठी देवदार लाकूड वापरत. ते आपल्या सहकार्यांना ट्रेनींग देत असत. माईक सेट करताना वोल्युम कंट्रोल बंद करायची सवय सर्व ऑपरेटरना लावत असत. त्या काळी लाउड स्पीकर मधून शिट्या येणे हे नॉर्मल होते. प्रत्येक वेळी स्पीकरची व माईकची जागा याचा अंदाज घेऊनच सर्व व्यवस्था का करावी लागे की ज्यामुळे फीडब्याक/ शिट्या येणार नाहीत. पूर्वी एक /दोन माईक असले की पुरत पण मोठ्या कार्यक्रमासाठी ४/५ माईक लावणे, अवघड होते. अम्प्लीफायारला १/२ माईकचीच सोय असे. नानांनी ५ माईक लावता येणारे अम्प्लीफायार बनवून घेतले. राष्ट्रपती ,पंतप्रधान यांचे कार्यक्रमासाठी मुख्य वक्त्यासाठी २ माईक लागत. एकाच स्टॅडवर २ माईक त्यांनी एक आडवी पट्टी लावुन व्यवस्था केली आजही ती सर्वत्र वापरली जाते. त्या काळी पुण्यात नाटके मांडव वजा थेअटर मध्ये होत. संगीत नाटकांना व्यवस्था करताना अनेक क्लुप्त्या नानासाहेब वापरत.

    मंदारमाला मध्ये शेवटच्या जुगलबंदीच्या जलशात राम मराठे व प्रसाद सावकार यांचे समोर पानदानात माईक ठेवून अत्यंत उत्तम प्रकारे सर्वांना ऐकण्याची व्यवस्था होई. सवाई गंधर्व महोत्सवासारख्या ठिकाणी वीज गेल्यावर लगेच बॅटरी वर स्पीकर चालू राहण्याची व्यवस्था करून नानासाहेबांनी सर्वांची व संयोजकाची वाहवा मिळवली होती. गीतरामायण गाताना बाबूजींना काटेकोर व्यवस्था लागे. माईक व दिवे यांची विशेष योजना नानासाहेब करुन देत. स्टीरीओ सिस्टीमचा पाया पुण्यात प्रथम नानासाहेबांनी महेशकुमार यांच्या ऑर्केस्ट्राचे वेळी घातला.

    बालगंधर्व रंगमंदिरात किशोरकुमार यांच्या कार्यक्रमाचे आधी त्यांनी स्वतः येऊन ट्रायल घेऊन ललकारला शाबासकी दिली होती. या व्यवसायामुळे नानासाहेब आपटे यांचे गायन, वादन आणि इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी संबंध आला. त्याच्यापैकी अनेक जणांशी घरगुती संबंधही निर्माण झाले. संगीत नाटकासाठी गायक कॉर्डलेस माईकचा उपयोग हल्ली सर्वत्र केला जातो. नानासाहेबांच्या मनात हीच कल्पना १९६० पासून होती. पण त्या काळी तंत्रज्ञान इतके पुढारलेले नसल्याने ती त्यावेळी प्रत्यक्षात येऊ शकली नाही. नानासाहेबांनी घातलेला तंत्र ज्ञानाचा पाया त्यांचे अनेक शिष्य आजही पुढे नेत आहेत.त्यात प्रामुख्याने श्री वामन रहाळकर, प्रदीप माळी,खांबे बंधू जॉन पाटोळे इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. ललकारच्या यशात दिग्गज कलाकार आणि रसिक यांच्या असलेल्या जिव्हाळ्या बरोबर नानासाहेबांनी अत्यंत कष्टाने वेळोवेळी आत्मसात केलेले तंत्रज्ञान पण तेवढेच महत्वाचे !!!
    नानासाहेब आपटे यांचे २० मार्च २००० साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / आपटे परिवार

  • शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळारामांवरील किस्सा

    शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा.

    १९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, "सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये, दोन मते कमी पडत आहेत, काहीही कर पण त्यांना निवडून आण". बहुदा मा.गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंवा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल.

    शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (शरद पवार म्हणतात .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!"), त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळाराम' यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले. मा.शरद पवारांनी 'पी.सावळाराम' यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले, तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर मा.गदिमाही उपस्थित होते, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले, नगराध्यक्ष झाले. गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...
    "बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."

    त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पीटल साठी प्रसिद्ध होते, कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असत, त्याचा रेफरंन्स व 'येडेमच्छींद्र' हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटील' केले. "बहाद्दरा काय काम केलस!, येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....." , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जयदेव-एक अपयशी संगीतकार!!

    खरतर, जयदेवला "अपयशी" संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.

    मला वाटत, त्यांच्या आयुष्याची सुरवातच मुळी "सहाय्यक" म्हणून झाली आणि त्यातच बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी, सुरवातीला, उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत, देव आनंदच्या "आन्धीया" या चित्रपटाला संगीत देताना, सहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर, एस.डी.बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!! जयदेव यांचे खरे नाव झाले ते, "हम दोनो" या चित्रपटाने!! पण, दुर्दैवाने, या संगीताच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजुबत झाला नाही. एकदा, देव आनंद म्हणाला होता कि," जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!!" अजब तर्कशास्त्र!! एक खरे कि, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या पण तो त्यांचा शैलीचा भाग होता, त्याला कोण काय करणार. पण, मग, मदन मोहन तरी काय फारसे वेगळे करायचा!! अर्थात, मदन मोहन देखील अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर वावरला!! एखाद्या संगीतकाराची शैली जर का रूढ मार्गाने न जाता, वेगळ्या वाटेने जात असली तर, तो काय दोष मानायचा का? त्या अर्थाने मराठीतील, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हे देखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!!
    जयदेवला, "हम दोनो" व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटाने लौकिकार्थाने यश दाखवले नाही. अगदी, "अंजली" पासून ते शेवटचा, "हीर रांझा" पर्यंतचा इतिहास, हेच उत्तर दर्शवतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा कि आपल्या तत्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत मोजली, असे म्हणायचे!! संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी, जयदेवने आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किमत मोजली. जयदेवने, इतर संगीतकारांच्या मानाने फारच तुरळक चित्रपट केले पण, त्यातील बहुतांशी चित्रपट केवळ अविस्मरणीय असेच होते, अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या सहाय्याने सांगोपांग चिकित्सा केली तरीदेखील!! जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्यक असतील तितकीच, त्यांनी आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्ट होई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४,५ व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची काहीच गरज नाही आणि त्यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरज नाही. असला, अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.

    आधी शब्द कि आधी चाल, हा भावगीत/चित्रपट गीतातील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्या सारख्या रसिकांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, आपल्यापुढे जे गाणे सादर होते, ते महत्त्वाचे मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारावी!! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेंव्हा आपल्यासमोर एखादे गाणे येते तेंव्हा, ते गाणे, १] कविता, २] संगीत रचना आणि ३] गायन, या तीनच घटकातून ऐकायचे, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात, हे तिन्हीही घटक, वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथे, मी केवळ "अर्थपूर्ण" गाण्यांचाच विचार करीत आहे. कारण आजही, आपल्या समजत असाच विचार प्रचलित आहे कि, तीन मिनिटांचे गाणे, हे "संगीत" नव्हेच!! अर्थात, हा देखील एक खुळचट विचार आहे म्हणा. प्रत्येक, गाण्यान, वरील तिन्हीही घटक आवर्जूनपणे आवश्यकच असतात. यातील एक जरी घटक "दुबळा" राहिला तर, सगळी रचनाच "फोफशी" होते. जयदेवच्या गाण्यांत हीं जाणीव प्रखरपणे जाणवते. जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरित्या जाणवतो. अर्थात, जयदेवने बहुतेकवेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवी असतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच्यासारखे, किंवा मराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्ष्यात येईल कि, हे "गीतकार" मुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कविता मुलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एका वेगळ्या निबंधाचा विषय आहे.

    "हम दोनो" मधील गाणी आपण, वानगीदाखल बघूया. "अल्ला तेरो नाम" पासून ते " कभी खुद पे" सारख्या गझल सदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. इथे, मला आणखी एक गमतीचा मुद्दा सुचला. "अल्ला तेरो नाम" हे गाणे तर अप्रतिम आहेच, यात वादच नाही, पण, मोठ्या झाडाच्या संपर्कात आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुटते तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. "अल्ला तेरो नाम" ची लोकप्रियता प्रचंडच आहे आणि आता तर ते लताचे एक classic गाणे म्हणूनच ओळखले जाते पण, याच चित्रपटातील, "प्रभू तेरो नाम" हे भजनदेखील तितकेच सुश्राव्य आहे, हे फारसे कुणी ध्यानातच घेत नाही आणि एक प्रकारे, या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!! असाच प्रकार, सी. रामचंद्रांच्या "अनारकली" बाबत झाला आहे,. "ये जिंदगी उसीकी हैं" हे गाणे अजरामर झाले पण, त्याच चित्रपटातील, "मुहोब्बत ऐसी धडकन हैं" हे गाणे पार मागे पडले. खर तर, रचनेच्या दृष्टीकोनातून पहिले तर, "मुहोब्बत ऐसी धडकन" हे गाणे नितांत रमणीय आणि गोड गाणे आहे. थोडा वेगळा विचार केला तर, असे दिसेल कि, "ये जिंदगी उसीकी हैं" या गाण्यावर, "शारदा" नाटकातील, "मूर्तिमंत भीती उभी" या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनी देखील कबूल केलेले आहे तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखे आहे. असो,

    जयदेवने फक्त लताकडूनच अफलातून रचना गावून घेतल्या आहेत असे नव्हे तर, हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सासदार केलेल्या आहेत. रुना लैलाचे "बोलो बोलो कान्हा" हे गाणे कधी ऐकले आहे का? आवर्जूनपणे ऐकण्यासारखे आहे. सुरेश वाडकर तर, "सीनेमे जलन" या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासियत अशी आहे कि, त्याची गाणी ऐकताना गोड वाटतात पण, प्रत्यक्ष्य ऐकताना त्यातील "अवघड" लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल, लताचेच प्रसिद्ध, "ये दिल और उनकी" हे पहाडी रागातले गाणे ऐकावे आणि माझ्या वाक्याची प्रतीती घ्यावी. इतके लयबद्ध गाणे पण तितकेच गायला अवघड!! तसाच प्रकार, " तू चंदा मीन चांदनी" आणि "मै आज पवन बन जाऊ" या गाण्यांच्या बाबतीत येतो. "मै आज पवन" हे गाणे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी मांड राग तर, खास जयदेवची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. "रात भी हैं कूच भिगी" सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस, सगळेच इतके विलोभनीय आहे कि, अशी गाणी ऐकताना, आपणच आपल्या मनाशी आपल्या लेखणीचा पराभव स्वीकारावा!!

    गाणी, आणखी अनेक सांगता येतील कि त्या योगे जयदेवची प्रतिभा निखरून मांडता येईल. पण, खर तर, गाण्यातील वाद्यमेळ, त्याचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ ऐकण्याचाच भाग आहे आणि तो फक्त, आपण एकटेच बसून शांतपणे अनुभवण्याचा भाग आहे. खर तर, कुठलेही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथे, दुसरे कुणीही उपरेच असतात. प्रत्येक गाणे हे, फक्त तुमच्याशीच संवाद साधत असते आणि त्यातूनच तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देत असता. निदान, माझी तरी, गाणे ऐकण्याची अशीच प्रक्रिया आहे.

    रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला, कसलाच आवाज नसतो. आपणही, विक्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशाच वेळी, दूरवरून, लताचे, "किस किसको दीपक प्यार करे" हे अत्यंत अवघडल्या रचेनेचे सूर ऐकायला येतात आणि आपण, स्वत:च कधी अंतर्मुख व्हायला लागतो हेच कळत नाही.

    - अनिल गोविलकर

  • मराठी सिनेअभिनेते मोहन गोखले

    घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मा.मोहन गोखले वावरले.

  • बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज

    अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली.

    मोहम्मद अझिज यांनी 'दूध का कर्ज', 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत' यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले. 'प्यार हमारा अमर रहे', 'ऐ मेरे दोस्त', 'तेरी बेवफाई का शिकवा', 'मितवा भूल ना जाना', 'फूल गुलाब का', 'दुनिया में कितना गम है', 'रब को याद करु', 'बहुत जताते हो', 'तू कल चला जायेगा', 'हम तुम्हें इतना', 'माय नेम इज लखन', 'तुने प्यार की बिन बजाई', 'तुमसे बना मेरा जीवन', यासारखी हिट गाणी गायली आहेत.

    २७ नोव्हेंबर २०१८ रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मोहम्मद अझिज यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=MNOjKA6vO-0
    https://www.youtube.com/watch?v=zczC3QjqArA

  • ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे

    आपल्या करीयरची सुरुवात त्यांनी १९७० साली ‘नटसम्राट’ या नाटकाने केली.‘नवरा माझा नवसाचा’ मधील भूमिकेमुळे सुनील तावडे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘दुहेरी’ या मालिकेत काही काळ ते नर्सच्या रुपात दिसले होते. ‘माझा होशील ना’ ही सध्या त्यांची मालिका गाजत आहे. ‘नटसम्राट’,’बॅरिस्टर’ तरुण तुर्क म्हातारे अर्क,लग्नाची गोष्ट, एकदा पहावे करून, लेकुरे उदंड झाली ही त्यांची काही नाटके होत.

  • महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग

    महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.

    मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.

    रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.

    लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.

    मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.

    1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
    पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.

    दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.

    १९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.

    त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

    भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.

    मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे

    त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात म्युझिक ॲ‍रेंजर म्हणून काम करणाऱ्या भिडे यांनी कालांतराने चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरुवात केली.

  • हा खेळ कुणाला दैवाचा कळला!

    आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ज्या प्रकारे मृत्यू झाला ते अत्यंत खेदकारक आहे. तो धक्कादायक म्हणावा लागेल. त्यांचे व्यक्तीमत्व, तज्ज्ञता असूनही साधेपणाने जगण्याची वृत्ती आणि माणूसकी मात्र कायमच स्मरणात राहील.

  • पं. मधुकर दीक्षित

    पं. दीक्षित बरीच वर्षे खाँसाहेबांच्या सान्निध्यात राहिल्याने खाँसाहेबांच्या सतार वादनातील गायकी अंग व त्यामधील बरेच बारकावे ज्ञात झाल्याने ते त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले होते. त्यामुळे दीक्षित यांच्या सतार वादनात खाँसाहेबांचा पगडा भासत असे.