जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सातार्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेला एक मुलगा हुषारी आणि इच्छाशक्तीच्या बळावर लंडनमध्ये अर्थशास्त्रातील पीएच . डी . मिळवतो आणि पुढे कॅनडाचे मानवी हक्क आयुक्त हे पद भूषवीत जगभरातील मानवी हक्क यंत्रणांवर आपला ठसा उमटवतो, हे कर्तृत्व अपवादात्मकच. भाऊसाहेब उबाळे या एका मराठी माणसाच्या नावे ते जमा असावे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब.
भाऊसाहेबांचे वडील सरकारी कर्मचारी असले, तरी स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सहभाग होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या मूल्यांचे भाऊसाहेबांवर बालवयातच संस्कार झाले. कॉलेज शिक्षणासाठी ते मुंबईत आले. नोकरी करीत त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे काही काळ त्यांनी सरकारी नोकरीही केली. पुढे गाठीला फारसे पैसे नसतानाही त्यांनी लंडनला प्रयाण केले. उबाळे यांनी तेथे अर्थशास्त्रातील पीएच. डी. मिळवली. या काळात त्यांनी पत्रकारिताही केली.
१९७५ मध्ये त्यांनी कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पात्रता असूनही त्यांना तेथे सुमारे दोन वर्षे कारकुनाखेरीज अन्य नोकरी दिली गेली नाही. हा अर्थातच वांशिक भेदभावाच्या मनोवृत्तीचा परिणाम होता. उबाळे यांनी समाजातील सर्व घटकांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. त्या काळात ईस्ट इंडियन्स तसेच पाकिस्तानी स्थलांतरितांच्या विरोधात कॅनडात हिंसक दंगे होत होते. उबाळे यांनी या हल्ल्यांचा तपशीलवार अभ्यास करून अहवाल तयार केला. पत्रकारितेतील अनुभवाचा वापर करीत, त्यांनी एका लहान मुलीच्या हस्ते तो जाहीर सभेत सरकारला 'सादर' केला . 'अहवालात काय आहे हे मला कळत नाही, पण माझं भविष्य त्यावर अवलंबून आहे,' हे त्या मुलीचं विधान माध्यमांनी उचलून धरलं आणि नंतर खुद्द पंतप्रधानांनी जाहीर सभेत या अहवालातील सर्व शिफारशी स्वीकारल्या ! 'उबाळे अहवाल' म्हणूनच तो ओळखला जातो. कॅनडातील समाजातील बहुविधता जपतानाच, त्यातील विविध वांशिक गटांत भावनिक एकजिनसीपणा आणणे, संधीच्या समानतेचे तत्त्व रुजविणे, याकरिता उबाळे कार्यरत राहिले.
कॅनडा सरकारनेही देशाचे मानवी हक्क आयुक्त तसेच वांशिक संबंध आयुक्त या पदांवर त्यांची नियुक्ती करून, त्यांच्या कल्पकतेचा आणि तळमळीचा सुयोग्य वापर करून घेतला. गरिबी निर्मूलन हा मानवी हक्कांचाच अविभाज्य भाग आहे, यावर त्यांचा भर होता. त्यामुळे मानवी हक्क चळवळीबरोबरच, 'इंटरनॅशनल सेंटर फॉर पॉव्हर्टी इरॅडिकेशन' ही संस्थाही त्यांनी स्थापन केली होती आणि त्यातून ग्रामीण विकासाला चालना देणारी कामे केली जात होती.
कॅनडात १९७५ सालापासून वास्तव्य असलेल्या आणि तेथील राजकीय - सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळवलेल्या भाऊसाहेबांनी जगाचा निरोप घेतला तो मात्र त्यांच्या मायदेशात आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण जेथे झाले त्या पुण्यात.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 8, 2017
मुळचे पंजाबचे असलेले राज खोसला हे शास्त्रीय संगीत शिकलेला गायक म्हणून मुंबईत आले होते ते गायक बनायला. त्यांचा जन्म ३१ मे १९२५ रोजी झाला. काही काळ आकाशवाणीवर म्युझिक विभागात काम ही केले पण बॉलीवूड हीच त्याची खरी कर्मभूमी ठरली. या राज खोसालावर नजर पडली देव आनंद यांची आणि त्यांनी राज खोसला यांना गुरु दत्तचा असीस्टंट बनवले.
१९५४ मध्ये देव आनंद यांच्या बरोबर राज खोसालांनी "मिलाप" बनवला पण हा चित्रपट तिकीटबारीवर सपाटून आपटला. पण मग सीआयडी आला आणि राज खोसलांच्या विमानानी टेक ऑफ घेतला. काला पानी, सोलवा साल, बंबई का बाबू, एक मुसाफीर एक हसीना, वोह कौन थी, मेरा साया, दो बदन, अनिता, चिराग, दो रास्ते, शरीफ बदमाश, कच्चे धागे आणि अनेक असे अप्रतीम चित्रपट राज खोसला यांनी बनवले.
अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी एक चित्रपट केला तो म्हणजे दोस्ताना. मेरा साया हा राज खोसला यांचा सर्वात गाजलेला चित्रपट.
राज खोसला यांचे निधन ९ जुन १९९१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 31, 2018
जिद्दीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कर्तृत्वाचा खोल ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन यांचे घराणे मुळचे अफगाणिस्तानातले, पश्तुन वंशाचे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी हुसेन यांच्या घराण्याचे संबंध होते. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा निर्णय घेतला होता. प्रारंभी मुंबईतल्या स्टुडिओत संवाद लेखक, सहदिग्दर्शक आणि अन्य कामे करीत करीत हुसेन यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र समजून घेतले.
जब प्यार किसी से होता है, हा त्यांनी १९६१ मध्ये दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रचंड गाजला. त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. धंदेवाईक तडजोडीला नकार देणारे हुसेन यांनी पन्नास वर्षात मोजकेच चित्रपट काढले पण ते सर्व उत्कृष्ट होते. तिसरी मंझिल, या चित्रपटात शम्मी कपूर आणि आशा पारेख यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातली गाणी बरीच वर्षे गाजत आहेत. अनामिका, जखमी, प्यार का मौसम, जब प्यार किसी से होता है, जन्म जन्म का साथ, मदहोश, कारवॉं, तुम मेरे हो, दुल्हा बिकता है, लॉकेट, खून की पुकार, हे त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेले चित्रपट देशभरातल्या चित्रपटगृहात रौप्यमहोत्सवी ठरले होते.
चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करताना प्रवाही कथेबरोबरच चित्रपटांची तंत्र शुध्दताही त्यांनी सांभाळली. अनेक नव्या कलाकारांना संधी देतानाच, तंत्रज्ञही घडवले. ही त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीला देणगी होय! साध्या, सोप्या प्रेमकथेवरचा प्यार का मौसम हा चित्रपट तेव्हाच्या युवकांत अत्यंत लोकप्रिय झाला होता. अनामिका हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला होता. चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान हा मा.ताहिर हुसेन यांचा मुलगा. त्यांच्या तालमीतच आमिर खान तयार झाला. ताहिर हुसेन हे लेखक आणि पटकथा लेखक होते. पटकथा लिहिताना ते भारतीय प्रेक्षकांची नाडी ओळखूनच संवाद लेखन करीत. तशीच गीतेही चित्रपटासाठी गीतकारांकडून लिहून घेत. सर्वांना माणुसकीने वागवणारा निर्माता आणि दिग्दर्शक असा त्यांचा चित्रपटसृष्टीत लौकिक होता. मा.ताहिर हुसेन यांचे २ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ताहिर हुसेन यांचे चित्रपट
निर्माता- कारवाँ (1971), अनामिका (1973), मदहोश (1974), जख्मी (1975), फिर जनम लेंगे हम (1977), खून की पुकार (1978), दूल्हा बिकता है (1982), लॉकेट (1986), हमारा खानदान (1988), तुम मेरे हो (1990), हम हैं राही प्यार के (1993),
दिग्दर्शक - तुम मेरे हो (1990)
February 2, 2017
शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी गीतलेखनाचा प्रस्ताव त्याने शैलेंद्र यांच्या समोर ठेवला; शैलेंद्र यांनी तो नाकारला. नंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. शैलेंद्रचे दोनाचे चार हात झाले.
संसाराचा गाडा नीट हाकण्यासाठी पैशांची वानवा जाणवू लागली. एकेदिवशी त्याने सरळ आरके स्टुडिओ गाठला. आरके कॅम्पमध्ये तेव्हा ‘बरसात’चे काम सुरू होते. राज कपूरने या अनोख्या शैलीच्या गीतकाराला ‘बरसात’च्या गीतलेखनाची संधी दिली. शैलेंद्रने ‘बरसात मे हमसे मिले तुम...’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ ही दोन गाणी लिहिली. तेव्हा पासून राज कपूर यांच्या सर्व चित्रपटात मा.शैलेंद्र यांनी गाणी लिहिली. शैलेंद्रच्या गाण्याने ‘आरके’ला एक नवी ओळख दिली. केवळ राज कपूरचा गीतकार ही ओळख पुसणारा म्हणून ‘गाइड’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘गाइड’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माइलस्टोन. यात शैलेंद्र यांच्या गाण्यांचा वाटा निश्चितच सर्वात मोठा.
‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘मोसे छल किये जा’, ‘वहाँ कौन है तेरा’ असे गानमोती या ‘गाइड’च्या माळेत शैलेंद्रने गुंफले आहेत. ‘काँटो से खीच के ए आँचल’ हा त्यातील मुकुटमणी ठरावा. १९५८ मध्ये 'ये मेरा दीवानापन है...' (फ़िल्म- यहूदी) च्या साठी १९५९ मध्ये 'सब कुछ सीखा हमने...' (फ़िल्म- अनाडी) १९६८ साली 'मै गाऊं तुम सो जाओ...' (फ़िल्म- ब्रह्मचारी) सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून मा.शैलेंद्र फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाला होता. आवारा हूँ, रमैया वस्ता वैया, दिल के झरोखे में तुझको बिठा कर,मुड मुड के ना देख मुड मुड के,पिया तोसे नैना लागे रे,दिल की नज़र से, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खतम, अशी अनेक संस्मरणीय गाणी मा.शैलेंद्र यांनी दिली.
गुलजार हे गीतकार बनण्यात शैलेंद्र यांचं मोठं योगदान होते. गुलजार साहेबांनीच म्हटल्या प्रमाणे, "शैलेंद्र चित्रपट सृष्टीने दिलेले सर्वात थोर गीतकार होते. शंकर जय किशन , सचिन देव बर्मन, देव आनंद , पंडित रविशंकर, बिमल रॉय यांच्या बरोबर त्यांनी अजरामर राहील इतकं अद्वितीय काम केलं आहे. "खूप कमी लोकानां माहित असेल की राज कपूर यांनी अभिनय केलेला 'तीसरी कसम' 'हा चित्रपट या शैलेंद्र निर्मित होता. पण हा चित्रपट चालला नाही. मा.शैलेंद्र १४ डिसेंबर १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शैलेंद्र यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=A6LEw97vXR4
https://www.youtube.com/watch?v=hu9tojGQ2BY
August 31, 2017
एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुंब मराठी साहित्यसृष्टीला परिचित आहेत. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. ‘घाल घाल पिंगा वार्याा माझ्या परसात...’ असे हळूवारपणे लिहिणारे निकुंब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते.
कृ. ब. निकुंब कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. शिकविण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा निकुंब प्रयत्न करायचे. त्यांच्या व्याख्यानातून विद्वतेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता, ज्ञानेश्व्री सरांना पाठ होती. गर्व, अहंकार यापासून लांब राहून विद्यार्थ्यांत मिसळून निकुंब समजावून द्यायचे.
कृ.ब.निकुंब यांची 'घाल घाल पिंगा वाऱ्या' ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो. या कवितेला कमलाकर भागवत यांनी अत्यंत करुण चाल लावली अन त्यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनी आर्त स्वरात हे गाणं असं काही गायलं की पुर्वी रेडीओवर हे गाणं लागलं की सर्व वयाच्या सासूरवाशिणी हमसून हमसून रडत असत !! आजही या गाण्याची अवीट गोडी टिकून आहे एक भावकवी आणि `मृगावर्त’ या नावीन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कृष्णाजी बळवंत निकुंब उर्फ कृ. ब. निकुंब परिचित आहेत.
`पारख’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. निर्मळ, आस्वादक दृष्टी, निर्णयातील सूक्ष्मता आणि निश्चितता, शैलीचे ललित्य आणि संयम या विशेषांचा समन्वय तर ह्या समीक्षालेखांत झालाच आहे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की, `केकावली’त संज्ञाप्रवाहाचे दर्शन घडते किंवा बालकवींच्या कवितेत जोडाक्षराचे दाठरपण मोडून त्याला सुकुमार रूप प्राप्त होते, यांसारखी लहानमोठी अपरिचित सौंदर्यस्थळे निकुंबाना अचूक गवसली होती. कवी निकुंब यांच्या कविता मोजक्याच मात्र आशयघन आहेत.
मृगावर्त, पंखपल्लवी, ऊर्मिला, उज्वला, अनुबंध हे त्यांचे लेखन होय. कवी निकुंब यांचे ३० जून १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. समीर गायकवाड.
August 16, 2017
सेलेना गोमेज ए. आर. रेहमानची खूप मोठी चाहती आहे.एका मुलाखतीत खुद्द सेलेनाने ही कबुली दिली.मी भारतीय संगीत मनापासून ऐकेते आणि ते मला आवडतेही. ए़ आऱ रेहमानचे संगीत मला सर्वाधिक आवडते़ त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला प्रचंड आनंद होईल, बॉलिवूडसाठी गायलाही मला आवडेल,असे सेलेना म्हणाली.भारतीय संस्कृतीबद्दलही सेलेना बोलली. मला भारत आणि भारतातील हिंदू संस्कृती पूर्वापार आवडते.
August 18, 2024
माणिक वर्मा यांनी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १९३९ साली दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली आणि दोन ध्वनिमुद्रिकामध्ये गाऊन ह्या क्षेत्रात त्या आल्या. अर्थात चित्रपटगीतांच्या बाबतीतही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. प्रभात कंपनीच्या हिंदी ‘ गोकुल ‘ या चित्रपटात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत त्यांनी प्रथम गायले. परंतु त्यांनी जास्त गाणी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांसाठी गायली. माणिक वर्मा यांनी असंख्य भावगीते , भक्तिगीते , चित्रगीते गायली आणि ती सर्व गाणी आजही आपल्या संस्कृतिक जीवनाचा भाग बनून राहिली आहेत.
July 15, 2021
एखादे ध्येय घेऊन जगणे , त्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही . त्यासाठी साधना लागते . प्रख्यात संस्कृत पंडित डॉ . केशव रामराव जोशी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते .
July 9, 2012
राक्षसी महत्वाकांक्षा ‘ ह्या नाटकासाठी गोव्यात मुद्दाम दत्तोबा भोसले यांना आणले. ते केशवराव भोसले यांचे बंधू होते. त्यावेळी ‘ कंदन ‘ ची भूमिका मामांना आयत्या वेळी करावी लागली. मामांचे काम पाहून दत्तोबा भोसले इतके खूष झाले की त्यांनी मामांना आनंदाने खांद्यावर घेऊन रंगपटात नेले .
September 12, 2021
२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत.
November 20, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti