जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
चित्रकलेवर ‘दिनानाथ शैली’चा ठसा उमटविणारे दिनानाथ दामोदर दलाल. राजकीय, सामाजिक व्यंगचित्रे अतिशय मार्मिकपणे रेखाटता रेखाटता बोजडपणा आणि रसहीनता यापासून आपला कुंचला दूर ठेवून त्यांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठात अमूलाग्र बदल घडवून आणला.
महिला सक्षमीकरणाचा नवा व समर्थ चेहरा म्हणून नमिता राऊत यांच्याकडे पाहिले जाते. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. महिला बचत गट स्थापन करून महिलांसाठीच्या हिताची कामे करण्यास सुरूवात केली.
त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या.
डिटको यांचे आयुष्य अगदी बंदिस्त होते. त्यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत किंवा जाहीर कार्यक्रम घेतले नाहीत. अतिशय नम्र असे त्यांचे व्यक्तित्व. त्यांनी प्रत्येकाच्या मनात दडलेला नायक ‘स्पायडरमॅन’च्या रूपाने चित्ररूपात प्रकट केला.
रामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते.
भारतीय नाटय़सृष्टीवर सर्जनशील लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३९ रोजी विदर्भातल्या पारवा या गावात झाला.
त्रिधारा या नाट्य प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. महेश एलकुंचवार यांचा जन्म तेलगु भाषक कुटुंबात झाला. त्यांची मातृभाषा तेलगूच. पारवा गावातच प्राथमिक शिक्षण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते नागपूरला आले. मॉरिस कॉलेजमधून बी.ए आणि नागपूर विद्यापीठातून इंग्लिश विषय घेऊन एम.एची पदवी मिळवली. कॉलेजजीवनात असताना, १९५७ ते १९६३ या काळात,त्यांनी जवळजवळ पाचशे ते सहाशे इंग्रजी चित्रपट पाहिले होते. पण विद्यार्थिदशेतच विजय तेंडुलकर यांचे "मी जिंकलो, मी हरलो', हे नाटक पाहून त्यांना नाट्य लेखनाची प्रेरणा मिळाली. व सहजपणे पाहिलेल्या नाटक या घटनेचा परिणाम होऊन एलकुंचवार नाटक या माध्यमाकडे वळले. चौफेर वाचन असलेल्या एलकुंचवार यांनी १९६७ साली "सुलताना'हे पहिले नाटक लिहिले आणि ते सत्यकथा मासिकात प्रसिद्ध होताच,नाट्य दिग्दर्शक आणि ख्यातनाम अभिनेत्री विजया मेहता यांनी रंगायन या संस्थेतर्फे ते रंगभूमीवर आणले. मानवी जीवनातली विलक्षण गुंतागुंत, पारंपरिक चालीरीतींचा प्रभाव, त्यामुळे निर्माण होणारे विविध सामाजिक प्रश्न, लोककथा,लोककलांचा सामाजिक प्रभाव, स्त्री जीवनाची मानसिक कोंडी, याचे प्रचंड चिंतन असलेल्या एलकुंचवार यांची नाटके चाकोरीबाह्य आणि नव्या विषयांवर प्रकाशझोत पाडणारी होती. पूर्ण अभ्यास आणि चिंतन केल्याशिवाय त्यांनी नाटके लिहिलेली नाहीत. त्यांच्या नाट्य लेखनात विलक्षण ताकद असल्यामुळेच त्यांच्या नाटकातली पात्रे प्रेक्षकांनाही नवा विचार देतात. १९८४ साली "होळी' या नाटकावर केतन मेहता यांनी तर गोविंद निहलानी यांनी "पार्टी' या नाटकावर हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोन्ही चित्रपटांसाठी पटकथा लेखनही एलकुंचवार यांनीच केले होते.
रुद्राक्ष, झुंबर, एका म्हाताऱ्याचा मृत्यू,कैफियत, यातनाघर, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, प्रतिबिंब, धर्मपुत्र, एका नाट्याचा मृत्यू, रक्तपुष्प, यासह त्यांनी लिहिलेली तीस नाटके मराठी रंगभूमीला नवी दिशा देणारी ठरली आहेत. त्यांच्या काही नाटकांचे हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषातही अनुवाद झाले आहेत.
मराठी भाषेवर विलक्षण प्रेम आणि या भाषेचा अभिमान असलेल्या महेश एलकुंचवार यांनी मराठीतच नाट्य लेखन केले. मराठी नाटक हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव असल्याचे ते सांगतात. ‘मौनराग’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहाने मराठी ललित लेखनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, युगांत,गाबरे यासारख्या प्रसिद्ध नाटकाचे लेखन करून क्रांती घडवून आणणाऱ्या महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला राज्य सरकारने १९८७ मध्ये उत्कृष्ट नाटक म्हणून सन्मानित केले होते.‘आत्मकथा’ या त्यांच्या नाटकाला १९८९ मध्ये अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘युगांत’ या नाटकाला देण्यात आला. १९९४ मध्ये संगीत नाटक अकादमीचा २००३ मध्ये अत्यंत मानाचा असा ‘सरस्वती सन्मान’,२००४ मध्ये साहित्य अकादमीचा व २००८ मध्ये पु.ल देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा ‘पुलोत्सव सन्मान’ त्यांना मिळाला. मराठी नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सुवर्ण पदकाने त्यांचा सन्मान झाला होता.त्यांना ‘प्रिय जी. ए. सन्मान पुरस्कार,’ के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे ‘सरस्वती पुरस्कारा’साठी सन्मानित करण्यात आलेआहे. तसेच संगीत मराठी अकादमीने विशेष अभ्यासवृत्ती जाहीर करून त्यांचा गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. त्यांचा जन्म ९ सप्टेबर १९६७ रोजी झाला. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय आता एक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे. खिलाडी सिरीज, यह दिल्लगी, मोहरा, मै खिलाडी तू अनाडी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भुल भुलय्या, सिंग इज किंग असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिध्द असलेल्या अभिनेत्याबाबतच्या काही रंजक गोष्टी.
लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले.तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते.
त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.‘स्पेशल २६’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते.भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे.
नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
साधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली.
दिलीप कुलकर्णी हे मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. एक दिग्दर्शक म्हणून ते चिकित्सक वृत्तीचे होतेच, पण त्याहीपेक्षा अजातशत्रू, सौजन्यमय व्यक्ती होते.
पुरंदरे, निर्मलाताई
डोळ्यातले सात्त्विक भाव आणि चेहऱ्यावरील स्निग्धता यामुळे क्षणात कुणालाही मनाच्या आतले काही सांगावेसे वाटावे, असे व्यक्तिमत्त्व निर्मलाताई पुरंदरे यांच्या ठायी आहे. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे त्या करीत असलेल्या कार्याला, पुणेकरांनी ‘पुण्यभूषण’ पुरस्काराच्या माध्यमातून दिलेली दाद म्हणूनच महत्त्वाची आहे.
अच्युतराव पटवर्धन यांनी स्थापलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याला त्यांनी संस्थात्मक स्वरूप दिले आणि ‘वनस्थळी’ ही संस्था स्थापन केली. ग्रामीण विकासात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना तेथील मुलामुलींनाच बालवाडय़ा चालवण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था काम करते. सुटीच्या काळात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन, फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी बालसदनची स्थापना, ग्रामीण भागातील बालवाडय़ांमधील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण वर्ग, शालाबाह्य युवकांसाठी सुतारकाम व प्लंबिंगच्या प्रशिक्षणाचे वर्ग, अशा अनेक प्रकारे निर्मलाताई महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेली पाच दशके कार्यरत आहेत. ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठीचे विविध उपक्रम आखणे हा त्यांच्या कार्यातील अविभाज्य भाग. हे करत असताना आपण काही वेगळे, मोठे करत आहोत, याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर असत नाही. प्रसिद्धीच्या वलयाची पुरेपूर जाणीव असूनही त्या त्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरल्या. वृत्तपत्रात छायाचित्रे छापून येण्यासाठी आपण काम करता कामा नये, यावर त्यांचा सतत भर असतो. ‘माणूस’ या मराठीतील एकेकाळच्या महत्त्वाच्या साप्ताहिकात दोन दशके संपादकीयकाम केल्यामुळे नजर विस्तारणे स्वाभाविक होते. निर्मलाताईंनी त्या वैचारिक अधिष्ठानाला प्रत्यक्ष कामाचीही जोड दिली. भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ फ्रान्स’ या संस्थेच्या त्या अध्यक्षही होत्या. अनेक पुरस्कार मिळूनही त्याकडे निर्लेपपणे पाहण्याची त्यांची वृत्ती त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवते. अभिजात कलांबद्दल ममत्व असणाऱ्या निर्मलाताईंना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या मोठय़ा परिवारालाही आनंद होणे स्वाभाविक आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
पुरंदरे, निर्मला
गेली तीसहून अधिक वर्षे अव्याहतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी सर्वस्व देऊन झटणार्या निर्मला पुरंदरे यांनी 'वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा'च्या माध्यमातून खेड्या-पाड्यांतील अनेक हातांना एकत्र बांधले आहे. त्यांच्या या कार्याची महती ग्रामीण भागांत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगलीच परिचित आहे.
डॉ. अच्युत आपटे यांनी स्थापन केलेल्या 'विद्यार्थी सहाय्यक समिती'मध्ये निर्मलाताई सुरुवातीपासून सक्रिय होत्या. ग्रामीण भागातून मोठ्या शहरांमध्ये शिकायला येणार्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव त्यांना यामुळे झाली. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करत असतानाच, विविध उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. निराश्रित बालकांसाठी 'आयआयएम' या ट्रस्टच्या माध्यमातून 'बालसदना'ची निर्मिती त्यांनी केली. मात्र, केवळ बालसदन किंवा बालवाडी निर्माण करून थांबायचे नाही तर तिथे शिकविणार्या शिक्षिकासुद्धा तयार केल्या पाहिजेत, हे ओळखून त्यांनी सहा महिन्यांचा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यातूनच 'वनस्थळी'ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर, राज्याच्या ठराविक भागांत हे प्रशिक्षण वर्गाचे जाळे विस्तारत गेले.
सुमारे अडीचशे बालवाड्या आणि ११ हजारांहून अधिक प्रशिक्षित बालवाडी शिक्षिका ही निर्मलाताई आणि त्यांनी 'वनस्थळी'द्वारे केलेल्या कार्यातून निर्माण झालेली 'संपत्ती' आहे. भांडवल आणि खर्चाचे आकडे याचा आधार न घेता मनुष्यबळावरचा विश्वास आणि त्यांच्या हातांची साथ, यावर ही संपत्ती उभी राहिली आहे. यामध्ये अर्थातच निर्मलाताईंच्या निर्मळ आणि पारदर्शी स्वभावाचे संचितही आहे, हे विसरून चालणार नाही! केवळ बालवाडी प्रशिक्षणापुरते वनस्थळी आणि निर्मलाताईंचे काम मर्यादित नाही; तर किशोर छंदवर्ग, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण आणि सध्या आरोग्य सेविका प्रशिक्षण, अशा उपक्रमांचा पसारा वाढतोच आहे.
'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स' आणि यासारख्या इतर संस्थांमधूनही त्यांचे समाजाशी नाळ जोडण्याचे प्रयत्न सुरूच आहेत... आणि निर्मलाताईंच्या कोशात 'स्वस्थता' किंवा 'विश्रांती' याला अजिबातच स्थान नसल्यामुळे त्यांच्या कार्याचा गाडा अव्याहत सुरूच आहे... कोणत्याही प्रसिद्धीशिवाय!
त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
Copyright © 2025 | Marathisrushti