जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रिया मराठे… विविध मराठी, हिंदी मालिकांमधून सातत्याने दिसणारा देखणा चेहरा… आकर्षक बांधा… ही प्रियाची वैशिष्टय़ं..
आपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास गेली दशकभर सातत्याने करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सडपातळ बांधा, मात्र हसऱया चेहऱयाच्या, बोलक्या डोळ्यांच्या आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रियाने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
लहानपणापासून प्रियाने शिक्षणाची स्वप्नं रंगवली. इतर मुलांप्रमाणेच तिलाही इंजिनीअर, डॉक्टर व्हायचं होतं खरं, मात्र अभिनय क्षेत्राकडे तिची कधी पावलं वळतील अशी कल्पनाही तिला त्या काळी नव्हती. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता. ठाणा कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीत असतानाच तिने महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाटय़स्पर्धा, तसंच तालमी पाहिल्या होत्या आणि याच काळात ती अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली. अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने अभिनयाचा वेगळा प्रवास तिचा सुरू झाला. पुढे एफवायला असताना तिची आणि याच महाविद्यालयातल्या इतर नाटय़प्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला वेगळी गती मिळाली. दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांचं त्या काळी तिला मार्गदर्शन मिळालं.
प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर प्रवेश मिळवला. 2005 साली मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळूनच पाहिलं नाही. 2007 साली तिने हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला तो ‘कसम से’ मालिकेतून. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही तिचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला. मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिला निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी चालून आली आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘तू तिथे मी’ या दोन्ही मालिका समांतर सुरू असल्याने तिची यासाठी वेळेची गणितं मांडताना तारेवरची कसरत होत होती. सरतेशेवटी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून आपला काढता पाय घेत तिने ‘तू तिथे मी’ याच मालिकेला प्राधान्य देत तिने आपला सकस अभिनय सादर केला. ‘विघ्नहर्ता महागणपती’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘1234’ आणि ‘ती आणि इतर’ या सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
प्रियाचं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. प्रिया मराठे हा चेहरा तिच्या मालिकांमधील अभिनयामुळे घराघरात पोहचला होता आणि म्हणूनच सुरुवातीला तिचं फोटोशूट हे तिच्या तेव्हा सुरू असलेल्या मालिकांतील भूमिकेला धरून करण्याचं निश्चित करण्यात आलं. यासाठी मॉडर्न साडीतला तिचा लूक लक्षात घेण्यात आला होता. यानुसार मेकअप, हेअर हे देखील लक्षात घेण्यात आलं. यावर साजेसे दिसतील असे दागिने आणि बांगडय़ा, कानातले दागिने हे देखील निवडण्यात आले. या शूटनंतर तिच्या मालिकांमध्ये असलेल्या नेहमीच्या इमेजला तडा देत तिचं वेस्टर्न आऊटफिटमधलं वेगळं फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. खरं तरं प्रिया जशी आहे, तिचं राहणीमान जसं आहे त्या सगळ्याला समोर ठेवून तिच्यासाठीचे कपडे निवडण्यात आले आणि मग फॅशनचा एक टच देऊन तिचा मेकअप आणि हेअर करण्यात आला. प्रियाचा चेहरा लक्षात घेऊन तिच्या मेकअपची शेड ठरवण्यात आली. मेकओव्हर केलेली प्रिया या फॅशनेबल लूकमध्ये फारच खुलून दिसत होती. भूमिकेतील तिची एकरूपता आणि तिने प्रत्येक भूमिकेला दिलेला समान न्याय हा मी देखील एकाच दिवशी करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या फोटोशूटमधून अनुभवाला आणि इथेच प्रियातला लपलेला उत्तम कलाकार मला कॅमेराबद्ध करता आल्याचा वेगळा आनंद मिळाला.
धनेश पाटील
ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे यांचा जन्म २६ सप्टेंबर, १९६७ रोजी झाला.
शिडाच्या नौकेवर एकट्याने २१हजार ६०० सागरी मैलांची विश्व सागर परिक्रमा पूर्ण करणारे कमांडर दोंदे हे पहिले भारतीय!
या परिक्रमेने जभरातील त्या वेळच्या १७५ विश्वयात्री दर्यावर्दींच्या पंगतीत प्रथमच एका भारतीयाचे नाव कोरले गेले. निवृत्त व्हाइस अॅडमिरल मनोहर आवटी यांच्या प्रेरणेतूनच कमांडर दोंदे या आव्हानात्मक कामगिरीसाठी उतरले.
कमांडर दोंदे यांनी ५६ फूट लांबीच्या म्हादेईतून पहिली सागरपरिक्रमा ऑगस्ट २००९ रोजी सुरू करून एप्रिल २०१० मध्ये पूर्ण केली. पण नौकेची दुरुस्ती, शिधा साठवणे आणि विविध देशांतील लोकांच्या भेटी घेणे यासाठी चार वेळा थांबे घेतल्यामुळे ही परिक्रमा १५७ दिवसांत पूर्ण झाली होती.२३ हजार समुद्र मैल अंतर पार करताना त्यांनी चार थांबे घेतले.
कमांडर दोंदे यांनी एनडीएत दाखल झाल्यापासूनच साहसी छंदांची आवड जोपासली होती आणि त्यांची मशागत करण्याची संधीही नौदलात मिळत असतेच. एनडीएमध्ये असताना ते घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन खेळायच्या पोलो या खेळात रमले. नंतर स्कीईंगच्या राष्ट्रीय स्पधेर्तही उतरले आणि नौदलाच्या सेवेत असताना डायव्हिंगचा थरारही त्यांनी आपलासा केला. मुंबई-कोची नौका सफारीत ते सहभागी होतेच...त्यामुळे आता हे नवं चॅलेन्ज...पण एकदा ते मनावर घेतल्यावर त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही.
भारताला एवढा विस्तीर्ण सागरकिनारा आणि इतक्या वर्षांची दर्यावर्दींची परंपरा असूनही विश्वपरिक्रमेत आपण मागे का राहिलो, याची रुखरुख कमांडर दोंदे यांनाही भेडसावू लागलीच. त्याचवेळी त्यांनी यासंबंधीची माहिती काढली, तेव्हा काही रंजक नोंदी सापडल्या. सर अॅलेक रोज यांनी १९६० साली केलेल्या विश्वपरिक्रमेच्या वेळी वापरलेली नौका कोलकात्यात तयार करण्यात आली होती. तर त्यानंतर सर रॉबिननॉक्स जॉन्स्टन हे तर विश्वपरिक्रमेकरिता मुंबईतच बनलेल्या 'सुहेली' या नौकेवर स्वार झाले होते. कुठेही न थांबता सागरपरिक्रमा करणारे पहिले दर्यावदीर् आणि जूल्स व्हेर्न ट्रॉफीचे दुसरे विजेते तसंच २००६ मध्ये ६७ व्या वषीर् सागर परिक्रमा पूर्ण करणारे सर्वात वयस्क (?) सदस्य असे किताब नावावर असलेले जॉन्स्टन यांच्यापर्यंत कमांडर दोंदे जाऊन धडकले. अगदी रीतसर त्यांची शिकवणीच म्हणाना. सर जॉन्स्टन यांच्यासह त्यांनी ब्रिटनमध्ये तीन आठवडे घालवले आणि त्यांच्यासह त्यांच्या बोटीवर डागडुजीपासून सर्व कामे कमांडर दोंदे यांनी केली. सदुसष्टाव्या वषीर्चा जॉन्स्टन यांचा उत्साह पाहून दोंदे थक्क झाले. जॉन्स्टन दोंदे यांच्या नौकेची बांधणी पाहण्यासाठी गोव्यात दाखल झाले, तेव्हा तर शिडाच्या काठीवर चढून नौकेची मजबुती पाहण्याचा काटेकोरपणाही दाखवत होते. मुंबईत लकडाबाजारात कुठे सामान मिळते, याच्या टीप्सही जॉन्स्टन द्यायचे. अॅडमिरल आवटी यांचं तर आपल्या विंचुणीर्तून या सर्व घडामोडींवर लक्ष होतंच. पण गोव्यातल्या मांडवी नदीचं मूळ नाव धारण करणारी म्हादेई, त्या गोव्यातल्या मातीतच बनत होती. तिचं बाळंतपण करणारे रत्नाकर दांडेकरांचे हातही असंच काटेकोर लक्ष ठेवून होते. वर्षभरात 'म्हादेई'चं काम पूर्ण झालंच पाहिजे, अशी अटच नौदलाने कंत्राटात घातली होती. शेवटच्या तीन महिन्यात तर आपलं ऑफिस विसरून म्हादेईच्या सेवेतच ते होते. या सर्वांचा परिक्रमेत मोठा वाटा आहे, हे दोंदे वारंवार सांगतात.
'म्हादेई' तयार झाल्यानंतर दोंदे यांनी त्यांचा सपोर्ट ऑफिसर अभिलाष याच्या साथीने मॉरिशसपर्यंत पहिली सागरी सफर केली. त्यानंतर ते एकटे २३०० सागरी मैल अंतर कापत म्हादेईच्या साथीने मुंबईत परतले, हीसुद्धा भारतीयाने केलेली पहिलीच लांब सफर ठरली. सागर परिक्रमेच्या अंतराच्या तुलनेत ते कमी असलं, तरी त्यातून नौकेची कसोटी पार पडली आणि अनुभवही मिळाला. एवढं सगळं झाल्यावर गेल्या वषीर् ऑगस्ट महिन्यात भर मान्सूनमध्ये दोंदेंची म्हादेई मुंबई बंदरातून निघाली, तेव्हा खरं तर मान्सूनचा काळ...म्हणजे वारे नैऋर्त्येकडून यायला हवेत, पण प्रत्यक्षात वारा वायव्येकडून येत होता...थोडक्यात काय, तर अथांग सागरात गेल्यावर वारा आणि लाटांबाबतचे आडाखे कसे चुकतील, याचा नेम नाही. विषुववृत्ताच्या जवळ गेल्यावरही त्यांना हाच अनुभव आला...अशा वेळी दोंदे सांगतात की, पर्याय काहीच नसतो, तुम्हाला तर पुढे जावंच लागतं, फार तर कधी ऑस्ट्रेलियाच्या ऐवजी तुम्ही मॉरिशसच्या दिशेने जाता...दिशा थोडी बदलावी लागली, तर डेस्टिनेशन तेच आणि पुढे तर जावंच लागतं...दोंदे सांगतात.
सारखं नौकेच्या मर्यादित जागेत राहून खुडकायला होत नाही का, या 'बालसुलभ' प्रश्नावर दोंदे सांगतात, जागा कमी असल्याने पायाला व्यायाम होत नाही, हे खरंय, पण बाकी शरीराला, स्नायूंना नेहमीच्या वर्क आऊटपेक्षाही अधिकच व्यायाम मिळतो. शीड बांधायाची चढ-उतार करण्यात भरपूर मेहेनत असते. रात्री सलग सहा-आठ तास झोप मिळाली, असंही क्वचितच घडलं. झोपलं, तरी नौका पुढे जात असतेच, तेव्हा सावध राहावंच लागतं. जेवणासाठी कुकर, गॅस सगळं होतं, कधी वरणभातही करायचो, पण एकटे असताना साग्रसंगीत जेवण करण्याची हौस वाटत नाही. चार बंदरांमध्ये थांबलो, तेव्हाही नौकेची डागडुजी आणि इतर कामांमध्येच वेळ गेला. नऊ मीटरच्या लाटा आणि ताशी शंभर किलोमीटर वेगाचे वारे अशा परिस्थितीत नौकेचं स्टिअरिंग व्हील तुटलं... असा तांत्रिक पेच उभा राहील, हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. त्यात दिवस गेला, पण त्यातून सावरता आलं. असे अनेक प्रसंग होते... माझ्या मनात एकच होतं, मी परिक्रमा पूर्ण करणार, हे नौदलाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचंय...त्याच बळावर मी परिक्रमा पूर्ण करू शकलो. आता 'म्हादेई'चा वापर इतरही भावी दर्यावर्दीनी करावा, असं मला वाटतं...दोंदे समुदाकडे पाहत सांगत असतात..
#CaptainDilipDonde
अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या. देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते. देवेन वर्मा यांनी १४९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी १५० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते. मा.देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बॉलीवूडमध्ये नव्वदचे दशक गाजवणारी जूही चावला १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हिंदी खेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. अभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे खळाळतं हास्य, चेहऱ्यावर एक हट के नटखटपणा आणि अभिनयातली जबरदस्त अदा. या गोष्टींमुळं या अभिनेत्रीनं एक काळ बॉलिवूडवर अक्षरश: राज्य केलं. जुही चावला ही बॉलीवूडची चुलीबुली अभिनेत्री म्हणुन सुध्दा ओळखली जाते.
बॉ़लीवूडमध्ये जूही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री नावाजली जाते. दोघही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. आमीर- जूही चावलाच्या जोडीने काही सुंदर चित्रपट दिले आहेत. जूही-शाहरुखची जोडी चित्रपटसृष्टीतील एक हीट जोडी राहिली आहे. या दोघांनी राजू बन गया जेन्टलमॅन, डर, डुप्लीकेट, यस बॉस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'गुलाब गँग' या सिनेमातल्या तिच्या खलनायकी भूमिकेचंही कौतुक झालं. जुही चावलाने हॉलीवूडमध्ये काम केले आहे. द हंड्रेड फूट जर्नी या चित्रपटातून जुहीने केले आहे. त्यांनी जय मेहता या गुजराती उद्योगपतीशी त्यांनी १९९८ मध्ये विवाह केला आहे. "आयपीएल‘मधल्या कोलकता नाईट रायडर्स टीमची सहमालकी त्यांच्याकडे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले. मा.भालबा केळकर यांचे ६ नोव्हेंबर १९८७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.
मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते. जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्द फेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८९३ रोजी निपाणी येथे झाला.
दामूअण्णा मालवणकर यांचे पूर्ण नाव दामूअण्णा बापूशेठ मालवणकर. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण त्यांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. तारुण्यात नाटकांच्या ध्यासामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. मात्र १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली.
चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून ङ्गिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडङ्गेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. १९१८ साली दामूअण्णा मालवणकर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हा ते दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकात भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा दीनानाथ मंगेशकरांकडेच राहिले.
१९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटातल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मा. विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. मा. विनायक यांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात मा. विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सावकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.
त्यानंतर विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या. मा.विनायक यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच. १९४७ साली मा. विनायक यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटातून भूमिका केली. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खर्याी अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत. चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत.
त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वत:ची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे सार्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला. राम गणेश गडकरी यांचा ‘तिंबूनाना’, चिं.वि. जोशींचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या.
भारती मंगेशकर म्हणजेच ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी ह्या दामुअण्णा मालवणकर यांची कन्या. पु.ल नी एकदा भारती मंगेशकर यांना बघितले तेव्हा म्हणाले होते " ही मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"
दामूअण्णा मालवणकर यांचे निधन १४ मे १९७५ रोजी झाले.
#DamuAnnaMalvankar
सामाजिक, कौटुंबिक, आरोग्यदायी जाणिवांचे प्रतिबिंब वनितामंडळाच्या विविध कार्यक्रमांतून आणि नभोनाटय़ाच्या निर्मितीतून घडू लागले. ‘अहो प्रपंच’ ही कौटुंबिक मालिका, ‘मंत्र जगण्याचा’ ही ९५ भागांची दीर्घमालिका, रंगभूमीचा इतिहास सांगणारे ‘असं घडलं नाटक’ व ‘किस्से रंगभूमीचे,’ ‘या चिमण्यांनो परत फिरा रे,’ ‘पैठणी’, ‘मातृरूपेण’, ‘विठूच्या या तुळशीच्या मंजिऱ्या’, ‘लेकीचा गं जलम’, ‘स्वयंप्रकाशिता’ अशा असंख्य मालिकांतून अनेक विषय हाताळले.
पुण्यात वडिलांच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली नाममुद्रा उमटविली.
भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने भर घालणाऱ्या सूरश्री केसरबाई केरकर या गोव्याच्या भूमीकन्या. त्यांचा जन्म १३ जुलै १८९२ रोजी झाला. उस्ताद अब्दुल करीम खाँ, प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्यत्व पत्करले. त्या राजे - सरदार मंडळींसाठी नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली. नोबेल पुरस्कारविजेते कवी रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते.
कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने १९४८ साली केसरबाईंना 'सूरश्री अशी पदवी बहाल केली. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. रवींद्रनाथ टागोरांनी 'सूरश्री' किताब बहाल केला. रवींद्रनाथांनी दिलेले गौरवपत्र चांदीच्या चौकटीत घालून केसरबाईंनी शेवटपर्यंत जतन करून ठेवले. संगीत नाटक अकादमीने १९५३ साली 'प्रमुख आचार्या' ही सनद त्यांना बहाल केली. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते.
गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे. केसरबाई केरकर यांचे १६ सप्टेंबर १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
Copyright © 2025 | Marathisrushti