जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि 'सॅल्युलाईड मॅन' अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचा जन्म ६ एप्रिल १९३३ रोजी केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे झाला.
परमेश कृष्णन नायर म्हणजेच पी के नायर यांचे तिरूअनंतपुरम येथेच शालेय आणि उच्च शिक्षण देखील झाले. मोठे होत असताना, त्यांच्यावर तमिळ भाषेमधील पौराणिक चित्रपटांचा विशेष पगडा होता आणि तेंव्हापासूनच त्यांना चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी केरळ विद्यापीठातून पदवी मिळवली, पण त्यांचे सर्व लक्ष मात्र चित्रपटांकडे होते आणि शेवटी १९५३ साली, ते केरळमधील सगळे सोडून मुंबईमध्ये आले आणि त्यांचा एक अनोखा प्रवास सुरु झाला. विशेष म्हणजे नायर यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून, त्या काळी काम केले आहे. नावेच घ्यायची झाली, तर बिमल रॉय किंवा मेहबूब खान, तसेच ऋषिकेश मुखर्जी आणि अजून अनेक मान्यवर दिग्दर्शक. पण त्यांना चित्रपट बनवण्याची कला शिकताना हे उमजले, की ते चांगले दिग्दर्शक कदाचित होऊ शकणार नाही. त्यासाठी लागणारे कौशल्य किंवा प्रतिभा त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच १९६१ साली त्यांनी ‘फिल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टीटयूट ऑफ इंडिया’ (एफ.टी.आय.आय) येथे रिसर्च असिस्टंट हे पद स्वीकारले. नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया संग्रहालयाची सुरुवात देखील याच संस्थेतून झाली. १९६४ साली संग्रहालयाची स्थापना झाली आणि त्यानंतरच नायर यांची नेमणूक असिस्टंट क्युरेटर म्हणून तिथे करण्यात आली. नायर यांना ‘प्रभात फिल्म कंपनी’, ‘वाडिया मुव्हीटोन’ आणि ‘जेमिनी स्टुडियो’ने बनविलेल्या चित्रपटांच्या संग्रहाचा खूप अभिमान होता. तसेच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक, हे त्यांचे खास मित्र होते आणि त्यामुळे त्यांचे अनेक चित्रपट आज चित्रपट संग्रहालयात शाबूत आहेत. ऋत्विक घटकांची ‘मेघे ढाका तारा’ त्यांना नायर यांना खूप आवडायची.
नायर यांनी शून्यातून हे संग्रहालय उभे केले आहे. त्यांनी जवळपास १२००० चित्रपट संग्रहित केले आणि त्यामधील तब्बल ८००० चित्रपट भारतीय आहेत. जुन्या चित्रफिती, भारताच्या काना कोपऱ्यातून शोधणे आणि त्यांचे संवर्धन करून त्या कायमच्या संग्रहित करणे, या कामाने नायर झपाटलेले होते. त्यांनी अनेक जुने, हरवलेले असे चित्रपट मिळविले आणि शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संवर्धन केले. भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे ४,००० चित्रपट संग्रहित आहेत.
२०१२ साली शिवेंद्रसिंग डुंगरपुर या चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाने नायर यांच्या आयुष्यावर एक माहितीपट बनविला आणि तो म्हणजे ‘सेल्युलॉईड मॅन’. या माहितीपटाने नायर यांचे आयुष्य पूर्णतः उलगडले आणि त्यांच्या कामाचे महत्व लोकांसमोर आणले. या माहितीपटाला २ राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. हा माहितीपट बनवला गेला नसता, तर खूपच कमी जणांना नायर यांच्या कामाची माहिती आणि महत्व कळाले असते. ‘सेल्युलॉईड मॅन’ने नायर यांचे आयुष्यच संग्रहित केले आहे. नायर यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. पी. के. नायर हे पुण्यातील आशय फिल्म क्लबचे अध्यक्षही राहिले होते.
पी. के. नायर यांचे ४ मार्च २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दांपत्यांनी नगराध्यक्ष म्हणून भूषविले आहे व आजही सत्ता त्यांच्याकडे असून नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी नफिसाबेगम अब्दुल सत्तार असून नगरपरिषदेच्या एकूण एकोणतीस सदस्यांपैकी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस नगरसेवक सभागृहात आहेत.
जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला. १९५४ साली व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक कलाकार म्हणून जयश्री गडकर यांनी सुरवात केली. १९५५ साली रशियन नेते कुश्चेव्ह आणि बुल्गानिन यांच्या हिंदुस्थान दौऱ्यातील पुणे भेटीवेळी संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी नृत्य केले. ते नृत्य पाहूनच दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांनी जयश्री गडकर यांना "दिसतं तसं नसतं' चित्रपटात लावणी नर्तिका म्हणून भूमिका दिली. भालजी पेंढारकर यांनी "गाठ पडली ठका ठका' या चित्रपटात त्यांना प्रथम नायिकेची संधी दिली. सूर्यकांत त्यांच्या नायकाच्या भूमिकेत होते. त्यानंतर या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. त्यातल्या "बुगडी माझी सांडली गं' या गाण्याला आणि नृत्याला लोकांनी डोक्यावर घेतलं.
तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा - लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश्नाना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. १९५९ साली आलेल्या अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावरील "सांगत्ये ऐका' या चित्रपटाने इतिहास घडवला. ‘"सांगत्ये ऐका'पासून दिग्दर्शक अनंत माने आणि नायिका जयश्री गडकर असे यशस्वी चित्रपटाचे समीकरण तयार झाले.
तमासगिरीणीची भूमिका साकारणाऱ्या जयश्री गडकर यांनी त्याच ताकदीने "मानिनी'मधली सालस, सात्त्विक, सोशीक पण जिद्दी मालती साकारली. "साधी माणसं' चित्रपटात त्यांनी मेकअप न करता लोहाराच्या पत्नीची भूमिका साकारली. "मोहित्यांची मंजुळा', "पवनाकाठचा धोंडी', "एक गाव बारा भानगडी', "मल्हारी मार्तंड', "अशीच एक रात्र होती', "लाखात अशी देखणी', "सुगंधी कट्टा' हे त्यांचे चित्रपट ग्रामीण आणि शहरी भागात तुफान गाजले."जिव्हाळा' चित्रपटातील त्यांच्या तोंडी असलेले "या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या' हे आर्त गाणे आणि त्यावेळचा अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहे. "घरकुल' चित्रपटातील "पप्पा सांगा कुणाचे' हे अरुण सरनाईक यांच्यासोबतचे त्यांचे गाणेही खूप प्रसिद्ध झाले.
मराठी, हिंदी, पौराणिक अशा २५० चित्रपटांत त्यांनी काम केले. रामानंद सागर यांच्या "रामायण' मालिकेत त्यांनी कौसल्येची भूमिका केली. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, पाच वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, २००३ साली व्ही. शांताराम पुरस्कार आणि २००८ साली "चित्रभूषण' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत ‘सांगत्ये ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘शाहीर परशुराम’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वैशाख वणवा’, ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘जिव्हाळा’, ‘घरकुल’, ‘सुगंधी कट्टा’ यांचा समावेश होतो.
जयश्री गडकर यांनी "सासर-माहेर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर "अशी असावी सासू' या चित्रपटाची निर्मिती, कथा, लेखन, दिग्दर्शन केले होते. अभिनेते बाळ धुरी हे त्यांचे पती. जयश्री गडकर यांचे २९ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयश्री गडकर यांचा जीवनपट
https://www.youtube.com/watch?v=O2TB0JM5N54
जयश्री गडकर यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=CeG2tvGeAiI
https://www.youtube.com/watch?v=Ux154gVQE6Q&list=PLrw5tGo-hU-v_Vm7TnEyN0Dme7V4X4ZeG
शम्मी कपूर यांनी गंभीर भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशालचेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन्न करणारे अभिनेतेही हवे असतात. जे आपल्याला आयुष्यात करणे शक्य नाही, ते पडद्यावरील अभिनेत्याच्या माध्यमातून उपभोगून घेण्याची ही सामान्य माणसाची गरज शम्मी कपूर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
‘तुमसा नही देखा’ या चित्रपटाने त्यांना यशाची खरी चव चाखायला मिळाली, तरी तोपर्यंतचे त्यांचे चित्रपट साफ कोसळले होते. इतके की चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची त्यांनी तयारी चालविली होती. तेव्हा ‘तुमसा नही देखा’ लोकप्रिय झाला. हिंदी नायकाला लागणारे देखणेपण त्यांच्याकडे होते, पण नायकाची बांधेसूद व कमावलेली देहयष्टी नव्हती. त्यांनी जी वैविध्यपूर्ण नृत्ये केली आहेत, तशी सध्या नृत्याचे पध्दतशीर शिक्षण घेतलेल्या अभिनेत्यांनाही करणे जमणार नाही. त्यातही पडद्यावरील त्यांची बरीचशी नृत्ये ही त्यांची स्वत:ची होती. त्याकाळी स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक नेमण्याची पध्दत नव्हती. त्यामुळे अभिनेत्याला स्वत:लाच गाण्याच्या भावार्थानुसार नृत्य करावे लागे.
धसमुसळा, रांगडा प्रणय, नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली आणि गीत संगीताची मेजवानी देत एका पाठोपाठ मनोरंजक चित्रपटांचा धडाका लावणारे म्हणून शम्मी कपूर यांची खासीयत होती. १९६०च्या दशकावर शम्मी कपूर यांनी अधिराज्य गाजविले होते. ‘जंगली’ या चित्रपटात त्यांनी ठोकलेल्या ‘याहू’ अशा रोमॅंटिक आरोळीने त्यापुढील चार पिढय़ांवर आपली मोहिनी कायम ठेवली आहे.
ही त्यांच्या वागण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, नाच करतानाची बेभान अदा यासारख्या गोष्टींमुळे शम्मी कपूर यांनी आपले एक स्थान निर्माण केले होते. ‘जंगली’, ‘काश्मीर की कली’, ‘ऍन इव्हनिंग इन पॅरीस’, ‘तीसरी मंझील’, ‘ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांनी त्यांना बॉलीवूडमध्ये अढळस्थान मिळवून दिले. नव्या अभिनेत्रींना पदार्पणाची संधी देण्याबद्दल त्यांचे स्थानही महत्त्वाचे आहे.
जगात नवीन काय घडत आहे, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. संगणक आणि इंटरनेटशी दोस्ती करणाऱ्या भारतातील अगदी प्रारंभीच्या व्यक्तींपैकी शम्मी कपूर हे एक होते. ‘याहू!’ कंपनीने आपले भारतातील कार्यालय सुरू केले तेव्हा शम्मी कपूर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. ‘याहू!’शी शम्मी कपूर यांचे असलेले रुपेरी नाते हे जसे त्यास कारण होते, तसेच त्यांचे इंटरनेटचे प्रेम आणि त्याबद्दलची माहिती हेही त्याचे कारण होते. ‘याहू!’ ही त्यांच्या मालकीची वेबसाइट आहे का, अशी विचारणा अनेकदा लोक त्यांना करीत. स्वत:ची वेबसाइट निर्माण करणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते.
शम्मी कपूर यांचे निधन १४ ऑगस्ट २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=0prXbQEgFkI
शम्मी कपूर यांची माहिती आजकी फनकार कार्यक्रमात.
https://www.youtube.com/watch?v=igrDASLbC2w
शम्मी कपूर यांची अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=A-4aWPj2u4U
https://www.youtube.com/watch?v=A3UaHh41EFk
https://www.youtube.com/watch?v=95pl9bqnFdA
बॉलीवुड चे प्रसिध्द निर्माते दिग्दर्शक ज्योति प्रकाश दत्ता उर्फ़ जे.पी.दत्ता यांचा जन्म ३ आक्टोबर १९४९ रोजी झाला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता ओ.पी.दत्ता हे जे.पी.दत्ता यांचे वडील.
५ डिसेंबर १९७१, लोंगेवालाची लढाई या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत जे.पी.दत्ता यांनी "बॉर्डर" हा चित्रपट अतिशय रोमांचकारी आणि स्फ़ूर्तीदायक असाच बनवला होता. असेच कारगीलचे युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादितयुद्ध होते.एल.ओ.सी कारगीलहा जे.पी.दत्ता यांचा चित्रपट कारगील युद्धात मरणपावलेल्या हुतात्म्यांच्या जीवनावरआधारित आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक काळ सराव करणाऱ्या अली अकबर खाँ यांना त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी संगीताचे धडे देत होते. १९७२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर उस्तादांनी घराण्याची संगीताची परंपरा अखेरयत कायम ठेवली. वयाच्या १३ व्या वर्षी अलाहाबादला पहिला जाहीर कार्यक्रम करणाऱ्या खाँसाहेबांनी २० व्या वर्षी एचएमव्हीसाठी लखनौला ध्वनिमुद्रण केले. जोधपूर घराण्यात राजगायक म्हणून सात वर्षे काम करत असतानाच त्यांना उस्ताद हा पहिला सन्मान बहाल केला गेला. लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांच्या विनंतीवरून १९५५ ला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम केल्यापासून त्यांना व भारतीय शास्त्रीय संगीताला साऱ्या संगीत विश्वाचे दरवाजे खुले झाले. १९५६ मध्ये कोलकात्ता येथे त्यांनी अली अकबर संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. पाश्चिमात्य जगाचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून १९६५ मध्ये अमेरिकेत संगीत केंद्र सुरू केले.
कॅलिफोर्नियात अली अकबर संगीत महाविद्यालय स्थापन केल्यानंतर स्वित्झर्लण्डमध्येही त्यांनी त्याची शाखा उघडली. जगभर दौरे करणाऱ्या उस्तादांनी चेतन आनंद यांच्या आँधिया, आयव्हरी-र्मचट यांच्या हाऊस होल्डर, सत्यजित रे यांच्या देवी, बर्नाडो बटरेलुस्सी यांच्या लिटल बुद्धा इ. चित्रपटांनाही त्यांनी पाश्र्वसंगीत दिले. भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून देणाऱ्या उस्तादांचे पौर्वात्य व पाश्चिमात्य संगीतविश्वात असंख्य चाहते आहेत. जगविख्यात व्हायोलिन वादक लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांनी तर त्यांचे ‘ग्रेटेस्ट म्युझिशियन इन द वर्ल्ड’ असे वर्णन केले होते. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सरोदवादनाचा कार्यक्रम करण्याची विनंती भारतीय राजदूतवासाने केली होती. अमेरिकेत त्यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप बहाल केली होती. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. खाँसाहेब पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील अढळ ध्रुवतारा म्हणून गेली पाच दशके ओळखले जात होते. अली अकबर खाँ यांचे १८ जून २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली.
जन्म. २४ एप्रिल १९४७
अरुण काकतकर हे एक चालते बोलते सांस्कृतिक केंद्र आहे. ते दूरदर्शन वर नोकरीत असताना त्यांचे मुंबईतले घर म्हणजे अनेक मराठी कलाकारांचे मुंबईत उतरण्याचे हक्काचे ठिकाण होते. अरुण काकतकर हे नांव आता पन्नाशीच्या अलिकडे पलिकडे असणाऱ्या सर्व मराठी माणसांच्या डोळ्यांपुढचं नांव. सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत दूरदर्शनच्या सुवर्णकाळातले ते निर्माते. प्रतिभा आणि प्रतिमा, सुंदर माझं घर अशा नुसत्या नावांनीही या पिढीच्या अंगावर रोमांच उभे राहतात. प्रतिभा आणि प्रतिमा, सुंदर माझं घर, युवदर्शन, शब्दांच्या पलीकडले, सायन्स् रिपोर्ट्, नाटक, स्पोर्टस् राउंड अप,आरोही या सर्वाचे निर्माते असायचे अरुण काकतकर.
दूरदर्शनवर सुमारे पंधरा वर्षे अनेक मालिकांची निर्मिती आणि इतर सेवा केल्यानंतर १९८७ ते २००५ पर्यत अरुण काकतकर यांनी 'बालचित्रवाणी'चे निर्मिती उपप्रमुख म्हणून काम बघितले होते, तेव्हा अरुण काकतकर यांनी दहा वर्षे स्वतःला बालचित्रवाणी मध्ये लहान मुलांचे मनोरंजन करत वाहून घेतले होते.
दूरदर्शनच्या दर्जेदार कार्यक्रमांचे निर्माते म्हणून काम करत असताना अरुण काकतकर यांनी स्मिता पाटील, लक्ष्मीकांत बेर्डे अशांना दूरदर्शन वर आणले. त्यांनी दूरदर्शनवर पु लं देशपांडे, सुधीर फडके (बाबुजी) आणि ग. दि. माडगुळकर (अण्णा) मैफील जमवली होती. अरुण काकतकर यांनी विनय धुमाळे, सुधीर गाडगीळ, समीरण वाळवेकर यांना कायम प्रोत्साह्नन दिले.आरोही हा कार्यक्रम त्यांनी एक वर्ष सादर केला व त्यातील पहिला कार्यक्रम लता मंगेशकर यांचा होता. जितेंद्र अभिषेकी, आशाताई, लतादिदींना दूरदर्शनवर लाईव्ह आणण्याचे श्रेय अरुण काकतकर यांना जाते.
दिग्दर्शक अंकुर काकतकर हे त्यांचे चिरंजीव आहेत. अंकुर काकतकर यांनी अनेक नाटके व चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गोंद्या आला रे वेब सिरीज मालिकेचे दिग्दर्शन अंकूर काकतकर यांनी केले आहे. ढोलताशे या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
अरुण काकतकर यांच्या कडे अनेक जुन्या दर्जेदार कार्यक्रमांच्या दुर्मिळ ध्वनिचित्रफिती आहेत. विदुषी माणिक वर्मा, डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, सुरेश भट,पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशाताई भोसले, किशोरीताई आमोणकर, मोगुबाई कुर्डीकर आणि लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गजांच्या अजरामर कार्यक्रमांची अरुण काकतकर यांनी निर्मिती केली आहे.
अरुण काकतकर यांची आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली असून "नक्षत्रांचे दिवस" आणि अनुभवसिद्ध अल्पाक्षरी+ दासबोध भासबोध ही पुस्तकं अंधांसाठी ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित झाली आहेत. इतर पुस्तकं.. ठसे आणि ठोसे, नक्षत्रांचे दिवस, ठोसबोध(९०० ओव्या), ई-बुक्स्.. मनगुंफी, आशयसूत्रे ओविले शब्द (१६०० ओव्या), कॉफी टेबल बुक: जगन्नाथे केले...(जगन्नाथ जाधव CEO, B G SHIRKE GROUP, यांचं आत्मचरित्र), (घ)बाड.. हे पुस्तक छपाईं च्या प्रक्रियेत आहे. अरुण काकतकर यांचे मनगुंफी हे पहिलं ई पुस्तक आहे. आनंद माडगूळकर, नीला सत्यनारायण, विनय हर्डीकर, अशा अनेक नामवंतांनी त्यांचे लिखाण गौरवलेले आहे. सध्या ते पुणे येथे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
२०१६ मध्ये अरुण काकतकर यांना स्वरशब्दप्रभू पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली.
त्यांच्या लेखनाचे विषय प्रामुख्याने भारतातील अधिसूचित जनजाती, आदिवासी , दलित , वंचित समुदाय हे होते.
Copyright © 2025 | Marathisrushti