(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल

    पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल यांचा जन्म १५ जून १९५० रोजी सादुलपूर, राजस्थान येथे झाला.

    लक्ष्मी मित्तल हे ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत भारतीय समजले जातात. लक्ष्मी मित्तल यांचे शालेय शिक्षण कोलकाताच्या श्री दौलतराम नोपानी स्कूल मध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये झाले. तेथे त्यांनी बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या 'ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स' या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत. त्या काळी लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी ‘मित्तल इस्पात’ असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला. इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले. मित्तल बंधूंमध्ये १९९४ साली संपत्तीची वाटणी झाल्यानंतर दोन वेगळे उद्योग समूह अस्तित्वात आले होते. त्यानंतर लक्ष्मी मित्तल यांनी २००६ ‘आर्सेलर मित्तल’ची स्थापना केली. सध्या लक्ष्मी मित्तल ‘आर्सेलर मित्तल’चे सीईओ व चेयरमेन काम बघत आहेत. २००७ मध्ये भारत सरकारने लक्ष्मी मित्तल यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच २००८ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना फोर्ब्ज मासिकाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. २०१३ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना ‘चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे इंग्लिश फुटबॉल क्लब 'क्वींस पार्क रेंजर्स'ची ३३ % मालकी आहे.

    अमेरिकेतील ‘केल्लोग्स स्कूल ऑफ मैनेजमेंट’ च्या सल्लागार बोर्डवर व 'क्लीवलैंड क्लिनिक' च्या 'बोर्ड ऑफ ट्रस्टीज' चे सदस्य लक्ष्मी मित्तल राहिले आहेत.२००३ मध्ये लक्ष्मी मित्तल व त्यांच्या ऊषा मित्तल फाउंडेशनने राजस्थान सरकार बरोबर जयपुर मध्ये 'एल.एन.एम. इंस्टीट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी' ची स्थापना केली आहे.

    लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नीचे नाव उषा मित्तल आहे. उषा मित्तल या फारच हुशार असल्याचे बोलले जाते. आपल्या पतीच्या व्यवसायात त्यांना त्या नेहमी मदत करत असतात. उषा मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगले काम उभे केले आहे. त्यांचे चिरंजीव हे त्यांच्या बरोबरच आदित्य मित्तल या व्यवसायात आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • गझल-गायक हरिहरन

    हरिहरन मुंबईत लहानाचे मोठे झाले. विज्ञान व कायदा या शिक्षण शाखांच्या पदव्या घेतल्या आहेत. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९५५ रोजी झाला.हरिहरन यांनी हिंदी, मल्याळम, कन्नड, मराठी अशा अनेकविध भाषांत गाणी म्हणली आहेत. ते एक उत्तम गझल-गायकही आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. अलमेलू हे त्यांचे संगीतातले पहिले गुरू होते. संगीतकार रेहमान यांनी हाय रामा(रंगीला), सून री सखी (हमसे है मुकाबला), भारत हमको जानसे प्यारा है (रोजा) या गाण्यांतून शास्त्रीय-उपाशास्त्रीय धाटणीचा गायक अशी मा.हरिहरन यांची प्रतिमा निर्माण केली आणि ‘टेलिफोन धून मे हसने वाली’ (हिंदुस्थानी), यू ही चलाचल (स्वदेस) सारख्या उडत्या चालीच्या गाण्यांनी ती धुऊन काढली. रेहमान-हरिहरन जोडीने दिलेली सर्वात सुंदर गाणी विरहगीत या प्रकारात मोडतात. रोजा जानेमन (रोजा), तू ही रे.. (बॉम्बे), चंदा रे चंदा रे (सपने) हरिहरन यांनी गायलेल्या चित्रपट-गीतांमधील यादें(यादें), झौका हवा का (हम दिल दे चुके सनम), कितनी बातें(लक्ष्य), ही विरहगीते नेहमीच मनात घर करून बसतात. हरिहरन यांनी भारतीय फ्युजन संगीतात मूलभूत काम केले. त्यांचा अल्बम "कलोनियल कझिन्स‘ याची साक्ष देतो. कलोनियल कझिन्स! हा एक गाजलेला अल्बम यातील ‘कृष्णा नीबे..’ ‘ओ हो काय झालं..’ ‘सा नि धा पा..’ अशा गाण्यांनी लेस्ली लुईस आणि हरिहरन या जोडीने भारतीय संगीतात एका वेगळ्याच संगीतप्रकाराची भर घातली. पण, गझल हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय. "गझल तुम्हाला नेहमीच मध्यममार्गी अनुभव देते. खयाल, ठुमरी, कव्वाली असे केवढे तरी वैविध्य यात आहे. संगीतात तीन दशकांहून आपल्या अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी नौशादजींपासून जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, इलयाराजा, रहेमान, अजय-अतुल आणि त्यांचा मुलगा अक्षय अशा अनेक संगीतकारांसोबत काम केले. अक्षयने गेल्या वर्षी आलेल्या "कोकणस्थ‘ला संगीत दिले होते. २००४ साली हरिहरन यांनी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    हरिहरन यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=qlUvCY2rp08
    https://www.youtube.com/watch?v=1kEjXAzir3Q
    https://www.youtube.com/watch?v=RR1bIAPM3Ro
    https://www.youtube.com/watch?v=j6fNKK2GBBk
    https://www.youtube.com/watch?v=CJvK0dox0_M
    https://www.youtube.com/watch?v=cuMYU4bqZ_A

  • कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई

    जागतिक कीर्तीचे चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.

    नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.

    प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई!

    एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणाऱ्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओमध्ये या स्टुडिओची गणना होते.

    नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकापासून हे नाव छोट्या पडद्याला व मोठ्या पडद्याला आपलं रुपडं देत आलं आहे. भारतातील प्रत्येक मोठा चित्रपट किंवा दूरदर्शनवरील प्रकल्प हा नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाने सजत असतो. भारत की खोज सारखी ऐतिहासिक महत्वाची मालिका असो किंवा लगान सारखा अफाट चित्रपट असो. त्या प्रकल्पावर नितीन देसाई हे असणारच! त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील चौकजवळ हा स्टुडीओ उभारायला घेतला. एक भव्य स्वप्न सृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे.

    शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ते, सहकार्याला कायम उत्सुक असणारे गावकरी आणि नयनरम्य पार्श्वभूमी ही या स्टुडिओची खासियत आहे. आज खालापूर कर्जतचे नाव एक कलापूर या नात्याने सर्वदूर पसरण्यात एन् डी स्टुडिओचा फार मोठा सहभाग आहे. स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसरातील अर्थकारण आणि समाजकारण बर्‍ यापैकी बदललं आहे. या परिसरात भारतातील छोटे मोठे सर्व कलाकार येतात, हजारो जणांना रोजगार मिळतो, याबरोबरच एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोडधंदे सुरू होत जातात.

    एकूणच सारा भाग हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अनेक कंपन्या बंद पडत असताना, एन् डी स्टुडिओमुळे काही प्रमाणात सावरला गेला आहे. आमीर खानचा द रायझिंग हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्यानंतरचा महत्वाचा चित्रपट. १८५७ चा भारला गेलेला कालखंड असेल किंवा मुंबईची अफाट गर्दी वाहून नेणारा गजबजलेला हमरस्ता असेल, तो तेथे साकारला गेला. जोधा अकबर सारखा पिरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला येथे दिमाखाने त्यातील सर्व बारकाव्यांसह स्टुडिओमध्ये उभा केला गेला.

    ग्रेट कॉमेडी सर्कस, बिग बॉससारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. राजा शिवछत्रपति सारखी भारतीय दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. छत्रपतींची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले, आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. यासंदर्भात बोलताना श्री नितीन देसाई म्हणाले की, हे सर्व सेट आम्ही निर्माण केले पण ते आम्ही मोडणार नाही, ते तसेच जतन करून ठेवणार, या प्रत्येक सेटला एक ऐतिहासिक महत्व आहे याची जाणीव आम्हाला आहे.

    भारतीय कलाइतिहासाची ही सोनेरी पाने आहेत. हा स्टुडिओ म्हणजे लवकरच एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आज अनेकदा ही मयसृष्टी आणि सर्वसामान्य माणसं यांच्यात अंतर पडलेले आपणांस जाणवते. हे अंतर या निमित्ताने कमी होईल आणी कलावंताबद्दलच्या आकर्षणाबरोबरच या कलावंताला आपली कला जोपासायला, पडद्यावरील आपली व्यक्तिरेखा साकारताना किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात याची नम्र जाणीव आम्ही करून देऊ शकू. एका दृष्टीने ते लोकशिक्षणच असेल.

    आमच्या स्टुडिओमध्ये एकाच वेळी शेकडो कलावंतांची, सहयोगी तंत्रज्ञांच्या राहण्याची, जेवण्याची, अखंड विद्युत पुरवठ्याची आम्ही सोय करू शकतो. आज आमच्या कंपनीचं प्रचंड मोठं असं कार्यालय पवई येथे आहे. एका सामान्य कुटुंबात मी जन्माला आलेलो असल्यामुळे मला माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या लोकांसमोर विनम्र असं उदाहरण ठेवता येतं आहे यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. एन् डी स्टुडिओने आता स्वत:ची कंपनी स्थापन करून नव्या दूरचित्रवाणी मालिका, नवे चित्रपटही घडवायला सुरुवात केली आहे.

    राजा शिवछत्रपति या मालिकेच्या निर्मितीबरोबरच तुफान गाजलेल्या महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांची निर्मिती एन् डी स्टुडिओने केली आहे. जगातील सात आश्चर्ये येथे उभी करून ज्यांना ज्यांना ही आश्चर्ये पहाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी त्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या जातील, येथे एक जागतिक दर्जाचं म्युझियम बनविण्याचा श्री देसाई यांचा मानस आहे.

    एन् डी स्टुडिओ हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जिद्द, चिकाट आणि कला यांच्या सहाय्याने साकारलेलं सत्य-स्वप्न आहे! नितिन देसाई यांच्यावर ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’

    लेखक मंदार जोशी. हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

    नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्याव एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचाऱ्याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कुतुहल शमविणारं हे पुस्तक आहे.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई (6-Aug-2021)

    दिग्दर्शक नितीन देसाई (6-Aug-2017)

    #NitinChandrakantDesai

  • फॅशन डिझायनर विक्रम फडणीस

    दिग्दर्शक म्हणून करीयर करायचं हे विक्रम फडणीस यांनी आधीपासूनच ठरवलं होतं, मात्र त्यांच्या करीयरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून झाली.

  • सुप्रसिद्ध गायिका राजकुमारी

    त्यांना लहानपणी गाणे शिकण्याची संधी मिळाली नाही परंतु घरच्यांनी मात्र तिला कधी आडकाठी केली नाही , तर गाण्यासाठी उत्तेजनच दिले. त्यानी पहिले गाणे वयाच्या १० व्या वर्षी गायले . त्यांनी आपले करिअर स्टेजपासून सुरु केले. प्रकाश पिक्स्चर्सचे विजय भट आणि प्रकाश भट यांनी त्याना एका स्टेज शोजमध्ये पाहिले. तेव्हा त्यांनी सांगितले तू स्टेजचे काम सोड तुझा आवाज खराब होईल कारण त्यावेळी माईक सिस्टीम नव्हती. त्यानंतर त्या प्रकाश पिक्चर्स मध्ये कामाला लागल्या.

  • सुरेंद्र शांताराम दिघे

    सुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत. जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे ही संस्था १९९२ साली स्थापन झाली. जिद्द-ज्ञान-साहस या चित्रसूत्रांवर आधारित गेले जवळ जवळ २० वर्ष काम करत आहे.

  • चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके

    अमूक एका चौकटीत बसणारा अभिनेता असं कुशलचं वर्णन करता येत नाही. कुशलचा अभिनय, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, संवादांची फेक, अभिनयाची उंची हे सारं पाहता कुशल येणाऱया काळात छोटय़ा पडद्यापेक्षा रूपेरी पडदा चांगलाच गाजवेल, अशी खात्री मला वाटते. कलाकार चेहऱयापेक्षा त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, ही जाण असलेले दिग्दर्शक पुढे आले की कुशलचा हात अभिनय क्षेत्रात कोणी धरणार नाही, हे नक्की!

  • निरूपा रॉय

    बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला. बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते. निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, ज्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली. निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुणसुंदरी' या गुजराती सिनेमामधून केली. 'हमारी मंजिल' या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

    १९५१ मध्ये त्यांचा 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या यशानंतर त्या प्रेक्षकामध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. याचदरम्यान त्यांनी 'वीर भीमसेन' सिनेमामध्ये द्रोपदीची भूमिका साकारली होती. १९५३ मध्ये रिलीज झालेला 'दो बीघा जमीन' हा निरुपा रॉय यांचा आवडता सिनेमा आहे. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात त्यांनी एका शेतकर-याच्या पत्नीची भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.निरुपा रॉय यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक धार्मिक सिनेमे केले. देवीची भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंत केलं.

    निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' सिनेमामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे. निरुपा यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मा.निरूपा रॉय यांचे निधन १३ आक्टोबर २००४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आत्माराम भेंडे

    सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला.आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, बॉलिवूड, जाहिराती, हिंग्लिश नाटकं आणि मालिकांमधून रसिकांना निखळ आनंद देणारे, त्यांच्या मनात प्रेमाचं-आदराचं स्थान मिळवणारे आत्माराम भेंडे यांनी, 'एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते' म्हणून स्वतःचा ठसा उमटवला होता.

    रसिकांना हसवण्यासाठी अंगविक्षेप किंवा कुठलाही थिल्लरपणा करायची गरज नसते, तर चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दफेक आणि टायमिंगमधून उत्तम विनोदनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिलं होतं. रंगभूमी, सिनेमा, जाहिराती, मालिकांमध्ये ते अगदी लिलया वावरले होते. फक्त अभिनेते म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती.

    ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    http://www.marathisrushti.com/articles/atmaram-bhende/

    # Bhende, Atmaram

  • सर्वाधिक वयाचे निवृत्त हयात पोलीस अधिकारी विश्वेश्वर चटर्जी

    इंडियन पोलीस सर्व्हिस हे नावही ज्या काळात 'पोलीस सेवेला दिलं गेलं नव्हतं, त्या काळात पोलीस सेवेत वरिष्ठ पदावर रूजू झालेले आणि निवृत्त हयात पोलीस अधिकाऱ्यांमधले देशभरातले सर्वाधिक वयाचे ज्येष्ठतम पोलीस अधिकारी म्हणून गणले जाणारे विश्वेश्वर चटर्जी रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. चटर्जी ब्रिटीश सत्ताकाळात पोलीस सेवेत दाखल झालेले १९४० च्या बॅचचे अधिकारी. त्या बॅचच्या अधिकाऱ्यांपैकी ९१ वर्षे वयाचे रणजीत गुप्ता हयात आहेत. बंगालमधल्या सेरामपूरमध्ये गुप्तांनी चटर्जीनंतर सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून काम केले.

    स्वाभाविकपणेच चटर्जी गेल्याचे कळताच त्यांच्या आठवणी जागवल्या त्या गुप्तांनी. चटर्जी मूळचे अविभक्त बंगालचे. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर चटर्जी पोलीस सेवेत दाखल झाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास चटर्जी कोलकाता पोलीस दलात उपायुक्त पदावर होते. हाझरातील अॅलेंबरी कंपनीतील कामगार आंदोलन हाताळण्याची जबाबदारी चटर्जीवर होती. चटर्जीनी ते आंदोलन कौशल्याने हाताळलेच, पण गुप्तचर खात्यात काम करीत असताना आपल्यातील अंगभूत नेतृत्वाची, राजकीय विश्लेषणाची आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या चिकित्सक अभ्यासाची चुणूकही राज्यकर्त्यांना दाखवून दिली.

    १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत-चीन सीमावर्ती भागासाठी स्वतंत्र रक्षक दल स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकारने केला तेव्हा स्वाभाविकपणेच चटर्जीची निवड त्या दलाच्या प्रमुखपदासाठी करण्यात आली. हा सीमावर्ती भाग सव्वा दोन हजार किलोमीटरचा. त्याचं रक्षण करण्यासाठी लागणारं दल खरं तर कितीतरी मोठ्या संख्येचं. पण प्रारंभी अवघ्या चार बटालियन्सच्या जोरावर दलाचं काम सुरू झालं.

    आज लडाखमधल्या काराकोरम खिंडीपासून अरूणाचल प्रदेशातल्या दिफू ला पर्यंत या दलाचं कार्यक्षेत्र विस्तारलं आहे. माऊंटेनिअरिंग, डिझास्टर मॅनेजमेंटबरोबरच न्यूक्लिअर, बायॉलॉजिकल आणि केमिकल डिझास्टर्स हाताळण्याचं काम हे दल करतं. प्रारंभीच्या काळात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल नावानं ओळखल्या जाणाऱ्या या दलासाठी स्वंत्र महासंचालक नव्हताच. चटर्जीनी पहिलं दशकभर दलाचे महानिरिक्षक र चटर्जी म्हणून काम पाहिलं, पण या काळात आणि त्यानंतर त्यांनी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाला जो आकार दिला, जी दिशा दिली, तिनं भारताच्या सर्व सुरक्षा दलांमधलं मानाचं दल म्हणून इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल ओळखलं जाऊ लागलं. १९६४ मध्ये एलिंट नावाचं एक गुप्तवार्ता अभियान चालवण्यात आलं. एलिंटचा अर्थ होता, 'इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्ट अॅण्ड अॅनॅलिसिस ऑफ इंटेलिजन्स'. १६ ऑक्टोबर १९६४ ला चीननं आपल्या पहिल्या अण्वस्त्र उपकरणाची चाचणी केली. चीनची अण्वस्त्रक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढल्याची धास्ती त्या घटनेनंतरच अमेरिका आणि भारताच्या मनात उत्पन्न झाली. चीननं ज्या ठिकाणी ही चाचणी केली ते ठिकाण इतकं सुदूर आणि आडबाजूला होतं की गुप्तचरांकडून त्याविषयीची माहिती सहजासहजी मिळणं शक्यच नव्हतं. सीआयएनं रॉ आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या सहकार्यानं 'एलिंट' हे शोध अभियान हाती घेतलं ते त्यासाठी. नंदादेवी शिखर मोहीमेच्या नावाखाली एम. एस. कोहली या गिर्यारोहकानं त्या शिखरावर एक शोध-उपकरण बसवायचा प्रयत्न केला. ते उपकरण बसलंही, पण पाठोपाठ हिमवादळ आलं आणि मोहीम अर्धवट सोडून तुकडीला परत यावं लागलं. पुन्हा एकदा तीच मोहीम हाती घेण्यात आली, पण उपकरण जे हरवलं ते हरवलंच. १९७४ मध्ये चटर्जी निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा बराचसा काळ त्यांनी सामाजिक सेवांसाठी घालवला. दक्षिण दिल्लीतील सत्यनारायण मंदिराचे ते संस्थापक होतेच पण रायसीना बंगाली स्कूलचेही ते तीन दशकांहून अधिक काळ अध्यक्ष होते. इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशनशी त्यांचे निकटचे संबंध तेव्हापासून राहिले ते अखेरपर्यंत!